Saturday, July 27, 2024

एक मार्गदर्शन

एका तंत्र शिक्षण कार्यक्रमामध्ये माझे प्रशिक्षण सुरू होते. जवळपास महिनाभराचा कार्यक्रम होता. बहुतांश विद्यार्थी मन लावून अभ्यास करताना दिसत होते. त्यातीलच एक विद्यार्थी सकाळी बरोबर वेळेवर वर्गात पोहोचायचा, अतिशय तन्मयतेने सर्व तासिकांना हजेरी लावायचा आणि दिलेला अभ्यास देखील वेळेवर पूर्ण करायचा.
एक दिवस दुपारी जेवणाची मधली सुट्टी झाली. मी बाहेर निघत असतानाच त्याने मला थांबवले आणि बोलू लागला,
“नमस्कार सर, मी तुमचं फेसबुक प्रोफाईल बघितलं.”
त्याच्या चेहऱ्यावरील माझ्याबद्दलची उत्सुकता बघून मी देखील चमकलो. तो पुढे बोलू लागला,
“सर तुमच्या सगळ्या पोस्ट मराठी मधून असतात. खूप भारी वाटतं वाचायला. आपल्यातलंच कोणीतरी लिहिलेलं आहे असं वाटतं. इथं शिकवताना तुम्ही सर्वकाही इंग्रजीतून शिकवता. ते पण छान वाटतं आणि सर्वकाही समजतं. तुम्ही कोणत्या शाळेतून शिकला आहात सर?”
त्याच्या या प्रश्नाने माझ्या चेहऱ्यावर आपोआपच स्मित उमटले. आणि मी त्याला उत्तर दिले.
“अर्थातच मराठी शाळेत. माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये झालेलं आहे. आणि दहावीपर्यंत पूर्ण मराठी माध्यमातून शिकलेलो आहे.”
“मग तुम्ही इतकं चांगलं इंग्रजी कसं बोलू शकता?”, त्याचा पुढचा प्रश्न.
“कसं आहे मित्रा… जर तुमचं तुमच्या मातृभाषेवर प्रभुत्व असेल तर तुम्ही इतर कोणतीही भाषा अतिशय सहजपणे शिकू शकता. माझंही असंच झालय. इंग्रजी शिकताना, बोलताना मी इतर कुठल्याही अन्य भाषेचा विचार केला नाही. किंवा पर्याय देखील शोधला नाही. बाहेरून आपल्या भागात आलेले लोक मराठी कसे बोलू शकतात? कारण त्यांनी जर मराठी ऐकली तरच हे शक्य आहे. तसेच मी देखील करतो. तुम्ही इंग्रजी ऐकली तरच तुम्ही ती बोलू शकता. आणि मातृभाषेतून शिकल्यामुळे मला कोणतीही गोष्ट अतिशय पटकन समजायला लागते. कदाचित याचमुळे मराठी इतकीच इंग्रजी देखील मला सहज जमत असावी.”
याशिवाय त्याला मार्गदर्शनपर इतर अनेक गोष्टी मी सांगितल्या. त्याला देखील त्या पटल्या. एक वेगळाच उत्साह त्याच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. शिवाय त्याचा आत्मविश्वास वाढविण्यास माझी मदत झाली, याचे देखील मला समाधान लाभले. 

Friday, July 19, 2024

दोष

एका राष्ट्रीय शिक्षण संस्थेतून संस्थेतील प्रशिक्षण कार्यक्रम नुकताच संपला होता आणि त्यांचे कंपन्यांसाठी प्लेसमेंट ड्राईव्ह सुरू होते. एक दिवस असाच प्रशिक्षण पूर्ण केलेल्या एक विद्यार्थी मला संस्थेमध्ये भेटला. मी त्याला विचारले, 

“झाले का रे प्लेसमेंट?”

“नाही ना सर अजून.”

“अरे मी पण ऐकलंय की ८० टक्के मुलांचे प्लेसमेंट झालेले आहे.”

“सर ते सगळे साउथ आणि नॉर्थ इंडियन आहेत. तुम्हाला माहितीये ना त्यांची इंग्रजी किती भारी असते. म्हणून मिळाला त्यांना जॉब!”. मला त्याच्या या उत्तराचा राग आला. मी त्याला तात्काळ सुनावले.

“तू तर इंग्लिश मीडियमचा आहेस ना. मग काय प्रॉब्लेम झाला? आणि मुर्खा साउथ इंडियन लोकांचा कौतुक मला नको सांगू. जेव्हा इंग्रजी बोलायची वेळ येत होती तेव्हा तू हमरे-को तुमरे-को करत बोलत होता, हे पाहिलेय मी. त्या साउथ इंडियन लोकांसाठी त्यांची भाषा आणि इंग्रजी या दोनच भाषा महत्त्वाच्या. आणि नॉर्थ इंडियन साठी हिंदी आणि इंग्रजी या दोन. तुम्ही बसा हमरे-को तुमरे-कोला कवटाळून. आणि दोष इतरांना द्या.”


आजही जेव्हा इंग्रजी बोलायची वेळ येते तेव्हा मराठी मुले हमरे-को तुमरे-कोच्या भाषेला प्राधान्य देतात. आणि सरळ सरळ इंग्रजी बोलायचं टाळतात. खरंतर ही तिसरी भाषा आपल्यावर थोपवल्याने आपलं नुकसान तर झाले नाहीये ना, याचा विचार करण्याची वेळ आलीये. 


  • तुषार भ. कुटे.  


Thursday, July 18, 2024

लुझिंग लीना

जून-जुलै १९७३ चा काळ असेल. दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठातील प्राध्यापक अलेक्झांडर सौचुक यांच्या सिग्नल आणि इमेज प्रोसेसिंगवर काम करणाऱ्या एका विद्यार्थ्याला आणि संगणक प्रयोगशाळा सहाय्यकाला त्यांच्या प्रयोगासाठी एक उत्तम इमेज अर्थात चित्र हवे होते. संगणकीय अल्गोरिदम इमेजेस वर अर्थात चित्रांवर व्यवस्थित चालतात की नाही हे पाहण्यासाठी त्यांना योग्य ते चित्र मिळत नव्हते. त्या काळात वापरण्यात आलेली ठेवणीतील चित्रे त्यांनी वापरून बघितली, परंतु त्यातून हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. शिवाय त्याच त्याच इमेजेस वापरून ते कंटाळले होते. त्यांना काहीशी वेगळी, डायनामिक, सुंदर अशी नवी कोरी इमेज हवी होती. या इमेजद्वारे ते आपल्या अल्गोरिथम नवीन शोधनिबंधामध्ये प्रकाशित करू इच्छित होते. आणि अचानक त्यांना अमेरिकेतील प्रसिद्ध ‘प्लेबॉय’ या नियतकालिकाच्या आतील पानांमध्ये मध्यभागी दोन पानांवर छापलेली एक इमेज दिसून आली. ती एका स्वीडिश मॉडेलची होती. तिचे नाव…  लीना फॉरसेन.

