Showing posts with label Sane Guruji. Show all posts
Showing posts with label Sane Guruji. Show all posts

Thursday, August 13, 2020

मानवजातीची कथा- डॉ. हेन्री थॉमस

डॉ. हेन्री थॉमस यांच्या लेखणीतून अवतरलेल्या 'मानवजातीची कथा' या पुस्तकाचा साने गुरुजींनी मराठीमध्ये अप्रतिम अनुवाद केला आहे. ही कथा आहे मानवजातीची...  खऱ्या अर्थाने मानवांच्या जातींची! या जाती कोणत्या? क्रूरकर्मा हुकूमशहा, धर्मांचे प्रेषित, आपल्याच नागरिकांवर अन्याय करणारे सम्राट, अहिंसेचा मार्ग असणारे संत, या विश्वाला खऱ्या मानवाच्या दृष्टीने बघणारे कवी-लेखक, कष्टकऱ्यांचे कष्ट समजून घेणारे विचारवंत, जगाला शांततेचा संदेश देणारे शांततादूत, अनेक देशांवर राज्य करण्याचे स्वप्न पाहणारे क्रूर राज्यकर्ते आणि जगाला नवे दृष्टिकोन देणारे तत्वज्ञ. अशा विविध मानव जातींचा हा संक्षिप्त इतिहास आहे. मानवी इतिहासामध्ये आजवर अनेक व्यक्ती होऊन गेल्या. त्यांच्या जीवनाचा व कार्याचा सारांश या पुस्तकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. हे मानव विविध प्रकारचे आहेत. मानवी इतिहासावर त्यांचा प्रभावही तितकाच मोठा आहे. त्यांनी जगाचा इतिहास व भूगोल बदलवून टाकलेला आहे. मानवाने कसे असावे व कसे असू नये? या दोहोंचीही अवलोकन करणारा हा इतिहास आहे. 

