Friday, November 6, 2020

पावनखिंड

वीर बाजीप्रभू देशपांडे यांची वीरगाथा महाराष्ट्रातील सर्वांनाच माहित आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची सिद्धी जोहरच्या पन्हाळ्यावरील वेढ्यातून सुटका करण्यासाठी बाजीप्रभूंनी आपले प्राण पणाला लावले होते. पन्हाळ्याच्या वेढ्यातून बाहेर पडल्यावर शिवाजी महाराज थेट खेळणा अर्थात विशाळगडाच्या दिशेने निघाले. परंतु सिद्धी जोहरच्या सैन्याला याची खबर लागताच त्यांनी वेगाने पाठलाग चालू केला. रस्त्यातील घोडखिंडीमध्ये बाजीप्रभू व त्यांचे बंधू फुलाजीप्रभू देशपांडे थांबून राहिले व शिवाजी महाराज विशाळगडावर पोहोचेपर्यंत त्यांनी सिद्धी जोहरच्या सैन्याचा अतिशय प्रखरपणे सामना केला. हजारो गनीम कापून काढले. हीच वीरगाथा रणजित देसाई यांनी "पावनखिंड" या त्यांच्या कादंबरीमध्ये चितारलेली आहे.
शिवरायांवरील प्रत्येक कादंबरीद्वारे त्यांच्या विविध गुणवैशिष्ट्यांचे दर्शन होते. शिवाय त्यांच्यावर जीव ओवाळून टाकणाऱ्या त्यांच्या शिलेदारांची गौरवगाथा ही नव्याने ध्यानात येते. बाजीप्रभू आणि शिवाजी महाराजांची पहिली भेट रोहीडा किल्ल्यावर झाली होती. तिथूनच त्यांचा स्नेह अधिक घट्ट होत गेला. बाजीप्रभूंना शिवरायांमधील खरा जाणता राजा दिसला. त्यामुळे लाख मेले तरी चालतील परंतु, लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे, या उक्तीप्रमाणे त्यांनी शिवाजी महाराजांना सुखरूपपणे गनिमांच्या वेढ्यातून बाहेर काढले. त्यात त्यांना आपले प्राण गमवावे लागले. बाजीप्रभुंसोबतच शिवा काशिद यानेही आपल्या प्राणांची आहुती दिली होती. शिवाजी महाराजांसाठी जीव देणारी ही माणसं इतिहासात अजरामर होऊन गेली. त्यांच्यामुळेच शिवरायांना मराठी माणसांचं स्वराज्य स्थापन करता आले. 


 

Saturday, October 31, 2020

ध्रुवांगल पथीनारू

पहाटे साडेचारची वेळ. तीन मित्र पार्टी करून भर पावसात आपल्या कारने घरी चालले आहेत. अचानक त्यांच्या कारसमोर एक व्यक्ती येते. अपघात घडतो. या अपघातात ती व्यक्ती मरण पावते. तिघेही त्या मृतदेहाला कुणाला शंका येऊ नये म्हणून गाडीच्या डिक्कीत टाकून घरी घेऊन येतात. दुसऱ्या दिवशी पोलिसांना रस्त्यावर स्वतःला गोळी झाडून आत्महत्या केलेली एक व्यक्ती सापडते. या घटनेच्या तपासासाठी पोलिस वरील तीन युवकांच्या बंगल्यावर येतात. त्यांची झडती घेतली जाते. परंतु काल मरण पावलेल्या व्यक्तीचा मृतदेह त्यांच्या गाडीच्या डिकीतुन गायब झालेला असतो. थोड्याच वेळात एका फ्लॅटमधून मधून एक मुलगी गायब झाली असल्याची तक्रार पोलिस स्टेशनमध्ये येते. पोलिस स्टेशनमधील इन्स्पेक्टर हा थंड डोक्याने विचार करणारा आहे. तो शांतपणे या सर्व घटनांचा पाठपुरावा करतो व त्यातील संबंध शोधून काढतो. एक अपघात, एक आत्महत्या व एक हरवलेली व्यक्ती यांचा एकमेकांशी काय संबंध असेल? या प्रश्नाभोवती फिरणारा रहस्यपट म्हणजे "ध्रुवांगल पथीनारू" होय. तसा हा चित्रपट फ्लॅशबॅकमध्ये दाखवला आहे. परंतु, शेवट मात्र वर्तमान काळातील आहे. तीन निरनिराळ्या घटनांमधील रहस्य क्षणोक्षणी उलगडत जातं. पण खरा गुन्हेगार कोण? हा प्रश्न अनुत्तरितच राहतो. शेवटच्या मिनिटाला या प्रश्नाचे उत्तर मिळतं व कथेचा अनपेक्षित शेवट होतो.
२०१६ मध्ये प्रदर्शित झालेला हा तमिळ चित्रपट कार्तिक नरेन यांनी लिहिला व दिग्दर्शित केलेला आहे. रहस्य पटाची एक वेगळी आवृत्ती यात पहायला मिळते.
 



Friday, October 30, 2020

सुवर्ण गरुड: लेखक मारुती चितमपल्ली

अरण्यऋषी म्हणून ओळख असलेले मराठी लेखक मारुती चितमपल्ली यांनी लिहिलेले हे पुस्तक होय. वनाधिकारी म्हणून काम करत असताना प्राण्यांसोबतच्या तसेच निसर्गाच्या सहवासातील अनेक अनुभवांवर लिहिलेल्या कथांचा व घटनांचा हा संग्रह होय. यातील पहिल्याच कथेच्या संदर्भाने पुस्तकाला "सुवर्ण गरुड" असे नाव देण्यात आलेले आहे. जंगलात वावरणाऱ्या विविध प्राण्यांसोबत त्यांना आलेले अनुभव या पुस्तकात शब्दबद्ध करण्यात आलेले आहेत. त्यातून विविध प्राण्यांची गुणवैशिष्ट्ये प्रामुख्याने समोर येतात. यातील अनेक वैशिष्ट्ये सर्वसामान्य वाचकाला कदाचित माहीत नसतीलही. त्यामुळे प्राणीजीवन नव्याने अनुभवण्याची संधी या पुस्तकाद्वारे मिळते. प्राण्यांचं वागणं-बोलणं व मनुष्यासोबत असलेला दृष्टिकोन हा पदोपदी विविध कथांमधून जाणवत राहतो. सुवर्ण गरुडासोबतच, मुकना मोर, खंड्या पक्षी, नाकेर पक्षी, शेकरू, कोल्हा, उंदीर, मुंगूस, सांभर, वाघीण, अजगर यासारख्या विविध प्राण्यांच्या कथा या पुस्तकांमध्ये वाचायला मिळतात. पांढरा भुजंग या कथेद्वारे पांढऱ्या नागाच्या शोधार्थ जीवन व्यतीत केलेल्या लेखकाच्या मामाची कहाणी समोर येते. तसेच सोलापूरच्या रखमजी चाचा यांची कहाणी देखील या पुस्तकांमध्ये वाचण्यास मिळते. पदोपदी जंगलातील अनुभव प्राण्यांसोबत जीवन आपण या कथांमधून अनुभवत फिरत असतो.



Wednesday, October 21, 2020

दांडेकरांची हरिश्चन्द्रवारी

तीन जिल्ह्यांच्या सीमेवरील घनदाट अरण्यात सर्वोच्च कोकणकड्यासह विराजमान असलेला दुर्गम दुर्ग म्हणजे हरिश्चन्द्रगड होय. ज्येष्ठ लेखक व दुर्गअभ्यासक गो. नि. दांडेकर जेव्हा या दुर्गावर पहिल्यांदा गेले होते तेव्हा तेही वाट चुकले होते. नगर जिल्ह्यातून ते थेट पुणे जिल्ह्यात पोहोचले होते! त्यांची ती अद्भुत सफर त्यांची 'दुर्गदर्शन' या पुस्तकात वर्णन केली आहे. त्यातलाच हा एक उतारा. 
 

 

गावकुसातील जित्राबं - भरत आंधळे

प्रत्येक गाव हे विविध प्रकारच्या लोकांनी भरलेलं असतं. त्यात निरनिराळ्या प्रवृत्तीचे, स्वभावाचे, शरीरयष्टीचे व व अतरंगी लोक भरलेले असतात. प्रत्येकाची मानसिकता वेगळी, दृष्टिकोन वेगळा आणि जीवन जगायची पद्धतही वेगळी असते. अशाच गावातील विविध व्यक्तींचे चित्रण लेखक भरत आंधळे यांनी त्यांच्या "गावकुसातील जित्राबं" या पुस्तकांमध्ये केलेले आहे. लेखकाचं नाशिक जिल्ह्यातील एक छोटस गाव. या गावात १९९० च्या दशकामध्ये होऊन गेलेल्या विविध व्यक्तींचे व्यक्तिचित्रण या पुस्तकांमध्ये केले गेलेले आहे. मी स्वतः १९९० च्या दशकामध्ये ग्रामीण भागात मोठा झालो असल्याने गावाकडची लोक कशा प्रकारची अवलिया असतात, हे जवळून पाहिलेले आहे. त्यामुळे हे लेखन लगेच भावले. वेगळ्या नावाची किंबहुना अशीच व्यक्तीचित्रण असणारी लोक आपल्या आजूबाजूला होती. किंबहुना ती सर्वच गावांमध्ये असतात. अनेक जण स्वार्थीपणाने कार्य करतात, काहीजण मनमौजी असतात, काहीजण मिळेल ते काम करतात, काहीजण नित्यनेमाने आयुष्यभर एकच काम करत असतात, काहींना पर्याय नसतो तर काहींना नवीन विचारसरणीचे व राहणीमानाचे आकर्षण असते. अशी अनेक माणसे या पुस्तकातून आपल्याला भेटून जातात. गावाकडच्या व्यक्तींसोबतच तिथल्या राहणीमानाचेही दर्शन होते.
आज बहुतांश लोक पुणे-मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये स्थलांतरित होत आहेत. शिवाय गावाकडील राहणीमानही वेगाने बदलत चाललेले आहे. निश्चितच त्याचा परिणाम गावगाड्यावर होताना दिसतो आहे. परंतु मागील शतकाच्या उत्तरार्धामध्ये जे ग्रामीण जीवन आमच्यासारख्यांनी अनुभवले, कदाचित ते पुढच्या पिढ्यांना अनुभवयास मिळणार नाही.
या पुस्तकातील प्रत्येक पात्र वेगवेगळे आहे. ते आपल्याला काहीतरी गोष्ट शिकवून जाते. त्यात जगावे कसे किंवा कसे जगू नये? या प्रश्नाचेही बहुतांशी उत्तर मिळून जाते. पु. ल. देशपांडे यांच्या "व्यक्ती आणि वल्ली" मधील विनोदी पात्रे या पुस्तकामध्ये नसली तरी अत्यंत साध्या ग्रामीण व्यक्ती आपल्याला त्यातून भेटून जातात. विशेष म्हणजे लेखकाने प्रामाणिकपणे आपल्या वडिलांचे प्रतापही व्यक्तिचित्रणाद्वारे या पुस्तकातून मांडले आहेत. ग्रामीण व्यक्ती व जीवन शैली अनुभवलेल्या प्रत्येकालाच यातील प्रत्येक पात्र जाणून घेण्यात निश्चितच आनंद वाटेल.
 