लीनाचे हे चित्र उभे आयताकृती आणि बऱ्यापैकी मोठे होते. परंतु त्यांनी या चित्राच्या चेहऱ्याकडचा चौरसाकृत भाग ५१२ * ५१२ अशा पिक्सल रिझोल्युशन मध्ये कापून घेतला आणि संगणकामध्ये RGB चॅनल्सचा वापर करून साठवून ठेवला. याच चित्राचा वापर करून त्यांनी आपले अल्गोरिथम शोधनिबंधामध्ये प्रकाशित केले. या शोधनिबंधाचा संदर्भ घेऊन पुढे हळूहळू  इमेज प्रोसेसिंगवर काम करणाऱ्या अन्य संशोधकांनी देखील या चित्राचा वापर करायला सुरुवात केली. अल्पावधीतच हे चित्र लोकप्रिय होऊ लागले. बहुतांश विद्यार्थी आणि संशोधक याच चित्राचा वापर करून इमेज प्रोसेसिंगचे अल्गोरिथम प्रकाशित करू लागले. याच विषयावर लिहिण्यात आलेल्या पुस्तकांमध्ये देखील लिहिण्याच्या चित्राचा वापर होऊ लागला. प्रामुख्याने पुरुष संशोधकांचा वर्चस्व असणाऱ्या या क्षेत्रात पहिल्यांदाच एका स्त्रीच्या चित्राचा इमेज प्रोसेसिंगच्या अल्गोरिथमसाठी वापर करण्यात आला होता. १९९५ मध्ये संगणकामध्ये सर्वाधिक वेळा वापरण्यात येणाऱ्या चित्रांमध्ये या चित्राचा पहिला क्रमांक लागला. जेव्हा ‘प्लेबॉय’ या नियतकालिकाला ही गोष्ट समजली तेव्हा त्यांनी कॉपीराईटचा दावा देखील दाखल केला. परंतु या चित्राची उपयुक्तता लक्षात आल्यानंतर कालांतराने नियतकालिकाने हा दावा मागे देखील घेतला होता. १९९१ मध्ये ऑप्टिकल इंजिनिअरिंगच्या सर्वोत्तम जर्नलच्या मुखपृष्ठावर देखील लीनाचे चित्र झळकले. तिथून या चित्राची लोकप्रियता अधिक वाढीस लागली. IEEE या प्रख्यात संस्थेच्या जर्नलमध्ये सर्वप्रथम १९९९ मध्ये तीन वेगवेगळ्या शोधनिबंधात लीना या चित्राचा वापर करण्यात आला होता. इथून पुढे IEEE च्या इमेज प्रोसेसिंग वरील बहुतांश शोधनिबंधामध्ये याच चित्राचा वापर होत गेला. विशेष म्हणजे या चित्राची लोकप्रियता वाढल्यानंतर लीना फॉरसेन या स्वीडिश मॉडेलला देखील दोन वेगवेगळ्या संशोधन कार्यक्रमांमध्ये आमंत्रित देखील करण्यात आलं होतं. शिवाय त्यातील एका कॉन्फरन्समध्ये तिने भाषण देखील दिलं! IEEE च्या इमेज प्रोसेसिंग जर्नलचे मुख्य संपादक डेव्हिड मुन्सन यांच्यामध्ये लीनाच्या या चित्रामध्ये इमेज प्रोसेसिंग मध्ये काम करणाऱ्या संशोधकांना हवी असलेली सर्व माहिती मिळून जाते. म्हणूनच ‘संगणक दृष्टी’च्या या विश्वात या चित्राचे अनन्य साधारण महत्त्व आहे. 

लीनाच्या चित्राच्या वापरावरून अनेक संशोधन करणाऱ्या संस्थांमध्ये वाद देखील झाले. शिवाय या चित्राला पर्याय शोधण्याचे देखील प्रयत्न झाले.. अर्थातच हा बदल सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही दृष्टीतून योग्य असाच होता. सन २०१८ मध्ये नेचर नॅनोटेक्नॉलॉजी आणि ऑप्टिकल इंजीनियरिंग अशा दोन्ही जर्नलने जाहीर केले की इथून पुढे लीनाची इमेज ते वापरणार नाहीत. परंतु आजही लोकप्रियतेच्या बाबतीत या चित्राने गाठलेले विक्रम अन्य कोणतेही चित्र मोडू शकलेले नाही, हेही तितकेच सत्य आहे.

इमेज प्रोसेसिंगमध्ये वर्षानुवर्षे वापरण्यात येणाऱ्या अल्गोरिथममध्ये आजही ही इमेज तितक्याच प्रभावीपणे आपले निकाल दाखवते. सन २०१९ मध्ये ‘लुझिंग लीना’ नावाची एक डॉक्युमेंटरी देखील प्रकाशित झाली होती. त्यामध्ये म्हटले होते की ‘बऱ्याच वर्षांपूर्वीच मी मॉडेलिंग मधून निवृत्त झाले आहे, आता वेळ आहे तंत्रज्ञानातून देखील निवृत्त होण्याची!’ पण ही निवृत्ती अधिकृतपणे होण्यासाठी त्यांना पाच वर्षे जावी लागली.  

१ एप्रिल २०२४ मध्ये IEEE ने जाहीर केले की इथून पुढे कोणत्याही प्रकाशनामध्ये संशोधक लीनाची इमेज वापरू शकणार नाहीत. असे असले तरी इमेज प्रोसेसिंग क्षेत्रामध्ये लीनाने जी इमेज बनवली आहे, ती क्वचितच एखादी दुसरी इमेज स्वतः बनवू शकेल!

(लीनाचे मूळ छायाचित्र छायाचित्रकार ड्वाईट हूकर यांनी काढले आहे.)


  • तुषार भ. कुटे


(सोबतचे चित्र: लीना फॉरसेन तिच्या सुप्रसिद्ध छायाचित्रासह!)

 


 

Monday, July 1, 2024

द. आफ्रिकेचा पराभव

सामन्यातला शेवटचा चेंडू टाकला गेला आणि भारत विजयी झाला. याचबरोबर भारतीय आणि प्रतिस्पर्धी दक्षिण आफ्रिका संघातील खेळाडूंच्या डोळ्यात देखील अश्रू होते परंतु त्यामध्ये जमीन आसमानाचा फरक होता. दक्षिण आफ्रिकेच्या तोंडातला घास हिरावून भारताने विश्वचषकावर आपले नाव कोरले होते. यावेळी पहिल्यांदाच प्रतिस्पर्धी संघाविषयी देखील भारतीयांना वाईट वाटून गेले. कारण यावेळेसचा प्रतिस्पर्धी पाकिस्तान किंवा बांगलादेश सारखा माजोरडा आणि शत्रुत्व राखणारा नव्हता किंवा इंग्लंड अथवा ऑस्ट्रेलियासारखा उन्मादी देखील नव्हता. क्रिकेटचा जेंटलमन्स गेम हे नाव सार्थ करणारा तो दक्षिण आफ्रिकेचा संघ होता.
मागच्या कित्येक वर्षांपासून मोक्याच्या क्षणी मान टाकणारा अर्थात चोकर्स म्हणून या संघाची अपख्याती होती. यावर्षी त्यांना त्यांच्यावरील हा डाग पुसण्याची संधी मिळाली होती. परंतु त्यांना विजय पताका फडकवता आली नाही. यावरून या संघाचे तसेच त्यांच्या सांघिक कामगिरीचे महत्त्व कमी होत नाही. भारतीय संघाप्रमाणेच त्यांनी देखील पूर्ण विश्वचषकात शंभर टक्के यश मिळवले. पण अंतिम क्षणी विजेता आणि उपविजेत्यामध्ये काही इंचाचेच अंतर राहून गेले.
दक्षिण आफ्रिका देखील पूर्ण सामन्यामध्ये विजेत्यासारखा खेळला परंतु त्यांना विजयी होत आले नाही. याचे संवेदनशील क्रिकेट रसिकांना देखील वाईट वाटून गेले. कारण या भावना नोव्हेंबर २०२३ मध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यानंतर भारतीयांच्या देखील होत्या. त्यामुळे आपण त्यांचे दुःख निश्चितच समजू शकतो. एक उत्तम प्रतिस्पर्धी म्हणून दक्षिण आफ्रिका संघाचा भारतीय क्रिकेट रसिकांना निश्चितच आदर आहे. क्रिकेट या खेळाला त्यांनी एका उंचीवर नेऊन ठेवलेले आहे. विश्वचषकातील एका पराभवामुळे त्यांचे महत्त्व निश्चितच कमी होत नाही.
त्यांच्या आजवरच्या कामगिरीला मनापासून सलाम. त्यांच्या या पहिल्या अंतिम सामन्याच्या अनुभवातून बोध घेऊन ते पुढील विश्वचषकात याहीपेक्षा चांगली कामगिरी ते करतील, अशी आशा करूयात.



Sunday, May 26, 2024

CNNs (Convolutional Neural Networks) कसे कार्य करतात?

डीप लर्निंगमधील CNNs (Convolutional Neural Networks) कसे कार्य करतात याचे एक विलक्षण प्रात्यक्षिक!
हा व्हिडिओ दर्शवितो की प्रतिमा लहान करणे म्हणजे नेहमीच महत्त्वाचे तपशील गमावणे असा होत नाही. हे लक्षात घ्या की प्रतिमा खूपच लहान असूनही, आपण स्पष्टपणे पाहू शकतो की या चित्रामध्ये कुत्रा आहे!
याचा अर्थ जर सुरुवातीच्या प्रतिमेच्या फक्त २५% भागामध्ये ती काय आहे, हे शोधण्यासाठी पुरेशी माहिती असेल तर आपण फक्त त्या भागावर लक्ष केंद्रित करू शकतो. अशा प्रकारे, आपल्याला CNN मध्ये संपूर्ण प्रतिमेसह कार्य करण्याची गरज नाही, ज्यामुळे गोष्टी अधिक सोप्या आणि जलद होतात.


