विद्या प्रतिष्ठानच्या “शरदचंद्र पवार इन्स्टिट्यूट ऑफ सेंट्रल ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स” या संस्थेला भेट देण्याचा योग आला. मागच्याच आठवड्यामध्ये या संस्थेच्या इमारतीचे उद्घाटन झाले होते. मी स्वतः आर्टिफिशल इंटेलिजन्समध्ये अनेक वर्षांपासून कार्यरत असल्याने या नव्या संस्थेविषयी माझ्या मनातही कुतूहल होते. प्रत्यक्ष संस्थेला भेट दिल्यानंतर मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली.
पाश्चिमात्य देशांप्रमाणे भारतात देखील आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागलेला आहे. परंतु या तंत्रज्ञानाच्या विकसनाचा विचार केल्यास अजूनही भारत अनेक देशांच्या कित्येक मागे असल्याचे दिसते. किंबहुना आपले आपली विद्यापीठे तसेच तंत्रज्ञान संस्था एआय विकसित करण्याच्या दृष्टीने लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर अजूनही फारशा गांभीर्याने उपलब्ध करून देताना दिसत नाहीत. म्हणूनच या क्षेत्रात काम करणाऱ्या भारतीय विकसकांना इन्फ्रास्ट्रक्चरसाठी क्लाऊडचा वापर करून तंत्रज्ञान एका अर्थाने उसने घ्यावे लागते. परंतु विद्या प्रतिष्ठानच्या या सेंटर ऑफ एक्सलन्स मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी लागणारे अद्ययावत तंत्रज्ञान तसेच इन्फ्रास्ट्रक्चर मुबलक प्रमाणात उपलब्ध केल्याचे दिसून आले. शिवाय डेटा सायन्स, बिझनेस इंटेलिजन्स, ड्रोन टेक्नॉलॉजी, नॅचरल लैंग्वेज प्रोसेसिंग, सायबर सेक्युरिटी, इंटरनेट ऑफ थिंग्स अशा विविध एआय आधारित शाखांसाठी वेगवेगळ्या प्रयोगशाळांची रचना या ठिकाणी करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे ड्रोन आणि इंटरनेट ऑफ थिंग्समधील उत्पादने तयार करण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या हार्डवेअरची गरज असते. आणि ही अद्ययावत हार्डवेअर्स अतिशय महाग असतात. विद्यार्थ्यांना यामध्ये प्रकल्प विकसित करायचे असल्यास खर्चिक होते. ही सर्व प्रकारचे हार्डवेअर्स इथल्या प्रयोगशाळांमध्ये दिसून आली.
पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातील निमशहरी ठिकाणी अशा प्रकारच्या प्रयोगशाळा असणारी संस्था म्हणजे आश्चर्यच होते. या पद्धतीचे इन्फ्रास्ट्रक्चर मला अजूनही पुण्यातल्या कोणत्याही विद्यापीठात किंवा तंत्रज्ञान संस्थेमध्ये दिसलेले नाही. ज्या तंत्रज्ञानाला गांभीर्याने घ्यायला हवे ते अजूनही मोठमोठ्या संस्था घेत नाहीत, याचे आश्चर्य वाटते. म्हणूनच बारामती सारख्या छोट्या शहरामध्ये विद्या प्रतिष्ठानने उभारलेला हा उपक्रम खरोखर स्पृहणीय आणि अभिनंदन असाच आहे.
— तुषार भ. कुटे
#AI #ArtificialIntelligence
Friday, January 9, 2026
शरदचंद्र पवार इन्स्टिट्यूट ऑफ सेंट्रल ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स
Sunday, September 21, 2025
पुणे -> धुळे -> पुणे = ६९१ किमी
धुळ्याच्या श्री विलेपार्ले केळवणी मंडळाच्या तंत्रशिक्षण संस्थेमध्ये अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने आयोजित केलेल्या ब्लॉगचेन या तंत्रज्ञानावर आधारित कार्यशाळेसाठी शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मला जायचे होते. तसं पाहिलं तर माझे येथील व्याख्यान केवळ अडीच ते तीन तासांचे होते. शिवाय सध्याच्या व्यग्र वेळापत्रकामधून पुण्यापासून इतक्या दूरवर व्याख्यान देण्यासाठी जायचे म्हणजे जिकीरीचे काम होते.
