Showing posts with label तुषार कुटे. Show all posts
Showing posts with label तुषार कुटे. Show all posts

Monday, March 12, 2012

श्रेया घोषाल: मराठी टॉप टेन

 भारतातील आजची सहा प्रमुख भाषांतील पार्श्वगायिका श्रेया घोषाल यांचा आज वाढदिवस आहे. त्यांनी मराठी भाषेत मराठी मातृभाषिक गायकांनाही लाजवेल अशा सुरांत अनेक गाणी गायली आहेत. त्यातील टॉप टेन गाणी मी इथे देत आहे. जमलं तर ऐकुन बघा....


१. जीव दंगला (जोगवा)
२. अजुन तरळते (माझी गाणी-अल्बम)
३. मन रानात गेलं गं (जोगवा)
४. सूर आले शब्द ल्याले (सुंदर माझे घर)
५. मेंदी भरल्या पावुली (मस्त शरदीय रात-अल्बम)
६. चंचल हा मनमोहन (माझी गाणी-अल्बम)
७. गार गार हा पवन बावरा (अर्जुन)
८. डोहाळे पुरवा (इश्श)
९. मंगळागौरी (मणी मंगळसूत्र)
१०. ऐकुन घे ना रे मना (स्वप्न तुझे नी माझे)

====================================================================

Sunday, June 27, 2010

वटवृक्षाचे आत्मवृत्त

नववी-दहावीत शिकत असताना मराठी मध्ये आत्मवृत्तात्मक निबंध नेहमी विचारले जायचे. किंबहुना याप्रकारचा एक निबंध हमखास विचारला जायचा. एखाद्याचे आत्मवृत्त लिहायचे म्हणजे मला त्यावेळी महाकठिण काम वाटत असे. जर कधी गरज पडलीच तर नवनीतच्या निबंधमालेतून निबंध थेट उतरवून काढायचो. या प्रकारचे निबंध म्हणजे मोठे आव्हान होते, ते मी फारसे पेलले नाही.

परवा, वटपौर्णिमा साजरी झाली. सकाळीच आमच्या परिसरातील वडाच्या झाडाजवळ बायकांची मोठी गर्दी दिसली होती. बायकांची भांडण वगैरे चालू आहे की काय, असा विचार मनात आला. पण, एवढ्या नटून-थटून कोणी भांडायला जमणार नव्हते. परंतू, जवळ गेल्यावर समजले की, सर्वजणी वडाच्या झाडाची पूजा करायला जमल्या आहेत. परिसरात ते एकच वडाचे झाड होते. त्यामुळे गर्दी होणार हे स्वभाविकच होते. तरी ह्या सर्व नशीबवानच म्हणायला हव्यात की, त्यांना निदान वडाचे झाड तरी मिळाले. मुंबईच्या स्त्रियांना तर वडाच्या झाडाची फांदी बाजारातून विकत आणावी लागते व त्याभोवती त्या प्रदक्षिणा घालतात. त्यामानाने नाशिकच्या स्त्रिया नशिबवान मानाच्या लागतील. बिचाऱ्या एकाच वडासमोर जमलेल्या सर्वजणी पाहून त्या वडाला काय वाटत असेल? असा विचार मनात आल्याने वडाच्या झाडाचे आत्मवृत्त लिहिण्याची कल्पना सुचली. अशा प्रकारचे आत्मवृत्त मी पहिल्यांदाच लिहित असल्याने ’वाचकांनी चूक-भूल देणे घेणे...’

मुलांनो, आज मी तुम्हाला माझी कैफियत सांगणार आहे. ऐकाल ना? काय करू... कोणी माझ्याकडे बघायलाही तयार नसते. निदान तुम्ही तरी माझ्याजवळ येता, खेळता. त्यामुळे मला खूप आनंद मिळतो. त्या मोठ्या लोकांना माझ्याकडे बघायला वेळच नाही. सतत आपल्या कामात गुंतलेले असतात. माझ्याकडून कोणालाही फळं व फुलं मिळत नाहीत, म्हणून मी नेहमीच दुर्लक्षित असतो. कुणीतरी सांगितलेच आहे की, जगातील कोणतीच गोष्ट ही निरूपयोगी नाही. त्यामुळे मला दिलासा मिळाला आहे. वाटत असलो तरी मीही निरूपयोगी नाही, याची मला पूर्ण खात्री आहे. परवाच मला त्याचा प्रत्यक्ष अनुभव आला.

