Monday, June 29, 2020

२९ जून - भारतीय सांख्यिकी दिवस

२९ जून हा भारतीय सांख्यिकी दिवस म्हणून ओळखला जातो.  प्रशांत चंद्र महालनोबिस या आधुनिक भारतीय सांख्यिकीच्या जनकाचा हा जन्मदिवस होय. त्यांचा जन्म २९ जून १८९३ रोजी कोलकाता येथे झाला व मृत्यू २८ जून १९७२ रोजी कोलकाता येथे झाला.


त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ २००६ पासून २९ जून हा दिवस भारतीय सांख्यिकी दिवस म्हणून ओळखला जातो. सांख्यिकी शास्त्रला तसं भारतीय समाजात फारसे स्थान नाही. परंतु जे आहे ते महालनोबीस यांच्या मुळेच, असं म्हणायला काहीच हरकत नाही. काही वर्षांपूर्वी 'मशीन लर्निंग' विषयाचा अभ्यास सुरू केला तेव्हा "महानॉलॉबीस डिस्टन्स" या संज्ञेबद्दल मला माहिती मिळाली. गुगलवर सर्च केल्यानंतर समजले की हे महान भारतीय गणितज्ञ आहेत. त्यांच्याच नावाने हा फॉर्मुला तयार करण्यात आलेला आहे. संख्यिकी शास्त्राची फारशी माहिती भारतीयांना नसल्यामुळे महानॉलॉबीस यांच्याबद्दलही फारशा लोकांना माहिती नाही. 


महानॉलॉबीस हे पहिल्या भारतीय नियोजन आयोगाचे सदस्य होते. विशेष म्हणजे ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या सांख्यिकी सल्लागार मंडळाचे अध्यक्ष होते. १९३१ मध्ये त्यांनी कोलकाता येथे 'इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट' म्हणजेच 'भारतीय सांख्यिकी संस्थान'ची स्थापना केली. त्यानंतर सांख्यिकी संस्थानाने विविध क्षेत्रांमध्ये लक्षणीय प्रगती केली. भारत स्वतंत्र झाल्यानंतर शेती आणि पूर नियंत्रण यावर सांख्यिकी शास्त्राद्वारे प्रयोग करण्यात आले. शिवाय औद्योगिक उत्पादन वाढ व बेरोजगारी कमी करण्यासाठी सांख्यिकी शास्त्राचा या संस्थेने चांगला उपयोग करून घेतला. याशिवाय स्वातंत्र्यानंतर दरडोई उत्पन्न शोधण्यासाठी स्थापल्या गेलेल्या संस्थेचे अध्यक्षही महानॉलॉबीस हेच होते. त्यांनी काढलेल्या निष्कर्षांच्या आधारावर द्वितीय पंचवार्षिक योजनेत या माहितीची चांगलीच मदत झाली. सांख्यिकी शास्त्राचा वापर कशा प्रकारे करावा? हे त्यांनी उत्तम पद्धतीने दाखवून दिले.
महानॉलॉबीस हे रवींद्रनाथ टागोर यांचे चाहते होते. आपल्या आयुष्यातले दोन महिने त्यांनी कोलकत्यात शांतिनिकेतन याठिकाणी घालवलेले आहेत. ते ते टागोरांच्या विश्वभारती संस्थेचे सचिवही होते. शिवाय टागोरांसोबत त्यांनी अनेकदा परदेश प्रवासही केला आहे.


जगातल्या विविध सांख्यिकी संस्थांचे ते सदस्य होते. इंडियन अकॅडमी ऑफ सायन्स, इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी, रॉयल सोसायटी, इकॉनोमेट्रिक सोसायटी, पाकिस्तान स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट, रॉयल सोसायटी ऑफ स्टॅटिस्टिक्स, अमेरिकन
स्टॅटिस्टिक्स असोसिएशन, किंग्स कॉलेज, केंब्रिज व रशियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट चे ते सन्माननीय सदस्य होते.

महानॉलॉबीस यांना आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक महत्त्वाचे पुरस्कार प्राप्त झाले. त्यात वेल्डन मेमोरियल प्राईझ, ऑक्सफर्ड विद्यापीठ, दुर्गाप्रसाद खेतान सुवर्णपदक, श्रीनिवास रामानुजन सुवर्णपदक व भारताचा द्वितीय क्रमांकाचा नागरी पुरस्कार पद्मविभूषण १९६८ साली त्यांना प्राप्त झाला. 
सन २०१८ मध्ये यांच्या १२५ व्या जयंतीदिनी भारत सरकारने त्यांच्या प्रतिमेचे नाणे तयार केले होते. शिवाय याच वर्षी गुगलने डूडल द्वारे त्यांना श्रद्धांजली अर्पण केली होती. सन २०१५ मध्ये श्रीनिवास रामानुजन यांच्या आयुष्यावर तयार झालेला चित्रपट 'दि मॅन हू न्यू इन्फिनिटी' यामध्येही महानलोबीस यांच्या नावाची एक चरित्र भूमिका आढळून येते.
अशा महान सांख्यिकी तज्ञाला आमचा प्रणाम!!!