अखेरीस रस्त्यानेच स्वतःच्या गाडीने प्रवास करत जायचे आम्ही ठरवले. माझी गाडी इलेक्ट्रिक अर्थात टाटाची नेक्सॉन ईव्ही. आणि पुण्यापासून धुळ्यापर्यंतचा अंतर होतं सव्वातीनशे किलोमीटर पेक्षा अधिक! एका दिवसामध्ये जाऊन परत येणं तसं अवघड वाटत होतं. परंतु दुसऱ्या दिवशी पुन्हा ऑफिसमध्ये नेहमीच्या प्रशिक्षणासाठी यायचं होतं. त्या दृष्टीने धुळ्याच्या या एका दिवसाच्या प्रवासाची आम्ही योजना आखली.
पहाटेच पुणे-नाशिक महामार्गाने धुळ्याच्या दिशेने रवाना झालो. आदल्या दिवशी विजांच्या गडगटाटासह पावसाने धुमाकूळ घातला होता. त्यामुळे या प्रवासातही मुसळधार आणि जोरदार पावसाची शक्यता होती. परंतु प्रत्यक्ष जसे काहीही झाले नाही. सकाळी निघालो त्यावेळेस आकाशातले ढग बऱ्यापैकी निघून गेले होते. संगमनेरचा टोलनाका पार झाल्यानंतर लगेचच गाडी चार्जिंगला लावली. अर्थात एवढ्या ऊर्जेमध्ये आम्ही धुळ्यापर्यंत निश्चित पोहोचू शकत होतो.
नारायणगावपासून सिन्नर पर्यंतचा पुणे-नाशिक महामार्गाचा टप्पा भयावह स्थितीमध्ये आलेला आहे. बऱ्याच ठिकाणी अजूनही वाहनचालकांना गाडी चालवण्यासाठी कसरत करावी लागते. अर्थात यामध्ये आम्ही देखील सामील होतो. राष्ट्रीय महामार्गांवर इलेक्ट्रिक वाहनांना ५०% टोलमाफीची घोषणा झाली, परंतु अजूनही कोणत्याच टोलनाक्यावर या सूचनेची अंमलबजावणी केली जात नाही. याचाही अनुभव आला!
सिन्नरपाशी महामार्ग सोडला आणि निफाडकडे जाणाऱ्या रस्त्याने मार्गक्रमण चालू केले. तेव्हा वातावरण पूर्णपणे निरभ्र झालेले होते. आजूबाजूला जिथवर नजर जाईल तिथपर्यंत हिरवीगर्द झाडी आणि त्यांच्या मधून काळा कुळकुळीत डांबरी रस्ता दिसत होता. महामार्ग सोडल्याने आता रस्त्यावरची गर्दी बऱ्यापैकी कमी झालेली होती. थोड्याच वेळात नांदूर-मध्यमेश्वरच्या पक्षी अभयारण्यापाशी पोहोचलो. त्या निसर्गरम्य परिसराचा आस्वाद घेत तसेच नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर आणि निफाड तालुक्यातील समृद्ध गावांच्या परिसरातून प्रवास करत आम्ही नाशिक-संभाजीनगर महामार्गाला लागलो. या रस्त्याची ही परिस्थिती भयावह अशीच होती. येथून निफाड पर्यंतचा तीन किलोमीटरचा रस्ता पार करायला जवळपास १५ मिनिटे लागली! निफाडनंतर चांदवडच्या दिशेने निघालो. थोड्याच वेळात दूरवर चांदवड तालुक्यातील सातमाळ्याच्या रांगा दृष्टीस पडू लागल्या. पावसाचे अजूनही नामोनिशान नव्हते. थोड्याच वेळात चांदवड शहरात पोहोचलो. जवळपास दशकभरानंतर या शहराचे दर्शन घेतले होते. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग लागला आणि पुन्हा तीच गर्दी रस्त्यावर दिसू लागली. चांदवडहून मालेगाव आणि मग लवकरच धुळे शहरामध्ये पोहोचलो. मागच्या तीन-चार तासांमध्ये जाणवत असलेल्या वातावरणातील गारवा नष्ट झाला होता. खरोखर उन्हाळा ऋतू चालू आहे की काय, असं वाटू लागलं होतं. अर्थात महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणांमधील वातावरणातला तसेच तापमानातील हा फरक स्पष्टपणे जाणवत होता. यावेळेस देखील आम्ही गुगल मॅपला पाऊण ते एक तासाने हरवले होते!
