Friday, June 30, 2023

व्हॅनिला स्ट्रॉबेरी आणि चॉकलेट

माथेरान म्हणजे महाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांपैकी एक आणि पर्यटकांचा ओघ असलेले डोंगरावरील एक गाव होय. याच गावाची पार्श्वभूमी या चित्रपटाला लाभलेली आहे. माथेरानमधील शाळेमध्ये जाणारी तेजू अर्थात तेजश्री ही पंधरा-सोळा वर्षांची मुलगी. तिच्या शाळेमध्ये व्हॅनिला नावाची एक कुत्री आहे. तिचे तिच्यावर जीवापाड प्रेम आहे. परंतु घरी आवडत नसल्याने ती व्हॅनिलाला घरी आणू शकत नाही. पण या दोघींचे एकमेकांवरील प्रेम पूर्ण शाळेला किंबहुना पूर्ण माथेरानला ठाऊक आहे.
एक दिवस भटकी कुत्री पकडण्यासाठी तालुक्याहून माणसे गावामध्ये येतात. त्यामुळे तेजूला व्हॅनिलाला घरी आणावे लागते. अशातच तेजूची मोठी बहीण देखील गरोदरपणासाठी माहेरी आलेली असते. वडिलांची इच्छा नसताना देखील व्हॅनिलाला काही दिवस घरी ठेवले जाते. नंतर सर्वांनाच तिचा लळा लागतो. व्हॅनिला देखील गरोदर असल्याचे लक्षात येते. परंतु एक दिवस अचानक व्हॅनिला गायब होते. तिच्या शोधासाठी सर्वजण पूर्ण माथेरान पालथे घालतात. पण त्यांच्या हाती फारसे काही लागत नाही. अखेरीस ती त्यांच्या घराशेजारीच जखमी अवस्थेत सापडते आणि तिने पिलांना देखील जन्म दिलेला असतो. त्याच रात्री तिच्या मोठ्या बहिणीचे देखील बाळंतपण होते.
अशी या चित्रपटाची कथा आहे. काही वेगळ्या धाटणीचे नाव दिल्यामुळे या चित्रपटात नक्की काय असावे, याची उत्सुकता होती. या उत्सुकतेतूनच हा चित्रपट पाहिला. तसं पाहिलं तर हा एक 'बालपट' आहे. मुलांचे प्राणी प्रेम यातून दाखविण्याचा दिग्दर्शकाचा हा प्रयत्न दिसतो. कदाचित त्याला सत्य घटनेची देखील पार्श्वभूमी असावी. म्हणूनच माथेरान सारख्या ठिकाणी या चित्रपटाचे चित्रीकरण झालेले आहे. तसेही चित्रीकरण दुसरीकडे कुठे केले असते तरी कथानकामध्ये फारसा फरक पडला नसता. बालकांचे भावविश्व उलगडून दाखविण्याचा दिग्दर्शकाचा प्रयत्न मात्र या चित्रपटातून दिसून आला. व्हॅनिला हे नाव ठीक आहे पण स्ट्रॉबेरी आणि चॉकलेट कुठून आले? याचा उलगडा मात्र शेवटच्या प्रसंगांमध्येच होतो. 



Saturday, June 24, 2023

पानिपतचा संग्राम

#पुस्तक_परीक्षण
#इतिहास
#सेतुमाधवराव_पगडी
मराठे आणि अब्दाली त्यांच्यामध्ये लढले गेलेले पानिपतचे तिसरे युद्ध म्हणजे मराठा साम्राज्याच्या भाळावरील भळभळती जखम होय. मराठ्यांच्या इतिहासामध्ये या ऐतिहासिक युद्धाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या युद्धाची मीमांसा करत असताना समकालीन साधनांचा आधार घ्यावा लागतो. तत्कालीन उपलब्ध असलेल्या अनेक मराठी तसेच फारसी साधनांमधून पानिपतच्या संग्रामामध्ये नक्की कोणत्या घटना कशा पद्धतीने घडल्या होत्या, याची माहिती मिळवता येते. ही मराठी आणि फारसी साधने पानिपतमध्ये घडलेल्या घटनांचे विस्तृतपणे वर्णन करतात. याद्वारे तत्कालीन युद्धाची परिस्थिती तसेच रणनीती आपल्याला ध्यानात यायला मदत होते.
अशाच मराठी आणि फारसी साधनांचा समावेश सेतू माधवराव पगडी यांनी प्रस्तुत ग्रंथामध्ये केला आहे. मराठी साधनांमध्ये प्रामुख्याने कुंजपुरा आणि पानिपतची पत्रे समाविष्ट आहेत. तर फारसी साधनांमध्ये तत्कालीन लिहिल्या गेलेल्या अनेक ग्रंथांचा व साधनांचा सहज व सुलभ मराठी अनुवाद पगडी यांनी या ग्रंथामध्ये दिलेला आहे. यातून पानिपतच्या रणांगणावर घडलेल्या घटनांची इत्यंभूत माहिती होऊन मराठ्यांच्या शौर्याची परंपरा सर्वसामान्य वाचकांना अभ्यासता येते.



