Friday, March 11, 2022

उत्तररंग - वाट चुकलेले नारायण धारप

वाट चुकलेले नारायण धारप असं या कादंबरीचं वर्णन करावं लागेल. कारण असं की, नारायण धारप म्हटलं की रहस्य कथा, भयकथा, गूढकथा आणि विज्ञान कथा समोर येतात. परंतु नारायण धारपांच्या या प्रतिमेला छेद देणारी कादंबरी म्हणजे "उत्तररंग" होय.
सुरुवातीच्या प्रस्तावनेमध्येच धारपांनी ही एक #कौटुंबिक कादंबरी असल्याचं म्हटलं होतं. परंतु या पूर्वीची त्यांची सर्वच पुस्तके मी एकाच रसांमध्ये वाचल्यामुळे त्यांना मी या प्रस्तावनेमुळे मध्ये फारसे गांभीर्याने घेतले नाही! अर्थात त्यांनी सांगितल्याप्रमाणे ही पूर्णतः कौटुंबिक अशीच #कादंबरी आहे. उतारवयाकडे प्रवास करत असलेल्या दोन स्त्री-पुरुषांची योगायोगाने भेट होते. दोघांच्याही मुलांची लग्न झालेली आहेत. शिवाय दोघेही सध्या एकटेच राहत आहेत. अर्थात त्यांचे जोडीदार मात्र त्यांच्यासोबत नाहीत. त्यामुळे जीवनात एकटेपणा तयार झालेला आहे. यातूनच तो अर्थात कथेचा नायक नायिकेला लग्नाची मागणी घालतो. ती मात्र विचारात पडते. परंतु सारासार विचार करून ती लग्नाला होकार देते. मग प्रश्न उरतो तो दोघांच्याही मुला-मुलींना ही बातमी सांगण्याचा. यामध्ये वेगवेगळ्या दृष्टिकोनाच्या, स्वभावाच्या मुलांची संसारांमध्ये एन्ट्री होते. अर्थात या त्यात फारसा ड्रामेबाजपणा दिसून येत नाही. दोघेही व्यवस्थितपणे मुलांना आपली बाजू सांगतात. शिवाय एकमेकांची ओळख देखील करून देतात. नायकाच्या पत्नीविषयीचा एक 'ट्विस्ट' मात्र यात येऊन जातो. या व्यतिरिक्त अन्य कोणतेही #रहस्य कादंबरीमध्ये नाही.
खरंतर कादंबरी वाचत असताना काहीतरी वेगळे रहस्य खुलेल, असं सातत्याने वाटत राहतं. पण आपला अपेक्षाभंग होतो! हा अपेक्षाभंग खरंतर नारायण धारपांच्या शेकडो रहस्य कादंबऱ्या वाचल्यामुळेच होतो, हेही तितकंच सत्य आहे. मग अगदी साधा सरळ प्रवास करत कादंबरी कथेच्या शेवटच्या टप्प्याकडे येऊन पोहोचते आणि नायक नायिकेच्या सुखी संसाराचा दुसरा टप्पा सुरू होतो.
#नारायण #धारप यांच्या भयकथा, रहस्यकथा तर भरपूर वाजता येतील परंतु कौटुंबिक कादंबरी मात्र सापडणे मात्र विरळाच. या प्रकारातील वाचनाची भूक भागवायची असेल तर 'उत्तररंग' ही एक उत्तम कादंबरी आहे. त्यामुळे वाट चुकलेले धारप आपल्याला या कादंबरीतून दिसून येतील.

