वर्षानुवर्षे चालत आलेल्या अनेक लोककला महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये प्रचलित आणि लोकप्रिय आहेत. परंतु कालानुरूप प्रगतीच्या मार्गाने मार्गक्रमण करत असताना या लोककला हळूहळू लोक पावत गेल्या. पण त्या अजूनही पूर्णपणे लुप्त झालेल्या नाहीत. पाश्चात्य आणि आधुनिक भारतीय संगीताने तसेच आधुनिक मनोरंजन पद्धतींचा स्वीकार केला गेल्याने लोककलांकडे समाजाचेच दुर्लक्ष व्हायला लागले. एकेकाळी जेव्हा इलेक्ट्रॉनिक माध्यमे उपलब्ध नव्हती तेव्हा लोककला टिकून होत्या. महाराष्ट्रातील समाजमन या लोककलांकडे आपली संस्कृती म्हणून पाहत होते. परंतु एकविसाव्या शतकाची सुरुवात झाल्यानंतर लोककलांचा ऱ्हास व्हायला सुरुवात झाली. पुढच्या काही वर्षांमध्ये या कला नाहीशा होतील की काय, अशी देखील परिस्थिती निर्माण झालेली आहे. परंतु ही भीती योग्य आहे का? असाही प्रश्न अनेकदा पडतो.
मागच्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातील नवतरुणांनी या लोककलांना आपल्या कलाविष्काराच्या माध्यमातून पुन्हा संजीवनी देण्याचे काम सुरू केल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे त्यांचे हे प्रयत्न कमालीचे यशस्वी आणि लोकप्रिय झाल्याचे दिसतात. हे सांगायचे कारण असे की काही दिवसांपूर्वीच अशाच महाराष्ट्रीय लोककलांचा बँड अर्थात 'फॉक प्रबोधन'ला पाहण्याची आणि ऐकण्याची संधी मिळाली. मागील तीन-चार वर्षांमध्ये तयार झालेले महाराष्ट्रीयन लोककलांचे विविध बँड ऐकून होतो. परंतु प्रबोधनबद्दल पहिल्यांदाच माहिती मिळाली. आणि केवळ उत्सुकतेपोटीच या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. पिंगळा, वासुदेव, गण, गवळण, कीर्तन, भारुड, छक्कड, जागरण, गोंधळ, पोवाडा, लावणी अशा विविध लोककलांचे अति उत्तम सादरीकरण या कार्यक्रमातून पहायला मिळाले. काही वर्षांपूर्वी गावांमध्ये तमाशा पाहिला होता. या तमाशा लोकप्रकाराचा आधुनिक कलावंतांनी खरोखर तमाशाच केला आहे, हे जाणवले. त्यामुळे लोककलेच्या या प्रबोधनातून असंच काहीतरी बघायला मिळेल, असं वाटलं होतं. परंतु ते पूर्णतः फोल ठरलं. ४० ते ५० उत्साही तरुणांच्या समूहाने जे महाराष्ट्रीय लोककलांचे सादरीकरण केलं ते अत्युच्च दर्जाच होतं. कधी कधी असंही वाटून गेलं की खरेखुरे कलाकार देखील आज या पातळीवरचा सादरीकरण करू शकणार नाहीत! कलाकारांचं गाणं, बोलणं, नाचणं आणि एकंदरीतच सादरीकरण सर्वोत्तम गुणवत्तेचं होतं. त्यादिवशी कितीतरी वर्षांनी आपल्या लोप पावत असलेल्या लोककलांचा अविष्कार याची देही याची डोळा पाहण्याची संधी मला मिळाली. आजची तरुणाई आधुनिक संगीताकडे वळत असताना महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या मराठी तरुणांनी आणलेला हा नवीन चमत्कार खरोखरच आयुष्यात कितीतरी वेळा पाहण्याजोगा आहे. आपल्या पारंपारिक संगीताची ताकत काय आहे, हेच अशा कार्यक्रमामधून प्रकर्षाने समजते. लोककलांमध्ये जीव ओतून काम करणारी तरुणाई पाहिली की खऱ्या अर्थाने आपल्या मराठी लोककला भविष्यामध्ये लोप पावणार नाहीत, याची खात्री देखील होते.
--- तुषार भ. कुटे.