 

Tuesday, October 20, 2020

ट्रॅप्ड

एखाद्या इमारतीच्या ३५ व्या मजल्यावरील सदनिकेत तुम्ही अडकला आहात. पूर्ण इमारतीत तुमच्या शिवाय कोणीही राहत नाही. घरातील पाणी आणि वीज पूर्ण बंद आहे. आजूबाजूच्या इमारती अतिशय खुजा आहेत. त्यामुळे तुमचा आवाज तीथवर पोहोचत नाही. अशा वेळी तुमची काय अवस्था होईल व तिथून बाहेर पडण्यासाठी तुम्ही काय काय कराल? या प्रश्नांची उत्तर देणारा वेगळ्या धाटणीचा चित्रपट म्हणजे ट्रॅप्ड होय.
काही वर्षांपूर्वी दूर निर्जन बेटावर अडकलेल्या एका व्यक्तीची गोष्ट हॉलिवूडच्या "कास्ट अवे" या चित्रपटातून पाहिली होती. पण ट्रॅप्ड मात्र यापेक्षा वेगळा आहे. या चित्रपटात त्याला आजूबाजूची सर्व माणसं दिसतायेत. हजारो लोक त्याच्या दृष्टिक्षेपात आहेत. पण तरीही तो हतबल आहे. कारण त्यांना त्याचं अस्तित्व माहित नाहीये.
पृथ्वीवरील सर्व प्राण्यांमध्ये मनुष्यप्राणी हा सर्वात बुद्धिमान मानला जातो. त्याच्या मेंदूचा अतिशय हुशारीने उपयोग करून त्याने या जगावर हुकूमत मिळवली आहे. त्यामुळे तो कसेही करून आपल्या प्रयोगशील मेंदूचा वापर कसा करू शकेल? हे या चित्रपटातून दिसते. आपल्या आजूबाजूच्या वस्तूंचा वापर करून तो सुटका करण्याचा प्रयत्न करतो. घरातल्या उंदरांनाही तो घाबरतो. पण नंतर त्याच्यात धिटाई येते. अन्नावाचून तडफडत असताना शुद्ध शाकाहारी असणारा तो वेळप्रसंगी मांसाहारीही होतो. अतिशय संकटात असताना त्याच्या मदतीला योग्य वेळी निसर्गही धावून येतो. अनेक आठवडे संघर्ष केल्यानंतर तो स्वतः सहीसलामत स्वतःची सुटका करून घेतो. या कथानकाचा चित्रपट आहे...  ट्रॅप्ड.
सन २०१६ मध्ये प्रदर्शित झालेला व सर्व काही राजकुमार राव असलेला हा चित्रपट होय.


 

Monday, October 19, 2020

गर्द: डॉ. अनिल अवचट

सुशांत सिंग आत्महत्या प्रकरण सुरू झाल्यापासून प्रसारमाध्यमांद्वारे संबंधित बातम्यांचा भडीमार होतो आहे. शिवाय या प्रकरणाने अमली पदार्थांच्या दिशेने नवीन वळण घेतले व बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणे समोर येऊ लागली. चर्चा झडू लागल्या. त्यामुळे ड्रग्ज नक्की काय असते व त्याचे व्यसन कशाप्रकारे जडले जाते? याची उत्सुकता होती. यात पडलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी "गर्द" या पुस्तकाची मोठी मदत झाली.

लोकांना सर्वसामान्यपणे दारूचे व्यसन असते. आपल्या आजूबाजूला आपण असे अनेक दारुडे, बेवडे पडलेले बघतो. त्यामुळे व्यसन म्हणजे काय? याची माहिती पहिल्यापासून होतीच. परंतु, गर्द अर्थात हेरोईन, ब्राउन शुगर सारख्या व्यसनांची व्याप्ती नक्की कशी आहे, याची माहिती अद्याप नव्हती. डॉ. अनिल अवचट लिखित गर्द या पुस्तकातून तपशीलवार सर्व माहिती पहिल्यांदाच समजली. डॉ. आनंद नाडकर्णी हे गर्द च्या रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर होय. त्यांच्या सहवासातून व अनुभवातून अनिल अवचट यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे. ब्राऊन शुगरची नशा कशी असते, ती कशी जडते, त्याचे दुष्परिणाम कोणते व त्याची व्यसनाधीन व्यक्ती कशाप्रकारे वागते? अशा विविध प्रश्नांची उत्तरे सत्य घटनांद्वारे या पुस्तकांमध्ये लेखकाने मांडलेली आहेत. 



एक वेळ दारूचे व्यसन सोडता येईल, परंतु गर्दचे व्यसन सुटणे महाकठीण. तसं पाहिलं तर तो एक प्रकारचा रोगच आहे. म्हणून त्यावर पद्धतशीर उपचार करावे लागतात. केवळ शारीरिक नाही तर व्यसनाधीन व्यक्ती मानसिक आजारी होतो. स्वतःची इच्छा असेल तरीही त्याला बाहेर पडता येत नाही. व्यसन चालूच ठेवावे लागते व त्याकरिता पैसा लागत असतो. पैशासाठी खोटं बोललं जातं, चोऱ्या केल्या जातात व त्यातूनच गुन्हेगार जन्माला येतात. इतकी मोठी व्याप्ती या व्यसनाची आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये हे व्यसन करणाऱ्या लोकांना प्रतिष्ठा प्राप्त आहे. परंतु, भारतीय संस्कृती वेगळी असल्यामुळे आपल्याकडे असं काही नाही. मध्यमवर्गीयांना हे व्यसन परवडणारे नाही. भारतीय उच्चभ्रू लोकांमध्येही मोठ्या प्रमाणात लोक गर्दच्या व्यसनाधीन आहेत. याची सर्व माहिती या पुस्तकामधून आपल्याला मिळते. याशिवाय ब्राऊन शुगर, हेरॉईन, गांजा, अफू यांचा नक्की काय परस्परसंबंध आहे, याची माहितीही लेखकाने पुस्तकामध्ये दिलेली आहे. व्यसनाच्या या बाबतीत डोळ्यात अंजन घालणारे असे हे पुस्तक होय.
(डॉ. अनिल अवचट हे मुळचे जुन्नरमधील ओतूरचे. त्यांचा आमच्या गावातील मधुकर कुलकर्णी यांच्याशी स्नेह होता. त्यांच्या श्रीविद्या प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. त्यामुळे माझ्या गावाचा या पुस्तकातील उल्लेख सुखावणारा होता.)

Sunday, October 18, 2020

पावनखिंडीतून...

रणजित देसाई लिखित "पावनखिंड" या कादंबरीतील हा बाजीप्रभू देशपांडे आणि शिवाजी महाराज यांच्यातील एक संवाद. एखाद्या गोष्टीकडे पाहण्याची शिवाजी महाराजांची दृष्टी कशी होती? याची माहिती निश्चितच आपल्याला होते.

ते दृश्य पाहून राजे बाजींना म्हणाले,
'बाजी ! गनीम भारी पडला ! सिद्दी आता हलणार नाही. तो आपली वाट बघत राहणार !'
'कसली ?'
'शरणागतीची !' राजांनी सांगितले.
'वाट बघ, म्हणावं !' बाजी उसळले, 'वेळ आलीच, तर मारू किंवा मरू'
राजे हसले. ते म्हणाले,
'नाही, बाजी, असला अतिरेकी विचार आपल्याला परवडणार नाही. ते फक्त रजपूत करू जाणे ! मोठं संकट आलं की, वैतागानं प्राणाची बाजी लावायची आणि रणांगणी समर्पण करायचं. मागं बायका-मुलींनी जोहार करायचा. नावलौकिक फक्त मरणाचा. यश मात्र नेहमीच शत्रूच्या हाती !'

Saturday, October 17, 2020

रतशासन

दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये नाविन्य ठासून भरलेले आहे. अनेक चित्रपटांमधून लेखकाची व दिग्दर्शकाची मेहनत पदोपदी जाणवते. यात प्रकारातला तमिळ रहस्यपट म्हणजे "रतशासन" होय. मागील काही महिन्यांपासून विविध भाषांमधील अनेक रहस्यपट पाहिले. परंतु, हा चित्रपट मात्र थोडा वेगळ्या धाटणीचा आहे. शिवाय चित्रपटाची लांबी अडीच तासांची आहे. त्यामुळेच रहस्य आणि थरार दीर्घकाळापर्यंत ठासून भरल्याचे दिसते.
सन २०१८ मधील हा चित्रपट प्रेम कुमार यांनी दिग्दर्शित केला होता. अभिनेता विष्णू विशाल यात मुख्य भूमिकेमध्ये आहे. त्याची एक यशस्वी दिग्दर्शक होण्यासाठी धडपड चालू असते. एका सिरीयल किलरच्या गोष्टीवर त्याचं काम पूर्ण झालेलं असतं. परंतु कोणताही निर्माता त्याचा चित्रपट बनवण्यासाठी पुढे येत नाही. मग "दुर्दैवाने" तो पोलिसांची नोकरी स्वीकारतो. मागील काही वर्षांपासून आपल्या सीरियल किलरच्या स्टोरीवर काम केल्यामुळे त्याचा खूप मोठा अभ्यास यावर झालेला असतो. त्याचा फायदा शहरात घडत असलेल्या एका विचित्र खून शृंखलेचा माग काढण्यासाठी तो करतो. अशी या चित्रपटाची स्टोरी लाइन आहे. 

रहस्यपट म्हटलं की, त्यात अनेक गोष्टींचा बारकाईने विचार करावा लागतो. अनेक शक्यता तपासाव्या लागतात. या सर्वांचा लेखकाने अतिशय बारीक अभ्यास केल्याचे या चित्रपटातून दिसून येते. पदोपदी तयार होणारे प्रश्न आणि निर्माण होणारे रहस्य, पुढे काय होईल? या प्रश्नाचे उत्तर शोध घेण्यास भाग पाडते. छोट्यातील छोटे सुगावे लेखकाने खूप उत्तमरित्या जमवून आणलेले आहेत. खरं तर एखाद्या पोलीस अधिकाऱ्याने गुन्ह्याचा तपास कसा व कोणत्या दिशेने करायचा असतो, यासाठी मार्गदर्शन करणारा असाच हा चित्रपट आहे. कथेतील चढ-उतार, दिशा, सातत्य आणि वेग याला तोडच नाही. त्यामुळे रहस्य पटाचा विचार करत असल्यास हा चित्रपट नक्की आणि नक्की पहा.


Monday, September 28, 2020

वेगवान गोलंदाज

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान गोलंदाज कोणता? या प्रश्नाचे उत्तर जवळपास सर्वांनाच माहित आहे. परंतु, युट्युबवर जाऊन 175 एमपीएच या नावाने एकदा सर्च करून बघा. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज मतिषा पथिराना याने मागील वर्षी कुमार विश्वचषकामध्ये भारताविरुद्ध 175 किलोमीटर प्रतितास वेगाचा चेंडूत टाकल्याचे व्हिडिओ तुम्हाला आढळून येतील. परंतु प्रत्यक्षात असे आहे का?
175 हा क्रिकेटमधला अविश्वसनीय वेग मानला जाईल. प्रत्यक्ष हा चेंडू पाहिला तर लक्षात येते की, काहीतरी गडबड आहे. खरं तर गडबड होतीच! त्यावेळी आयसीसीची स्पीडगन व्यवस्थित चालत नव्हती. त्यामुळे तिने 175 चा वेग दाखवला. अशी परिस्थिती सुमारे वीस वर्षापूर्वीही झाली होती. ज्यात पाकिस्तानच्या मोहम्मद सामी या गोलंदाजाचा वेग 163 इतका दाखवण्यात आला होता. याचेही व्हिडिओ युट्युबवर पाहता येतील. मोहम्मद सामीचा चेंडू सौरभ गांगुलीने सीमापार धाडला होता. तसा तो वेगवान होता. परंतु, 163 चा वेग गाठू शकेल, असे दिसत नाही. आयसीसीची स्पीडगन यापूर्वी बरेचदा अशीच बिघडलेली आहे. तरीही सर्वात वेगवान गोलंदाज कोणते? याचा खराखुरा आढावा आपण घेऊयात. मागच्या पंधरा वर्षांमध्ये शंभर मैलांचा अर्थात 160 किलोमीटर प्रतितास या वेगाचा पल्ला केवळ एकदाच एका गोलंदाजाने गाठलेला आहे. त्यापूर्वीची दहा वर्ष मात्र वेगवान गोलंदाजांनी क्रिकेट विश्वावर राज्य केले होते. त्यात प्रामुख्याने ऑस्ट्रेलिया व पाकिस्तानी गोलंदाजांचा समावेश होता. वेगवान गोलंदाजांचे वेग हेच सर्वात मोठे अस्त्र होते. त्याचा वापरही उत्तमरित्या मैदानावर केला गेला. परंतू, आजची परिस्थिती पाहिली तर ध्यानात येते की, गोलंदाजांना 150 चा वेगही मोठ्या मेहनतीने पार करता येतो. 


