गावाबाहेर एका विस्तीर्ण, निर्जन मोकळ्या जागेत ही समाधी विदारक आणि उपेक्षित अवस्थेत उभी होती. तिची रचना एखाद्या मुस्लिम पद्धतीच्या दर्ग्यासारखी भासत होती. आजूबाजूला सामसूम होती. समाधीवर चुन्याचे काही ताजे तर काही जुने लेप लावल्याचे दिसत होते. समोरच दिवा लावण्यासाठी केलेली एक छोटी जागा होती, ज्यावरून कोणीतरी तिथे नियमितपणे नतमस्तक होत असावे, याची जाणीव झाली. पण दुर्दैवाने, या थोर योद्ध्याच्या समाधीचा इतिहास सांगणारा साधा एक फलकही तिथे नव्हता आणि माहिती देणारे आजूबाजूला कोणीही नव्हते.
या वास्तूविषयी कोणाला विचारावे, असा प्रश्न पडलेला असतानाच, थोड्या वेळाने एका दुचाकीवरून लुंगी नेसलेले एक गृहस्थ तिथे आले. फोनवर बोलत असलेले ते गृहस्थ आमची चुळबूळ पाहून आमच्याजवळ आले. त्यांनी अत्यंत हसतमुख चेहऱ्याने आणि नमस्कार करून आमचे स्वागत केले. आमची भाषा मराठी आणि त्यांची कन्नड; त्यामुळे संवादाचा मोठा प्रश्न उभा राहिला. पण खाणाखुणा आणि काही तुटक शब्दांच्या आधारे आमचा संवाद सुरू झाला. 'नागराज' असे त्यांचे नाव आणि तेच या आजूबाजूच्या विस्तीर्ण जागेचे मालक असल्याचे आम्हाला समजले. आम्ही थेट पुण्याहून, महाराजांच्या भूमीतून आलो आहोत, याचे त्यांना मोठे अप्रूप वाटले. त्यांनी आत्मीयतेने आमचा फोन नंबर लिहून घेतला.
भाषेच्या अडचणीमुळे फारशी माहिती मिळत नाही, हे पाहून आम्ही पुढच्या प्रवासाला निघण्याचा निर्णय घेतला. पण आम्ही गाडी सुरू करून दोन मिनिटेही झाली नसतील, तोच नागराज यांचा फोन आला. त्यांनी गावातील काही जाणकार मंडळींना मुद्दाम बोलावून घेतले होते. त्यांच्या या आपुलकीमुळे आम्ही तात्काळ गाडी पुन्हा मागे फिरवली.
तिथे पोहोचल्यावर नागराज यांनी बोलावलेल्या 'शरणप्पा सज्जन' या स्थानिक जाणकाराशी आमची भेट झाली. त्यांनी ही समाधी संभाजी महाराजांचीच असल्याच्या वृत्ताला ठाम दुजोरा दिला. मात्र, त्यांच्या बोलण्यातून एक खंतही जाणवली. "लहानपणापासून आम्ही ही समाधी याच अवस्थेत पाहत आलो आहोत, यात कोणताही बदल झालेला नाही," असे ते म्हणाले.
अधिक माहिती जाणून घेण्याच्या आमच्या इच्छेला अय्यानगौडा यांनी सविस्तर उत्तरे दिली. पूर्वी या समाधीवर एक सुंदर संरक्षक छप्पर होते, पण निजामाच्या काळात या वास्तूची मोठी नासधूस झाली. त्यानंतरच्या काळात ही वास्तू विविध स्थानिक आणि कायदेशीर वादांमध्ये अडकली. प्रकरण पोलीस दरबारी गेल्यामुळे समाधीच्या जीर्णोद्धाराचे काम कायमचे रखडले. काही वर्षांपूर्वी या समाधीच्या विकासासाठी मोठा निधी मंजूर झाला होता, पण लाल फितीच्या कारभारामुळे प्रत्यक्ष एकही वीट रचली गेली नाही.
स्थानिक गावकऱ्यांच्या मनात मात्र एक मोठी आशा आहे. जर या समाधीचा भव्य जीर्णोद्धार झाला, तर कणकगिरी गावाचे नाव भारताच्या नकाशावर मानाने झळकेल, असा त्यांना विश्वास आहे. यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडे अधिकृत प्रस्ताव पाठवावा, तरच यावर वेगाने काम होऊ शकते, अशी त्यांची प्रामाणिक अपेक्षा आहे.
शिवकाळाचा विचार केल्यास, कणकगिरी हा त्याकाळी एक अत्यंत भक्कम आणि अभेद्य भुईकोट किल्ला होता. आजही गावात फिरताना या जुन्या तटबंदीचे जीर्ण अवशेष इतिहासाची साक्ष देत उभे असल्याचे पाहायला मिळते. आज मंदिरांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कणकगिरीत इतिहासाच्या या खाणाखुणा मात्र काळाच्या पडद्याआड हरवत चालल्या आहेत.
छत्रपती शिवरायांच्या या थोरल्या बंधूंकडे आपल्या इतिहासाने कायमच काहीसे दुर्लक्ष केले, ही एक मोठी शोकांतिका आहे. इतिहासाचे भीष्माचार्य वासुदेव सीताराम बेंद्रे यांचा अपवाद वगळता, इतर कोणत्याही इतिहासकाराने या थोर योद्ध्याच्या आयुष्यावर सखोल संशोधन केले नाही. परिणामी, त्यांचा पराक्रम आणि इतिहास आजही बहुतांश मराठी जनांसाठी अपरिचितच राहिला आहे. कदाचित याच अज्ञानामुळे त्यांची समाधी आज अशी दुर्लक्षित अवस्थेत आहे.
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'राजा शिवाजी' या रितेश देशमुख यांच्या चित्रपटामुळे शिवरायांचे थोरले बंधू किती कर्तृत्ववान होते, हा इतिहास प्रकर्षाने महाराष्ट्रासमोर येत आहे. यातून निश्चितच जनजागृती होईल. पण आता केवळ इतिहासाचे स्मरण करून चालणार नाही, तर या उपेक्षित स्मारकाच्या पुनर्बांधणीची नितांत आवश्यकता आहे.
यासाठी प्रबळ राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. कोणतेही भाषिक किंवा सीमावाद न आणता, प्रशासनाने योग्य ती पावले टाकली, तरच कर्नाटकातील या समाधीचा जीर्णोद्धार होऊ शकेल. हे कार्य पूर्णत्वास गेल्यास, भविष्यात हे स्मारक केवळ इतिहासाची साक्षच देणार नाही, तर येणाऱ्या प्रत्येक पिढीसाठी एक महान प्रेरणास्थान म्हणून दिमाखात उभे राहील!
--- तुषार भ. कुटे
#Marathi #ChhatrapatiShivaji #RajaShivaji #SambhajiMaharaj #ShivajiMaharaj #History #Kanakgiri #Karnatak #Maratha



.jpg)