बरोबर दोन वाजता महाविद्यालयात पोहोचलो आणि पाच वाजता व्याख्यान संपल्यानंतर पुन्हा परतीच्या मार्गाने लागलो. नियोजनात थोडीशी गडबड झाल्यामुळे धुळे शहर सोडायला साडेसहा वाजले. संध्याकाळीची महामार्गावरील गर्दी आणि अधूनमधून कोसळणारा पाऊस यातून मार्ग काढत मुंबई-आग्रा महामार्गाने प्रवास करू लागलो. बहुतांश ठिकाणी रस्त्याची कामे चाललेली होती. त्यामुळे भयंकर रहदारीचा सामना करत आणि भल्या मोठ्या मालवाहू कंटेनर आणि ट्रकच्यामधून मार्ग काढत आम्ही पुढे सरकत होतो. मालेगाव बाह्यमार्ग सोडल्यानंतर रस्ता बऱ्यापैकी रिकामा झाला. तोपर्यंत हा प्रवास कष्टप्रद असाच वाटत होता. चांदवडमध्ये पोहोचायला जवळपास दोन तास लागले.
चांदवड ते सिन्नर हा जवळपास ८० किलोमीटरचा रस्ता आहे. यामध्ये निफाड वगळता अन्य कोणतेही मोठे गाव लागत नाही. साडेआठ ते साडेनऊच्या सुमारास आम्ही इथल्या अंतर्गत सामसूम झालेल्या रस्त्यांवरून वेगाने प्रवास करत होतो. रस्त्यातली सर्व गावे जवळपास शांत झालेली होती. वर्दळदेखील अतिशय कमी झालेली होती. शांत आणि सातत्यपूर्ण वेगाने आमचा प्रवास या मार्गावरून पूर्ण झाला. पावणेदहा वाजता पुन्हा पुणे-नाशिक महामार्गाला लागलो. समृद्धी महामार्गाच्या जवळ जेवण केले, गाडी चार्ज केली आणि थेट पुण्याच्या दिशेने परतीच्या मार्गाला लागलो.
हा प्रवास थकवणारा नव्हता... एक रोमांचकारी अनुभव होता आणि सुयोग्य नियोजनाचे धडे देणारा होता. प्रत्येक वेळी गुगल मॅपला आम्ही अर्धा ते पाऊण तासाने हरवले. कदाचित ही आमच्या गाडीची किमया होती. एकंदर प्रवासामध्ये सहाशे नव्वद किलोमीटरचे अंतर पार झाले. यापूर्वीचा पुणे ते हैदराबाद हा पावणे सहाशे किलोमीटरचा विक्रम मोडीत निघाला.
इंद्रायणी, भामा, भीमा, घोड, मीना, कुकडी, मुळा, प्रवरा, गोदावरी आणि मोसम अशा तब्बल दहा नद्या आणि चार महामार्ग या एकंदरीत प्रवासात पार झाले!
Sunday, December 22, 2024
पुस्तक महोत्सवात ज्ञानेश्वरी
पुणे पुस्तक महोत्सवामध्ये आज प्रचंड गर्दी झाली होती. आमच्या स्टॉलमध्ये वाचकांना पुस्तके पाहण्यासाठी बऱ्यापैकी मोकळी जागा ठेवलेली होती. तरी देखील अनेकांना चालता येत नव्हते. आमच्यावरील बिलिंगचा भार देखील वाढलेला होता. अशावेळी ज्ञानेश्वरीने एका बिलबुकाची सूत्रे स्वतःच्या हाती घेतली. आणि पटापट एका बाजूने ती बिले करू लागली. पुस्तकांची नावे लिहून, त्यांची किंमत लिहून त्यावरील सवलतीसह किती किंमत आहे, हे ती पटापट बिलांवर लिहित होती आणि अंतिम बिल बनवून देत होती. तिचा आम्हाला बराच हातभार लागला. पुस्तके विकत घेतल्यानंतर बिल करण्यासाठी येणारे वाचक तिच्याकडे कौतुकाने पाहत होते. इतकी लहान मुलगी पटापट बिले लिहून त्यांना देत असताना दिसली. अनेकांनी तिचे तोंड भरून कौतुक देखील केले. काहींनी फोटो काढले. अनेकांनी तर त्यांच्यासोबत आलेल्या मुलांना दाखवले देखील की, बघ ती मुलगी कसं काम करत आहे!