शोएब अख्तर आजवरचा सर्वात वेगवान गोलंदाज. या पाकिस्तानी गोलंदाजाने सन 2003 च्या विश्वचषकामध्ये इंग्लंड विरुद्ध 161.3 kmph चा वेग गाठला होता. हाच  आजवरचा सर्वात वेगवान चेंडू होय. इतर वेळेसही शोएब अख्तरचे बहुतांश चेंडू 150 च्यावर वेग गाठत असत. ऑस्ट्रेलियाचा ब्रेट ली हा दुसरा वेगवान गोलंदाज होय. वेस्ट इंडिज विरुद्ध खेळताना त्याने 161.1 चा वेग सन 2003 मध्येच गाठला होता. ऑस्ट्रेलियाचा शॉन टेट या गोलंदाजानेही 161 चा वेग इंग्लंड विरुद्ध पार केलेला आहे. चौथ्या क्रमांकावरील जेफ थॉमसन याचा विक्रम सुमारे पंचवीस वर्ष अबाधित होता. वेस्ट इंडिज विरुद्ध 1975 मध्ये खेळताना त्याने 160.6 चा वेग गाठला होता. पाचव्या क्रमांकावरही ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क हा गोलंदाज येतो. 160 च्यावर गोलंदाजी केलेला तो पाचवा गोलंदाज होता. या पाच जणांव्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कुणीही आजवर 160 किलोमीटर प्रतितास किंवा 100 मैल प्रतितास टप्पा पार केलेला नाही!


Sunday, September 20, 2020

अशी ही बनवाबनवी आणि धुमधडाका

सचिन पिळगावकरचा "अशी ही बनवाबनवी" आणि महेश कोठारे यांचा "धुमधडाका" हे मराठी चित्रपट सृष्टीतील मैलाचा दगड ठरलेले चित्रपट होय. परंतु, दोन्ही चित्रपट विविध चित्रपटांचे रिमेक आहेत, याची खूप कमी जणांना माहिती असेल. धूमधडाका हा चित्रपटाच्या रिमेकच्या सिरीज मधला सर्वात शेवटचा चित्रपट होता. 1985 मध्ये तयार झालेला धुमधडाका हा मूळ तमिळ चित्रपट काढलिक्का नेरामिलाई या या चित्रपटाचा रिमेक होय. हा तमिळ पट 1964 मध्ये तयार झाला होता. त्याचा पहिला रिमेक तेलगु मध्ये 1965 मध्ये झाला. 1966 मध्ये तो हिंदीत "प्यार किये जा"  या नावाने तयार झाला होता. तर 1979 मध्ये या चित्रपटाचा कन्नडमध्ये रिमेक झाला आणि सर्वात शेवटी तो महेश कोठारे यांनी 1985 मध्ये मराठी मध्ये आणला!
सचिन पिळगावकर यांनीही हिंदीमधले अनेक चित्रपट मराठीमध्ये रिमेक केले आहेत. त्यातीलच "अशी ही बनवाबनवी" हाही एक चित्रपट होय. तो 1988 मध्ये रिलीज झाला होता. 1966 मधील ऋषिकेश मुखर्जी यांच्या "बिवी और मकान" या चित्रपटावर तो आधारित होता. त्याचा पुन्हा रिमेक 1991 मध्ये तेलगू भाषेत तर 2003 मध्ये कन्नड भाषेमध्ये करण्यात आला. 2009 मध्ये हिंदीत "पेयिंग गेस्ट" या नावाने, 2014 मध्ये पंजाबी मध्ये मिस्टर अँड मिसेस 420 तर 2017 मध्ये जिओ पगला या नावाने बंगालीत रिमेक झाला. अशा तऱ्हेने एक सुपर हिट स्टोरी भारताच्या विविध भाषांमध्ये पुन्हा पुन्हा तयार होत आलेली आहे.


 

Sunday, September 13, 2020

कोडिंग फॉर किड्स

आजच्या माहिती तंत्रज्ञान युगामध्ये प्रत्येकालाच संगणकाची माहिती असणे आवश्यक आहे. अनेक युरोपियन देशांमध्ये शालेय अभ्यासक्रमामध्येच विद्यार्थ्यांना संगणकीय प्रोग्रॅमिंगची माहिती होण्यासाठी संगणकीय भाषा शिकवल्या जातात. त्यामुळे संगणकाचा वापर कोडींग (coding) करण्यासाठी कसा करावा, हे विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच समजते. भारत सरकारने देखील नवीन शिक्षण धोरणानुसार इयत्ता सहावी पासूनच शालेय अभ्यासक्रमामध्ये संगणकीय कोडींगचा समावेश केला आहे. ज्याद्वारे संगणकाचा वापर कसा करायचा असतो, हे विद्यार्थ्यांना अवगत होते. याकरिता वापरण्यात येणारी अत्याधुनिक संगणकीय भाषा म्हणजे *स्क्रॅच* (Scratch) होय. विद्यार्थ्यांना या संगणकीय भाषेद्वारे कोडिंग करता यावी, स्वतःचे संगणकीय प्रोग्रॅम लिहिता यावे, ॲनिमेशन तयार करता यावे तसेच विविध कॉम्प्युटर गेम बनवता यावे, याकरिता आम्ही *कोडींग फॉर किड्स* हा ऑनलाइन अभ्यासक्रम तयार केला आहे. विविध बहुराष्ट्रीय व भारतीय कंपन्या पालकांकडून मोठ्या फी आकारणी करून चालवत आहेत. आम्ही तो केवळ 999 रुपयांमध्ये ऑनलाइन उपलब्ध करून दिलेला आहे. याद्वारे विद्यार्थ्यांना संगणकीय कोडींगचे परिपूर्ण ज्ञान प्राप्त होण्यास मदत होईल.

अधिक माहितीसाठी संपर्क: 9960163010
वेबसाईट: https://mitu.co.in/coding-for-kids

Tuesday, September 1, 2020

शिलेदारांचे ईमान - अनंत तिबिले

मी सहसा ऐतिहासिक कादंबरी वाचत नाही. कादंबरीकार इतिहास अधिक रंजक पद्धतीने मांडत असल्याने तो चुकीचा मनात बसण्याची शक्यता असते. त्यामुळे अशी पुस्तके मी टाळतो. परंतु, काहीतरी वेगळं वाचावं यासाठी अनंत तिबिले यांची ही पहिलीच कादंबरी वाचून काढली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका अज्ञात मावळ्याच्या शौर्यावर व त्याच्या तत्कालीन जीवनावर आधारित असणारी ही कादंबरी होय. त्याचे नाव केदार. नाव तसं तत्कालीन परिस्थिती पाहता वेगळं वाटत असलं, तरी ते फारसं जाणवून येत नाही. कादंबरीचा नायक अर्थात जो स्वराज्याचा शिलेदार आहे, तो अनाथ आहे. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात तो दाखल होतो व प्रतापगडची मोहीम, विशाळगडचा वेढा तसेच मिरजेचा वेढा अशा विविध प्रसंगांमध्ये आपले शौर्य दाखवतो. अशी एकंदरीत कादंबरीची पार्श्वभूमी आहे. शिवाय तिला प्रेमकहाणीचाही स्पर्श झालेला आहे. अनंत तिबिले यांनी सर्व प्रसंग विविध प्रकरणांमध्ये मांडलेले आहेत. प्रसंग जरी निरनिराळे असले तरी कथा कुठेही तुटत नाही. तिची रंजकता टिकून राहते. शिवकालामध्ये खरोखरच कित्येक मावळ्यांच्या जीवनात असे प्रसंग आले असावेत, याची जाणीव ही कादंबरी निश्चितच करून देते.

 

Friday, August 28, 2020

आरोग्य आणि शिक्षण

जगापुढे कोरोना सारख्या महामारीचे संकट उभे असताना वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन व युनिसेफ यांनी नुकताच एक शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्य विषयीचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार जगातील ३३ टक्के शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध नाही. जरी यातील एक तृतीयांश शाळा या आफ्रिकेतील वाळवंटी प्रदेशातल्या असल्या तरी बहुतांश शाळा या भारतातील देखील आहेत. स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतर देखील अनेक भारतीय शाळांमध्ये अजूनही पिण्याच्या पाण्याची सुविधा व्यवस्थित उपलब्ध होऊ शकलेली नाही. तशीच परिस्थिती हात धुण्याच्या पाण्याची व साबणाचीही आहे. भारतामध्ये इंग्रजी माध्यमांच्या शाळांचं फॅड वाढत चालले असताना सरकारी व अनुदानित शाळांकडे मात्र दुर्लक्ष होताना दिसत आहे. विद्यार्थ्यांना शाळेमध्ये लागणाऱ्या मूलभूत सुविधा देखील उपलब्ध होताना दिसत नाहीत. शासकीय शाळांना दरवर्षी अशा विविध कामांसाठी शासनाकडून अतिशय तुटपुंजी रक्कम दिली जाते. त्यामुळे शाळांमध्ये सुविधा उपलब्ध करता येत नाहीत. गावातील नागरिक जर सुजान असतील तर तेच लोकसहभागातून व वर्गणी द्वारे शासकीय शाळांच्या सुधारणा करत आहेत. नागरिकांचे जरी हे कर्तव्य असले तरी शासनाची ही जबाबदारी आहे. भारतासारख्या प्रगतीशील देशांमध्ये शिक्षणाचे बजेट अतिशय कमी आहे. त्यामुळेच शिक्षणाला व शिक्षण मंदिराला दुय्यम स्थान दिले जाते.

Saturday, August 22, 2020

पायथॉन प्रोग्रॅमिंग : पहिले मराठी ई-बुक

सुमारे एक वर्षापूर्वीची गोष्ट. पायथॉन प्रोग्रॅमिंगचे मराठीतून व्हिडिओ ट्युटोरिअल तयार करण्याची संकल्पना मनात आली आणि काही कालावधीतच सदर व्हिडिओज युट्युबवर आम्ही अपलोड केले. खरंतर या व्हिडिओजला मिळणारा प्रतिसाद हा अपेक्षेपेक्षा अधिकच होता. केवळ एकाच वर्षांमध्ये आमच्या युट्युब चॅनेल वरील हे सर्वात लोकप्रिय व्हिडिओ ठरले. कमेंटसवरून प्रतिसाद लक्षात यायला लागला. प्रत्येक ट्यूटोरियल मराठी प्रोग्रॅमरला आवडत होते. त्यांचा प्रतिसाद हा हुरूप देणारा ठरला. आज तुम्ही गुगल अथवा युट्युब वर Python in Marathi असे सर्च केल्यास हेच व्हिडिओ सर्वात आधी दिसून येतात. शिवाय मागच्या सलग आठ महिन्यांपासून कंपनीच्या युट्युब चॅनेलचे टॉप तीन व्हिडीओज हे "पायथॉन इन मराठी" याच प्लेलिस्टमधील आहेत!
कुणालाही आपल्या भाषेतून शिकायला मिळणे, हे आनंददायी व अधिक आवडीचे असते. त्याचाच हा परिणाम म्हणूनच पायथॉन प्रोग्रॅमिंगचे मराठीतून पुस्तक लिहावे, हा विचार मनात आला व लगेच त्यावर काम करायला आम्ही सुरुवात केली. मागच्या सहा वर्षांपासून या संगणकीय भाषेवर प्रभुत्व निर्माण झाले होते. त्यामुळे त्यातील संकल्पना सहजपणे मराठीतून मांडायला सोपे जाऊ लागले. पुस्तकाची संकल्पना दोन महिन्यांपासून आकार घेऊ लागली होती आणि तंत्रज्ञानाच्या सहकार्यानेच इतक्या कमी कालावधीत पुस्तक तयार झाले. आज त्याची पहिली झलक इथे प्रदर्शित करीत आहोत. त्यासाठी माझी पत्नी रश्मी हिचा मोलाचा सहभाग आहे. म्हणूनच तिच्या वाढदिवशी या पुस्तकाची घोषणा करत आहोत. हे माझे तिसरे पुस्तक होय! तसेच ते पहिलेच व्यवसायिक ई-बुक आहे. त्याचे प्रकाशन ५ सप्टेंबर अर्थात शिक्षकदिनी होणार आहे. तेव्हाच त्याची आवृत्ती ऑनलाईन ई-वितरणासाठी उपलब्ध होईल. तसेच १५ सप्टेंबर अर्थात अभियंता दिनापासून ते अमेझॉन व गूगल बुक्स वरही उपलब्ध केले जाईल.

अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://mitu.co.in/python-programming-in-marathi-e-book

 

Wednesday, August 19, 2020

खलील जिब्रानच्या उत्कृष्ट कथा

साधारणतः वीसेक वर्षांपूर्वी एका मराठी वृत्तपत्रामध्ये खलील जिब्रानच्या लघु बोधकथा प्रकाशित व्हायच्या. या बोधकथांमधून कमीत कमी घटनांद्वारे सर्वोत्तम संदेश लेखक देत असे. त्यामुळे त्या कथा मनाला भावत असत. खलील जिब्रान हे नाव तेव्हा मी पहिल्यांदाच ऐकले. आपल्या अवतीभवती घडणाऱ्या विविध घटनांना बांधेसूदपणे शब्दात मांडून त्याची बोधकथा तयार करण्याचे कौशल्य खलिल जिब्रान यांच्याकडे होते. त्यामुळे दररोज प्रसिद्ध होणाऱ्या या बोधकथा मी नियमित वाचत असे. आज वीस वर्षांनी खलील जिब्रानच्या कथा वाचण्याची पुन:श्च संधी मिळाली.
अनेकांना हे नाव कदाचित परिचित नसावे. खलील जिब्रान हे इंग्रजी आणि अरेबिक साहित्यातील एक प्रसिद्ध लेखक व चित्रकार होते. त्यांनी एकूण पंचवीस पुस्तके लिहिलेली आहेत. शिवाय त्यांच्या कथांचा जगातील २० पेक्षा अधिक भाषांमध्ये अनुवादही झालेला आहे. त्यांच्या या साहित्यातील सर्वोत्कृष्ट कथांचा स्मिता लिमये यांनी केलेला हा अनुवाद होय. 


खलील यांचा जन्म लेबेनॉन सारख्या सतत अराजकतेमध्ये वावरणाऱ्या देशामध्ये झाला होता. तरीही अशा वातावरणात त्यांची निर्मल विचारधारा साहित्य रुपाने बाहेर आली, हे विशेष! कमीत कमी शब्दांमध्ये कथा सादर करून त्याचे तात्पर्य वाचकांसमोर मांडण्याचे कौशल्य त्यांच्याकडे आहे. या पुस्तकाचे प्रामुख्याने तीन भाग आहेत. यातल्या पहिल्या भागामध्ये लेखकाचे विचार सुविचार रूपामध्ये मांडलेले आहेत. दुसऱ्या भागात लघु-बोधकथा वाचता येतात. तर तिसऱ्या भागामध्ये दोन दीर्घकथा आहेत. मनाला भावणारे विचार व लघु कथांमधून येणारी त्याची प्रचिती अनुभवायची असल्यास खलील जिब्रान यांचे साहित्य निश्चितच उपयोगी आणि प्रेरणादायी ठरेल असेच आहे.

Friday, August 14, 2020

मराठी भाषे विषयी थोडसं वेगळं, पण महत्त्वाचं!

जगामध्ये शेकडो भाषा एक कोटी पेक्षा जास्त लोकांच्या मातृभाषा आहेत. ज्यांना त्यांची प्रथम भाषा म्हणूनही ओळखले जाते. अशा विविध भाषांवर काम करणारी एस.आय.एल. इंटरनॅशनल ही नामांकित संस्था होय. दरवर्षी भाषेच्या संख्येनुसार अर्थात ती भाषा बोलणाऱ्याच्या संख्येनुसार आकडेवारी एस.आय.एल. द्वारे प्रसारित केली जाते. आज जगातल्या सर्वाधिक बोलल्या जाणार्‍या भाषांमध्ये बहुतांश भाषा या भारतीय आहेत. यात मराठी भाषेचाही समावेश होतो. परंतु मराठी भाषा अन्य भाषांपेक्षा आपलं वेगळेपण राखून असल्याचे दिसते. त्यासाठीच हा लेखप्रपंच.
जगात बोलल्या जाणार्‍या प्रमुख भाषा या एक किंवा त्यापेक्षा अधिक देशांमध्ये राष्ट्रभाषा किंवा अधिकृत भाषा म्हणून प्रचलित आहेत. एस.आय.एल. ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मागील वर्षीच्या सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या दहा भाषा व व त्या कोणत्या देशांमध्ये अधिकृत आहेत त्याची माहिती एकदा तपासून पहा.

१. चायनीज
चीनची लोकसंख्या जगात सर्वात जास्त असल्यामुळे चिनी ही जगातली सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा होय. तिचे अधिकृतपणे मंदारीन असे नाव आहे. जगात ९२ कोटी लोकांची ती मातृभाषा आहे. तसेच चीन, तैवान, मकाऊ आणि सिंगापूर या चार देशांमध्ये तिला अधिकृत भाषेचा दर्जा प्राप्त आहे.

२. स्पॅनिश
बहुतांश लॅटिन अमेरिका अर्थात दक्षिण अमेरिकेमध्ये स्पॅनिश भाषा बोलली जाते. युरोपियन स्पेन सारख्या देशांपेक्षा अमेरिकेत ही भाषा बोलणाऱ्यांची संख्या अधिक आहे. ४८ करोड लोकांची ती मातृभाषा आहे. शिवाय वीस देशांची अधिकृत भाषा म्हणून स्पनिशला मान्यता आहे.

३. इंग्लिश
इंग्लिश ही जगाची भाषा म्हणून ओळखली जाते. शिवाय ती ३८ कोटी लोकांची मातृभाषा आहे. विशेष म्हणजे ८० पेक्षा अधिक देशांमध्ये इंग्लिशला अधिकृत भाषा म्हणून दर्जा दिला गेला आहे. त्यात भारताचाही समावेश होतो.

४. हिंदी
भारतात सर्वात जास्त बोलली जाणारी ही भाषा होय. ती जगामध्ये ३४ कोटी लोकांची मूळ मातृभाषा आहे. शिवाय भारताव्यतिरिक्त फिजी या देशाची ती अधिकृत भाषा आहे.

५. बंगाली
प्रामुख्याने भारतात बोलली जाते. तिचे ते २० करोड मातृभाषा असणारे लोक आहेत. शिवाय भारत व बांगलादेश या दोन देशांची ती अधिकृत भाषा आहे.

६. पोर्तुगीज
सहाव्या क्रमांकावरील पोर्तुगीज भाषा मूळची पोर्तुगालची असली तरी ब्राझील देशामध्ये तिचे सर्वाधिक मातृभाषीक आहेत. २२ कोटी लोकांची ती प्रथम भाषा असून तिला दहा देशांमध्ये अधिकृत भाषेचा दर्जा प्राप्त आहे.

७. रशियन
क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा देश असणाऱ्या रशियाची रशियन ही अधिकृत भाषा होय. १५ कोटी लोकांची ती मातृभाषा आहे. याशिवाय जगातल्या आठ देशांमध्ये तिला राष्ट्रभाषा किंवा अधिकृत भाषा हा दर्जा प्राप्त आहे.

८. जपानी
ही भाषा प्रामुख्याने जपानमध्ये बोलली जाते. ती तेरा कोटी लोकांची मातृभाषा असून जपान सह पलाऊ देशाची अधिकृत भाषा आहे.

९. पंजाबी
भारत व पाकिस्तानच्या पंजाब प्रांतांमध्ये पंजाबी प्रामुख्याने बोलली जाते. विशेष म्हणजे भारतापेक्षा पाकिस्तान मध्ये पंजाबी बोलणाऱ्यांची संख्या अधिक आहे. फरक इतकाच की, पाकिस्तानी पंजाबी शाहमुखी लिपीमध्ये तर भारतीय पंजाबी गुरुमुखी लिपीत लिहिली जाते. मातृभाषा म्हणून पाकिस्तान मध्ये पंजाबी ही पहिल्या क्रमांकाची भाषा आहे! शिवाय जगात ९.२ कोटी लोकांची मातृभाषा आहे.

१०. मराठी
मातृभाषा म्हणून सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या भाषेत मराठी भाषा दहाव्या क्रमांकावर आहे. ८.३ कोटी लोकांची ती मातृभाषा आहे. आणि सर्वात विशेष म्हणजे मराठी भाषा फक्त एकाच देशात अर्थात भारतामध्ये अधिकृत भाषेचा दर्जा राखून आहे. दहाव्या क्रमांकावरील ही पहिलीच अशी भाषा की जी फक्त एकाच देशामध्ये अधिकृत भाषा मानली जाते!

स्रोत:
https://www.sil.org/
https://en.wikipedia.org/wiki/List_of_languages_by_number_of_native_speakers

@ तुषार कुटे. 
 

Thursday, August 13, 2020

मानवजातीची कथा- डॉ. हेन्री थॉमस

डॉ. हेन्री थॉमस यांच्या लेखणीतून अवतरलेल्या 'मानवजातीची कथा' या पुस्तकाचा साने गुरुजींनी मराठीमध्ये अप्रतिम अनुवाद केला आहे. ही कथा आहे मानवजातीची...  खऱ्या अर्थाने मानवांच्या जातींची! या जाती कोणत्या? क्रूरकर्मा हुकूमशहा, धर्मांचे प्रेषित, आपल्याच नागरिकांवर अन्याय करणारे सम्राट, अहिंसेचा मार्ग असणारे संत, या विश्वाला खऱ्या मानवाच्या दृष्टीने बघणारे कवी-लेखक, कष्टकऱ्यांचे कष्ट समजून घेणारे विचारवंत, जगाला शांततेचा संदेश देणारे शांततादूत, अनेक देशांवर राज्य करण्याचे स्वप्न पाहणारे क्रूर राज्यकर्ते आणि जगाला नवे दृष्टिकोन देणारे तत्वज्ञ. अशा विविध मानव जातींचा हा संक्षिप्त इतिहास आहे. मानवी इतिहासामध्ये आजवर अनेक व्यक्ती होऊन गेल्या. त्यांच्या जीवनाचा व कार्याचा सारांश या पुस्तकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. हे मानव विविध प्रकारचे आहेत. मानवी इतिहासावर त्यांचा प्रभावही तितकाच मोठा आहे. त्यांनी जगाचा इतिहास व भूगोल बदलवून टाकलेला आहे. मानवाने कसे असावे व कसे असू नये? या दोहोंचीही अवलोकन करणारा हा इतिहास आहे. 