परवा वटपौर्णिमा साजरी झाली. मी त्याला माझा वाढदिवस मानतो. कधी नव्हे ते लोक माझ्याकडे पाहतात व आपुलकीने पाणीही घालतात. माझा वाढदिवस अर्थात वटपौर्णिमा कधी आहे, याची आठवण मला कधीच ठेवावी लागत नाही. जेव्हा परिसरातील स्त्रिया माझी पूजा करायाला येतील, तेव्हाच माझा वाढदिवस असतो असे मी मानतो. पण, त्याकरिता पूर्ण वर्षभर वाट पाहावी लागते. मला याचे समाधान मात्र निश्चित आहे की, निदान वर्षातून एकदा तरी लोक माझी आठवण काढतात. याकरिता मी त्या सावित्री मातेला धन्यवाद देतो, जिने यमाच्या हातून आपल्या पतीचे अर्थात सत्यवानाचे प्राण परत आणले होते. तेव्हापासून आपल्या देशात वटपौर्णिमा साजरी केली जाते. इतर दिवशी माझ्याकडे कोणी ढुंकुनही पाहत नाही.

परवा इथे खूप स्त्रिया जमल्या होत्या. सर्वजणी माझ्या भोवती प्रदक्षिणा घालत होत्या. पण, मला त्या दोऱ्या बांधतात हे फारसे आवडत नाही. शिवाय एकदा बांधलेली दोरी परत कधीच निघत नाही. पुढच्या वर्षीपर्यंत ती तुटायला येते तोच पुन्हा नवी वटपौर्णिमा आलेली असते. त्यामुळे मला बांधून गेल्यासारखे वाटते. आता तर ती माझी ओळख बनून राहिली आहे. ज्या झाडाला दोऱ्या बांधल्या असतील, ते झाड वडाचे असते, अशी व्याख्या आधुनिक आईने मुलासाठी बनविली आहे. पूर्वी आई सांगायची की, ज्या झाडाला पारंब्या असतील ते झाड वडाचे होय. पण, आताच्या मुलांना पारंब्या म्हणजे काय? तेच माहित नसते त्यामुळे आयांनी मुलांना समजविण्याचा सोपा मार्ग सुचविला आहे. या कारणाने मात्र माझी ओळखच पुसून गेली आहे, याचे वाईट वाटते. काही दिवसांपूर्वी पाहिलेल्या एका प्रसंगाने तर माझी झोपच उडविली होती. आजच्या काळातील एक आधुनिक आई आपल्या पिंटूला घेऊन त्याच्या ’स्कूल’ला सोडायला चालली होती. तेवढ्यात त्या पिंटूचे लक्ष माझ्याकडे गेले. व त्याने उत्सुकतेने आपल्या मातोश्रींना विचारले, ’मम्मी मम्मी, त्या ट्रीचे नेम काय आहे?’ त्याची एवढी शुद्ध मराठी मला समजलीच नाही. त्याच्या आईलाही उत्तर देता आले नाही. ती म्हटली, मी तुला टुमारोला सांगते म्हणून. दुसऱ्या दिवशी पुन्हा जेव्हा या मायलेकांची जोडी माझ्याजवळ आली तेव्हा मम्मीने पिंटूला सांगितले की, ’ही बनियन ट्री आहे!’. तेव्हा मात्र मला कसेकसेच झाले. मी काय... बनियन देणारे झाड आहे? इंग्रजीमध्ये मला ’बनियन ट्री’ म्हणतात असे जेव्हा मला समजले तेव्हा माझे भवितव्य किती ’उज्ज्वल’ आहे, याची खात्री मला पटली. आणखी काही वर्षांनी माझी ओळख ’बनियन ट्री’ अशीच होणार आहे, याचे वाईट वाटू लागले होते.