Ⓒ Ⓐ  तुषार भ. कुटे 



Wednesday, March 9, 2022

एक अनपेक्षित शेवभाजी

महाराष्ट्रीय पदार्थ काही विशिष्ट हॉटेलमध्ये अतिशय चवदार भेटतात. अशाच पदार्थांपैकी एक म्हणजे शेव भाजी होय. नाशिकला असताना मेसच्या डब्यामध्ये आठवड्यातून कमीत कमी दोन वेळा तरी शेव भाजी यायची. त्यामुळे ती खाऊन खाऊन कंटाळा आला होता. म्हणूनच हॉटेलमध्ये गेलो तरी कधीही नंतर मी शेव भाजी खाल्ली नाही! पण इतक्या वर्षांनंतर घारगावच्या एका छोट्याशा हॉटेलमध्ये उत्तम शेव भाजी खायला मिळाली. काही भाज्या विशिष्ट पद्धतीमध्ये बनवल्या तरच छान चवदार होतात. शेव भाजीचं देखील असंच आहे. घारगावच्या 'हॉटेल श्री लक्ष्मी'मध्ये अशीच उत्तम शेव भाजी खायला मिळाली. त्यासाठी आम्ही २५ किलोमीटरचा प्रवास करत (एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात) गेलो होतो!
पुणे-नाशिक महामार्गावर घारगाव हे असे एकमेव गाव आहे, ज्याला बायपास बनवण्यात आलेला नाही. हायवेवरील उड्डाणपूल गावामधूनच जातो. या उड्डाणपुलामुळे गावामध्ये असणाऱ्या छोट्या व्यावसायिकांचा संपर्क हायवेशी तुटलेला आहे. यातीलच एक 'हॉटेल श्री लक्ष्मी' होय. उड्डाणपुलाच्या पूर्वेला खाली हे अतिशय साधे हॉटेल आहे. इथे शेव भाजीची स्पेशल प्लेट मिळते. तसेच आपण दह्याची सुद्धा वेगळी प्लेट घेऊ शकतो. अत्यंत उत्कृष्ट अशी चव या भाजीला आहे. मी कधी विचारही केला नव्हता की, भविष्यात पोट भरून शेव भाजी खाईल! काही गोष्टी अश्याच अनपेक्षित असतात, त्या अशा!
विशेष म्हणजे 'हॉटेल श्री लक्ष्मी' असे नाव असणाऱ्या या हॉटेलचे मालक रऊफभाई शेख नावाचे मुस्लिम आहेत! शहरात असं कधीच बघायला मिळणार नाही. मात्र गावाकडे अजूनही ही परंपरा सुरु आहे, याचे विशेष वाटते. 




Tuesday, March 8, 2022

ब्रीफ आन्सर्स टू दि बिग क्वेश्चन्स

#पुस्तक_परीक्षण
📖 ब्रीफ आन्सर्स टू दि बिग क्वेश्चन्स
✍️ स्टीफन हॉकिंग (अनुवाद प्रणव सखदेव)
📚 मंजुल पब्लिशिंग हाऊस

