Friday, December 20, 2019

एका पुस्तक प्रदर्शनात

मागच्या आठवड्यात एके ठिकाणी पुस्तक प्रदर्शनाला जाणे झाले. वाचनसंस्कृतीची आपल्या इथे काय स्थिती आहे, हे आपल्याला माहीतच आहे. त्याप्रमाणेच सदर प्रदर्शनाला अगदी तुरळक गर्दी दिसून आली. माझी पुस्तके घेऊन झाल्यानंतर मी ती काउंटरवर घेऊन आलो. तिथे पैसे घेण्यासाठी बसलेला युवक आपल्या मोबाईल मधल्या व्हाट्सअपवर विविध मिम्सचे व्हिडिओ पाहत गुंग झाला होता. मागच्या अर्ध्या तासापासून त्याची नजर जराही मोबाईल मधून बाहेर आलेली नव्हती. माझे बिल करण्यासाठी त्याने काही सेकंद मोबाईल बाजूला ठेवला व परत आपल्या इच्छुक कार्यात गुंग होऊन गेला. 


प्रदर्शनातून बाहेर आल्यावर मी विचार केला, अशा मोठ्या पुस्तक प्रदर्शनाच्या काउंटरवर जर मी बसलो असतो तर कदाचित मी दिवसभर फक्त तिथली पुस्तकेच वाचत बसलो असतो! किंबहुना कोणत्याही पुस्तक प्रेमीने हेच केलं असतं. पुस्तके वाचायची सोडून मोबाईल मधले व्हिडिओ पाहण्यात हे लोक किती वेळ वाया घालवतात? त्यांना नक्की त्यातून कोणते ज्ञान मिळतं? हा टाईमपास नाही का?
पण थोड्याच वेळात मला माझ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली. विचार केल्यानंतर समजले की, तो वाचत नाहीये..  कदाचित त्याला वाचनाची आवड नाहीये. म्हणून तो आज या ठिकाणी फक्त गल्ल्यावर पैसे गोळा करण्याची कामं करतोय. त्याचा त्याच्या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असता तर कदाचित त्यालाही त्याच्या प्रगतीचा मार्ग सापडला असता. अर्थात तुमचा दृष्टीकोनच तुमचा भविष्य ठरवत असतं, हे पुनश्च एकदा त्या दिवशी समजलं.

© तुषार कुटे

Monday, November 25, 2019

ग्रहणांतील भीती

सूर्यग्रहण म्हणजे आपल्यात खगोल सृष्टीचा एक अद्भुत चमत्कार आहे! लहानपणी सर्वात पहिलं ग्रहण अर्थात खग्रास सूर्यग्रहण माझ्या वाढदिवशी 25 ऑक्टोबर 1995 ला पाहिलं होतं. रस्त्यावरची सामसूम आणि इतर कर्मकांड त्यावेळेस पहिल्यांदाच पाहिली व अनुभवली. रस्त्यावर पडलेल्या रिकाम्या गुटख्याच्या कव्हर मधून पाहिलेले ते सूर्यग्रहण आजही ध्यानात आहे. आमच्या वैज्ञानिक दृष्टिकोन त्यावेळेस आकार घेऊ लागला होता. त्यानंतर बरीच खंडग्रास सूर्यग्रहण पाहिली. रात्री जागून अनेक चंद्रग्रहणही पाहिली. एके वर्षी एक कंकणाकृती सूर्यग्रहण पाहिले होते.
अशाच कंकणाकृती सूर्यग्रहणाच्या योग कित्येक वर्षांनी 26 डिसेंबरला येतोय. आज सर्वच ग्रहणांची माहिती आपल्या दिनदर्शिकेत लिहिलेली असते. या पोस्ट सोबत जे छायाचित्र जोडलेले आहे, ही माहिती एका 'जगप्रसिद्ध' दिनदर्शिकेतून घेण्यात आली आहे. 
 

वर्षानुवर्षे ग्रहणाच्या बाबतीत चालत आलेल्या गैरसमजुती व अंधश्रद्धा यांना खतपाणी घालण्याचे काम हे लोक करताना दिसतायेत. ग्रहण वेधामध्ये भोजन करू नये, पर्वकाळात पाणी पिऊ नये, झोपू नये, गर्भवती महिलांनी ग्रहण पाहू नये, नर्मदा स्नान करावे असे मूर्खासारखे उपदेश व सल्ले याठिकाणी देण्यात आलेत. अशा गोष्टी वाचल्यावर देण्यात येते की, आपण अजूनही पुरातन काळात जगतोय. किंबहुना हे स्वयंघोषित ज्योतिषी लोक आपल्याला जगायला लावतायेत. खगोल विज्ञानाच्या या नयनरम्य आविष्काराचा आस्वाद घेण्याऐवजी भीतीचे वातावरण तयार करतायेत. अशाच लोकांवर महाराष्ट्र अंधश्रद्धा विरोधी कायद्यानुसार कारवाई व्हायला हवी. ती होईल की नाही हे माहीत नाही. परंतु, नागरिकांनी सजग होणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे याच जगप्रसिद्ध दिनदर्शिकेमध्ये अनिल काकोडकर, माधवराव चितळे, दत्तप्रसाद दाभोळकर यांचेही लेख आहेत हा मोठा विरोधाभास!

Monday, November 18, 2019

हॉटेलात पुस्तक वाचणारा

बर्‍याच दिवसांनी भाऊबीजेच्या निमित्ताने आमची ही दोन दिवसांसाठी माहेरी गेली होती. म्हणून घरी एकट्यासाठी काही बनविण्यापेक्षा बाहेर उपहारगृहातच जाऊन खावे, असा विचार केला. दिवाळीच्या निमित्ताने बरीचशी उपहारगृहे ही बंद होती. मुख्य चौकातल्या एका दर्शनी जागेत 'महाराष्ट्रीयन कॅफे'च्या नावाने चालू झालेले नवे उपाहारगृह दिसले. तशी चांगलीच गर्दी होती. त्यामुळे आमचीही पावले पोटाची पूजा करण्यासाठी सदर उपहारगृहाकडे वळाली. तिथे गेल्यावर समजले की, चपात्या संपल्या आहेत व सध्या फक्त थाळीच उपलब्ध आहे. दहा मिनिटे थांबावे लागेल, असा मालकांचा आदेश आला. रात्रीचे दहा वाजले होते. आता यावेळेस कुठे नवे उपहारगृह शोधा? असा विचार करून तिथेच बसायचा विचार केला. आमच्यासारखे अजून अनेक जण थाळी येण्याची वाट बघत बसले होते. आजकालच्या युगात एखाद्या ठिकाणी वाट बघणे म्हणजे मोबाईल मध्ये डोकं खुपसून बसणे असा होतो. त्याचा प्रत्यय आम्हास याही वेळेसही आला. जेवणाची वाट बघणारे सर्व मनुष्यप्राणी खाली मान घालून मोबाईलच्या स्क्रीनवर बोटं वर खाली करत बसले होते. कुणीच कुणाशी बोलत नव्हतं. 



आम्हीपण एका टेबलावर ठाण मांडून बसलो. दहा मिनिटे असच स्वस्थ बसण्यापेक्षा बॅगमध्ये एखादं पुस्तक आहे का? हे पाहिलं तर शेवटचे एकच पुस्तक सापडलं. आमच्या उर्दू भाषेमध्ये ते पुस्तक होतं! पुस्तक उघडलं आणि जामा मशीदीतल्या चाचा कबाबी दिल्लीवाले यांच्यावर मुल्ला वाहिदी यांनी लिहिलेला लेख वाचायला सुरुवात केली. उपहारगृहात काम करणारा पोऱ्या (मराठीत वेटर!) आमच्याकडे टक लावून पाहायला लागला. पहिली गोष्ट म्हणजे कुणी हॉटेलमध्ये पुस्तक घेऊन वाचत का? हा प्रश्न त्याला पडला असावा व दुसरी गोष्ट, सदर पुस्तक हे कुठल्याशा "मुसलमानी" भाषेत लिहिले आहे, हेही त्याने पाहिलं. हा बाबा नक्की कोण आहे? याविषयी त्याला नक्कीच कुतूहल निर्माण झाले असावे. अशा प्रकारची पुस्तकं फक्त विशिष्ट धर्माचे लोकच वाचतात, असा अनेकांचा समज असतो. कदाचित त्यालाही तसेच वाटत असावे. जवळपास दहा मिनिटे झाली असावीत. त्यानंतर तो वाट पाहणाऱ्या प्रत्येकाला विचारत होता, 'तुम्हाला थाळी पाहिजे का?' परंतु, माझ्या जवळ आल्यावर त्याने विचारले, 'आपको भी लाऊ क्या थाली?' त्यावर मी प्रतिप्रश्न केला, 'मराठी येत नाही का तुला?' माझ्या अनपेक्षित प्रश्नावर तो काहीसा वरमला. मग मीच सांगितले, 'ये घेऊन'.
यातून एक गोष्ट समजली की, सर्वसामान्य जीवनात वावरताना आपण मनात कितीतरी समजुती घेऊन फिरत असतो व आपल्या निरीक्षणाने वेगवेगळ्या प्रतिमा मनात तयार करत असतो. प्रत्येक वेळेस या प्रतिमा तंतोतंत तशाच असतील असेही नाही.