(संकलित)


 

कोणत्याही क्षेत्रातील सर्जनशीलतेची शक्ती

➡️ नवकल्पनांना प्रोत्साहन:
सर्जनशीलता नवीन कल्पना तसेच समस्यांवर उपाय सुचवते.
ती व्यवसायांना स्पर्धात्मक बाजारपेठांमध्ये पुढे राहण्यास मदत करते.

➡️ समस्या चुटकीसरशी सोडवते:
सर्जनशील विचारांना अद्वितीय दृष्टीकोन देते.
ती आव्हानांचे संधीत रूपांतर करते.

➡️ उत्पादकता वाढवते:
"आउट-ऑफ-द-बॉक्स" विचारांना प्रोत्साहन देते.
कार्यक्षमता आणि उत्पादकता वृद्धिंगत करते.

➡️ अनुकूलता वाढवते:
सर्जनशीलता बदल सहजतेने करण्यात मदत करते.
तसेच कार्यात लवचिकता तयार करते.

➡️ सहयोग सुधारते:
विविध कल्पना आणि संघशक्तीला प्रोत्साहन देते.
अधिक समृद्ध, आणि अधिक प्रभावी परिणामांकडे नेते.

➡️ वैयक्तिक वाढीस चालना देते:
सतत शिकण्यास आणि विकासाला प्रोत्साहन देते.
तसेच आपल्याला सतत उत्सुक आणि प्रेरित ठेवते.

तुमचे कार्य आणि जीवन बदलण्यासाठी सर्जनशीलतेची शक्ती स्वीकारा! 🚀

(संकलित)


 

🚀 वैद्यकीय क्षेत्राचे भविष्य: हेड ट्रान्सप्लांट आणि एआयचा वापर! 🧠

अशा जगाची कल्पना करा जिथे डोके प्रत्यारोपण ही केवळ साय-फाय संकल्पना नसून एक वैद्यकीय वास्तव आहे! एमआयटी न्यूजनुसार, भविष्यात हे शक्य होऊ शकते! हे जितके महत्त्वाचे वाटते तितकेच, अशा वैद्यकीय सीमांना पार करण्यात एआय ची भूमिका निश्चितच सर्वात महत्वाची असणार आहे.
सर्जिकल प्लॅनिंग, रिअल-टाइम मॉनिटरिंग आणि पोस्टऑपरेटिव्ह केअरमध्ये एआय ची अचूकता ही भविष्यातील असे प्रकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. न्यूरल नेटवर्क सिम्युलेशनपासून रोबोटिक-सहाय्यित शस्त्रक्रियांपर्यंत, एआय आणि मानवी नवकल्पना यांचा समन्वय अभूतपूर्व वैद्यकीय प्रगतीचा मार्ग मोकळा करत आहे, असं दिसतं!

संदर्भ: एमआयटी न्यूज.


 

Sunday, May 19, 2024

स्टॅटिस्टिक्स

स्टॅटिस्टिक्स अर्थात सांख्यिकी म्हणजेच संख्याशास्त्राचा अभ्यासक्रमामध्ये शालेय जीवनात अथवा महाविद्यालयीन जीवनामध्ये माझा कधीही संबंध आला नाही. जवळपास १० ते १२ वर्षांपूर्वी जेव्हा पहिल्यांदा मशीन लर्निंग शिकायला आणि शिकवायला सुरुवात केली तेव्हा संख्याशास्त्राची खऱ्या अर्थाने मला स्वतःला गरज भासू लागली. स्टॅटिस्टिक्स हे केवळ नावच ऐकले होते आणि असेही ऐकून होतो की ती गणिताचीच एक शाखा आहे. आज दशकभरामध्ये या विषयातील सर्व संकल्पना नक्की काय आहेत? त्यांचा व्यवहारिक जीवनामध्ये काय उपयोग होतो? याची व्यवस्थित माहिती झाली आहे
कदाचित डेटा सायन्स या विषयाला हात घातल्यामुळे संख्याशास्त्र कोळून प्यायची सवय झालेली आहे. डेटा सायन्स मुळेच संख्याशास्त्राचीही मला ओळख झाली. गणिताचाच एक भाग वाटत असला तरी व्यवहारिक पद्धतीने संख्यांचा उपयोग कशा पद्धतीने होतो हे संख्याशास्त्र आपल्याला सांगते. इंटरनेटवर उपलब्ध असणाऱ्या साधनांचा वापर करून, इंग्रजी पुस्तके वाचून तसेच विविध लेखकांनी लिहिलेले ब्लॉग वाचून मी संख्याशास्त्र शिकत गेलो आणि याच कारणास्तव डेटा सायन्स अधिक उत्तमरीत्या समजायला लागले. गणित तसं पाहिलं तर अवघड नाही परंतु त्याचा व्यवहारीक उपयोग लक्षात आला तरच ते ध्यानात राहते हे समजले. गणितापेक्षा संख्याशास्त्र अधिक सुलभ आहे. या विषयावर आधारित माझ्या पाहण्यात तरी एकही मराठी पुस्तक उपलब्ध नव्हते.
अच्युत गोडबोले आणि डॉ. अमिता धर्माधिकारी यांनी लिहिलेले “स्टॅटिस्टिक्स” हे पुस्तक जेव्हा हाती लागले तेव्हा लगेचच भराभरा ते वाचून काढले. एका अर्थाने ही माझ्यासाठी उजळणीच होती. मला या संकल्पना नव्याने माझ्या भाषेतून वाचायला मिळाल्या. केवळ एवढेच नाही तर संख्याशास्त्रातील काही मूलभूत संकल्पना आणखी व्यवस्थित समजल्या. जसे एवरेज आणि मीन मधील फरक, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्यूशनचा उपयोग.
प्रोबॅबिलिटीचा आणि संख्याशास्त्राचा लोकसंख्याशास्त्र आणि विमा विज्ञानामध्ये असणारे उपयोग, याशिवाय भारतीय संख्या शास्त्रज्ञांची माहिती आणि विशेष म्हणजे या विषयातील कोडी, दिशाभूल आणि गमतीजमती या गोष्टी मला नव्याने या पुस्तकाद्वारे समजल्या. तसं पाहिलं तर कोणताही तांत्रिक विषय मराठीतून मांडणं अतिशय अवघड आहे. अर्थात हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. तरीदेखील लेखक द्वयीनी संख्याशास्त्राचा सखोल ऊहापोह आणि अभ्यास या पुस्तकाद्वारे केल्याचे दिसते. काही संकल्पना नवशिक्यांना समजण्यासाठी अवघड आहेत. अर्थात त्यांचा व्यवहारिक उपयोग दर्शवून दिल्यास त्या आणखी व्यवस्थित समजू शकतील असे वाटते. प्रोबॅबिलिटी आणि प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्यूशन ही संकल्पना अजूनही अभियांत्रिकी आणि विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना फारशी लवकर समजत नाही. तसेच त्याचे व्यवहारिक उपयोग देखील ध्यानात येत नाहीत. खरंतर प्रेडिक्टिव्ह अनालिटिक्स साठी हे अतिशय उपयुक्त तत्व आहे. त्याची मांडणी आणखीन व्यवस्थितपणे व्हायला हवी असं वाटून जातं. बाकी डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स ते इनफरन्शियल स्टॅटिस्टिक्स ची इत्यंभूत माहिती आपल्याला या पुस्तकाद्वारे वाचायला मिळते. शिवाय बहुतांश संकल्पनांचा इतिहास देखील लेखकांनी यामध्ये दिला असल्याने ती अधिक रंजक वाटते. संख्याशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येक मराठी व्यक्तीसाठी हे पुस्तक म्हणजे एक उत्तम संदर्भ ग्रंथ होईल असेच आहे.
या पुस्तकाची जमेची बाजू म्हणजे यातील दिलेली उदाहरणे. या उदाहरणाद्वारे संख्याशास्त्राचा व्यवहारिक उपयोग कसा करता येतो, किंबहुना अनेक प्रश्नांची उकल संख्याशास्त्राद्वारेच कशी करता येते याची माहिती वाचकांना होते. अच्युत गोडबोले यांच्या पुस्तकामध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात इंग्रजी शब्दांचा भरणा दिसून आला. त्यातील  बऱ्याचशा शब्दांना उत्तम मराठी प्रतिशब्द आहेत. त्यांचा वापर करता आला असता. जसे सिस्टीम= प्रणाली, रूल= नियम, मेथड= पद्धती, एक्सपेरिमेंट= प्रयोग, प्रोबॅबिलिटी= संभाव्यता, सिलेक्शन= निवड, मार्क्स= गुण, एवरेज= सरासरी, रेट=दर, रॉ=कच्चा/अपरिपक्व, नंबर=क्रमांक, फॉर्म्युला= सूत्र, डायमेन्शन= मिती, अनालिसिस=विश्लेषण, टेक्निक= तंत्र, टेस्ट= चाचणी, थियरम= प्रमेय, टेबल= तक्ता/सारणी, इंजीनियरिंग= अभियांत्रिकी, प्रॉडक्ट= उत्पादन, ड्रॉईंग=आकृत्या इत्यादी.
लोकसंख्याशास्त्र, जीवनसारणी आणि विमाविज्ञानाविषयीचे  प्रकरण आणि गोळाबेरीज नावाचे प्रकरण हे प्रत्येक संख्याशास्त्रज्ञाला माहित असावे असेच आहे. एकंदरीत आज सर्वाधिक नोकरीच्या संधी ज्या क्षेत्रामध्ये उपलब्ध आहेत त्या डेटा सायन्सला शिकण्यापूर्वी संख्याशास्त्राचा पाया मजबूत असणे गरजेचे आहे. त्यासाठी हे पुस्तक उत्तम मार्गदर्शक म्हणून काम करेल. 

