Monday, November 25, 2019

ग्रहणांतील भीती

सूर्यग्रहण म्हणजे आपल्यात खगोल सृष्टीचा एक अद्भुत चमत्कार आहे! लहानपणी सर्वात पहिलं ग्रहण अर्थात खग्रास सूर्यग्रहण माझ्या वाढदिवशी 25 ऑक्टोबर 1995 ला पाहिलं होतं. रस्त्यावरची सामसूम आणि इतर कर्मकांड त्यावेळेस पहिल्यांदाच पाहिली व अनुभवली. रस्त्यावर पडलेल्या रिकाम्या गुटख्याच्या कव्हर मधून पाहिलेले ते सूर्यग्रहण आजही ध्यानात आहे. आमच्या वैज्ञानिक दृष्टिकोन त्यावेळेस आकार घेऊ लागला होता. त्यानंतर बरीच खंडग्रास सूर्यग्रहण पाहिली. रात्री जागून अनेक चंद्रग्रहणही पाहिली. एके वर्षी एक कंकणाकृती सूर्यग्रहण पाहिले होते.
अशाच कंकणाकृती सूर्यग्रहणाच्या योग कित्येक वर्षांनी 26 डिसेंबरला येतोय. आज सर्वच ग्रहणांची माहिती आपल्या दिनदर्शिकेत लिहिलेली असते. या पोस्ट सोबत जे छायाचित्र जोडलेले आहे, ही माहिती एका 'जगप्रसिद्ध' दिनदर्शिकेतून घेण्यात आली आहे. 
 

वर्षानुवर्षे ग्रहणाच्या बाबतीत चालत आलेल्या गैरसमजुती व अंधश्रद्धा यांना खतपाणी घालण्याचे काम हे लोक करताना दिसतायेत. ग्रहण वेधामध्ये भोजन करू नये, पर्वकाळात पाणी पिऊ नये, झोपू नये, गर्भवती महिलांनी ग्रहण पाहू नये, नर्मदा स्नान करावे असे मूर्खासारखे उपदेश व सल्ले याठिकाणी देण्यात आलेत. अशा गोष्टी वाचल्यावर देण्यात येते की, आपण अजूनही पुरातन काळात जगतोय. किंबहुना हे स्वयंघोषित ज्योतिषी लोक आपल्याला जगायला लावतायेत. खगोल विज्ञानाच्या या नयनरम्य आविष्काराचा आस्वाद घेण्याऐवजी भीतीचे वातावरण तयार करतायेत. अशाच लोकांवर महाराष्ट्र अंधश्रद्धा विरोधी कायद्यानुसार कारवाई व्हायला हवी. ती होईल की नाही हे माहीत नाही. परंतु, नागरिकांनी सजग होणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे याच जगप्रसिद्ध दिनदर्शिकेमध्ये अनिल काकोडकर, माधवराव चितळे, दत्तप्रसाद दाभोळकर यांचेही लेख आहेत हा मोठा विरोधाभास!

Monday, November 18, 2019

हॉटेलात पुस्तक वाचणारा

बर्‍याच दिवसांनी भाऊबीजेच्या निमित्ताने आमची ही दोन दिवसांसाठी माहेरी गेली होती. म्हणून घरी एकट्यासाठी काही बनविण्यापेक्षा बाहेर उपहारगृहातच जाऊन खावे, असा विचार केला. दिवाळीच्या निमित्ताने बरीचशी उपहारगृहे ही बंद होती. मुख्य चौकातल्या एका दर्शनी जागेत 'महाराष्ट्रीयन कॅफे'च्या नावाने चालू झालेले नवे उपाहारगृह दिसले. तशी चांगलीच गर्दी होती. त्यामुळे आमचीही पावले पोटाची पूजा करण्यासाठी सदर उपहारगृहाकडे वळाली. तिथे गेल्यावर समजले की, चपात्या संपल्या आहेत व सध्या फक्त थाळीच उपलब्ध आहे. दहा मिनिटे थांबावे लागेल, असा मालकांचा आदेश आला. रात्रीचे दहा वाजले होते. आता यावेळेस कुठे नवे उपहारगृह शोधा? असा विचार करून तिथेच बसायचा विचार केला. आमच्यासारखे अजून अनेक जण थाळी येण्याची वाट बघत बसले होते. आजकालच्या युगात एखाद्या ठिकाणी वाट बघणे म्हणजे मोबाईल मध्ये डोकं खुपसून बसणे असा होतो. त्याचा प्रत्यय आम्हास याही वेळेसही आला. जेवणाची वाट बघणारे सर्व मनुष्यप्राणी खाली मान घालून मोबाईलच्या स्क्रीनवर बोटं वर खाली करत बसले होते. कुणीच कुणाशी बोलत नव्हतं. 



आम्हीपण एका टेबलावर ठाण मांडून बसलो. दहा मिनिटे असच स्वस्थ बसण्यापेक्षा बॅगमध्ये एखादं पुस्तक आहे का? हे पाहिलं तर शेवटचे एकच पुस्तक सापडलं. आमच्या उर्दू भाषेमध्ये ते पुस्तक होतं! पुस्तक उघडलं आणि जामा मशीदीतल्या चाचा कबाबी दिल्लीवाले यांच्यावर मुल्ला वाहिदी यांनी लिहिलेला लेख वाचायला सुरुवात केली. उपहारगृहात काम करणारा पोऱ्या (मराठीत वेटर!) आमच्याकडे टक लावून पाहायला लागला. पहिली गोष्ट म्हणजे कुणी हॉटेलमध्ये पुस्तक घेऊन वाचत का? हा प्रश्न त्याला पडला असावा व दुसरी गोष्ट, सदर पुस्तक हे कुठल्याशा "मुसलमानी" भाषेत लिहिले आहे, हेही त्याने पाहिलं. हा बाबा नक्की कोण आहे? याविषयी त्याला नक्कीच कुतूहल निर्माण झाले असावे. अशा प्रकारची पुस्तकं फक्त विशिष्ट धर्माचे लोकच वाचतात, असा अनेकांचा समज असतो. कदाचित त्यालाही तसेच वाटत असावे. जवळपास दहा मिनिटे झाली असावीत. त्यानंतर तो वाट पाहणाऱ्या प्रत्येकाला विचारत होता, 'तुम्हाला थाळी पाहिजे का?' परंतु, माझ्या जवळ आल्यावर त्याने विचारले, 'आपको भी लाऊ क्या थाली?' त्यावर मी प्रतिप्रश्न केला, 'मराठी येत नाही का तुला?' माझ्या अनपेक्षित प्रश्नावर तो काहीसा वरमला. मग मीच सांगितले, 'ये घेऊन'.
यातून एक गोष्ट समजली की, सर्वसामान्य जीवनात वावरताना आपण मनात कितीतरी समजुती घेऊन फिरत असतो व आपल्या निरीक्षणाने वेगवेगळ्या प्रतिमा मनात तयार करत असतो. प्रत्येक वेळेस या प्रतिमा तंतोतंत तशाच असतील असेही नाही.

