Friday, March 31, 2023

240

मागील अठरा वर्षांमध्ये एकाच वेळी सुमारे 150 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचा विक्रम होता या आठवड्यामुळे आठवड्यामध्ये 240 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली आहे मागील अनेक वर्षांपासून शिकवत असल्यामुळे माझ्यातील अबूतपूर्व क्लास कंट्रोल चा अनुभव देखील यावेळी आला आणि एका अद्भुत अप्रतिम कार्याची प्रचिती देखील!


 

Wednesday, March 29, 2023

इनफिक्स आणि पोस्टफिक्स

संगणकाला आपली भाषा समजून सांगायची असेल तर संगणकीय प्रोग्रामिंग लँग्वेजचा वापर केला जातो. ज्याद्वारे आपल्याला पाहिजे असलेले कोणतेही काम आपण संगणकाकडून करवून घेऊ शकतो. जशी संगणकाची भाषा वेगळी आहे तशीच कोणतीही गोष्ट समजावून घेण्याची प्रक्रिया देखील संगणकामध्ये वेगळी असल्याचे दिसून येते. आपल्याला जर एखादे गणिती समीकरण सोडवायचे असल्यास आपण सामान्यपणे 'इनफिक्स' या पद्धतीने सदर समीकरण लिहीत असतो.
उदाहरणार्थ,
 

x + y = z
 

या गणितीय समीकरणांमध्ये x आणि y यांची बेरीज करून z मध्ये ती साठवलेली आहे. अशा प्रकारची समीकरणे केवळ मानवी मेंदूलाच समजू शकतात. यास 'इनफिक्स एक्सप्रेशन' म्हटले जाते. अर्थात यामध्ये जी गणिती प्रक्रिया करायची आहे, त्याचे चिन्ह दोन्ही संख्यांच्या अथवा अक्षरांच्या मध्ये लिहिले जाते. यावरून आपल्याला समजते की या दोन्हींवर अर्थात x आणि y वर कोणती गणिती प्रक्रिया करायची आहे? परंतु संगणकाचे मात्र असे नाही. संगणकाला आधी कोणत्या संख्यांवर प्रक्रिया करायची आहे, हे सांगावे लागते आणि त्यानंतर कोणती प्रक्रिया करायची आहे हे सांगावे लागते. अर्थात वर लिहिलेले गणिती समीकरण संगणकामध्ये अशा प्रकारे लिहिले जाईल...
 

xy+z=
 

यास 'पोस्टफिक्स एक्सप्रेशन' असे म्हटले जाते. ज्यामध्ये आधी संख्या आणि नंतर गणिती चिन्ह लिहिलं जातं. अर्थात संगणकाची अंतर्गत रचना अशा पद्धतीने असल्यामुळेच या निराळ्या समीकरण पद्धतीचा अवलंब केला जातो. परंतु प्रत्यक्षात जेव्हा आपण सदर समीकरण संगणकीय भाषेमध्ये लिहितो त्यावेळेस ते आपल्या भाषेप्रमाणेच लिहिले जाते. 'पोस्टफिक्स'मध्ये असणारे समीकरण हे संगणक अंतर्गत पातळीवर बदलून घेतो आणि नंतर त्याचे उत्तर शोधत असतो. यावरून एक गोष्ट मात्र समजते की नैसर्गिक मेंदू आणि कृत्रिम मेंदू सारखेच कामे करतात. पण त्यांना समजावून सांगण्याची पद्धती मात्र वेगळी असते!