मागील अडीच ते साडेतीन हजार वर्षांमध्ये ज्या घडामोडी घडल्या व त्या घडामोडींवर ज्यांचा प्रभाव होता, त्यांचं संक्षिप्त चरित्र म्हणून या पुस्तकाकडे पाहता येईल. मानवी संस्कृतीची सुरुवात झाल्यानंतर मागील तीन हजार वर्षांमध्ये आपण खऱ्या अर्थाने प्रगत होत गेलो. याच कालखंडात मानव म्हणून आपल्यातील अनेक प्रवृत्ती दिसून आल्या. त्याच प्रवृत्तींचं प्रतिमा चित्रण म्हणजे 'मानवजातीची कथा' होय. या कथेची सुरुवात होते बंडखोर राजपुत्र मुसा याच्यापासून आणि शेवट झाला आहे दुसऱ्या महायुद्धाच्या मुसोलीनी आणि हिटलरमध्ये. या दरम्यानच्या कालखंडातील अनेक व्यक्ती त्यांची नावे आपण यापूर्वी अनेकदा ऐकली. त्यांचे कार्य ही आपल्याला ज्ञात आहे. परंतु, त्याचा जगाच्या इतिहासावर नक्की कसा प्रभाव पडला याची माहिती मात्र आपल्याला नाही. हा इतिहास प्रामुख्याने युरोप खंडात घडला. ग्रीस, इटली, स्पेन, पोर्तुगाल, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, रशिया, हॉलंड या देशांमध्ये अनेक व्यक्ती होऊन गेल्या. त्यांची व त्यांच्या कार्याची मीमांसा आपल्याला पुस्तकांमधून होते. युरोप व्यतिरिक्त अमेरिकेतील दोन आणि अशियातील तीन व्यक्तींची संक्षिप्त माहिती लेखकाने या पुस्तकात दिली आहे.
ग्रीक व रोमन संस्कृती या जगाच्या इतिहासातील सर्वात जुन्या संस्कृती होत. त्यांच्यामध्ये दोन हजार वर्षांपूर्वी अनेक राजे होऊन गेले. अनेक तत्त्वज्ञ व शास्त्रज्ञही झाले. तो काळ होता जगात धर्म येण्यापूर्वीचा, म्हणजे नरसंहार करण्यासाठी तत्कालीन सम्राटांना धर्माचे कारण नव्हते. यात काळातील अलेक्झांडर, एपिक्यूरस, हॅनिबॉल, केटू, सीझर, चौदावा लुई, नेपोलियन सारखे युरोपियन सम्राट या जगावर केवळ हुकूमत गाजवण्यासाठी व राज्य करण्यासाठीच जन्माला आले होते, असे इतिहास सांगतो. त्यांच्या पूर्वी आशियाची भूमी भगवान गौतम बुद्ध, कन्फ्यूशियस आणि लाओत्से सारख्या महान पुरुषांच्या जन्माने पावन झालेली होती. युरोपात मात्र अशी परिस्थिती दिसून आली नाही. ज्या राजांना आपण इतिहासात स्थान देतो, त्यांनी किती मोठा जागतिक नरसंहार केलेला आहे, याची प्रचिती या पुस्तकातून येते. अलेक्झांडर पासून मागील शतकातल्या हिटलरपर्यंत सर्वांनीच कोणत्या ना कोणत्या कारणास्तव फक्त माणसे मारण्याचे काम केले होते. दोन हजार वर्षांपूर्वी जगात धर्माची निर्मिती झाली आणि पुनश्च नरसंहार करण्यासाठी राज्यकर्त्यांना सम्राटांना आणि हुकूमशहांना कारण मिळाले. साम्राज्यवादी धर्म अनेक मोठ्या लढायांना व धर्म युद्धांना कारणीभूत ठरले आहेत. या धर्माचा प्रसार जगात तर झालाच. परंतु त्याची किंमत मनुष्यहानीने जगाला मोजायला लागली. इतक्या प्रदीर्घ कालखंडानंतर जगात फक्त ज्यू, भारतीय आणि चीनी या तीन संस्कृती आजवर टिकून आहेत. ज्यू लोकांनी आजवर जितकी हानी व अन्याय सहन केला असेल, तितका कदाचित इतर कोणत्याही संस्कृतीमध्ये केला गेला नसावा. आक्रमकांनी आपला धर्म जगभर पोहोचवला. माणसे मारून आमचा धर्म कसा माणुसकीचा धर्म आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. त्यातही वरील तीन संस्कृती अजूनही टिकून आहे हे विशेष!
जगाचा इतिहास तसा फक्त क्रूरकर्मा राजांचा होता असे नाही. या इतिहासात डांटे आणि गटे सारखे महान कवी, शेक्सपियर सारखे नाटककार विचारवंत होऊन गेले. कला-विज्ञान यांची सांगड घालणारा लिओनार्दो द विंची होऊन गेला. जगाने संशोधक वृत्तीचा कोलंबस पाहिला आणि आपल्या पूर्वजांचा परिचय करून देणारा चार्ल्स डार्विनही पाहिला. स्पायनोझा सारखा थोर विचारवंत या जगात जन्मला होता हेही आपले भाग्य होय. लिंकन, टॉल्स्टॉय आणि महात्मा गांधी यांच्यासारखी माणसे व त्यांच्या विचारधारा जगाने पाहिल्या.
एक गोष्ट मात्र येथे हे प्रकर्षाने नमूद करावीशी वाटते की, धर्म या संकल्पनेभोवती, त्याच्या रक्षणासाठी तसेच प्रसारासाठी जितक्या अमानुष हत्या आजवर या जगात झालेल्या त्या इतर कोणत्याही कारणाने झालेल्या नाहीत. कार्ल मार्क्सने म्हटले होते की, धर्म ही अफूसारखी आहे. तिची नशा कधीच उतरत नाही. जगाच्या इतिहासातून एक गोष्ट खूप प्रकर्षाने जाणवते.
प्रत्येक संस्कृतीमध्ये प्रेषित तयार झाले आहेत. प्रथम प्रेषितांना ठार मारायचे आणि मग त्यांची प्रेते पुजायची. ही मानवाची नेहमीचीच युक्ती आहे. अनेक प्रेषितांनी जन्मभर मानवतेचा संदेश दिला. परंतु त्यांच्या अनुयायांना मात्र तो आजही समजलेला नाही, हे दुर्दैव! आपला इतिहास अत्यंत प्रेरणादायक आहे. त्यातून सकारात्मक गोष्टी घेता येतात आणि नकारात्मक बाबी टाकूनही देता येतात. या इतिहासात शिकण्यासारखं बरच काही आहे. इतिहासात होऊन गेलेल्या व्यक्तींकडून अगाध ज्ञान प्राप्ती होते. परंतु त्यातून कोणत्या गोष्टी घ्यायच्या आणि कोणत्या सोडून द्यायच्या? हे ज्याने त्याने ठरवायचं असतं. हाच या पुस्तकाचा सारांश!

पुस्तकातील प्रमुख व्यक्तींचा इतिहास...
- राजपुत्र मूसा इतिहासातील पहिला युद्धविरोधी वीर जेरिमिया
- देवत्व पावलेला नास्तिक बुद्ध
- ख्रिस्ताचा आध्यात्मिक पिता कन्फ्यूशियस
- ज्याने साम्राज्य मिळाले; पण संस्कृतीचा विध्वंस असा सायरस
- अथेन्सचा लोकप्रिय लोकशाही पक्ष-नेता पेरिक्लीस अधिक चांगल्या जगाचे स्वप्न खेळविणारा प्लेटो
- स्वत: व ईश्वर यांत जगाची वाटणी करणारा अलेक्झांडर
- हसरा, दुःखवादी एपिक्यूरस
- द्वेष मूर्ती हैनिबल कार्थेजियन राजपुत्र
- जगातील कपटपटूंचा शिरोमणी कॅटो
- देव होऊ पाहणारा मनुष्य : सीझर
- नाझारेथ बहिष्कृत ज्यू येशू
- मातृहत्यारा सम्राट नीरो
- तत्त्वज्ञानी सम्राट मार्कस ऑरेलियस
- कॉन्स्टंटाइन : जुन्या धर्मवृत्तीचा आत्मा असलेला ख्रिश्चन
- शार्लमन : पोपला वाचवून स्वत: सम्राट होणारा संन्यासी
- पीटर : अमीन्सचा माथेफिरू भिक्षु
- कॅथलिक पंथी बंडखोर : अॅसिसीचा साधू फ्रॅन्सिस
- मुक्या शतकाचा आवाज : डान्टे
- युरोप व आशिया यांमधील दुवा : मार्को पोलो
- नवयुगाचे तीन पुरस्कर्ते : पेट्रार्क, जोहान्स हस, जॉन बॉल
- ऑर्लिन्स येथील कुमारी जोन ऑफ आर्क : फ्रान्सची माता
- टॉर्कीमीडा व पवित्र 'इन्क्विझिशन' न्यायसंस्था
- अमेरिका न शोधणारा कोलंबस
- कला-विज्ञान-वेत्ता लिओनार्डो डी व्हिन्सी
- पोपला धाब्यावर बसविणारा शेतकरी मार्टिन ल्यूथर
- सैतानाचा शिष्य मॅकिऑव्हिली
- नव सृष्टीचा निर्माता शेक्सपिअर
- फ्रेंच राजांपैकी अति प्रसिद्ध राजा चौदावा लुई
- अहिंसक, युद्ध-प्रतिकारी जॉर्ज फॉक्स
- अॅमस्टरडॅम येथील शांतमना स्पायनोझा
- रशियावर सुधारणा लादणारा पीटर दि ग्रेट
- व्हॉल्टेअर
- जग जिंकूनही निर्वासित अवस्थेत मरणारा नेपोलियन
- गटे: हा पाहा खरा मनुष्य
- संयुक्त युरोपचे स्वप्न खेळवणारा इटालियन नेता : मॅझिनी
- समाजवादाचा जनक कार्ल-मार्क्स
- प्रशियाचा प्रतिगामी चॅन्सेलर विस्मार्क
- आपल्या पूर्वजांचा परिचय करून देणारा चार्लस डार्विन
- कृष्णवर्णियांचा त्राता अब्राहम लिंकन
- द्वेषविहीन जगाचे ध्येय देणारा टॉलस्टॉय
- शेवटचा कैसर सम्राट दुसरा वुइल्यम
- मॅकि विलियन पद्धत पत्करणारे हुकूमशाही विरुद्ध लोकशाही : मुसोलिनी, हिटलर, रुझवेल्ट

Saturday, August 8, 2020

कल्पित-अकल्पित - सुधा रिसबूड

सुधा रिसबूड यांच्या लेखणीतून अवतरलेला 'कल्पित-अकल्पित' हा कथा संग्रह होय. विज्ञानातील भविष्यातील प्रगती या विषयाला प्रामुख्याने अनुसरून यातील कथा लेखिकेने लिहिलेल्या आहेत. भविष्यामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान तसेच प्रामुख्याने खगोल विज्ञान कसे असेल? या कल्पनेतून कथा साकारलेल्या दिसून येतात. विज्ञान हा नेहमीच रंजक विषय राहिलेला आहे. त्यामुळे भविष्यातील विज्ञान अधिक रंजकता प्राप्त करून देतो. याच अनुषंगाने लिहिलेल्या कथा विज्ञान-मनोरंजन करून जातात. यातील काही कथांची व्याप्ती हजारो वर्षे भविष्यातील आहे. या कथा मांडताना लेखिकेच्या कल्पना कौशल्याचा कस लागल्याचे दिसते. बऱ्याचदा हे स्वप्नरंजन भासत असले तरी अशक्य नाही, याचीही जाणीव होते. शिवाय काही ठिकाणी शेकडो वर्षांनी विज्ञान याहीपेक्षा कितीतरी प्रगत असू शकते, हेही जाणवते.
एकंदरीत विज्ञान कथा वाचण्यासाठी एक सुंदर खजिना सुधा रिसबूड यांनी मराठी वाचकांसमोर या पुस्तकाद्वारे ठेवल्याचे या पुस्तकातून दिसते.

 

