Friday, December 30, 2022

काळजुगारी - ऋषिकेश गुप्ते

ही आहे अट्टल जुगारी असणाऱ्या चंदू जुगाऱ्याच्या मुलाची अर्थात काली जुगारी याच्या प्रवासाची गोष्ट. जुगारामध्ये सर्वच गोष्टी अनपेक्षित असतात. अनेकदा नशिबाची साथ लागते. म्हणूनच निकाल माहित असून देखील फासे टाकणाऱ्याला प्रत्येक क्षेत्रात जुगारी म्हटले जाते.
या कथेचा नायक हा एक सर्वसामान्य मुलगा आहे. ज्याची आई अनेक वर्षांपूर्वी घरातून पळून गेलेली आहे आणि बापाने लहानपणापासूनच त्याला 'काळजुगारी' व्हायचय, असं मनामध्ये ठसवायला सुरुवात केली आहे. पण 'काळजुगारी' व्हायचं म्हणजे नक्की काय? हे त्यालाही अजून उमजलेले नाही. त्याच्या बापाने देखील त्याला काही सांगितलेले नाही. तो अनेकदा अनाकलनीय प्रसंगातून जातो. नक्की काय चाललंय, कशासाठी चाललय? याचा उलगडा त्याला होत नाही. परंतु जसजसा काळ पुढे सरकत जातो तसतसे जुगारी आणि 'काळजुगारी' म्हणजे काय, याची माहिती त्याला होत जाते. त्याचा बाप एक अट्टल जुगारी होता आणि त्याचं काळजुगारी होण्याचं स्वप्न होतं. पण ते पूर्ण झाले नाही. म्हणूनच आपल्या मुलाने आपला वारसा पुढे चालवावा व काळजुगारी होण्यासाठी आयुष्य पणाला लावावं, अशी त्याची इच्छा होती.
काली जुगारीचा एका सामान्य मुलापासून काळजुगारी होण्यापर्यंतचा प्रवास लेखक ऋषिकेश गुप्ते यांनी थरारकरित्या या लघुकादंबरीमध्ये चितारला आहे. ही एक विस्मय कथा आहे. वाचायला सुरुवात केल्यावर आपण तिच्यामध्ये पूर्णतः गुंतून जातो. एकंदरीत कथेचं चित्र आपल्यासमोर उभं राहतं. सर्व गोष्टी काल्पनिक असल्या तरी खऱ्याखुऱ्या वाटायला लागतात. यातच या विस्मय-कादंबरीचं आणि लेखकाचंही खरं यश आहे. 



Thursday, December 29, 2022

मराठी चित्रपट आणि आयएमडीबी

आयएमडीबी अर्थात 'इंटरनेट मूवी डेटाबेस' म्हणजे जगभरातील सर्व प्रकारच्या सर्व भाषांतील तयार झालेल्या चित्रपटांचा परिपूर्ण शब्दकोश होय! चित्रपटांसंबंधित सर्व प्रकारची माहिती आपल्याला आयएमडीबीच्या संकेतस्थळावर मिळते. शिवाय विविध चित्रपटांना आपण परीक्षण आणि रेटिंग देखील देऊ शकतो. आयएमडीबीवर दर्दी परीक्षक आणि प्रेक्षक आपला अभिप्राय देत असतात. त्यामुळेच इथे दिलेले रेटिंग हे विश्वासार्ह मानण्यात येते. आज सदर संकेतस्थळ तुम्ही उघडून पाहिले तर बहुतांश इंग्रजी चित्रपटांना लाखांमध्ये प्रेक्षकांनी रेटिंग दिले आहे. तसेच बहुतांश बॉलीवूड आणि दक्षिण भारतीय चित्रपटांची रेटिंग देखील दहा हजारांच्या पटीमध्ये प्रेक्षकांनी दिले आहे.
अनेकदा अन्य भाषेतील चित्रपट पाहायचा असेल तर प्रेक्षक आयएमडीबीवरील रेटिंग तपासून पाहतात. त्यावरूनच हा चित्रपट कसा असेल, याचा अंदाज येतो. मागील काही वर्षांपासून मराठी भाषेमध्ये देखील मोठ्या प्रमाणात दर्जेदार चित्रपट निर्मिती होताना दिसत आहे. हे चित्रपट महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी चालतात. परंतु त्यांनी अजूनही मराठी देशाची सीमारेषा ओलांडलेली नाही, असे दिसते. याचे कारण आयएमडीबीचे रेटिंग आहे, असे वाटते.
मराठी प्रेक्षकांनी अजूनही आपल्या भाषेतील दर्जेदार चित्रपटांना बहुसंख्येने रेटिंग आणि अभिप्राय दिलेला नाही. त्यामुळे अन्य भाषेतील प्रेक्षक मराठी चित्रपट जास्त पाहत नाहीत. मराठी लोक मात्र सर्व भाषेतील चित्रपट पाहतात. जर आपल्याला आपल्या चित्रपट इंग्लिश सब-टायटल सह अन्य भागांमध्ये पोहोचवायचे असतील तर अधिकाधिक मराठी प्रेक्षकांनी आपल्या भाषेतील चित्रपटांना आयएमडीबीवर रेटिंग देण्याची नितांत आवश्यकता आहे. जेणेकरून आपल्या कलाकृती सातासमुद्रापार देशातील लोक देखील पाहतील आणि त्यामध्ये त्यांच्या अभिप्रायाचा देखील समावेश होऊ शकेल.


 

Saturday, December 24, 2022

काळे शहर

मंगोलियाच्या पश्चिमेकडील गोबी वाळवंटाच्या मध्यभागी एकेकाळी एक समृद्ध राज्य उभे होते. ते धार्मिक शिक्षणाचे, कलेचे केंद्र आणि व्यापाराचे केंद्र होते.
अनेक मंगोलियन पौराणिक कथांपैकी एका कथेनुसार देवतांच्या पहिल्या वंशजांनी खारा-खोटो हे एक सुंदर आणि समृद्ध शहर वसवले, ज्यामध्ये ऋषी, व्यापारी, शूर सैनिक आणि कुशल कारागीर राहत होते.
खारा-खोतो म्हणजे "काळे शहर"! हा सिल्क रोडवरील मध्ययुगीन टंगुट किल्ला होता, जो १०३२ मध्ये जुयान लेक बेसिनजवळ बांधला गेला होता.
त्याच्या अवशेषांचे निरीक्षण केल्यास ९.१ मीटर-उंचीची तटबंदी आणि ३.७ मीटर-जाड बाह्य भिंती दिसून येतात. ११ व्या शतकात ते पश्चिम झिया व्यापाराचे केंद्र बनले.
द ट्रॅव्हल्स ऑफ मार्को पोलोमध्ये मार्को पोलोने खारा-खोटो या नावाने ओळखल्या जाणाऱ्या एट्झिना किंवा एडझिना नावाच्या शहराच्या भेटीचे वर्णन केले आहे.
हा तटबंदीचा किल्ला १२२६ मध्ये चंगेज खानने प्रथम घेतला होता. त्यानंतर मंगोलांची अंतर्गत भरभराट होत राहिली आणि कुबलाई खानच्या काळात त्याचा विस्तार झाला. सन १३७२ नंतर ते सोडण्यात आले.


 

ज्ञानाची किंमत

झिम्बाब्वेमध्ये एका दरोड्यादरम्यान बँक दरोडेखोर बँकेतील सर्वांना ओरडून म्हणाले: "हलू नका. पैसे देशाचे आहेत. पण जीव तुमचा आहे."

बँकेतील सर्वजण शांतपणे खाली पडले. याला म्हणतात "माइंड चेंजिंग कन्सेप्ट"... परंपरागत विचार पद्धती बदलणे.

जेव्हा एक महिला प्रक्षोभकपणे टेबलावर पडली, तेव्हा दरोडेखोर तिच्यावर ओरडले: "कृपया सभ्यपणे वागा! हा एक दरोडा आहे, बलात्कार नाही!"

याला म्हणतात "व्यावसायिक असणे". फक्त तुम्ही काय करण्यासाठी प्रशिक्षित आहात? यावर लक्ष केंद्रित करा!

जेव्हा बँक दरोडेखोर घरी परतले, तेव्हा धाकटा दरोडेखोर (एमबीए प्रशिक्षित) मोठ्या दरोडेखोराला म्हणाला, "चल आपल्याला किती मिळाले ते मोजू."

यावर मोठा दरोडेखोर म्हणाला: "तू खूप मूर्ख आहेस. इतका पैसा आहे की मोजायला खूप वेळ लागेल. आज रात्री, टीव्हीवरील बातम्या सांगतील की आम्ही बँकेतून किती लुटले!"

याला "अनुभव" म्हणतात. आजकाल कागदी पात्रतेपेक्षा अनुभव महत्त्वाचा!

दरोडेखोर निघून गेल्यानंतर बँक मॅनेजरने बँक सुपरवायझरला त्वरीत पोलिसांना बोलवा असे सांगितले. पण सुपरवायझर त्याला म्हणाले: "थांबा! आपण स्वतःसाठी बँकेतून १ कोटी काढू आणि ते ७ कोटीमध्ये जोडू जे आपण यापूर्वी बँकेतून गहाळ केले होते."

याला "प्रवाहासह पोहणे" असे म्हणतात. प्रतिकूल परिस्थितीला आपल्या फायद्यासाठी रूपांतरित करणे!

सुपरवायझर म्हणाला, "दर महिन्याला दरोडा पडला तर चांगले होईल." याला "किलिंग बोरडम" म्हणतात. तुमच्या नोकरीपेक्षा वैयक्तिक आनंद महत्त्वाचा आहे.

दुसर्‍या दिवशी, टीव्हीच्या बातम्यांमध्ये सांगण्यात आले की, बँकेतून १० कोटी चोरले गेलेत!

दरोडेखोरांनी पैसे मोजले.. मोजले... मोजले, परंतु त्यांना फक्त दोन कोटींच मिळाले होते. दरोडेखोर खूप संतापले, "आम्ही आमचा जीव धोक्यात घालून फक्त २ कोटी चोरले. बँक मॅनेजरने ८ कोटींवर डल्ला मारला. चोर होण्यापेक्षा शिक्षित असणे चांगले आहे, असे दिसते!"

याला म्हणतात "ज्ञानाची किंमत सोन्याइतकी आहे!"

त्या दिवशी बँक मॅनेजर आणि सुपरवायझर सगळे हसत हसत आनंदात होते!!

(संकलित)


 

Sunday, December 18, 2022

अमेरिकन राष्ट्रपतींना पुरून उरलेला झुंजार क्रांतीकारी

सुमारे वीस वर्षांपूर्वी एका प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये आम्हाला प्रश्न आला होता की, सर्वाधिक काळ राज्य करणारा राज्यकर्ता कोण? याचे उत्तर म्हणजे 'फिडेल कॅस्ट्रो' यांचे नाव मी पहिल्यांदाच ऐकलं. तेव्हापासूनच कॅस्ट्रो बद्दलची उत्सुकता मनामध्ये तयार झाली होती. आज अनेक वर्षांनी त्यांच्यावर लिहिलं गेलेलं हे पुस्तक वाचायला मिळालं आणि एका अद्भुत व्यक्तिमत्त्वाचा परिचय झाला. या पुस्तकाच्या शीर्षकामध्येच "अमेरिकन राष्ट्रपतींना पुरून उरलेला झुंजार क्रांतीकारी" असं लिहिलेलं आहे. यातूनच फिडेल कॅस्ट्रो या नावाची महती प्रकट होते. 


क्युबा हा सुमारे एक कोटी लोकसंख्या असलेला आणि जवळपास १०० चौ. किमी क्षेत्रफळाचा देश. परंतु तरीदेखील आपल्या जवळच असणाऱ्या अमेरिकेला फिडेल कॅस्ट्रोच्या मदतीने पाच दशके शह देण्याचे काम त्याने केले. अमेरिकेच्या विरोधात थेट भूमिका घेणाऱ्या लोकांचे आणि देशांचे काय झाले? हे इतिहासामध्ये आपण पाहिलेच आहे. परंतु फिडेल कॅस्ट्रो हा त्याला अपवाद होता. क्युबाच्या सहा दशकांहून अधिक काळ चाललेल्या संघर्षाचा कप्तान तो होता. एका क्रांतिकारकापासून क्युबाचा सर्वेसर्वा बनलेल्या कॅस्ट्रोची ही कहाणी खरोखर प्रेरणादायी अशीच आहे. त्याने सहा दशके क्युबावर केवळ राज्यच केले नाही तर अमेरिकेला नामोहरम केले आणि जगासमोर एका अद्वितीय संघर्षाचे उदाहरण देखील त्याने ठेवले. त्याला अनेकदा मारण्याचा प्रयत्न झाला. त्यातून तो अनेकदा सुदैवाने बचावला देखील. तरीसुद्धा त्याने आपल्या संघर्ष तसूभर देखील कमी केला नाही. त्याच्यातील हे गुणच त्याला इतिहासामध्ये अजरामर करून गेले. कॅस्ट्रोच्या कालखंडामध्ये जवळपास दहा अमेरिकी राष्ट्रपती होऊन गेले. प्रत्येकाचा दृष्टिकोन व नेतृत्वगुण निरनिराळे होते. त्या प्रत्येकाशी झालेल्या संघर्ष देखील वेगवेगळा होता. परंतु फिडेल कॅस्ट्रोने तो अतिशय चलाखीने हाताळण्याचे काम केले.
त्याचा आयुष्याचा प्रवास हा सर्वसामान्यांना आवाक करणार आहे आणि त्याची ही कथा अचंबित करणारी!