वर्षानुवर्षे असणाऱ्या विज्ञानाविषयीच्या अज्ञानातून अनेक अंधश्रद्धा तयार झाल्या. निसर्गातील अनेक गोष्टी या मनुष्याला अचंबित करणाऱ्या व अनुत्तरीत अशा वाटत होत्या. त्यातूनच मानवी मनातून नवनव्या संकल्पना पुढे आल्या. आपण अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरे कुणावर तरी सोपवून दिली. परंतु जसजशी विज्ञानाची प्रगती होत गेली तसतसं निरनिराळी रहस्य मानवासमोर उलगडू लागली. परंतु आजही अनेक रहस्यांचा भेद झालेला नाही. बरेच प्रश्न आजही अनुत्तरीत आहेत. विज्ञानाद्वारे या प्रश्नांचा व त्यांच्या उत्तरांचा शोध घेण्याची प्रक्रिया अजूनही चालू आहे. कदाचित ती यापुढेही अव्याहतपणे चालू राहील. अशाच अनेक प्रश्नांची थोर शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी वैज्ञानिक दृष्ट्या दिलेली उत्तरे म्हणजे हे पुस्तक होय.
महान खगोल वैज्ञानिक स्टीफन हॉकिंग यांचं हे शेवटचं पुस्तक आहे. त्यामुळे या पुस्तकाविषयी उत्सुकता तर होतीच. त्यांनी या पुस्तकामध्ये खालील प्रश्नांची सविस्तरपणे विवेचनासह वैज्ञानिकदृष्ट्या उत्तरे दिलेली आहेत.
- देव खरच आहे का?
- हे सगळं कसं सुरू झालं?
- भविष्यात काय घडेल, याचं पूर्वानुमान लावू शकतो का?
- कृष्णविवराच्या आत काय असतं?
- विश्वात इतरत्र कुठे बौद्धिक जीवसृष्टी आहे का?
- आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आपल्याला मागे टाकेल का?
- आपल्या भविष्याला आकार कसा द्यायचा?
- आपण पृथ्वीवर तगून राहू का?
- अंतराळात आपण वसाहती केल्या पाहिजेत का?
- काळ प्रवास शक्य आहे का?
खरं तर हे सर्वच प्रश्न अतिशय उत्सुकतेने भरलेली आहेत. प्रत्येकालाच या विषयी जाणून घ्यायचं आहे. या उत्सुकतेची पूर्तता करणारे पुस्तक स्टीफन हॉकिंग सारख्या उच्च बुद्धिमत्ता असणाऱ्या वैज्ञानिकाकडून आपल्याला मिळतं. एखाद्या शास्त्रज्ञाची बौद्धिक पातळी किती उच्च असते, याचं उत्तम उदाहरण म्हणजे हॉकिंग होय. विशेष म्हणजे पुस्तक वाचताना मागील शतकातील महान वैज्ञानिक अल्बर्ट आईन्स्टाईन यांच्याबद्दल अनेकदा उल्लेख येतो. हॉकिंग यांना आईन्स्टाईन बद्दल असणारी आपुलकी व आदर पदोपदी जाणवत राहतो. विश्वाच्या दृष्टीने आपण क्षुल्लक बाब आहोत, याची देखील जाणीव करून हे पुस्तक देतं. या पुस्तकाद्वारे विश्वरचनाशास्त्र नावाच्या भौतिकशास्त्राच्या नव्या शाखेची माहिती मिळाली. शिवाय हॉकिंग यांनी बऱ्याच ठिकाणी आपल्या आजाराबद्दल लिहिलेले आहे. त्यामुळे त्यांची त्याकाळची पार्श्वभूमी देखील लक्षात आली. शरीराने अपंग असलेल्या एक व्यक्ती किती उच्च पातळीवर विचार करू शकतो, याची प्रचिती पुस्तक वाचताना निश्चितच येते. विज्ञानावर प्रेम करणाऱ्या, पृथ्वीच्या पर्यावरणाविषयी आपुलकी असणाऱ्या व वैज्ञानिक विचारसरणी अनुसरण करणाऱ्या प्रत्येकासाठी हे पुस्तक वाचनीय असंच आहे.