Monday, July 27, 2020

डेटा सायन्स आणि पायथॉन प्रोग्रॅमिंग

मागच्या दहा वर्षांपासून संगणक क्षेत्रांमध्ये वेगाने बदल होताना दिसत आहेत. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग सारखी क्षेत्रे ही वेगाने विकसित होत आहेत. डेटा सायन्स हा या क्षेत्रांचा मूळ गाभा होय. उपलब्ध माहितीच्या आधारे विविध प्रकारचे ऍनालिसिस करून त्यावर योग्य निर्णय प्रक्रिया राबवण्याचे कार्य डेटा सायन्स द्वारे केले जाते. त्यामुळे डेटा सायन्स व डेटा सायंटिस्टची जवळपास सर्व क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे. या कारणास्तव संगणक व माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये डेटा सायन्स वर काम करणाऱ्या तंत्रज्ञ व अभियंत्यांची गरज भासत आहे. परंतु सद्य परिस्थिती पाहता या तंत्रज्ञानात कुशल असणारे मनुष्यबळ अजूनही उपलब्ध नाही. अनेक विद्यापीठांमध्ये सदर अभ्यासक्रम नुकताच समाविष्ट करण्यात आलेला आहे. परंतु त्यातून कुशल मनुष्यबळ तयार होण्यासाठी अजून किमान तीन ते चार वर्षे जावी लागतील. अशा परिस्थितीमध्ये आज माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात डेटा सायंटिस्ट व डेटा अनॅलिस्ट तसेच मशीन लर्निंग इंजिनीयरची नितांत गरज आज आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी आम्ही डेटा सायन्सचा परिपूर्ण कोर्स मागील चार वर्षांपासून घेत आहोत. या क्षेत्रात लागणारे परिपूर्ण व प्रात्यक्षिकांचे ज्ञान सदर अभ्यासक्रमातून आम्ही विद्यार्थ्यांना प्रदान करत असतो.
जसं संगणक तंत्रज्ञान बदलत चाललं आहे, तसंच इथे वापरण्यात येणाऱ्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस सुद्धा बदललेल्या आहेत. एकेकाळी सी आणि सी प्लस प्लस अथवा जावा सारख्या प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस आल्या तरी आपल्याला संगणक क्षेत्रांमध्ये सहज प्रवेश करता येऊ शकत होता. पण आजची परिस्थिती तशी नाही. आज कॉम्प्युटर प्रोग्रामिंगचे विश्व पायथॉन प्रोग्रामिंग लँग्वेज व्यापू पाहत आहे. मागच्या दहा वर्षांचा आलेख पाहिला तर ध्यानात येईल की, जावा प्रोग्रामिंग लैंग्वेज पेक्षा पायथॉन ही दोन पावले पुढे चालणारी लँग्वेज आहे. सन २०१६ मध्ये पायथॉन प्रोग्रामिंग लँग्वेजने जावाला माहिती-तंत्रज्ञान विश्वात मागे टाकले आहे. त्यामुळे येणारे जग हे पायथॉन प्रोग्रामिंग लँग्वेजवर आधारित असेल, यात शंका नाही. महत्त्वाचे असे की, पायथॉन ही आज वापरण्यात येणाऱ्या संगणकातील डेटा सायन्स, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, नॅचरल लैंग्वेज प्रोसेसिंग, इंटरनेट ऑफ थिंग्स, ब्लॉकचेन सारख्या अद्ययावत तंत्रज्ञानात प्रामुख्याने वापरली जाते. त्यामुळे संगणक तंत्रज्ञान जसजसे विकसित होत जाईल तस-तशी पायथॉन प्रोग्रामरची सुद्धा गरज माहिती-तंत्रज्ञान विश्वाला भासणार आहे.
या दोन्ही तंत्रज्ञानांचे प्रशिक्षण देण्यासाठी आमच्या कंपनीतर्फे मागच्या चार वर्षांपासून दोन निरनिराळे कोर्सेस चालवले जातात. त्यापैकी डेटा सायन्सचा कोर्स हा २५००० रुपये किमतीचा होता आणि पायथॉनचा कोर्स दहा हजार रुपये किंमतीचा होता. परंतु लॉकडाऊन मध्ये आम्ही दोन्ही कोर्सेस ऑनलाइन पद्धतीने सुरू केलेले आहेत. ज्यांना संगणक व माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये वरील तंत्रज्ञानावर काम करायचे असेल, त्यांना डेटा सायन्स चा कोर्स ८० टक्के डिस्काउंटसह रुपये ४९९९ मध्ये तर पायथॉन प्रोग्रामिंग लँग्वेजचा कोर्स ९० टक्के डिस्काउंटसह रुपये ९९९ मध्येच आम्ही उपलब्ध करून दिलेला आहे. सदर कोर्सद्वारे अधिकाधिक तंत्रज्ञ नव्या तंत्रज्ञानासह माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला उपलब्ध व्हावेत व नवीन मनुष्यबळ विकसित व्हावे, यासाठी इतकी मोठी सूट आम्ही दिलेली आहे. तरी यांची माहिती घेण्यासाठी खाली दिलेल्या क्रमांकावर किंवा वेबसाईटवर तुम्ही संपर्क साधू शकता.

https://mitu.co.in/courses
मोबाईल: 8600829693

द इमिटेशन गेम : एका ध्येयवेड्या गणितज्ज्ञाची कथा

संगणकाचा जनक कोण? याचं उत्तर अर्थात चार्ल्स बाबेज हे नाव जवळपास सर्वांनाच माहीत असतं. परंतु, आधुनिक संगणकाचा जनक कोण? याचे उत्तर मात्र खूप कमी लोकांना माहीत आहे. अगदी संगणक अभियंते व तंत्रज्ञ यांनाही हे नाव कदाचित माहीत नसावं.
आधुनिक संगणकाचा जनक आहे ॲलन ट्युरिंग!
सन १९५० नंतर संगणकाची पिढी हळुहळु डिजिटल व्हायला लागली होती. डिजिटल कम्प्युटरच युग सुरुवातीच्या काळामध्ये होतं. या काळानंतर संगणक क्षेत्रात सर्वात महत्त्वाचं योगदान देणारे तीन शास्त्रज्ञ म्हणजे ॲलन ट्युरिंग, जॉन व्हॉन न्यूमन आणि डेनिस रिची होय. या तिघांशिवाय आधुनिक संगणक बनू शकला नसता, असं मला वाटतं. त्यापैकी ट्युरिंग हा सर्वाधिक विशेष असा गणितज्ञ होता. सन १९४० च्या सुमारास दुसरे महायुद्ध जर्मनीने जगावर लादलं होतं. तंत्रज्ञान विकासाच्या दृष्टीने हे महायुद्ध खूप महत्त्वाचं मानलं गेलं पाहिजे. कारण याच महायुद्धामुळे तंत्रज्ञानाचा विशेष करून डिजिटल इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाचा वापर व विकास अतिशय वेगाने होऊ लागला. यात काळामध्ये ॲलन ट्युरिंग हा इंग्लंडमध्ये गणितज्ञ म्हणून नावारूपास येत होता. त्याची कहाणी सन २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'इमिटेशन गेम' या चित्रपटात चित्रित करण्यात आलेली आहे. चित्रपट पाहिल्यानंतर ट्युरिंगचे तंत्रज्ञानाला व विशेषतः संगणक तंत्रज्ञानाला असलेले योगदान किती महत्वपूर्ण आहे, याची प्रचीती येते. शिवाय त्यांनी केलेली धडपड व समर्पण हेही आपल्या समोर प्रकर्षाने येतं. अँड्रयू ह्युजेस यांनी १९८३ मध्ये लिहिलेल्या 'ऍलन ट्युरिंग: द एनिग्मा' या पुस्तकावर हा चित्रपट आधारलेला आहे.


१९३० च्या दशकातला ॲलन ट्युरिंग हा नावाजलेला गणितज्ञ होता. त्यामुळे केंब्रिज विद्यापीठात एका महत्त्वाच्या प्रकल्पावर काम करण्यासाठी वयाच्या केवळ सत्ताविसाव्या वर्षी त्याला संधी मिळाली. आपल्याला माहीतच आहे की, याच कालावधीमध्ये हिटलरच्या जर्मनीने जगावर दुसरे महायुद्ध लादलं होतं. जर्मनी सर्वच क्षेत्रात आघाडीवर होती. युरोपमध्ये जवळपास सर्वच देश पादाक्रांत करण्याची हिटलरची मनीषा होती. या युद्धात भयंकर नरसंहारही झाला होता. जर्मन सैन्य आधुनिक तंत्रज्ञानाच्या बळावर आघाडी घेत होतं. त्यांचे एन्कोडेड संदेश हे पाठवले जायचे. यातली बरेचशे संदेश इंग्लंड व अन्य मित्र राष्ट्रांना मिळत होते. परंतु त्याचे अर्थ त्यांना उमगत नसत. एक गणिती प्रक्रिया सोडवण्यासाठी सत्तावीस वर्षे लागतील इतकी ती किचकट होती. त्यामुळे जर्मनांनी पूर्ण युरोप समोर मोठे आव्हान निर्माण केले होते. जर्मन संदेश मिळवण्यासाठी इंग्लंडकडे एनिग्मा नावाचे मशीन होते. परंतु त्यातून संदेशांची डिकोडिंग होत नव्हती. ती साध्य करण्यासाठी इंग्लंडमध्ये शास्त्रज्ञ व गणित तज्ञांचा एक चमू कार्यरत होता. त्यात ॲलन ट्युरिंगला बोलावणे आले. तसं पाहिलं तर ट्युरिंग हा जरा विक्षिप्त होता. आल्या आल्या त्याने थेट पंतप्रधान चर्चिल यांनाच पत्र पाठवून संशोधनाची सर्व सूत्रे आपल्या हातात घेतली व त्यांच्या टीम मधून दोघांना वगळून टाकले. त्याचे ध्येय निराळे होते. तो कोणत्याही प्रकारचे जर्मन संदेश तात्काळ डिकोडिंग करू शकेल, अशा यंत्राच्या शोधात होता. त्यासाठी तंत्रज्ञ गोळा करण्याकरिता बरीच मेहनत घेतली व आपल्या गणिती मेंदूचा वापर करून एक अतिशय किचकट यंत्र तयार केले. त्याला तो "ख्रिस्तोफर" म्हणत असे. क्रिस्तोफर हे त्याच्या बालपणीच्या दिवंगत मित्राचे नाव होते. या मशीनची डेव्हलपमेंट करण्यासाठी त्याने दिवस-रात्र मेहनत केली. जवळपास दोन वर्ष या प्रकल्पावर काम चालू होते. एकीकडे महायुद्ध जर्मनी जिंकणार अशी परिस्थिती बनत चालली होती. परंतु जर्मन संदेशांचे डिकोडिंग मात्र काही होत नव्हते. त्यामुळे इंग्लंड सरकारने विद्यापीठातल्या शास्त्रज्ञांच्या चमूला अखेरचा एक महिना दिला. तो एक महिना ऍलन ट्युरिंग व त्याच्या साथीदारांनी सार्थकी लावला. एक महादिव्य असे मशीन त्यांनी तयार केले. आता जर्मन संदेश त्यांना सहजपणे डिकोडिंग करता येऊ लागले. यामागची त्यांची मेहनत, कष्ट व समर्पण हे वाखाणण्याजोगे होते. डिजिटल कम्प्युटरला तयार करणारे हेच ते इंजिन होय ज्याला 'ट्युरिंग मशीन' असे म्हटले जाते. आधुनिक डिजिटल संगणकाचा पाया या नव्या तंत्रज्ञानाने भरला गेला होता. या मशीनचा वापर इंग्लंडने जर्मन संदेश डिकोर्डिंग साठी तर केला. परंतु त्यांनी सर्वच संदेश वाचून त्यावर कृती केली नाही. त्यामुळे जर्मनांना इंग्लिश लोक आपला संदेश वाचत आहेत, हे समजूनच आले नाही. या मशीनमुळे दुसरे महायुद्ध दोन वर्ष आधीच संपले. आणि त्यामुळे १.४ कोटी लोकांचा जीव वाचला. इतिहासामध्ये ट्युरिंगचे इतके भरीव योगदान आहे. त्या काळामध्ये इंग्लंडला कदाचित ते समजले नसावे. कारण समलैंगिकतेच्या गुन्ह्याखाली त्याला शिक्षा झाली होती. त्याला दोन वर्षे जेल किंवा हर्मोनिक थेरपी यापैकी एक निवडायचे होते. संशोधनावर कार्य चालू राहावे म्हणून त्याने थेरपीची निवड केली व टुरिंग नावाने आणखी काही शोध जगासमोर आणले. त्याचा शेवट मात्र आत्महत्येने झाला. वयाच्या ४१ व्या वर्षी ट्युरिंगने सायनाईड घेऊन आत्महत्या केली. १९५४ अंतर २०१३ पर्यंत समलैंगिकतेचा कायदा इंग्लंडमध्ये लागू होता. परंतु २०१३ मध्ये इंग्लंडच्या राणीने अधिकृतरित्या ट्युरिंगची माफी मागितली होती. अर्थात त्यामुळे त्याचे योगदान इंग्लंडला मान्य करता आले.
ट्युरिंगने तयार केलेल्या ट्युरिंग मशीनच्या या बळावरच आजचा आधुनिक संगणक उभा आहे. ॲलन ट्युरिंग जर नसता तर कदाचित डिजिटल संगणक अजूनही मागच्याच पिढीमध्ये असला असता. त्याच्या या योगदानाला स्मरून एसीएम अर्थात असोसिएशन ऑफ कॉम्प्युटिंग मशिनरीने  संगणक शास्त्राचे नोबेल म्हणून ट्युरिंग अवार्ड देण्याची सुरुवात केली. आतापर्यंत अनेक महान संगणक तज्ञांना हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे.
"इमिटेशन गेम" या चित्रपटातून ट्युरिंगचे चरित्र जगासमोर आले. एकंदरीतच संगणकावर प्रेम करणाऱ्या सर्वांसाठी हा चित्रपट निश्चित बघण्यासारखा आहे. काही धडपड्या व ध्येयवेड्या लोकांमुळेच आजचं तंत्रज्ञान उभं आहे. त्यातलाच एक ॲलन ट्युरिंग...