Sunday, December 11, 2022

चिनी ड्रायव्हर टेस्ट

मागील आठवड्यामध्ये ट्विटर वरील एका युजरने एक व्हिडिओ पोस्ट केला होता. चीनमध्ये ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी कोणत्या प्रकारची चाचणी घेतली जाते, हे या व्हिडिओ मधून दाखविण्यात आले होते. तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला अंदाज येईल की गाडी चालवण्यासाठी लागणारी सर्व कौशल्ये या चाचणीद्वारे कुणालाही तपासता येऊ शकतील. या व्हिडिओची बातमी देखील भारतातील सर्वच इंग्रजी वर्तमानपत्रांनी दिली होती! शिवाय तो चीनमधीलच आहे का याची खात्रीलायक माहिती मात्र कोणत्यात बातमीमध्ये दिलेली नाही.
तसं पाहिलं तर अशा प्रकारची चाचणी भारतामध्ये देखील घ्यायला हवी. परिवहन विभाग हा भ्रष्टाचारामध्ये अव्वल क्रमांकावर आहे. याच कारणास्तव मोठ्या प्रमाणात रस्ते अपघात आपल्या देशात होत असतात. गाडी व्यवस्थित चालवता येत नसली तरी देखील अनेकांजवळ वाहन चालविण्याचा परवाना असतो. शिवाय आपल्या इथे कौशल्यांपेक्षा कागदाला जास्त महत्व दिलं जातं. आठचा आकडा काढणारा कोणीही आपल्या इथे सहज ड्रायव्हर बनून जातो. यावर पुनर्विचार करणे निश्चितच गरजेचे आहे!


 

Friday, December 9, 2022

डॉ. संजय तलबार

"अलार्ड अभियांत्रिकी महाविद्यालय, मारुंजी" चे प्राचार्य डॉ. संजय तलबार म्हणजे एक दिलखुलास व्यक्तिमत्व. सहा वर्षांपूर्वी नांदेडच्या श्री. गुरु गोविंद सिंहजी तंत्रज्ञान संस्थेमध्ये ते कार्य करत असताना माझी त्यांच्याशी ओळख झाली. ते स्वतः इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये 'पीएचडी' आहेत. शिवाय अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली 'पीएचडी' देखील पूर्ण केली आहे. वेगळ्या शाखेचे प्राध्यापक असून देखील सरांना प्रोग्रामिंग मध्ये विशेष रुची आहे. ते सातत्याने नवीन गोष्टी शिकत असतात. म्हणूनच माझ्यासाठी ते प्रेरणास्थानी आहेत. पायथॉन प्रोग्रामिंगवर लिहिलेल्या माझ्या पहिल्या मराठी ई-पुस्तकासाठी सरांना अभिप्राय देण्यासाठी विनंती केली. तेव्हा त्यांनी लगेचच होकार कळविला आणि काही दिवसांमध्येच आपल्या अभिप्रायाचा व्हिडिओ बनवून देखील मला पाठविला. त्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये आम्ही या व्हिडिओचा समावेश केला होता. त्या त्यातीलच सारांशरुपी अभिप्राय पुस्तकाच्या प्रिंट आवृत्तीमध्ये देखील घेण्यात आलेला आहे. आज सरांना हे पुस्तक स्वहस्ते देताना होणारा आनंद अवर्णनीय होता. माझ्या नवनवीन कार्याला त्यांची त्यांचा सदैव पाठिंबा असतो. या भेटीत देखील त्यांनी दिलेल्या शुभेच्छा व सूचना बहुमूल्य अशा होत्या!


 

Thursday, December 8, 2022

एआय: द फायनल काउंटडाऊन

इतिहास साक्षीदार आहे की, या पृथ्वीवर एका वेळी केवळ एकाच शक्तिशाली प्राण्याने राज्य केले आहे! ज्याकाळी डायनासोरची या जगावर सत्ता चालू होती, त्या काळात मनुष्यप्राणी अस्तित्वात देखील नव्हता. कदाचित डायनोसॉरच्या विनाशानंतर ही पोकळी भरून काढण्यासाठी होमो सेपिअन्स अवतरले असावेत. मनुष्य प्राण्यांमध्ये देखील कमीत कमी सहा प्रजाती अस्तित्वात होत्या. पण त्यातील केवळ होमो सेपियन्स अर्थात हुशार मानव अर्थात आपण शिल्लक राहिलो आहोत! लाखो वर्षांपूर्वी होमो निअँडर्थल मानव नाहीसा झाला आणि राहिले केवळ होमो सेपियन्स.
एकविसाव्या शतकात मनुष्य स्वतःची नवीन प्रजाती निर्माण करू पाहत आहे, ती म्हणजे होमोनाइड रोबोट्स. आर्टिफिशियल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानाद्वारे मानवी बुद्धिमत्ता संगणकीय बुद्धिमत्तेमध्ये परावर्तित होताना दिसत आहे. याच कारणास्तव यंत्रे देखील मानवाच्या बुद्धिमत्तेची बरोबरी करायला चालली आहेत. त्यांचा सध्याचा वेग पाहता पुढील काही दशकांमध्येच हुबेहूब मानवासारखा यंत्रमानव तयार होईल, यात शंकाच नाही. एका अर्थाने मनुष्यप्राणी आणि यंत्र प्राणी अशा दोन प्राण्यांचे वर्चस्व पृथ्वीवर तयार होईल. परंतु दोघांमधून राज्य कोण करेल? अर्थात संगणकाद्वारे तयार झालेले यंत्र प्राणी निश्चितच आपल्यापुढे एक पाऊल टाकण्याचा प्रयत्न करतील आणि त्यांची यशस्वी होण्याची शक्यता ९९ टक्क्यांपेक्षा अधिक आहे! म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स लवकरच पृथ्वीवर राज्य करण्याची क्षमता राखून आहे, असं दिसून येतं. या सर्व प्रक्रियेचा उहापोह करणारा हा डॉक्युमेंटरीवजा चित्रपट म्हणजे "एआय: द फायनल काउंटडाऊन".
तसं पाहिलं तर ही एक बोधकथा आहे. या चलचित्रांमधून मनुष्याला बोध घेण्यासारखं बरंच काही आहे. नव्या तंत्रज्ञानामुळे आपण विनाशाकडे तर जात नाही ना? या प्रश्नाचे उत्तर तंत्रज्ञान विकसित करताना शोधण्याची नितांत गरज वाटते. शिवाय कोणतीही गोष्ट नियंत्रणाबाहेर जाऊ नये यासाठी योग्य काळजी घ्यायला हवी, हे देखील तितकेच महत्त्वाचे. तंत्रज्ञानाचा उपयोग मानवी जीवन सुकर आणि सुलभ करण्यासाठी होतो आहे. तरीही त्याच्या वापरातील धोके जर संपूर्ण मनुष्यजगताला विनाशाकडे नेणार असतील तर यावर निश्चितच सखोल विचार करणे गरजेचे आहे.
बाकी चलचित्र आणि त्यातील ॲनिमेशन्स हे उत्तमरीत्या बनवलेली आहेत. एकदा तरी नक्की पहाच!  

Ⓒ Ⓐ  तुषार भ. कुटे


 

पायथॉन प्रोग्रामिंगवर कार्यशाळा

नुकतीच पिंपरी चिंचवड तंत्रनिकेतन, पुणे येथे पायथॉन प्रोग्रामिंगवर कार्यशाळा घेतली. यामध्ये द्वितीय वर्ष माहिती तंत्रज्ञानाच्या मुलांनी सहभाग घेतला होता. संगणक प्रोग्रामिंग अनेकांना अतिशय अवघड वाटते. परंतु ती रंजकपणे शिकवल्यास त्यातील रुची वाढण्यास मदत होते. शिवाय कमी वयामध्ये आकलनक्षमता अतिशय उत्तम असते, याची प्रचिती या कार्यशाळेमध्ये आली. विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. तसेच त्यांच्या परीक्षणांवरून मलादेखील पुन्हा नव्या गोष्टी शिकविण्यासाठी ऊर्जा प्राप्त झाली. धन्यवाद!








 

Monday, December 5, 2022

मी, ती आणि चित्रपट

नाशिक मध्ये राहत असताना आम्ही दोघे अर्थात मी आणि आमची पत्नी नियमितपणे प्रत्येक मराठी चित्रपट बघायला जात असू. त्या काळामध्ये एकही मराठी चित्रपट आम्ही चुकवलेला नव्हता. सन २०१५ ची गोष्ट असेल. 'कट्टी-बट्टी' नावाचा मराठी चित्रपट नाशिकच्या सिटी सेंटर मॉल मधील चित्रपटगृहामध्ये लागला होता. सकाळचा खेळ असावा. चित्रपट सुरू होण्याच्या अगदी बरोबर वेळेमध्येच आम्ही चित्रपटगृहासमोर दाखल झालो. परंतु दरवाजा बंद होता. नंतर समजले की आज चित्रपट बघणारे आम्ही दोघेच जण आहोत! त्यामुळे कमीत कमी पाच तिकिटांची विक्री झाल्याशिवाय चित्रपटाचा शो चालू करता येणार नाही, असे आम्हाला सांगण्यात आले. आम्हाला उशीर झाला आहे की काय? अशी धाकधूक वाटत होती ती आता चित्रपट सुरू होईल की नाही? या काळजीमध्ये बदलली गेली. मग वाट पाहण्याशिवाय आमच्यासमोर कुठलाही पर्याय नव्हता.
आमचे नशीब चांगले होते. त्यामुळे आणखी तीन मुलींनी या चित्रपटाची तिकिटे खरेदी केली आणि शो चालू झाला! सर्वात शेवटच्या रांगेमध्ये मध्यभागी आमच्या खुर्च्या होत्या आणि आमच्या बरोबर समोरच्या रांगेमध्ये समोरच्याच खुर्च्यांमध्ये त्या तिघी बसलेल्या होत्या. चित्रपटाचे कथानक फारसे मनोरंजक असे नव्हते. त्यामुळे त्या तिघींची चलबिचल चाललेली आम्हाला दिसली. मध्यंतर झाले आणि त्या तिघीही चित्रपटगृहातून निघून गेल्या व परतल्या नाहीत. आता पूर्ण चित्रपटगृहांमध्ये केवळ आम्ही दोघेच उरलो होतो! त्या स्क्रीनची काळजी घेणारा कर्मचारी एकदा डोकावून बघून गेला. त्याने पाहिले की फक्त दोनच जण हा चित्रपट बघत आहेत. त्यानंतर पूर्ण चित्रपट संपेपर्यंत त्याने चार ते पाच वेळा तरी डोकावले असेल! आता हे दोघे देखील निघून जातील, मग शो थांबवता येईल. या आशेवर तो ये-जा करत होता. पण आम्हाला मात्र चित्रपट पूर्णपणे बघायचाच होता. पूर्ण चित्रपटगृहामध्ये आम्ही दोघे त्या चित्रपटाचा मनमुराद आनंद लुटत होतो. असा अनुभव पुन्हा घ्यायला मिळणार नाही, याची आम्हालाही खात्री होती. म्हणून पूर्णवेळ बसून आम्ही चित्रपट पहिला. तो संपल्यावर बाहेर पडत असताना त्या कर्मचाऱ्याला हास्य वदनाने नमस्कार केला आणि घरी आलो.