Tuesday, March 28, 2023

चाकण भुईकोट सायकल स्वारी

सकाळी सहा वाजता उठलो तेव्हा वातावरणामध्ये धुकं कमी होतं. पण हळूहळू दहा ते पंधरा मिनिटांमध्ये त्याची तीव्रता वाढायला लागली आणि सगळीकडे अस्पष्ट दिसायला लागलं. इंद्रायणी नदीभोवती तयार झालेल्या या धुक्याच्या वातावरणात नदीच्या काठाकाठाने मार्गक्रमण करणं तसं अवघड होतं. म्हणून आज नदी पार करून कुठेतरी सायकल स्वारी करण्याचे ठरवले.
आमच्या घरापासून सगळ्यात जवळ असणारा परंतु आजवर भेट न दिलेला किल्ला म्हणजे चाकणचा भुईकोट दुर्ग अर्थात संग्रामदुर्ग होय. अंतर फक्त ११ किलोमीटर होतं. परंतु प्रवास होता राष्ट्रीय महामार्गावरचा. सायकल काढली आणि पाचच मिनिटांमध्ये पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६० ला लागलो. मोशी टोलनाक्यापाशी मोठ्या प्रमाणात धुकं दिसून येत होतं. या टोलनाक्याच्या पुढेच इंद्रायणी नदी आहे.
महामार्गावरील नेहमीप्रमाणे गाड्यांची वर्दळ चालू होतीच. रस्त्याच्या पूर्ण डाव्या कडेने मी सायकल हाकायला सुरुवात केली. महामार्गावरून वेगाने गाड्या घोंगावत जात होत्या. तरीही धुके असल्यामुळे त्यांचा वेग काहीसा कमी असलेला दिसला. माझा चढतीचा रस्ता होता त्यामुळे वेग फारसा पकडलेला नव्हताच. फक्त उलट्या दिशेने समोरून येणाऱ्या वाहनांमुळेच अडचण व्हायची. बाकी रस्त्याच्या कडे कडेने चालल्यावर तसा काही त्रास होत नव्हता. चाकण नगरपरिषदेच्या हद्दीपाशी आल्यावर धुकं पूर्णतः संपलं होतं. आणि सर्विस रोड चालू झालेला होता. सकाळच्या सूर्याची किरणे आता सर्वत्र दिसायला लागली होती. धुक्याचा मागमूसही नव्हता. चाकण शहराचा मुख्य चौक जवळ येत होता. मला आता रस्ता पार करून पलीकडच्या बाजूला जायचे होते. आज पहिल्यांदाच चाकणच्या उड्डाणपुलाचा काय उपयोग आहे, हे समजले! कार चालकांसाठी तसे दोनही उड्डाणपूल हे निरुपयोगीच आहेत. या पुलाच्या खालून मी पलीकडच्या दिशेने गेलो. मुख्य बाजारपेठ अजूनही उघडलेली नव्हती. कदाचित ती सुरू झाल्यानंतर इथे बरीच मोठी गर्दी होत असावी असं दिसून आलं.
चाकण शहरातील जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक आणि दोनच्या समोर बांधलेल्या एका कमानीतून आत गेलो. इथे समोरच चाकणचा उध्वस्त भुईकोट किल्ला नजरेस पडला. महाराष्ट्रातील इतर भुईकोट किल्ल्यांप्रमाणेच आज या एकेकाळ्याच्या पराक्रमी भुईकोट किल्ल्याची देखील अवस्था झाली आहे. फारसे अवशेष शिल्लक राहिलेले नाहीत. त्यावर निव्वळ दृष्टिक्षेप टाकला आणि परतीच्या वाटेने निघालो. येताना रस्ता जवळपास उतरणीचाच होता. एकदा तर एका पीएमपी बसला देखील ओव्हरटेक करून आलो! ती बस नंतर माझ्यापुढे गेलीच नाही!
इंद्रायणी नदीच्या जवळ आलो तोवर धुक्याची तीव्रता बऱ्यापैकी कमी झालेली होती. आज पहिल्यांदाच पूर्ण प्रवास सतत कानावर आढळणाऱ्या वाहनांच्या आवाजामध्येच गेला.. अंतर होतं 22 किलोमीटर!


 

Monday, March 20, 2023

देहू ते आळंदी सायकलवारी

मराठी वाङ्मयाला हजारो वर्षांची परंपरा आहे. याच परंपरेतील आणि वारकरी संप्रदायाला पूजनीय व मार्गदर्शक असणारे ग्रंथ म्हणजे संत तुकारामांची गाथा आणि संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी. आपल्या इथे ग्रंथ पूजनाची परंपरा तर आहेच, याशिवाय ग्रंथांची मंदिरे देखील बांधलेली आहेत. अशीच मंदिरे गाथा आणि ज्ञानेश्वरी या दोन्ही ग्रंथांची अनुक्रमे देहू आणि आळंदी या गावांमध्ये बांधलेली आहेत. या मंदिरांच्या भिंतींवर ग्रंथांचे श्लोक संगमरवरी दगडामध्ये कोरलेले आहेत. महाराष्ट्रीय किंबहुना संपूर्ण जगाला मार्गदर्शक ठरणारे हे ग्रंथ मंदिररूपात आपल्याला पाहायला मिळतात.
आजची सायकल स्वारी ही या दोन्ही मंदिरांच्या आणि त्यांच्या मराठी साहित्यातील योगदानाला समर्पित केली. श्रीक्षेत्र देहूमध्ये इंद्रायणी काठी असणाऱ्या संत तुकाराम महाराज गाथा मंदिरात सकाळी सात वाजून सात मिनिटांनी पोहोचलो होतो. तिथून आळंदी रस्त्याने मार्गक्रमण करत आळंदीतील इंद्रायणी काठावर बांधलेल्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी मंदिरात सात वाजून ५७ मिनिटांनी पोहोचलो. हा एक अविस्मरणीय अनुभव होता.


