नाशिक येथील मविप्र समाज संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालय
प्रांगणामध्ये शिवोत्सव भरविण्यात आलेला आहे. या उत्सवामध्ये शिवरायांवरील
७५ हजार पुस्तकांचा वापर करून ग्रंथरांगोळी देखील साकारण्यात आलेली आहे.
खरंतर ग्रंथांची देखील रांगोळी तयार करता येऊ शकते, ही संकल्पनाच अभिनव अशी
आहे! शिवाय ती तयार करताना कल्पक नियोजन, प्रचंड मेहनत लागते आणि सर्वात
महत्त्वाचे म्हणजे वातावरणातील बदलांचे आव्हान देखील असते. त्यावर सुयोग्य
मार्ग काढून बनविलेली शिवरायांची ही भव्य रांगोळी महाविद्यालयाच्या
मैदानामध्ये पाहता येते.
याव्यतिरिक्त संस्थेच्या विविध शाळांमधील
मुलांनी कल्पकतेने साकारलेल्या किल्ल्यांच्या प्रतिकृती देखील येथे पाहता
येतात. जे किल्ले आपण प्रत्यक्ष पाहिलेले नाही, त्यांची प्रतिकृती दगड,
माती, कागद यांचा वापर करून तयार केलेली आहे. असे सुमारे ६० पेक्षा अधिक
किल्ले येथे बनविलेले आहेत. तसेच शिवरायांवरील विविध रंगीत चित्रे, मराठा
हत्यारे आणि बारा बलुतेदारांची शिल्पे ही देखील या शिवोत्सवाची वैशिष्ट्ये
आहेत.
Saturday, December 2, 2023
ग्रंथरांगोळी
Monday, December 5, 2022
मी, ती आणि चित्रपट
नाशिक मध्ये राहत असताना आम्ही दोघे अर्थात मी आणि आमची पत्नी नियमितपणे
प्रत्येक मराठी चित्रपट बघायला जात असू. त्या काळामध्ये एकही मराठी चित्रपट
आम्ही चुकवलेला नव्हता. सन २०१५ ची गोष्ट असेल. 'कट्टी-बट्टी' नावाचा
मराठी चित्रपट नाशिकच्या सिटी सेंटर मॉल मधील चित्रपटगृहामध्ये लागला होता.
सकाळचा खेळ असावा. चित्रपट सुरू होण्याच्या अगदी बरोबर वेळेमध्येच आम्ही
चित्रपटगृहासमोर दाखल झालो. परंतु दरवाजा बंद होता. नंतर समजले की आज
चित्रपट बघणारे आम्ही दोघेच जण आहोत! त्यामुळे कमीत कमी पाच तिकिटांची
विक्री झाल्याशिवाय चित्रपटाचा शो चालू करता येणार नाही, असे आम्हाला
सांगण्यात आले. आम्हाला उशीर झाला आहे की काय? अशी धाकधूक वाटत होती ती आता
चित्रपट सुरू होईल की नाही? या काळजीमध्ये बदलली गेली. मग वाट
पाहण्याशिवाय आमच्यासमोर कुठलाही पर्याय नव्हता.
आमचे नशीब चांगले
होते. त्यामुळे आणखी तीन मुलींनी या चित्रपटाची तिकिटे खरेदी केली आणि शो
चालू झाला! सर्वात शेवटच्या रांगेमध्ये मध्यभागी आमच्या खुर्च्या होत्या
आणि आमच्या बरोबर समोरच्या रांगेमध्ये समोरच्याच खुर्च्यांमध्ये त्या तिघी
बसलेल्या होत्या. चित्रपटाचे कथानक फारसे मनोरंजक असे नव्हते. त्यामुळे
त्या तिघींची चलबिचल चाललेली आम्हाला दिसली. मध्यंतर झाले आणि त्या तिघीही
चित्रपटगृहातून निघून गेल्या व परतल्या नाहीत. आता पूर्ण चित्रपटगृहांमध्ये
केवळ आम्ही दोघेच उरलो होतो! त्या स्क्रीनची काळजी घेणारा कर्मचारी एकदा
डोकावून बघून गेला. त्याने पाहिले की फक्त दोनच जण हा चित्रपट बघत आहेत.