मागील अडीच ते साडेतीन हजार वर्षांमध्ये ज्या घडामोडी घडल्या व त्या घडामोडींवर ज्यांचा प्रभाव होता, त्यांचं संक्षिप्त चरित्र म्हणून या पुस्तकाकडे पाहता येईल. मानवी संस्कृतीची सुरुवात झाल्यानंतर मागील तीन हजार वर्षांमध्ये आपण खऱ्या अर्थाने प्रगत होत गेलो. याच कालखंडात मानव म्हणून आपल्यातील अनेक प्रवृत्ती दिसून आल्या. त्याच प्रवृत्तींचं प्रतिमा चित्रण म्हणजे 'मानवजातीची कथा' होय. या कथेची सुरुवात होते बंडखोर राजपुत्र मुसा याच्यापासून आणि शेवट झाला आहे दुसऱ्या महायुद्धाच्या मुसोलीनी आणि हिटलरमध्ये. या दरम्यानच्या कालखंडातील अनेक व्यक्ती त्यांची नावे आपण यापूर्वी अनेकदा ऐकली. त्यांचे कार्य ही आपल्याला ज्ञात आहे. परंतु, त्याचा जगाच्या इतिहासावर नक्की कसा प्रभाव पडला याची माहिती मात्र आपल्याला नाही. हा इतिहास प्रामुख्याने युरोप खंडात घडला. ग्रीस, इटली, स्पेन, पोर्तुगाल, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, रशिया, हॉलंड या देशांमध्ये अनेक व्यक्ती होऊन गेल्या. त्यांची व त्यांच्या कार्याची मीमांसा आपल्याला पुस्तकांमधून होते. युरोप व्यतिरिक्त अमेरिकेतील दोन आणि अशियातील तीन व्यक्तींची संक्षिप्त माहिती लेखकाने या पुस्तकात दिली आहे.
ग्रीक व रोमन संस्कृती या जगाच्या इतिहासातील सर्वात जुन्या संस्कृती होत. त्यांच्यामध्ये दोन हजार वर्षांपूर्वी अनेक राजे होऊन गेले. अनेक तत्त्वज्ञ व शास्त्रज्ञही झाले. तो काळ होता जगात धर्म येण्यापूर्वीचा, म्हणजे नरसंहार करण्यासाठी तत्कालीन सम्राटांना धर्माचे कारण नव्हते. यात काळातील अलेक्झांडर, एपिक्यूरस, हॅनिबॉल, केटू, सीझर, चौदावा लुई, नेपोलियन सारखे युरोपियन सम्राट या जगावर केवळ हुकूमत गाजवण्यासाठी व राज्य करण्यासाठीच जन्माला आले होते, असे इतिहास सांगतो. त्यांच्या पूर्वी आशियाची भूमी भगवान गौतम बुद्ध, कन्फ्यूशियस आणि लाओत्से सारख्या महान पुरुषांच्या जन्माने पावन झालेली होती. युरोपात मात्र अशी परिस्थिती दिसून आली नाही. ज्या राजांना आपण इतिहासात स्थान देतो, त्यांनी किती मोठा जागतिक नरसंहार केलेला आहे, याची प्रचिती या पुस्तकातून येते. अलेक्झांडर पासून मागील शतकातल्या हिटलरपर्यंत सर्वांनीच कोणत्या ना कोणत्या कारणास्तव फक्त माणसे मारण्याचे काम केले होते. दोन हजार वर्षांपूर्वी जगात धर्माची निर्मिती झाली आणि पुनश्च नरसंहार करण्यासाठी राज्यकर्त्यांना सम्राटांना आणि हुकूमशहांना कारण मिळाले. साम्राज्यवादी धर्म अनेक मोठ्या लढायांना व धर्म युद्धांना कारणीभूत ठरले आहेत. या धर्माचा प्रसार जगात तर झालाच. परंतु त्याची किंमत मनुष्यहानीने जगाला मोजायला लागली. इतक्या प्रदीर्घ कालखंडानंतर जगात फक्त ज्यू, भारतीय आणि चीनी या तीन संस्कृती आजवर टिकून आहेत. ज्यू लोकांनी आजवर जितकी हानी व अन्याय सहन केला असेल, तितका कदाचित इतर कोणत्याही संस्कृतीमध्ये केला गेला नसावा. आक्रमकांनी आपला धर्म जगभर पोहोचवला. माणसे मारून आमचा धर्म कसा माणुसकीचा धर्म आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. त्यातही वरील तीन संस्कृती अजूनही टिकून आहे हे विशेष!
जगाचा इतिहास तसा फक्त क्रूरकर्मा राजांचा होता असे नाही. या इतिहासात डांटे आणि गटे सारखे महान कवी, शेक्सपियर सारखे नाटककार विचारवंत होऊन गेले. कला-विज्ञान यांची सांगड घालणारा लिओनार्दो द विंची होऊन गेला. जगाने संशोधक वृत्तीचा कोलंबस पाहिला आणि आपल्या पूर्वजांचा परिचय करून देणारा चार्ल्स डार्विनही पाहिला. स्पायनोझा सारखा थोर विचारवंत या जगात जन्मला होता हेही आपले भाग्य होय. लिंकन, टॉल्स्टॉय आणि महात्मा गांधी यांच्यासारखी माणसे व त्यांच्या विचारधारा जगाने पाहिल्या.
एक गोष्ट मात्र येथे हे प्रकर्षाने नमूद करावीशी वाटते की, धर्म या संकल्पनेभोवती, त्याच्या रक्षणासाठी तसेच प्रसारासाठी जितक्या अमानुष हत्या आजवर या जगात झालेल्या त्या इतर कोणत्याही कारणाने झालेल्या नाहीत. कार्ल मार्क्सने म्हटले होते की, धर्म ही अफूसारखी आहे. तिची नशा कधीच उतरत नाही. जगाच्या इतिहासातून एक गोष्ट खूप प्रकर्षाने जाणवते.
प्रत्येक संस्कृतीमध्ये प्रेषित तयार झाले आहेत. प्रथम प्रेषितांना ठार मारायचे आणि मग त्यांची प्रेते पुजायची. ही मानवाची नेहमीचीच युक्ती आहे. अनेक प्रेषितांनी जन्मभर मानवतेचा संदेश दिला. परंतु त्यांच्या अनुयायांना मात्र तो आजही समजलेला नाही, हे दुर्दैव! आपला इतिहास अत्यंत प्रेरणादायक आहे. त्यातून सकारात्मक गोष्टी घेता येतात आणि नकारात्मक बाबी टाकूनही देता येतात. या इतिहासात शिकण्यासारखं बरच काही आहे. इतिहासात होऊन गेलेल्या व्यक्तींकडून अगाध ज्ञान प्राप्ती होते. परंतु त्यातून कोणत्या गोष्टी घ्यायच्या आणि कोणत्या सोडून द्यायच्या? हे ज्याने त्याने ठरवायचं असतं. हाच या पुस्तकाचा सारांश!