Friday, November 15, 2019

निसर्ग बदलांकडे...

मागच्या काही वर्षांपासून वातावरणात व हवामानात होत चाललेले बदल आता प्रकर्षाने लक्षात येऊ लागलेत. यंदाचा ऑक्टोबर महिना पूर्ण पावसाचा गेला. शिवाय कधी नव्हे ते पूर्ण दिवाळीतही पाऊस पडला! निसर्गाकडून मानवजातीला देण्यात येणारी ही धोक्याची घंटा समजायला हवी. मानवनिर्मित कारणांमुळे निसर्गाचा समतोल ढासळत चालला आहे. त्यामुळे सर्वच ऋतूंवर त्याचा प्रतिकूल परिणाम होतोय. हिवाळ्यात थंडीची तीव्रता वाढत चालली व उन्हाळ्यातही उन्हाची दाहकता नवे नवे उच्चांक गाठत आहे. नुकतेच क्लायमेट सेंटरने प्रकाशित केलेल्या अहवालात मुंबईसह अन्य मोठी शहरे येत्या तीस वर्षांत पाण्याखाली जाण्याची शक्यता वर्तवली आहे. अशा विविध धोक्याच्या घंटांनी आता तरी नागरिक व सरकारांनी जागे व्हायला हवे. पर्यावरण शिक्षणाला फारसे गांभीर्याने न घेतल्याने मानव जातीकडून निसर्गाची अतोनात हानी होत आहे. त्यामुळेच निसर्गाचे पलटवार मनुष्य जातीवर होत आहेत. या सर्व घटनांची कारणमीमांसा होणे व त्यावर ठोस उपाययोजना करणे गरजेचे वाटते. केवळ मूठभर पर्यावरणवाद्यांमुळे पर्यावरणात बदल घडेल, अशी अपेक्षा करणे मूर्खपणाचे ठरेल. निसर्ग संवर्धनासाठी सरकारबरोबरच नागरिकांचाही सकारात्मक व सबळ पाठिंबा असायला हवा. तरच भविष्यात येऊ घालणाऱ्या नैसर्गिक संकटापासून आपण आपल्याला व येणाऱ्या पिढीला वाचवू शकू.
 
 

Thursday, November 14, 2019

पुस्तके रस्त्यावरची

कंपनीच्या कामाच्या निमित्ताने अनेकदा सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूरला जाणे झाले. हे शहर बऱ्यापैकी ओळखीचे झाले आहे. जून महिन्यातली गोष्ट आहे. एका पाच दिवसांच्या कामासाठी इस्लामपूरला गेलो होतो. राहण्याची सोय कामाच्या ठिकाणी होती. संध्याकाळी पाच नंतरचा वेळ रिकामाच असायचा. त्या वेळात थोडं शहरात फेरफटका मारून यावं, असा विचार होता. शिवाय फिरण्यासाठी एक बाईकही मिळवली होती. त्यादिवशी आमच्या हीचा मेसेज आला की, इस्लामपुरात "स्वराज्य रक्षक संभाजी" मालिकेतील कलाकारांची रांगोळी काढलेले एक प्रदर्शन भरलंय. तिने पत्ताही पाठवला होता. शहरातल्या आंबिका मंदिराशेजारी हे प्रदर्शन भरलं होतं. सहानंतर फ्रेश होऊन प्रदर्शन बघायला निघालो. अर्थात गुगल मॅपवाली बाई होतीच आम्हाला मार्गदर्शन करायला. साधारणत: पंधरा-वीस मिनिटात मी या मंदिराजवळ जाऊन पोहोचलो. 
 
