१९९९ ते २००० च्या दरम्यान सर्वप्रथम हे पुस्तक मी पाहिले होते. कदाचित याच काळात या पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली असावी. हे पुस्तक विशेष याकरिता वाटले की, त्यातील कविता प्रत्यक्ष कुसुमाग्रजांनी लिहिलेल्या होत्या! कुसुमाग्रजांसारख्या ज्येष्ठ कवींनी बालकवितांचे हे पुस्तक लिहिल्याचे बघून माझी उत्सुकता चाळवली गेली. आणि त्यातील सर्व बालकविता मी वाचून काढल्या.
“एका मुळाक्षराची एक बालकविता” या संकल्पनेतून ही ‘अक्षरबाग’ साकारलेली आहे. म्हणजेच प्रत्येक कवितेमध्ये सदर अक्षर अधिकाधिक वेळा आल्याचे दिसते. किती सुंदर संकल्पना आहे ही! आणि त्याहीपेक्षा कवीसाठी एक आव्हानात्मक काम देखील! परंतु कुसुमाग्रजांनी ते लीलया पेलले आणि मराठी मुळाक्षरानुसार सहज आणि सोप्या बालकविता या पुस्तकामध्ये शब्दबद्ध केल्या. त्या वाचायला घेतल्या की आपण नकळतपणे चालीमध्ये गायला लागतो. अतिशय कमी जोडाक्षरे असणाऱ्या या बालकविता मुलं देखील सहजपणे वाचू आणि गाऊ देखील शकतात. लॉकडाऊनच्या काळामध्ये माझ्या मुलीने देखील यातील काही कविता गायल्या होत्या.
भाषेचे सौंदर्य हे कवितांमध्ये असते. त्यातील ताल आणि लय हे शब्दांद्वारे भाषेची ओळख करून देतात. जर बालपणीच अशा पुस्तकांची मुलांना ओळख झाली तर निश्चितच त्यांची भाषेची अधिक जवळीक अधिक वाढू शकेल.
--- तुषार भ. कुटे
No comments:
Post a Comment
to: tushar.kute@gmail.com