- तुषार भ. कुटे



Sunday, May 5, 2024

उत्तर कोरिया: जगाला पडलेलं एक कोडं

उत्तर कोरिया म्हणजे जगातील सर्वात गुढ देश होय. अर्थात अमेरिकेसारख्या बलाढ्य महासत्तेला न जुमानणारा देश कसा असेल? याविषयी सर्वांच्याच मनात उत्सुकता आहे. शिवाय सातत्याने विविध प्रसंगी उत्तर कोरियातील प्रशासन व्यवस्थेविषयी तसेच तिथल्या राजकीय व्यवस्थेविषयी बातम्या प्रसारित होतच असतात. त्यातून असं लक्षात येतं की उत्तर कोरिया म्हणजे एक स्वतःचे वेगळे विश्व आहे. हे विश्व नक्की कसं तयार झालं? आणि इथली माणसं अशा विचित्र विश्वामध्ये कशा पद्धतीने राहतात? याविषयी प्रत्येकाच्या मनात उत्सुकता आहे, या सर्वांचं उत्तर देणार हे पुस्तक म्हणजे "उत्तर कोरिया: जगाला पडलेलं एक कोडं".
कोरियाच्या इतिहासाची सुरुवात होते ती जपानी आक्रमणापासून. जपानने अनेक वर्ष इथल्या लोकांना गुलामगिरीखाली वागवलं. परंतु कालांतराने या देशाच्या विचारधारेमुळे त्याचे उत्तर आणि दक्षिण असे दोन तुकडे झाले. १०० वर्षांपूर्वीच्या कोरियामध्ये उत्तर भाग हा अधिक समृद्ध तर दक्षिण भाग हा गरीब होता. पण उत्तर कोरियाने हळूहळू हुकूमशाहीच्या दिशेने वाटचाल चालू केली. एखाद्या देशामध्ये हुकूमशाही नक्की कशी सुरू होऊ शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे उत्तर कोरिया होय! जर्मनीमध्ये एकेकाळी असणारी हिटलर प्रणित हुकूमशाही आणि आज उत्तर कोरिया मध्ये असणारी एकाच घराण्याची हुकूमशाही यात काहीसा फरक असला तरी फलित मात्र एकच आहे. लोकशाहीपेक्षा हुकूमशाही बरी हे जेव्हा एखाद्या देशाची जनता स्वतः मानू लागते तेव्हाच ते हळूहळू वैचारिक गुलाम होत जातात आणि राजेशाही नसली तरी विशिष्ट घराण्याला आपलं मानून त्यांचे नियमच शिरसावंद्य मानले जातात. स्वातंत्र्य म्हणजे काय, याचा अर्थ देखील ते समजून घेत नाहीत. एका डबक्यातल्या बेडकासारखी त्यांची अवस्था होते. बाहेरच्या जगात काय चाललंय, हे देखील त्यांना माहीत नसतं. अशीच काहीशी अवस्था उत्तर कोरियन नागरिकांची आहे. याचे विस्तृत विवेचन या पुस्तकाद्वारे लेखक अतुल कहाते यांनी अतिशय उत्तमरीत्या केलेले आहे.


 

Wednesday, May 1, 2024

नाच गं घुमा

ठाण्यातल्या उच्चभ्रू रहिवासी भागामध्ये राहणारे त्रिकोणी कुटुंब. यातील राजा आणि राणी अर्थात नवरा आणि बायको दोघेही वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये जॉबला आहेत. आणि त्यांची मुलगी शाळेमध्ये शिकतेय. अर्थात याच कारणास्तव त्यांच्या घरी घरकाम करण्यासाठी कामवाली बाई आहे.

त्यांचा दिवस सुरू होतो सकाळी सात वाजल्यापासून. घरातली सर्वच कामे कामवाली बाई अर्थात आशाताई अगदी तन्मयतेने करतेय. दिवसातील बारा तास वेळ ती या घरात घालवते. अर्थात घराची सर्वच जबाबदारी तीच्याकडेच आहे.  बहुतांश वेळा ती कामाला उशिरा पोहोचते. त्यामुळेच एक दिवस वैतागून राणी आशाताईला कामावरून काढून टाकते. आणि दुसरी बाई शोधायला लागते. पण तिला हवी तशी बाई मिळत नाही. मग पुन्हा आशाताईला कामावर बोलावले जाते. परत काही दिवसांनी एका घटनेमुळे तिला काम सोडावे लागते. यानंतर मात्र राणीची फारच पंचाईत व्हायला लागते. आशाताई आपल्यासाठी काय काय करू शकतात, किंबहुना काय करतायेत? याची जाणीव तिला व्हायला लागते. यातूनच राणी आणि आशाताई यांच्यातील भावनिक बंध समोर येतो आणि कथा संपते.

ही गोष्ट साधी सरळ वाटली तरी आज शहरात राहणाऱ्या अनेक मध्यम तसेच उच्चमध्यमवर्गीय घरातील जवळपास अर्ध्याअधिक कुटुंबांची तरी आहे. घर सांभाळण्यासाठी घरातील ‘त्या’ दोघांव्यतिरिक्त आणखी कोणीतरी असायला हवे हे अधोरेखित करणारी ही कहाणी आहे.

मराठीमध्ये आजवर आई-वडील, आई-मुलगा, वडील-मुलगी, बहीण-भाऊ सारख्या जवळपास प्रत्येक नात्यावर भाष्य करणारे अनेक चित्रपट होऊन गेले. परंतु घरमालकिन आणि कामवाली बाई यांच्यातील बंध दाखवणारा कदाचित हा पहिलाच चित्रपट असावा. ही गोष्ट दिग्दर्शकाने विनोदी ढंगाने सादर केलेली आहे. परंतु शेवटाकडे जाता जाता ती भावनिक वाट पादाक्रांत करते. खरंतर हीच कथेची मुख्य गरज होती. ज्यामुळेच चित्रपट पूर्णत्वास जातो. घरातील एकूण वातावरण, दोघांच्याही ऑफिसमधील वातावरण, आजूबाजूची परिस्थिती आणि घडणाऱ्या घटना या शहरातील प्रत्येकाला आपल्याशा किंबहुना आपल्या अवतीभवतीच घडणाऱ्या आहेत, असं वाटतं. चित्रपटातील प्रत्येक पात्र त्यांच्या भूमिकेशी समरस झाल्याचं देखील दिसतं. म्हणून ही गोष्ट मनाला भावते.

या चित्रपटांमध्ये दोन ‘घुमा’ आहेत. यातील पहिली घुमा अर्थात राणीची भूमिका मुक्ता बर्वेने छान साकारलेली आहे. तर दुसरी घुमा जिला आपण या चित्रपटाचे मध्यवर्ती पात्र म्हणू तिची अर्थात आशाताईची भूमिका नम्रता संभेरावने अतिशय उत्कृष्टपणे साकारलेली दिसते. कदाचित ही भूमिका तिच्यासाठीच लिहिली गेली असावी, हेही दिसून येतं. तिच्यासारखी चतुरस्त्र अभिनेत्री कोणतीही भूमिका अतिशय उत्तमपणे निभावू शकते. पूर्ण चित्रपटामध्ये सर्वप्रथम तिचीच भूमिका खरोखर लक्षात राहते. ‘वाळवी’ या परेश मोकाशी यांच्या आधीच्या चित्रपटामध्ये देखील अतिशय छोट्या भूमिकेमध्ये नम्रताने आपली छाप पाडली होती. कदाचित याचमुळे तिला या चित्रपटामध्ये मोठी भूमिका मिळाली असावी. तिने या संधीचं सोनं करून दाखवलेलं आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून लाखो मराठी प्रेक्षकांना नम्रता ज्ञात आहेच. पण या चित्रपटातून तिने तिच्यातील कसलेली अभिनेत्री मराठी प्रेक्षकांना पुन:श्च दिसून येते.