Thursday, July 23, 2020

१४ स्टोरीज दॅट इस्पायर्ड सत्यजित राय

वाङ्मय ही प्रेरणा असू शकते का? निश्चितच होय... कथा,कविता, कादंबरी अशा साहित्याच्या विविध प्रकारांनी अनेकांना प्रेरणा दिली आहे. विविध कादंबरी व कथांवर आधारित आजवर अनेक चित्रपट विविध भाषांमध्ये तयार झाले. ज्येष्ठ दिग्दर्शक सत्यजीत राय हेही याला अपवाद नाहीत.
सत्यजित राय यांना प्रेरणा देणाऱ्या चौदा विविध लघुकथा या पुस्तकांमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. त्यातला प्रत्येक सिनेमा हा श्रेष्ठ दर्जाचा होता. देवी, जलसा घर आणि शतरंज के खिलाडी हे त्यापैकी काही गाजलेले चित्रपट होय. १४ पैकी १३ कथा या पुस्तकांमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. प्रेमचंद यांची एक कथा वगळता अन्य सर्व कथा ह्या बंगालीतून इंग्रजीमध्ये भाषांतरित झाल्या व इंग्रजीतुन मराठीमध्ये नीता गद्रे यांनी भाषांतरित केलेल्या आहेत.
रवींद्रनाथ टागोर, ताराशंकर बंदोपाध्याय, प्रभात कुमार मुखोपाध्याय, राजशेखर बसू आणि प्रेमचंद यांच्या कथा या कथासंग्रहात समाविष्ट आहेत. शिवाय सत्यजित राय यांनी ही दोन कथा लिहिलेल्या आहेत. अतिथी आणि पिकुची डायरी या कथांमधून त्यांचे लेखन कौशल्यही प्रतीत होते. जीवनातील विविध रस या कथांमधून आपल्याला अनुभवयास मिळतात. कथा लिहिली गेली तरी दिग्दर्शकाने ती ज्या पद्धतीने मांडली आहे, त्या पद्धतीवर ती श्रोत्यांपर्यंत कशाप्रकारे पोहोचते, हे अवलंबून असते. अशाच धाटणीच्या विविध कथा या पुस्तकांमधून वाचकांना वाचायला मिळतील.


Saturday, July 18, 2020

हवाई मुलुखगिरी, लेखक-मिलिंद गुणाजी, छायाचित्र-उद्धव ठाकरे

सध्या लॉकडाऊन असल्यामुळे आणि पर्यटनावर बंदी असल्याने किल्ले भ्रमंती करता येत नाही. दुर्गभ्रमंती करणाऱ्यांसाठी सध्या कठीण काळ चालू आहे! त्यामुळे पावले घरात थांबली आहेत आणि किल्ले ओस पडलेले आहेत.
घरच्या घरी किल्ले पाहण्यासाठीचा सर्वोत्तम उपाय म्हणजे दुर्गभ्रमंती वर लिहिली गेलेली पुस्तके. अनेक पुस्तकांमध्ये छायाचित्रे समाविष्ट नाहीत. परंतु उद्धव ठाकरे यांनी काढलेल्या छायाचित्रांचं "हवाई मुलुखगिरी" हे पुस्तक मात्र अपवाद आहे. महाराष्ट्रातील प्रमुख किल्ल्यांचे रंगीत बर्ड आय व्ह्यूज या पुस्तकातून पाहायला मिळतात. अतिशय सुंदर अशी छायाचित्रे या पुस्तकांमध्ये आहेत. भुईकोट किल्ले, गिरीदुर्ग आणि सागरी दुर्ग अशा सर्व प्रकारचे किल्ले यात समाविष्ट आहेत. सह्याद्रीचं दुर्गसौंदर्य उद्धव ठाकरे यांनी अप्रतिमरीत्या आपल्या कॅमेरामध्ये बंदिस्त केलं आहे. अगदी डोळ्यांचं पारणं फेडणारी छायाचित्रे या पुस्तकात पाहता येतात. आमच्या जुन्नर मधले जवळपास सर्वच किल्ले या पुस्तकात आहेत. याशिवाय लेणी, घाटवाटा कोकण कडा अशा विविधरंगी छायाचित्रांनी हे पुस्तक सजलेलं आहे. पावसाळ्यातली छायाचित्रे तर अतिशय मनमोहक आहेत. त्यांच्याकडे पाहातच रहावसं वाटतं. पुस्तकात केवळ छायाचित्रच नाही, तर मिलिंद गुणाजी यांनी किल्ल्यांची वर्णने देखील केलेली आहेत. त्यामुळे घरबसल्या सह्याद्रीची भ्रमंती करण्यासाठी हे पुस्तक एक उत्तम "आधार"
म्हणून बघता येईल!
 

 

Thursday, July 9, 2020

हिंदी भाषेत डब झालेला पहिला हॉलीवुड पट

हिंदी भाषेत डब झालेला पहिल्या हॉलीवुड पटाचे श्रेय बरेच जण "ज्यूरासिक पार्क" या चित्रपटाला देतात. बहुतांश जणांनी हाच पहिला चित्रपट हिंदीत पाहिला आहे. शिवाय गुगलवर शोधण्याचा प्रयत्न केला तरी तुम्हाला हेच उत्तर सापडेल. ज्यूरासिक पार्क हा चित्रपट १९९३ मध्ये तयार झाला होता. त्याच्या लोकप्रियतेमुळे तो जगभरात बऱ्याच भाषांमध्ये भाषांतरित झाला होता. त्यानंतर हॉलिवूडचे गाजलेले बेबीज डे आऊट, द मास्क, स्पीड, जुमानजी यासारखे चित्रपट हिंदीत आले व चाललेले देखील. आज अशी परिस्थिती आहे की, आज हिंदीत मूळ हिंदी चित्रपटांपेक्षा डब झालेल्या चित्रपटाची सर्वात जास्त गर्दी दिसते. ज्यूरासिक पार्क जरी डब झालेल्या पहिला चित्रपट मानत असले तरी प्रत्यक्षात तसे नाही. मग तो पहिला चित्रपट कोणता?
१९६९ मध्ये जे. ली. थॉमसन यांनी दिग्दर्शित केलेला "मेकॅनाज गोल्ड" हा हिंदीत डब झालेला पहिला हॉलीवुडपट होय! "मस्तान का सोना" या नावाने तो हिंदीत भाषांतरीत झाला होता. एका हरवलेल्या सोन्याची थरारक कहाणी त्यात चित्रीत करण्यात आलेली होती. या चित्रपटानंतर १३-१४ वर्षांनी भारतात हॉलीवूड चित्रपट डब करण्याची परंपरा वेग घेऊ लागली. "मस्तान का सोना" हा चित्रपट आज कुठेही उपलब्ध नाही. गुगलवर तुम्ही शोधलं तरी सापडणार नाही. परंतु फ्लिपकार्टवर मात्र त्याची डीव्हीडी होती. पण, आता तीही आऊट ऑफ स्टॉक आहे!
 
 

Monday, July 6, 2020

विज्ञान भ्रमंती - निरंजन घाटे

ज्येष्ठ विज्ञान लेखक निरंजन घाटे यांच्या विज्ञान बखरीमधलं हे बहुमूल्य पुस्तक होय. विज्ञान हा विषय किती अद्भुत व सखोल आहे, याची जाणीव करून देणारं हे पुस्तक आहे. मंगळावरील पाण्यापासून माणसांच्या मासेमारी पर्यंत, भुताच्या जन्मापासून माकड आणि माणसांपर्यंत आणि आपल्या आदि पूर्वजांपासून गॅलापेगॉसच्या राक्षसी कासर्वांपर्यंत विस्तृत विज्ञान-ज्ञान देणारे पुस्तक म्हणजे "विज्ञान भ्रमंती" होय. विज्ञानात जितके खोलात जाऊ तितके ते अधिक गहन होत जातं. व ही खोलीच ज्ञानाची कवाडं उघडी करतात. याची प्रचिती हे पुस्तक वाचल्यावर निश्चितच येते.
काही प्रश्नांचा आपण विज्ञानाच्या दृष्टीने अजूनही विचार केलेला नाही. डावे-उजवे का व कसे? लिओनार्दो दा विंची, मिडास राजाची कथा अशा विविध विषयांना लेखकाने या पुस्तकाच्या निमित्ताने संशोधनात्मक रूप दिले आहे.
मानववंशशास्त्र हा माझा आवडता विषय. डार्विनशिवाय हा विषय पूर्णच होऊ शकत नाही. यावरच आधारित "सजीवांची जीवघेणी स्पर्धा" हे सर्वात वाचनीय प्रकरण या पुस्तकात लेखकाने विस्तृत पद्धतीने मांडले आहे. त्यामुळे विज्ञानाच्या अमर्याद विश्वाची छोटीशी भ्रमंती ते निश्चितच करून आणते. याशिवाय विज्ञानाचे सोबती असणारे गणित व इतिहास या विषयांचे महत्त्वही जागोजागी ठळकपणे दिसून येते.

 

Friday, July 3, 2020

दूरदर्शी गॅलिलिओ

गतिशील पृथ्वीची संकल्पना कोपर्निकसच्या आधी ऍरिस्टार्कस वगैरे अनेक ग्रीक तत्त्वज्ञांनीही केली होती, तसेच त्याच्या भौतिक विज्ञानाविषयी शंका बाळगणारेही अनेक विद्वान गेली निदान २-३ शतके वावरतच होते.

डोक्यावर दुसरे छत निश्चित होईपर्यंत पहिले मोडकळीला आलेले घर सोडायला माणूस धजत नाही, तशी स्थिती या विद्वानांची झालेली होती. शिवाय धर्माची नाराजी ओढवून घेण्याची भीतीही त्यांच्या मनात होतीच. नवीन कल्पना मनात खेळवणे, नवीन अटकळी बांधणे, त्यांच्या शक्यता चोखाळणे इथपर्यंत धर्मसंस्थेकडून मुभा होती; परंतु त्यापुढे जाऊन प्रस्थापिताला हटवून त्याच्या जागी दुसरे ज्ञान आणण्याची मुभा त्यांना नव्हती.

गॅलिलिओ या क्रांतिवीराचे यश त्याच्या या शिकवणीत अधिक आहे. रुळलेल्या चाकोरीला चिकटून राहण्याच्या वृत्तीची जागा स्वतंत्र बुद्धीने घ्यावी, या संदेशाची ललकारीच जणू त्याने दिली. दुसरे म्हणजे अॅरिस्टॉटल पद्धतीच्या अभावी ज्यांना एकदम निराधार वाटले असते, अशा सर्वांसाठी ज्ञानार्जनाचे एक वेगळेच अतिशय प्रभावी असे साधन त्याने निर्माण केले; ते म्हणजे तर्कशास्वाशी पूर्णपणे सुसंगत अशा गणितावर आधारित वैज्ञानिक कार्यपद्धती! आधुनिक जगाला कुण्या एका माणसाने देऊ केलेली अशी ही फार मोठी देणगी आहे.

गॅलिलिओचा संपूर्ण बौद्धिक आवाका पाहता दुर्बिणीचा जनक, भव्यदिव्य शोध लावणारा खगोलशास्त्रज्ञ, आयुष्यातला वीस वर्षांचा महत्त्वाचा काळ कोपर्निकस वादाला स्वत:ला वाहून घेणारा कट्टर पुरस्कर्ता असे शिक्के त्याला अपुरे पडतात. या सर्व गोष्टी घडल्या त्या अपघातानेच! त्याचा पिंड चिंतकाचा व मौलिक संशोधकाचाच होता. नवीन विज्ञानाची फार स्पष्ट चाहूल त्याला लागली होती. त्या विज्ञानाचा मागोवा कसा घ्यायचा, हे सर्वसामान्य माणसापर्यंत सर्वांना समजून सांगण्याचा तळमळ त्याला लागली होती.

ईश्वराविषयी श्रद्धेची भावना बाळगणारा गॅलिलिओ ईश्वरनिर्मित जगाच्या मानवी व्यवहारात भावुक होता, जगाच्या भौतिक अभ्यासाची त्याला ओढ लागली होती. त्या अभ्यासाला आवश्यक अशी कार्यपद्धती त्याने शोधून काढली. ती कार्यपद्धती काटेकोरपणे अवलंबिली, तर मानव संशोधनाच्या एका अनंत मार्गावर चालत राहील आणि ईश्वर त्याला कधीही भरकटू देणार नाही, असा त्याला विश्वास होता.

