Tuesday, February 28, 2023

महाद्वीपीय विस्थापन

या विश्वामध्ये कोणतीही गोष्ट स्थिर नाही. प्रत्येकाला गति प्राप्त आहे. जसे चंद्र पृथ्वीभोवती फिरतो, पृथ्वी स्वतःभोवती फिरते आणि सूर्यही स्वतःभोवती फिरतो. सूर्यमालेतील प्रत्येक ग्रह सूर्याभोवती फिरतच असतो. आकाशातल्या प्रत्येक ग्रहाला, ताऱ्यांना गती आहे. असंच काहीसं पृथ्वीच्या पृष्ठभागाचे आहे. पृथ्वीवरील जमिनीचे भाग अर्थात खंड हेही स्थिर नाहीत. ते एकमेकांपासून दूर जात आहेत. हा सिद्धांत काहीसा पटणारा वाटत नाही. परंतु तो खरा आहे.
सोळाव्या शतकामध्ये सर्वप्रथम अब्राहम ऑर्टेलियस यांनी हा सिद्धांत पहिल्यांदा मांडला होता. परंतु त्यांना भक्कम पुरावे देता आले नाहीत. पृथ्वीवरील सर्व खंड हे आपली जागा सातत्याने बदलत आहेत. किंबहुना ते एकमेकांपासून दूर किंवा जवळ जात आहेत. असं १८८० मध्ये सर्वप्रथम जर्मन शास्त्रज्ञ अल्फ्रेड वेगनर याने जगासमोर मांडले. अन्य बऱ्याच वैज्ञानिक शोधांप्रमाणेच याही शोधाला अथवा सिद्धांताला जागतिक मान्यता मिळाली नाही. त्यामुळे वॅगनरने हा सिद्धांत सिद्ध करण्यासाठी पुरावे गोळा करायला सुरुवात केली. १९१५ मध्ये त्यांनी या विषयावर एक परिपूर्ण पुस्तक लिहिले. या पुस्तकामध्ये त्यांचा महाद्वीपीय विस्थापन (कॉन्टिनेन्टल ड्रिफ्ट) हा सिद्धांत व्यवस्थित मांडण्यात आला होता. या सिद्धांतानुसार करोडो वर्षांपूर्वी पृथ्वीवरील आज अस्तित्वात असणारे सर्व सातही खंड एकमेकांना जोडलेले होते. दक्षिण अमेरिकेची पूर्व किनारपट्टी आणि आफ्रिका खंडाची पश्चिम किनारपट्टी जर एकमेकांना जोडून पाहिली तर असे लक्षात येते की हे भूभाग एकेकाळी एकमेकांना जोडलेले असावेत. आज या दोन्ही किनारपट्ट्यांमध्ये अटलांटिक महासागर पसरलेला आहे. याशिवाय वेगनर यांनी असे हे सिद्ध केले की, करोडो वर्षांपूर्वी सापडलेल्या जीवाश्मांचे नमुने जगाच्या विविध ठिकाणी सापडलेल्या नमुन्यांशी मिळतेजुळते होते. जसे ब्राझीलमधील जीवाश्म व पश्चिम आफ्रिकेतील जीवाश्म हे सारखेच आढळून आले. तसेच पूर्व आफ्रिकेतील जीवाश्म व भारतातील जीवाश्म हेही मिळतेजुळते दिसून येत होते. हीच मात्रा करोडो वर्षांपूर्वी नामशेष झालेल्या वनस्पतींनाही लागू पडत होती. काही ठिकाणच्या वातावरणाचा अभ्यास करून तेथील वातावरण एकेकाळी सारखेच असावे, हेही त्यांनी पटवून दिले. यावरून पृथ्वीवरील सर्व खंड एकमेकांना जोडलेले होते हे वेगनर यांनी पुराव्यांच्या आधारे सिद्ध केले. तरीही अनेकांना हे फारसे पटले नाही.
१९५० ते १९६० या दरम्यान नवीन तंत्रज्ञान आधारित चुंबकीय सर्वेक्षण करण्यात आले. त्यात असे सिद्ध होते की, सर्व खंड एकेकाळी एकमेकांना निश्चितच जोडलेले असावेत. या सर्वेक्षणातून "प्लेट टेक्टॉनिक" नावाचा नवा सिद्धांत जन्माला आला. ज्यात असे मांडण्यात आले की, पृथ्वीचे भूभाग अर्थात प्लेट नैसर्गिकरित्या सरकत आहेत. सर्वात वरच्या प्लेटला लिथोस्पियर तर त्याखालील ज्वालामुखीच्या प्लेटला आस्थेनोस्पियर असे म्हटले जाते. ज्वालामुखीच्या सातत्याने होणाऱ्या हालचालीमुळे पृथ्वीच्या भूभागावरील प्लेट सरकत आहेत.
एकेकाळी हे सर्व खंड सलग भूभागावर होते. त्यास पॅन्जिया असे म्हणतात. ही तीस कोटी वर्षांपूर्वीची स्थिती होती. सतरा कोटी वर्षांपूर्वी त्याचे लॉरेशिया व गोंडवानालँड असे दोन भाग व्हायला सुरुवात झाली. आशिया, युरोप व उत्तर अमेरिका हे उत्तरेकडील लॉरेशियामध्ये तर दक्षिण अमेरिका, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका आणि भारतीय उपखंड हे गोंडवानालँड भागांमध्ये होते. पाच करोड वर्षांपूर्वी भारतीय उपखंडाची प्लेट आशिया खंडाला जोडली गेली. ज्यामुळे आज हिमालयाची निर्मिती झाल्याचे दिसते. आजही भारतीय उपखंड सातत्याने आशिया खंडावर दाब देत आहे त्यामुळे हिमालयाची उंची काही इंचांनी वाढत चालली आहे. विशेष म्हणजे शास्त्रज्ञांनी हेही सिद्ध केले आहे की, अमेरिका व आफ्रिका खंडांतील अंतर दरवर्षी अडीच सेंटिमीटरने वाढत चालले आहे! आणखी काही लाख वर्षांमध्ये पृथ्वीचा आजचा नकाशा आणि त्यावेळेसचा नकाशा हा पूर्णपणे वेगळा असेल, हे मात्र निश्चित.