त्यादिवशी वटपौर्णिमेला बायका जमल्या तेव्हा त्या नक्की सण साजरा करायला आल्या आहेत की सामुहिक वार्तालाभ करायला? तेच समजत नव्हते. सतत शब्दसुमने ही प्रत्येकीच्या मुखातून बाहेर पडत होती. त्यामुळे कोण काय बोलत आहे, तेच समजत नव्हते. माझ्या वाढदिवसाला माझ्या जवळ सर्वात जास्त ध्वनी प्रदूषण होत असावे, असे वाटून गेले. याची मला फारशी सवय नाही. पण, दर एका वर्षाने मला हा प्रसंग निभावून न्यावाच लागतो. त्यापेक्षा तुम्ही मुलेच बरी. माझ्यासोबत खेळताना दंगा जरी केला तरी, त्याने मला त्रास होत नाही. पण, आजकाल तुम्हीही माझ्याशी कधी खेळत नाही. या परिसरात जेव्हा शहरी निवास कमी होता तेव्हा इथली मुले माझ्यासोबत सूरपारंब्या खेळायची. मलाही त्यांच्या सहवासात खूप आनंद उपभोगता यायचा. पण, आताच्या मुलांना असे खेळ माहितच नाहीत. आज मुलं केवळ घरात बसून त्या इडियट बॉक्स समोर बसलेले असतात किंवा कॉम्प्युटरवर गेम खेळत असतात. त्यांना घराबाहेर खेळाता येत नाही. फारफार तर घराबाहेर ते क्रिकेटच खेळतात. त्यामुळे माझा व तुम्हा लहान मुलांचा सहवास आता संपुष्टात येऊ लागला आहे. बदल हा निसर्गाचा नियम आहे, असे म्हणतात. पण, हा बदल निसर्गच्याच मुळाशी येवू लागला आहे. पुढील काही वर्षांत माझ्यासारख्या वडाच्या झाडाला तुम्ही मानव मात्र निरूपयोगी ठरवून टाकाल.

शहरीकरणाच्या नादात आज मोठी वृक्षकत्तल तुम्ही करत आहात. पण, त्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडून गेला आहे, याचा विचार करणारे फारच थोडे आहेत. मागे एकदा तुमच्या खासदाराने वृक्षप्रेमींना सुनावले होते की, आम्ही एवढे प्रयत्न करून रस्तेविकास प्रकल्प आपल्या शहरात आणतो आणि तुम्ही ते होऊ देत नाहित. खरोखर कीव करावीशी वाटते अशा माणसांची. विकास करू नये, रस्ते बांधू नये, असे कोणी म्हणत नाही. पण, जितकी झाडे तोडायची आहेत, त्याच्या तिप्पट झाडे लावल्याशिवाय झाडे तोडण्यास कायदाही परवानगी देत नाही. आधी तिप्पट झाडे लावा मगच झाडे तोडा, अशी मागणी करणाऱ्या वृक्षप्रेमींचे काय चुकले? आमच्या इथल्या महामार्गाचे रूंदीकरण करण्यासाठी ही सारी वृक्षकत्तल होणार आहे. या रस्त्याशेजारील झाडांत आमची वडाची झाडे अर्थात वटवृक्षच सर्वात जास्त आहेत. ही सर्व झाडे तोडल्यास वडाची प्रजात या शहरात किती मोठ्या संख्येने कमी होईल, याची मला फार भीती वाटते. पण, काय करू या पृथ्वीवर कर्ता करविता हा देव नसून मानवच आहे, हेच मोठे दुर्दैव आहे. त्याच्यापुढे आम्ही तरी काय करणार?

काही वर्षांनी आज मुंबईमध्ये जशी माझी व इतर झाडांची स्थिती आहे तशीच अन्य शहरातही होणार आहे. त्यामुळे निसर्गाचा समतोल साधण्यासाठी पुढची पिढी एक जबाबदार पिढी म्हणून तयार होणे गरजेचे आहे. म्हणूनच माझी ही कहाणी मी तुम्हाला सांगितली. भविष्यात माझे अस्तित्व केवळ छायाचित्रातच मर्यादित राहू नये असे तुम्हाला वाटत असेल, तर ते टिकवण्यासाठी आता तुम्हीच मला मदत करा...

Wednesday, June 16, 2010

बिबट्यापासून सुटका: अशी आणि तशी

पुण्याच्या दैनिक केसरी मध्ये सन २००२ मध्ये लिहिलेली एक घटना इथे देत आहे. खूप दिवसांनी त्या घटनेची प्रकर्षाने आठवण झाली होती...