Friday, November 15, 2019

निसर्ग बदलांकडे...

मागच्या काही वर्षांपासून वातावरणात व हवामानात होत चाललेले बदल आता प्रकर्षाने लक्षात येऊ लागलेत. यंदाचा ऑक्टोबर महिना पूर्ण पावसाचा गेला. शिवाय कधी नव्हे ते पूर्ण दिवाळीतही पाऊस पडला! निसर्गाकडून मानवजातीला देण्यात येणारी ही धोक्याची घंटा समजायला हवी. मानवनिर्मित कारणांमुळे निसर्गाचा समतोल ढासळत चालला आहे. त्यामुळे सर्वच ऋतूंवर त्याचा प्रतिकूल परिणाम होतोय. हिवाळ्यात थंडीची तीव्रता वाढत चालली व उन्हाळ्यातही उन्हाची दाहकता नवे नवे उच्चांक गाठत आहे. नुकतेच क्लायमेट सेंटरने प्रकाशित केलेल्या अहवालात मुंबईसह अन्य मोठी शहरे येत्या तीस वर्षांत पाण्याखाली जाण्याची शक्यता वर्तवली आहे. अशा विविध धोक्याच्या घंटांनी आता तरी नागरिक व सरकारांनी जागे व्हायला हवे. पर्यावरण शिक्षणाला फारसे गांभीर्याने न घेतल्याने मानव जातीकडून निसर्गाची अतोनात हानी होत आहे. त्यामुळेच निसर्गाचे पलटवार मनुष्य जातीवर होत आहेत. या सर्व घटनांची कारणमीमांसा होणे व त्यावर ठोस उपाययोजना करणे गरजेचे वाटते. केवळ मूठभर पर्यावरणवाद्यांमुळे पर्यावरणात बदल घडेल, अशी अपेक्षा करणे मूर्खपणाचे ठरेल. निसर्ग संवर्धनासाठी सरकारबरोबरच नागरिकांचाही सकारात्मक व सबळ पाठिंबा असायला हवा. तरच भविष्यात येऊ घालणाऱ्या नैसर्गिक संकटापासून आपण आपल्याला व येणाऱ्या पिढीला वाचवू शकू.
 
 

Thursday, November 14, 2019

पुस्तके रस्त्यावरची

कंपनीच्या कामाच्या निमित्ताने अनेकदा सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूरला जाणे झाले. हे शहर बऱ्यापैकी ओळखीचे झाले आहे. जून महिन्यातली गोष्ट आहे. एका पाच दिवसांच्या कामासाठी इस्लामपूरला गेलो होतो. राहण्याची सोय कामाच्या ठिकाणी होती. संध्याकाळी पाच नंतरचा वेळ रिकामाच असायचा. त्या वेळात थोडं शहरात फेरफटका मारून यावं, असा विचार होता. शिवाय फिरण्यासाठी एक बाईकही मिळवली होती. त्यादिवशी आमच्या हीचा मेसेज आला की, इस्लामपुरात "स्वराज्य रक्षक संभाजी" मालिकेतील कलाकारांची रांगोळी काढलेले एक प्रदर्शन भरलंय. तिने पत्ताही पाठवला होता. शहरातल्या आंबिका मंदिराशेजारी हे प्रदर्शन भरलं होतं. सहानंतर फ्रेश होऊन प्रदर्शन बघायला निघालो. अर्थात गुगल मॅपवाली बाई होतीच आम्हाला मार्गदर्शन करायला. साधारणत: पंधरा-वीस मिनिटात मी या मंदिराजवळ जाऊन पोहोचलो. 
 
 
इस्लामपूरातल्याच एका महाविद्यालयातर्फे रांगोळीचे हे छोटेखानी प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. रांगोळी मात्र छान काढलेली होती. अगदी हुबेहूब! त्यासोबत थोडावेळ फोटोसेशन करून मी मंदिराच्या बाहेर आलो. अजून जेवायला बराच वेळ होता. त्यामुळे काय करावे, याच विचारात असताना मंदिराच्या उजव्या बाजूला चार-पाच स्टॉल्स लावलेले दिसले. त्या रस्त्याने आज शिरलो तर लक्षात आले की, इथे खूप मोठे मार्केट आहे. अगदी पुण्या-मुंबईतल्या गजबजलेल्या रस्त्यासारखी गर्दी येथे झाली होती. जवळपास सर्वच वस्तू रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या दुकानात लावलेल्या दिसल्या. अनेक दुकाने लख्ख प्रकाशात उजळून निघालेली दिसत होती. खरेदीदारांची संख्याही काही कमी नव्हती. एकमेकांना धक्का मारून पुढे जाणारे उत्साहाने भाव करीत खरेदीला हातभार लावत होते. अशा ठिकाणी पुस्तकांचं दुकान असणे, म्हणजे मूर्खपणाचं लक्षण म्हणता येईल! पण त्या गर्दीतही पुस्तकांची दुकाने होती! कुठे... तर रस्त्यावर! मार्केटच्या दोन्ही बाजूंनी दुकानांची गर्दी तर मधल्या जागेत दोन-तीन मुले रस्त्यावर बसून पुस्तके विकत होती. अशा गजबजलेल्या मार्केटमध्ये कुणी खरेदीदार त्यांच्याकडे ढुंकूनही पाहत नव्हता. याउलट त्यांच्या पुस्तकांना व विक्री करणाऱ्या मुलांनाही येणाऱ्या जाणाऱ्यांचे अनेकदा पाय लागत होते. या परिस्थितीतही दहा-बारा वर्षांची ती मुले उत्साहाने विक्रीसाठी बसली होती. आपल्या देशातल्या वाचनसंस्कृतीचे एक अंग मी याची देही याची डोळा पाहिले. पुस्तक म्हटलं की आमचे हात आणि मेंदू दोन्ही उत्तेजित होतात. मी खाली बसून पुस्तके चाळायला सुरुवात केली. बहुतेक सर्वच लहान मुलांची पुस्तके होती. कोल्हापुरच्या कुठल्या प्रकाशनाने प्रकाशित केलेली... बऱ्याचशा पुस्तकात बोधपर, मनोरंजनपर गोष्टी होत्या व किंमतही वीस ते पंचवीस रुपयांच्या दरम्यान होती. मी तिथे जाईपर्यंत कदाचित त्यांचे एकही पुस्तक विकलं गेलं नसावं. गिऱ्हाईक आलय म्हटल्यावर त्यांनीही पुस्तकांची माहिती सांगायला सुरुवात केली. एकेक पुस्तक पाहून मी माझा गठ्ठा तयार करायला लागलो. जवळपास तीस पुस्तके मी निवडली. यावर मुलांचा आनंद द्विगुणित झाला होता. त्यामुळे त्यांनीही प्रत्येक पुस्तकामागे पाच रुपये कमी केले. शिवाय एक पुस्तकही मला फ्री देऊन टाकले!
मी ती सर्व पुस्तक लहान मुलांना वाटण्यासाठी घेतली होती. परंतु त्यात विक्री करणाऱ्या मुलांचे समाधानही मला प्राप्त झाले होते. आज मी त्यातील बरीच पुस्तके लहान मुलांना वाटून टाकलीयेत. थोडीशी उरलीत, ती पण संपतील. परंतु वाचनाची संस्कृती आज रस्त्यावर पडली, हे मात्र या घटनेतून मला मनापासून जाणवले.