 

Tuesday, February 14, 2023

भिरकीट

गावातील सर्वांना परिचित, सर्वांची कामे करणारा तसेच सर्वांना योग्य तो सल्ला देणारा व्यक्ती म्हणजे तात्या होय. याच गावामध्ये जब्बर अण्णा हे सर्वात लोकप्रिय व्यक्तिमत्व! परंतु वयोवृद्ध झाल्यामुळे आता ते अंथरुणाला खेळून आहेत. त्यांचा मोठा मुलगा आणि सून त्यांची काळजी घेत आहेत. तर लहान मुलगा व त्याची बायको मुंबईला राहत आहेत. अचानक एक दिवस जब्बर अण्णा यांचा मृत्यू होतो. सर्वत्र ही बातमी पसरते. गावातील बहुतांश लोक शोकाकुल होतात. त्यांचा बाहेर गावाकडील मुलगा आणि मुलगी देखील अंत्ययात्रेला येतात. प्रत्येकाचा दृष्टिकोन, भावना निरनिराळे असतात. शिवाय अनेकांच्या वागण्यातून स्वार्थीपणा डोकावत राहतो. गावातील निवडणुका जवळ आलेल्या असतात आणि त्याकरता गावातील प्रतिष्ठित राजकारणी बंटीदादा यांना इलेक्शनचा वाजत गाजत फॉर्म भरायचा असतो. परंतु सर्व गावाचेच कुळ एक असल्यामुळे सर्वांना सुतक पडलेले असते. आता करायचे काय, म्हणून जगभर अण्णांच्या तेराव्याचा विधी तीनच दिवसांमध्ये उरकून घेण्याचे ठरले जाते. यात वाद प्रतिवाद होतात. पण बंटी दादाचे म्हणणे ऐकण्यास सर्वांना भाग पडते. यामध्ये तात्याची भूमिका अतिशय महत्त्वपूर्ण ठरते.
जब्बर अण्णांची बायको त्यांच्या मृत्यूपासून सुन्न अवस्थेत गेलेली असते. तीन-चार दिवसांपासून चाललेला गोंधळ ती पाहत असते. आपल्या पतीविषयी कोणाला किती आपुलकी आहे, याची देखील तिला जाणीव होत असते. दोनच दिवसांमध्ये आपली मुले संपत्तीची वाटणी करून तिची परस्पर विक्री करायला निघालेली आहेत, हे देखील ती उघड्या डोळ्यांनी पाहत असते. कदाचित हे तिला कालांतराने सहन होत नाही. ज्या माणसाने गावातील बहुतांश तरुणांना मुंबईमधील गिरणीमध्ये कामाला लावले त्याच्या अंतिम समयी चाललेला गोंधळ तिलाही बघवत नाही. यातून ती एक महत्त्वाचा निर्णय घेते आणि चित्रपट संपतो.
तात्याची महत्त्वपूर्ण आणि मध्यवर्ती भूमिका गिरीश कुलकर्णी यांनी साकारलेली आहे. ती देखील त्यांच्या नेहमीच्या ग्रामीण शैलीमध्ये. चित्रपटातील प्रसंग व त्यातील भावभावनांचे चित्रण तसेच सर्वच कलाकारांचा अभिनय उत्तम जुळून आला आहे. विनोदाबरोबरच गांभीर्याची फोडणी देताना दिग्दर्शकाने कथेचा योग्य मेळ घातल्याचे दिसते. शेवटमात्र आपल्याला चुटपुट लावून जातो.