त्यानंतर पूर्ण चित्रपट संपेपर्यंत त्याने चार ते पाच वेळा तरी डोकावले
असेल! आता हे दोघे देखील निघून जातील, मग शो थांबवता येईल. या आशेवर तो
ये-जा करत होता. पण आम्हाला मात्र चित्रपट पूर्णपणे बघायचाच होता. पूर्ण
चित्रपटगृहामध्ये आम्ही दोघे त्या चित्रपटाचा मनमुराद आनंद लुटत होतो. असा
अनुभव पुन्हा घ्यायला मिळणार नाही, याची आम्हालाही खात्री होती. म्हणून
पूर्णवेळ बसून आम्ही चित्रपट पहिला. तो संपल्यावर बाहेर पडत असताना त्या
कर्मचाऱ्याला हास्य वदनाने नमस्कार केला आणि घरी आलो.
Tuesday, November 22, 2022
मनमाड-येवला रस्त्यावर
मागील एका घटनेमध्ये जसं मी सांगितलं होतं की कुणीही ट्राफिक पोलीस कर्मचारी वर्दीमध्ये समोर दिसला की तो आपल्याकडे आले आपले गिराईक अशा नजरेने पाहताना आम्हाला जाणवतो आणि त्याच्या तोंडातून गळत असलेली लाळ देखील दिसत असते. नाशिक जिल्ह्यातील किल्ले सर करून परत जात असताना घडलेला हा किस्सा देखील अशाच प्रकारचा आहे.
३१ डिसेंबर २०२१ हा दिवस होता. ३१ डिसेंबर म्हटलं की सगळीकडेच पोलिसांची गस्त असते. मनमाड शहरानजीक असलेल्या अंकाई-टंकाई किल्ल्यांचा ट्रेक करून आम्ही पुन्हा येवला शहराच्या दिशेने निघालो होतो. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गवरून अहमदनगर तसेच पुण्याकडे येणारा हा हमरस्ता आहे. म्हणूनच या रस्त्यावर मोठमोठ्या मालवाहू गाड्यांची सातत्याने वर्दळ असते. अनकाई किल्ल्याकडून येवला शहराकडे येताना अशीच भली मोठी गर्दी या रस्त्यावर झाली होती. साधारणतः सहा ते सात किलोमीटर अंतरावर ट्राफिक पोलीस गाड्यांना अडवताना दिसून आले. बहुतांश गाड्या या मालवाहू प्रकारातील होत्या. ३१ डिसेंबर असल्यामुळे कदाचित वेगळ्या प्रकारची चौकशी चालू असावी, असे आम्हाला वाटले. आमच्या गाडीचा MH14 हा क्रमांक बघून आमची गाडी बाजूला घ्यायला लावली. अगदी दुर्दैवानेच म्हणावं लागेल की १५ डिसेंबरलाच माझ्या गाडीची पीयूसी संपलेली होती! खरंतर यात माझीच चुकी होती की माझ्या ध्यानात राहिले नाही. संबंधित ट्राफिक हवालदाराने मागितलेली सर्व कागदपत्रे त्यांना सुपूर्द केली. फक्त पीयूसीची तारीख निघून गेलेली होती. साहेबांना नवीन बकरा पकडल्याने आनंद झाला असावा. त्यांनी मला बाजूला घेतले आणि सांगितले, 'पियूसीचे हजार रुपये दंड पडतात, तुम्ही दोनशे रुपये द्या आणि निघून जा.' १००० रुपयांचे काम जर दोनशे रुपयांमध्ये होत असेल तर कोणीही ते देऊन निघून जाईल. परंतु मला ते पटत नव्हते. त्यांना मी सरळ सांगितले, "ऑनलाइन फाईन करून द्या. मी भरतो."
