Tuesday, July 8, 2025

ChatGPT

मी एआयमुळे (AI) नोकऱ्या जातील याची काळजी करत नाही. मला काळजी वाटते ती विचारांची जागा एआय घेईल याची. विशेषतः मुलांमध्ये.

जर आपण काळजी घेतली नाही, तर आपण विचार करणाऱ्या पुढच्या पिढीला घडवू शकणार नाही. त्याऐवजी, आपण अशी पिढी घडवू ज्यांना कधी विचार करण्याची गरजच पडली नाही.

एआयबद्दलची माझी ही सर्वात मोठी भीती आहे – ती हॅल्युसिनेशन्सची नाही, नोकऱ्यांची नाही, किंवा पाळत ठेवण्याचीही नाही.

ती आहे "कॉग्निटिव्ह ॲट्रोफी" – म्हणजेच विचार करण्याच्या क्षमतेची हळूहळू होणारी झीज, जी घडवण्यासाठीच शिक्षण असते.

आणि हे आत्ताच घडायला लागलं आहे.

मी एमआयटीचा (MIT) अलीकडचा अभ्यास वाचल्यापासून त्याबद्दल विचार करत आहे. अर्थात, कोणताही चांगला शास्त्रज्ञ म्हणेल की कोणत्याही संशोधनात लाखो त्रुटी काढता येतात. पण हे संशोधन माझ्या डोक्यातून जात नाहीये.

त्यांनी चॅटजीपीटी (ChatGPT) वापरून निबंध लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मेंदूची तपासणी केली आणि त्याने गेल्या अनेक महिन्यांपासून मला वाटणारी भीती खरी ठरवली.

→ मेंदूतील न्यूरल कनेक्टिव्हिटी ७९ वरून ४२ पर्यंत खाली आली – म्हणजेच ४७% घट झाली. काही सत्रांमध्ये आणि फ्रिक्वेन्सी बँडमध्ये ही घट तब्बल ५५% पर्यंत होती.

→ ८३% विद्यार्थी त्यांनी लिहिलेले एकही वाक्य काही मिनिटांनंतर आठवू शकले नाहीत.

→ त्यांनी एआयचा वापर थांबवला तरी, ज्यांनी कधीच एआय वापरले नाही त्यांच्या तुलनेत त्यांच्या मेंदूची कार्यक्षमता कमीच राहिली.

संशोधकांनी याला "कॉग्निटिव्ह ऑफलोडिंग" म्हटले आहे. मी याला झीज (erosion) होण्याच्या जवळचे काहीतरी म्हणतो. कारण यात खरा धोका शैक्षणिक नाही, तर विकासात्मक आहे.

आपण मुलांना फक्त लिहिण्याचे साधन देत नाही आहोत. आयुष्यभरासाठी आवश्यक असलेल्या मानसिक क्षमता विकसित करण्यापूर्वीच आपण त्यांना शॉर्टकट देत आहोत.

जेव्हा तुमचा मेंदू विचार न करता एखादे काम पूर्ण करायला शिकतो, तेव्हा काय होते? तुम्ही तर्कशक्ती विकसित करत नाही, तर अवलंबित्व विकसित करत आहात.

जेव्हा तुम्ही संघर्ष – जसे की चिंतन, कल्पनांवर विचार करणे – हे काम बाहेरील घटकाला देता, तेव्हा तुम्हाला असे काहीतरी मिळते जे विचारांसारखे वाटते, पण ते विचार नसतात.

आणि जर तुम्ही १२ वर्षांचे असाल? १०? ५? तर तुम्ही लिहायला शिकत नाही. तुम्ही विचार करणे टाळायला शिकत आहात.

भीतीदायक भाग काय आहे? हे काम करते. चांगले गुण मिळतात. वेळ वाचतो. ज्यामुळे याला आव्हान देणे आणखी कठीण होते.

पण शिक्षकांनी एआय-सहाय्यित निबंधांना "आत्म्याशिवायचे" (soulless) असे म्हटले. तो शब्द मला घाबरावतो आहे!

मी एआय विरोधी नाही. मी याच क्षेत्रात काम करतो. पण ज्या गोष्टींची जागा एआय घेत आहे, विशेषतः शिक्षणात, त्याच्या मी पूर्णपणे विरोधात आहे.

आपण इथे कठीण गोष्टी टाळून पोहोचलो नाही. आपण विचार करायला शिकून इथे पोहोचलो. हळूहळू. अपूर्णपणे. आणि कधीकधी वेदनादायकपणे.

पुढच्या पिढीला ही संधी कधीच मिळाली नाही तर काय होईल?

