Sunday, October 13, 2019

पोलिसांची प्रतिमा

पोलीस व प्रत्येकाच्या जीवनाशी निगडित एक वेगळ्याच प्रकारचा विषय असतो. कधी ना कधी ह्या विषयाची आपल्याबरोबर गाठ पडत असते. परंतु, ही गाठ सकारात्मकतेपेक्षा नकारात्मकते कडे जास्त झुकलेली दिसते. केवळ माझाच नाही तर अनेकांचा अनुभव कदाचित असाच असावा.
साधारण वर्षभरापूर्वीची गोष्ट आहे. पुणे ते नाशिक रस्त्यावर आंबेगाव तालुक्यात कळंब नावाचे एक खेडे आहे. या गावातून पुणे-नाशिक महामार्ग अतिशय अरुंद भागातून जातो. घोड नदीच्या काठावर वसलेल्या या गावात नदीवरचा एक अरुंद पूलही आहे. त्यादिवशी नाशिकला जाताना या पुलावर आमचा अपघात झाला होता. एका सेलेरियो कारने s-cross कारला मागून धडक दिली. त्यामुळे त्या कारने आमच्या कारला धडक दिली व आमची कार पुढच्या एसयूव्ही कारला धडकली! अशा तऱ्हेने एकाच वेळी चार गाड्या एकमेकांना धडकल्या होत्या. आमच्यासह सर्वजण सर्वात शेवटच्या कार ड्रायवरवर भयंकर भडकले होते. त्याला फक्त मारायचे बाकी ठेवले होते. त्यातच आमच्या मागच्या गाडीच्या ड्रायव्हरने पोलिसात तक्रार करण्याची धमकी दिली. प्रत्यक्षात त्याने तसे केले नसते. परंतु जवळच्या पोलिस चौकीला कुठून तरी वास लागलाच! थोड्याच वेळात दोन कॉन्स्टेबल पंचनामा करण्यासाठी दाखल झाले. हे सर्व अपघात प्रकरण पोलिसात लवकरच नोंद होणार, अशी परिस्थिती होती. परंतु याबाबतीत आजूबाजूच्या लोकांनी आमची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. सर्वांचे असेच म्हणणे होते की, पोलिसात गेल्यावर त्यांना चार-पाच हजार रुपये द्यावे लागतील. विशेष म्हणजे अशा मताचे जवळपास सर्वच लोक तिथे होते! सर्वांना हेच वाटत होते की, तुम्ही आपापसात मिटवून घ्या. कशाला पोलिसांची 'झंझट'? त्यावेळी एकंदरीत पोलिसांची जनमानसात काय प्रतिमा असेल, हे ध्यानात आले आणि हा विषय पोलिसात मात्र गेला नाही.
वरील घटनेनंतर साधारणत: चार महिन्यांनी भोसरीच्या स्पाईन रोड सिग्नलपाशी मला असाच अनुभव आला. एक दारू पिऊन चाललेला बेवडा माझ्या गाडीला मागून येऊन घासून गेला. अर्थात त्यामुळे त्याच्यात गाडीचे जास्त नुकसान झाले होते. तरीही बेवडे साहेब गाडीतून उतरून तावातावाने भांडायला आले. त्यावेळेसही सदर प्रकरण पोलिसात जाण्याच्या वाटेवर होते. परंतु पुन्हा सर्वांच्या म्हणण्यानुसार पोलिसात जाणे म्हणजे पैसे आणि वेळ दोन्ही वाया घालवणे होय. पोलीस खायलाच टपलेले असतात, असे अनेकांचे म्हणणे होते आणि हेही प्रकरण इथेच थांबले.


फक्त याच दोन नाही तर अशा अनेक त्रयस्थ ठिकाणी अशाच प्रकारचा अनुभव येतो. यातून कोणता बोध घ्यावा, तेच समजत नाही. सिंघम आणि दबंग हे केवळ चित्रपटात शिट्ट्या मिळवण्यासाठी असतात, असेच यातून एकंदरीत दिसते. केवळ पोलिसच नाही तर अनेक सरकारी कर्मचाऱ्यांना बद्दल अशाच प्रकारचे अनुभव आपल्या नागरिकांकडे आहेत आणि विशेष म्हणजे त्यांना त्याची सवय झालीये! अनेक ठिकाणी तर ही संस्कृती मानली जाते. त्यामुळे एकंदरीत सरकारी कर्मचारी ही जमात वेगळीच आहे. त्यांच्या वाटेला जायला नको. असा ग्रही आमच्यासारख्यांच्या मनात तयार झालाय. कधी कोणत्या सरकारी कार्यालयात गेले की तेथील लोक केवळ आपल्या कडून पैसे उकळायला बसलेत, असंही बऱ्याचदा वाटून जातं. हा ग्रह पुसून टाकण्यासाठी कधीतरी एखादा प्रामाणिक अधिकारी आमच्यासारख्यांच्या अनुभवात जमा व्हावा असेही वाटते. वाट बघुयात.

No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com