 

Saturday, December 3, 2022

एक भेट

मागील आठवड्यामध्ये जुन्नर मधील बेल्हे इथल्या समर्थ महाविद्यालयामध्ये पायथॉन प्रोग्रामिंगच्या व्याख्यानाच्या निमित्ताने जाणे झाले. समर्थ शैक्षणिक संकुलाचे विश्वस्त श्री. वल्लभ शेळके यांची देखील त्यादिवशी भेट झाली. खरंतर या औपचारिक भेटीचे अनौपचारिक संवादामध्ये कसे रूपांतर झाले, ते आम्हाला देखील समजले नाही. वल्लभ शेळके हे इतिहासाचे एक गाढे अभ्यासक होय. त्यांनी इतिहासामध्ये मास्टर्स पदवी देखील प्राप्त केली आहे, हे त्यादिवशी आम्हाला पहिल्यांदाच समजले. आम्ही देखील ऐतिहासिक पुस्तकांचे प्रकाशक आहोत, हे ऐकल्यावर त्यांचा आनंद द्विगुणित झाला. त्यांनी इतिहासातील विविध विषयांवर, ऐतिहासिक व्यक्तिरेखांवर आणि इतिहास संशोधकांवर आमच्याशी सखोल चर्चा केली. यातूनच त्यांच्या एकंदरीत अभ्यासू व्यक्तिमत्त्वाचा आम्हाला देखील अंदाज आला. शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापन मंडळातील सदस्य इतका अभ्यासू असू शकतो, याचे उदाहरण म्हणजे वल्लभ शेळके होत. वाचनाची आवड असलेल्या या व्यक्तिमत्वाला मी माझे पुस्तक दिले याचा मला देखील मनस्वी आनंद झाला. 

 

Friday, December 2, 2022

चंद्र आहे साक्षीला - देवेन्द्र पुनसे

या अनुवादित कथासंग्रहाची प्रस्तावना विशेष भावते. त्यात लिहिलेलं आहे की, जॉन शिवर म्हणतो "शॉर्ट स्टोरी इज डेड, लॉँग लिव्ह दि शॉर्ट स्टोरी". समकालीन जीवनाची अस्वस्थता, अगतिकता, अतिरेक यातून साऱ्यांचा वेध घेणारा हा अमेरिन कथाकार कथा या वाङ्मयाबद्दल असे उदात्तपणे आपले मत मांडतो. कथा मृत झाली आहे. कथा चिरायू होवो, असे विधान करताना तो कथा या वाङ्मय प्रकाराचे चिरंतन सार सांगून जातो. सत्य हे आहे की, या पृथ्वीवर राहणाऱ्या प्रत्येक मानवी जीवनाची स्वतःची एक कथा असते. पृथ्वीवर पहिला मानव अवतरला तो ही स्वतःची एक कथा घेऊनच. तेव्हा मानव व कथा यांचे नाते चिरंतन नाही अतूट आहे! कथा ही मानवाच्या जीवनातील प्राण आहे, असे म्हणणे जास्त संयुक्तिक ठरते. जगाचा प्रारंभ हीसुद्धा कथाच आहे. अगदी पाषाणयुगातील मानवापासून आजच्या महासंगणकीय युगापर्यंत कथा आपली सोबत करीत आहे.
या कथेला किंबहुना जागतिक कथेचे एक सारांशरुपी चित्रण करणारा हा छोटेखानी कथासंग्रह आहे. जागतिक साहित्यामध्ये कथा हा प्राचीन साहित्य प्रकार मानला जातो. पूर्वी कथाकथनाचा रूपात तो नांदत होता. आजचा कथालेखन हा त्यानंतरचा महत्त्वपूर्ण टप्पा. जगातील विविध देशांमधील प्रतिभासंपन्न कथाकारांच्या कथा या कथासंग्रहामध्ये लेखकाने एकवटविलेल्या आहेत. प्रत्येकाची शैली, रचना, मांडणी वेगवेगळी आहे. त्यातून सदर लेखकाच्या अन्य कथा कशा असतील, याची देखील प्रचिती येते. एडगर ॲलन पो, सर आर्थर कॉनन डायल, अंतोन चेखोव तसेच सत्यजित रे यांसारख्या जागतिक दर्जाच्या कथाकारांच्या कथा आपल्याला वाचायला मिळतात. शिवाय अर्नेस्ट हेमिंग्वे, थीन पे मियंत, गी द मोपांसा यांच्या विविध प्रकारच्या कथांचा समावेश या पुस्तकामध्ये केलेला आहे.
या पुस्तकातून शेरलॉक होम्सची कथा मी पहिल्यांदाच वाचली. शिवाय अंतोन चेखोव या रशियन कथा काराची कथा देखील पहिल्यांदाच वाचावयास मिळाली. जागतिक कथा विश्वामध्ये कोणत्या प्रकारचे विषय हाताळले जातात, याची प्रचिती या कथासंग्रहातून निश्चितच येते. त्यामुळे हे पुस्तक काही वाचनीय असे ठरते.


 

Thursday, December 1, 2022

ल्युसी: मेंदूच्या वापराची कहाणी

माणसाच्या मेंदूमध्ये कोट्यावधी न्यूरॉन असतात. याच न्यूरॉनचा वापर करून मानवाने इतर प्राण्यांपेक्षा अनेक पावले पुढची बुद्धिमत्ता प्राप्त केली आहे. प्रत्यक्षात मनुष्यप्राणी आपल्या मेंदूमधील किती टक्के न्यूरान्सचा वापर करतो? या प्रश्नाचे उत्तर जेव्हा शास्त्रज्ञांनी शोधले तेव्हा त्यांना समजले की आपण फार-फार तर दहा टक्के मेंदू आजवर वापरलेला आहे! जर आपण इतक्या कमी प्रमाणात मेंदू वापरलेला असेल आणि अन्य प्राणी जगताला हेवा वाटेल अशी प्रगती केली असेल तर जेव्हा १००% मेंदू वापरू त्यावेळेस काय होईल? याची कल्पना देखील करवत नाही. याच संकल्पनेवर आधारित असणारा हा हॉलीवुडपट म्हणजे "ल्युसी" होय.
ल्युसी ही एक सर्वसामान्य युवती आहे. चीनमधल्या एका शहरामध्ये ती काम करते. आपल्या प्रियकराने दिलेल्या धोक्यामुळे ती मोठ्या संकटात सापडते. त्यातून बाहेर येण्याचा ती जीवाच्या आकांताने प्रयत्न करत असते. परंतु याच घडामोडींमध्ये तिच्या शरीरात झालेल्या रासायनिक प्रक्रियेमुळे तिच्या मेंदूची क्षमता वाढायला सुरुवात होते. पहिल्यांदा २०% मग २८% नंतर ४०% नंतर ६०% कालांतराने ८० टक्के आणि अखेरीस ती आपल्या मेंदूचा शंभर टक्के वापर करते. या प्रत्येक टप्प्यामध्ये तिचा मेंदू कशा पद्धतीने काम करतो, किंबहुना ती तिच्या मेंदूचा कसा वापर करते? हे अतिशय रंजकपणे चित्रपटामध्ये दाखवलेले आहे.
जेव्हा मेंदू १००% कार्यरत होतो त्यावेळेची स्थिती काहीशी अनाकलनीय आहे. पण चित्रपट विज्ञानातील एक अद्भुतरंजकता आपल्याला दाखवून जातो. विशेष म्हणजे प्रत्येक टप्प्यागणिक तो खिळवून ठेवतो आणि खरोखरच असं झालं तर काय? या प्रश्नाचे उत्तर आपल्याला देत राहतो. काही विज्ञान रंजन मनाला सुखवणारे असतात. काही कल्पना प्रत्यक्षात येण्याजोग्या असतात पण कधी येतील याची खात्री नसते? त्यातीलच ही विज्ञान रंजक कल्पना होय.
भविष्यामध्ये कदाचित आपण देखील आपल्या मेंदूचा शंभर टक्के वापर करण्यास यशस्वी होऊ. त्यावेळेस कदाचित विश्वाची रहस्ये आपल्यासमोर खुली देखील होतील. ...बाकी स्कार्लेट जोहान्सनने ल्युसीची भूमिका अप्रतिम पार पाडली आहे!


 

Tuesday, November 22, 2022

उद्याचं बेट (बिग डायोमेड) आणि कालचं बेट (लिटल डायोमेड)

ही दोन्ही डायोमेड बेटे फक्त तीन मैलांच्या अंतरावर आहेत. परंतु मोठे बेट त्याच्या लहान शेजाऱ्यापेक्षा जवळजवळ एक दिवस पुढे आहे (२१ तास). कारण ही दोन्ही बेटे पॅसिफिक महासागरातून जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय तारखेच्या दोन वेगवेगळ्या बाजूला आहेत आणि एका कॅलेंडर दिवसाच्या दरम्यानची सीमा चिन्हांकित करतात. हे दोन्ही भूप्रदेश अलास्का आणि सायबेरिया दरम्यान बेरिंग सामुद्रधुनीमध्ये आहेत.
बिग डायोमेड रशियन बाजूला आहे तर लिटल डायोमेड अमेरिकेच्या बाजूला आहे. हिवाळ्यात दोन बेटांमध्‍ये तयार झालेला बर्फाचा पूल बेकायदेशीर असला तरी, त्‍यांच्‍यातील अंतर कमी करतो आणि 'वेळेचा प्रवास' अर्थात टाईम ट्रॅव्हलची अनुभूती देतो!

 



मनमाड-येवला रस्त्यावर

मागील एका घटनेमध्ये जसं मी सांगितलं होतं की कुणीही ट्राफिक पोलीस कर्मचारी वर्दीमध्ये समोर दिसला की तो आपल्याकडे आले आपले गिराईक अशा नजरेने पाहताना आम्हाला जाणवतो आणि त्याच्या तोंडातून गळत असलेली लाळ देखील दिसत असते. नाशिक जिल्ह्यातील किल्ले सर करून परत जात असताना घडलेला हा किस्सा देखील अशाच प्रकारचा आहे.
३१ डिसेंबर २०२१ हा दिवस होता. ३१ डिसेंबर म्हटलं की सगळीकडेच पोलिसांची गस्त असते. मनमाड शहरानजीक असलेल्या अंकाई-टंकाई किल्ल्यांचा ट्रेक करून आम्ही पुन्हा येवला शहराच्या दिशेने निघालो होतो. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गवरून अहमदनगर तसेच पुण्याकडे येणारा हा हमरस्ता आहे. म्हणूनच या रस्त्यावर मोठमोठ्या मालवाहू गाड्यांची सातत्याने वर्दळ असते. अनकाई किल्ल्याकडून येवला शहराकडे येताना अशीच भली मोठी गर्दी या रस्त्यावर झाली होती. साधारणतः सहा ते सात किलोमीटर अंतरावर ट्राफिक पोलीस गाड्यांना अडवताना दिसून आले. बहुतांश गाड्या या मालवाहू प्रकारातील होत्या. ३१ डिसेंबर असल्यामुळे कदाचित वेगळ्या प्रकारची चौकशी चालू असावी, असे आम्हाला वाटले. आमच्या गाडीचा MH14 हा क्रमांक बघून आमची गाडी बाजूला घ्यायला लावली. अगदी दुर्दैवानेच म्हणावं लागेल की १५ डिसेंबरलाच माझ्या गाडीची पीयूसी संपलेली होती! खरंतर यात माझीच चुकी होती की माझ्या ध्यानात राहिले नाही. संबंधित ट्राफिक हवालदाराने मागितलेली सर्व कागदपत्रे त्यांना सुपूर्द केली. फक्त पीयूसीची तारीख निघून गेलेली होती. साहेबांना नवीन बकरा पकडल्याने आनंद झाला असावा. त्यांनी मला बाजूला घेतले आणि सांगितले, 'पियूसीचे हजार रुपये दंड पडतात, तुम्ही दोनशे रुपये द्या आणि निघून जा.' १००० रुपयांचे काम जर दोनशे रुपयांमध्ये होत असेल तर कोणीही ते देऊन निघून जाईल. परंतु मला ते पटत नव्हते. त्यांना मी सरळ सांगितले, "ऑनलाइन फाईन करून द्या. मी भरतो."
पीयूसी नसल्याच्या कारणावरून दंड भरणारा त्यांना मी कदाचित पहिलाच व्यक्ती भेटलो असेल. त्यामुळे ते देखील चक्रावले.
हवालदार पुढे बोलू लागला, "साहेब तुम्ही चांगले दिसता. सगळी कागदपत्रे देखील आहेत. कशाला हजार रुपयाचा भुर्दंड भरताय? त्यापेक्षा दोनशे रुपयांमध्ये तुमचं काम करून देतो! कागदावर दंड देखील लागणार नाही."
त्यांना दोनच शब्दांमध्ये उत्तर दिले, "चालेल मला! करा फाईन."