पीयूसी नसल्याच्या कारणावरून दंड भरणारा त्यांना मी कदाचित पहिलाच व्यक्ती भेटलो असेल. त्यामुळे ते देखील चक्रावले.
हवालदार पुढे बोलू लागला, "साहेब तुम्ही चांगले दिसता. सगळी कागदपत्रे देखील आहेत. कशाला हजार रुपयाचा भुर्दंड भरताय? त्यापेक्षा दोनशे रुपयांमध्ये तुमचं काम करून देतो! कागदावर दंड देखील लागणार नाही."
त्यांना दोनच शब्दांमध्ये उत्तर दिले, "चालेल मला! करा फाईन."
मग त्याचा देखील नाईलाज झाला. त्याने मशीनमध्ये माहिती टाकली आणि बराच वेळ वाट बघत होता. इंटरनेटला रेंज नसण्याचे कारण सांगून तो शेजारच्या गाडीपाशी असलेल्याच्या दुसऱ्या सहकाऱ्याजवळ गेला व त्याला देखील काहीतरी सांगितले. मग तो त्याच्या जवळचे मशीन घेऊन इकडे आला. त्याने देखील पहिल्याचीच री ओढली. "साहेब तुम्ही चांगले दिसता कशाला फाईन वगैरे भरताय? दोनशे रुपये द्या लगेच गाडी मोकळी करतो."
मी पुन्हा म्हटलं, "साहेब ऑनलाईन फाईन करा. मी भरायला तयार आहे. आधीच्या साहेबांना सुद्धा मी हे सांगितलं आहे. यापेक्षा वेगळं मी काही करू शकत नाही."
मग त्याचा देखील नाईलाज झाला. गाडीला ऑनलाइन फाईन पडला. पण त्यांनी सांगितल्याप्रमाणे तो एक हजार रुपये नसून ५०० रुपये होता! लाखो ड्रायव्हरपैकी पियूसी नसल्यामुळे ऑनलाईन फाईन भरणारा कदाचित मी एकमेव ड्रायव्हर असावा!
दोघांच्याही चेहऱ्यावर आश्चर्यमिश्रित भाव होते. त्यांच्यासमोरच मी आरटीओच्या वेबसाईटवर फाईन भरला आणि गाडी चालू केली. एक मात्र धडा घेतला की लांबच्या प्रवासाला जाण्याच्या आधी गाडीची सगळं कागदपत्रे योग्य आहेत की नाही, हे तपासून घ्या आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोलिसांशी कुठलाही काळा व्यवहार करू नका.
Ⓒ Ⓐ तुषार भ. कुटे
Wednesday, October 21, 2020
गावकुसातील जित्राबं - भरत आंधळे
या पुस्तकातील प्रत्येक पात्र वेगवेगळे आहे. ते आपल्याला काहीतरी गोष्ट शिकवून जाते. त्यात जगावे कसे किंवा कसे जगू नये? या प्रश्नाचेही बहुतांशी उत्तर मिळून जाते. पु. ल. देशपांडे यांच्या "व्यक्ती आणि वल्ली" मधील विनोदी पात्रे या पुस्तकामध्ये नसली तरी अत्यंत साध्या ग्रामीण व्यक्ती आपल्याला त्यातून भेटून जातात. विशेष म्हणजे लेखकाने प्रामाणिकपणे आपल्या वडिलांचे प्रतापही व्यक्तिचित्रणाद्वारे या पुस्तकातून मांडले आहेत. ग्रामीण व्यक्ती व जीवन शैली अनुभवलेल्या प्रत्येकालाच यातील प्रत्येक पात्र जाणून घेण्यात निश्चितच आनंद वाटेल.