पुस्तकातील प्रमुख व्यक्तींचा इतिहास...
- राजपुत्र मूसा इतिहासातील पहिला युद्धविरोधी वीर जेरिमिया
- देवत्व पावलेला नास्तिक बुद्ध
- ख्रिस्ताचा आध्यात्मिक पिता कन्फ्यूशियस
- ज्याने साम्राज्य मिळाले; पण संस्कृतीचा विध्वंस असा सायरस
- अथेन्सचा लोकप्रिय लोकशाही पक्ष-नेता पेरिक्लीस अधिक चांगल्या जगाचे स्वप्न खेळविणारा प्लेटो
- स्वत: व ईश्वर यांत जगाची वाटणी करणारा अलेक्झांडर
- हसरा, दुःखवादी एपिक्यूरस
- द्वेष मूर्ती हैनिबल कार्थेजियन राजपुत्र
- जगातील कपटपटूंचा शिरोमणी कॅटो
- देव होऊ पाहणारा मनुष्य : सीझर
- नाझारेथ बहिष्कृत ज्यू येशू
- मातृहत्यारा सम्राट नीरो
- तत्त्वज्ञानी सम्राट मार्कस ऑरेलियस
- कॉन्स्टंटाइन : जुन्या धर्मवृत्तीचा आत्मा असलेला ख्रिश्चन
- शार्लमन : पोपला वाचवून स्वत: सम्राट होणारा संन्यासी
- पीटर : अमीन्सचा माथेफिरू भिक्षु
- कॅथलिक पंथी बंडखोर : अॅसिसीचा साधू फ्रॅन्सिस
- मुक्या शतकाचा आवाज : डान्टे
- युरोप व आशिया यांमधील दुवा : मार्को पोलो
- नवयुगाचे तीन पुरस्कर्ते : पेट्रार्क, जोहान्स हस, जॉन बॉल
- ऑर्लिन्स येथील कुमारी जोन ऑफ आर्क : फ्रान्सची माता
- टॉर्कीमीडा व पवित्र 'इन्क्विझिशन' न्यायसंस्था
- अमेरिका न शोधणारा कोलंबस
- कला-विज्ञान-वेत्ता लिओनार्डो डी व्हिन्सी
- पोपला धाब्यावर बसविणारा शेतकरी मार्टिन ल्यूथर
- सैतानाचा शिष्य मॅकिऑव्हिली
- नव सृष्टीचा निर्माता शेक्सपिअर
- फ्रेंच राजांपैकी अति प्रसिद्ध राजा चौदावा लुई
- अहिंसक, युद्ध-प्रतिकारी जॉर्ज फॉक्स
- अॅमस्टरडॅम येथील शांतमना स्पायनोझा
- रशियावर सुधारणा लादणारा पीटर दि ग्रेट
- व्हॉल्टेअर
- जग जिंकूनही निर्वासित अवस्थेत मरणारा नेपोलियन
- गटे: हा पाहा खरा मनुष्य
- संयुक्त युरोपचे स्वप्न खेळवणारा इटालियन नेता : मॅझिनी
- समाजवादाचा जनक कार्ल-मार्क्स
- प्रशियाचा प्रतिगामी चॅन्सेलर विस्मार्क
- आपल्या पूर्वजांचा परिचय करून देणारा चार्लस डार्विन
- कृष्णवर्णियांचा त्राता अब्राहम लिंकन
- द्वेषविहीन जगाचे ध्येय देणारा टॉलस्टॉय
- शेवटचा कैसर सम्राट दुसरा वुइल्यम
- मॅकि विलियन पद्धत पत्करणारे हुकूमशाही विरुद्ध लोकशाही : मुसोलिनी, हिटलर, रुझवेल्ट