Ⓒ तुषार भ. कुटे




Monday, March 7, 2022

पवनाकाठचा धोंडी

गो. नी. दांडेकर म्हटलं की, साहित्यात सह्याद्रीच्या डोंगररांगांत वसलेल्या दुर्गांचे दर्शन होतं. गोनीदांचे साहित्य म्हणजे याच सह्याद्रीच्या रांगड्या परिसरात रमलेलं मराठी ग्रामीण साहित्य आहे. 'माचीवरला बुधा' या कादंबरीमध्ये पहिल्यांदा ते अनुभवायला मिळालं. त्यांचीच 'पवनाकाठचा धोंडी' ही अशाच बाजाची कादंबरी आहे. पवन मावळामधील पवना नदीच्या काठावर वसलेला 'तुंग' दुर्ग आहे. याच दुर्गाचा हवालदार धोंडी याची ही गोष्ट.
शिवाजी महाराजांच्या काळापासून तुंगीच्या देखरेखीची जबाबदारी धोंडीच्या घराण्याने पार पाडलेली आहे. आज तो या घराण्याची परंपरा पुढे नेतो आहे. त्याचा त्याला सार्थ अभिमान आहे. शिवाय याच कारणामुळे पंचक्रोशीमध्ये त्याला मान मिळतो आहे. त्याने हवालदार म्हणून आपली कामगिरी चोख बजावलेली आहे. कधीही कोणाशी दुजाभाव केलेला नाही. तो इमानी आहे आणि आपल्या तत्त्वांशी बांधील आहे. परंतु त्याचा भाऊ कोंडी मात्र त्याच्यापेक्षा वेगळ्या विचारांचा आहे. तो काहीसा बंडखोर जाणवतो. याच कारणामुळे पवनाकाठी राहणाऱ्या या धोंडीच्या आयुष्यात निरनिराळ्या घटना घडतात. मात्र तो आपली तत्वे सोडत नाही.
अशी पार्श्वभूमी असणारी ही कादंबरी म्हणजे 'पवनाकाठचा धोंडी'. सुरुवातीला कथेला रंग चढायला थोडासा वेळ लागतो. नंतर ती हळूहळू वाचकाच्या मनाचा पकड घ्यायला लागते व आपण त्याच्यामध्ये गुंतत जातो. पवनाकाठच्या धोंडीचे व्यक्तिमत्व गोनीदांनी अतिशय उत्तमरीत्या रेखाटलेले आहे. विशेष म्हणजे कोंडी आणि सारजा तसेच सरू आणि धोंडी या दीर-भावजयाचं नातं अतिशय उत्तमरित्या या पुस्तकांमधून रंगवलेले आहे. शेवटी शेवटी कादंबरी भावनात्मक करून सोडते. म्हणजेच तोवर आपण कादंबरीमध्ये पूर्णपणे गुंतत गेलो असतो. हीच तर गोनीदांच्या लेखणीची जादू आहे. या कादंबरीवर आधारित चित्रपटाची निर्मिती देखील झालेली आहे. परंतु सध्या हा चित्रपट इंटरनेटवर कुठेही उपलब्ध नाही.



Sunday, March 6, 2022

पावनखिंड चित्रपट का पाहावा?