Wednesday, October 30, 2019
गोष्ट एका परीक्षेची
पॉलिटेक्निकला नुकतेच 'कॅरिऑन' लागू झाले होते कॅरीऑन चा अर्थ असा की, कधीही नापास झालेला मुलगा पुढच्या वर्गात ढकलला जात असे. शिवाय इयरली पॅटर्न मधून सेमिस्टर पॅटर्न आल्यामुळे तंत्रशिक्षण मंडळाला सर्वच विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात ढकलणे अनिवार्य झाले होते. अर्थात यामुळे वर्षानुवर्षे डिप्लोमा करत असलेली मुले एकाच वर्गात आली होती. यातले कितीतरी मुले माझ्या पेक्षा वयाने मोठी होती आणि शरीरानेही!
यंदा पहिल्यांदाच ओरल एक्झाम आल्यामुळे मीही भलताच खूष होतो आणि विद्यार्थ्यांची चांगलीच ओरल घेऊ असाही, विचार मनात पक्का केला होता. त्याकाळात परीक्षेच्यावेळी माझ्यातला आदर्श शिक्षक जागा होत असे! मला पहिलीच परीक्षा आली ती महावीर पॉलिटेक्निकला.
हे महाविद्यालय नाशिकच्या दिंडोरी रोड वरील म्हसरूळ गावापासून आत मध्ये वरवंडी गावच्या रस्त्यावर आहे. या रस्त्याने नाशिकची सिटीबस दिवसातून एक ते दोन वेळा जायची. शिवाय गावाकडचा भाग असल्यामुळे रिक्षांची संख्या अत्यंत कमी होती. कॉलेजची बस मात्र नियमित जायची. तिथल्या इंटरनल एक्झामिनरने मला त्यांच्या बसचे वेळापत्रक दिले होते. तरीही त्या दिवशी माझी बस चुकली. मग मी अमृतधाम ते पंचवटी आणि पंचवटी ते म्हसरूळ असा रिक्षाने प्रवास केला. परीक्षेची वेळ होत आली होती आणि मलाही जायची घाई होती. म्हसरूळच्या वरवंडी फाट्यावर उतरलो. तर तिथे एकही रिक्षा उभी असलेली दिसली नाही. अर्थात मला फक्त शेअर रिक्षाचा पर्याय उपलब्ध होता. थेट परीक्षा करणे मात्र परवडणारे नव्हते. त्यामुळे लिफ़्ट मागण्याचा एक सहज सोपा पर्याय माझ्यापुढे होता. त्याचीच वाट बघत मी वरवंडी फाट्यावर उभा राहिलो. परंतु या रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनांची गर्दी फार नव्हती. जाणारे बाइकस्वार फारफार तर म्हसरूळ गावात घुटमळत. आता काय करावे? हा प्रश्न उभा ठाकलेला होताच.
फाट्यावर उन्हात उभे असताना एका बाईकस्वाराने पाहिले व तो थोडं पुढे अंतरावर जाऊन थांबला. त्याने मागे वळून बघितले आणि मला हाक मारली. डोळ्यावर टिपिकल चष्मा अडकवलेला, छोटे केस आणि माझी बारीक देहयष्टी घेऊन मी त्याच्याकडे गेलो.
'कॉलेजला जायचं का?' तो म्हणाला.
त्याच्या या प्रश्नावर मनात आनंदी होऊन मी होकारार्थी मान डोलावली. अखेर काही मिनिटांच्या प्रतीक्षेनंतर मला लिफ्ट मिळाली होती. त्यामुळे हायसे वाटले. त्या दहा मिनिटांच्या प्रवासात आमच्या थोड्या गप्पा झाल्या.
'परीक्षेला चालला काय?' त्याने विचारले.
त्याच्याच प्रश्नावर मला समजले की, त्याला वाटतंय मी विद्यार्थी आहे. मग मनातल्या मनात म्हटलं, बघूया काय होतंय ते आणि होकारार्थी मान डोलावली.