एकंदरीत चित्रपट एकदाच नाही तर पुन्हा-पुन्हा पहावा असाच आहे. परेश मोकाशी यांचा चित्रपट म्हणजे मराठी प्रेक्षकांसाठी मेजवानीच असते. हा चित्रपट देखील त्याला अपवाद नाही. 

 


 


Friday, April 19, 2024

काळाच्या संदर्भात

काळ अर्थात टाईम म्हणजे विज्ञानाला अजूनही सखोलपणे न समजलेली गोष्ट. आम्हाला वेळ कळते, असं म्हणणारी माणसं देखील काळाबद्दल अनेक प्रश्नांची उत्तरे देऊ शकत नाहीत. याच काळावर आधारित लेखक बाळ फोंडके यांनी लिहिलेले आणि नॅशनल बुक ट्रस्टने प्रकाशित केलेले हे पुस्तक, “काळाच्या संदर्भात”.
बाळ फोंडके म्हणतात, काळाला सुरुवात व शेवटही नाही याची जाणीव होते तेव्हा तो गूढ, अतिवास्तववादी रूप धारण करतो. तो शाश्वत आहे. तो उलट्या दिशेने प्रवाहित होऊ शकणार नाही, यासाठी गणितशास्त्त्राप्रमाणे जरी काही कारण नसलं तरी त्याचा प्रवाह एकाच दिशेने भूतकाळातून भविष्याकडे आहे. ही विवेक शून्यता कमी होती म्हणून की काय अल्बर्ट आईन्स्टाईनने अधिकृतपणे जाहीर केलं की काळ ही अशी चौथी मिती आहे. ज्यात विश्वाचं अस्तित्व आहे जी स्थळापासून विभक्त होऊ शकत नाही. शिवाय काळ स्वायत्त नसतो, पण तो निरीक्षकाच्या संदर्भ चौकटीवर अवलंबून असतो.
विश्वामध्ये बिग बँगपासून काळाची सुरुवात झाली असं म्हणतात. याच कारणास्तव जीवसृष्टी एका सुसूत्रतेमध्ये बांधलेली दिसते. आपण आपल्यापुरता लोकल टाईमचा विचार करतो. परंतु टाईम ही संज्ञा विज्ञानाच्या दृष्टीने अतिशय सखोल अभ्यास करण्यासारखी आहे. माणसाने आपल्या सोयीसाठी कालगणना तयार केली. परंतु ती तयार करत असताना त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. शिवाय अनेक गणित मांडावी लागली. त्यातील अचूकता टिकून राहावी म्हणून बऱ्याच उपाययोजनाही करावे लागल्या. यामुळे काळामध्ये अनेक अगम्य वैशिष्ट्ये तयार झालेली दिसतात. या सर्वांचा आढावा बाळ फोंडके यांनी या पुस्तकातून घेतलेला आहे. काल विभाजन कसे केले जाते? लीप वर्ष, लीप सेकंद म्हणजे काय? सेकंद, दिवस, रात्र नक्की काय असतात? अधिक महिना म्हणजे काय? दशमान वेळ, आठवडा, दिनदर्शिका, घड्याळ, सूर्यतबकड्या, पाणघड्याळ यांचा काळाशी नक्की काय संदर्भ आहे? काळाच्या विषयी आईन्स्टाईन तसेच स्टीफन हॉकिंग या महान शास्त्रज्ञांचे नक्की काय म्हणणे होते? क्वार्टझ घड्याळ, आण्विक घड्याळ नक्की कशी बनवली जातात? चौथी मिती आणि गुरुत्वाकर्षण यांचा काय संबंध आहे? भूत आणि भविष्य सापेक्ष आहेत का? कालबाण, जीवाश्म, रेडिओकार्बन, कालक्षेत्र यांचा नक्की अर्थ काय? जेट लॅग काय असतो? सहस्त्रक म्हणजे नक्की काय? अशा ५० हून अधिक प्रश्नांची उत्तरे या पुस्तकाद्वारे आपल्याला मिळतात. त्यामुळेच काळाचा एकंदरीत विस्तृत आवाका ध्यानात यायला देखील मदत होते. काही गोष्टी आपल्या कल्पनेच्या पलीकडील आहेत. परंतु त्या सुटसुटीतपणे लेखकाने या पुस्तकामध्ये मांडलेल्या आहेत. विशेष म्हणजे त्या सर्व गोष्टी रूप आहेत. विक्रम आणि वेताळ यांच्या गोष्टी आपल्याला माहीतच आहेत. याच विक्रम-वेताळाच्या प्रश्नोत्तरांच्या गोष्टींशी सांगड घालून लेखकाने हे पुस्तक लिहिलेले आहे. वेताळ प्रश्न विचारतो आणि विक्रम त्याची ससंदर्भ आणि शास्त्रीय उत्तरे देतो. अशा प्रकारची या पुस्तकाची रचना आहे. हे गोष्टी रूप विज्ञान ऐकताना आपली उत्सुकता टिकून राहते आणि वाचायला देखील आनंद मिळतो.
मूळ इंग्रजीत असणारे हे पुस्तक सुहासिनी अग्निहोत्री यांनी मराठीमध्ये भाषांतरित केलेले आहे.


Sunday, April 14, 2024

चीप - अतुल कहाते

विसावं शतक हे संगणक अर्थात डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स क्रांतीचं शतक होतं. या क्रांतीने आज वापरात असलेली बहुतांश इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि उपकरणे जन्माला घातली. तंत्रज्ञानाचा वेग वाढवण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. एकविसाव्या शतकातील संगणकीय तंत्रज्ञान याच इलेक्ट्रॉनिक क्रांतीवर आधारलेला दिसतं.
मागील शतकातील या महत्त्वपूर्ण क्रांतीने संगणकाच्या मेंदूला अर्थात मायक्रोप्रोसेसरला जन्म दिला. आज वापरात येणाऱ्या संगणकासह इतर सर्व महत्त्वपूर्ण उपकरणांमध्ये मायक्रोप्रोसेसर चीपचा प्रामुख्याने समावेश असतो. अर्थात आजच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा तो मेंदूच आहे, असे म्हणावे लागेल. आज वेगाने प्रगत होत असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा पाया देखील मागील शतकातील मायक्रोप्रोसेसर तंत्रज्ञानाने घातला होता. या प्रोसेसरच्या अर्थात चीपच्या प्रगतीचा आढावा घेणारं हे पुस्तक म्हणजे लेखक अतुल कहाते यांचं 'चीप'.
या पुस्तकाद्वारे डिजिटल इलेक्ट्रॉनिक क्षेत्रामध्ये मागील शतकभरामध्ये घडलेल्या क्रांतीचा विस्तृत आढावा घेण्यात आलेला आहे. आज तंत्रज्ञानाची चाके याच इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचा आधार घेऊन वेगाने पळताना दिसत आहेत. ही क्रांती घडत असताना अनेक शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांनी आपल्या बुद्धीचा उपयोग करून विविध संकल्पना जन्माला घातल्या. अनेक समस्यांची उकल त्यांनी करून दिली. याच कारणास्तव संगणकीय कार्यभाग सहजतेने व वेगाने व्हायला सुरुवात झाली. आज आपण वापरत असणाऱ्या जवळपास प्रत्येक इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये प्रोसेसरचा अर्थात चिपचा समावेश असतो. तिचा इतिहास रंजकपणे या पुस्तकात मांडण्यात आलेला आहे.
आज अस्तित्वात असणाऱ्या एकंदरीत इलेक्ट्रॉनिक साधनांमध्ये सर्वात गुंतागुंतीचे आणि किचकट असणारे हे उपकरण आहे. ज्याशिवाय आपला संगणक, लॅपटॉप, मोबाईल आणि अन्य स्मार्ट उपकरणे चालू शकत नाहीत. याची आजवरची प्रगती सदर पुस्तकांमधून आपल्याला वाचायला मिळते. अनेक तंत्रज्ञांची मेहनत अनुभवायला मिळते. अर्थातच नव्या पिढीच्या संगणक तंत्रज्ञांना ती प्रेरणा देणारी अशीच आहे!