पावनखिंड हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून मागच्या दोन आठवड्यांमध्ये चित्रपटाविषयीच्या तसेच चित्रपट आवडल्याच्या प्रशंसक पोस्ट मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर येत आहेत. एखाद्या मराठी चित्रपटाविषयी मागील काही वर्षांमध्ये मराठी प्रेक्षक भरभरून बोललेले नाहीत. पावनखिंडने मात्र ही कमी भरून काढली. त्याबद्दल मराठी प्रेक्षकांचे धन्यवादच म्हणायला हवेत. अर्थात एकंदरीत चित्रपट लोकांना आवडतो आहे, ही निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळे मी चित्रपटाचे परीक्षण करत बसणार नाही. माझा महत्त्वाचा प्रश्न आहे की, पावनखिंड चित्रपट का पाहावा?
मागच्या काही वर्षांपासून नवी पिढी ही शालेय शिक्षणात मातृभाषेपासून दुरावलेली दिसते. सर्वांनाच हे इंग्रजीच वेड लागलेलं आहे. इंग्रजीत शिकलं की आपण फार मोठे होऊ शकतो, अशी भावना अनेकांच्या मनात रुजू होताना दिसते आहे. त्यामुळेच येणारी नवीन पिढी आता आंतरराष्ट्रीय इंग्रजी शाळांमध्ये शिकताना दिसते आहे. याच आंतरराष्ट्रीय इंग्रजी शाळांमध्ये महाराष्ट्राचा तसेच मराठ्यांचा इतिहास कितपत शिकवला जातो, हा देखील मोठा प्रश्न आहे. त्यांच्या शालेय इतिहासामध्ये मोगलांच्या गौरवशाली(?) इतिहासाबरोबर दोन वाक्यात शिवाजी महाराजांचा इतिहास सांगितला जातो. तोही औरंगजेब सारख्या 'महान' बादशहाला त्रास देणारा एक माणूस दक्षिणेमध्ये होता, असा सारांशरुपी इतिहास तुमच्या मुलांना समजणार आहे. म्हणजेच त्यांच्या लेखी महाराष्ट्राच्या इतिहासाची किंमत शून्य आहे. याच कारणास्तव महाराष्ट्राच्या नवीन मराठी पिढीला आपला इतिहास समजणारच नाही.
भारताच्या एकंदरीत जडणघडणीमध्ये महाराष्ट्राचे सर्वोच्च योगदान राहिलेले आहे. महाराष्ट्राची परंपरा संघर्षाची, बलिदानाची, आत्मसमर्पणाची व अत्युच्च राष्ट्रवादाची आहे, हे आजवर महाराष्ट्राच्या इतिहासाने पाहिले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पराक्रमी तेजस्वी पुरुष या मातीत जन्मला, हे आपले भाग्यच म्हणावे लागेल. परंतु आंतरराष्ट्रीय इंग्रजी पुस्तके या इतिहासाला क्षुल्लक महत्त्व देतात. मग आपला इतिहास आपल्या पुढच्या पिढीला समजणार तरी कसा? इंग्रजीमध्ये तयार होणारे काल्पनिक चित्रपट आणि काल्पनिक हिरो यातच नवी पिढी गुंगवून ठेवायची का? आपले दिवंगत खरे खरे हिरो या पिढीला कधी समजणार? त्यांचा पराक्रम पुढच्या पिढीला दाखवायचा असेल तर शिवकालावर आधारित असे अनेक चित्रपट तयार व्हायला हवेत. तसेच मराठी पालकांनी ते आपल्या पाल्यांना दाखवायला देखील हवेत. तरच आपले पूर्वज किती पराक्रमी होते, याची माहिती नवीन पिढीला होईल.
पाश्चिमात्य देशांमध्ये होऊन गेलेल्या महापुरुषांइतकेच किंबहुना त्याहीपेक्षा तेजस्वी महापुरूष महाराष्ट्राच्या मातीत जन्मले. परंतु महाराष्ट्रीय जनतेला आजही त्यांची माहिती नाही. आपण ऐतिहासिक पुस्तके वाचत नाही. त्यामुळे चित्रपट हे सर्वसामान्यांसमोर आपला जाज्वल्य इतिहास पोचविण्याचे सर्वोत्तम माध्यम आहे. यापुढेही शिवाजी महाराजांवर आधारित अनेक चित्रपट तयार होतील. त्यातून मराठ्यांच्या पराक्रमाची गाथा मांडली जाईल. या चित्रपटांना देखील असाच प्रतिसाद मिळत राहो व आपला इतिहास सर्वदूर पोहोचो, हीच अपेक्षा.
टीप: तुम्हाला कोणताही मराठी चित्रपट आवडला असल्यास त्याचे रेटिंग आयएमडीबी (IMDB) या आंतरराष्ट्रीय वेबसाईटवर नक्की द्या! आपल्या चित्रपटाची प्रशंसा आपण केली तरच जग करेल, हे लक्षात असू द्या. 



Saturday, March 5, 2022

एक सर्वकालीन महान लेगस्पिनर

नव्वदच्या दशकामध्ये आम्हाला #क्रिकेट सामने पाहण्यासाठी टीव्ही समोर बसायला लावणारे अनेक दिग्गज होते. भारतीय खेळाडू प्रमाणेच अन्य देशातील अनेक खेळाडूंची नावे देखील यात घेता येतील. यातीलच एक खेळाडू म्हणजे ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज शेन वॉर्न होय. कालच हृदयविकाराने शेन वॉर्न यांची प्राणज्योत मालवली आणि एका महान फिरकी गोलंदाजांचा शेवट झाला. 