मग आमचे प्रश्न-प्रश्न आणि उत्तरे-उत्तरे चालू झाली.
'कोणत्या क्लासमध्ये आहेस' त्याने विचारले.
'टीवाय आयटी'.
'मी पण त्याच वर्गात आहे'.
'कॅमच्या (कम्प्युटर आर्किटेक्चर अँड मेंटेनन्स) ओरलला चाललाय का?'.
'हो' मी म्हटले.
त्यालाही आपला जोडीदार मिळाल्याचे समाधान वाटले. अर्थात कॅरीऑन मुळे अनेक उडाणटप्पू मुले एकाच वर्गात आली होती. त्यातले बरेच जण कॉलेज अटेंड करत नव्हते. आमचा हा स्वारही त्याच कॅटेगरीतला! त्यामुळे माझ्या उत्तरावर त्याचा लगेच विश्वास बसला.
'तू कोणत्या बॅचचा?' त्याने पुढे विचारले.
'2004'
'हो का? मी 2003 च्या बॅचचा...'
'हे एक्स्टर्नल लई खडूस असतात का रे?'
'हो... लै खडूस असतात. मी तीन वेळा नापास झालोय'
'मी तर काहीच प्रिपरेशन केला नाही भाऊ!'
'अरे मी तरी कुठे केलीये? मी असंच चाललोय.'
'जाऊदे पास तर पास नापास तर नापास!'
असं म्हणत त्याने एक्स्टर्णल एक्झामिनरला दोन-चार शिव्या दिल्या आणि पुढचा संवाद सुरू ठेवला.
कॉलेजच्या गेट पाशी गेल्यावर मात्र माझी गोची झाली. त्याने तर त्याचे आयकार्ड दाखवले. पण माझ्याकडे तर तेही नव्हते आणि वॉचमनला एक्स्टर्णल एक्झामिनर आहे, असे सांगावे तर माझाच भांडाफोड झाला असता. वॉचमन मात्र कार्ड वरती अडून बसला होता.
काय भाऊ तुला परीक्षेला आयकार्ड लागतं हे पण माहीत नाही का? असं सांगून तो लगबगीने आत मध्ये निघून गेला. मग मी लगेचच इंटर्णल एक्झामिनर ला फोन लावला आणि वॉचमनशी बोलायला सांगितले. मग काय वॉचमनने तातडीने आत सोडून दिले आणि अखेरीस आमची परीक्षा चालू झाली. मी आणि इंटरनल एक्झामिनर टेबलसमोर बसलेलो आणि एक एक विद्यार्थी आत यायला सुरुवात झाली. आणि पाहतो तर काय, आमचा बाईकस्वार पहिल्या क्रमांकावर होता!!! खूप जुन्या बॅचचा असल्यामुळे त्याचा पहिला क्रमांक लागला होता. मला समोर एक्झामिनर म्हणून बघितल्यावर तर त्याला धक्काच बसला. काय करावं काय नाही, या प्रश्नाचे उत्तरही त्याच्याकडे नव्हते. त्याला हेही माहीत होते की, त्यांनी काहीच अभ्यास केलेला नाहीये, हे मला माहितीये! शिवाय माझ्या नावाने त्याने दोन-चार शिव्या हासडल्या होत्या. बिचाऱ्याची अवस्था मात्र मला बघवली नाही. कदाचित त्याचा मेंदू हँग झालेला असावा! ओरल ला दोन-चार सोपे प्रश्न विचारले आणि त्याला सोडून दिले. परंतु एकाही प्रश्नाचे उत्तर बिचाऱ्याला आले नाही. परीक्षा संपल्यावर त्या विद्यार्थ्याला मी परत कधीच पाहिले नाही. परंतु एका अनपेक्षित प्रसंगाची मजा मात्र तो घेऊन गेला. हा किस्सा जेव्हा मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगायचो तेव्हा त्यांचा शेवटचा एकच प्रश्न असायचा, तो पास झाला की नापास? मग मी हसून उत्तर द्यायचो, 'मी माझ्या दहा मिनिटांच्या मित्राला नापास थोडी करणार होतो?'