 

Sunday, April 7, 2024

गणिती

गणित म्हणजे अनेकांचा डोक्याबाहेरचा अर्थात नावडता विषय. माझ्या बाबतीत सांगायचं तर शालेय जीवनामध्ये गणित मला कधी कठीण वाटलं नाही. दहावीला सुद्धा १५० पैकी १४२ गुण मला या विषयात मिळाले होते. परंतु या गणिताचे रूपांतर जेव्हा “मॅथेमॅटिक्स”मध्ये झालं त्यानंतर आमची आकलनक्षमता कमी होत गेली. अर्थात हे गणित आम्हाला व्यवहारिक गणित म्हणून समजलं नाही.
डिप्लोमाच्या पहिल्या वर्षाला असताना माझा वर्गात दुसरा क्रमांक आला होता. या परीक्षेतील अभियांत्रिकी गणितामध्ये मला १०० पैकी केवळ ५० गुण मिळाले होते तर पहिल्या क्रमांकावरील आमच्या मित्राला १०० पैकी १०० गुण होते! एकंदरीत अभियांत्रिकीच्या सहाही वर्षांमध्ये जवळपास सारखीच परिस्थिती राहिली. गणिताचा आणि आमचा अनेकदा संबंध आला पण तो केवळ पास होण्यापुरता!
तसं पाहिलं तर गणित हाच विश्वाचा पाया आहे. प्रत्येक गोष्ट ही गणिताशी अतिशय घट्टपणे जोडलेली आहे. किंबहुना गणिताशिवाय जगाचे पान देखील हलणार नाही, अशी परिस्थिती आहे. पण हे गणित व्यवहारांमध्ये नक्की कशा पद्धतीने वापरले जाते, याची माहिती आपल्याला होत नाही. म्हणजे गणित शिकवतानाच त्याचा व्यवहारांमध्ये नक्की कुठे कसा उपयोग होतो, हेच आपल्याला समजत नाही. किंबहुना समजावले जात नाही. म्हणूनच गणित अवघड वाटते.
मी देखील त्यातीलच एक होतो. परंतु जवळपास दहा वर्षांपूर्वी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि विदा विज्ञान क्षेत्रामध्ये काम करायला सुरुवात केल्यापासून हळूहळू मला गणित आणि त्याचा व्यवहारातील उपयोग समजायला लागला. कोणते सूत्र, समीकरण कुठल्या ठिकाणी वापरायचे याची माहिती व्हायला लागली. परंतु त्याची खोली अजूनही फारशी जास्त नव्हती. आजही मला उच्च दर्जाचे गणित माहिती आहे हे मी खात्रीने सांगू शकत नाही. एकंदरीतच गणित हा प्रत्येकासाठीच गुढ, किचकट आणि मेंदूला ताण देणारा विषय आहे.
गणित या विषयाशी संदर्भ असणारी खूप कमी पुस्तके मराठीमध्ये लिहिली गेलेली आहेत. परंतु या सर्वांमधील सर्वोत्तम पुस्तक म्हणजे अच्युत गोडबोले आणि डॉ. माधवी ठाकूर देसाई लिखित “गणिती” होय. गणिताचा उगम कशा पद्धतीने झाला आणि त्याची मागील हजारो वर्षांची प्रगती कशी होती, याची इत्यंभूत माहिती रोचक आणि रोमांचक घटनांद्वारे लेखकद्वयींनी या पुस्तकामध्ये विस्तृतपणे मांडलेली आहे. तुम्हाला गणित आवडो अथवा न आवडो हे पुस्तक निश्चित एक उत्तम मार्गदर्शक म्हणून काम करेल.
जगाने ही गोष्ट स्वीकारलेलीच आहे की, शून्य या संकल्पनेचा जनक भारतीय गणितज्ञ आर्यभट्ट यांनी लावला. कोणतीही गोष्ट शून्यापासून सुरुवात होते. म्हणजेच भारतीयांनीच गणिताची सुरुवात केली, असं म्हणायला हरकत नाही! परंतु भारतीयांव्यतिरिक्त दोन हजार वर्षांपूर्वी मेंदुने आणि संस्कृतीने प्रगत असणाऱ्या अनेक देशांनी गणिताच्या प्रगतीमध्ये बहुमूल्य असा हातभार लावलेला आहे. त्याची सुरुवात ग्रीक गणितज्ञांपासून होते. युक्लीड, पायथागोरस सारख्या गणितज्ञांनी खऱ्या अर्थाने गणिताचा पाया समृद्ध केला. अंकगणित, बीजगणित, भूमिती आणि बीजभूमिती सारख्या गणिती शाखांचा दोन हजार वर्षांपूर्वी उगम झाला. त्यामध्ये अनेक महान गणितज्ञांचा बहुमूल्य वाटा होता. गणिताच्या आधारे अनेक सूत्रे आणि समीकरणे रचली गेली. विचारवंतांचे मेंदू पणाला लागले. अनेक गूढ प्रश्नांची उकल करण्यासाठी गणिती समीकरणे उदयास आली. यात भारतीय तसेच बहुतांशी युरोपीय गणितज्ञांचा भला मोठा वाटा दिसून येतो.
गणिताचा अभ्यास करत असताना वापरली गेलेली अनेक सूत्रे संकल्पना आणि समीकरणे ज्या गणितज्ञांच्या नावाने आहेत ते सर्व या पुस्तकातून मला भेटले. नेपियर आणि लॉगॅरिथम, देकार्तची बीजभूमिती, फर्माची प्रमेये, बायनॉमियल थियरम आणि कॅल्क्युलसचा शोध लावणारा सर आयझॅक न्यूटन, कॅल्क्युलेटरच्या प्रगतीमध्ये मोलाची भर घालणारा पास्कल, लेबनीट्स, बर्नोली यांचे गणिती घराणं, लँगरज, लाप्लास, गाऊस, बंडखोर गणितज्ञ गॅल्व्हा, रिमान, हार्डी पॉइनकरे, कॅण्टर, न्यूमन, नॅश यासारखे अनेक गणितज्ञ या पुस्तकातून आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात.
बहुतांश गणितज्ञ हे त्यांच्या सुरुवातीच्या काळामध्ये अतिशय सामान्य बुद्धीचे होते. कदाचित त्यावेळी त्यांना त्यांच्या मेंदूची प्रतिभा लक्षात आलेली नसावी. परंतु आपल्या सुगीच्या काळामध्ये त्यांनी गणिती विश्वात अतिशय बहुमूल्य कामगिरी करून दाखवली. काही गणितज्ञ अतिशय कमी वयाचे देखील होते. परंतु इतक्या कमी कालावधीमध्ये देखील त्यांनी गणिती विश्व समृद्ध केले. विज्ञानाला पडणाऱ्या कोड्यांची उकल गणितज्ञांनी आपल्या उच्च बुद्धिमत्तेचा वापर करून केलेली दिसते. विशेष म्हणजे मागील हजार वर्षांमधील बहुतांश गणितज्ञ हे फ्रान्स, जर्मनी आणि रशिया याच तीन प्रमुख देशांमध्ये जन्मलेले दिसतात. यामध्ये अमेरिकी वंशाचा एकही नाही. न्युटन आणि जॉर्ज बुली वगळला तर एकही इंग्लिश देखील नाही.
अंकगणितापासून सुरू झालेला प्रवास आजच्या आधुनिक गणितातील टोपोलॉजी, सेट थियरी, गेम थिअरी, बुलियन अल्जेब्रा, सॅटिस्टिक्स अर्थात सांख्यिकी, प्रॉबाबिलिटी अर्थात संभाव्यताशास्त्र आणि लॉजिक अर्थात तर्कशास्त्रापर्यंत पोहोचल्याचा दिसतो. गणितातील प्रत्येक शाखेचा अंतर्भाव या पुस्तकामध्ये अतिशय विस्तृतरित्या केलेला आहे. काही संकल्पना ज्या इंग्रजीमध्ये समजायला अवघड जातात, त्यांचे विस्तृत विश्लेषण आपल्याला वाचायला मिळते.
गणिताचे विश्वदेखील गणितातील इन्फिनिटी या संकल्पनेप्रमाणेच अमर्याद आहे, याची प्रचिती या पुस्तकाद्वारे होते. कोणत्याही संकल्पनेचा प्रवास कधीच थांबत नाही. गणिताचे देखील तसंच आहे. अनेक गणितज्ञांनी त्यांच्या ज्ञानाने गणितीविश्व समृद्ध केलेले आहे. त्याचाच वापर करून पुढील गणितज्ञ याच गणिताला पुढच्या पातळीवर घेऊन चाललेले आहेत. आजच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगामध्ये गणित हा प्रमुख पाया मानला जातो. यात टिकून राहायचं असेल तर गणिती संकल्पना समजून घेतल्या पाहिजेत. त्यांचा व्यवहारिक उपयोग शोधता आला पाहिजे. तरच मानवी अर्थात नैसर्गिक बुद्धिमत्ता संगणकामध्ये आपल्याला गणिती संकल्पनांचा वापर करून अंतर्भूत करता येईल.
गणिताची भीती घालवणारे तसेच त्याच्या रोमांचक प्रवासाची सफर घडवून आणणारे हे पुस्तक प्रत्येकाने किमान एकदा तरी वाचायलाच हवं.