© तुषार कुटे

Tuesday, November 12, 2019

मराठी पुस्तके मिळवा ऑनलाईन

तंत्रज्ञानाचा वापर आज जवळपास प्रत्येकच क्षेत्रात होतोय. पुस्तक निर्मिती, विपणन व विक्री क्षेत्रही या पासून दूर राहिलेले नाही. आज अनेक कंपन्यांनी पुस्तक व्यवसायात उडी घेतली आहे. वाचनसंस्कृतीवर आजही लोकांचा मोठा विश्वास आहे. त्यामुळेच तंत्रज्ञानाचा वापर याही क्षेत्रात वाढत चाललाय. आज तुम्ही घरबसल्या आपल्या भाषेतील पुस्तके मागू शकता. विविध वस्तू खरेदी करताना जसे प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय वा हात लावल्याशिवाय त्याचा दर्जा कळत नाही, तसे पुस्तकांचे नाहीये. पुस्तकांचा दर्जा हात लावून समजत नाही. त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने कोणतीही शंका मनात न ठेवता आपण पुस्तके मागू शकतो. खाली काही महत्त्वाच्या वेबसाईट्स दिल्या आहेत, तिथून तुम्ही तुमचं अकाऊंट तयार करून पुस्तके कुरियरने घरपोच मागवू शकता. शिवाय तुमची खरेदी 500 वा हजार रुपयांच्या वर असेल तर त्यासाठी वेगळे कुरिअर चार्जेस द्यावे लागत नाहीत.


१. बुक गंगा (https://www.bookganga.com/)
मराठीतील सर्वात जास्त पुस्तके असणारी ही वेबसाइट आहे. तुम्हाला हवे असणारे जवळपास प्रत्येक पुस्तक तुम्हाला या वेबसाइटवर मिळू शकेल. शिवाय सदर पुस्तकाची पहिली दहा-पंधरा पाने तुम्ही वाचू शकता. जेणेकरून पुस्तकाचा आशय व लेखकाची लेखनशैली तुम्हाला तपासता येईल. अनेक पुस्तके ई-बुक स्वरूपात ह्या ठिकाणी उपलब्ध आहेत. प्रत्येक पुस्तकावर तुमचा अभिप्राय अर्थात रीव्ह्यू टाकण्याची सुविधा बुकगंगा ने उपलब्ध करून दिली आहे. अनेक पुस्तकांवर कमीत कमी पाच ते दहा टक्के सूटही तुम्हाला मिळू शकेल. बुकगंगाचं बुक स्टोअर पुण्याच्या डेक्कन जिमखाना परिसरात आहे. तिथेही तुम्ही पुस्तके खरेदी करू शकता.
२. अक्षरधारा (https://www.akshardhara.com/)
पुण्याच्या बाजीराव रस्त्यावर असणारे अक्षरधारा बुक गॅलरी हे पुस्तकालय होय. या पुस्तकालयातही मोठ्या प्रमाणात पुस्तके उपलब्ध आहेत. ती तुम्ही प्रत्यक्ष जाऊन वा ऑनलाईन खरेदी करू शकता. त्यांच्या वेबसाइटवर शाखानुसार, प्रकाशननुसार, लेखकानुसार पुस्तक शोधण्याची सुविधा दिली आहे. व बहुतांशी पुस्तकांवर थेट कमीत कमी दहा टक्के सुटही उपलब्ध आहे. सभासदत्वाची सुविधाही अक्षयधाराने देऊ केली आहे. या अंतर्गत पुस्तकांवर अधिक सूटही मिळवता येते.
३. अमेझॉन इंडिया (https://www.amazon.in/)
ही भारताची सर्वाधिक पुस्तके विक्री करणारी वेबसाईट आहे. मराठीतील खूप पुस्तके त्यांच्या संकेतस्थळावरून तुम्ही खरेदी करु शकता. अमेझॉन सर्च साठी उपलब्ध असणारे सर्व ऑप्शन्स तुम्हाला पुस्तके शोधण्यासाठी वापरता येतात. अमेझॉन चे स्पेशल सेल चालू असताना अमेझॉन बुक्स ला भेट द्यायला विसरू नका. अनेक मोठी पुस्तके भल्यामोठ्या सूटच्या रूपाने इथे उपलब्ध होऊ शकतात. मी स्वतः मेहता पब्लिकेशनच्या सर्व मोठ्या कादंबऱ्या (स्वामी धरून!) 49 टक्के डिस्काऊंट मध्ये खरेदी केल्या होत्या! एवढा डिस्काउंट मला मेहतांच्या गॅलरीत पण मिळत नाही.
सर्वात अभिमानाची बाब म्हणजे सर्वाधिक विक्री होणाऱ्या पुस्तकात अमेझॉन इंडियावर मराठी ही हिंदी नंतरची दूसरी भारतीय भाषा आहे! अमेझॉनचे स्वतःचे किंडल नावाची ई-बुक रीडर आहे. अनेक मराठी पुस्तके किंडल धारकांना मोफत ही वाचता येतात.
४. मेहता पब्लिशिंग हाऊस (http://www.mehtapublishinghouse.com/)
या ठिकाणी फक्त मेहता पब्लिशिंग हाऊसनेच प्रकाशित केलेली पुस्तके तुम्हाला विकत घेता येतील. शिवाय त्यांची सभासद होण्याची सुविधाही उपलब्ध आहे, ज्यात तुम्हाला 30 टक्क्यांपर्यंत एका पुस्तकावरही सूट मिळू शकते! आनंद यादव, वि. स. खांडेकर, द. मा. मिरासदार, रणजित देसाई, व. पु. काळे, शंकर पाटील, व्यंकटेश माडगूळकर, विश्वास पाटील, सुधा मूर्ती, स्वाती चांदोरकर यांच्यासारख्या दिग्गज मराठी लेखकांची पुस्तके या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. आज-काल इथे नव्याने येणारी पुस्तके ही बहुतांशी अनुवादित असतात.
५. बुक्सनामा (https://www.booksnama.com/)
डायमंड पब्लिकेशनची सर्व पुस्तके या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. याशिवाय विविध विषयांची पुस्तके येथून तुम्ही भरघोस सूट घेऊन खरेदी करू शकता.
वरील साईट व्यतिरिक्त अजूनही काही वेबसाइट्स आहेत, जिथून सहजपणे पुस्तके मागवता येतात. त्यांचाही वापर तुम्ही बिनधास्त करू शकता.
https://www.flipkart.com/
https://www.granthdwar.com
https://www.bookvishwa.com/
https://www.rasik.com/
https://www.shubhambooksonline.com/
http://www.menakabooks.com/
https://www.suyashbookgallery.com/

कधीकधी बुक गॅलरीतून पुस्तक मागण्यापेक्षा प्रत्यक्ष प्रकाशनाकडूनच मागण्यास सोयीचे पडते व कमी किमतीत ते उपलब्ध होऊ शकते. बऱ्याच मोठ्या प्रकाशकांनी ऑनलाईन पुस्तके विक्रीची सोय वाचकांना करून दिली आहे.
१. मेहता पब्लिशिंग हाऊस (http://www.mehtapublishinghouse.com/)
२. मनोविकास (https://www.manovikasprakashan.com/)
३. राजहंस (https://www.rajhansprakashan.com/)
४. सकाळ (http://sakalpublications.com/)
५. कॉन्टिनेन्टल (http://continentalprakashan.com/)

Sunday, November 10, 2019

ट्रेनमध्ये घोरणारी प्रवृत्ती

घोरणे ही सर्वसामान्य माणसाची एक प्रवृत्ती आहे. मीही कधीकाळी घोरत नव्हतो. परंतु, आमच्या हीच्या म्हणण्यानुसार मीही बऱ्याचदा झोपेत घोरत असतो. पण झोप नीट आली नाही की, झोपेत घोरणं होत नाही! 