 
इस्लामपूरातल्याच एका महाविद्यालयातर्फे रांगोळीचे हे छोटेखानी प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. रांगोळी मात्र छान काढलेली होती. अगदी हुबेहूब! त्यासोबत थोडावेळ फोटोसेशन करून मी मंदिराच्या बाहेर आलो. अजून जेवायला बराच वेळ होता. त्यामुळे काय करावे, याच विचारात असताना मंदिराच्या उजव्या बाजूला चार-पाच स्टॉल्स लावलेले दिसले. त्या रस्त्याने आज शिरलो तर लक्षात आले की, इथे खूप मोठे मार्केट आहे. अगदी पुण्या-मुंबईतल्या गजबजलेल्या रस्त्यासारखी गर्दी येथे झाली होती. जवळपास सर्वच वस्तू रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या दुकानात लावलेल्या दिसल्या. अनेक दुकाने लख्ख प्रकाशात उजळून निघालेली दिसत होती. खरेदीदारांची संख्याही काही कमी नव्हती. एकमेकांना धक्का मारून पुढे जाणारे उत्साहाने भाव करीत खरेदीला हातभार लावत होते. अशा ठिकाणी पुस्तकांचं दुकान असणे, म्हणजे मूर्खपणाचं लक्षण म्हणता येईल! पण त्या गर्दीतही पुस्तकांची दुकाने होती! कुठे... तर रस्त्यावर! मार्केटच्या दोन्ही बाजूंनी दुकानांची गर्दी तर मधल्या जागेत दोन-तीन मुले रस्त्यावर बसून पुस्तके विकत होती. अशा गजबजलेल्या मार्केटमध्ये कुणी खरेदीदार त्यांच्याकडे ढुंकूनही पाहत नव्हता. याउलट त्यांच्या पुस्तकांना व विक्री करणाऱ्या मुलांनाही येणाऱ्या जाणाऱ्यांचे अनेकदा पाय लागत होते. या परिस्थितीतही दहा-बारा वर्षांची ती मुले उत्साहाने विक्रीसाठी बसली होती. आपल्या देशातल्या वाचनसंस्कृतीचे एक अंग मी याची देही याची डोळा पाहिले. पुस्तक म्हटलं की आमचे हात आणि मेंदू दोन्ही उत्तेजित होतात. मी खाली बसून पुस्तके चाळायला सुरुवात केली. बहुतेक सर्वच लहान मुलांची पुस्तके होती. कोल्हापुरच्या कुठल्या प्रकाशनाने प्रकाशित केलेली... बऱ्याचशा पुस्तकात बोधपर, मनोरंजनपर गोष्टी होत्या व किंमतही वीस ते पंचवीस रुपयांच्या दरम्यान होती. मी तिथे जाईपर्यंत कदाचित त्यांचे एकही पुस्तक विकलं गेलं नसावं. गिऱ्हाईक आलय म्हटल्यावर त्यांनीही पुस्तकांची माहिती सांगायला सुरुवात केली. एकेक पुस्तक पाहून मी माझा गठ्ठा तयार करायला लागलो. जवळपास तीस पुस्तके मी निवडली. यावर मुलांचा आनंद द्विगुणित झाला होता. त्यामुळे त्यांनीही प्रत्येक पुस्तकामागे पाच रुपये कमी केले. शिवाय एक पुस्तकही मला फ्री देऊन टाकले!
मी ती सर्व पुस्तक लहान मुलांना वाटण्यासाठी घेतली होती. परंतु त्यात विक्री करणाऱ्या मुलांचे समाधानही मला प्राप्त झाले होते. आज मी त्यातील बरीच पुस्तके लहान मुलांना वाटून टाकलीयेत. थोडीशी उरलीत, ती पण संपतील. परंतु वाचनाची संस्कृती आज रस्त्यावर पडली, हे मात्र या घटनेतून मला मनापासून जाणवले.

© तुषार कुटे

Tuesday, November 12, 2019

मराठी पुस्तके मिळवा ऑनलाईन

तंत्रज्ञानाचा वापर आज जवळपास प्रत्येकच क्षेत्रात होतोय. पुस्तक निर्मिती, विपणन व विक्री क्षेत्रही या पासून दूर राहिलेले नाही. आज अनेक कंपन्यांनी पुस्तक व्यवसायात उडी घेतली आहे. वाचनसंस्कृतीवर आजही लोकांचा मोठा विश्वास आहे. त्यामुळेच तंत्रज्ञानाचा वापर याही क्षेत्रात वाढत चाललाय. आज तुम्ही घरबसल्या आपल्या भाषेतील पुस्तके मागू शकता. विविध वस्तू खरेदी करताना जसे प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय वा हात लावल्याशिवाय त्याचा दर्जा कळत नाही, तसे पुस्तकांचे नाहीये. पुस्तकांचा दर्जा हात लावून समजत नाही. त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने कोणतीही शंका मनात न ठेवता आपण पुस्तके मागू शकतो. खाली काही महत्त्वाच्या वेबसाईट्स दिल्या आहेत, तिथून तुम्ही तुमचं अकाऊंट तयार करून पुस्तके कुरियरने घरपोच मागवू शकता. शिवाय तुमची खरेदी 500 वा हजार रुपयांच्या वर असेल तर त्यासाठी वेगळे कुरिअर चार्जेस द्यावे लागत नाहीत.