क्रिकेट कळायला लागल्यापासून मला शेन वॉर्न ऑस्ट्रेलियाच्या संघामध्ये सातत्याने दिसून आला. त्या काळातील भारताचा अनिल कुंबळे, पाकिस्तानचा मुश्ताक अहमद आणि ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर्न हे तीन सर्वोत्तम लेगस्पिनर म्हणून ओळखले जात असत. त्यातल्या त्यात शेन वॉर्नची खासियत अशी की तो हातभर देखील चेंडू वळवू शकायचा! एकवेळ ऑफस्पिनर होणे सोपे आहे पण #लेगस्पिनर मात्र कठीण होते. आजही त्या दर्जाचे लेग स्पिनर दिसून येत नाहीत. म्हणूनच शेन वॉर्नच्या फिरकी कौशल्य विषयी मला विशेष आदर वाटतो. सचिन #तेंडुलकर आणि शेन वॉर्न सारख्या जगविख्यात फलंदाज व गोलंदाजांची #जुगलबंदी लाइव्ह बघायला मिळाली, हे आमच्या पिढीचे भाग्य होते. शेन वॉर्नचे सर्वकालीन फिरकी घेणारे चेंडू घेऊन पाहिले की, आजचे गोलंदाज निश्चितच आश्चर्याने तोंडात बोटे घालतील. एका अर्थाने तो फिरकीचा जादूगार म्हणावा, असा होता.
इंग्लंड आणि #ऑस्ट्रेलिया मध्ये ऍशेस मालिका खेळवली जाते. विशेष म्हणजे या सर्व टेस्ट मॅचेस असतात. या मॅचेसमध्ये केली मी शेन वॉर्नची गोलंदाजी बराच वेळा पाहिलेली आहे. एखाद्या खेळाडू बद्दल आदर वाटावा असाच तो होता. ऑस्ट्रेलियाला कोणीही संघ हरवू शकत नाही, असं त्या काळात वाटायचं आणि या संघाच्या गोलंदाजीचा कणा शेन वॉर्न होता! सलग #विश्‍वचषक जिंकलेल्या संघाचा तो भाग होता. यावरूनच त्याची तत्कालीन महती आपल्याला समजू शकेल. आयपीएल सामने सुरू झाले त्यावेळेस राजस्थान रॉयल्स या सर्वात सर्वात दुबळ्या संघाचा तो कर्णधार होता. तरी देखील सर्वात पहिली #आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचे भाग्य त्याला लाभले. खरं तर याला भाग्य म्हणता येणार नाही. शेन वॉर्नचे कसबच इतके उत्तम होते की, त्याचा फायदा तुलनेने दुबळा असणाऱ्या राजस्थानच्या संघाने करून घेतला. इतर सर्व संघांचे कर्णधार भारतीय असले तरी कोण जाणे, मला #राजस्थान रॉयल संघाबद्दल विशेष आपुलकी वाटायची. कदाचित शेन वॉर्न यासाठी कारणीभूत असेल.
क्रिकेट पाहण्याचा व अनुभवण्याचा आनंद या महान गोलंदाजाने आम्हाला दिला, याबद्दल आम्ही त्याचे सदैव ऋणी असू.

© तुषार भ. कुटे

Friday, March 4, 2022

द बुक ऑफ राम

#पुस्तक_परीक्षण
📖 दि बुक ऑफ राम
✍️ देवदत्त पटनायक (अनुवाद- चेतन कोळी)
📚 पेंग्विन रँडम हाऊस इंडिया, मंजुल पब्लिशिंग हाउस