Tuesday, December 11, 2018
आजोबा अन एम एच १५
'कशी.... चालवतच आणली का?' त्यांनी प्रश्न केला.
या प्रश्नाने त्यांच्या चेहऱ्यावरचे प्रश्नचिन्ह माझ्या चेहऱ्यावर तयार झाले.
'नाशिकहून गाडी चालवतात आणली का?' त्यांनी पुन्हा प्रश्न केला. तेव्हा माझ्या लक्षात आले की, आजोबांना माझ्या गाडीचा क्रमांक दिसला होता. पण, त्यांना मी गाडी पुण्यात कशी आणली, यात मात्र किती रस होता!
मी मात्र स्मितहास्य करून 'नाही' असे सहज सोप्पे उत्तर दिले. पण, मनातल्या मनात 'नाही... डोक्यावर घेऊन आलो', असे उत्तर आधीच तयार झाले होते. टिपिकल पुणेकरांसोबत त्यांचाच सारखे बोलायची सवय आता हळूहळू होऊ लागलीये. कदाचित त्या आजोबांना 'एम एच १५' हा क्रमांक नाशिकचा आहे... अन ते मला माहित आहे... असेही सुचवायचे असेल... म्हणून हा खटाटोप असावा. 'आम्हाला सगळ्यातलं सगळं कळतं' ... त्यातलाच हा भाग...!!!
Sunday, March 31, 2013
Thrilling Harihar fort
| Harihar Fort from Base |
| I am at the start of the steps |
| Bhaskar Gad from Harihar fort |
| Steps of the fort (But you don't need helmet!!!) |
| Tunnel after the steps |
| Berry's the base of the Harihar fort. |
| Greeny roads in the summer. |
| Top of the Harihar fort. |
Saturday, March 9, 2013
नाशिक पर्यटनमित्र...!!!
’पिकतं तिथं विकत नाही’ असं म्हणतात, हे आपल्या शहराच्या बाबतीत १०० टक्के खरं आहे. नाशिकवासियांनी याचा खऱ्या अर्थाने विचार करण्याची गरज आहे.
Saturday, March 2, 2013
कपडे धुण्याची कला
सुरुवातीच्या काळात कपडे नक्की कसे धुवायचे? या प्रश्नाचे उत्तर प्रात्याक्षिकरित्या सापडण्यासाठी मला बरीच मेहनत घ्यावी लागली! आणि तीही मार्गदर्शकाविना! ह्या प्रोसेसमध्ये मला अनेक नवे अनुभव आले! अनुभव हाच माणसाचा खरा गुरू असतो, हेही समजले. कोणता साबण वापरायचा तसेच ब्रश कसा वापरायचा याचेही धडे मी स्वत:च गिरवले. त्यामुळे साबण व ब्रश या दोघांच्याही दर्जाच्या अंदाज येऊन गेला. निरमा, एरियल, सर्फ़ एक्सेल, टाईड असे अनेक निरनिराळे ब्रॅंड वापरून झाले. त्यातही निरनिराळे फ्लेव्हर्स वापरून पाहिले. मग, कोणता ब्रॅंड व कोणता फ्लेव्हर हा चांगला आहे, याची माहिती झाली. आज एखाद्या गृहिणीलाही मी याबाबत मार्गदर्शन करू शकतो. पूर्वी मी रफ ब्रशचा वापर करताना कपडे लवकर खराब व्हायचे नंतर मित्रांच्या मार्गदर्शनामुळे सॉफ्ट ब्रशचा वापर करायला लागलो व कपड्यांची ’लाईफ’ वाढली! उदाहरणच द्यायचे झाले तर सीओईपीमध्ये जो युनिफॉर्म वापरायचो त्याचे शर्ट आजही मी वापरतो आहे!!!




