Saturday, February 15, 2020

बारा कथा

कविवर्य कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांचा मी वाचलेला हा पहिलाच कथासंग्रह. डॉ. बा. वा. दातार यांनी त्याचे संपादन केले आहे. नावाप्रमाणेच यात 12 कथा आहेत. सर्वच वेगळ्या विषयाला वाहिलेल्या. पहिल्या दोन-तीन कथा प्रेम व विरह यावर आधारित होत्या. त्यामुळे असं वाटलं की, नंतरच्या ही कथा अशाच असतील. परंतु शिरवाडकरांनी विविध विषयांवर हात घातल्याचे दिसते. यातील तीन कथा या रहस्य प्रकारात मोडणाऱ्या आहेत. लेखकाचे भाषेवर असलेलं प्रभुत्व सर्वच कथांतून प्रतीत होतं. कथा कशी असावी? याचे प्रात्यक्षिक उदाहरणच शिरवाडकरांनी त्यांच्या लेखणीतून दाखवून दिले आहे. कोणतीच कथा ही कंटाळवाणी वाटत नाही. अगदी एकाच बैठकीत संपून टाकावे, असे हे पुस्तक आहे. वाचनाला सलग वेळ मिळत नसल्याने मी कादंबरी ऐवजी कथासंग्रह वाचतो. अर्थात प्रत्येकाची पद्धत निराळी असतेच. परंतु, हे पुस्तक मी एकाच बैठकीत संपवले हे विशेष!

कवीचे भाषेवर जबरदस्त प्रभुत्व असते, हे शिरवाडकरांच्या साहित्यकृतीतून जाणवते. त्यामुळे कथा आणि साहित्यप्रेमींसाठी सदर पुस्तक मेजवानी ठरावे असेच आहे.

Friday, February 14, 2020

उबुंटू

आपण म्हणतो की, शिक्षण हे प्रत्येकाच्या हक्काचा आहे. यातील 'हक्क' या शब्दाचा नक्की अर्थ काय? कदाचित प्रत्येकाची व्याख्या ही वेगळी असू शकते. ग्रामीण व दुर्गम भागात आजही शिक्षणाला व शाळांना प्राथमिक स्थान न देता दुय्यम स्थान प्राप्त झालेले आहे. परंतु, शिक्षण किती महत्वाचे आहे व तेच प्राप्त करण्यासाठी आजही ग्रामीण विद्यार्थ्यांना किती कसरत व मेहनत करावी लागते, याचे चित्रण करणारा चित्रपट म्हणजे उबुंटू!


आजवर आम्ही 'उबुंटू' नावाची ऑपरेटिंग सिस्टिम वापरली होती. परंतु त्याचा शब्दार्थ या चित्रपटातून प्रतीत झाल्याचे दिसले. त्याची कथा सुरू होते ढोबळेवाडी नावाच्या एका दुर्गम गावातून. या गावातील शाळेत पस्तीस पटसंख्या असणारी शाळा आहे. परंतु मोठ्या अनुपस्थितीमुळे गावकरी शाळा बंद करण्याचा निर्णय घेतात. शाळेचे शिक्षक मात्र मेहनती व ध्येयवादी आहेत. ते त्यांचा प्रयत्न चालूच ठेवतात. पण काही महत्त्वाच्या कामानिमित्त त्यांच्या गावी त्यांना जावे लागते. मग पुढे शाळेतल्या हुशार विद्यार्थ्यांची शाळा टिकवण्याची धडपड चालू होते. गावातून बाहेर पडून ते शहराच्या ठिकाणी येतात तेव्हा शिक्षकांनी शिकवलेल्या ज्ञानाचा त्यांना पुरेपूर फायदा होतो. असा हा एकंदरीत चित्रपटाचा कथासार आहे. शिक्षण या विषयाला वाहिलेल्या मराठीतील काही चित्रपटांमधला हा एक चित्रपट होय. यातील गाणीही अत्यंत प्रभावशाली व प्रसंगानुरूप बोलणारी आहेत. तीच प्रेक्षकांच्या मनावर प्रभाव टाकून जातात.
या चित्रपटातील एक प्रार्थना खूप लोकप्रिय झाली होती. 