देवदत्त पटनायक यांच्याविषयी यापूर्वी बरंच ऐकलेलं होतं. म्हणूनच त्यांच्या पुस्तकाविषयी उत्सुकता तर होतीच. तेव्हा त्यांचे 'द बुक ऑफ राम' हे पुस्तक हाती आले. अर्थातच नावावरून रामकथेवर अर्थात रामायणावर लिहिलेले हे पुस्तक आहे, हे लक्षात येईल. रामायण भारतीय लोकांसाठी काही वेगळा विषय नाही. राम हा भारतीयांच्या श्रद्धेचा विषय आहे. शिवाय अनेकांसाठी तो अस्मितेचा देखील आहे. यापूर्वी अनेकांनी रामकथेवर पुस्तके लिहिलेली आहेत. परंतु प्रत्येक लेखकाचा दृष्टीकोन वेगवेगळा दिसून येतो. देवदत्त पटनायक यांनी देखील रामायण याचे विस्तृत विवेचन या पुस्तकाद्वारे केलेले आहे. रामायणात घडलेल्या विविध घटनांची पार्श्वभूमी सहजपणे पुस्तकात लेखकाने मांडलेली आहे. दूरदर्शनवर पाहिलेल्या रामायणामुळे रामकथा चांगलीच लक्षात राहिली होती. त्यामुळे पुस्तक वाचून नवी काय अनुभवणार, हा देखील प्रश्न होता. परंतु या पुस्तकाद्वारे लेखकाच्या दृष्टिकोनातून रामायणाचे विविध पैलू लक्षात आले. एखादी घटना का घडली, किंबहुना ती घडल्यामुळे काय परिणाम झाले? अशा प्रश्नांची उत्तरे पटनायक यांनी या पुस्तकातून दिलेली आहेत.
विशेष म्हणजे मागच्या हजारो वर्षांमध्ये विविध प्रकारची रामायणे लिहिली गेली. प्रत्येक रामायणाचा गाभा वेगवेगळ्या असला तरी कथेमध्ये काहीसे बदल होतातच, याची देखील माहिती या पुस्तकामध्ये दिलेली आहे. रामायणातील विविध पात्रांचे दृष्टीकोण, विसंगती तसेच विचार करण्याची पद्धती देखील आपल्याला अनुभवता येते. राम हा कथेचा नायक असल्याने त्याच्या विविध पैलूंचा अभ्यास नव्याने करता येतो. पौराणिक कथांचा देखील संशोधनात्मक अभ्यास कसा करायचा, हे या पुस्तकातून निश्चितच समजते. शिवाय रामकथेतून अनेक गोष्टींची शिकवण देखील मिळते. कदाचित याचमुळे आज देखील भारतामध्ये रामकथा सातत्याने वाचल्या व ऐकल्या जातात.
सर्वात विशेष शिकवण अशी की, जेव्हा रामाचा बाण लागून रावण खाली कोसळतो तेव्हा त्याने म्हटलेली वाक्ये देवदत्त पटनायक यांनी खूप सुंदररित्या लिहिलेली आहेत. तो म्हणतो, 'रामा तू खऱ्या अर्थानं अतिशय योग्य असा विरोधक आणि पृथ्वीतलावर ची सर्वात शक्तिमान व्यक्ती आहेस. जिला स्वतःच्याच भावनांपासून अलिप्त राहता येऊ शकते. मी तुला नमस्कार करतो. माझ्याकडे अतिशय थोडा वेळ आहे कारण मी लवकरच मृत्युमुखी पडणार आहे. मात्र माझ्या आयुष्यात मी जे शिकलो त्याच्यापैकी सर्वात महत्त्वाची गोष्ट मी तुला शिकवणार आहे. ज्या गोष्टींपासून नुकसान होईल अशा गोष्टींचा मोह वाटणं किंवा या गोष्टी टाळणं हिताचं आहे. अशाच गोष्टींचं आकर्षण वाटणं, हे अज्ञानी मनाचे लक्षण आहे. हे सदैव ध्यानात ठेव. ज्या गोष्टींबद्दल आपल्याला प्रचंड आकर्षण वाटतं त्याच गोष्टींमुळे तुमचं नुकसान होतं, हे समजण्याची गरज आहे. ज्या गोष्टींपासून आपण दूर पळतो, ज्या गोष्टींबद्दल आपण दिरंगाई करतो अशाच गोष्टी स्वतःचा विकास करण्यासाठी फायदेशीर ठरतात'. ही अतिशय महत्त्वाची शिकवण रावणाने रामाला दिली. विशेष म्हणजे आजही मनुष्य जातीसाठी ती आदर्श अशी शिकवणच आहे.
पुस्तकाच्या सर्वात शेवटच्या परिच्छेदांमध्ये लेखकाने जे लिहिले आहे ती रामायणातील खरी शिकवण म्हणून सांगता येऊ शकते.
आता आपल्याला सीतेची (मनाची) बंधनांतून सुटका करायची आहे. आपल्या बुद्धिरूपी हनुमानात दडलेल्या सर्व क्षमतांचा विकास करायचा आहे. जीवनरूपी सागर तरून जायचा आहे आणि रावणाच्या लंकेवर (अहंकाराच्या साम्राज्यावर) विजय मिळवायचा आहे, त्याची सोन्याची लंका जाळून तिचं रामाशी पुनर्मीलन घडवून आणायचं आहे ... कारण राम आपल्या अंतर्यामीच आहे, तो आपल्यातल्या 'स्व'त्वापर्यंत पोहोचण्याची वाट पाहतोय.
या रामाला आपण केवळ एका काव्यामध्ये किंवा एका स्थानापुरतं मर्यादित ठेवू शकत नाही. तो तर स्थळकाळाच्या मर्यादेपलीकडे आहे. तो सर्वव्यापी आहे. तो म्हणजे दुसरातिसरा कुणी नसून आपलाच आत्मा, परमचैतन्य आहे. तोच आपलं खरं अस्तित्व आहे. तोच आपल्यामध्ये प्राण ओततो आणि आपलं साक्षिभावानं निरीक्षण करतो.
आपण जेव्हा या रामाची प्रचिती घेऊ, तेव्हा राजकीय विजयाची आपल्या मनातली इच्छा लोप पावते. आणि तेव्हा आपलं मन प्रेमानं, समजेनं आणि सर्वांप्रतिच्या भूतदयेनं भरून जातं. त्या वेळी धर्म अधिराज्य गाजवतो, आणि रामराज्याची स्थापना होते ... आपल्या अंतर्यामीसुद्धा आणि सभोवतीसुद्धा!