इतकी लहान मुलगी पटापट मराठीमध्ये कसं लिहू शकते? विशेष म्हणजे तिचे आकडेदेखील मराठीमध्ये होते, याचे देखील खूप आश्चर्य वाटलं. ती मराठी माध्यमामध्ये शिकत आहे, हे ऐकल्यावर काहींचे डोळे विस्फारले होते. पुस्तकांच्या जगात वावरताना दिवसभर तिची आम्हाला हातभार लावण्यासाठी चाललेली चाललेली लगबग अखेरीस रात्री महोत्सव बंद होईपर्यंत चालूच होती. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तिची यावर्षीची पुस्तकांची खरेदीही खूप मोठी झाली!
--- तुषार भ. कुटे
पुणे पुस्तक महोत्सवातील परकीय पाहुणे
आज पुणे पुस्तक महोत्सवामध्ये या दोन परदेशी व्यक्तींनी लक्ष वेधून घेतले. ते जवळपास सर्व स्टॉलवर फिरत होते. इथली गर्दी बघून त्यांचे व्हिडिओ देखील काढत होते. त्यांच्या चेहऱ्यावर कौतुक मिश्रित आश्चर्याचे भाव दिसून आले. महोत्सवामध्ये पुस्तके पाहण्यासाठी आणि विकत घेण्यासाठी झालेली गर्दी पाहून ते आश्चर्यचकित झाले असावेत. पुस्तकांनी भरलेल्या मोठमोठ्या पिशव्या घेऊन जाणाऱ्या लोकांचे त्यांनी नकळत फोटो देखील काढले. एकंदरीत पुणेकरांच्या वाचनप्रेमाने ते भारावून गेले होते. भारतीयांविषयी तसेच इथल्या वाचन संस्कृतीविषयी त्यांच्या मनात निश्चितच सकारात्मक भावना निर्माण झाली असावी, हे मात्र निश्चित.
Tuesday, January 9, 2024
एक दृष्टिकोन
पुण्यातील एका राष्ट्रीय शिक्षण संस्थेमधील माझे काम आटोपून मी निघालो
होतो. तळमजल्यावर कुणीच नव्हते. समोरून दोन विद्यार्थी काहीतरी शोधात
येताना दिसले. त्यांनी मला हाक दिली आणि विचारले, “सर टॉयलेट कुठे आहे?”
त्यांच्या बोलण्यावरून ते मराठी भाषिक वाटत नव्हते. पण तरीदेखील त्यांनी
मराठी भाषेतून हा प्रश्न विचारला, याचे मला आश्चर्य वाटले. त्यामुळे मी
तात्काळ त्यांना स्वच्छतागृहाचा रस्ता दाखवला. जाता जाता त्यांच्यातील
संभाषण माझ्या कानी पडले.
दोघेही उत्तर भारतातील वेगवेगळ्या राज्यातून
पुण्यात शिकायला आले होते. ज्या विद्यार्थ्याने मला विचारले तो इथे
येण्याआधी पुणे शहराचा आणि इथल्या भाषेचा देखील अभ्यास करून आलेला होता!
शिवाय मराठी भाषेत जुजबी प्रश्न विचारण्याचा सराव देखील त्याने केला होता.
त्याचे मला विशेष कौतुक वाटले. कारण आजवर आपण पाहिलेच आहे की, उत्तरेतून
आलेले लोक मराठी लोकांना गृहीत धरतात. आमची भाषा मराठी लोकांना येतच असेल,
शिवाय तेच आमच्याशी आमच्या भाषेमध्ये बोलतील हे देखील त्यांना माहीत असतं.
म्हणून महाराष्ट्र भूमीची मराठी भाषा शिकण्याची तसदी कोणी घेत नाही. परंतु
या विद्यार्थ्याप्रमाणे दृष्टिकोन असेल तर त्यांच्याविषयी मराठी लोकांना
देखील आपुलकी वाटेल. गरज कोणाला आहे हा प्रश्न नाही तर बाहेरून आलेले लोक
इथल्या राज्याचा आणि भाषेचा किती सन्मान करतात? हे जास्त महत्त्वाचे.