- तुषार भ. कुटे
जुन्नर, पुणे. 



Sunday, March 17, 2024

मराठी भाषा धोरण

मातृभाषेवर प्रेम करणाऱ्या कोणत्याही मराठी माणसाला आवडेल असेच भाषा धोरण महाराष्ट्र राज्य सरकारने जाहीर केले. त्याबद्दल त्यांचे आभार आणि अभिनंदन देखील.
मागच्या काही वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये होत असलेली मराठी भाषेची अधोगती लक्षात घेऊन त्यासाठी पावले उचलणे अपरिहार्यच होते. म्हणून या निर्णयाचे स्वागत करायला हवे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे याची अंमलबजावणी करण्यासाठी जेवढा शासनाचा सहभाग असेल किंबहुना त्यापेक्षा कितीतरी अधिक सामान्य नागरिकांचा असायला हवा. कारण आज-काल मराठी भाषिक लोकच आपल्या भाषेला तुच्छ आणि दुय्यम समजायला लागलेले आहेत. हिंदी आणि इंग्रजी सारख्या परकीय भाषा मराठी भाषेवर अतिक्रमण करत आहेत. मराठी लोकांची साथ असल्यामुळेच त्यांचे वर्चस्व देखील वाढू लागलेले आहे. मराठी भाषेच्या अस्तित्वाला हा भविष्यातील सर्वात मोठा धोका संभवतो. याच कारणास्तव मराठी संपवण्यात इतर कोणाचाही नाही तर प्रत्यक्ष मराठी लोकांचा सर्वात मोठा वाटा असणार आहे. म्हणूनच आपली भाषा वाचवण्यासाठी काही गोष्टी बंधनकारक करणे तसेच तिचा दैनंदिन जीवनातील वापर वाढवणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपले लोक भाषेपेक्षा जात आणि धर्म याला अधिक महत्त्व देतात. भाषा टिकली तरच तुमची संस्कृती टिकणार आहे, हे अनेकांच्या ध्यानात येत नाही. भाषेच्या ऱ्हासासोबतच संस्कृतीचा देखील ऱ्हास अपरिहार्य आहे. 


 

Tuesday, March 12, 2024

जयहिंद पॉलीटेक्निक

१९९९ यावर्षी अर्थात बरोबर पंचवीस वर्षांपूर्वी माझ्या तंत्रशिक्षण जीवनाची सुरुवात जुन्नरमधल्या जयहिंद पॉलीटेक्निक या महाविद्यालयातून झाली. अभियांत्रिकी व तंत्रज्ञान म्हणजे काय? हे मला माहिती देखील नव्हते. परंतु महाविद्यालयीन जीवनात तंत्रज्ञानाच्या अ-आ-ईची सुरुवात झाली. आज त्याच महाविद्यालयात मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आले होते. खरंतर माझ्यासाठी हा अत्यंतिक आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण होता. मागील २५ वर्षांमध्ये मी ज्या गोष्टी मिळवल्या त्याची सुरुवात या भूमीतून झाली होती, याचा मला अभिमान वाटतो. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना २५ वर्षांपूर्वीचा मी मला पुन्हा आठवला. माझ्या वैयक्तिक अनुभवाची शिदोरी उलगडताना मन भरून आले होते. तत्कालीन परिस्थिती आणि आजची परिस्थिती अतिशय भिन्न आहे. सुयोग्य मार्गदर्शनाची वाणवा, साधनांचा अभाव आणि खडतर परिस्थितीमध्ये आम्ही आमच्या तंत्रशिक्षण जीवनाची सुरुवात केली होती. पहिल्यापासूनच मागे न वळून पाहण्याची प्रेरणा मनात होती. हे महाविद्यालयीन नसते तर कदाचित मी आज इंजिनियर देखील झालो नसतो. म्हणूनच माझ्या करिअरचा श्रीगणेशा करणाऱ्या या महाविद्यालयाचा मी शतशः ऋणी आहे.
आपल्या अनुभवाचा फायदा विद्यार्थ्यांना व्हावा, हीच मनापासून इच्छा.
ही संधी मला दिल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. जितेंद्र गुंजाळ, संचालिका डॉ. शुभांगी गुंजाळ आणि प्राचार्य डॉ. स्वप्नील पोखरकर यांचे मनःपूर्वक आभार! 

 





Friday, March 8, 2024

स्माईल प्लीज

नंदिनी ही अतिशय महत्त्वाकांक्षी आणि करिअरला वाहून घेतलेली प्रसिद्ध फोटोग्राफर आहे. पतीबरोबर होणाऱ्या वारंवार कलहामुळे तिने त्याच्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतलेला आहे. पण अजूनही दोघांमध्ये कटूता नाही. दोघांची मुलगी असल्याने त्यांच्यात सर्वकाही सामंजस्याने सुरू आहे. प्रगतीच्या पायऱ्या चढत चढत नंदिनी यशाच्या शिखराकडे प्रवास करीत आहे. परंतु अचानक एका दिवसापासून ती छोट्या छोट्या गोष्टी विसरायला लागते. कामाच्या व्यापात हे तिच्या फारसं लक्षात येत नाही. पण आपली मैत्रीण असलेल्या मानसोपचार तज्ञाबरोबर चर्चा केल्यानंतर तिला समजते की तिला डिमेन्शिया अर्थात विसरण्याचा आजार झालेला आहे. आणि तो अगदी सुरुवातीच्या टप्प्यावर आहे. यावर कुठलाही उपाय आजवर शोधला गेलेला नाही. मेंदूतून हळूहळू अनेक गोष्टी विसरल्या जाणार आहेत. हा तिच्यासाठी एक मोठा धक्का असतो. जसजसे दिवस जातात तसतशी तिची लक्षात ठेवण्याची क्षमता कमी होते. ती वेगळ्याच कोशात वावरत असते. परंतु एक दिवस तिला एक नवा मित्र भेटतो. जो तिला तिच्या आयुष्याची नवी दिशा दाखवतो. तिच्यातील मूळ कलागुण ओळखून नव्याने जगायला शिकवतो. पण कधीतरी ती त्याला देखील विसरत असते. कथेचा शेवट गोड होतो की कटू हे चित्रपट पाहिल्यानंतरच समजेल.
मुक्ता बर्वे हिने नंदिनीची भूमिका केलेली आहे. शिवाय प्रसाद ओक तिच्या पूर्वश्रमीच्या पतीच्या तर ललित प्रभाकर नव्या मित्राच्या भूमिकेत दिसतो. कथेची मांडणी तशी उत्तम आहे. शिवाय सर्वच कलाकार कसलेले असल्यामुळे एक उत्तम कलाकृती या चित्रपटातून पाहायला मिळते.


 

Thursday, March 7, 2024

काबुली हरभरा

दुपारची सुट्टी झाली. स्टाफ रूममध्ये आलो तोवर तिथे कोणीही आलेले नव्हते. शिपाई आल्यानंतर त्यांना लगेचच कॅन्टीनमधून जेवण घेऊन यायला सांगितले. दोनच मिनिटात जेवण आले आणि मी जेवायला सुरुवात केली. पाच-एक मिनिटांनी ‘त्या’ आत मध्ये आल्या. कदाचित त्यांचे लेक्चर उशिराने संपलं असावं. माझ्या ताटाकडे बघून त्यांनी विचारलं,
“ कोणती भाजी आहे आज?”
“ काबुली हरभरा.”, मी उत्तरलो.
माझ्या या उत्तराने त्यांनी त्यांच्या चेहऱ्यावर वेगळेच हावभाव आणले. आणि पुढे बोलू लागल्या,
“ छोले आहेत होय!.... मराठी नावं म्हणजे कशी विचित्रच वाटतात नाही. त्यापेक्षा आपलं हिंदी आणि इंग्रजी बरं.”
त्यावर मी त्यांच्याकडे कटाक्ष टाकला आणि बोललो,
“ सिमला मिर्च, लेडीज फिंगर आणि एलिफंट इयरबद्दल तुमचं काय म्हणणं आहे?”
यावर प्रतिसाद म्हणून मला उसनं स्मितहास्य प्राप्त झालं. त्यानंतर मात्र आमचा संवाद अतिशय क्वचित झाला असावा.