- (डॉ. राधिका यांच्या लिंक्डइन पोस्टवरून साभार)




Saturday, July 5, 2025

जुळून येती रेशीमगाठी

दूरचित्रवाणीवरच्या मालिका बघण्याची मला बिलकुल सवय नाही. तसं पाहिलं तर काही वर्षांपूर्वी झी मराठी वाहिनीवरच्या काही मालिका आम्ही नियमित बघत होतो. परंतु त्यांचा दर्जा, कथानक पाहता आपण चुकीच्या दिशेने चाललो आहोत, याची जाणीव झाली आणि कालांतराने सर्व बंद केले. मागच्या काही वर्षांपासून घरामध्ये टीव्हीदेखील नाही. त्यामुळे दूरचित्रवाणीवरच्या मालिकांचा आता सहसा संबंध येत नाही.
तरी देखील अधेमध्ये कुठेतरी कुणाच्या घरात मालिकेतील प्रसंग पाहायला मिळतात. कथानक तर अतिशय सुमार दर्जाचे असते. कोणत्याही घरात घडू नयेत, अशा घटनांचा भडीमार केलेला असतो. द्वेष, शत्रुत्व, मत्सर, व्याभिचार, अश्लीलता या वैशिष्ट्यपूर्ण गुणांनी या मालिका सजवलेल्या असतात. घरातल्या घरात इतरांसाठी लपलेले सापळे, इतरांना संपवण्यासाठी सुरू असलेले खटाटोप, आपल्याच सग्यासोयऱ्यांविषयी असलेला पराकोटीचा द्वेष, कोणत्याच बाबतीत सुख नाही आणि समाधान नाही अशी कुटुंबे, प्रेम भावनेचा अनादर करणाऱ्या व्यक्ती, नायकांपेक्षा अधिक असलेले खलनायक आणि विशेषत: खलनायिका, स्वतःचे काम सोडून इतरांच्या जीवनात सातत्याने धुडगूस घालणाऱ्या व्यक्ती. सुख-शांती-समाधान या शब्दांचा अर्थही ज्यांच्या गावी नाही, असे नायक आणि नायिका. अशा कितीतरी शब्दांमध्ये या मालिकांची वर्णने करता येतील. त्याहून विशेष म्हणजे याच प्रकारच्या मालिकांना आज मोठा प्रेक्षकवर्ग लाभलेला आहे. थोड्या हलक्याफुलक्या विषयाच्या मालिका चालू झाल्या की त्यांचा ‘टीआरपी’ लगेच ढासळतो. एखाद्या ऐतिहासिक व्यक्तिरेखेवर सुरू झालेल्या मालिका लवकरच प्रेक्षकांअभावी बंदही पडतात. पण अंधश्रद्धेचा बाजार मांडलेल्या मालिका वर्षानुवर्षे चालूच राहतात, हेही विशेष. एकंदर दूरचित्रवाणी मनोरंजनाची परिस्थिती बघितली तर नैतिकदृष्ट्या ‘भयावह’ आहे, असेच म्हणावे लागेल. अर्थात यामागे निर्माते अथवा दिग्दर्शकांचा दोष आहे असेही नाही. प्रेक्षकांना जे आवडते आणि प्रेक्षक जे अधिकाधिक काळ पचवू शकतात, अशीच कथानके त्यांच्यासमोर सादर केली जातात. एका अर्थाने निर्मात्यांना पैसे कमवायचे असतात. हा त्यांच्या व्यवसायाचाच भाग आहे. परंतु प्रेक्षकांच्या दृष्टीने विचार केला तर दूरचित्रवाणी मालिकांच्या कथानकाचा त्यांच्या मनावर कुठे ना कुठेतरी दुष्परिणाम होतच असतो, हेही तितकेच सत्य. आजच्या स्पर्धेच्या काळात दूरचित्रवाणी वाहिन्यादेखील नवनवी द्वेषपूर्ण कथानके घेऊन मालिका बनवत आहेत. आणि प्रेक्षकांना देखील ‘बनवत’ आहेत हे म्हणायला हरकत नाही.
हे सर्व सांगायचा उद्देश असा की आज जरी उत्तम कथानकाच्या मालिका तयार होत नसल्या तरी काही वर्षांपूर्वी विविध वाहिन्यांवर प्रसारित झालेल्या मालिका आजही बघाव्या अशाच आहेत. दशकभरापूर्वी झी मराठीवर “जुळून येती रेशीमगाठी” नावाची एक मालिका प्रसारित झाली होती. अर्थात त्यावेळी ती मी पाहिली नव्हती. परंतु आमच्या पत्नीच्या आग्रहाखातर या मालिकेचे सर्व भाग झी-मराठीच्या ओटीपी ॲपवर आम्ही पाहिले. आज प्रसारित होणाऱ्या मालिकांच्या बजबजबुरीमध्ये अशी ही एक मालिका होती, याचे मला आश्चर्य वाटले. म्हणून आज ही पोस्ट लिहीत आहे.