१. बुक गंगा (https://www.bookganga.com/)
मराठीतील सर्वात जास्त पुस्तके असणारी ही वेबसाइट आहे. तुम्हाला हवे असणारे जवळपास प्रत्येक पुस्तक तुम्हाला या वेबसाइटवर मिळू शकेल. शिवाय सदर पुस्तकाची पहिली दहा-पंधरा पाने तुम्ही वाचू शकता. जेणेकरून पुस्तकाचा आशय व लेखकाची लेखनशैली तुम्हाला तपासता येईल. अनेक पुस्तके ई-बुक स्वरूपात ह्या ठिकाणी उपलब्ध आहेत. प्रत्येक पुस्तकावर तुमचा अभिप्राय अर्थात रीव्ह्यू टाकण्याची सुविधा बुकगंगा ने उपलब्ध करून दिली आहे. अनेक पुस्तकांवर कमीत कमी पाच ते दहा टक्के सूटही तुम्हाला मिळू शकेल. बुकगंगाचं बुक स्टोअर पुण्याच्या डेक्कन जिमखाना परिसरात आहे. तिथेही तुम्ही पुस्तके खरेदी करू शकता.
२. अक्षरधारा (https://www.akshardhara.com/)
पुण्याच्या बाजीराव रस्त्यावर असणारे अक्षरधारा बुक गॅलरी हे पुस्तकालय होय. या पुस्तकालयातही मोठ्या प्रमाणात पुस्तके उपलब्ध आहेत. ती तुम्ही प्रत्यक्ष जाऊन वा ऑनलाईन खरेदी करू शकता. त्यांच्या वेबसाइटवर शाखानुसार, प्रकाशननुसार, लेखकानुसार पुस्तक शोधण्याची सुविधा दिली आहे. व बहुतांशी पुस्तकांवर थेट कमीत कमी दहा टक्के सुटही उपलब्ध आहे. सभासदत्वाची सुविधाही अक्षयधाराने देऊ केली आहे. या अंतर्गत पुस्तकांवर अधिक सूटही मिळवता येते.
३. अमेझॉन इंडिया (https://www.amazon.in/)
ही भारताची सर्वाधिक पुस्तके विक्री करणारी वेबसाईट आहे. मराठीतील खूप पुस्तके त्यांच्या संकेतस्थळावरून तुम्ही खरेदी करु शकता. अमेझॉन सर्च साठी उपलब्ध असणारे सर्व ऑप्शन्स तुम्हाला पुस्तके शोधण्यासाठी वापरता येतात. अमेझॉन चे स्पेशल सेल चालू असताना अमेझॉन बुक्स ला भेट द्यायला विसरू नका. अनेक मोठी पुस्तके भल्यामोठ्या सूटच्या रूपाने इथे उपलब्ध होऊ शकतात. मी स्वतः मेहता पब्लिकेशनच्या सर्व मोठ्या कादंबऱ्या (स्वामी धरून!) 49 टक्के डिस्काऊंट मध्ये खरेदी केल्या होत्या! एवढा डिस्काउंट मला मेहतांच्या गॅलरीत पण मिळत नाही.
सर्वात अभिमानाची बाब म्हणजे सर्वाधिक विक्री होणाऱ्या पुस्तकात अमेझॉन इंडियावर मराठी ही हिंदी नंतरची दूसरी भारतीय भाषा आहे! अमेझॉनचे स्वतःचे किंडल नावाची ई-बुक रीडर आहे. अनेक मराठी पुस्तके किंडल धारकांना मोफत ही वाचता येतात.
४. मेहता पब्लिशिंग हाऊस (http://www.mehtapublishinghouse.com/)
या ठिकाणी फक्त मेहता पब्लिशिंग हाऊसनेच प्रकाशित केलेली पुस्तके तुम्हाला विकत घेता येतील. शिवाय त्यांची सभासद होण्याची सुविधाही उपलब्ध आहे, ज्यात तुम्हाला 30 टक्क्यांपर्यंत एका पुस्तकावरही सूट मिळू शकते! आनंद यादव, वि. स. खांडेकर, द. मा. मिरासदार, रणजित देसाई, व. पु. काळे, शंकर पाटील, व्यंकटेश माडगूळकर, विश्वास पाटील, सुधा मूर्ती, स्वाती चांदोरकर यांच्यासारख्या दिग्गज मराठी लेखकांची पुस्तके या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. आज-काल इथे नव्याने येणारी पुस्तके ही बहुतांशी अनुवादित असतात.
५. बुक्सनामा (https://www.booksnama.com/)
डायमंड पब्लिकेशनची सर्व पुस्तके या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. याशिवाय विविध विषयांची पुस्तके येथून तुम्ही भरघोस सूट घेऊन खरेदी करू शकता.
वरील साईट व्यतिरिक्त अजूनही काही वेबसाइट्स आहेत, जिथून सहजपणे पुस्तके मागवता येतात. त्यांचाही वापर तुम्ही बिनधास्त करू शकता.
https://www.flipkart.com/
https://www.granthdwar.com
https://www.bookvishwa.com/
https://www.rasik.com/
https://www.shubhambooksonline.com/
http://www.menakabooks.com/
https://www.suyashbookgallery.com/

