महाराष्ट्राचा इतिहास विस्तृत आणि सखोल पद्धतीने लिहायला घेतला तर शेकडो खंडही अपुरे पडतील इतका मोठा आहे. सेतूमाधवराव पगडी यांच्यासारख्या जेष्ठ इतिहासकाराने आपल्या इतिहासातील अशी असंख्य अपरिचित पाने पुस्तक रूपाने लिहिलेली आहेत. त्यातीलच हे एक पुस्तक ‘बहु असोत सुंदर’.
महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जवळपास नामशेष व्हायला आलेल्या अनेक किल्ल्यांचा आणि गावांचा इतिहास या पुस्तकांमध्ये आपल्याला वाचायला मिळतो. छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, उदगीर, नळदुर्ग, गाळणा, परांडा, कंधार, चंद्रपूर अशा विविध ठिकाणचा अपरिचित अज्ञात इतिहास पगडींनी लेखमालिकेद्वारे या पुस्तकांमध्ये मांडलेला आहे. कदाचित स्थानिक जनतेला देखील याची फारशी माहिती नसावी. औरंगजेब काळात खानदेश नक्की कसा होता, याचे विस्तृत विवेचन एका लेखामध्ये पगडी करतात. तसेच दोन लेखांमध्ये छत्रपती संभाजीराजांच्या चरित्रावर देखील त्यांनी प्रकाश टाकलेला आहे. पावनखिंडीच्या लढाईमध्ये प्रसिद्ध झालेला विशाळगड कसा होता, तसेच त्याचे औरंगजेबाचे असलेले नाते एका लेखामध्ये पगडी स्पष्ट करतात.
याशिवाय शिवरायांच्या चतुराईने धन्य ती वस्ती, जन्मस्थानातील शिवलीलामृत, शिवरूपाचे एक आगळे दर्शन, छत्रपतींचे जीवन कार्य आणि विचारधन, उर्दूचे पहिले कोशकार शिवाजी महाराज, रथचक्र उद्धरीले या लेखांमधून शिवकाळातील विविध प्रसंगांचा परिचय वाचकांना होतो. एका लेखामध्ये औरंगजेबा नंतरचा महाराष्ट्र कसा होता, याचे वर्णन पगडी करतात. शिवाय वऱ्हाड आणि खडकीच्या लढाईचे वर्णन देखील त्यांनी उत्तमरीत्या या पुस्तकामध्ये लिहिलेले आहे. अशा विविध ऐतिहासिक घटनांनी समृद्ध असा हा ग्रंथ कोणत्याही इतिहासप्रेमी वाचकाने वाचावा असाच आहे.
No comments:
Post a Comment
to: tushar.kute@gmail.com