कामाच्या निमित्ताने ट्रेनमध्ये बराचसा प्रवास होतो आणि आजवर अनेकदा ट्रेनचा रात्रीचा प्रवास आम्हाला घडलाय. आता रात्र आली की, झोप येते आणि झोप आली की, घोरणंही येतच! ट्रेनच्या ३A च्या डब्यात जवळपास 64 प्रवासी असतात. त्यामुळे रात्रीच्या वेळेस आपण आपल्या बर्थवर झोपलेलो असताना कुठून ना कुठून तरी घोरण्याचा आवाज येत राहतात. चित्रविचित्र घोरण्याने कधीकधी मनोरंजन होतं तर कधीकधी वैतागून किळस वाटायला लागतो. या जगात मनोरंजकरित्या घोरणाऱ्यांची संख्या तशी कमीच आहे! ट्रेनच्या इतक्या वेळेसच्या प्रवासात आजवर फक्त एकदाच ट्रेनमधल्या प्रवाश्याचे घोरणे लक्षात ठेवावे, असे वाटले होते.
नांदेडची आमची नेहमीची पनवेल-नांदेड एक्सप्रेस ही ट्रेन होती आणि नेहमीप्रमाणे ट्रेन आरक्षण करणाऱ्या सॉफ्टवेअरने अप्पर बर्थ आमच्या माथी मारला होता! आमच्या उंचीमुळे तीन बर्थ असलेल्या जागेत आम्हाला कधीच बसता आले नाही. त्यामुळे हा बर्थ नेहमी कंटाळवाणा वाटतो. आमच्या समोरच्या अप्पर बर्थवर एक ९० ते १०० किलो वजनाचा मनुष्यप्राणी येऊन ठेपला. खरेतर तो ठेपला नव्हता तर त्याला ठेपवला होता! म्हणजेच आप्तस्वकीयांनासोबत राहता यावे म्हणून कोणीतरी आपली सीट बदलून घेतली होती. यामुळे सदर इसम समोरच्या अप्पर बर्थवर आला. रात्री दहा वाजेपर्यंत सर्व काही ठीक चालले होते. परंतु त्यानंतर सदर इसमास झोप लागली आणि त्याचा जो मूळ आवाज आहे, त्याच्या दुप्पट आवाजात तो घोरायला लागला. घोरण्याचा इतका भयंकर आवाज पहिल्यांदाच आमच्या कानावर पडत होता. एखाद्याच्या घोरण्याने दुसऱ्याच्या कानाचे पडदे फाटू शकतात का? या प्रयोगासाठी कदाचित हाच आवाज योग्य असावा, असे वाटून गेले. सदर इसम मुद्दामहून तर असा आवाज काढत नाहीये ना? हाही विचार आला. परंतु त्याच्यामध्ये इतकं सातत्य असावा का? या प्रश्नाचे उत्तर आमच्याही मनाने 'नाही' असेच दिले. आजूबाजूच्या कंपार्टमेंट मधून येणारे इतर घोरण्याचे आवाज या आवाजाची बिलकुलच स्पर्धा करू शकत नव्हते. त्यांनी तर केव्हाच तलवार म्यान केल्याचे जाणवत होते. एकटा शिपाई किती वेळ लढणार? केव्हातरी थांबेल, असा विचार मनात आला. पण एकट्याची लढाई काही थांबेचना. त्या इसमाच्या नाकातून मध्येच चित्रविचित्र आवाज यायचे. नाकात काहीतरी अडकलेय आणि ते बाहेर येण्यासाठी तडफडते आहे, असं भासत होतं. पण एवढ्या एक तासात ते बाहेर यायला होतं. तरीही आलं नाही. जवळपास दोन तास तो कर्कश्य आवाज आमच्या श्रवणेंद्रियातून थेट मेंदूत जाऊन घुमत होता. त्यामुळे आमचा मेंदू विश्रांतीला सुरुवात करण्याची वेळ सतत पुढे पुढे ढकलत असल्याचे जाणवले. म्हणून निद्राधीन होण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहण्यावाचून आमच्यापुढे काहीच पर्याय नव्हता. इसमाच्या घोरण्याची तीव्रता एक वेळी एवढी व्हायची की, जणू आत्ताच त्याचा कंठ फुटून नाकातून बाहेर येईल. त्यादिवशी आम्हाला जाणवले की, बॅग मधील गरजेच्या वस्तू ठेवतो त्या पर्समध्ये कापसाचे बोळे ठेवायला हवेत. वेळ कुणावर सांगून येत नाही. कधी कशाचा वापर करावा लागू शकेल, हेही सांगता येणार नाही. अशा या बिकट परिस्थितीत रात्री कधीतरी आम्हास झोप लागली. परंतु ती अल्पकालीनच ठरली. पहाटेपासून परत तोच दंगा चालू झाला आणि सकाळी 7 वाजेपर्यंत तो चालू होता! तदनंतर तो इसम आमच्या झोपेची वाट लावून साडेसात वाजता परभणी स्टेशनला उतरून निघून गेला. जाता जाता हेही म्हणाला की, 'ट्रेन मध्ये काय झोप होत नाही ओ नीट... !'. आम्ही स्मितहास्य करून त्यांना प्रतिसाद दिला. त्यानंतर एका महाभयंकर संकटातून सुटल्याची जाणीव आम्हाला झाली. अर्ध्या-पाऊण तासाच्या प्रवासानंतर झोपेची जोरदार गुंगी यायला लागली होती. पण थोड्याच वेळात ट्रेन हुजूर साहिब नांदेड स्टेशनला पोहोचली.

© तुषार कुटे

Saturday, November 9, 2019

रीवाल्युसीऑन डेल युनिफॉर्मे

स्वातंत्र्यानंतर शिक्षणाचे खरे पर्व आपल्या देशात चालू झालं. मुलांना मारून मुटकून शाळेत पाठवायला लागले. शाळेत शिक्षक आणि घरी पालक अशी बऱ्याचदा दुहेरी पिटाई विद्यार्थ्यांची होत असे. हळूहळू मुलांच्या कपड्यांकडे लक्ष जायला लागलं. त्यातून गणवेश हा प्रकार उदयास आला. त्याला आपण आज मराठीत युनिफॉर्म म्हणतो. सगळी मुले सारख्याच कपड्यात यायला लागली. अनेकांना शाळेसाठी कपडे परवडत नसल्याने एकच गणवेश चार-पाच वर्षे घातला जायी. किंवा नवीन कपडे घेताना युनिफॉर्मच्या रूपाने घेतला जायी. कधीकधी हा युनिफॉर्म वाढत्या अंगाचा असायचा. पहिल्या वर्षी घालताना तो एकदमच ढगळ वाटायचा. जसजसे वर्षे पुढे सरकायची, तसा तसा तो नीट यायला लागायचा आणि पूर्ण व्यवस्थित येईपर्यंत तो फाटलेला असायचा! आजही दुर्गम भागातल्या शाळांमध्ये अशीच परिस्थिती आहे. अनेक मुले शाळेत व्यतिरिक्त इतर ठिकाणीही युनिफॉर्म मध्येच असतात. शहरे मात्र आता युनिफॉर्मच्या पुढच्या पायरीवर जाऊन पोहोचलीत.