मग त्याचा देखील नाईलाज झाला. त्याने मशीनमध्ये माहिती टाकली आणि बराच वेळ वाट बघत होता. इंटरनेटला रेंज नसण्याचे कारण सांगून तो शेजारच्या गाडीपाशी असलेल्याच्या दुसऱ्या सहकाऱ्याजवळ गेला व त्याला देखील काहीतरी सांगितले. मग तो त्याच्या जवळचे मशीन घेऊन इकडे आला. त्याने देखील पहिल्याचीच री ओढली. "साहेब तुम्ही चांगले दिसता कशाला फाईन वगैरे भरताय? दोनशे रुपये द्या लगेच गाडी मोकळी करतो."
मी पुन्हा म्हटलं, "साहेब ऑनलाईन फाईन करा. मी भरायला तयार आहे. आधीच्या साहेबांना सुद्धा मी हे सांगितलं आहे. यापेक्षा वेगळं मी काही करू शकत नाही."
मग त्याचा देखील नाईलाज झाला. गाडीला ऑनलाइन फाईन पडला. पण त्यांनी सांगितल्याप्रमाणे तो एक हजार रुपये नसून ५०० रुपये होता! लाखो ड्रायव्हरपैकी पियूसी नसल्यामुळे ऑनलाईन फाईन भरणारा कदाचित मी एकमेव ड्रायव्हर असावा!
दोघांच्याही चेहऱ्यावर आश्चर्यमिश्रित भाव होते. त्यांच्यासमोरच मी आरटीओच्या वेबसाईटवर फाईन भरला आणि गाडी चालू केली. एक मात्र धडा घेतला की लांबच्या प्रवासाला जाण्याच्या आधी गाडीची सगळं कागदपत्रे योग्य आहेत की नाही, हे तपासून घ्या आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोलिसांशी कुठलाही काळा व्यवहार करू नका.

Ⓒ Ⓐ  तुषार भ. कुटे

Wednesday, November 16, 2022

इंडीजीनियस लँग्वेज

इंडीजीनियस लँग्वेज अर्थात देशी भाषा म्हणजे अशी भाषा जी एखाद्या परिसरातील मूळ रहिवाशांकडून बोलली जाते. भाषा आणि संस्कृती यांचं अतिशय दृढ असं नातं आहे. जेव्हा भाषा नष्ट होते तेव्हा त्या परिसरातील संस्कृती देखील लयाकडे प्रवास करत असते. मागील काही शतकांपासून जगभरामध्ये देशी भाषा लुप्त होण्याचं प्रमाण वेगाने वाढताना दिसत आहे. जगातील सात खंडांमध्ये हजारो प्रकारचे समाज वास्तव्यात आहेत. त्यांच्याद्वारे विविध प्रकारच्या भाषा बोलल्या जातात. मागील हजारो वर्षांचा इतिहास बघितला तर परकीय आक्रमकांनी आपल्या भाषा जगभरातील विविध परिसरांमध्ये नेल्या. हळूहळू त्यातील शब्द स्थानिक भाषेमध्ये यायला लागले. कालांतराने त्यांचा देखील नवीन भाषिक समूह तिथे तयार व्हायला लागला आणि स्थानिक भाषा लुप्त व्हायला लागली.
मागील शतकभरामध्ये हजारो भाषा या लुप्त झालेल्या आहेत. किंबहुना अनेक लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. इसवी सन २०१९ मध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेने देशी भाषांचे वर्ष म्हणून घोषित केले होते. ज्याद्वारे जगभरातून लुप्त होणाऱ्या स्थानिक भाषा टिकाव्यात म्हणून विशेष लक्ष वेधले गेले. परंतु त्याचा फारसा प्रभाव जागतिक समुदायावर पडलेला दिसत नाही. स्थानिक भाषा लुप्त होण्यामागे अनेक कारणे आहेत. परकीय आक्रमकांनी अनेकदा सामूहिक हत्या केल्यामुळे देखील भाषा लुप्त झालेल्या आहेत. तसेच नैसर्गिक आपत्ती देखील काही भाषांच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरलेली आहे. त्याहीपेक्षा मोठे कारण म्हणजे जुन्या पिढ्यांनी आपली भाषा नव्या पिढीकडे हस्तांतरित केली नाही. ही प्रक्रिया देखील अनेक शतकांपासून जागतिक समुदायांमध्ये अनुभवता येते. आज देखील त्यामध्ये बदल झालेला दिसत नाही. 


दक्षिण अमेरिका खंडाचा विचार केल्यास इसवी सन १६०० मध्ये तेथील देशांत सुमारे ५२ भाषा बोलल्या जायच्या. परंतु आज या भाषा जाणणारे अतिशय कमी लोक दक्षिण अमेरिकेमध्ये राहत आहेत. त्यांची टक्केवारी केवळ आठ टक्के इतकी आहे! अन्य लोक परकीय आक्रमकांच्या स्पॅनिश आणि पोर्तुगीज भाषा बोलतात. आज जगामध्ये ६,८०९ भाषा अस्तित्वात आहेत आणि त्यापैकी ९०% भाषा बोलणारे समुदाय एक लाखांपेक्षा देखील कमी आहेत! याचा अर्थ पुढील काही दशकांमध्ये कमीत कमी ६,१०० भाषा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. जगात ४६ भाषा अशा आहेत की ज्या केवळ एकाच व्यक्तीला ज्ञात आहेत आणि ३५७ भाषा या जास्तीत जास्त पन्नास लोकांकडून बोलल्या जातात. अर्थात पुढील दशकांमध्येच या भाषा पूर्णपणे लुप्त होऊन जातील.
आज संगणक व इंटरनेटच्या युगामध्ये केवळ मोठ्या भाषिक समुदायांनाच ग्लॅमर प्राप्त झालेले आहे. याच कारणास्तव छोटे भाषिक समुदाय नव्या भाषांकडे आकर्षित झालेले दिसतात. त्यांना आपल्या मूळ भाषांची व त्या बोलण्याची लाज देखील वाटते. म्हणूनच त्यांची भाषा व संस्कृती लवकरच संपण्याच्या मार्गावर आहे. भारतीय समाज रचना बघितल्यास भारतीय भाषांसाठी देखील काही वेगळी परिस्थिती नाही. जागतिकीकरणाच्या रेट्यामध्ये भारतीय लोक आपल्या भाषांना दुय्यम स्थान देताना दिसत आहेत. जी परिस्थिती दक्षिण अमेरिकेतील भाषांची झाली, तीच भारतीय समुदाय आपल्या मूळ भाषांवर लवकरच आणेल असेही चित्र आहे. म्हणजेच पुढील शतकभरामध्ये भारतातल्या बहुतांश भाषा या नष्ट झालेल्या असतील आणि मुख्य भाषा देखील अल्पमतात गेलेल्या असतील. आपली भाषा आणि संस्कृती याविषयी विशेष आस्था असलेले जगातील समुदायच टिकून राहतील.
मग आपल्या भाषा आणि संस्कृती टिकवायची की तिची हत्या करायची? हे अजूनही भारतीय लोकांच्या हातात आहे!

Saturday, November 12, 2022

त्रिभाषा सूत्र

स्वातंत्र्यानंतर भाषा आधारित राज्य रचना पूर्ण झाल्यावर भारतीय भारतीय संघराज्यातील राज्यांनी शालेय शिक्षणासाठी त्रिभाषा सूत्राचा अवलंब केला होता. किंबहुना केंद्र सरकारनेच स्थानिक भाषा, हिंदी भाषा आणि इंग्रजी भाषा या सूत्राचा राज्यांना अवलंब करण्यासाठी सांगितले. उत्तर भारतातील स्थानिक भाषा ही हिंदी असल्यामुळे त्या ठिकाणी केवळ द्विभाषा सूत्रच लागू होते. मात्र अन्य उर्वरित भारतामध्ये भारतीय संघराज्याची राजभाषा म्हणून हिंदी भाषा अभ्यासक्रमात टाकण्यात आलेली आहे. अर्थात तेव्हापासूनच केरळ आणि तमिळनाडू सारख्या राज्यांनी केंद्राला त्रिभाषा सूत्राच्या केराची टोपली दाखवली होती. आजतागायत या राज्यांमध्ये स्थानिक भाषा व इंग्रजी या दोनच भाषा शालेय शिक्षणात शिकवल्या जातात. अर्थात याचा त्यांना कधीही तोटा झालेला नाही!
उत्तर भारत वगळता अन्य भारतामध्ये शालेय शिक्षणात द्वितीय भाषा म्हणून हिंदीचा समावेश केला जातो. मागील काही दशकांची स्थिती पाहता त्रिभाषा सूत्राचा पुनर्विचार करण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. काही वर्षांपूर्वी इंग्रजी भाषेचे महत्त्व लक्षात घेता महाराष्ट्र सरकारने पहिलीपासूनच इंग्रजी या विषयाचा अभ्यासक्रमामध्ये समावेश केला. तो यशस्वी देखील झाला आहे. परंतु आजची परिस्थिती पाहता पाचवीच्या अभ्यासक्रमापासून हिंदी भाषेचा अतिरिक्त बोजा विद्यार्थ्यांवर पडत असलेला दिसतो. काळाची पावले ओळखून जसा इंग्रजीचा समावेश अभ्यासक्रमामध्ये करण्यात आला तसाच हिंदी या अनावश्यक विषयाऐवजी 'संगणकीय भाषा' हा सर्वोत्तम पर्याय निवडता येऊ शकतो.
एकविसावे शतक हे संगणकीय प्रगतीच्या पुढच्या टप्प्याने सुरू झाले. हळूहळू ते संगणकीय कृत्रिम बुद्धिमत्तेच्या दिशेने प्रवास करत आहे. म्हणूनच विद्यार्थ्यांना संगणकीय प्रोग्रामिंग करता यावी ही येणाऱ्या काळाची गरज ठरणार आहे. शिवाय भारत सरकारने जाहीर केलेल्या नवीन शैक्षणिक धोरणांमध्ये देखील इयत्ता सहावी पासून संगणकीय प्रोग्रामिंग भाषा अभ्यासक्रमामध्ये असावी असे सुचवलेले आहे. अर्थात यामुळे विद्यार्थ्यांवरील अतिरिक्त ताण तयार होईल असे वाटते. तो कमी करायचा असल्यास मराठी, इंग्रजी आणि संगणकीय भाषा असे त्रिभाषा सूत्र ठरविता येऊ शकते.
बहुतांश मुलांना आज लहान वयातच मोबाईल तसेच संगणक यांची ओळख होत असते. परंतु त्याचा वापर ते केवळ गेम खेळणे किंवा व्हिडीओ बघणे यासाठीच करत असतात. या यंत्रांचा निश्चित उपयोग काय, हे संगणकीय प्रोग्रामिंगद्वारे विद्यार्थ्यांना समजू शकते. शिवाय त्यादृष्टीने त्यांचा मेंदू देखील विकसित होण्याकरता मदत होऊ शकेल. 


आज संगणकाचा उपयोग प्रत्येक क्षेत्रातच केला जात आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी करिअरच्या दृष्टीने कोणतेही क्षेत्र निवडले तरी त्यांना संगणकीय प्रोग्रामिंग माहीत असणे आवश्यक बनले आहे. याच कारणास्तव सर्वच माध्यमांच्या शाळांमध्ये नव्या त्रिभाषीय सूत्राचा अवलंब राज्य सरकारने करावा. जेणेकरून विद्यार्थ्यांवरील अतिरिक्त ताण न वाढता त्यांचा शालेय जीवनातच कौशल्य विकास होण्यास मदत होईल.

Ⓒ तुषार भ. कुटे.

