Monday, October 31, 2022

इमाईका नोदिगल

'सिरीयल किलर' हा सस्पेन्स थ्रिलर चित्रपटांसाठी असणारा नेहमीचा विषय. या चित्रपटांमध्ये सातत्याने खून होत राहतात आणि या सर्व खुनांमध्ये एक विशेष साम्य असतं. ते सामने शोधण्यासाठी पोलिसांना बराच वेळ आणि बुद्धी खर्च करावी लागते. काहीशा अशाच पार्श्वभूमीचा परंतु वेगळ्या वाटेने जाणारा तमिळ रहस्यपट म्हणजे 'इमाईका नोदिगल'! 


सन २०१८ मध्ये अजय ज्ञानमुथू यांच्या दिग्दर्शनाखाली हा चित्रपट तयार झाला होता. नयनतारा या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेमध्ये आहे. सीबीआय ऑफिसर अंजली विक्रमादित्यनची मुख्य भूमिका तिने साकारलेली आहे. चित्रपटाची सुरुवात तिच्यापासूनच होते. एक धडाडीची आणि ध्येयाने प्रेरित झालेली आयपीएस ऑफिसर कशी असावी? हे तिच्या व्यक्तिरेखेतून दिसून येते. पण तिला आव्हान देणारा एक व्यक्ती आहे, तो म्हणजे रुद्र. खरंतर हा रुद्र काही वर्षांपूर्वी मृत झालेला होता. पण तरी देखील तो खून करत सुटला आहे. हा रुद्र आहे तरी कोण? त्याच्याभोवती फिरणारी कहानी या चित्रपटामध्ये चित्रीत करण्यात आलेली आहे.
तसं पाहिलं तर आधीच सांगितल्याप्रमाणे हा वेगळ्या वळणाचा चित्रपट आहे. काही अनपेक्षित धक्के तो देऊन जातो आणि अखेरीस असत्याचा पडदा दूर होऊन सत्य समोर येते. दक्षिणात्य चित्रपटांमध्ये असणारा वेग या चित्रपटामध्ये आपल्याला पुन्हा दिसून येतो आणि सस्पेन्स थ्रिलर च्या पठडीत मोडणारा आणखी एक चित्रपट पाहण्याची तो मजा देऊन जातो.

Friday, October 28, 2022

वाढदिवशी सूर्यग्रहण

२४ ऑक्टोबर १९९५ माझ्या अकराव्या वाढदिवसाच्या आदला दिवस. या दिवशी मी आयुष्यातील पहिले सूर्यग्रहण अनुभवले. विशेष म्हणजे ते भारतातून दिसले होते आणि खग्रास सूर्यग्रहण होते! ग्रहणाविषयी असणाऱ्या अंधश्रद्धा देखील याचवेळी पहिल्यांदा पाहायला मिळाल्या. कालांतराने अनेकदा खग्रास आणि खंडग्रास सूर्यग्रहणे व चंद्रग्रहणे नियमितपणे पाहिली.
यंदाच्या वाढदिवशी कित्येक वर्षांनी पहिल्यांदाच खंडग्रास सूर्यग्रहण अनुभवायला मिळाले. विशेष म्हणजे आजवर पाहिलेल्या सर्व सूर्यग्रहणांपैकी ते एकमेव ग्रस्तास्त खंडग्रास सूर्यग्रहण होते. 


 