Tuesday, January 9, 2024

गहिरे पाणी

आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या अनेक घटनांचा गूढतेच्या दृष्टिकोनातून विचार केला की गुढकथा तयार होते. रत्नाकर मतकरी यांच्या कथेमध्ये गुढकथेचा हा सारासार विचार अतिशय प्रकर्षाने समोर येतो. निरनिराळे विषय घेऊन त्यातील घटनांमध्ये रहस्यमयता तयार करण्याची शैली केवळ मतकरींच्या लेखनामध्ये आहे, असे दिसते. “गहिरे पाणी” हा कथासंग्रह देखील रत्नाकर मतकरींच्या या शैलीची वाट जोपासणारा दिसतो. सुमारे वीस-बावीस वर्षांपूर्वी अल्फा मराठी या पहिल्या खाजगी मराठी वाहिनीवर प्रदर्शित झालेल्या “गहिरे पाणी” या चित्रमालिकेच्या कथांचा हा संग्रह होय. यातून लेखकाच्या कल्पनाशक्तीचा अद्वितीय अविष्कार आपल्याला पाहायला मिळतो. प्रत्येक कथा एका वेगळ्या विषयाशी जोडलेली आहे. ती वाचायला सुरुवात केल्यानंतर शेवट केल्याशिवाय थांबवत नाही. मतकरींच्या कथांचे हे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणता येईल. जवळपास प्रत्येक कथा ‘वाचनीय’ या प्रकारामध्ये मोडते. विशेष म्हणजे या कथांची चित्रमालिका देखील युट्युबवर उपलब्ध आहे. अशा सर्व कथांचा या संग्रहामध्ये समावेश नाही. परंतु या कथा वाचताना त्यातील चित्र हुबेहूब डोळ्यासमोर उभे राहते. काही कथा मतकरींच्या अन्य कथासंग्रहामध्ये देखील आहेत. तरीदेखील त्या वाचताना पुन्हा नव्याने काहीतरी वाचण्याचा आनंद देऊन जातात.

#BookReview #Book2024 #RatnakarMatkari 

एक दृष्टिकोन

पुण्यातील एका राष्ट्रीय शिक्षण संस्थेमधील माझे काम आटोपून मी निघालो होतो. तळमजल्यावर कुणीच नव्हते. समोरून दोन विद्यार्थी काहीतरी शोधात येताना दिसले. त्यांनी मला हाक दिली आणि विचारले, “सर टॉयलेट कुठे आहे?” त्यांच्या बोलण्यावरून ते मराठी भाषिक वाटत नव्हते. पण तरीदेखील त्यांनी मराठी भाषेतून हा प्रश्न विचारला, याचे मला आश्चर्य वाटले. त्यामुळे मी तात्काळ त्यांना स्वच्छतागृहाचा रस्ता दाखवला. जाता जाता त्यांच्यातील संभाषण माझ्या कानी पडले.
दोघेही उत्तर भारतातील वेगवेगळ्या राज्यातून पुण्यात शिकायला आले होते. ज्या विद्यार्थ्याने मला विचारले तो इथे येण्याआधी पुणे शहराचा आणि इथल्या भाषेचा देखील अभ्यास करून आलेला होता! शिवाय मराठी भाषेत जुजबी प्रश्न विचारण्याचा सराव देखील त्याने केला होता. त्याचे मला विशेष कौतुक वाटले. कारण आजवर आपण पाहिलेच आहे की, उत्तरेतून आलेले लोक मराठी लोकांना गृहीत धरतात. आमची भाषा मराठी लोकांना येतच असेल, शिवाय तेच आमच्याशी आमच्या भाषेमध्ये बोलतील हे देखील त्यांना माहीत असतं. म्हणून महाराष्ट्र भूमीची मराठी भाषा शिकण्याची तसदी कोणी घेत नाही. परंतु या विद्यार्थ्याप्रमाणे दृष्टिकोन असेल तर त्यांच्याविषयी मराठी लोकांना देखील आपुलकी वाटेल. गरज कोणाला आहे हा प्रश्न नाही तर बाहेरून आलेले लोक इथल्या राज्याचा आणि भाषेचा किती सन्मान करतात? हे जास्त महत्त्वाचे. 


- तुषार भ. कुटे



Friday, January 5, 2024

आपली भाषा

रविवारचा दिवस. सकाळी बऱ्याच दिवसांनी बाहेर नाश्ता करण्यासाठी आम्ही जवळच्या एका हॉटेलमध्ये आलो. गर्दी फारशी नव्हती. आमची ऑर्डर दिली आणि वाट पाहू लागलो. शेजारच्या टेबलावर एक मराठी जोडपे येऊन बसले. अर्थात त्यांच्या बोलण्यावरून ते मराठी आहेत, हे आम्हाला समजले. त्यांनी लागोलाग हॉटेलच्या वेटरला बोलावले. अर्थात याकरिता त्यांनी बहुतांश मराठी लोक गुलाम असलेल्या हिंदी भाषेचा वापर केला, हे वेगळे सांगायला नको! हॉटेलचे नाव मराठी, मालक मराठी आणि सर्व कर्मचारी देखील मराठीतच बोलत होते. तरी देखील मराठी लोकांना मुघली भाषेचा वापर का करावा वाटतो, हा मोठा प्रश्नच आहे.
त्या दोघांनी ऑर्डर दिल्यानंतर लगेचच माझ्या पत्नीने मला एक गोष्ट सांगितली,
“आपल्या इथल्या मराठी लोकांना सतत हिंदीची गुलामी करायची सवय झालेली आहे. कुठेही गेलं की, लगेच हिंदीत सुरू होतात. अशा लोकांचा मला भयंकर राग येतो!”
अर्थात हे सर्व त्यांना ऐकू जाईल अशा भाषेमध्ये ती बोलली. याचा परिणाम सकारात्मक दिसून आला. पुढच्या वेळेस जेव्हा शेजारच्या टेबलावरील ‘त्या’ने वेटरला हाक मारली त्यानंतर तो त्याच्याशी मराठीतच संवाद साधत होता. अगदी बिल देईपर्यंत!
कधी कधी मुघली भाषेची गुलामी करत असणाऱ्या मराठी लोकांना अशाच पद्धतीने टोमणे मारावेत, असं वाटतं. त्याशिवाय ते सुधारणार नाहीत. आणि आपली भाषा देखील अभिमानाने वापरणार नाहीत!

- तुषार भ. कुटे


Wednesday, January 3, 2024

अंतराळातील स्फोट

जवळपास २५ वर्षांपूर्वी एका वाचनालयामध्ये जयंत नारळीकरांचं “अंतराळातील स्फोट” हे पुस्तक वाचायला मिळाले. अभ्यास सोडून अवांतर म्हणून वाचलेलं माझ्या आयुष्यातील कदाचित हे पहिलंच पुस्तक होतं. नारळीकरांची ही विज्ञान कथा मला भयंकर आवडली. कदाचित याचमुळे मला वाचनाची आवड निर्माण झाली. यानंतर मी नारळीकरांच्याच प्रेषित आणि ‘वामन परत न आला ‘या कादंबऱ्या देखील वाचल्या. त्याही मला तितक्याच आवडल्या होत्या. कालांतराने मी स्वतःच्या पुस्तकांचा संग्रह करायला सुरुवात केली. काही वर्षानंतर मी वाचलेले ‘अंतराळातील स्फोट’ हे पुस्तक बाजारात शोधण्याचा देखील प्रयत्न केला. परंतु ते काही मिळाले नाही. मागील आठवड्यामध्ये पुणे पुस्तक महोत्सवात साहित्य अकादमीच्या स्टॉलवर हे पुस्तक मला अनपेक्षितरित्या दिसून आले. ते विकत घेतल्यानंतर अगदी दोन ते तीन तासांमध्ये वाचून संपवले. दोन दशकांपूर्वीच्या वाचन आठवणी जागृत करणारा हा प्रसंग होता!