कधीकधी बुक गॅलरीतून पुस्तक मागण्यापेक्षा प्रत्यक्ष प्रकाशनाकडूनच मागण्यास सोयीचे पडते व कमी किमतीत ते उपलब्ध होऊ शकते. बऱ्याच मोठ्या प्रकाशकांनी ऑनलाईन पुस्तके विक्रीची सोय वाचकांना करून दिली आहे.
१. मेहता पब्लिशिंग हाऊस (http://www.mehtapublishinghouse.com/)
२. मनोविकास (https://www.manovikasprakashan.com/)
३. राजहंस (https://www.rajhansprakashan.com/)
४. सकाळ (http://sakalpublications.com/)
५. कॉन्टिनेन्टल (http://continentalprakashan.com/)

Sunday, November 10, 2019

ट्रेनमध्ये घोरणारी प्रवृत्ती

घोरणे ही सर्वसामान्य माणसाची एक प्रवृत्ती आहे. मीही कधीकाळी घोरत नव्हतो. परंतु, आमच्या हीच्या म्हणण्यानुसार मीही बऱ्याचदा झोपेत घोरत असतो. पण झोप नीट आली नाही की, झोपेत घोरणं होत नाही! 


कामाच्या निमित्ताने ट्रेनमध्ये बराचसा प्रवास होतो आणि आजवर अनेकदा ट्रेनचा रात्रीचा प्रवास आम्हाला घडलाय. आता रात्र आली की, झोप येते आणि झोप आली की, घोरणंही येतच! ट्रेनच्या ३A च्या डब्यात जवळपास 64 प्रवासी असतात. त्यामुळे रात्रीच्या वेळेस आपण आपल्या बर्थवर झोपलेलो असताना कुठून ना कुठून तरी घोरण्याचा आवाज येत राहतात. चित्रविचित्र घोरण्याने कधीकधी मनोरंजन होतं तर कधीकधी वैतागून किळस वाटायला लागतो. या जगात मनोरंजकरित्या घोरणाऱ्यांची संख्या तशी कमीच आहे! ट्रेनच्या इतक्या वेळेसच्या प्रवासात आजवर फक्त एकदाच ट्रेनमधल्या प्रवाश्याचे घोरणे लक्षात ठेवावे, असे वाटले होते.
नांदेडची आमची नेहमीची पनवेल-नांदेड एक्सप्रेस ही ट्रेन होती आणि नेहमीप्रमाणे ट्रेन आरक्षण करणाऱ्या सॉफ्टवेअरने अप्पर बर्थ आमच्या माथी मारला होता! आमच्या उंचीमुळे तीन बर्थ असलेल्या जागेत आम्हाला कधीच बसता आले नाही. त्यामुळे हा बर्थ नेहमी कंटाळवाणा वाटतो. आमच्या समोरच्या अप्पर बर्थवर एक ९० ते १०० किलो वजनाचा मनुष्यप्राणी येऊन ठेपला. खरेतर तो ठेपला नव्हता तर त्याला ठेपवला होता! म्हणजेच आप्तस्वकीयांनासोबत राहता यावे म्हणून कोणीतरी आपली सीट बदलून घेतली होती. यामुळे सदर इसम समोरच्या अप्पर बर्थवर आला. रात्री दहा वाजेपर्यंत सर्व काही ठीक चालले होते. परंतु त्यानंतर सदर इसमास झोप लागली आणि त्याचा जो मूळ आवाज आहे, त्याच्या दुप्पट आवाजात तो घोरायला लागला. घोरण्याचा इतका भयंकर आवाज पहिल्यांदाच आमच्या कानावर पडत होता. एखाद्याच्या घोरण्याने दुसऱ्याच्या कानाचे पडदे फाटू शकतात का? या प्रयोगासाठी कदाचित हाच आवाज योग्य असावा, असे वाटून गेले. सदर इसम मुद्दामहून तर असा आवाज काढत नाहीये ना? हाही विचार आला. परंतु त्याच्यामध्ये इतकं सातत्य असावा का? या प्रश्नाचे उत्तर आमच्याही मनाने 'नाही' असेच दिले. आजूबाजूच्या कंपार्टमेंट मधून येणारे इतर घोरण्याचे आवाज या आवाजाची बिलकुलच स्पर्धा करू शकत नव्हते. त्यांनी तर केव्हाच तलवार म्यान केल्याचे जाणवत होते. एकटा शिपाई किती वेळ लढणार? केव्हातरी थांबेल, असा विचार मनात आला. पण एकट्याची लढाई काही थांबेचना. त्या इसमाच्या नाकातून मध्येच चित्रविचित्र आवाज यायचे. नाकात काहीतरी अडकलेय आणि ते बाहेर येण्यासाठी तडफडते आहे, असं भासत होतं. पण एवढ्या एक तासात ते बाहेर यायला होतं. तरीही आलं नाही. जवळपास दोन तास तो कर्कश्य आवाज आमच्या श्रवणेंद्रियातून थेट मेंदूत जाऊन घुमत होता. त्यामुळे आमचा मेंदू विश्रांतीला सुरुवात करण्याची वेळ सतत पुढे पुढे ढकलत असल्याचे जाणवले. म्हणून निद्राधीन होण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहण्यावाचून आमच्यापुढे काहीच पर्याय नव्हता. इसमाच्या घोरण्याची तीव्रता एक वेळी एवढी व्हायची की, जणू आत्ताच त्याचा कंठ फुटून नाकातून बाहेर येईल. त्यादिवशी आम्हाला जाणवले की, बॅग मधील गरजेच्या वस्तू ठेवतो त्या पर्समध्ये कापसाचे बोळे ठेवायला हवेत. वेळ कुणावर सांगून येत नाही. कधी कशाचा वापर करावा लागू शकेल, हेही सांगता येणार नाही. अशा या बिकट परिस्थितीत रात्री कधीतरी आम्हास झोप लागली. परंतु ती अल्पकालीनच ठरली. पहाटेपासून परत तोच दंगा चालू झाला आणि सकाळी 7 वाजेपर्यंत तो चालू होता! तदनंतर तो इसम आमच्या झोपेची वाट लावून साडेसात वाजता परभणी स्टेशनला उतरून निघून गेला. जाता जाता हेही म्हणाला की, 'ट्रेन मध्ये काय झोप होत नाही ओ नीट... !'. आम्ही स्मितहास्य करून त्यांना प्रतिसाद दिला. त्यानंतर एका महाभयंकर संकटातून सुटल्याची जाणीव आम्हाला झाली. अर्ध्या-पाऊण तासाच्या प्रवासानंतर झोपेची जोरदार गुंगी यायला लागली होती. पण थोड्याच वेळात ट्रेन हुजूर साहिब नांदेड स्टेशनला पोहोचली.

© तुषार कुटे

Saturday, November 9, 2019

रीवाल्युसीऑन डेल युनिफॉर्मे

स्वातंत्र्यानंतर शिक्षणाचे खरे पर्व आपल्या देशात चालू झालं. मुलांना मारून मुटकून शाळेत पाठवायला लागले. शाळेत शिक्षक आणि घरी पालक अशी बऱ्याचदा दुहेरी पिटाई विद्यार्थ्यांची होत असे. हळूहळू मुलांच्या कपड्यांकडे लक्ष जायला लागलं. त्यातून गणवेश हा प्रकार उदयास आला. त्याला आपण आज मराठीत युनिफॉर्म म्हणतो. सगळी मुले सारख्याच कपड्यात यायला लागली. अनेकांना शाळेसाठी कपडे परवडत नसल्याने एकच गणवेश चार-पाच वर्षे घातला जायी. किंवा नवीन कपडे घेताना युनिफॉर्मच्या रूपाने घेतला जायी. कधीकधी हा युनिफॉर्म वाढत्या अंगाचा असायचा. पहिल्या वर्षी घालताना तो एकदमच ढगळ वाटायचा. जसजसे वर्षे पुढे सरकायची, तसा तसा तो नीट यायला लागायचा आणि पूर्ण व्यवस्थित येईपर्यंत तो फाटलेला असायचा! आजही दुर्गम भागातल्या शाळांमध्ये अशीच परिस्थिती आहे. अनेक मुले शाळेत व्यतिरिक्त इतर ठिकाणीही युनिफॉर्म मध्येच असतात. शहरे मात्र आता युनिफॉर्मच्या पुढच्या पायरीवर जाऊन पोहोचलीत.