Thursday, October 13, 2022

सतराव्या शतकातील गोवळकोंड्याची कुत्बशाही

महाराष्ट्राच्या इतिहासाला धार चढते ती #छत्रपती #शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या मराठेशाहीच्या उदयानंतरच. आज स्थापन झालेले मराठी राज्य शिवशाहीबरोबरच उदयास आले. परंतु इस्लामी राज्यकर्त्यांनी भारतावर कब्जा मिळवलेला असताना स्वकीयांचे राज्य निर्माण करणे, ही त्या काळातली अशक्यप्राय अशीच घटना होती. त्यातूनच शिवरायांनी सतराव्या शतकात रयतेचे राज्य स्थापन केले. तत्पूर्वी #मराठी प्रदेशांमध्ये तसेच पूर्ण दक्षिण भारतामध्ये बहमनी सुलतानाचे वर्चस्व होते. परंतु #बहमनी राज्याची शकले पडली आणि #निजामशाही, #इमादशाही, #बरीदशाही, #आदिलशाही व #कुत्बशाही राज्ये निर्माण झाली. यातील कुत्बशाही राज्य सर्वात शेवटचे राज्य होय. त्यांची राजधानी गोवळकोंड्याला होती.
शिवशाहीचा उदय झाला त्यावेळी या पाचही शाह्या दख्खनवर राज्य करत होत्या. त्यामुळे शिवशाहीचा सखोल अभ्यास करण्यासाठी तत्कालीन इस्लामिक राज्यकर्त्यांचा देखील अभ्यास करणे गरजेचे आहे. याच दृष्टीकोणातून इतिहासाचे भिष्माचार्य वासुदेव सीताराम #बेंद्रे यांनी 'सतराव्या शतकातील गोवळकोंड्याची कुत्बशाही' हा ग्रंथ संपादिला. शिवशाहीचा काळ चालू झाला त्यावेळी मराठी राज्य चोहोबाजूंनी इस्लामी राज्यकर्त्यांनी घेरलेले होते. त्यातच दक्षिणेतील #गोवळकोंड्याची कुत्बशाही देखील समाविष्ट होती. मराठी राज्य विस्तारत असताना अनेकदा अप्रत्यक्षपणे कुत्बशाहीचा आधार मिळाला.
हा ग्रंथ मराठी आणि #इंग्रजी अशा दोन भागांमध्ये तयार करण्यात आलेला आहे. याकरता वा. सी. बेंद्रे यांनी प्रचंड मेहनत घेतल्याचे दिसून येते. त्यांनी कुत्बशाहीची विश्वसनीय #सनावळ बनवलेली आहे. कुत्बशाहीच्या संपूर्ण कार्यकाळामध्ये झालेल्या विविध राज्यकर्त्यांची विस्तृत माहिती तसेच तत्कालीन #उल्लेखनीय ऐतिहासिक घटना या सदर ग्रंथामध्ये विस्तृतपणे नोंदविलेल्या आहेत. या ग्रंथाचे संपादन बेंद्रे यांनी प्रा. भगवत दयाळ शर्मा यांच्या साहाय्याने सन १९३४ मध्ये केले होते. तसं पाहिलं तर त्या काळामध्ये इतिहासावर फारसे #संशोधन झाले नव्हते. परंतु त्यांनी अभ्यासलेल्या परकीय साधनांमधून कुत्बशाहीची बरीच माहिती जमा केली गेली. त्याचाच उपयोग मराठेशाहीचा #अभ्यास करण्यासाठी झालेला दिसतो. या ग्रंथामध्ये कुत्बशाहीच्या लेखनाचे सर्व प्रयत्न, हकीकत, तत्कालीन #लढाया, #युद्धपद्धती तसेच इतर पातशहांचे असणारे संबंध याविषयी सखोल माहिती पुरवलेली आहे. विशेष म्हणजे कुत्बशाहीचे शिवशाहीची संबंध व त्यावरील परिणाम याचा उपयोग मराठेशाहीच्या अभ्यासकांना निश्चित करता येण्याजोगा आहे.
इतिहास लेखन करत असत असताना तत्कालीन कालगणनेची भान ठेवणे गरजेचे असते. सदर ग्रंथामध्ये बहुतांश ठिकाणी #ऐतिहासिक साधनांमध्ये इस्लामी #हिजरी कालगणनेचा उल्लेख येतो. या कालगणनेचे आजच्या जागतिक कालगणनेमध्ये रूपांतर करून #दिनांक व वर्ष यांचा उल्लेख बेंद्रे यांनी या ग्रंथांमध्ये केलेला आहे.
या ग्रंथाच्या इंग्रजी भागामध्ये तत्कालीन इंग्रजीचा बेंद्रे यांनी वापर केलेला आहे. आजच्या काळात वापरण्यात येणारे स्पेलिंग तसेच व्याकरण हे काही प्रमाणात वेगळे आहे. पुस्तकामध्ये मात्र इंग्रजीतील तत्कालीन #व्याकरण व स्पेलिंगचा वापर करण्यात आलेला आहे.
ग्रंथाचे पुन:प्रकाशन करत असताना प्रकाशकांनी यामध्ये कोणताही बदल केलेला नाही. इतिहास अभ्यासकांना तसेच भाषासंशोधकांना तत्कालीन #भाषा कशी होती, याचा अभ्यास करणे सुलभ होईल असे वाटते.



Thursday, October 6, 2022

महाराष्ट्रात या आणि हिंदी शिका

ग्रामीण भागातील एका 'एमआयडीसी'मधील कंपनीत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे माझे दिवसभराचे सत्र होते. संध्याकाळी ते संपले त्यानंतर सहभागी कर्मचाऱ्यांपैकी एक जण मला भेटायला आला. तो केरळमधून अडीच वर्षांपूर्वी कामाच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये आला होता. शिवाय मी त्याच्याशी पूर्णपणे इंग्रजीत बोलत असलो तरी त्याचे माझ्याशी बऱ्यापैकी संभाषण हिंदी भाषेतून चालू होते. याचे मला आश्चर्य वाटले. म्हणून उत्सुकता म्हणून मी त्याला विचारले,
"Generally, Tamil and Malayalam people don't study and understand Hindi language. How can you speak Hindi so well?"
तर तो म्हणाला, "मेरे को केरला मे ढाई साल पहले हिंदी नही आती थी. यहा महाराष्ट्र मे आके हिंदी सीखी है!"
यावर मी त्याला विचारले, "So people around you are North Indians?"
माझा प्रश्न ऐकून तो किंचितसा हसला आणि बोलू लागला, "यहा के सभी लोग मराठी ही है लेकिन वो मुझसे हिंदी मे ही बोलते है. इस वजह से मुझे हिंदी आती है."