एकत्रित कुटुंबात राहणाऱ्या आठ जणांची ही गोष्ट. कौटुंबिक मूल्ये काय असतात, हे या मालिकेच्या प्रत्येक भागात दिसून आले. कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ व्यक्ती कसे असावेत? त्यांचा दृष्टिकोन कसा असावा? कुटुंबातील समतोल कसा साधावा? तसेच विविध घटनांकडे तटस्थ दृष्टीने कसे पहावे? अशा बराच बऱ्याच प्रश्नांची उत्तरे या मालिकेतील गिरीश ओक यांनी साकारलेल्या नाना देसाईंच्या भूमिकेतून मिळतात. आजच्या मालिकांमध्ये देखील कुटुंबातील जेष्ठ व्यक्ती दाखवलेल्या आहेत. परंतु या व्यक्तिरेखेला अजूनही तोड नाही, असेच म्हणता येईल. विशेष म्हणजे त्यांची पत्नी अर्थात घरातील सर्वांची माई यादेखील त्यांना साजेशा अशाच आहेत. घरातील सासूने कसे असावे? याचे उत्तम उदाहरण म्हणजे सुकन्या कुलकर्णी यांनी साकारलेली माई देसाई यांची भूमिका. मालिकेतल्या विविध प्रसंगांमधून त्यांच्यातील आई आणि सासूचे गुण सातत्याने प्रदर्शित होतात. आजच्या मालिकांमध्ये असणारी खाष्ट सासू किंवा सातत्याने सुनेला त्रास देणारी सासू पाहिली तर सासू अशीच असते, असाही अनेकांचा भ्रम व्हावा. आणि जेव्हा माई देसाईंची भूमिका पहाल तेव्हा सासू अशी असते? का हाही प्रश्न पडावा.
या मालिकेतील मुख्य जोडपं अर्थात आदित्य आणि मेघना. मेघनाचे लग्न तिच्या इच्छेविरुद्ध झालेले आहे. तिचे आई-वडील विशेषता वडील अतिशय तिरसट स्वभावाचे. खरंतर अशा स्वभावाच्या माणसाबरोबर त्यांच्या पत्नीने आजवर कसे दिवस काढले असतील? असाही प्रश्न पडतो. परंतु ते देखील देसाईंच्या कुटुंबासोबत राहून हळूहळू त्यांच्या प्रेमात पडतात. आणि त्यांच्यासारखाच विचार देखील कालांतराने करू लागतात. काहीसं खलनायकी रूपाने दाखवलेलं मेघनाच्या वडिलांचं अर्थात सुरेश कुडाळकर यांचे पात्र विविध रूपांनी भरलेलं आहे. हे मालिकेच्या भागागणिक दिसून येतं. ‘बाबाजी बाबाजी’ म्हणताना ते करत असलेली कृती सातत्याने लक्षात राहते. नाना देसाईंची मुलगी अर्चना आणि तिचा नवरा सतीश हे देखील त्यांच्यासोबतच राहतात. आदर्श जावई कसा असावा? याचे उत्तर सतीशकडे पाहून देता येतं. एकंदरीतच सर्व पात्रे आपापल्या भूमिकांमध्ये उत्तम ठसा उमटवितात. कुटुंबामध्ये एकमेकांना समजून घेण्याचा दृष्टिकोन, सहकार्याची भूमिका, समस्यांच्या काळामध्ये एकमेकांना असणारा पाठिंबा, सर्वांचा सुसंवाद, मैत्री, आपुलकी या सर्व गोष्टी ध्यानात राहतात. आणि विशेष म्हणजे आपल्या मनावर प्रभाव देखील पडतात. सकारात्मक दृष्टिकोन तयार करण्यासाठी मदत देखील करतात. एखाद्या घटनेकडे आपला दृष्टिकोन आपण यातील पात्रांच्या दृष्टिकोनाशी तुलना करायला जातो. आणि एक नवी शिकवण देखील मिळते. अर्थात हे या मालिकेतील पात्रांचे आणि कथानकाचे यश आहे असेच म्हणायला हवे. आई, वडील, मुलगा, मुलगी, सून, जावई, सासू, सासरे, दीर, भावजय, नणंद, दाजी, व्याही आणि विहीन आदर्शवत नाती या मालिकेतून समोर येतात.
४०० पेक्षा अधिक भाग प्रसारित झालेली ही मालिका अजूनही ऑनलाइन विविध प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. खरोखर काहीतरी चांगलं पहायचं असेल तर आजही या मालिकेला आणि कथानकाला पर्याय नाही, असंच म्हणता येईल.

- तुषार भ. कुटे