- तुषार भ. कुटे
Thursday, December 8, 2022
पायथॉन प्रोग्रामिंगवर कार्यशाळा
नुकतीच पिंपरी चिंचवड तंत्रनिकेतन, पुणे येथे पायथॉन प्रोग्रामिंगवर कार्यशाळा घेतली. यामध्ये द्वितीय वर्ष माहिती तंत्रज्ञानाच्या मुलांनी सहभाग घेतला होता. संगणक प्रोग्रामिंग अनेकांना अतिशय अवघड वाटते. परंतु ती रंजकपणे शिकवल्यास त्यातील रुची वाढण्यास मदत होते. शिवाय कमी वयामध्ये आकलनक्षमता अतिशय उत्तम असते, याची प्रचिती या कार्यशाळेमध्ये आली. विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. तसेच त्यांच्या परीक्षणांवरून मलादेखील पुन्हा नव्या गोष्टी शिकविण्यासाठी ऊर्जा प्राप्त झाली. धन्यवाद!
Tuesday, June 8, 2021
मराठीतून अभियांत्रिकी
युरोप तसेच पूर्व आशियातील अनेक देशांमध्ये तंत्रशिक्षण मातृभाषेतूनच दिले जाते. त्यामुळे देशांतर्गत प्रगतीला वेगाने चालना मिळत आहे. भारतामध्ये मात्र अशी परिस्थिती नाही. आपल्याला युरोपीय व अमेरिकन देशांवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळेच इंग्रजीतून अभियांत्रिकी शिक्षणाला मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिले जाते. अनेकांचे असेही म्हणणे असते की, इंग्रजीतून शिकलं की फाडफाड बोलता येतं! परंतु हा भ्रम आहे. आजही इंग्रजीतून अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या बहुतांश, किंबहूना तीन चतुर्थांश मुलांना इंग्रजी व्यवस्थित बोलता येत नाही. शिवाय अभ्यासक्रम इंग्रजीमध्ये असल्यामुळे बहुदा तो समजतही नाही. याच कारणास्तव ज्ञानाधारित पिढ्या आपल्या देशात तयार होताना दिसत नाहीत. बहुतांश मुले केवळ घोकंपट्टी करून अभियांत्रिकीच्या परीक्षा पास होत असतात. मातृभाषेतून अभियांत्रिकी शिक्षण मिळाल्याने किमान त्यांना संकल्पना समजण्यास तरी निश्चितच मदत होईल. बाकी फाडफाड इंग्रजी बोलणे, हे ज्याचे त्याच्या हातात आहे. अनेकांना असेही वाटते की, इंग्रजीतल्या अभियांत्रिकी संकल्पनांना मराठीमध्ये भाषांतरित कराव्या लागतील. परंतु तसे करण्याची आवश्यकता वाटत नाही. युरोपातील स्पॅनिश, फ्रेंच, जर्मन, इटालियन, पोर्तुगीज भाषांमध्ये अभियांत्रिकीच्या संकल्पना जशाच्या तशा मांडलेल्या आहेत. भारतीय भाषांमध्येही हाच प्रयोग चालू ठेवावा लागेल. जेणेकरून विद्यार्थ्यांना त्या आपल्या भाषेमध्ये व्यवस्थित समजू शकतील.
Tuesday, March 3, 2020
लिफ्ट
"तळमजल्यावर जायचं का?"
"नाही सिक्स्थ फ्लोअरला!" तो उत्तरला.
"मग खालचं बटन का दाबलं?"
"लिफ्टला खाली आणण्यासाठी!"
मनातल्या मनात खुदकन हसवणारे उत्तर होते हे.
लिफ्ट आली आणि आम्ही आत गेलो. मग मी त्याला समजावून सांगितलं, "बाहेरची बटनं लिफ्ट कुठे न्यायची याच्यासाठी नसतात. आपल्याला कुठे जायचे? याच्यासाठी असतात".
"पण आली ना लिफ्ट खाली!"
त्याच्या या बोलण्यावर पुढे काय बोलावं, हे मला सुचेना. मी मात्र पु.ल.देशपांडे व द. मा. मिरासदार यांच्या कोणत्या पात्रात माझ्या लिफ्टमधील हे पात्र योग्यरीत्या बसेल, याचा विचार करत बसलो.