Sunday, May 30, 2010

माळशेज घाटाची भ्रमंती


भटकायला तसं मला फारसं आवडत नाही. त्यातल्या त्यात पावसाळ्यात फिरणं म्हणजे मला कंटाळवाणं वाटे. पण, तरिही पावसाळ्यामध्ये माळशेज सारखा घाट पाहणं म्हणजे निसर्गाचे म्हणजे निसर्गाचे आपल्या जवळील खरे सौंदर्य पाहण्यासारखे आहे, असे मला वाटते.
माझ्या गावापासून माळशेज फार-फार चाळिस किलोमीटर असेल. आमच्या घरासमोरून जाणारा राज्यमार्ग हा अणे-माळशेज आहे. अणे आणि माळशेज ही जुन्नर तालुक्यातील व पुणे जिल्ह्यातीलही दोन टोके होत. काही वर्षांपूर्वी ह्या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाची मान्यता मिळाली. तेव्हापासून माळशेजच्या घाटातील नियमित वर्दळ आता वाढलेलीच आहे. फिरण्यासाठी म्हणून माळशेजला मी मात्र केवळ एकदाच भेट दिली आहे. तसं पाहिलं तर या घाटातला प्रवास मला नेहमीचाच होता. ठाण्याला शिकत असताना दर सुट्टीत घरी यायचो तेव्हा माळशेजचे दर्शन हे ठरलेलेच होते. उन्हाळ्यातल्या सुट्टीत माळशेज निरस वाटायचा पण हिवाळ्याच्या अर्थात दिवाळीच्या सुट्टीत त्याचे निखरलेले सौंदर्य दृष्टीस पडायचे. त्याची सुरूवात खऱ्या अर्थाने जूनमधल्या मॉन्सूनच्या आगमनाने होते.
माळशेज घाट हा पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरच्या आळेफाटा या गावापासून मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावर साधारणत: ४५ किमी अंतरावर आहे. पूर्वी हा रस्ता फारसा मोठा नव्हता परंतू, गेल्या काही वर्षात तो अधिक चांगला बनविला आहे. तरीही माळशेज घाटाच्या जवळ असणारा रस्ता अजुनही जुन्याच अवस्थेत असल्याचे दिसून येते. आळेफाट्यानंतर ओतूर गांव सोडले की, सह्याद्रीचे डोंगर दिसू लागतात. प्रसिद्ध हरिश्चंद्रगड याच डोंगररांगांमध्ये आहे. पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात धुके आढळून येते. काही वर्षांपूर्वी या परिसरामध्ये पिंपळगाव जोगे हे मोठे नवे धरण बांधण्यात आले आहे. त्यामुळे मूळ रस्त्यात काही बदल करण्यात आले होते. जुन्नर तालुक्यातले शेवटचे गांव ’मढ’ हे पिंपळगांव जोगे धरणग्रस्तांसाठीच वसवण्यात आले आहे. हे गांव ओलांडल्यावर धरणाचे मोठे पात्र नजरेस पडते. डोगररांगा व धरणाचा परिसर ह्यांचा अप्रतिम संगम इथे अनुभवता येतो.

माळशेजची खरी सुरूवात ’वेळ खिंड’ नावाच्या छोट्या घाटातून होते. ही खिंड ओलांडल्यानंतर समोर धुक्यांमध्ये सह्याद्रीच्या डोंगररांगा व अनंत वाटणारे धरण दृष्टीस पडते. माळशेजचा प्रवास इथुनच सुरू होतो. माळशेज घाट हा भूसपाटीपासून बऱ्याच उंचीवर आहे. शिवाय तितक्याच उंचीवर आणखी डोंगर आहेत. त्यांची शिखरे ही धुक्यांमुळे नजरेस पडत नाहीत. आधीच्या प्रवासात जरी आपल्याला पाऊस लागला नसेल तरी माळशेज मध्ये पाऊस पडत असतोच. पावसाचे चारही महिने इथे पाऊस असतो, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. उंचाहून पडणारे धबधबे हे माळशेज घाटातील सर्वात मोठे आकर्षण ठरते. केवळ हौशी पर्यटकच नाही तर एसटीने प्रवास करणारे प्रवासीही त्याचा मनमुराद आनंद लुटतात. घाटाचे रस्तेही अनेक ठिकाणी पाण्याने भरलेले दिसून येतात. माळशेजचे पूर्ण दृष्टीस मावणारे एक-दीड किलोमीटरचे वळण हे धुक्यामध्ये भरून आलेले असते. त्यात वरून पडणारे धबधबे खूपच मोहक दिसून येतात. घाटामध्ये केवळ एकच छोटा बोगदा आहे. तोही काही वर्षांपूर्वी तयार करण्यात आला होता. शिवाय एक छोटे मंदिरही आहे. पर्यटकांची याठिकाणी मोठी गर्दी असते.
बऱ्याच वर्षांपासून माळशेज रेल्वेचे धोंगडे शासन दरबारी भिजत पडले आहे. त्यास अजुनही मंजूरी मिळाली नाही. पण, माळशेजची रेल्वे तयार झाल्यावर पर्यटकांसाठी ती मोठी पर्वणीच ठरणार आहे. कारण, त्या रेल्वेने मुंबईहून खंडाळ्यासारखाच माळशेजचा प्रवास अगदीच जलद होऊन जाईल.
येत्या पावसाळ्यात माळशेजचे सौंदर्य खऱ्या अर्थाने खुलून येईल. त्याच वेळेस तिथला नज़ारा याची देही याची डोळा पाहता येईल.