काही वर्षांपूर्वी युनिफॉर्ममध्ये टायचा समावेश झाला. सुटाबुटाच्या कपड्यांवर घालण्यात येणारे टाय, आता लहान मुलांच्या गणवेशात येऊ लागले होते. सुरुवातीला जेव्हा मुले काय घालायची, तेव्हा कोणीतरी सतत आपला गळा आवळतोय की काय? असं वाटत राहायचं. अनेकदा पालक मुलांच्या टायला त्यांचं मंगळसूत्र म्हणायचे! या मंगळसूत्रानंतर बुटांचा अर्थात शूजचा समावेश युनिफॉर्ममध्ये झाला. सर्व मुलांचे बूट एकाच काळ्या रंगात दिसायला लागले. जी मुले बूट घालून येत नसत, त्यांना एकतर दंड पडायचा किंवा मार मिळायचा. त्यामुळे बूटसंस्कृतीने पुन्हा पालकांच्या खिशाला गळती लावायला सुरुवात केली. यानंतर थोड्याच कालावधीत सॉक्सचा युनिफॉर्ममध्ये समावेश झाला. त्यामुळे व्हाईट सॉक्स कंपल्सरी झाले. अनेकांकडे सॉक्सची एकच जोडी असल्याने त्याला भोक पडेपर्यंत वापरले जात असत. अजूनही ही परिस्थिती सुधारलेली नाही.
कालांतराने युनिफॉर्ममध्ये आणखी एका नव्या भिडूची भर पडली. पीटीच्या तासाला अर्थात शारीरिक शिक्षणासाठी नवीन वेगळा टी-शर्टचा युनिफॉर्म आला. खेळाच्या तासाला मुले मग एकाच रंगाचा व एकाच प्रकारचा टी-शर्ट घालून यायला लागले. या सर्वांतून किती खेळाडू तयार झाले? या प्रश्नाचे उत्तर सापडले तसं फार अवघड आहे. पण, या टी-शर्ट ने त्याच्यासोबत आणखी एका साथीदाराला सोबत आणले होते, ते म्हणजे स्पोर्ट्स शूज! आता खेळताना रेग्युलर शुज घालणार का? मग खेळासाठी वेगळे शूज युनिफॉर्म बरोबर शाळेच्या प्रांगणात दाखल झाले. पुन्हा तोच प्रश्न, किती खेळाडू तयार झाले?
थंडीच्या दिवसांमध्ये मुलांना फक्त युनिफॉर्ममध्ये यायला अवघड जायचं. म्हणून मुले स्वेटर वगैरे घालून यायचे. परंतु त्यामुळे शाळेचे युनिफॉर्म दिसेनासे व्हायचे. यावरही उपाय शोधला गेला. काय तर, स्वेटर्सचाही अंतर्भाव युनिफॉर्ममध्ये झाला! मग मुलं एकाच प्रकारचा व एकाच रंगाचा स्वेटर घालून यायला लागले. आत्तापर्यंत युनिफॉर्म वर बराच खर्च होत होता. पण पालकांची इनकमही वाढत होती, ही गोष्ट ध्यानात घ्यायला हवी.
पावसाळा आला आणि परिस्थिती पालटली. मुले स्वेटर्स न घालता रेनकोट घालून यायला लागली. पुन्हा शाळेची पंचाईत झाली. मग युनिफॉर्मसाठी रेनकोट असा शोध घेतला गेला व त्याचाही समावेश शाळेच्या नव्या गणवेशात करण्यात आला. आतापर्यंत गणवेषाचा आकार जवळपास संपत आला होता. पुढे काय... पुढे काय... करता करता शाळेच्या (आतापर्यंत स्कूल झालेल्या) एक गोष्ट ध्यानात आली की, मुलं शाळेत येतात तेव्हा प्रत्येकाचे दप्तर (माफ करा... स्कूल बॅग) ही वेगवेगळ्या रंगाची व आकाराची असते. तिथे पण आमच्या झिरमिळ्या लावलेल्या कापडी पिशवी पासून मॉडर्न स्कूल बॅग पर्यंत उत्क्रांती झालीच होती! आता युनिफॉर्ममध्ये तिचा समावेश होणार होता. पण पालकांना काय कारण सांगायचे? मुलं एकमेकांची दप्तरे बघतात व तुलना करतात, त्यांना वाईट वाटते, त्यांच्यात भांडणं होतात... ही कारणं आता पटण्यासारखी होती आणि अखेरीस दप्तराचा समावेशही युनिफॉर्ममध्ये झाला. याच कारणास्तव मुलांची पाण्याची बाटली अर्थात वॉटर बॅग सारख्याच रंगात आली१
अशी ही सर्व गणवेशाची उत्क्रांती प्रक्रिया आहे. कदाचित यापुढे नव्या क्लृप्त्या शोधल्या जातील. जसे जे पालक मुलांना सोडायला शाळेत येतात त्यांचे पण कपडे वेगळे असतात. कदाचित त्यामुळे पण मुलं तुलना करतील व भांडतील, तेव्हा काय करायचं? कधीतरी विज्ञानाच्या प्रयोगाला मुलांच्या गणवेशावर काहीच सांडलं तर काय करायचं? याही प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतील.
सर्वात महत्त्वाचं या लेखाचे शीर्षक असं का दिले? याचा विचार केला असेल, तर ध्यानात असू द्या गणवेशाची उत्क्रांती हे मी स्पॅनिशमध्ये लिहिलय, फक्त लिपी देवनागरी आहे!!!

पहिला भाग इथे पहा

© तुषार कुटे

Thursday, November 7, 2019

बोलतो 'ना' मराठी!

भारतातल्या सर्व राज्यांमध्ये विविध प्रकारच्या भाषा बोलल्या जातात व प्रत्येक राज्याला स्वतःची एक किंवा अनेक राज्यभाषा आहेत. आपल्या राज्याची ही राज्यभाषा व इथली बोलली जाणारी प्रमुख भाषा आहे, मराठी. तिला आपण लाडाने 'मायबोली' म्हणतो! महाराष्ट्र हे इतर राज्यांपेक्षा व प्रामुख्याने दक्षिण भारतातील पाच प्रमुख राज्यांपेक्षा जरा वेगळे राज्य आहे. म्हणजे सांगायचं असं की, इथला मराठी भाषिक सर्वसामान्यपणे मराठी बोलण्यास प्राधान्य देत नाही. कदाचित त्याला भारतातल्या अन्य काही भाषा 'इंटरनॅशनल' वाटत असाव्यात! या कारणास्तव आम्ही सदर विषयांवर थोडे संशोधन केले व त्यानुसार काही निष्कर्ष काढले आहेत. ते तुमच्या समोर सादर करतो. 

मराठी भाषिक सहजपणे इतर भाषिकांशी मराठीत बोलत नाहीत याची अनेक कारणे आहेत-
पहिले कारण: जाज्वल्य अभिमान
मराठी लोकांना आपल्या भाषेचा प्रचंड अभिमान आहे. त्यामुळे ती भाषा फक्त आपणच बोलावी, असे त्यांना वाटत असते. आपण जर परभाषिकाशी मराठीत बोललो तर त्यालाही आपली भाषा येऊ लागेल व लवकरच तो तिच्यावर प्रभुत्व प्राप्त करेल. असं कोणीही येऊन आपली भाषा बोलावी, हे मराठी भाषिक कसं खपवून घेऊ शकेल? आमच्या भाषेवर फक्त आमचाच अधिकार आहे, यावर मराठ्यांची नितांत श्रद्धा आहे. त्यामुळे ते सहसा मराठी लोकांशी मराठीत बोलण्याचे टाळतात. मुंबईत तर त्याचा कधी कधी कहरच होतो. तिथे मराठी लोकही मराठीत बोलत नाहीत. इतका जाज्वल्य अभिमान फक्त आणि फक्त मराठी लोकच दाखवू शकतात!
दुसरे कारण: भाषाप्रभुत्व
इतिहासावर व वर्तमानावरही नजर टाकली तर देशाला सर्वाधिक बुद्धिमान व तेजस्वी माणसे महाराष्ट्राने दिली आहेत, असे दिसेल. त्याचे कारणही मराठी लोकांना माहित आहे. आम्ही लोक बहुभाषिक आहोत. आमच्या राज्यात कमीत-कमी ऐंशी टक्के लोकांना किमान तीन भाषा तरी सहज देतात ( अर्थात समजतात). भाषा तज्ञांच्या म्हणण्यानुसार ज्याला अधिक भाषा येतात त्याचा मेंदू तितका तल्लख असतो. तीन-तीन भाषांच्या ज्ञानप्राप्तीमुळे मराठी माणसाचा मेंदू तल्लख झालाय. त्यामुळे तो आपली भाषा समोरच्याला शिकू देत नाही. पण, समोरच्याची भाषा बोलून तिच्यावरही प्रभुत्व मिळवण्याचा प्रयत्न करतो. अमराठी लोकांचं बोलणं त्यांच्याच भाषेत ऐकतो व त्याच भाषेत उत्तर देतो. त्यामुळे मराठी लोकांना नव्या भाषेवर प्रभुत्व मिळवणं सोपं जातं. मग समोरच्याला वाटतं, याला तर आपली भाषा येतीये, मग कशाला याच्याशी मराठीत बोला? यामुळे दोन गोष्टी साध्य होतात अमराठी लोकांना आपली भाषा येत नाही व ते वा दोन भाषांतच अडकून पडतात आणि मराठी लोकांची बहुभाषिकत्वामुळे मात्र बौद्धिक पातळी वाढत राहते.
तिसरे कारण: दुसऱ्याच्या भाषेची वाट लावणे
एखादा अमराठी भाषिक तोडकी-मोडकी मराठी बोलत असेल तर मराठ्यांना हा आपल्या भाषेचा हा अपमान वाटतो. म्हणून ते दुसऱ्या भाषेत मुद्दाम चुकीचे शब्द भरवतात. जसे ते हिंदीत बोलताना मुद्दाम तेरेकू, मेरेको, इसकू, उसकू टाइप टपोरी शब्दांचा वापर करतात व त्या भाषेचे सौंदर्य बिघडवतात. यामुळे त्यांना सिद्ध करता येते की, मराठी भाषा ही किती सुंदर व शुद्ध आहे.
चौथे कारण: आपले शब्द घुसडवणे
वरच्याच कारणाला जोडून हेही एक कारण आपण सांगू शकतो. समोरच्याची भाषा अशुद्ध करण्यासाठी मराठी भाषिक आपल्या भाषेतले शब्द त्यात घुसडवतात. उदाहरणार्थ कांदा, बटाटा, नक्की वगैरे शब्द हिंदी नसून मराठी आहेत, हे महाराष्ट्रातल्या अनेक परप्रांतीयांना माहीतच नाहीये! अशाप्रकारे समोरच्याच्या भाषेत भेसळ करून तिचे सौंदर्य बिघडवले जाते व मराठी भाषा कशी श्रेष्ठ आहे, हे मराठी लोक अप्रत्यक्षपणे दाखवून देतात.
अशाप्रकारे मराठी लोकांना माहित आहे की, आम्हाला मराठी येतंय म्हणून आम्हाला मराठी राज्यात किंमत आहे जर कोणीही ऐरागैरा येऊन मराठीत बोलू लागला तर आमची किंमत काय राहणार? या प्रश्नाच्या उत्तरापायी मराठी लोकांची ही सारी खटपट चालू आहे.
बरोबर ना? 