Monday, November 7, 2022

मृत्यू पाहिलेली माणसं

पृथ्वीवर अस्तित्वात असणाऱ्या एकूण सजीवसृष्टी पैकी केवळ मनुष्य प्राणी सर्वांवर राज्य करतो आहे. त्याच्या अंगात असणाऱ्या अनेक गुणांमुळे तो या पृथ्वीचा राजा आहे, असे आपण म्हणू शकतो. प्रगल्भ बुद्धिमत्तेबरोबरच मानवाचा सर्वात मोठा गुण म्हणजे प्रखर इच्छाशक्ती! याच इच्छाशक्तीच्या बळावर त्याने आजवर अनेक असाध्य गोष्टी साध्य करून दाखवल्या. अशाच इच्छाशक्तीच्या जोरावर मृत्यूवर विजय मिळवलेल्या माणसांची कहाणी सांगणारे हे पुस्तक म्हणजे, "मृत्यू पाहिलेली माणसं".
मानवी जीवनाचं 'मृत्यू' हे अंतिम सत्य आहे. ज्याला कोणीच टाळू शकत नाही. मृत्यू यायचा असतो तेव्हा तो येतोच. पण मानवी इतिहासात आजवर अशी अनेक माणसे होऊन गेली ज्यांनी आपल्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर मृत्यूला देखील पळवून लावले होते. लेखिका गौरी कानेटकर यांनी या पुस्तकामध्ये मृत्यूच्या दारातून परतलेल्या व्यक्तींच्या थरारक कहाण्या लेखणीबद्ध केलेल्या आहेत.
त्यांच्या या कहाण्यांमधून आपल्याला आजच्या युगातील खरे नायक आणि नायिका भेटतात. यामध्ये आहे अमेझॉनच्या जंगलात २१ दिवस भटकणारा युसी, युगांडामध्ये वंशच्छेदात तीन महिने बाथरूम मध्ये लपून काढणारी इमॅक्युली, जगातील सर्वात मोठी पर्वतरांग असणाऱ्या अँडीज पर्वताततून सुखरूप बाहेर येणारे नॅन्दो आणि रॉबर्ट, एका निर्मनुष्य जंगलात दाट धुक्यामध्ये हरवून देखील कष्टाने परतणारे बारा वर्षाचे पोर डॉन, विमान अपघातात जंगलात येऊन पडलेला जुलियन, १२७ तास दगडाखाली हात अडकलेला ऍरन, समुद्राच्या लाटांवर तब्बल १५ महिने जिवंत राहिलेला अलवरिंगा, निर्जन वाळवंटामध्ये हरविलेला रिकी आणि एका बर्फाळ बेटावर उणे ५७ तापमानात तग धरून राहिलेली अडा! यांच्या कहाण्या या कल्पनेच्या पलीकडील अशाच आहेत. हे नायक आणि नायिका ज्या परिस्थितीमध्ये जिवंत राहिले ती परिस्थिती निव्वळ मानवी जीवनासाठी अशक्य कोटीतीलच मानावी अशी आहे. पण त्यांच्यामध्ये जीवन जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती जिवंत होती. त्याच इच्छाशक्तीच्या बळावर ते आलेल्या संकटाला तोंड देऊ शकले आणि त्यातून सुखरूप बाहेर देखील पडले. काहीजणांना नशिबाची साथ लाभली तरी देखील त्यांचा संघर्ष मात्र कमी नव्हता. यातील अनेकांनी काहीबाही खाऊन दिवस काढले व तग धरून राहिले.
मनुष्य प्राण्याखेरीज त्यांच्या ऐवजी जर इतर प्राणी असला असता तर कदाचित त्याचा मृत्यू झाला असता. पण मानवाचा कोणत्याही परिस्थितीत अंतिम क्षणापर्यंत तग धरून राहण्याचा गुणधर्म त्याला नेहमीच सहाय्य करत आला आहे. याची प्रचिती या पुस्तकातून आपल्याला येते. आपल्यातल्या प्रत्येकाला 'हरू नकोस हा शेवट नाही' हा संदेश हे सर्वजण देऊन जातात. खरोखर प्रेरणादायी अशा सत्य कहाण्या आपल्याला देखील ऊर्जा देऊन जातात! 



Sunday, November 6, 2022

फ्लॅट अर्थ सोसायटी: मूर्खांचा बाजार

दोन दिवसांपूर्वी फेसबुक वर एक मीम बघण्यात आले त्यात एका बातमीचा स्क्रीन शॉट होता. बातमी होती.

Flat Earthers say that they have community all around the globe!

फ्लॅट अर्थ आणि ग्लोब या दोन्ही परस्पर विरोधी गोष्टी आहेत! ग्लोब म्हणजे गोल जग. जगामध्ये पृथ्वी सपाट आहे, असे मानणारे देखील लोक आहेत याचे आश्चर्य वाटले. त्यांच्याविषयी माहिती शोधण्याचा प्रयत्न केला व अतिशय वेगळी आणि आश्चर्यजनक माहिती समोर आली. पृथ्वी ही गोल नसून सपाट आहे, असे मानणारे लाखो लोक या जगात अस्तित्वात आहेत, असे समजले आणि विशेष म्हणजे त्यांनी त्यांची "फ्लॅट अर्थ सोसायटी" नावाचा जागतिक संस्था देखील बनवलेली आहे! दोन वर्षांपूर्वी या लोकांचे जागतिक संमेलन देखील भरले होते! 

Ref: https://physicsworld.com/wp-content/uploads/2020/07/Flat_Earth_illustration.jpg


पृथ्वी गोल आहे आणि ती सूर्याभोवती फिरते, हे निकोलस कोपर्निकस याने सर्वप्रथम सांगितले आणि सिद्ध देखील केले. त्यानंतर अनेक शास्त्रज्ञांनी पृथ्वी गोल आहे हे वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध केले होते. कालांतराने संपूर्ण जगाने देखील हे मान्य केले की पृथ्वी गोल आहे आणि ती सूर्याभोवती फिरते. परंतु एकोणिसाव्या शतकामध्ये इंग्लंडमधील एका व्यक्तीने पृथ्वी नक्की गोल आहे का, यावर शंका उपस्थित केली आणि एका प्रयोगाद्वारे सिद्ध देखील केले की पृथ्वी गोल नसून सपाट आहे. पॅरालॅक्स नावाने हा व्यक्ती संबोधला जातो. इंग्लंडमध्ये एक दहा मैल लांबी असणारा सरळ कॅनॉल आहे. या कॅनॉलमध्ये दुर्बिणीचा वापर करून त्याने सिद्ध केले की पृथ्वी सपाट आहे! पृथ्वीला गोल म्हणणे ही वैज्ञानिक अंधश्रद्धा आहे, असे त्याचे म्हणणे होते. त्याने अनेक चित्र विचित्र प्रयोग करून सपाट पृथ्वीची संकल्पना मांडली. हळूहळू पृथ्वी सपाट आहे हे मानणाऱ्या लोकांची संख्या देखील वाढत गेली. तुम्ही विश्वास करू शकत नाही की अमेरिकेमध्ये फक्त ८४ टक्के लोकांना वाटते की पृथ्वी गोल आहे आणि विशेष म्हणजे २० ते ४० या वयोगटातील ६४% लोकांनाच असे वाटते की पृथ्वी गोल आहे. हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी वैज्ञानिक दृष्ट्या चुकीची परंतु आपल्याला पटतील अशी कारणे देखील दिलेली आहेत. जसे की विमान हवेत उडताना पृथ्वीला समांतर उडत असते. त्याचा पुढचा भाग कधीच खालच्या दिशेने नसतो म्हणजे पृथ्वी सपाट आहे. विमानात तुम्ही समांतर पातळी तपासण्यासाठी चे उपकरण अर्थात लेवल इंडिकेटर नेले तर ते पूर्ण प्रवासात तुम्हाला समांतर पातळी दाखवते, असा जबरदस्त सिद्धांत "सपाट पृथ्वी" वाले मांडतात. त्यांच्या म्हणण्यानुसार पृथ्वीच्या कडेला मोठमोठाले बर्फाचे कडे आहेत ते तोडून तुम्ही जाऊ शकत नाही. उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव हे पृथ्वीच्या दोन कडेला आहेत. असं सपाट पृथ्वीवाले म्हणतात.
विशेष म्हणजे त्यांच्या सिद्धांतानुसार पृथ्वी वगळता सूर्यमालेतील सर्व ग्रह हे गोल आहेत! पृथ्वीला जर सपाट म्हटले तर पूर्ण जगामध्ये एकच टाईम झोन वापरावा लागेल आणि दिवस बदलायचा असेल तर पृथ्वीला सूर्याभोवती नव्हे तर सूर्याला पृथ्वीभोवती फिरावे लागेल! ही सर्व मूर्खांची गंमत म्हणावी अशीच आहे. पृथ्वीला सपाट सिद्ध करणारे अनेक व्हिडिओ तुम्हाला युट्युबवर दिसून येतील. शिवाय "व्हॉट इफ" या सुप्रसिद्ध चॅनेलने देखील या विषयावर एक सुंदर डॉक्युमेंटरी तयार केली आहे. ती नक्की पहा. अर्थात "जर पृथ्वी सपाट असती तर?" या विषयावर ती असल्याने त्यांच्या म्हणण्यानुसार देखील पृथ्वी गोल आहे, असंच सिद्ध होतं. सपाट पृथ्वी सिद्धांत मांडणाऱ्या एका व्यक्तीने काही वर्षांपूर्वी स्वतःच रॉकेट तयार करून अवकाशात झेप घेतली होती! जेणेकरून त्याला हे सिद्ध करायचं होतं की, पृथ्वी सपाटच आहे. तर्कशास्त्र बाजूला ठेवलं तर सपाट पृथ्वीवाल्या मूर्खांच्या बाजारात आपण देखील सहजपणे सामील होऊ शकतो. तुम्हाला काय वाटतं काय करायचं?

Ⓒ Ⓐ  तुषार भ. कुटे

Tuesday, November 1, 2022

पुलावरच्या पाण्यातून...

किल्ल्याच्या दिशेने सकाळी सकाळीच कुच करण्याचे ठरवले. गुगल मॅपद्वारे रस्ता पंधरा किलोमीटरचा दाखवत होता. सकाळी रहदारी तशी नव्हती. महामार्गावर मात्र नियमित असणारी मालवाहतूक दिसून आली. पण थोड्याच वेळात आम्ही महामार्गातून बाहेर पडलो आणि हिरव्यागार झाडीतून किल्ल्याच्या दिशेने प्रवास करायला लागलो. यावर्षीचा पाऊस हा काही तुफानच होता. त्यामुळे परिसरातील कोणते धरण, तलाव वा नदी ओसंडून वाहिली नाही, असे झाले नाही. रस्त्यामध्ये थोड्याच अंतरावर लागूनच एक तलाव होता. तो देखील तुडुंब भरलेला होता. त्याच्या सांडव्यावरून पाणी वाहत होते. आमचा रस्ता याच सांडव्याच्या कडेकडेने पुढे जात होता. विशेष म्हणजे पाणी सातत्याने वाहत होतं आणि रस्ता देखील पाण्याखाली गेला होता. रस्त्यावर बांधलेल्या पूलावरून देखील पाणी ओसंडून वाहत होते. पुलाचे कठडे दिसत असल्यामुळे रस्ता नेमका कुठे आहे, हे मात्र आम्हाला समजत होते. शिवाय येणारी जाणारी वाहने कमी असली तरी या रस्त्याने नेहमीची जाणारी असल्याने त्यांना परिचयाचा रस्ता होता. त्यांच्याच परिचयाचा वापर करून आयुष्यामध्ये पहिल्यांदाच इतक्या पाण्याने भरलेल्या रस्त्यामध्ये गाडी घातली. आजवर फक्त बातम्यांमध्येच असे व्हिडिओ पाहत आलो होतो. आज नाईलाजाने का होईना अशा रस्त्यावरून जाण्याची वेळ आली. पहिलीच वेळ असल्याने काहीसं थरारक असं चित्र दिसलं. केवळ एक ते दीड मिनिटांमध्ये पाण्याचा तो वाहणारा प्रवाह आम्ही पार केला. परतताना दुसऱ्या बाजूला एक मोठा खड्डा होता. अर्थात तो आम्हाला चुकवता आला नाही. पाण्याचा हा प्रवाह पार केल्यानंतर आम्हाला एसटी महामंडळाची बस देखील दिसून आली. म्हणजे ही बस या पाण्यातून नियमितपणे प्रवास करत असावी, हे देखील समजले. दुचाकीस्वार मात्र आमच्यापेक्षा मोठा थरारक अनुभव घेत असावेत, याची प्रचिती देखील आली. जाताना आणि परतताना अश्या दोन वेळा या पाण्यातून मार्गक्रमण करावे लागले. पण तो अनुभव थरारक असाच होता! 



Monday, October 31, 2022

इमाईका नोदिगल

'सिरीयल किलर' हा सस्पेन्स थ्रिलर चित्रपटांसाठी असणारा नेहमीचा विषय. या चित्रपटांमध्ये सातत्याने खून होत राहतात आणि या सर्व खुनांमध्ये एक विशेष साम्य असतं. ते सामने शोधण्यासाठी पोलिसांना बराच वेळ आणि बुद्धी खर्च करावी लागते. काहीशा अशाच पार्श्वभूमीचा परंतु वेगळ्या वाटेने जाणारा तमिळ रहस्यपट म्हणजे 'इमाईका नोदिगल'! 


सन २०१८ मध्ये अजय ज्ञानमुथू यांच्या दिग्दर्शनाखाली हा चित्रपट तयार झाला होता. नयनतारा या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेमध्ये आहे. सीबीआय ऑफिसर अंजली विक्रमादित्यनची मुख्य भूमिका तिने साकारलेली आहे. चित्रपटाची सुरुवात तिच्यापासूनच होते. एक धडाडीची आणि ध्येयाने प्रेरित झालेली आयपीएस ऑफिसर कशी असावी? हे तिच्या व्यक्तिरेखेतून दिसून येते. पण तिला आव्हान देणारा एक व्यक्ती आहे, तो म्हणजे रुद्र. खरंतर हा रुद्र काही वर्षांपूर्वी मृत झालेला होता. पण तरी देखील तो खून करत सुटला आहे. हा रुद्र आहे तरी कोण? त्याच्याभोवती फिरणारी कहानी या चित्रपटामध्ये चित्रीत करण्यात आलेली आहे.
तसं पाहिलं तर आधीच सांगितल्याप्रमाणे हा वेगळ्या वळणाचा चित्रपट आहे. काही अनपेक्षित धक्के तो देऊन जातो आणि अखेरीस असत्याचा पडदा दूर होऊन सत्य समोर येते. दक्षिणात्य चित्रपटांमध्ये असणारा वेग या चित्रपटामध्ये आपल्याला पुन्हा दिसून येतो आणि सस्पेन्स थ्रिलर च्या पठडीत मोडणारा आणखी एक चित्रपट पाहण्याची तो मजा देऊन जातो.