 

Wednesday, June 17, 2020

अंतराळातील मृत्यु - डॉ. संजय ढोले

पुणे विद्यापीठात कार्यरत असणारे डॉ. संजय ढोले यांचे मेहता पब्लिशिंग हाऊसने ५-६ विज्ञान कथासंग्रह प्रकाशित केले आहेत. त्यातीलच 'अंतराळातील मृत्यू' हा एक होय. त्यांच्या डिंभक व अश्मजीव या दोन पुस्तकानंतर वाचलेला हा तिसरा कथासंग्रह होय. त्यांच्या प्रत्येक पुस्तकात लेखक म्हणून त्यांची संशोधक वृत्ती सातत्याने जाणवते. प्रत्येक कथेत मुलविज्ञान अर्थात जीव, भौतिक व रासायन यांचा प्रामुख्याने प्रभाव असतो. विशेष म्हणजे त्या विज्ञान संकल्पनांनी ओतप्रोत भरलेल्या असतात. विज्ञान कशा प्रकारे काम करू शकते? या प्रश्नाचे उत्तर ते आपल्या कथांमधून देत राहतात. हे सर्व कल्पनाविलास असले तरी अशक्यतेचा पल्ला कदाचित गाठू शकणार नाही असेच आहेत.
प्रयोग, संशोधन व शास्त्रज्ञ/प्राध्यापक हे त्यांच्या प्रत्येक कथेत येणारे शब्द. अर्थात त्याची प्रत्येक कथा ही एका प्रयोगात सारखीच असते. तिच्यात विज्ञानाच्या मूल गाभ्याचा प्रकर्षाने समावेश असतो. जयंत नारळीकर, निरंजन घाटे व बाळ फोंडके यांच्या पेक्षा वेगळ्या कथा डॉ. ढोले लिहितात. हे मला प्रामुख्याने सांगावेसे वाटते. त्यांच्या सर्वच कथासंग्रहांमध्ये त्यांची शैली व विज्ञान हे समान धागे आहेत. त्यामुळे मुल विज्ञानाची आवड असणाऱ्यांनी त्यांचे कथासंग्रह निश्चितच वाचावेत.


Tuesday, June 16, 2020

निवडक र. अ. नेलेकर

धारक व मतकरी यांच्यानंतर वाचलेले र. अ. नेलेकर हे तिसरे भयकथा लेखक! त्यांच्या भयकथांचे केवळ तीन संग्रह प्रसिद्ध आहेत. त्यामुळे मराठी वाचकांना ते फारसे परिचित नसावेत. शिवाय त्यांच्या नावे तीन विनोदी कथासंग्रह देखील आहेत! भय आणि विनोद असे परस्परविरोधी प्रकार हाताळलेले नेलेकर कदाचित एकमेव मराठी लेखक असावेत. त्यांच्याच भयकथांचा हा कथासंग्रह होय- निवडक र. अ. नेलेकर (राजेंद्र प्रकाशन)
प्रत्येक लेखकाची एक वेगळी शैली असते. तशीच नेलेकरांची स्वतःची शैली आहे. फारसं वर्णनात्मक चित्रन न करता साध्या सरळ पद्धतीने परंतु वाचकांना खिळवून ठेवणाऱ्या कथा, हे त्यांचे वैशिष्ट्य मानावे लागेल. धारप व मतकरी वाचल्यानंतर नेलेकरांच्या शैलीत रुळायला थोडा वेळ लागतो. पण नंतर ती आपल्या मनाची पकड घ्यायला सुरवात करते व एक अद्भुत विश्वाची सफर घडवून आणते. त्यांच्या या पुस्तकात एकूण सोळा कथा आहेत. त्यातील अखेरची 'कणक राऊळ' ही केवळ साहस कथा आहे. बाकीच्या भयकथांमध्ये कुठली सर्वात चांगली? असे निश्चित सांगता येणार नाही. कारण प्रत्येक कथा ही पूर्णतः वेगळ्या धाटणीची आहे. त्यांच्यात तोचतोचपणा जाणवत नाही. त्यामुळे कुठलीही कथा वाचली तरी आपल्याला निराळ्याच विश्वात घेऊन जाते, हे विशेष.
संग्रहातील काही कथांना विविध स्पर्धांमध्ये पारितोषिके मिळाली आहेत. त्यामुळे अशा दर्जेदार कथांचा संग्रह निश्चितच वाचनीय असाच आहे.

 

Monday, June 1, 2020

इमान

"एक म्हैना व्हऊन गेला राव. इमानं अजून बंदच हायेत!", पहिला चिंतातुर होऊन बसला होता.
"तुला काय करायचं रं इमानाचं? तू आपलं एष्टीचं बघ की, ती बी बंदच हाय!" - दुसरा.
"असं काय करतूस राव, तुला म्हाईत नाय का इमानानं परदेशात जायचं लई मोठं सपनं हाय माझं."
"व्ह्यय की, इतकी वर्षं तेच ऐकतोय ना!"
"इमानं कधीच चालू व्हनार नाय का रं?"
"आजूक दोन-तीन म्हैनं तरी न्हाय व्हनार."
"म्हंजी... नंतर व्हतीलच ना?"
"व्हतीलच रं. पन तू लई सपान नको बघू. काईतरी दुसरा इषय काढू."
"दुसरा काय इषय आता?" - पहिला चिंताग्रस्त.
"टीवी वरचं रामायण संपलं ना? मग मला सांग, त्यातून तू काय शिकला?"
या प्रश्नावर पाहिल्याने गहन विचार केला व बोलू लागला.
"परदेशात इमानानं जाणारी सीता ही पहिली भारतीय व्हती!"
"अरे खुळ्या, ते न्हाय. दुसरं काय तरी सांग."
पुन्हा पाहिल्याने काही काळ डोके खाजविले व बोलू लागला.
"सोताच्या ताकदीवर परदेशात जाणारा हनुमान हा पहिला भारतीय व्हता!"
"खुळं तेच डोक्यात घेऊन बसलंय अजून. तू नाय सुधारणार बाबा!"
अशी तणतण करत दुसरा तेथून निघून गेला. पहिला मात्र अजून काही सुचतंय का? याचा विचार करत तिथेच डोकं खाजवत उभा होता.