© तुषार कुटे 

Monday, November 4, 2019

टाइप ऑफ स्कूल्स

फार वर्षांपूर्वी म्हणजे जेव्हा आम्ही शाळा शिकत होतो, त्या काळात फक्त एकच प्रकारची शाळा असायची. स्वतःच्या मातृभाषेतून शिकण्याचे स्वातंत्र्य आणि मजा होती. पण झालं असं की, आज अनेकांना असं वाटते की आम्ही शासनाच्या एका लोकल आणि फालतू शाळेत शिकलो म्हणून मागे राहिलो आहे. नाहीतर एकेदिवशी नोबेल पारितोषिकच जिंकून आलो असतो अथवा मायक्रोसॉफ्ट आणि गुगल सारखी कंपनी माझ्या नावावर असली असती. मी आज ऑडी, मर्सिडीज, रोल्स-रॉइस सारख्या गाड्यांमधून फिरत असलो असतो. पण मी आज कुठे आहे? इथे भारतात खितपत पडलोय. 
 

आजच्या पालकांची हीच समस्या ओळखून जुन्या आणि अनेक नव्या शिक्षण सम्राटांनी (ते शिक्षण महर्षी जुनं झालं!) नव्यानव्या शाळांची निर्मिती केली व त्यांनी नवा मॉडर्न इंडियन घडवण्याची शपथ घेतली आहे. काहींनी एवढ्या हायफाय शाळा काढल्या आहेत की, शिक्षण क्षेत्रातील 'बलिदानाबद्दल' त्यांना कोणता पुरस्कार द्यावा? हा प्रश्न सरकारला भविष्यात पडू शकतो.
तर एकंदरीत सध्याची परिस्थिती पाहता आपल्या महाराष्ट्रातल्या शाळांचे प्रामुख्याने पाच प्रकार पडतात. मागे एकदा प्रायव्हेट शाळांनी फुकट 'पब्लिक स्कूल' लावल्याने संतापलेल्या शासनाने त्यांचा पब्लिकचा लेबल काढून घेतला! अशा शाळा आता पुढच्या कुठल्यातरी एका कॅटेगरीत मोडतात.
पहिला प्रकार- लोकल स्कूल
या शाळा आहेत सर्वात कमी दर्जाच्या! जिथे मुलांना त्यांच्या मातृभाषेतून हसत-खेळत व आनंदी वातावरणात शिकवले जाते. याच कारणामुळे या शाळेत आजकाल स्टॅंडर्ड विद्यार्थी तयार होत नाहीत. त्यामुळे या शाळांना तसा भाव कमीच आहे. शिवाय ते पालकांकडून पैसे घेत नाहीत. मग अशा शाळांचा दर्जा काय असणार आहे? या शाळांमध्ये स्पर्धा नावाचा प्रकार फारसा अस्तित्वात नसतो. त्यामुळे इथे प्रवेश घेऊन पालकांना आपली मुले रेसमध्ये पळवता येत नाहीत.
दुसरा प्रकार- नॅशनल स्कूल
ही आहे राष्ट्रीय दर्जाची शाळा! जागतिक भाषा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंग्रजीची सुरुवात होते इथून. इथे प्रवेश घेणाऱ्या मुलांची स्पर्धा थेट देशातल्या प्रत्येक मुलासोबत होत असते मग तो कुठल्याही राज्याचा असो! त्यामुळे त्याला नॅशनल कॉम्पेटेटरचा दर्जा मिळाल्याशिवाय राहत नाही! 
तिसरा प्रकार- इंटरनॅशनल स्कूल
ही आहे आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा. कोणत्या 'इंटरनेशन' ने यांना तो दर्जा दिला असो वा नसो ते स्वतःला आम्ही इंटरनॅशनल आहोत, हे सांगण्याचा अतोनात प्रयत्न करतात. इथे शिकणाऱ्या मुलांची स्पर्धा जगातल्या सर्व देशातील सर्व मुलांसोबत असते. त्यामुळे ऍपल व अमेझॉन चा मालक होण्यासाठी किंवा नोबेल पारितोषिक मिळवण्यासाठी इथे सर्वात जास्त स्कोप आहे.
चौथा प्रकार- ग्लोबल स्कूल
इथे शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांची स्पर्धा भुतलावर अस्तित्वात असणाऱ्या प्रत्येक सजीव प्राण्यासोबत होत असते. त्यामुळे तो खऱ्या अर्थाने ग्लोबल सिटीझन म्हणून ओळखला जाऊ शकतो. किंबहुना चित्त्यापेक्षा वेगवान पळण्याची व पाण्यात डॉल्फिनपेक्षा मोठी उडी मारण्याची क्षमता कदाचित प्राप्त करू शकतो! 
पाचवा प्रकार- युनिव्हर्सल स्कूल
युनिव्हर्स म्हणजे विश्व. या विश्वात असंख्य आकाशगंगा आहेत, दीर्घिका आहेत व त्यात अनेक सूर्यमालाही असतील. कदाचित अनेक ठिकाणी सजीवसृष्टी असेल. त्यामुळे युनिव्हर्सल स्कूल मध्ये शिकणाऱ्या मुलांची स्पर्धा या विश्‍वात अस्तित्वात असणाऱ्या सजीव सृष्टीतील प्रत्येक सजीव प्राण्याची होत असते! एवढी मोठी स्पर्धा केल्यावर तो किती बुद्धिमान प्राणी होऊ शकतो? याची आपण कल्पनाही करू शकत नाही. परंतु त्यासाठी दरवर्षी लाखात पैसे मोजावे लागतात. एवढ्या वेगवेगळ्या प्रकारच्या सजिवांशी स्पर्धा करायला शिकायचं, तर लाखभर रुपये त्यापुढे काहीच नाहीत.
एकंदरीत काय, पालकांना निर्णय घेणे सोपे जावे म्हणून हा आमचा सर्व प्रपंच. तसे पाहिले तर मज पामरासी जास्त काही ज्ञान नाही. अर्थात मीही लोकल स्कूलचा विद्यार्थी आहे. तेव्हा घ्या थोडं समजून.

© तुषार कुटे

Sunday, November 3, 2019

नांदेडचा येवले चहा

नांदेडच्या विद्यापीठात एकेदिवशी कामानिमित्त जाणे झाले होते. त्यावेळी विद्यापीठातल्या एका प्राध्यापकांनी सांगितलेला हा किस्सा.
येवले अमृततुल्य बद्दल आता सबंध महाराष्ट्राला माहिती झालीये. नांदेडमध्येही येवले चहाची शाखा चालू झाली आहे. याठिकाणी अन्य ठिकाणांसारखी रांगेत उभे राहून चहा पिण्यासाठी गर्दी झाल्याचे दिसते अर्थात त्यांची लोकप्रियता वाढतच आहे.