Tuesday, December 11, 2018
आजोबा अन एम एच १५
'कशी.... चालवतच आणली का?' त्यांनी प्रश्न केला.
या प्रश्नाने त्यांच्या चेहऱ्यावरचे प्रश्नचिन्ह माझ्या चेहऱ्यावर तयार झाले.
'नाशिकहून गाडी चालवतात आणली का?' त्यांनी पुन्हा प्रश्न केला. तेव्हा माझ्या लक्षात आले की, आजोबांना माझ्या गाडीचा क्रमांक दिसला होता. पण, त्यांना मी गाडी पुण्यात कशी आणली, यात मात्र किती रस होता!
मी मात्र स्मितहास्य करून 'नाही' असे सहज सोप्पे उत्तर दिले. पण, मनातल्या मनात 'नाही... डोक्यावर घेऊन आलो', असे उत्तर आधीच तयार झाले होते. टिपिकल पुणेकरांसोबत त्यांचाच सारखे बोलायची सवय आता हळूहळू होऊ लागलीये. कदाचित त्या आजोबांना 'एम एच १५' हा क्रमांक नाशिकचा आहे... अन ते मला माहित आहे... असेही सुचवायचे असेल... म्हणून हा खटाटोप असावा. 'आम्हाला सगळ्यातलं सगळं कळतं' ... त्यातलाच हा भाग...!!!
Tuesday, December 4, 2018
राजगड हिंदीतून
शिवरायांचा सर्वात अधिक सहवास लाभलेला किल्ला म्हणजे राजगड...
स्वराज्यातील प्रतापगडाचे युद्ध, लाल महालातील चढाई, सुरतेचा छापा, आग्र्याहून सुटका, पुरंदरचा तह यासारख्या घटनांचा राजधानी म्हणून साक्षीदार असलेला दुर्ग म्हणजे राजगड...
या किल्ल्याविषयी बऱ्याच दिवसांपासून हिंदी लेख लिहावा असे बऱ्याच दिवसांपासून मनात होते. ही इच्छा मी एक जानेवारी २०१३ मध्ये पूर्ण केली. सदर लेख इथे http://tusharkute.blogspot.com/2013/03/blog-post_8071.html वाचता येईल. तदनंतर दोन वर्षांनी मी हाच लेख महाविद्यालयाच्या वार्षिक मासिकासाठी पाठविला होता. लेख दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हिंदी संपादकीय मंडळातून मला फोन आला. त्यांना वाटत होते की, सदर लेख मी 'रायगड' या किल्ल्यासाठी लिहिला असावा पण चुकून त्यात 'राजगड' असं नाव आलंय. आपल्यालाच लोकांना आपल्या किल्यांविषयी अथवा इतिहासाविषयी माहिती नाही, याचे मला अर्थातच फारसे विशेष वाटले नाही. लेख अखेर प्रसिद्ध झाला! त्यावेळी त्यावर मला अनेक प्रतिक्रिया मिळाल्या होत्या. तुमच्या प्रतिक्रिया व सूचनांचे स्वागत यावेळीही आहे.
http://tbkute.blogspot.com/2015/11/hindi_17.html
Wednesday, April 3, 2013
आयपीएल आणि पाणी
Saturday, March 2, 2013
कपडे धुण्याची कला
सुरुवातीच्या काळात कपडे नक्की कसे धुवायचे? या प्रश्नाचे उत्तर प्रात्याक्षिकरित्या सापडण्यासाठी मला बरीच मेहनत घ्यावी लागली! आणि तीही मार्गदर्शकाविना! ह्या प्रोसेसमध्ये मला अनेक नवे अनुभव आले! अनुभव हाच माणसाचा खरा गुरू असतो, हेही समजले. कोणता साबण वापरायचा तसेच ब्रश कसा वापरायचा याचेही धडे मी स्वत:च गिरवले. त्यामुळे साबण व ब्रश या दोघांच्याही दर्जाच्या अंदाज येऊन गेला. निरमा, एरियल, सर्फ़ एक्सेल, टाईड असे अनेक निरनिराळे ब्रॅंड वापरून झाले. त्यातही निरनिराळे फ्लेव्हर्स वापरून पाहिले. मग, कोणता ब्रॅंड व कोणता फ्लेव्हर हा चांगला आहे, याची माहिती झाली. आज एखाद्या गृहिणीलाही मी याबाबत मार्गदर्शन करू शकतो. पूर्वी मी रफ ब्रशचा वापर करताना कपडे लवकर खराब व्हायचे नंतर मित्रांच्या मार्गदर्शनामुळे सॉफ्ट ब्रशचा वापर करायला लागलो व कपड्यांची ’लाईफ’ वाढली! उदाहरणच द्यायचे झाले तर सीओईपीमध्ये जो युनिफॉर्म वापरायचो त्याचे शर्ट आजही मी वापरतो आहे!!!
