Tuesday, August 30, 2022

एक अनपेक्षित भेट

श्री. रमेश खरमाळे म्हणजे जुन्नर आणि परिसरातील प्रत्येकाला माहित असणारे व आपलेसे वाटणारे व्यक्तिमत्व होय. मागील अनेक वर्षांपासून जुन्नरमधील निसर्ग-संपदा व पर्यटन वृद्धीचे महान कार्य खरमाळे सर करत आहेत. मागील आठवड्यामध्ये जुन्नरमध्ये असताना योगायोगाने त्यांची भेट झाली.
तसं पाहिलं तर आम्ही अनेक वर्षांपासून समाज माध्यमांद्वारे एकमेकांना ओळखत होतो. पण त्यादिवशीची भेट ही पहिलीच प्रत्यक्ष भेट होती! एका उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे दर्शन झाल्यामुळे आम्ही दोघेही अर्थात मी आणि आमच्या सौ. भारावून गेलो. त्यांच्या कामाची पावती म्हणून मिळालेली स्मृतिचिन्हे आणि सन्मानपत्रे पाहून आम्हाला त्यांच्या एकूण कार्याची निश्चितच प्रचिती आली.
खरमाळे सरांनी स्वतः लिहिलेले ‘जगेन मायभू तुझ्यासाठी’ हे पुस्तक त्यांनी आम्हाला भेट म्हणून दिले. मागील काही दिवसांमध्ये वेळ मिळेल तसे पुस्तक वाचत होतो. त्यातून खरमाळे सरांच्या एकंदरीत व्यक्तिमत्त्वाची ओळख होत गेली. जुन्नर परिसरातील अडचणीच्या प्रसंगी जीव वाचवण्यासाठी त्यांनी केलेल्या मदतीची हकीकत तसेच जुन्नरमधील अनेक अपरिचित ट्रेकच्या गोष्टी त्यांनी या पुस्तकामध्ये शब्दबद्ध केलेल्या आहेत. आपल्या दैनंदिन जीवनातील कार्य करत असताना आपण समाजाचे देखील देणे लागतो, याची जाणीव विविध प्रसंगांमधून खरमाळे यांनी ठेवल्याचे दिसते. त्यांचे या पुस्तकातील अनुभव निश्चितच प्रेरणादायी असेच आहेत. नव्या पिढीतील तरुणांनी यातून बऱ्याच गोष्टी बोध घेण्यासारख्या आणि शिकण्यासारख्या आहेत.
त्यांच्या या पुस्तकामध्ये वर्णन केलेल्या अनेक ट्रेकच्या वाटा मी देखील अजून सर केलेल्या नाहीत! त्यांचे वर्णन ऐकून या परिसरामध्ये निसर्गामध्ये मुक्तपणे स्वैर करण्याची ऊर्जा निश्चितच प्राप्त होते. 



Saturday, August 13, 2022

प्रकाशतंत्राची रोमहर्षक गाथा

सृष्टीच्या अनेक मुलतत्त्वांपैकी एक म्हणजे प्रकाश होय. जगातील सर्वात वेगवान गोष्ट म्हणजेच प्रकाश होय. प्रकाशाविना विश्व अंधारमय आहे. अशाच प्रकाशतंत्राची रोमहर्षक गाथा अच्युत गोडबोले यांच्या 'प्रकाश' या पुस्तकांमध्ये वर्णिलेली आहे.
अनेक शतकांपासून माणूस प्रकाशाचा वापर दैनंदिन जीवनामध्ये करत होता. प्रकाशाचा मूळ स्त्रोत मात्र सूर्य आहे, असे मानले जायचे. परंतु मानवाने कृत्रिम प्रकाशाची निर्मिती केली. आगीचा शोध लागला. त्यातून प्रकाश कसा निर्माण करायचा? हे मानवाला समजले. तिथून मेणबत्त्या तयार झाल्या आणि विजेचा शोध लागल्यानंतर कृत्रिम प्रकाश दिवे तयार झाले. मनुष्याला प्रकाशामागचं विज्ञान कळत गेलं. हाच प्रकाश मानवी प्रगतीचे एक साधनच बनून गेला. मानवी प्रगतीच्या नव्या पिढ्या घडत गेल्या. विज्ञान प्रगत होत गेलं. तसतसं प्रकाशाचा उपयोग वेगवेगळ्या पद्धतीने विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये होत गेला. याच प्रकाशामुळे मायक्रोस्कोप, टेलिस्कोप, कॅमेरा, फोटोग्राफी टेलिव्हिजन, लेझर आणि फायबर ऑप्टिकचा जन्म झाला. या तंत्रज्ञानाने अनेक विविध प्रकारच्या नव्या शोधांना जन्म दिले. एका अर्थाने प्रकाशाधारित शोध हे विज्ञानाच्या शेकडो शोधांची जननी आहे, असे म्हणावे लागेल.
या सगळ्यांची कहाणी अच्युत गोडबोले यांच्या 'प्रकाश' या पुस्तकामध्ये वाचायला मिळते. यातून आपल्याला भेटतात अनेक ध्येयवेडे तंत्रज्ञ आणि शास्त्रज्ञ! त्यांच्या वेगळेपणामुळे अथवा अभ्यासामुळेच आपण सहज उपलब्ध होणाऱ्या तंत्रविश्वामध्ये वापरत आहोत. त्यांचे स्मरण देखील करणं तितकंच गरजेचं आहे. भविष्यामध्ये मनुष्य प्रकाशाचा वेग गाठायला पाहतो आहे. कदाचित ते काही दशकांमध्ये शक्य देखील होईल. परंतु त्यामागची प्रेरणा काय होती? हेही आपण ध्यानात ठेवायला हवे.