हीच आमची प्रार्थना
अन हेच आमचे मागणे
माणसाने माणसाशी
माणसासम वागणे

Thursday, February 13, 2020

प्लास्टिक पासून मुक्ती

महाराष्ट्रातील समुद्र किनारे प्लास्टिकच्या बारीक कणांमुळे अधिक प्रदूषित झाल्याचे निरीक्षण पणजी स्थित 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्रफी' या संस्थेतर्फे नोंदविण्यात आले आहे. शिवाय नेदर्लंड्सच्या एका प्रसिद्ध जर्नलमध्ये ही या संदर्भातला लेख प्रसिद्ध झाला आहे. मनुष्यप्राणी निसर्गामध्ये करत असलेल्या लुडबूडीचा व विशेषतः निसर्गाच्या हानीचा हा एक मोठा पुरावाच मानावा लागेल. रसायन शास्त्राने मानवाच्या हाती दिलेला एक घातक पदार्थ म्हणजे प्लास्टिक होय. तसा तो घातक नाहीये, परंतु मानव प्राणी ज्या प्रमाणे त्याचा वापर करत आहे ते पाहता तो घातकच बनत चाललाय! कोकणातल्या मुक्त समुद्रकिनाऱ्यांवर गेल्या काही वर्षांपासून पिकनिकच्या नावाखाली होणारी गर्दी वाढत चालली आहे. त्यामुळे मानवनिर्मित कचऱ्याचीही वाढ होत आहे. त्यात प्लास्टिक कचरा हाच सर्वात मोठ्या प्रमाणात समुद्रकिनाऱ्यांवर टाकला जातो. देशाचे 'सुजाण' नागरिक म्हणून निसर्गाची हानी आपण अशाप्रकारे करतच असतो. त्याची परिणिती किनाऱ्यावरील कचर्‍यात वाढ होण्यामध्ये झालीये. राज्यात लागू झालेल्या प्लास्टिकबंदी नंतरही ते वापरण्यात तीळमात्रही फरक पडलेला नाही. मुख्यतः शासनातही त्यात फारसे घेणेदेणे उरलेले नाही, असेच दिसते. निदान सर्वांनी या देशाचे 'सजग' नागरिक म्हणून तरी आपली जबाबदारी ओळखायला हवी व आपल्या सोबत निसर्गाचाही प्लास्टिक पासून मुक्ती द्यायला हवी. 


एरंडाचे गुऱ्हाळ - चि. वि. जोशी

शालेय अभ्यासक्रम संपल्यानंतर थेट एम. ए. च्या अभ्यासात चि.वि. जोशी यांचं नाव पुन:श्च ऐकलं. शिवाय त्यांनी सुमारे नव्वद वर्षांपूर्वी लिहिलेल्या 'एरंडाचे गुऱ्हाळ' या पुस्तका संबंधात फक्त ऐकीव माहिती होती.

अर्थातच चि. वि. जोशी यांचे मी वाचलेले हे पहिलेच पुस्तक! विनोद करणं ही खरोखर सर्वात आव्हानात्मक गोष्ट आहे.  त्यामुळे विनोदी लेखक, विनोदी कवी व विनोदी नट हे त्यांच्या क्षेत्रातले खरे राजे असतात.  पु.  ल.  देशपांडे यांच्या आधी चि. वि. जोशी यांनी मराठी विनोदी साहित्य विश्व सजवले. त्याच काळातील हे पुस्तक होय. विविध घटनांना जोशींनी अगदी खुमासदार पद्धतीने रंगवले आहे. कुठेही अतिशयोक्ती जाणवत नाही. यातील अनेक विनोदी कथा या संपादक व प्रकाशक या लेखनाशी संबंधीत दोन जातींची आहे. कदाचित चि. वि. जोशी त्यांना स्वतः मध्ये पाहत असावेत. इतकं मात्र नक्की की, आजच्या शतकानंतरही वाचावीशी अशी पुस्तके, तीही विनोदी फार कमी आहेत. त्यातीलच हे एक पुस्तक!