आपल्याला सत्य गवसले आहे, असा दावा त्याने कधीच केला नाही, पण सत्याकडे नेणाऱ्या निरंतर मार्गाचे दरवाजे आपण उघडले आहेत आणि या यात्रेतील पथिकांचा मेळा नेहमी वाढतच जाणार, हे त्याला दिसले होते. सत्याचे स्वरूप नेहमी अधिकाधिक विशाल होत जाईल आणि क्षितिजाआडून ते मानवाला सतत खुणावत राहील, हे त्याला दिसले होते.

निसर्गाचा अविरत अभ्यास ही मानवाच्या पुढच्या पिढ्यांची महत्त्वाची कामगिरी होणार... त्याच्या स्वत:च्या पेक्षाही अधिक प्रखर व प्रगल्भ बुद्धीचे मानव, विज्ञानाचा त्याने घेतला त्यापेक्षा अधिक खोल वेध घेत राहणार... हे त्याला दिसले होते.

मानवाच्या चर्मचक्षु साठी दुर्बिणीचे साधन देऊन विश्वाचे भव्य रूप गॅलिलिओने त्याला दाखवले. नवीन विज्ञानाचा आविष्कार करून बौद्धिक वाटचालीतला दूरचा पल्ला त्याने मानवाला दाखवून दिला.

खरोखरच मानवतेच्या इतिहासातला तो एक दूरदर्शी महामानव होऊन गेला.


Monday, June 29, 2020

२९ जून - भारतीय सांख्यिकी दिवस

२९ जून हा भारतीय सांख्यिकी दिवस म्हणून ओळखला जातो.  प्रशांत चंद्र महालनोबिस या आधुनिक भारतीय सांख्यिकीच्या जनकाचा हा जन्मदिवस होय. त्यांचा जन्म २९ जून १८९३ रोजी कोलकाता येथे झाला व मृत्यू २८ जून १९७२ रोजी कोलकाता येथे झाला.


त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ २००६ पासून २९ जून हा दिवस भारतीय सांख्यिकी दिवस म्हणून ओळखला जातो. सांख्यिकी शास्त्रला तसं भारतीय समाजात फारसे स्थान नाही. परंतु जे आहे ते महालनोबीस यांच्या मुळेच, असं म्हणायला काहीच हरकत नाही. काही वर्षांपूर्वी 'मशीन लर्निंग' विषयाचा अभ्यास सुरू केला तेव्हा "महानॉलॉबीस डिस्टन्स" या संज्ञेबद्दल मला माहिती मिळाली. गुगलवर सर्च केल्यानंतर समजले की हे महान भारतीय गणितज्ञ आहेत. त्यांच्याच नावाने हा फॉर्मुला तयार करण्यात आलेला आहे. संख्यिकी शास्त्राची फारशी माहिती भारतीयांना नसल्यामुळे महानॉलॉबीस यांच्याबद्दलही फारशा लोकांना माहिती नाही. 


महानॉलॉबीस हे पहिल्या भारतीय नियोजन आयोगाचे सदस्य होते. विशेष म्हणजे ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या सांख्यिकी सल्लागार मंडळाचे अध्यक्ष होते. १९३१ मध्ये त्यांनी कोलकाता येथे 'इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट' म्हणजेच 'भारतीय सांख्यिकी संस्थान'ची स्थापना केली. त्यानंतर सांख्यिकी संस्थानाने विविध क्षेत्रांमध्ये लक्षणीय प्रगती केली. भारत स्वतंत्र झाल्यानंतर शेती आणि पूर नियंत्रण यावर सांख्यिकी शास्त्राद्वारे प्रयोग करण्यात आले. शिवाय औद्योगिक उत्पादन वाढ व बेरोजगारी कमी करण्यासाठी सांख्यिकी शास्त्राचा या संस्थेने चांगला उपयोग करून घेतला. याशिवाय स्वातंत्र्यानंतर दरडोई उत्पन्न शोधण्यासाठी स्थापल्या गेलेल्या संस्थेचे अध्यक्षही महानॉलॉबीस हेच होते. त्यांनी काढलेल्या निष्कर्षांच्या आधारावर द्वितीय पंचवार्षिक योजनेत या माहितीची चांगलीच मदत झाली. सांख्यिकी शास्त्राचा वापर कशा प्रकारे करावा? हे त्यांनी उत्तम पद्धतीने दाखवून दिले.
महानॉलॉबीस हे रवींद्रनाथ टागोर यांचे चाहते होते. आपल्या आयुष्यातले दोन महिने त्यांनी कोलकत्यात शांतिनिकेतन याठिकाणी घालवलेले आहेत. ते ते टागोरांच्या विश्वभारती संस्थेचे सचिवही होते. शिवाय टागोरांसोबत त्यांनी अनेकदा परदेश प्रवासही केला आहे.


जगातल्या विविध सांख्यिकी संस्थांचे ते सदस्य होते. इंडियन अकॅडमी ऑफ सायन्स, इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी, रॉयल सोसायटी, इकॉनोमेट्रिक सोसायटी, पाकिस्तान स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट, रॉयल सोसायटी ऑफ स्टॅटिस्टिक्स, अमेरिकन
स्टॅटिस्टिक्स असोसिएशन, किंग्स कॉलेज, केंब्रिज व रशियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट चे ते सन्माननीय सदस्य होते.

महानॉलॉबीस यांना आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक महत्त्वाचे पुरस्कार प्राप्त झाले. त्यात वेल्डन मेमोरियल प्राईझ, ऑक्सफर्ड विद्यापीठ, दुर्गाप्रसाद खेतान सुवर्णपदक, श्रीनिवास रामानुजन सुवर्णपदक व भारताचा द्वितीय क्रमांकाचा नागरी पुरस्कार पद्मविभूषण १९६८ साली त्यांना प्राप्त झाला. 
सन २०१८ मध्ये यांच्या १२५ व्या जयंतीदिनी भारत सरकारने त्यांच्या प्रतिमेचे नाणे तयार केले होते. शिवाय याच वर्षी गुगलने डूडल द्वारे त्यांना श्रद्धांजली अर्पण केली होती. सन २०१५ मध्ये श्रीनिवास रामानुजन यांच्या आयुष्यावर तयार झालेला चित्रपट 'दि मॅन हू न्यू इन्फिनिटी' यामध्येही महानलोबीस यांच्या नावाची एक चरित्र भूमिका आढळून येते.
अशा महान सांख्यिकी तज्ञाला आमचा प्रणाम!!!

 

Wednesday, June 17, 2020

अंतराळातील मृत्यु - डॉ. संजय ढोले

पुणे विद्यापीठात कार्यरत असणारे डॉ. संजय ढोले यांचे मेहता पब्लिशिंग हाऊसने ५-६ विज्ञान कथासंग्रह प्रकाशित केले आहेत. त्यातीलच 'अंतराळातील मृत्यू' हा एक होय. त्यांच्या डिंभक व अश्मजीव या दोन पुस्तकानंतर वाचलेला हा तिसरा कथासंग्रह होय. त्यांच्या प्रत्येक पुस्तकात लेखक म्हणून त्यांची संशोधक वृत्ती सातत्याने जाणवते. प्रत्येक कथेत मुलविज्ञान अर्थात जीव, भौतिक व रासायन यांचा प्रामुख्याने प्रभाव असतो. विशेष म्हणजे त्या विज्ञान संकल्पनांनी ओतप्रोत भरलेल्या असतात. विज्ञान कशा प्रकारे काम करू शकते? या प्रश्नाचे उत्तर ते आपल्या कथांमधून देत राहतात. हे सर्व कल्पनाविलास असले तरी अशक्यतेचा पल्ला कदाचित गाठू शकणार नाही असेच आहेत.
प्रयोग, संशोधन व शास्त्रज्ञ/प्राध्यापक हे त्यांच्या प्रत्येक कथेत येणारे शब्द. अर्थात त्याची प्रत्येक कथा ही एका प्रयोगात सारखीच असते. तिच्यात विज्ञानाच्या मूल गाभ्याचा प्रकर्षाने समावेश असतो. जयंत नारळीकर, निरंजन घाटे व बाळ फोंडके यांच्या पेक्षा वेगळ्या कथा डॉ. ढोले लिहितात. हे मला प्रामुख्याने सांगावेसे वाटते. त्यांच्या सर्वच कथासंग्रहांमध्ये त्यांची शैली व विज्ञान हे समान धागे आहेत. त्यामुळे मुल विज्ञानाची आवड असणाऱ्यांनी त्यांचे कथासंग्रह निश्चितच वाचावेत.


Tuesday, June 16, 2020

निवडक र. अ. नेलेकर

धारक व मतकरी यांच्यानंतर वाचलेले र. अ. नेलेकर हे तिसरे भयकथा लेखक! त्यांच्या भयकथांचे केवळ तीन संग्रह प्रसिद्ध आहेत. त्यामुळे मराठी वाचकांना ते फारसे परिचित नसावेत. शिवाय त्यांच्या नावे तीन विनोदी कथासंग्रह देखील आहेत! भय आणि विनोद असे परस्परविरोधी प्रकार हाताळलेले नेलेकर कदाचित एकमेव मराठी लेखक असावेत. त्यांच्याच भयकथांचा हा कथासंग्रह होय- निवडक र. अ. नेलेकर (राजेंद्र प्रकाशन)
प्रत्येक लेखकाची एक वेगळी शैली असते. तशीच नेलेकरांची स्वतःची शैली आहे. फारसं वर्णनात्मक चित्रन न करता साध्या सरळ पद्धतीने परंतु वाचकांना खिळवून ठेवणाऱ्या कथा, हे त्यांचे वैशिष्ट्य मानावे लागेल. धारप व मतकरी वाचल्यानंतर नेलेकरांच्या शैलीत रुळायला थोडा वेळ लागतो. पण नंतर ती आपल्या मनाची पकड घ्यायला सुरवात करते व एक अद्भुत विश्वाची सफर घडवून आणते. त्यांच्या या पुस्तकात एकूण सोळा कथा आहेत. त्यातील अखेरची 'कणक राऊळ' ही केवळ साहस कथा आहे. बाकीच्या भयकथांमध्ये कुठली सर्वात चांगली? असे निश्चित सांगता येणार नाही. कारण प्रत्येक कथा ही पूर्णतः वेगळ्या धाटणीची आहे. त्यांच्यात तोचतोचपणा जाणवत नाही. त्यामुळे कुठलीही कथा वाचली तरी आपल्याला निराळ्याच विश्वात घेऊन जाते, हे विशेष.
संग्रहातील काही कथांना विविध स्पर्धांमध्ये पारितोषिके मिळाली आहेत. त्यामुळे अशा दर्जेदार कथांचा संग्रह निश्चितच वाचनीय असाच आहे.

 

Monday, June 1, 2020

इमान

"एक म्हैना व्हऊन गेला राव. इमानं अजून बंदच हायेत!", पहिला चिंतातुर होऊन बसला होता.
"तुला काय करायचं रं इमानाचं? तू आपलं एष्टीचं बघ की, ती बी बंदच हाय!" - दुसरा.
"असं काय करतूस राव, तुला म्हाईत नाय का इमानानं परदेशात जायचं लई मोठं सपनं हाय माझं."
"व्ह्यय की, इतकी वर्षं तेच ऐकतोय ना!"
"इमानं कधीच चालू व्हनार नाय का रं?"
"आजूक दोन-तीन म्हैनं तरी न्हाय व्हनार."
"म्हंजी... नंतर व्हतीलच ना?"
"व्हतीलच रं. पन तू लई सपान नको बघू. काईतरी दुसरा इषय काढू."
"दुसरा काय इषय आता?" - पहिला चिंताग्रस्त.
"टीवी वरचं रामायण संपलं ना? मग मला सांग, त्यातून तू काय शिकला?"
या प्रश्नावर पाहिल्याने गहन विचार केला व बोलू लागला.
"परदेशात इमानानं जाणारी सीता ही पहिली भारतीय व्हती!"
"अरे खुळ्या, ते न्हाय. दुसरं काय तरी सांग."
पुन्हा पाहिल्याने काही काळ डोके खाजविले व बोलू लागला.
"सोताच्या ताकदीवर परदेशात जाणारा हनुमान हा पहिला भारतीय व्हता!"
"खुळं तेच डोक्यात घेऊन बसलंय अजून. तू नाय सुधारणार बाबा!"
अशी तणतण करत दुसरा तेथून निघून गेला. पहिला मात्र अजून काही सुचतंय का? याचा विचार करत तिथेच डोकं खाजवत उभा होता.