गणपतीच्या काळामध्ये प्राध्यापकांच्या गल्लीतही एका सार्वजनिक गणेशाची स्थापना झाली होती. परंतु, प्रत्येकच गल्लीत गणपती असल्याने संध्याकाळच्या आरतीला फारशी गर्दी होत नसे. एक दिवस गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षाने सकाळी पाटी लावली- "आज संध्याकाळी आरतीनंतर सगळ्यांना येवले यांच्या कडून चहा मिळणार आहे!" म्हणता म्हणता दिवसभरात ही बातमी आजूबाजूच्या सगळ्या गल्ल्यांमध्ये पोहोचली आणि त्यादिवशी गणपतीच्या आरतीला भली मोठी गर्दी झाली! आरती सुरू झाल्यानंतर प्रत्येक जण ती कधी संपेल, याची वाट पाहत होता. एवढी गर्दी पाहून मंडळवाले खुश झाले. अखेर आरती संपली व सर्वजण बिल्डिंगच्या पार्किंग मध्ये येवले चहा पिण्यासाठी जाऊ लागले. पण, पार्किंगमध्ये दृश्य तर वेगळेच होतं. तिथे एक मनुष्य टेबलावर चहाचा थर्मास घेऊन व एका हातात चहाचे कागदी कप घेऊन सगळ्यांची वाट बघत उभा होता. प्राध्यापकांच्या लक्षात आले की सदर मनुष्य त्यांच्या कॅन्टीन मध्येच कामाला आहे. याने पण येवले चहा जॉईन केलं की काय? असाही विचार त्यांच्या मनात आला. पण, नंतर चौकशी केल्यावर समजलं की, कॅन्टीन वाल्याचेही आडनाव येवले आहे! मग काय सर्वजण 'येवले' यांचा चहा पिऊन तृप्त झाले.

© तुषार कुटे

Wednesday, October 30, 2019

अवघे जग बदलून टाकणारे महान द्रष्टे

"टॉप व्हिजनरीज हू चेंज्ड द वर्ल्ड" या जॉर्ज इलियन लिखित पुस्तकाचा "अवघे जग बदलून टाकणारे महान द्रष्टे" हा अनुवाद होय. तंत्रज्ञानाच्या विश्वाचे राजे असणारे स्टीव जॉब्स, जॅक मा, बिल गेट्स, एलोन मस्क व मार्क झुकेरबर्ग यांचे हे छोटेखानी प्रेरणादायी चरित्र आहे. कोणतीही संकल्पना मनात येणे, ती प्रत्यक्षात उतरवणे व व्यावसायिकरित्या यशस्वी करून दाखवणे, याची गोष्ट या पुस्तकातून वाचायला मिळते. वरील सर्व तंत्रज्ञ व व्यावसायिकांनी आपली संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी काय काय मेहनत घेतली? अपयशाच्या कोणत्या पायऱ्या पार केल्या? व आज ते इतक्या उंचीवर पोहोचूनही सामाजिक भावनेने कशा प्रकारे कार्य करत आहेत? या सर्व प्रश्नांची उत्तरे या पुस्तकातून मिळतात. शिवाय अन्य देशांची विचारसंस्कृती व भारतीय विचारपद्धती यातील फरकही प्रकर्षाने जाणवतो. म्हणजे सांगायचं असं की, यातील एक जण जरी भारतीय कुटुंबात व भारतात जन्माला आला असता तर कदाचित तो या स्थानी असला नसता. आपल्या देशात अनेक धडपडे तरुण आहेत. परंतु, त्यांना प्रोत्साहन देणारे वातावरण इथे नाहीये. ते कसे असावे? या प्रश्नाचे उत्तर या पुस्तकातून मिळू शकेल. 


स्टीव जॉब्स वगळता इतर चौघे आजही अविरतपणे कार्यरत आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यात विविध प्रकारची सकारात्मक व नकारात्मक वळणे आली. त्यांचा योग्य रीतीने सामना केला गेला. त्यांची एक विचारसरणी तयार होत गेली. हेच त्यांच्या यशस्वीतेचे मुख्य कारण आहे. अगदी सारांश सांगायचा तर "थ्री इडियट्स" या हिंदी चित्रपटात फुनसुख वांगडू सांगतात तसं "सक्सेस के पीछे मत भगो, एक्सलन्स का पीछा करो. सक्सेस झक मार के तुम्हारे पिछे आयेगी".

डिंभक

डॉ. जयंत नारळीकर, निरंजन घाटे व बाळ फोंडके यांच्यानंतर मी वाचलेले डॉ. संजय ढोले हे चौथे विज्ञान कथा लेखक आणि त्यांचा "डिंभक" हा विज्ञान कथासंग्रह! आपल्या आवडत्या विषयात वाचन करण्याची मजाच काही और असते. 'मनोरंजनाबरोबरच कुतूहल जागृत करणाऱ्या लक्षवेधक विज्ञानकथा' या सारांशाने मेहता पब्लिशिंग हाऊसने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. विज्ञानाला अनुसरून लिहीलेल्या जवळपास सर्वच कथांची भट्टी छान जमून आलीये.


पुस्तकाच्या मलपृष्ठावर नमूद केल्याप्रमाणे कथांचा सारांश असा...
नॅनो तंत्रज्ञानाद्वारे मृतांना जिवंत करण्याचा प्रयोग...  मृत माणसाच्या मेंदूचे रोपण जिवंत कुत्रीच्या शरीरात करणे...  भविष्यात नेऊ शकणारी खुर्ची आणि एका राजकीय नेत्याने तिचा केलेला गैरवापर...  शिशाच्या अणूचे सोन्याच्या अणूमध्ये रूपांतर करण्यात यशस्वी झाल्याने मालामाल झालेला शास्त्रज्ञ...  परग्रहावरील डिंभक... पिंजकामुळे लाभलेल्या अदृश्य होण्याच्या शक्तीमुळे एका शास्त्रज्ञाने अतिरेक्यांचा केलेला खात्मा...  क्लोननिर्मिती...  गर्भाबरोबरच वाढणाऱ्या ट्युमरला शास्त्रज्ञाने दिलेली मात...  ग्राफीनच्या कणांवरचे संशोधन...  विशिष्ट प्रयोगाद्वारे खुन्यापर्यंत पोहोचणारा शास्त्रज्ञ...  एक विचित्र कीटक. अशा विविध वैज्ञानिक संकल्पनांचा सदुपयोग व दुरुपयोग करणारे शास्त्रज्ञ. त्यातून घडणारे मानवी मनाचं दर्शन. वैज्ञानिक संकल्पना आणि मानवी मन यांच्या कल्पनेतून साकारलेल्या रंजक विज्ञान कथांचा वाचनीय संग्रह...
थोडसं वेगळं सांगायचं तर बऱ्याच कथांमध्ये ध्येयवेडे शास्त्रज्ञ व त्यांची प्रयोगशाळा अशी कथा रचना तयार झाली आहे. त्यामुळे कथेचा मूळ गाभा जरी वेगळा असला तरी त्यात सारखेपणा जाणवत राहतो. लेखकाने विज्ञानाच्या सर्व अंगांचा विचार केल्याचेही दिसते. एकंदरितच विज्ञान प्रेमींनी हे पुस्तक वाचावे असेच आहे.

गोष्ट एका परीक्षेची

इंजीनियरिंग झाल्यानंतर वयाच्या 22 व्या वर्षीच नोकरीला लागलो. नाशिकच्या के. के. वाघ पॉलिटेक्निकमध्ये लेक्चरर म्हणून मला नोकरी मिळाली होती. पहिल्याच वर्षी परफॉर्मन्स चांगला राहिला. लागलीच दुसऱ्या वर्षी मला एक्स्टर्णल एक्झामिनर म्हणून जाण्याची संधीही मिळाली पॉलिटेक्निकच्या समर एक्झाम चालू होणार होत्या मी त्यावेळी 'कॉम्प्युटर आर्किटेक्चर अँड मेंटेनन्स' हा विषय शिकवायचो. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या या विषयाला फक्त ओरल एक्झाम अर्थात तोंडी परीक्षा होती. त्याच्या आधीच्या सेमिस्टरला मात्र मी चांदवडच्या पॉलिटेक्निकमध्ये एक्स्टर्णल एक्झामिनर म्हणून जाऊन आलेलो होतो. परंतु ती फक्त ऑनलाईन एक्झाम होती. त्यामुळे एक्झामिनरचा रोल फक्त सुपरवायझर म्हणूनच होता. आता मुलांना थेट प्रश्न विचारण्याची परीक्षा मला पहिल्यांदाच मिळाली होती आणि कॉलेज होतं... महावीर पॉलीटेक्निक! शिक्षक होतो तरी देहयष्टी शिक्षका सारखी नव्हती. त्यावेळी मी कोणत्याच अँगलने पॉलिटेक्निकचा मास्तर वाटत नव्हतो. या गोष्टीचे कधी फायदे व्हायचे तर कधी तोटे. केवळ 55 किलो वजन आणि पाच फूट 10 इंच उंची असलेल्या माणसाला कोण शिक्षक म्हणेल? सडपातळ बांधा आणि आत गेलेले गाल हीच माझ्या देहयष्टीची ओळख! त्यामुळे त्या काळात बरेच किस्से घडले. एकदा तर एका इंडस्ट्रियल व्हिजिटला मला कोणी शिक्षक आहे, अशी ओळख देईनाच. जेव्हा विद्यार्थ्यांनी समजावून सांगितले तेव्हा त्यांना समजले की, मी शिक्षक आहे असाच एक किस्सा त्या वर्षीच्या परीक्षांमध्ये घडला होता.
पॉलिटेक्निकला नुकतेच 'कॅरिऑन' लागू झाले होते कॅरीऑन चा अर्थ असा की, कधीही नापास झालेला मुलगा पुढच्या वर्गात ढकलला जात असे. शिवाय इयरली पॅटर्न मधून सेमिस्टर पॅटर्न आल्यामुळे तंत्रशिक्षण मंडळाला सर्वच विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात ढकलणे अनिवार्य झाले होते. अर्थात यामुळे वर्षानुवर्षे डिप्लोमा करत असलेली मुले एकाच वर्गात आली होती. यातले कितीतरी मुले माझ्या पेक्षा वयाने मोठी होती आणि शरीरानेही!