आरॉन

कोकणातल्या एका छोट्या गावामध्ये राहणारा मुलगा म्हणजे बाबू. आपल्या काका आणि काकीसोबत तो राहत आहे. लहान असतानाच त्याची आई त्याला सोडून परदेशामध्ये अर्थात फ्रान्सला निघून गेलेली आहे. त्याच्या आईचा त्याच्यावर आणि त्याचा देखील आईवर खूप जीव आहे. परंतु ते भेटत असतात फक्त पत्रांमधून. पत्रांद्वारे होणारा हा संवाद मायेचा ओलावा टिकवून ठेवत असतो. कालांतराने हा पत्रसंवाद देखील कमी कमी होत जातो. बाबूवर जितके त्याच्या आईचे प्रेम असते तितकेच काका आणि काकीचे देखील असते. त्यांना मुल नसते. कदाचित याच कारणास्तव बाबूवर ते मुलाप्रमाणेच प्रेम करत असतात.
आपल्या वहिनीला वचन दिल्याप्रमाणे बाबूचे काका त्याला दहावीची परीक्षा झाल्यानंतर त्याच्या आईकडे सोडण्यासाठी निघतात. ही गोष्ट अपरिहार्यच असते. त्याच्या काकीला देखील त्याचा सहवास सोडवत नाही. पण तरीदेखील दोघेही फ्रान्सला जाण्यासाठी निघतात. प्रत्यक्ष पॅरिसमध्ये पोहोचल्यानंतर त्यांना असे समजते की बाबूची आई सध्या तिथे राहत नाही. तिचा कुठेच पत्ता नसतो. मग इथून सुरू होतो तिला परदेशामध्ये शोधण्याचा प्रवास. फ्रान्ससारख्या अनोळखी देशामध्ये दोघेही तिथल्या अन्य दोन अनोळखी लोकांना घेऊन बाबूच्या आईला शोधायला निघतात. त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शिवाय छोट्या छोट्या घटनांमधून ते पुढचा मार्ग शोधत जातात.
चित्रपटाचे कथानक तसे साधे आणि सरळ आहे. पण मूळ कथा ही भावभावनांच्या खेळाभोवती गुंफल्याचे दिसते. चित्रपटाच्या अखेरीस बाबूला त्याची आई मिळते का आणि मिळाली जरी तरी तो तिच्यासोबत राहतो का या प्रश्नांची उत्तरे मिळतात.


 

Sunday, June 18, 2023

फेसबुक नावाचा व्हायरस

लोकसंख्येनुसार भारत जरी जगातील पहिल्या क्रमांकाचा देश असला तरी इंटरनेट वापरकर्त्यांचा विचार केला तर फेसबुक हा जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश ठरेल. आज जगभरातील २११ कोटी लोक फेसबुकचा वापर करतात. भारताचा विचार केला तर भारतात ३१ कोटी सक्रिय फेसबुक सदस्य आहेत. 'सक्रिय'चा अर्थ असा की ते दररोज एकदा तरी फेसबुक उघडून पाहतात. म्हणजेच अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचायचे असल्यास फेसबुक हे सर्वात प्रभावी माध्यम आहे. परंतु हेच लोकभावना बिघडवण्यासाठी वापरण्यात येणारे सर्वात मोठे माध्यम देखील आहे. 