त्याचे बोलणे माझ्यासाठी धक्कादायक होते. पुणे जिल्ह्यातल्या एका ग्रामीण भागामध्ये राहणारा दक्षिण भारतीय माणूस अडीच वर्षांमध्ये उत्तम हिंदी बोलू शकतो. परंतु मराठीचा त्याला गंध देखील नव्हता. त्याच्याशी आजूबाजूचे सर्व मराठी लोक हिंदीमध्ये संभाषण साधायचे. ज्या भाषेला मल्याळम लोक काडीचीही किंमत देत नाही, ती भाषा मराठी लोकांनी या व्यक्तीला शिकवली होती.
खरंतर आपल्याच भाषेला तुच्छ समजणाऱ्या मराठी लोकांसाठी हा एक धडा आहे. समोरच्याला मराठी समजत नसेल तर थेट हिंदीत संभाषण करून आपलेच लोक आपल्या भाषेला दुय्यम दर्जा देताना दिसतात. पूर्वी मुंबई शहरामध्ये असणारे मराठीच्या अनासक्तीचे लोन आता हळूहळू महाराष्ट्रात इतरत्र देखील पसरताना दिसत आहे. महाराष्ट्राच्या राजेभाषेच्या भविष्यासाठी ही सर्वात मोठी धोक्याची घंटा आहे.
मराठी लोकांनो वेळीच सावध व्हा आपली भाषा आपल्याच राज्यात मरत आहे. त्याला जबाबदार पण आपणच आहोत.

Tuesday, October 4, 2022

दीक्षाभूमीतील तो अर्धातास

नागपुरातील दीक्षाभूमीबद्दल अनेक वर्षांपासून केवळ वृत्तपत्रांमध्येच वाचत होतो. दरवर्षी धम्मचक्र परिवर्तनदिनी तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणदिनी येथे लाखो आंबेडकरी अनुयायांची गर्दी होत असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी अगणित लोक या ठिकाणी येत असतात. अशा पवित्र ठिकाणी जाण्याची माझी कित्येक वर्षे इच्छा होती. अखेर एका कार्यक्रमाच्या निमित्ताने नागपूरला दोन दिवसांसाठी जाणे झाले आणि माझ्या सुदैवाने मी ज्या ठिकाणी राहत होतो तिथून केवळ दीड किलोमीटरच्या अंतरावर दीक्षाभूमी होती!
आदल्या दिवशीचा कार्यक्रम उरकल्यानंतर रात्री लवकर झोपी गेलो आणि सकाळी सात वाजताच तयार झालो होतो. गुगल मॅपवर दीक्षाभूमी शोधून काढली आणि आजचा मॉर्निंग वॉक याच रस्त्याने करायचा असे ठरवले. कधी मोठ्या रस्त्याने तर कधी छोट्याशा गल्लीमधून पायपीट करत पंधरा मिनिटांमध्ये दीक्षाभूमीच्या एका दरवाजापाशी पोहोचलो. तो बंद होता. गुगल मॅपवर मात्र सकाळी सात वाजल्याचीच उघडण्याची वेळ दाखवत होते. मला काहीतरी चुकल्याचे जाणवले. नंतर लक्षात आले की हा मुख्य दरवाजा नव्हता. तीन ते चार मिनिटांमध्ये पुढच्या सिग्नलला वळसा घालून मी मुख्य दरवाजातून आत प्रवेश केला. आतमध्ये कोणीच नव्हतं. दूरवर एक सुरक्षारक्षक दिसून आला तेव्हा जाणवले की आत प्रवेश करता येऊ शकतो. जसजसे चालत होतो तसतसे या भूमीचे पावित्र्य मन शांत करत होते. पाठीवरची बॅग बाहेर काढून ठेवली व मुख्य प्रार्थनास्थळामध्ये प्रवेश केला. आत कुणीही नव्हतं. अगदी टाचणी पडेल इतकी शांतता या ठिकाणी अनुभवता येत होती!
या वास्तूची रचनाच अशी आहे की इथे बाहेरचा देखील कुठलाच आवाज येत नव्हता. ध्यान करण्यासाठी ती एक सर्वोत्तम जागा होती. अगदी मन भरून मी ती डोळ्यात साठवून ठेवली. तासनतास याच ठिकाणी बसून राहावे, असे देखील वाटत होते. मध्यभागी असणारी बुद्धमूर्ती शांतता, एकाग्रता आणि प्रसन्नता यांचे प्रतीक असल्याची मला खात्री झाली. एक क्षणी असे देखील वाटून गेले की ही तीच जागा आहे का जिथे एकाच दिवशी लाखो लोक दर्शनासाठी आणि प्रार्थनेसाठी येत असतात. अर्थात त्या दिवशी मी अतिशय भाग्यवान ठरलो. कदाचित कुणालाही न अनुभवता येणारी प्रसन्नता, शांतता आणि मनःशांती मला अनुभवता आली होती!