काही वर्षांपूर्वी युनिफॉर्ममध्ये टायचा समावेश झाला. सुटाबुटाच्या कपड्यांवर घालण्यात येणारे टाय, आता लहान मुलांच्या गणवेशात येऊ लागले होते. सुरुवातीला जेव्हा मुले काय घालायची, तेव्हा कोणीतरी सतत आपला गळा आवळतोय की काय? असं वाटत राहायचं. अनेकदा पालक मुलांच्या टायला त्यांचं मंगळसूत्र म्हणायचे! या मंगळसूत्रानंतर बुटांचा अर्थात शूजचा समावेश युनिफॉर्ममध्ये झाला. सर्व मुलांचे बूट एकाच काळ्या रंगात दिसायला लागले. जी मुले बूट घालून येत नसत, त्यांना एकतर दंड पडायचा किंवा मार मिळायचा. त्यामुळे बूटसंस्कृतीने पुन्हा पालकांच्या खिशाला गळती लावायला सुरुवात केली. यानंतर थोड्याच कालावधीत सॉक्सचा युनिफॉर्ममध्ये समावेश झाला. त्यामुळे व्हाईट सॉक्स कंपल्सरी झाले. अनेकांकडे सॉक्सची एकच जोडी असल्याने त्याला भोक पडेपर्यंत वापरले जात असत. अजूनही ही परिस्थिती सुधारलेली नाही.
कालांतराने युनिफॉर्ममध्ये आणखी एका नव्या भिडूची भर पडली. पीटीच्या तासाला अर्थात शारीरिक शिक्षणासाठी नवीन वेगळा टी-शर्टचा युनिफॉर्म आला. खेळाच्या तासाला मुले मग एकाच रंगाचा व एकाच प्रकारचा टी-शर्ट घालून यायला लागले. या सर्वांतून किती खेळाडू तयार झाले? या प्रश्नाचे उत्तर सापडले तसं फार अवघड आहे. पण, या टी-शर्ट ने त्याच्यासोबत आणखी एका साथीदाराला सोबत आणले होते, ते म्हणजे स्पोर्ट्स शूज! आता खेळताना रेग्युलर शुज घालणार का? मग खेळासाठी वेगळे शूज युनिफॉर्म बरोबर शाळेच्या प्रांगणात दाखल झाले. पुन्हा तोच प्रश्न, किती खेळाडू तयार झाले?
थंडीच्या दिवसांमध्ये मुलांना फक्त युनिफॉर्ममध्ये यायला अवघड जायचं. म्हणून मुले स्वेटर वगैरे घालून यायचे. परंतु त्यामुळे शाळेचे युनिफॉर्म दिसेनासे व्हायचे. यावरही उपाय शोधला गेला. काय तर, स्वेटर्सचाही अंतर्भाव युनिफॉर्ममध्ये झाला! मग मुलं एकाच प्रकारचा व एकाच रंगाचा स्वेटर घालून यायला लागले. आत्तापर्यंत युनिफॉर्म वर बराच खर्च होत होता. पण पालकांची इनकमही वाढत होती, ही गोष्ट ध्यानात घ्यायला हवी.
पावसाळा आला आणि परिस्थिती पालटली. मुले स्वेटर्स न घालता रेनकोट घालून यायला लागली. पुन्हा शाळेची पंचाईत झाली. मग युनिफॉर्मसाठी रेनकोट असा शोध घेतला गेला व त्याचाही समावेश शाळेच्या नव्या गणवेशात करण्यात आला. आतापर्यंत गणवेषाचा आकार जवळपास संपत आला होता. पुढे काय... पुढे काय... करता करता शाळेच्या (आतापर्यंत स्कूल झालेल्या) एक गोष्ट ध्यानात आली की, मुलं शाळेत येतात तेव्हा प्रत्येकाचे दप्तर (माफ करा... स्कूल बॅग) ही वेगवेगळ्या रंगाची व आकाराची असते. तिथे पण आमच्या झिरमिळ्या लावलेल्या कापडी पिशवी पासून मॉडर्न स्कूल बॅग पर्यंत उत्क्रांती झालीच होती! आता युनिफॉर्ममध्ये तिचा समावेश होणार होता. पण पालकांना काय कारण सांगायचे? मुलं एकमेकांची दप्तरे बघतात व तुलना करतात, त्यांना वाईट वाटते, त्यांच्यात भांडणं होतात... ही कारणं आता पटण्यासारखी होती आणि अखेरीस दप्तराचा समावेशही युनिफॉर्ममध्ये झाला. याच कारणास्तव मुलांची पाण्याची बाटली अर्थात वॉटर बॅग सारख्याच रंगात आली१
अशी ही सर्व गणवेशाची उत्क्रांती प्रक्रिया आहे. कदाचित यापुढे नव्या क्लृप्त्या शोधल्या जातील. जसे जे पालक मुलांना सोडायला शाळेत येतात त्यांचे पण कपडे वेगळे असतात. कदाचित त्यामुळे पण मुलं तुलना करतील व भांडतील, तेव्हा काय करायचं? कधीतरी विज्ञानाच्या प्रयोगाला मुलांच्या गणवेशावर काहीच सांडलं तर काय करायचं? याही प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतील.
सर्वात महत्त्वाचं या लेखाचे शीर्षक असं का दिले? याचा विचार केला असेल, तर ध्यानात असू द्या गणवेशाची उत्क्रांती हे मी स्पॅनिशमध्ये लिहिलय, फक्त लिपी देवनागरी आहे!!!

पहिला भाग इथे पहा

© तुषार कुटे

Thursday, November 7, 2019

बोलतो 'ना' मराठी!

भारतातल्या सर्व राज्यांमध्ये विविध प्रकारच्या भाषा बोलल्या जातात व प्रत्येक राज्याला स्वतःची एक किंवा अनेक राज्यभाषा आहेत. आपल्या राज्याची ही राज्यभाषा व इथली बोलली जाणारी प्रमुख भाषा आहे, मराठी. तिला आपण लाडाने 'मायबोली' म्हणतो! महाराष्ट्र हे इतर राज्यांपेक्षा व प्रामुख्याने दक्षिण भारतातील पाच प्रमुख राज्यांपेक्षा जरा वेगळे राज्य आहे. म्हणजे सांगायचं असं की, इथला मराठी भाषिक सर्वसामान्यपणे मराठी बोलण्यास प्राधान्य देत नाही. कदाचित त्याला भारतातल्या अन्य काही भाषा 'इंटरनॅशनल' वाटत असाव्यात! या कारणास्तव आम्ही सदर विषयांवर थोडे संशोधन केले व त्यानुसार काही निष्कर्ष काढले आहेत. ते तुमच्या समोर सादर करतो. 