Tuesday, December 15, 2009

आंतरभारती

साने गुरूजी हे महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या इतिहासातील एक महापुरुष होते. ’श्यामची आई’ या पुस्तकावरून व चित्रपटावरून आपण त्यांना ओळखतो. परंतु, त्यांनीच स्वातंत्रपुर्व काळात मांडलेली एक संकल्पना मला इथे मांडावीशी वाटते.
आंतरभारती ही ती संकल्पना होय. आज भारतामध्ये कितीतरी भाषा बोलल्या जातात. ब्रिटिश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी आपल्या देशाबद्दल म्हटले होते की ’हा देश निरनिराळ्या वर्णाच्या, रंगाच्या, वंशाच्या, धर्माच्या, जातीच्या, व भाषेच्या लोकांचे अजायबघर आहे..!’ या देशात अशी एकही भाषा नाही की, ज्यातुन कमीत कमी ५० टक्के लोक एकमेकांशी सहज संवाद साधु शकतात. विश्व संस्कृतीकडे एक नजर टाकली तर लक्षात येते की, जगातील कितीतरी देशांनी आपल्या भाषा परकीय आक्रमणामुळे गमावल्या आहेत. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, कॅरेबियन बेटे, मेक्सिको, ब्राझील, अर्जेंटीना, (लॅटीन अमेरिकेतले सर्वच देश), तसेच आफ़्रिकेतील साऊथ आफ़्रिका व अन्य लहान देश यांच्या मूळ भाषा कोणत्या, हे त्यांनाच सांगता येणार नाही. ब्रिटिश, स्पॅनिश, पोर्तुगीज, फ़्रेंच, यांच्या आक्रमण व वास्तव्यामुळे या देशांच्या भाषाच बदलुन गेल्या. परंतु, भारताचे तसे झाले नाही. भारताने बहुभाषीय संस्कृती आजही जोपासली आहे. अशा देशाला एकच राष्ट्रभाषा असु शकत नाही!
आज अनेक भारतीय भारतात बहुसंख्येने बोलल्या जाणाऱ्या हिंदीतुन संवाद साधताना दिसतात. हिंदी भाषकांची संख्या अधिक असल्याने तीला राष्ट्रभाषा म्हणुन ठसवण्याचा प्रयत्न केला जातोय. काही वर्षांपूर्वी तमिळांनी या विरूद्ध आवाज उठवला होता, आज महाराष्ट्रातही असा आवाज ऐकु येतोय. भारतीय राज्यघटनेने २३ भाषांना राष्ट्रभाषा म्हणुन दर्जा दिला आहे. त्यामुळे एकाच भाषेला राष्ट्रभाषा मानु नये, असे माझे मत आहे.
साने गुरूजींनी आंतरभारतीची जी संकल्पना सांगीतली होती, त्यात त्यांची अपेक्षा होती की, प्रत्येक भारतीयाने किमान दोन भारतीय भाषा शिकायला हव्यात. एकमेकांशी संवाद साधताना आपली मातृभाषा वापरली तर फारच उत्तम. नवी भाषा शिकल्याने ज्ञानाचे भांडार खुले होते. जवळपास सर्वच भारतीय भाषांमध्ये उत्तमोत्तम साहित्य उपलब्ध आहे, त्याचा आस्वादही आपल्याला घेता येईल. प्रत्येकाला आपल्या मातृभाषेचा अभिमान असतो आणि असावाही.... परंतु, दुसरी भाषा जर आपल्या समोर आपल्या भाषेला तुछ्च समजत असेल, तर त्याचा निषेधही करणे गरजेचे आहे.
बहुभाषिक संस्कृतीच्या बाबतीत आपल्याला राजा राम मोहन रॉय तसेच पी. व्ही. नरसिंहराव यांचा आदर्श घेता येईल.
मला आणखी एक गोष्ट इथे नमुद करावीशी वाटते की, स्वातंत्र्योत्तर काळापासुन हिंदी या भाषेला ती आपली राष्ट्रभाषा नसताना देखील तसे दर्शवण्याचा प्रयत्न केला गेला. या बाबतील बहुसंख्य असणाऱ्या हिंदी भाषकांची स्वार्थी वृत्ती दिसुन येते. भारताच्या काश्मिरी, पंजाबी, उर्दु, मराठी, गुजराथी, सिंधी, कोकणी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, बंगाली, ओरीया, आसामी, संस्कृत, बोडो, नेपाली, मैथिली या सर्वच राष्ट्रभाषा असताना केवळ हिंदीलाच राष्ट्रभाषा म्हणुन ठसविले गेले. त्यामुळे, हिंदी ही अभ्यासक्रमातील एक भाषा म्हणुन आपल्याला शिकावी लागतेय. राष्ट्रभाषा म्हणुन सर्वच भारतीय भाषांना हा दर्जा मिळायला हवा. भारतीयांनी केवळ हिंदीलाच राष्ट्रभाषा न मानता सर्व भारतीय भाषांना राष्ट्रभाषा मानयले हवे. तरच आंतरभारतीची संकल्पना खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात येऊ शकेल.......