मराठी वाङ्मयाला हजारो वर्षांची परंपरा आहे. याच परंपरेतील आणि वारकरी
संप्रदायाला पूजनीय व मार्गदर्शक असणारे ग्रंथ म्हणजे संत तुकारामांची गाथा
आणि संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी. आपल्या इथे ग्रंथ पूजनाची परंपरा तर
आहेच, याशिवाय ग्रंथांची मंदिरे देखील बांधलेली आहेत. अशीच मंदिरे गाथा आणि
ज्ञानेश्वरी या दोन्ही ग्रंथांची अनुक्रमे देहू आणि आळंदी या गावांमध्ये
बांधलेली आहेत. या मंदिरांच्या भिंतींवर ग्रंथांचे श्लोक संगमरवरी
दगडामध्ये कोरलेले आहेत. महाराष्ट्रीय किंबहुना संपूर्ण जगाला मार्गदर्शक
ठरणारे हे ग्रंथ मंदिररूपात आपल्याला पाहायला मिळतात.
आजची सायकल स्वारी
ही या दोन्ही मंदिरांच्या आणि त्यांच्या मराठी साहित्यातील योगदानाला
समर्पित केली. श्रीक्षेत्र देहूमध्ये इंद्रायणी काठी असणाऱ्या संत तुकाराम
महाराज गाथा मंदिरात सकाळी सात वाजून सात मिनिटांनी पोहोचलो होतो. तिथून
आळंदी रस्त्याने मार्गक्रमण करत आळंदीतील इंद्रायणी काठावर बांधलेल्या
ग्रंथराज ज्ञानेश्वरी मंदिरात सात वाजून ५७ मिनिटांनी पोहोचलो. हा एक
अविस्मरणीय अनुभव होता.
Monday, March 20, 2023
देहू ते आळंदी सायकलवारी
Sunday, March 19, 2023
डिस्ने इमॅजियनीयरिंग
डिस्ने कंपनीने नुकताच हा रोबो अनावरण केला आहे! 🤯
जर तुम्हाला विश्वास नसेल की, मानवांना एक दिवस रोबोट साथीदार असतील, तर ही ९० सेकंदाची क्लिप खरोखर पाहण्यासारखी आहे.
व्हिडिओ मध्ये ०१:०६ या वेळी प्रेक्षकांच्या तात्काळ भावनिक प्रतिक्रियेकडे विशेष लक्ष द्या..
"डिस्ने इमॅजियनीयरिंग" मधील सर्जनशील प्रवर्तकांनी तयार केलेला हा अत्याधुनिक प्रोटोटाइप विशेषतः लोकांशी भावनिक संबंध निर्माण करण्यासाठी डिझाइन केलेला आहे.
रोबोटिक्स क्षेत्रामध्ये अजूनही अगदी सुरुवातीचे दिवस आहेत, परंतु प्रगतीचा वेग खरोखरच मनाला आनंद देणारा आहे… क्षितिजावर अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि पुढे आकर्षक भविष्य.
Tuesday, March 7, 2023
पिंपळ
वयाच्या मावळतीकडे झुकलेल्या एका वृद्ध 'युवका'ची ही गोष्ट आहे. हे गृहस्थ रिटायरमेंटनंतर आपले आयुष्य एकांतामध्ये घालवत आहेत. त्यांची पत्नी अनेक वर्षांपूर्वी त्यांना सोडून गेली आहे आणि सर्व मुले आता अमेरिकेमध्ये स्थायिक झालेली आहेत. त्यांचा आणि त्यांच्या नातवांचा संवाद केवळ व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होतो आहे. त्यातच ते समाधान मानत आपले दैनंदिन आयुष्य सुखाने आणि आनंदाने जगत आहेत. परंतु त्यातही आपले सगळे सोयरे जवळ नसल्याची सल आहेच.
त्यांची काळजी घेणारी भारतातील एक डॉक्टर युवती आहे. ती त्यांची सख्खी मैत्रीण देखील आहे. शिवाय सोबतीला त्यांचा स्वयंपाकी व मदतनीस तुकाराम देखील आहे. आजोबा दररोज रात्री व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपल्या नातवांशी आणि मुलांशी गप्पा मारत असतात. परंतु प्रत्यक्ष स्पर्शामध्ये असणारा ओलावा या इ-संवादामध्ये दिसून येत नाही. एके दिवशी घडलेल्या एका प्रसंगामुळे सर्वजण त्यांना अमेरिकेमध्ये येण्याची विनंती करतात. परंतु त्यांची इच्छा नसते. याच मातीमध्ये आपण विलीन व्हावे, असे त्यांना वाटत असते. पण मुलांच्या आणि नातवांच्या हट्ट पुढे त्यांचे काही चालत नाही आणि ते निर्णय घेतात. तो चित्रपटामध्ये पाहण्यासारखा आहे.
गजेंद्र अहिरे दिग्दर्शित या चित्रपटात आजोबांची मध्यवर्ती भूमिका दिलीप प्रभावळकर यांनी केली आहे. तसेच सोबतीला प्रिया बापट आणि किशोर कदम देखील दिसून येतात. चित्रपटाची मांडणी तशी फारच उत्तम. शिवाय भावभावनांचे चित्रण देखील उत्तम जमून आले आहे. चित्रपटाच्या अखेरीस कित्येक वर्षे उभा असलेला हा 'पिंपळ' नेमका कोणत्या दिशेने जातो हे पाहणे औत्सुक्याचे ठरते.