फेसबुकच्या रिकमंडेशन सिस्टीम अल्गोरिदमनुसार आपण ज्या प्रकारच्या पोस्टवर अधिक काळ राहतो किंवा त्यावर क्लिक करतो, तशाच प्रकारच्या पोस्ट आपल्याला सातत्याने आणि वेगाने दिसायला लागतात. यातून मतपरिवर्तन होण्यास देखील मदत होते. फेसबुकचा हा सर्वाधिक विषारी अल्गोरिदम आहे. याद्वारे लोक अधिकाधिक आपला वेळ फेसबुकवर खर्च करतात. त्यामुळे फेसबुकला मोठ्या प्रमाणात पैसा मिळतो. परंतु यातून लोकांची मने देखील दूषित होण्याचा मोठा संभव असतो. खरंतर ही संभाव्यता नाही, ही वस्तुस्थिती आहे! फेसबुकमध्ये अर्थात मेटा कंपनीमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने याबाबतीत गौप्यस्फोट देखील केला आहे. मागील काही वर्षांपासून सोशल मीडियाचा वापर वाढल्यानंतरच भारतीय समाजामध्ये विषारी वातावरण तयार झाल्याचे दिसते. यात फेसबुकसारख्या माध्यमांचा सर्वात मोठा वाटा आहे. या माध्यमाद्वारे कोणतीही माहिती चुटकीसरशी पूर्ण जगभरामध्ये पोहोचते. ती खरी आहे ती खोटी याची शहानिशा देखील केली जात नाही. याच कारणास्तव सामाजिक सौहार्द आणि शांतता यांना निश्चितच धोका पोहोचला जात आहे. आधुनिक इंटरनेटवर वेगाने पसरलेला हा एक प्रकारचा धोकादायक व्हायरस म्हणता येईल. अजूनही सर्वसामान्य इंटरनेट वापरकर्त्यांना याविषयी निश्चित माहिती नाही. म्हणूनच लोक फेसबुकच्या अनिर्बंध वापराला बळी पडल्याचे दिसतात. राजकीय लोकदेखील याचा गैरफायदा करून घेत आहेत. आज आपण साक्षर तर झालो आहोत परंतु अजूनही 'इंटरनेट साक्षर' झालेलो नाही, असं दिसतं. कदाचित दुष्परिणाम वाढत गेल्यानंतर शहाणपण येऊ शकतं. परंतु त्यासाठी बराच काळ जावा लागेल.

- तुषार भ. कुटे.

Friday, June 9, 2023

ड्रीम मॉल

सई नावाची एक स्त्रीवादी विचारांची मुलगी आहे. एका फिल्म प्रोड्युसरकडे ती सध्या काम करत आहे. त्याचे कार्यालय 'ड्रीम मॉल' नावाच्या एका मोठ्या मॉलमध्ये स्थित आहे. सध्या ते एका हॉरर चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम करत आहेत. बऱ्याचदा घरी जाण्यासाठी तिला आणि तिचा सहकारी सचिन याला उशीर होत असतो. त्या दिवशी देखील त्यांना असाच उशीर झालेला असतो. मॉलमधील सर्वच दुकाने बंद झालेली असतात. त्यांना सुरक्षा अधिकाऱ्याकडून बाहेर जाण्याकरता फोनही येतो. ते बाहेर जायला निघतात परंतु काही विचित्र घटना घडायला सुरुवात होते. सई पार्किंग मध्ये आल्यानंतर तिची भेट याच मॉलमधील सिक्युरिटी गार्डशी होते. त्याचं तिच्यावर अनेक दिवसांपासून प्रेम असतं. तिच्या पायी तो ठार वेडा झालेला असतो! यातून सुरू होते एक जीवघेणी पळापळ आणि झटापट!
मॉल बंद झालेला असतो. एकही दुकान उघडे नसते आणि त्यामध्ये या दोघांचा पाठशिवणीचा खेळ चालू असतो.
सईची भूमिका नेहा जोशी तर सेक्युरिटी गार्डची भूमिका सिद्धार्थ जाधव याने साकारलेली आहे. पूर्ण चित्रपटात सिद्धार्थ जाधव पहिल्यांदाच नकारात्मक भूमिकेमध्ये दिसून आलेला आहे. चित्रपटाच्या कथानकात तसं पाहिलं तर फारसा दम नाही. दोन्ही कलाकारांचा अभिनय सोडला तर चित्रपटाला फारसे गुण देता येणार नाहीत. सिद्धार्थला केवळ नकारात्मक भूमिकेमध्ये पाहायचे होते, म्हणून हा चित्रपट पाहिला. सध्या तरी पन्नास टक्के गुण देता येतील. अजूनही मराठी रहस्यपट वेगाने प्रगती करू शकतील... याला बराच वाव आहे, असे दिसते.