एका दुर्गम खेडेगावात राहणाऱ्या आणि काळ्या मातीत राबणाऱ्या एका शेतकऱ्याची ही गोष्ट. दिवसभर काबाडकष्ट करून स्वतःच्या कुटुंबाचे पोट भरायचे या उद्देशानेच त्याचे जीवन व्यतीत होत असतं. त्याला दोन मुली असतात. दोघींवरही त्यात त्याचा भारी जीव. आपल्याला मुलगा व्हावा असे त्याला वाटत असते. तरीदेखील मुलींवरील त्याचे प्रेम तसूवरही कमी होत नाही. बायको तिसऱ्या वेळेस गरोदर असते. यावेळेस मुलगा असो वा मुलगी, काहीही चालेल असे जरी तू म्हणत असला तरी देखील मनामध्ये मुलगाच व्हावा ही सुक्त इच्छा दळून राहिलेली असते. कारण मुलगी झाली की ती आपली नसते, परक्याचं धन असते. तिच्या लग्नात देखील खूप खर्च होत असतो. त्यानेच माणूस कर्जबाजारी होऊन जातो,. या मानसिकतेचा पगडा गावच्या वातावरणातून हळूहळू त्याच्या मनावर तयार होऊ लागतो.. आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये त्याला देखील तसे अनुभव यायला लागतात. हळूहळू घरामध्ये पैसा देखील कमी पडू लागतो. मोठ्या मुलीच्या शिक्षणासाठी देखील त्याला पैसा खर्च करता येत नाही. आजूबाजूचे पुरुष मुलींकडे कोणत्या नजरेने पाहतात याची देखील त्याला प्रचिती यायला लागते. म्हणूनच आता मुलगी नको ही त्याची भावना अधिक प्रबळ व्हायला लागते. एक अर्थाने मुलींवरची माया देखील आटायला सुरुवात होते. त्याची आई त्याच्या बायकोकडे यावेळेस मुलगाच व्हावा असा दोषा लावत असते. हळूहळू त्याची मानसिकता देखील त्याच दृष्टीने तयार व्हायला लागते. मग एके दिवशी तो एक भयानक निर्णय घेतो. शेजारच्या गावातील पुरुषाला तो त्याचे कुटुंब आणि मित्राचेही कुटुंब जायला निघते. परंतु त्या उरूसाचा तो गैरफायदा घेतो. भविष्यामध्ये येणाऱ्या त्याच्या दृष्टीतील संकटापासून वाचण्याची तो पहिली पायरी टाकायला पाहतो. त्यात त्याला यश देखील येते. परंतु त्याचे मन मात्र त्याला क्षमा करत नाही. आणि चित्रपटाच्या शेवटी भावनिक निर्णय घेऊन समाधानी मनाने तो परततो.
मराठी चित्रपटांच्या भावनाप्रधान चौकटीमध्ये सुयोग्यरीत्या बसणारा हा चित्रपट आहे. कथेची लांबी फारशी नसली तरी परिणामकारक जाणवते. गावच्या वातावरणात राहिलेल्या राहिलेल्यांना ती अधिक प्रभावी जाणवू शकते. कदाचित असं कधी होऊ शकतं का? या प्रश्नाचे उत्तर त्यांना माहीत असतं. 2008 साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट तत्कालीन समाज स्थितीचे उत्तम चित्रण करतो. कलाकारांच्या बाबतीत बोलायचे झाले तर उपेंद्र लिमये, दीपा परब, शशांक शेंडे या सर्वांचा अभिनय उत्तमच आहे. काहीतरी वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न हा चित्रपट निश्चितच करतो.
--- तुषार भ. कुटे

No comments:
Post a Comment
to: tushar.kute@gmail.com