Friday, October 28, 2022

वाढदिवशी सूर्यग्रहण

२४ ऑक्टोबर १९९५ माझ्या अकराव्या वाढदिवसाच्या आदला दिवस. या दिवशी मी आयुष्यातील पहिले सूर्यग्रहण अनुभवले. विशेष म्हणजे ते भारतातून दिसले होते आणि खग्रास सूर्यग्रहण होते! ग्रहणाविषयी असणाऱ्या अंधश्रद्धा देखील याचवेळी पहिल्यांदा पाहायला मिळाल्या. कालांतराने अनेकदा खग्रास आणि खंडग्रास सूर्यग्रहणे व चंद्रग्रहणे नियमितपणे पाहिली.
यंदाच्या वाढदिवशी कित्येक वर्षांनी पहिल्यांदाच खंडग्रास सूर्यग्रहण अनुभवायला मिळाले. विशेष म्हणजे आजवर पाहिलेल्या सर्व सूर्यग्रहणांपैकी ते एकमेव ग्रस्तास्त खंडग्रास सूर्यग्रहण होते. 


 

Thursday, October 13, 2022

सतराव्या शतकातील गोवळकोंड्याची कुत्बशाही

महाराष्ट्राच्या इतिहासाला धार चढते ती #छत्रपती #शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या मराठेशाहीच्या उदयानंतरच. आज स्थापन झालेले मराठी राज्य शिवशाहीबरोबरच उदयास आले. परंतु इस्लामी राज्यकर्त्यांनी भारतावर कब्जा मिळवलेला असताना स्वकीयांचे राज्य निर्माण करणे, ही त्या काळातली अशक्यप्राय अशीच घटना होती. त्यातूनच शिवरायांनी सतराव्या शतकात रयतेचे राज्य स्थापन केले. तत्पूर्वी #मराठी प्रदेशांमध्ये तसेच पूर्ण दक्षिण भारतामध्ये बहमनी सुलतानाचे वर्चस्व होते. परंतु #बहमनी राज्याची शकले पडली आणि #निजामशाही, #इमादशाही, #बरीदशाही, #आदिलशाही व #कुत्बशाही राज्ये निर्माण झाली. यातील कुत्बशाही राज्य सर्वात शेवटचे राज्य होय. त्यांची राजधानी गोवळकोंड्याला होती.
शिवशाहीचा उदय झाला त्यावेळी या पाचही शाह्या दख्खनवर राज्य करत होत्या. त्यामुळे शिवशाहीचा सखोल अभ्यास करण्यासाठी तत्कालीन इस्लामिक राज्यकर्त्यांचा देखील अभ्यास करणे गरजेचे आहे. याच दृष्टीकोणातून इतिहासाचे भिष्माचार्य वासुदेव सीताराम #बेंद्रे यांनी 'सतराव्या शतकातील गोवळकोंड्याची कुत्बशाही' हा ग्रंथ संपादिला. शिवशाहीचा काळ चालू झाला त्यावेळी मराठी राज्य चोहोबाजूंनी इस्लामी राज्यकर्त्यांनी घेरलेले होते. त्यातच दक्षिणेतील #गोवळकोंड्याची कुत्बशाही देखील समाविष्ट होती. मराठी राज्य विस्तारत असताना अनेकदा अप्रत्यक्षपणे कुत्बशाहीचा आधार मिळाला.
हा ग्रंथ मराठी आणि #इंग्रजी अशा दोन भागांमध्ये तयार करण्यात आलेला आहे. याकरता वा. सी. बेंद्रे यांनी प्रचंड मेहनत घेतल्याचे दिसून येते. त्यांनी कुत्बशाहीची विश्वसनीय #सनावळ बनवलेली आहे. कुत्बशाहीच्या संपूर्ण कार्यकाळामध्ये झालेल्या विविध राज्यकर्त्यांची विस्तृत माहिती तसेच तत्कालीन #उल्लेखनीय ऐतिहासिक घटना या सदर ग्रंथामध्ये विस्तृतपणे नोंदविलेल्या आहेत. या ग्रंथाचे संपादन बेंद्रे यांनी प्रा. भगवत दयाळ शर्मा यांच्या साहाय्याने सन १९३४ मध्ये केले होते. तसं पाहिलं तर त्या काळामध्ये इतिहासावर फारसे #संशोधन झाले नव्हते. परंतु त्यांनी अभ्यासलेल्या परकीय साधनांमधून कुत्बशाहीची बरीच माहिती जमा केली गेली. त्याचाच उपयोग मराठेशाहीचा #अभ्यास करण्यासाठी झालेला दिसतो. या ग्रंथामध्ये कुत्बशाहीच्या लेखनाचे सर्व प्रयत्न, हकीकत, तत्कालीन #लढाया, #युद्धपद्धती तसेच इतर पातशहांचे असणारे संबंध याविषयी सखोल माहिती पुरवलेली आहे. विशेष म्हणजे कुत्बशाहीचे शिवशाहीची संबंध व त्यावरील परिणाम याचा उपयोग मराठेशाहीच्या अभ्यासकांना निश्चित करता येण्याजोगा आहे.
इतिहास लेखन करत असत असताना तत्कालीन कालगणनेची भान ठेवणे गरजेचे असते. सदर ग्रंथामध्ये बहुतांश ठिकाणी #ऐतिहासिक साधनांमध्ये इस्लामी #हिजरी कालगणनेचा उल्लेख येतो. या कालगणनेचे आजच्या जागतिक कालगणनेमध्ये रूपांतर करून #दिनांक व वर्ष यांचा उल्लेख बेंद्रे यांनी या ग्रंथांमध्ये केलेला आहे.
या ग्रंथाच्या इंग्रजी भागामध्ये तत्कालीन इंग्रजीचा बेंद्रे यांनी वापर केलेला आहे. आजच्या काळात वापरण्यात येणारे स्पेलिंग तसेच व्याकरण हे काही प्रमाणात वेगळे आहे. पुस्तकामध्ये मात्र इंग्रजीतील तत्कालीन #व्याकरण व स्पेलिंगचा वापर करण्यात आलेला आहे.
ग्रंथाचे पुन:प्रकाशन करत असताना प्रकाशकांनी यामध्ये कोणताही बदल केलेला नाही. इतिहास अभ्यासकांना तसेच भाषासंशोधकांना तत्कालीन #भाषा कशी होती, याचा अभ्यास करणे सुलभ होईल असे वाटते.



Thursday, October 6, 2022

महाराष्ट्रात या आणि हिंदी शिका

ग्रामीण भागातील एका 'एमआयडीसी'मधील कंपनीत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे माझे दिवसभराचे सत्र होते. संध्याकाळी ते संपले त्यानंतर सहभागी कर्मचाऱ्यांपैकी एक जण मला भेटायला आला. तो केरळमधून अडीच वर्षांपूर्वी कामाच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये आला होता. शिवाय मी त्याच्याशी पूर्णपणे इंग्रजीत बोलत असलो तरी त्याचे माझ्याशी बऱ्यापैकी संभाषण हिंदी भाषेतून चालू होते. याचे मला आश्चर्य वाटले. म्हणून उत्सुकता म्हणून मी त्याला विचारले,
"Generally, Tamil and Malayalam people don't study and understand Hindi language. How can you speak Hindi so well?"
तर तो म्हणाला, "मेरे को केरला मे ढाई साल पहले हिंदी नही आती थी. यहा महाराष्ट्र मे आके हिंदी सीखी है!"
यावर मी त्याला विचारले, "So people around you are North Indians?"
माझा प्रश्न ऐकून तो किंचितसा हसला आणि बोलू लागला, "यहा के सभी लोग मराठी ही है लेकिन वो मुझसे हिंदी मे ही बोलते है. इस वजह से मुझे हिंदी आती है."


त्याचे बोलणे माझ्यासाठी धक्कादायक होते. पुणे जिल्ह्यातल्या एका ग्रामीण भागामध्ये राहणारा दक्षिण भारतीय माणूस अडीच वर्षांमध्ये उत्तम हिंदी बोलू शकतो. परंतु मराठीचा त्याला गंध देखील नव्हता. त्याच्याशी आजूबाजूचे सर्व मराठी लोक हिंदीमध्ये संभाषण साधायचे. ज्या भाषेला मल्याळम लोक काडीचीही किंमत देत नाही, ती भाषा मराठी लोकांनी या व्यक्तीला शिकवली होती.
खरंतर आपल्याच भाषेला तुच्छ समजणाऱ्या मराठी लोकांसाठी हा एक धडा आहे. समोरच्याला मराठी समजत नसेल तर थेट हिंदीत संभाषण करून आपलेच लोक आपल्या भाषेला दुय्यम दर्जा देताना दिसतात. पूर्वी मुंबई शहरामध्ये असणारे मराठीच्या अनासक्तीचे लोन आता हळूहळू महाराष्ट्रात इतरत्र देखील पसरताना दिसत आहे. महाराष्ट्राच्या राजेभाषेच्या भविष्यासाठी ही सर्वात मोठी धोक्याची घंटा आहे.
मराठी लोकांनो वेळीच सावध व्हा आपली भाषा आपल्याच राज्यात मरत आहे. त्याला जबाबदार पण आपणच आहोत.

Tuesday, October 4, 2022

दीक्षाभूमीतील तो अर्धातास

नागपुरातील दीक्षाभूमीबद्दल अनेक वर्षांपासून केवळ वृत्तपत्रांमध्येच वाचत होतो. दरवर्षी धम्मचक्र परिवर्तनदिनी तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणदिनी येथे लाखो आंबेडकरी अनुयायांची गर्दी होत असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी अगणित लोक या ठिकाणी येत असतात. अशा पवित्र ठिकाणी जाण्याची माझी कित्येक वर्षे इच्छा होती. अखेर एका कार्यक्रमाच्या निमित्ताने नागपूरला दोन दिवसांसाठी जाणे झाले आणि माझ्या सुदैवाने मी ज्या ठिकाणी राहत होतो तिथून केवळ दीड किलोमीटरच्या अंतरावर दीक्षाभूमी होती!
आदल्या दिवशीचा कार्यक्रम उरकल्यानंतर रात्री लवकर झोपी गेलो आणि सकाळी सात वाजताच तयार झालो होतो. गुगल मॅपवर दीक्षाभूमी शोधून काढली आणि आजचा मॉर्निंग वॉक याच रस्त्याने करायचा असे ठरवले. कधी मोठ्या रस्त्याने तर कधी छोट्याशा गल्लीमधून पायपीट करत पंधरा मिनिटांमध्ये दीक्षाभूमीच्या एका दरवाजापाशी पोहोचलो. तो बंद होता. गुगल मॅपवर मात्र सकाळी सात वाजल्याचीच उघडण्याची वेळ दाखवत होते. मला काहीतरी चुकल्याचे जाणवले. नंतर लक्षात आले की हा मुख्य दरवाजा नव्हता. तीन ते चार मिनिटांमध्ये पुढच्या सिग्नलला वळसा घालून मी मुख्य दरवाजातून आत प्रवेश केला. आतमध्ये कोणीच नव्हतं. दूरवर एक सुरक्षारक्षक दिसून आला तेव्हा जाणवले की आत प्रवेश करता येऊ शकतो. जसजसे चालत होतो तसतसे या भूमीचे पावित्र्य मन शांत करत होते. पाठीवरची बॅग बाहेर काढून ठेवली व मुख्य प्रार्थनास्थळामध्ये प्रवेश केला. आत कुणीही नव्हतं. अगदी टाचणी पडेल इतकी शांतता या ठिकाणी अनुभवता येत होती!
या वास्तूची रचनाच अशी आहे की इथे बाहेरचा देखील कुठलाच आवाज येत नव्हता. ध्यान करण्यासाठी ती एक सर्वोत्तम जागा होती. अगदी मन भरून मी ती डोळ्यात साठवून ठेवली. तासनतास याच ठिकाणी बसून राहावे, असे देखील वाटत होते. मध्यभागी असणारी बुद्धमूर्ती शांतता, एकाग्रता आणि प्रसन्नता यांचे प्रतीक असल्याची मला खात्री झाली. एक क्षणी असे देखील वाटून गेले की ही तीच जागा आहे का जिथे एकाच दिवशी लाखो लोक दर्शनासाठी आणि प्रार्थनेसाठी येत असतात. अर्थात त्या दिवशी मी अतिशय भाग्यवान ठरलो. कदाचित कुणालाही न अनुभवता येणारी प्रसन्नता, शांतता आणि मनःशांती मला अनुभवता आली होती!