 

Saturday, February 11, 2023

जगातील सर्वात चिकट पदार्थ

सन १९२७ ची गोष्ट आहे. ऑस्ट्रेलियामधील ब्रिस्बेन शहरातल्या क्वीन्सलँड विद्यापीठामध्ये थॉमस पारनेल नावाचे प्राध्यापक विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्र शिकवत होते. वरवर स्थायू रूपात दिसणारा पदार्थ द्रव रूपामध्ये अधिक घट्टपणा (viscosity) दाखवत असतो, हे प्रयोगाद्वारे प्राध्यापक पारनेल यांना विद्यार्थ्यांना दाखवायचे होते. त्यासाठी त्यांनी डांबरासारखा दिसणाऱ्या पीच या पदार्थाचा एक ठोकळा फोडून त्याला तापविले व त्यामुळे तो द्रवरूपात आला. हा पीच म्हणजे कार्बनपासून तयार होणारा बिट्युमेन व अस्फाल्टसारखा एक घट्ट पदार्थ आहे. झाडे, पेट्रोलियम आणि डांबरी कोळशाच्या मिश्रणातून तो तयार होत असतो. हा द्रवरूप पीच प्राध्यापक पारनेल यांनी एका शंकूच्या आकाराच्या पारदर्शक पात्रामध्ये जमा केला. जवळपास तीन वर्ष त्यांनी हे हे काचेचे पात्र तसेच ठेवले होते. सन १९३० मध्ये त्यांनी त्याचे पुढील एक टोक कापून टाकले जेणेकरून आपल्या द्रवरूप पदार्थ बाहेर येईल. त्यावेळी त्याचा घट्टपणा इतका होता की अतिशय मंद गतीने तो पदार्थ त्यातून बाहेर यायला लागला आणि जवळपास आठ वर्षानंतर म्हणजे सन १९३८ मध्ये त्याचा पहिला थेंब खाली पडला. तो पारनेल यांनी एका दुसऱ्या काचेच्या पात्रामध्ये जमा केला होता. तेव्हापासून आजतागायत या पदार्थाचे केवळ नऊ थेंब काचेच्या शंकुमधून खाली पडले आहेत. सातत्याने ९३ वर्षे चालणाऱ्या या वैज्ञानिक प्रयोगाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने देखील घेतली आहे.
आज काचेच्या पात्रामध्ये असणारा हा पीच क्वीन्सलँड विद्यापीठाच्या पारनेल इमारतीमध्ये ठेवलेला आहे. याठिकाणी तापमान, आर्द्रता आणि हवेचा दाब नियंत्रणाखाली ठेवून हा प्रयोग अजूनही चालू ठेवण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे गेल्या ९३ वर्षांमध्ये अजूनपर्यंत एकानेही काचेच्या पात्रातून पीचचा थेंब खाली पडल्याचे प्रत्यक्ष पाहिलेले नाही. सन १९६१ मध्ये प्रयोगशाळेचे संरक्षक जॉन मेनस्टोन हे सातवा थेंब पडताना आजूबाजूलाच होते. परंतु तो त्यांनी समोरासमोर प्रत्यक्ष पडताना पाहिलेला नाही. प्रयोगावर लक्ष ठेवण्यासाठी मागील शतकाच्या अखेरीस तिथे एक कॅमेरा बसवण्यात आला होता. परंतु नोव्हेंबर २००० मध्ये हा कॅमेरा काही कारणास्तव खराब झाल्यामुळे आठवा थेंब पडल्याचे रेकॉर्डिंग झाले नाही.
१९३० पासून साधारणतः आठ वर्षांनी त्याचा एक थेंब काचेच्या पात्रांमध्ये पडत होता. परंतु १९८८ मध्ये प्रयोगशाळेत वातानुकूलक यंत्रणा अर्थात एसी बसवण्यात आला. त्यानंतर मात्र थेंब पडण्याचा कालावधी काहीसा मंदावला गेला व तो तेरा वर्षांवर आला. २०१४ मध्ये नववा थेंब आधीच्या खाली पडलेल्या आठव्या थेंबाला बराच काळ स्पर्श करून होता. म्हणून काचेचे पात्र काढून घेण्यात आले. त्याच वेळी नववा थेंब त्यात पडला. आता त्याच्या पुढील थेंब सन २०२० ते २०३० या कालावधीमध्ये खाली पडण्याचा अंदाज आहे. आज आपण क्वीन्सलँड विद्यापीठातील हा प्रयोग इंटरनेटवर लाईव्ह पाहू शकतो. त्याची लाईव्ह स्ट्रीम https://livestream.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
मागील काही वर्षांमध्ये थेंब खाली पडतानाचा टाईम लॅप्स व्हिडिओ घेण्यात आला होता. अशा प्रकारच्या व्हिडिओमध्ये चलचित्रे वेगाने पुढे जाताना दिसतात. परंतु हा व्हिडीओ टाईम लॅप्स प्रकारातला सर्वात मंदगती व्हिडिओ ठरला आहे. या प्रयोगासाठी एगनोबेल प्राइज देखील जाहीर झाले होते. विज्ञानातील विचित्र प्रयोगांसाठी हा पुरस्कार देण्यात येतो!
पीच या पदार्थांचा विचार केल्यास त्याचा घट्टपणा मधापेक्षा २० लाख पटीने अधिक आहे. तसेच तो पाण्यापेक्षा २.३ x १०११ इतका अधिक चिकट व घट्ट आहे. या प्रयोगापूर्वी ही १८४० मध्ये ऑक्सफर्ड इलेक्ट्रिक बेल हा प्रयोग सुरू करण्यात आला होता. तसेच बेवरली क्लॉक हाही प्रयोग १८६४ मध्ये सुरू करण्यात आला होता. परंतु दोन्ही प्रयोग काही कारणास्तव मधल्या काळामध्ये बंद पडले होते. याच कारणास्तव इतिहासामध्ये सर्वाधिक काळ झालेला वैज्ञानिक प्रयोग हा "पीच ड्रॉप एक्सपेरिमेंट" हाच आहे. अशा प्रकारचा प्रयोग डब्लिन येथील ट्रीनिटी महाविद्यालयामध्ये करण्यात आला. या प्रयोगात पिचचा थेंब १३ जुलै २०१३ मध्ये खाली पडला होता. त्याचा लाईव्ह व्हिडिओ इंटरनेटवर उपलब्ध आहे.