मराठी भाषिक सहजपणे इतर भाषिकांशी मराठीत बोलत नाहीत याची अनेक कारणे आहेत-
पहिले कारण: जाज्वल्य अभिमान
मराठी लोकांना आपल्या भाषेचा प्रचंड अभिमान आहे. त्यामुळे ती भाषा फक्त आपणच बोलावी, असे त्यांना वाटत असते. आपण जर परभाषिकाशी मराठीत बोललो तर त्यालाही आपली भाषा येऊ लागेल व लवकरच तो तिच्यावर प्रभुत्व प्राप्त करेल. असं कोणीही येऊन आपली भाषा बोलावी, हे मराठी भाषिक कसं खपवून घेऊ शकेल? आमच्या भाषेवर फक्त आमचाच अधिकार आहे, यावर मराठ्यांची नितांत श्रद्धा आहे. त्यामुळे ते सहसा मराठी लोकांशी मराठीत बोलण्याचे टाळतात. मुंबईत तर त्याचा कधी कधी कहरच होतो. तिथे मराठी लोकही मराठीत बोलत नाहीत. इतका जाज्वल्य अभिमान फक्त आणि फक्त मराठी लोकच दाखवू शकतात!
दुसरे कारण: भाषाप्रभुत्व
इतिहासावर व वर्तमानावरही नजर टाकली तर देशाला सर्वाधिक बुद्धिमान व तेजस्वी माणसे महाराष्ट्राने दिली आहेत, असे दिसेल. त्याचे कारणही मराठी लोकांना माहित आहे. आम्ही लोक बहुभाषिक आहोत. आमच्या राज्यात कमीत-कमी ऐंशी टक्के लोकांना किमान तीन भाषा तरी सहज देतात ( अर्थात समजतात). भाषा तज्ञांच्या म्हणण्यानुसार ज्याला अधिक भाषा येतात त्याचा मेंदू तितका तल्लख असतो. तीन-तीन भाषांच्या ज्ञानप्राप्तीमुळे मराठी माणसाचा मेंदू तल्लख झालाय. त्यामुळे तो आपली भाषा समोरच्याला शिकू देत नाही. पण, समोरच्याची भाषा बोलून तिच्यावरही प्रभुत्व मिळवण्याचा प्रयत्न करतो. अमराठी लोकांचं बोलणं त्यांच्याच भाषेत ऐकतो व त्याच भाषेत उत्तर देतो. त्यामुळे मराठी लोकांना नव्या भाषेवर प्रभुत्व मिळवणं सोपं जातं. मग समोरच्याला वाटतं, याला तर आपली भाषा येतीये, मग कशाला याच्याशी मराठीत बोला? यामुळे दोन गोष्टी साध्य होतात अमराठी लोकांना आपली भाषा येत नाही व ते वा दोन भाषांतच अडकून पडतात आणि मराठी लोकांची बहुभाषिकत्वामुळे मात्र बौद्धिक पातळी वाढत राहते.
तिसरे कारण: दुसऱ्याच्या भाषेची वाट लावणे
एखादा अमराठी भाषिक तोडकी-मोडकी मराठी बोलत असेल तर मराठ्यांना हा आपल्या भाषेचा हा अपमान वाटतो. म्हणून ते दुसऱ्या भाषेत मुद्दाम चुकीचे शब्द भरवतात. जसे ते हिंदीत बोलताना मुद्दाम तेरेकू, मेरेको, इसकू, उसकू टाइप टपोरी शब्दांचा वापर करतात व त्या भाषेचे सौंदर्य बिघडवतात. यामुळे त्यांना सिद्ध करता येते की, मराठी भाषा ही किती सुंदर व शुद्ध आहे.
चौथे कारण: आपले शब्द घुसडवणे
वरच्याच कारणाला जोडून हेही एक कारण आपण सांगू शकतो. समोरच्याची भाषा अशुद्ध करण्यासाठी मराठी भाषिक आपल्या भाषेतले शब्द त्यात घुसडवतात. उदाहरणार्थ कांदा, बटाटा, नक्की वगैरे शब्द हिंदी नसून मराठी आहेत, हे महाराष्ट्रातल्या अनेक परप्रांतीयांना माहीतच नाहीये! अशाप्रकारे समोरच्याच्या भाषेत भेसळ करून तिचे सौंदर्य बिघडवले जाते व मराठी भाषा कशी श्रेष्ठ आहे, हे मराठी लोक अप्रत्यक्षपणे दाखवून देतात.
अशाप्रकारे मराठी लोकांना माहित आहे की, आम्हाला मराठी येतंय म्हणून आम्हाला मराठी राज्यात किंमत आहे जर कोणीही ऐरागैरा येऊन मराठीत बोलू लागला तर आमची किंमत काय राहणार? या प्रश्नाच्या उत्तरापायी मराठी लोकांची ही सारी खटपट चालू आहे.
बरोबर ना? 

© तुषार कुटे 

Monday, November 4, 2019

टाइप ऑफ स्कूल्स

फार वर्षांपूर्वी म्हणजे जेव्हा आम्ही शाळा शिकत होतो, त्या काळात फक्त एकच प्रकारची शाळा असायची. स्वतःच्या मातृभाषेतून शिकण्याचे स्वातंत्र्य आणि मजा होती. पण झालं असं की, आज अनेकांना असं वाटते की आम्ही शासनाच्या एका लोकल आणि फालतू शाळेत शिकलो म्हणून मागे राहिलो आहे. नाहीतर एकेदिवशी नोबेल पारितोषिकच जिंकून आलो असतो अथवा मायक्रोसॉफ्ट आणि गुगल सारखी कंपनी माझ्या नावावर असली असती. मी आज ऑडी, मर्सिडीज, रोल्स-रॉइस सारख्या गाड्यांमधून फिरत असलो असतो. पण मी आज कुठे आहे? इथे भारतात खितपत पडलोय. 
 