 

Sunday, September 18, 2022

Vijapurchi Adilshahi (विजापूरची आदिलशाही)

सतराव्या शतकात दक्षिण भारतीय इतिहासावर प्रभाव टाकणारी 'आदिलशाही' ही एक बलशाली राजसत्ता होती. स्वराज्य विस्तार करत असताना शिवाजी महाराजांना अनेकदा बलाढ्य आदिलशाहीशी सामना करावा लागला. परंतु, विजापूरच्या या आदिलशाहीशी संबंधित अतिशय तुरळक माहिती मूळ मराठी ग्रंथांतून वाचायला मिळते. बहामनी साम्राज्यातून उदयास आलेल्या आदिलशाहीच्या उगमापासून अस्तापर्यंत याचे सविस्तर वर्णन असलेला 'बुसातीन-उस-सलातीन' हा पहिला पर्शियन ग्रंथ फकीर महंमद झुबेरी यांनी इसवी सन १८२४ मध्ये लिहिला होता. या ग्रंथाचे मराठी भाषांतर नरसिंहराव विठ्ठल पारसनीस यांनी त्यानंतर सुमारे वीस ते पंचवीस वर्षांमध्ये केले. तसेच मूळ मोडी लिपीमध्ये असणारा हा ग्रंथ इतिहासाचे भीष्माचार्य वा. सी. बेंद्रे यांनी सन १९६८ मध्ये मराठी देवनागरी लिपीमध्ये संपादित केला. हा ग्रंथ म्हणजेच 'विजापूरची आदिलशाही' होय. आदिलशाही राजवटीमध्ये होऊन गेलेल्या सर्व आदिलशहांच्या कारकिर्दीची इत्यंभूत माहिती या ग्रंथांमध्ये वर्णन केलेली आहे. अनेक दुर्मिळ ग्रंथांपैकी असणारा हा एक 'साधनग्रंथ' होय. तो आदिलशाहीच्या दृष्टिकोनातून लिहिला गेलेला आहे. तसेच तो तत्कालीन मराठी भाषेमध्ये त्याचे भाषांतर झाले असल्याने मराठी लेखन कलेच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी देखील महत्त्वाचा असा ग्रंथ आहे!
 

Get this book from here: 

Thursday, September 1, 2022

भयंकर सुंदर मराठी भाषा

समाज जीवन सुधारले, पिढ्या बदलल्या की भाषा देखील बदलत जाते. भाषेमध्ये नवीन शब्द तयार होतात. तसेच जुन्या शब्दांचे नवे अर्थ देखील तयार होतात. यातूनच 'भयंकर' सुंदर असे विशेषण मराठी भाषेला लेखकाने दिले आहे. त्यातूनच तयार झालेले पुस्तक 'भयंकर सुंदर मराठी भाषा' होय. सुमारे वीस वर्षांपूर्वी वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेली ही एक भाषाविषयक उत्कृष्ट लेखमाला होय. मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या तसेच मराठी भाषेच्या सौंदर्याची चिकित्सा करणाऱ्या प्रत्येक वाचकाला आवडेल असेच हे पुस्तक आहे. भाषा वाचताना तसेच दैनंदिन जीवनामध्ये वापरताना आपण अतिशय सहज व सुलभपणे तिचा वापर करत असतो. परंतु त्यातील सौंदर्य आपल्याला ध्यानात येत नाही. लेखकाने अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी या लेखमालेतून सुंदररित्या वाचकांसमोर मांडलेल्या आहेत. त्यांचे विवेचन देखील अतिशय सुंदर आहे. त्यामुळे त्यांच्या भाषा बुद्धीकौशल्याचे कौतुक करावेसे वाटते.
'मराठी असे आमची मायबोली' हे अभिमानाने सांगावे का? या प्रश्नाचे उत्तर हे पुस्तक आपल्याला निश्चितच देईल.


 

Tuesday, August 30, 2022

एक अनपेक्षित भेट

श्री. रमेश खरमाळे म्हणजे जुन्नर आणि परिसरातील प्रत्येकाला माहित असणारे व आपलेसे वाटणारे व्यक्तिमत्व होय. मागील अनेक वर्षांपासून जुन्नरमधील निसर्ग-संपदा व पर्यटन वृद्धीचे महान कार्य खरमाळे सर करत आहेत. मागील आठवड्यामध्ये जुन्नरमध्ये असताना योगायोगाने त्यांची भेट झाली.
तसं पाहिलं तर आम्ही अनेक वर्षांपासून समाज माध्यमांद्वारे एकमेकांना ओळखत होतो. पण त्यादिवशीची भेट ही पहिलीच प्रत्यक्ष भेट होती! एका उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे दर्शन झाल्यामुळे आम्ही दोघेही अर्थात मी आणि आमच्या सौ. भारावून गेलो. त्यांच्या कामाची पावती म्हणून मिळालेली स्मृतिचिन्हे आणि सन्मानपत्रे पाहून आम्हाला त्यांच्या एकूण कार्याची निश्चितच प्रचिती आली.
खरमाळे सरांनी स्वतः लिहिलेले ‘जगेन मायभू तुझ्यासाठी’ हे पुस्तक त्यांनी आम्हाला भेट म्हणून दिले. मागील काही दिवसांमध्ये वेळ मिळेल तसे पुस्तक वाचत होतो. त्यातून खरमाळे सरांच्या एकंदरीत व्यक्तिमत्त्वाची ओळख होत गेली. जुन्नर परिसरातील अडचणीच्या प्रसंगी जीव वाचवण्यासाठी त्यांनी केलेल्या मदतीची हकीकत तसेच जुन्नरमधील अनेक अपरिचित ट्रेकच्या गोष्टी त्यांनी या पुस्तकामध्ये शब्दबद्ध केलेल्या आहेत. आपल्या दैनंदिन जीवनातील कार्य करत असताना आपण समाजाचे देखील देणे लागतो, याची जाणीव विविध प्रसंगांमधून खरमाळे यांनी ठेवल्याचे दिसते. त्यांचे या पुस्तकातील अनुभव निश्चितच प्रेरणादायी असेच आहेत. नव्या पिढीतील तरुणांनी यातून बऱ्याच गोष्टी बोध घेण्यासारख्या आणि शिकण्यासारख्या आहेत.
त्यांच्या या पुस्तकामध्ये वर्णन केलेल्या अनेक ट्रेकच्या वाटा मी देखील अजून सर केलेल्या नाहीत! त्यांचे वर्णन ऐकून या परिसरामध्ये निसर्गामध्ये मुक्तपणे स्वैर करण्याची ऊर्जा निश्चितच प्राप्त होते. 



Saturday, August 13, 2022

प्रकाशतंत्राची रोमहर्षक गाथा

सृष्टीच्या अनेक मुलतत्त्वांपैकी एक म्हणजे प्रकाश होय. जगातील सर्वात वेगवान गोष्ट म्हणजेच प्रकाश होय. प्रकाशाविना विश्व अंधारमय आहे. अशाच प्रकाशतंत्राची रोमहर्षक गाथा अच्युत गोडबोले यांच्या 'प्रकाश' या पुस्तकांमध्ये वर्णिलेली आहे.
अनेक शतकांपासून माणूस प्रकाशाचा वापर दैनंदिन जीवनामध्ये करत होता. प्रकाशाचा मूळ स्त्रोत मात्र सूर्य आहे, असे मानले जायचे. परंतु मानवाने कृत्रिम प्रकाशाची निर्मिती केली. आगीचा शोध लागला. त्यातून प्रकाश कसा निर्माण करायचा? हे मानवाला समजले. तिथून मेणबत्त्या तयार झाल्या आणि विजेचा शोध लागल्यानंतर कृत्रिम प्रकाश दिवे तयार झाले. मनुष्याला प्रकाशामागचं विज्ञान कळत गेलं. हाच प्रकाश मानवी प्रगतीचे एक साधनच बनून गेला. मानवी प्रगतीच्या नव्या पिढ्या घडत गेल्या. विज्ञान प्रगत होत गेलं. तसतसं प्रकाशाचा उपयोग वेगवेगळ्या पद्धतीने विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये होत गेला. याच प्रकाशामुळे मायक्रोस्कोप, टेलिस्कोप, कॅमेरा, फोटोग्राफी टेलिव्हिजन, लेझर आणि फायबर ऑप्टिकचा जन्म झाला. या तंत्रज्ञानाने अनेक विविध प्रकारच्या नव्या शोधांना जन्म दिले. एका अर्थाने प्रकाशाधारित शोध हे विज्ञानाच्या शेकडो शोधांची जननी आहे, असे म्हणावे लागेल.
या सगळ्यांची कहाणी अच्युत गोडबोले यांच्या 'प्रकाश' या पुस्तकामध्ये वाचायला मिळते. यातून आपल्याला भेटतात अनेक ध्येयवेडे तंत्रज्ञ आणि शास्त्रज्ञ! त्यांच्या वेगळेपणामुळे अथवा अभ्यासामुळेच आपण सहज उपलब्ध होणाऱ्या तंत्रविश्वामध्ये वापरत आहोत. त्यांचे स्मरण देखील करणं तितकंच गरजेचं आहे. भविष्यामध्ये मनुष्य प्रकाशाचा वेग गाठायला पाहतो आहे. कदाचित ते काही दशकांमध्ये शक्य देखील होईल. परंतु त्यामागची प्रेरणा काय होती? हेही आपण ध्यानात ठेवायला हवे.

 


 

Thursday, June 23, 2022

द रेस्क्यू

सन २०१८ मध्ये थायलंडमधील थाम लुआंग या नैसर्गिक गुहेमध्ये १३ मुले अडकली होती. फुटबॉल खेळून झाल्यानंतर फिरण्यासाठी ही मुले या गुहेमध्ये पोहोचली. परंतु पावसाचा वेग वाढत असल्यामुळे हळूहळू गुहेमध्ये पाणी शिरायला लागलं. त्यामुळे पाण्यापासून बचावासाठी ती अधिकच आत गुहेमध्ये जाऊन पोहोचली. परतण्याच्या सर्व वाटा बंद झाल्या होत्या. दुसऱ्या दिवशी बाह्यजगताला या मुलांची माहिती मिळाली. गुहेच्या बाहेर सापडलेल्या सायकलींवरुन ही मुले गुहेमध्येच असावीत, असा कयास बांधण्यात आला. पावसाचा जोर वाढतच होता. त्यामुळे मुलांना बाहेर कसे काढायचे? असा प्रश्न देखील प्रशासनाला पडला आणि यातून सुरू झाली जगातली सर्वात मोठी रेस्क्यू अर्थात सुटका मोहीम.
थायलंडमधील या गुहेतील मुलांच्या सुटकेचा थरार जगभरामध्ये लाईव्ह टेलिकास्ट होत होता. ही गुहा पाच ते सहा किलोमीटर लांब आहे. शिवाय अनेक ठिकाणी जाण्यासाठी चिंचोळ्या वाटा आहेत. या वाटांमध्ये पाणी भरलं तर आत मध्ये जाणं केवळ अशक्य आहे. ही बातमी जगातील विविध देशांमध्ये पसरल्यानंतर गुहेमध्ये जाण्यासाठी जगातील सर्वोत्तम डायव्हर्स बोलविण्यात आले. युके, बेल्जियम, ऑस्ट्रेलिया येथील सर्वोत्तम डायव्हर्स थायलंडमध्ये दाखल झाले व त्यांनी जवळपास अडीच आठवड्यांच्या प्रयासानंतर या मुलांची गुहेमधून सुटका केली.
ही मुले गुहेमध्ये अशा ठिकाणी अडकली होती जिथे केवळ जाण्यासाठीच तीन ते साडेतीन तास लागत होते! शिवाय ती पाण्याने भरलेली असल्यामुळे पूर्णपणे अंधारामध्ये होती. जसजसे दिवस जात होते तसतसे ही मुले जिवंत असतील का? हा प्रश्नही गडद होत होता. किंबहुना त्याची शक्यता देखील मावळत चालली होती. परंतु दहा दिवसानंतर पहिला डायवर या मुलांपर्यंत पोहोचला. ती सर्व मुले सुखरूप होती! विशेष म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारची भीती अथवा काळजी दिसत नव्हती. दहा दिवस एका ठिकाणी ही मुले बसून होती. ही त्यांच्या धैर्याची व धाडसाची परीक्षाच म्हणावी लागेल. मुले या गुहेमध्ये सापडल्याची बातमी जगभरातील दूरचित्रवाहिन्यांवर उत्सवासारखी दाखविली गेली. परंतु त्यांना बाहेर कसे काढायचे? हादेखील प्रश्न होताच. यामध्ये दोन ते तीन दिवस गेले. तोपर्यंत मुलांना खाण्याचे पदार्थ व पाणी पुरविण्यात आले होते. त्यांना परत काढण्याच्या मोहिमेमध्ये अजूनही डायव्हर्स सहभागी झाले. दरम्यान थायलँड नौदलाचा एक अधिकारी या मोहिमेत ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्यामुळे मृत्युमुखी पडला होता. विशेष म्हणजे मुले ज्या ठिकाणी अडकली होती, त्या ठिकाणी केवळ १५ टक्के ऑक्सिजन वातावरणात होता. वैज्ञानिकदृष्ट्या १८ टक्क्यांपेक्षा कमी ऑक्सिजन असलेल्या ठिकाणी राहणे मानवासाठी अशक्य अशी गोष्ट आहे. परंतु ही सर्व मुले मात्र अशा वातावरणामध्ये पूर्ण अंधारात देखील जिवंत होती! त्यांना तिथून परत काढताना बेशुद्ध करूनच बाहेर काढले गेले. कारण, परतताना पूर्ण प्रवास पाण्यामधून करायचा होता. शिवाय सर्वत्र अंधारच होता. त्यामुळे तीन तासांच्या या प्रवासामध्ये ती मुले तग धरू शकतील की नाही, ही शंका होतीच. अखेर दोन दिवसांमध्ये सर्व मुलांना बाहेर काढून ही मोहीम यशस्वी झाली.
ही सर्व खरीखुरी रोमांचकारी कहाणी हॉटस्टार वर 'रेस्क्यु' या डॉक्युमेंटरीमध्ये चित्रित करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे यामध्ये वापरण्यात आलेले सर्व फुटेज हे मूळ व्हिडिओ मधूनच घेण्यात आलेले आहे. यात कोणतेही नाट्यरूपांतर वापरले गेलेले नाही. केवळ डॉक्युमेंटरी म्हणून नाही तर एक प्रेरणादायी कहाणी तसेच रोमांचकारी कथा म्हणून देखील तिच्याकडे बघता येऊ शकेल.
 