© तुषार भ. कुटे  



Wednesday, March 2, 2022

अभिशाप

#पुस्तक_परीक्षण
📖 अभिशाप
✍️ श्रीकांत कार्लेकर
📚 डायमंड पब्लिकेशन्स

सह्याद्रीमध्ये संशोधन करणारे एक प्राध्यापक आहेत. त्यांच्यासारखाच मनापासून संशोधन करणारा त्यांचा एक विद्यार्थी देखील या कथेमध्ये आहे. या गुरुशिष्यांची जोडी एका नव्या प्रकल्पावर काम करायला सुरुवात करते. तसं हे कार्य पीएचडी प्राप्त करण्यासाठी केलेलं आहे. परंतु संशोधक शिष्य ते मनापासून करतो आणि त्यातून वैज्ञानिक निष्कर्ष काढले जातात. राजकीय लोक मात्र स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी या संशोधनाला कोणतेच महत्त्व देत नाही. त्यातून अघटीत प्रकार घडतो. अशी कथा रचना असलेली ही कादंबरी होय... अभिशाप.
श्रीकांत कार्लेकर यांनी लिहिलेल्या कादंबरीमध्ये एका प्रभावी संशोधनाच्या उपेक्षेची मनाला चटका लावणारी कथा चित्रित केलेली आहे. केवळ ११४ पानांच्या या पुस्तकात आलेले ते कथानक तसे वेगवान म्हणावे लागेल. जवळपास अर्ध्याहून अधिक कादंबरी संवाद रूपानेच पुढे गेलेली दिसते. संशोधनासाठी मनापासून प्रयत्न करणारा विद्यार्थी विरुद्ध केवळ पैशाच्या जोरावर पीएचडी प्राप्त करणारा विद्यार्थी अशा लढाईचा स्पर्श देखील या कादंबरीला झालेला आहे. बहुतांश ठिकाणी देवनागरीमध्ये इंग्रजी भाषेतील वाक्य वापरली गेल्याने त्याचा लवकर अर्थ समजत नाही. एक तर ती इंग्रजीचाच रोमन लिपीमध्ये लिहायला हवी होती किंवा थेट मराठीतच हवी होती. असेही बऱ्याचदा वाटून जाते. ही गोष्ट सोडली तर एक छोटेखानी कादंबरी वाचण्याची हौस हे पुस्तक पूर्ण करते.



🌐 कोठून घेतले : https://bookvishwa.com

© तुषार भ. कुटे