Sunday, April 29, 2012
पुणे-नाशिक महामार्ग
![]() |
| Pune- Nashik Highway |
Wednesday, December 30, 2009
पुण्यात राहण्याचा पहिला अनुभव
पुणे महानगरपालिकेचा पूल ओलांडल्यानंतर ’मुख्य’ पुणे शहर चालू होते. पेठांमध्ये वसलेली ’टिपिकल पुणेरी’ माणसे इथे पाहायला मिळतात. मराठीतल्या ’ण’ ला आवर्जून ’ण’च म्हणणारी माणसे हीच होय...! शोधता शोधता आप्पा बळवंत चौकासारख्या मध्यवर्ती ठिकाणी नारायण पेठेत आम्हाला खोली मिळाली. एकच खोली व त्याला गॅलरी होती, तीही बंदिस्त... सकाळी आम्ही निघायचो तेव्हा तिथुन फक्त पाण्याच्या मोटारीचा आवाज यायचा. या खोलीमध्ये टॉयलेट-बाथरूमही अटॅच होते. आणि भाडे होते, अडिच हजार.... सन २००२ मध्ये इतके भाडे निश्चितच जास्त होते. तरिही चौघांनी मिळून ते भरायचे ठरविले. शिवाय डिपॉझिटही तितकेच होते. मालकाचे नाव होते, सॉरी..... मालकिणीचे नाव होते....सौ. रेणुसे. मालकाला तर आम्ही कधी पाहिलेही नसेल....
पहिल्यांदाच पुण्याला राहायला आल्याने मला फारसे करमतही नव्हते. त्यातल्या त्यात मालकिणबाई टिपिकल मराठी किंवा हिंदी चित्रपटात दाखवितात तश्या वागणाऱ्या होत्या. त्याही ’ण’ ला आवर्जून ’ण’च म्हणणाऱ्या कॅटेगरीतल्याच.... नाकातून बोलणारी माणसे या परिसरात विशेषत: सदाशिव पेठेत बहुसंख्येने आढळुन येतील. मालकिणबाई रोज दार ठोठवायला यायच्या. रोज नविन कारण असायचे.... पुणेरी लोकांचा असा अनुभव पहिल्यादाच येत असल्याने मीही वैतागुन गेलो. त्यामुळे करमतच नव्हते. एक दिवस मी एकटा असताना त्या आल्या व डोकं खात बसल्या. त्यांच्या बोलण्याने डोळ्यात पाणी आले होते (हे अश्रू फ्रस्ट्रेशनचे होते...) तेव्हाच रूम सोडायचा निर्णय घेतला. तसेही मला इथुन सीओईपी पर्यंत चालत जायला जवळपास ४० मिनिट लागायचे. पुढे काय करायचे याचा निर्णय न घेताच मी मात्र ती रूम सोडली. त्यानंतर कधीच पुणे मुख्य शहरात राहण्याचा प्रसंग आला नाही.
Tuesday, September 29, 2009
Swine flu pact...
When I entered in Pune, I was aware of this capital city of swine flu in India. So, I was also having fear of the swine flu. But, after some time I saw most of the citizens were free of the masks. I was confused by watching such situations…! After that, I also threw my mask (handkerchief…!). For all the five days, not even once I wore the mask on my face. I realised my power of resistance is very strong. Most of Pune citizens also think positively on this issue. They think only the person gets affected by H1N1, whose power of resistance is low. Still the swine flu effect is continuing in Pune. Government should have to take more aggressive steps to control the flu. Even in my training program, a lady used to wear the mask almost all the time, except the meal…!