 

Sunday, March 19, 2023

डिस्ने इमॅजियनीयरिंग

डिस्ने कंपनीने नुकताच हा रोबो अनावरण केला आहे!  🤯

जर तुम्हाला विश्वास नसेल की, मानवांना एक दिवस रोबोट साथीदार असतील, तर ही ९० सेकंदाची क्लिप खरोखर पाहण्यासारखी आहे.

व्हिडिओ मध्ये ०१:०६ या वेळी प्रेक्षकांच्या तात्काळ भावनिक प्रतिक्रियेकडे विशेष लक्ष द्या..

"डिस्ने इमॅजियनीयरिंग" मधील सर्जनशील प्रवर्तकांनी तयार केलेला हा अत्याधुनिक प्रोटोटाइप विशेषतः लोकांशी भावनिक संबंध निर्माण करण्यासाठी डिझाइन केलेला आहे.

रोबोटिक्‍स क्षेत्रामध्‍ये अजूनही अगदी सुरुवातीचे दिवस आहेत, परंतु प्रगतीचा वेग खरोखरच मनाला आनंद देणारा आहे… क्षितिजावर अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि पुढे आकर्षक भविष्य.



Tuesday, March 7, 2023

पिंपळ

वयाच्या मावळतीकडे झुकलेल्या एका वृद्ध 'युवका'ची ही गोष्ट आहे. हे गृहस्थ रिटायरमेंटनंतर आपले आयुष्य एकांतामध्ये घालवत आहेत. त्यांची पत्नी अनेक वर्षांपूर्वी त्यांना सोडून गेली आहे आणि सर्व मुले आता अमेरिकेमध्ये स्थायिक झालेली आहेत. त्यांचा आणि त्यांच्या नातवांचा संवाद केवळ व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होतो आहे. त्यातच ते समाधान मानत आपले दैनंदिन आयुष्य सुखाने आणि आनंदाने जगत आहेत. परंतु त्यातही आपले सगळे सोयरे जवळ नसल्याची सल आहेच.
त्यांची काळजी घेणारी भारतातील एक डॉक्टर युवती आहे. ती त्यांची सख्खी मैत्रीण देखील आहे. शिवाय सोबतीला त्यांचा स्वयंपाकी व मदतनीस तुकाराम देखील आहे. आजोबा दररोज रात्री व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपल्या नातवांशी आणि मुलांशी गप्पा मारत असतात. परंतु प्रत्यक्ष स्पर्शामध्ये असणारा ओलावा या इ-संवादामध्ये दिसून येत नाही. एके दिवशी घडलेल्या एका प्रसंगामुळे सर्वजण त्यांना अमेरिकेमध्ये येण्याची विनंती करतात. परंतु त्यांची इच्छा नसते. याच मातीमध्ये आपण विलीन व्हावे, असे त्यांना वाटत असते. पण मुलांच्या आणि नातवांच्या हट्ट पुढे त्यांचे काही चालत नाही आणि ते निर्णय घेतात. तो चित्रपटामध्ये पाहण्यासारखा आहे.
गजेंद्र अहिरे दिग्दर्शित या चित्रपटात आजोबांची मध्यवर्ती भूमिका दिलीप प्रभावळकर यांनी केली आहे. तसेच सोबतीला प्रिया बापट आणि किशोर कदम देखील दिसून येतात. चित्रपटाची मांडणी तशी फारच उत्तम. शिवाय भावभावनांचे चित्रण देखील उत्तम जमून आले आहे. चित्रपटाच्या अखेरीस कित्येक वर्षे उभा असलेला हा 'पिंपळ' नेमका कोणत्या दिशेने जातो हे पाहणे औत्सुक्याचे ठरते.