आजच्या पालकांची हीच समस्या ओळखून जुन्या आणि अनेक नव्या शिक्षण सम्राटांनी (ते शिक्षण महर्षी जुनं झालं!) नव्यानव्या शाळांची निर्मिती केली व त्यांनी नवा मॉडर्न इंडियन घडवण्याची शपथ घेतली आहे. काहींनी एवढ्या हायफाय शाळा काढल्या आहेत की, शिक्षण क्षेत्रातील 'बलिदानाबद्दल' त्यांना कोणता पुरस्कार द्यावा? हा प्रश्न सरकारला भविष्यात पडू शकतो.
तर एकंदरीत सध्याची परिस्थिती पाहता आपल्या महाराष्ट्रातल्या शाळांचे प्रामुख्याने पाच प्रकार पडतात. मागे एकदा प्रायव्हेट शाळांनी फुकट 'पब्लिक स्कूल' लावल्याने संतापलेल्या शासनाने त्यांचा पब्लिकचा लेबल काढून घेतला! अशा शाळा आता पुढच्या कुठल्यातरी एका कॅटेगरीत मोडतात.
पहिला प्रकार- लोकल स्कूल
या शाळा आहेत सर्वात कमी दर्जाच्या! जिथे मुलांना त्यांच्या मातृभाषेतून हसत-खेळत व आनंदी वातावरणात शिकवले जाते. याच कारणामुळे या शाळेत आजकाल स्टॅंडर्ड विद्यार्थी तयार होत नाहीत. त्यामुळे या शाळांना तसा भाव कमीच आहे. शिवाय ते पालकांकडून पैसे घेत नाहीत. मग अशा शाळांचा दर्जा काय असणार आहे? या शाळांमध्ये स्पर्धा नावाचा प्रकार फारसा अस्तित्वात नसतो. त्यामुळे इथे प्रवेश घेऊन पालकांना आपली मुले रेसमध्ये पळवता येत नाहीत.
दुसरा प्रकार- नॅशनल स्कूल
ही आहे राष्ट्रीय दर्जाची शाळा! जागतिक भाषा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंग्रजीची सुरुवात होते इथून. इथे प्रवेश घेणाऱ्या मुलांची स्पर्धा थेट देशातल्या प्रत्येक मुलासोबत होत असते मग तो कुठल्याही राज्याचा असो! त्यामुळे त्याला नॅशनल कॉम्पेटेटरचा दर्जा मिळाल्याशिवाय राहत नाही! 
तिसरा प्रकार- इंटरनॅशनल स्कूल
ही आहे आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा. कोणत्या 'इंटरनेशन' ने यांना तो दर्जा दिला असो वा नसो ते स्वतःला आम्ही इंटरनॅशनल आहोत, हे सांगण्याचा अतोनात प्रयत्न करतात. इथे शिकणाऱ्या मुलांची स्पर्धा जगातल्या सर्व देशातील सर्व मुलांसोबत असते. त्यामुळे ऍपल व अमेझॉन चा मालक होण्यासाठी किंवा नोबेल पारितोषिक मिळवण्यासाठी इथे सर्वात जास्त स्कोप आहे.
चौथा प्रकार- ग्लोबल स्कूल
इथे शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांची स्पर्धा भुतलावर अस्तित्वात असणाऱ्या प्रत्येक सजीव प्राण्यासोबत होत असते. त्यामुळे तो खऱ्या अर्थाने ग्लोबल सिटीझन म्हणून ओळखला जाऊ शकतो. किंबहुना चित्त्यापेक्षा वेगवान पळण्याची व पाण्यात डॉल्फिनपेक्षा मोठी उडी मारण्याची क्षमता कदाचित प्राप्त करू शकतो! 
पाचवा प्रकार- युनिव्हर्सल स्कूल
युनिव्हर्स म्हणजे विश्व. या विश्वात असंख्य आकाशगंगा आहेत, दीर्घिका आहेत व त्यात अनेक सूर्यमालाही असतील. कदाचित अनेक ठिकाणी सजीवसृष्टी असेल. त्यामुळे युनिव्हर्सल स्कूल मध्ये शिकणाऱ्या मुलांची स्पर्धा या विश्‍वात अस्तित्वात असणाऱ्या सजीव सृष्टीतील प्रत्येक सजीव प्राण्याची होत असते! एवढी मोठी स्पर्धा केल्यावर तो किती बुद्धिमान प्राणी होऊ शकतो? याची आपण कल्पनाही करू शकत नाही. परंतु त्यासाठी दरवर्षी लाखात पैसे मोजावे लागतात. एवढ्या वेगवेगळ्या प्रकारच्या सजिवांशी स्पर्धा करायला शिकायचं, तर लाखभर रुपये त्यापुढे काहीच नाहीत.
एकंदरीत काय, पालकांना निर्णय घेणे सोपे जावे म्हणून हा आमचा सर्व प्रपंच. तसे पाहिले तर मज पामरासी जास्त काही ज्ञान नाही. अर्थात मीही लोकल स्कूलचा विद्यार्थी आहे. तेव्हा घ्या थोडं समजून.

© तुषार कुटे

Sunday, November 3, 2019

नांदेडचा येवले चहा

नांदेडच्या विद्यापीठात एकेदिवशी कामानिमित्त जाणे झाले होते. त्यावेळी विद्यापीठातल्या एका प्राध्यापकांनी सांगितलेला हा किस्सा.
येवले अमृततुल्य बद्दल आता सबंध महाराष्ट्राला माहिती झालीये. नांदेडमध्येही येवले चहाची शाखा चालू झाली आहे. याठिकाणी अन्य ठिकाणांसारखी रांगेत उभे राहून चहा पिण्यासाठी गर्दी झाल्याचे दिसते अर्थात त्यांची लोकप्रियता वाढतच आहे.


गणपतीच्या काळामध्ये प्राध्यापकांच्या गल्लीतही एका सार्वजनिक गणेशाची स्थापना झाली होती. परंतु, प्रत्येकच गल्लीत गणपती असल्याने संध्याकाळच्या आरतीला फारशी गर्दी होत नसे. एक दिवस गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षाने सकाळी पाटी लावली- "आज संध्याकाळी आरतीनंतर सगळ्यांना येवले यांच्या कडून चहा मिळणार आहे!" म्हणता म्हणता दिवसभरात ही बातमी आजूबाजूच्या सगळ्या गल्ल्यांमध्ये पोहोचली आणि त्यादिवशी गणपतीच्या आरतीला भली मोठी गर्दी झाली! आरती सुरू झाल्यानंतर प्रत्येक जण ती कधी संपेल, याची वाट पाहत होता. एवढी गर्दी पाहून मंडळवाले खुश झाले. अखेर आरती संपली व सर्वजण बिल्डिंगच्या पार्किंग मध्ये येवले चहा पिण्यासाठी जाऊ लागले. पण, पार्किंगमध्ये दृश्य तर वेगळेच होतं. तिथे एक मनुष्य टेबलावर चहाचा थर्मास घेऊन व एका हातात चहाचे कागदी कप घेऊन सगळ्यांची वाट बघत उभा होता. प्राध्यापकांच्या लक्षात आले की सदर मनुष्य त्यांच्या कॅन्टीन मध्येच कामाला आहे. याने पण येवले चहा जॉईन केलं की काय? असाही विचार त्यांच्या मनात आला. पण, नंतर चौकशी केल्यावर समजलं की, कॅन्टीन वाल्याचेही आडनाव येवले आहे! मग काय सर्वजण 'येवले' यांचा चहा पिऊन तृप्त झाले.

© तुषार कुटे