 
Ⓒ Ⓐ  तुषार भ. कुटे
 

 


Tuesday, June 21, 2022

अदृश्य माणूस

विज्ञान कथांचं जग मनोरंजक आणि तितकच अद्भुत देखील असतं. त्यात अनेकदा अतिशयोक्ती असली तरी 'हे असं घडू शकतं' असंही वाटत राहतं. मराठी साहित्याला विज्ञान कथांचा प्रदीर्घ इतिहास नसला तरी पाश्चिमात्य साहित्यामध्ये मात्र शेकडो वर्षांपासून विज्ञानकथा लिहिल्या जात आहेत.
विज्ञान कथांचे जनक म्हणले जाणारे एच. जी. वेल्स यांची 'अदृश्य माणूस' ही अतिशय रंजक अशी विज्ञान कादंबरी होय. 'इनव्हीजीबल मॅन' या मूळ कादंबरीचा प्रणव सखदेव यांनी मराठी अनुवाद केलेला आहे. ही कादंबरी सन १८९७ मध्ये म्हणजे सव्वाशे वर्षांपूर्वी वेल्स यांनी लिहिली होती. विज्ञान कथा याच काळामध्ये पहिल्यांदा तयार व्हायला लागल्या. त्यात 'इनव्हीजीबल मॅन' ही कादंबरी मोठ्या प्रमाणात गाजली. आज ती वाचत असताना इतकी जुनी असेल असे जराही वाटत नाही. अदृश्य माणूस ह्याच मध्यवर्ती संकल्पनेवर ती आधारित असली तरी त्या भोवती फिरणारा थरार हा लेखकाने अतिशय उत्कृष्टरित्या रंगविलेला आहे. सुरुवातीला पार्श्वभूमी तयार करत असलेला काळ थोडासा कंटाळवाणा वाटतो. कदाचित भाषांतरित कादंबरी असल्याने इंग्रजी माणसांची नावे जुळवून घेण्यास थोडासा वेळ लागत असावा. परंतु अदृश्य माणसाचे जसे जसे रहस्य समोर यायला लागते तसतसा घटनांचा वेग वाढत जातो आणि कादंबरीचा थरार देखील वाढतो. अनेकदा अदृश्य माणसाची कीव देखील येते. कादंबरी वेगाने पुढे सरकत असताना लेखकाने अनेक छोट्या छोट्या गोष्टींचा विचार केलेला आहे. यावरूनच लेखकाचे सूक्ष्म निरीक्षण देखील लगेच ध्यानात येते. हे सूक्ष्म निरीक्षणच या कादंबरी लेखकाचे यश मानावे लागेल. विशेष म्हणजे सुरुवातीची काही पाने सोडली तर ती कुठेही कंटाळवाणी जाणवत नाही. साहस कथा आणि रहस्यकथा तसेच विज्ञानकथा वाचकांसाठी ही मेजवानीच आहे असे म्हणता येईल!


 

Sunday, June 19, 2022

'सजीवांचा नामदाता: कार्ल लिनियस' - उमेश करंबेळकर

मानववंशशास्त्राचा अभ्यास करत असताना आपल्याला होमो सेपियन अस हे नाव नक्की कोणी दिले असावं? असा प्रश्न पडला होता. त्याचे उत्तर देखील मी शोधले होते. तो नामदाता होता, कार्ल लिनियस!
परंतु त्याच्याविषयी अगदीच जुजबी माहिती काही पुस्तकांमध्ये उपलब्ध होती. तीदेखील सारांश रूपामध्ये. अच्युत गोडबोले यांच्या 'किमयागार' या पुस्तकामध्ये लिनियसवर एक पूर्ण प्रकरण लिहिलेले सापडले. त्यातून बरीचशी माहिती मिळाली. शिवाय दीपा देशमुख लिखित 'जग बदलणारे ग्रंथ' या पुस्तकामध्ये जग बदलणाऱ्या पन्नास ग्रंथामध्ये कार्ल लिनियस लिखित 'सिस्टिमा नॅचुरी' या पुस्तकाचा समावेश केलेला आढळला. तेव्हा लिनियस नक्की कोण होता? याविषयी कुतूहल जागृत झाले. म्हणूनच डॉ. उमेश करंबेळकर लिखित 'सजीवांचा नामदाता: कार्ल लिनियस' हे पुस्तक वाचायला घेतले आणि लिनियस नावाच्या वादळाची कहाणी समजून आली.
जगामध्ये पशु, पक्षी, कीटक, जलचर, फळझाडे, फुलझाडे, वृक्ष, वेली अशाच प्रकारचे सजीवांचे गट पाडले जातात. परंतु प्रत्यक्षात लाखो प्रकारचे सजीव या पृथ्वीवर अस्तित्वात आहेत. त्यातील अजूनही काही सजीवांशी मनुष्याचा संपर्क झालेला नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात असलेल्या सजीवांची वर्गवारी करणारा शास्त्रज्ञ म्हणजे कार्ल लिनियस होय! त्याने सजीवांचा हा पूर्ण पसारा एका सिस्टीममध्ये मांडला. शिवाय त्या प्रत्येकाला नाव दिलं. त्याचं वर्गीकरण केलं. त्यातूनच सजीवांच्या जातीची ओळख झाली. ही नामकरण पद्धत जीवशास्त्राने कायमची स्वीकारलेली आहे. म्हणूनच काल लिनियस याला 'सजीवांचा नामदाता' असे म्हटले जाते.
स्विडन म्हटलं की विज्ञानविश्वाला आठवतो तो 'अल्फ्रेड नोबेल'. याच स्वीडनमध्ये तीनशे वर्षांपूर्वी कार्ल लिनियसचा जन्म झाला. पहिल्यापासूनच तो निसर्ग वेडा होता. त्याने वनस्पती संशोधनासाठी केलेली लॅपलँड या स्वीडनमधील जंगलाची सफर मात्र अद्भुत आणि रोमहर्षक अशीच होती. आजही आपण कोणी भारतातल्या जंगलांमध्ये इतके दिवस एकट्याने सफर करू शकत नाही. त्यामुळे लिनियसची ही भटकंती धाडसी अशीच म्हणता येईल. आपल्या आयुष्यातील अनेक दशके त्याने निरनिराळ्या सजीवांचा शोध घेतला व त्यांचे वर्गीकरण केले. त्यासाठी त्याने भटकंती देखील मोठ्या प्रमाणात केली. एका अर्थाने तो आपल्या जीवनातील ध्येयाने प्रेरित झालेला होता. शिवाय त्याला अनेक संशोधक शिष्यदेखील लाभले. याच शिष्यांनी जगभरामध्ये प्रवास करून विविध देशांतील जंगलांमधून वनस्पतींचे नमुने गोळा करून त्याला दिले. लिनियसचे शिष्य जगातील जवळपास प्रत्येक जंगलांमधून भटकले होते. याच कारणास्तव त्याचे 'सिस्टीमा नॅचुरी' हे परिपूर्ण पुस्तक तयार झाले. त्याची पहिली आवृत्ती १३ पानांची तर तेरावी आवृत्तीत तेवीसशे पानांची तयार झाली होती. अशा या ध्येयवेड्या वनस्पतीशास्त्रज्ञाचा प्रवास सांगणारं हे पुस्तक, 'सजीवांचा नामदाता: कार्ल लिनियस'!


 

Saturday, June 18, 2022

विकिपीडियाला मदत करा

इंटरनेट म्हणजे माहितीचा महासागर होय. या महासागराला समृद्ध करणारी वेबसाईट म्हणजेच 'विकिपीडिया'. बहुतांश संज्ञा आपण जेव्हा गुगलमध्ये शोधतो तेव्हा देखील आपल्याला विकिपीडियाच्या पानांची लिंक समोर दिसते. विकिपीडिया हा जगातील अनेक लेखकांनी तसेच संपादकांनी समृद्ध केलेला माहितीचा स्त्रोत आहे. येथील माहिती अगदी नगण्य प्रमाणात अविश्वासार्ह मानली गेली असली तरी बहुतांशी माहिती आपल्याला ज्ञानस्वरूपात प्राप्त होत असते. किंबहुना आम्ही देखील बऱ्याच वेळा विकिपीडिया वरील माहितीचा वापर करत असतो. विशेष म्हणजे बहुतांश माहितीला माहितीचे स्त्रोत व संदर्भ दिलेले असतात. त्यामुळे तिच्या विश्वासार्हतेवर शंका घेता येत नाही.
आजपर्यंत आम्ही देखील मोठ्या प्रमाणात विकिपीडियावरील लेखांचा उपयोग वाचनासाठी व नवीन ज्ञानग्रहण करण्यासाठी केलेला आहे. परंतु काल विकिपीडिया उघडली तेव्हा त्यांचं हे निवेदन समोर दिसलं. विकिपीडिया हा मोफत उपलब्ध करून देण्यात आलेल्या ज्ञानचा स्त्रोत आहे. त्यावरील माहिती वाचण्यासाठी आपल्याला कोणतेही अकाउंट लागत नाही किंवा पैसेही द्यावे लागत नाहीत! आज-काल आपल्या ऑनलाईन वर्तमानपत्रांमध्ये लेख वाचण्यासाठी देखील आपल्याला पैसे द्यावे लागतात, अशी परिस्थिती आहे. याउलट विकिपीडिया मात्र आपल्याला माहितीचा साठा मोफत उपलब्ध करून देते. ही गोष्ट कौतुकास्पद अशीच आहे. परंतु त्या बदल्यात आपण विकिपीडिया ला काय देतो? या प्रश्नाचे उत्तर देखील शोधावे लागेल. विकिपीडियाने दिलेल्या माहितीनुसार केवळ दोन टक्के वाचक हे त्यांना डोनेट अर्थात पैसे दान करत असतात. याच गोष्टींवर विकिपीडिया टिकून आहे. हा आकडा खरोखरच वाढायला हवा, असे आम्हाला देखील वाटते. माहितीचा जगातील सर्वात मोठा स्त्रोत हा टिकून राहायला हवा, त्यासाठी त्यांनी आपल्याकडून आर्थिक मदतीची अपेक्षा केली तर चुकीचे ठरणार नाही. अगदी पन्नास रुपयांपासून आपण विकिपीडियाला डोनेट करू शकतो जेणेकरून माहितीचा हा स्त्रोत टिकून राहील आणि भविष्यामध्ये अधिक समृद्ध होत राहील.
(या पोस्टपूर्वीच आम्ही विकिपीडियाला डोनेशन दिले आहे)