कोकणातल्या एका छोट्या गावामध्ये राहणारा मुलगा म्हणजे बाबू. आपल्या काका आणि काकीसोबत तो राहत आहे. लहान असतानाच त्याची आई त्याला सोडून परदेशामध्ये अर्थात फ्रान्सला निघून गेलेली आहे. त्याच्या आईचा त्याच्यावर आणि त्याचा देखील आईवर खूप जीव आहे. परंतु ते भेटत असतात फक्त पत्रांमधून. पत्रांद्वारे होणारा हा संवाद मायेचा ओलावा टिकवून ठेवत असतो. कालांतराने हा पत्रसंवाद देखील कमी कमी होत जातो. बाबूवर जितके त्याच्या आईचे प्रेम असते तितकेच काका आणि काकीचे देखील असते. त्यांना मुल नसते. कदाचित याच कारणास्तव बाबूवर ते मुलाप्रमाणेच प्रेम करत असतात.
आपल्या वहिनीला वचन दिल्याप्रमाणे बाबूचे काका त्याला दहावीची परीक्षा झाल्यानंतर त्याच्या आईकडे सोडण्यासाठी निघतात. ही गोष्ट अपरिहार्यच असते. त्याच्या काकीला देखील त्याचा सहवास सोडवत नाही. पण तरीदेखील दोघेही फ्रान्सला जाण्यासाठी निघतात. प्रत्यक्ष पॅरिसमध्ये पोहोचल्यानंतर त्यांना असे समजते की बाबूची आई सध्या तिथे राहत नाही. तिचा कुठेच पत्ता नसतो. मग इथून सुरू होतो तिला परदेशामध्ये शोधण्याचा प्रवास. फ्रान्ससारख्या अनोळखी देशामध्ये दोघेही तिथल्या अन्य दोन अनोळखी लोकांना घेऊन बाबूच्या आईला शोधायला निघतात. त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शिवाय छोट्या छोट्या घटनांमधून ते पुढचा मार्ग शोधत जातात.
चित्रपटाचे कथानक तसे साधे आणि सरळ आहे. पण मूळ कथा ही भावभावनांच्या खेळाभोवती गुंफल्याचे दिसते. चित्रपटाच्या अखेरीस बाबूला त्याची आई मिळते का आणि मिळाली जरी तरी तो तिच्यासोबत राहतो का या प्रश्नांची उत्तरे मिळतात.
No comments:
Post a Comment
to: tushar.kute@gmail.com