Ⓒ Ⓐ तुषार भ. कुटे
 

 

Sunday, February 5, 2023

दोन कथा ऐका...

दोन कथा ऐका...

1. नोकियाने अँड्रॉइडला नाकारले
2. 'याहू'ने गुगलला नकार दिला

कथा संपली!

शिकलेले धडे:
1. जोखीम घ्या
2. बदल स्वीकारा
3. जर तुम्ही वेळेनुसार बदलण्यास नकार दिला तर तुमचा नाश होईल!

आणखी २ कथा

1. फेसबुकने व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्राम विकत घेतले
2. 'मिंत्रा' ने जबॉन्ग विकत घेतले, फ्लिपकार्टने मिंत्रा आणि नंतर वॉलमार्टने फ्लिपकार्ट विकत घेतले

कथा संपली

शिकलेले धडे:
1. इतके शक्तिशाली व्हा की तुमचे प्रतिस्पर्धी तुमचे सहयोगी बनतील.
2. वरच्या स्थानावर पोहोचा आणि नंतर स्पर्धा काढून टाका.

2 आणखी कथा

1. कर्नल सँडर्स यांनी वयाच्या 65 व्या वर्षी KFC सुरू केले
2. जॅक मा, ज्यांना KFC मध्ये नोकरी मिळू शकली नाही, त्यांनी अलीबाबाची स्थापना केली

कथा संपली

शिकलेले धडे:
1. वय फक्त एक संख्या आहे
2. जे प्रयत्न करत राहतात तेच यशस्वी होतात

शेवटचे पण अतिशय महत्वाचे,

1. फेरारीचे संस्थापक एन्झो फेरारी यांनी ट्रॅक्टर मालकाचा अपमान केला
2. ट्रॅक्टर मालकाने लॅम्बोर्गिनीची स्थापना केली

कथा संपली

शिकलेले धडे:
1. कधीही कोणालाही कमी लेखू नका
2. यश हा सर्वोत्तम बदला आहे

सर्वांचा आदर करा !!
तुमचा वेळ हुशारीने गुंतवा !!
मेहनत करत रहा !!
शिकत रहा आणि वाढत रहा !!

तुमची वेळ येईल !



(संकलित)
- तुषार कुटे