यंदा पहिल्यांदाच ओरल एक्झाम आल्यामुळे मीही भलताच खूष होतो आणि विद्यार्थ्यांची चांगलीच ओरल घेऊ असाही, विचार मनात पक्का केला होता. त्याकाळात परीक्षेच्यावेळी माझ्यातला आदर्श शिक्षक जागा होत असे! मला पहिलीच परीक्षा आली ती महावीर पॉलिटेक्निकला.
हे महाविद्यालय नाशिकच्या दिंडोरी रोड वरील म्हसरूळ गावापासून आत मध्ये वरवंडी गावच्या रस्त्यावर आहे. या रस्त्याने नाशिकची सिटीबस दिवसातून एक ते दोन वेळा जायची. शिवाय गावाकडचा भाग असल्यामुळे रिक्षांची संख्या अत्यंत कमी होती. कॉलेजची बस मात्र नियमित जायची. तिथल्या इंटरनल एक्झामिनरने मला त्यांच्या बसचे वेळापत्रक दिले होते. तरीही त्या दिवशी माझी बस चुकली. मग मी अमृतधाम ते पंचवटी आणि पंचवटी ते म्हसरूळ असा रिक्षाने प्रवास केला. परीक्षेची वेळ होत आली होती आणि मलाही जायची घाई होती. म्हसरूळच्या वरवंडी फाट्यावर उतरलो. तर तिथे एकही रिक्षा उभी असलेली दिसली नाही. अर्थात मला फक्त शेअर रिक्षाचा पर्याय उपलब्ध होता. थेट परीक्षा करणे मात्र परवडणारे नव्हते. त्यामुळे लिफ़्ट मागण्याचा एक सहज सोपा पर्याय माझ्यापुढे होता. त्याचीच वाट बघत मी वरवंडी फाट्यावर उभा राहिलो. परंतु या रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनांची गर्दी फार नव्हती. जाणारे बाइकस्वार फारफार तर म्हसरूळ गावात घुटमळत. आता काय करावे? हा प्रश्न उभा ठाकलेला होताच.
फाट्यावर उन्हात उभे असताना एका बाईकस्वाराने पाहिले व तो थोडं पुढे अंतरावर जाऊन थांबला. त्याने मागे वळून बघितले आणि मला हाक मारली. डोळ्यावर टिपिकल चष्मा अडकवलेला, छोटे केस आणि माझी बारीक देहयष्टी घेऊन मी त्याच्याकडे गेलो.
'कॉलेजला जायचं का?' तो म्हणाला.
त्याच्या या प्रश्नावर मनात आनंदी होऊन मी होकारार्थी मान डोलावली. अखेर काही मिनिटांच्या प्रतीक्षेनंतर मला लिफ्ट मिळाली होती. त्यामुळे हायसे वाटले. त्या दहा मिनिटांच्या प्रवासात आमच्या थोड्या गप्पा झाल्या.
'परीक्षेला चालला काय?' त्याने विचारले.
त्याच्याच प्रश्नावर मला समजले की, त्याला वाटतंय मी विद्यार्थी आहे. मग मनातल्या मनात म्हटलं, बघूया काय होतंय ते आणि होकारार्थी मान डोलावली.
मग आमचे प्रश्न-प्रश्न आणि उत्तरे-उत्तरे चालू झाली.
'कोणत्या क्लासमध्ये आहेस' त्याने विचारले.
'टीवाय आयटी'.
'मी पण त्याच वर्गात आहे'.
'कॅमच्या (कम्प्युटर आर्किटेक्चर अँड मेंटेनन्स) ओरलला चाललाय का?'.
'हो' मी म्हटले.
त्यालाही आपला जोडीदार मिळाल्याचे समाधान वाटले. अर्थात कॅरीऑन मुळे अनेक उडाणटप्पू मुले एकाच वर्गात आली होती. त्यातले बरेच जण कॉलेज अटेंड करत नव्हते. आमचा हा स्वारही त्याच कॅटेगरीतला! त्यामुळे माझ्या उत्तरावर त्याचा लगेच विश्वास बसला.
'तू कोणत्या बॅचचा?' त्याने पुढे विचारले.
'2004'
'हो का? मी 2003 च्या बॅचचा...'
'हे एक्स्टर्नल लई खडूस असतात का रे?'
'हो... लै खडूस असतात. मी तीन वेळा नापास झालोय'
'मी तर काहीच प्रिपरेशन केला नाही भाऊ!'
'अरे मी तरी कुठे केलीये? मी असंच चाललोय.'
'जाऊदे पास तर पास नापास तर नापास!'
असं म्हणत त्याने एक्स्टर्णल एक्झामिनरला दोन-चार शिव्या दिल्या आणि पुढचा संवाद सुरू ठेवला.
कॉलेजच्या गेट पाशी गेल्यावर मात्र माझी गोची झाली. त्याने तर त्याचे आयकार्ड दाखवले. पण माझ्याकडे तर तेही नव्हते आणि वॉचमनला एक्स्टर्णल एक्झामिनर आहे, असे सांगावे तर माझाच भांडाफोड झाला असता. वॉचमन मात्र कार्ड वरती अडून बसला होता.
काय भाऊ तुला परीक्षेला आयकार्ड लागतं हे पण माहीत नाही का? असं सांगून तो लगबगीने आत मध्ये निघून गेला. मग मी लगेचच इंटर्णल एक्झामिनर ला फोन लावला आणि वॉचमनशी बोलायला सांगितले. मग काय वॉचमनने तातडीने आत सोडून दिले आणि अखेरीस आमची परीक्षा चालू झाली. मी आणि इंटरनल एक्झामिनर टेबलसमोर बसलेलो आणि एक एक विद्यार्थी आत यायला सुरुवात झाली. आणि पाहतो तर काय, आमचा बाईकस्वार पहिल्या क्रमांकावर होता!!! खूप जुन्या बॅचचा असल्यामुळे त्याचा पहिला क्रमांक लागला होता. मला समोर एक्झामिनर म्हणून बघितल्यावर तर त्याला धक्काच बसला. काय करावं काय नाही, या प्रश्नाचे उत्तरही त्याच्याकडे नव्हते. त्याला हेही माहीत होते की, त्यांनी काहीच अभ्यास केलेला नाहीये, हे मला माहितीये! शिवाय माझ्या नावाने त्याने दोन-चार शिव्या हासडल्या होत्या. बिचाऱ्याची अवस्था मात्र मला बघवली नाही. कदाचित त्याचा मेंदू हँग झालेला असावा! ओरल ला दोन-चार सोपे प्रश्न विचारले आणि त्याला सोडून दिले. परंतु एकाही प्रश्नाचे उत्तर बिचाऱ्याला आले नाही. परीक्षा संपल्यावर त्या विद्यार्थ्याला मी परत कधीच पाहिले नाही. परंतु एका अनपेक्षित प्रसंगाची मजा मात्र तो घेऊन गेला. हा किस्सा जेव्हा मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगायचो तेव्हा त्यांचा शेवटचा एकच प्रश्न असायचा, तो पास झाला की नापास? मग मी हसून उत्तर द्यायचो, 'मी माझ्या दहा मिनिटांच्या मित्राला नापास थोडी करणार होतो?'

Tuesday, October 22, 2019

आपल्या नद्या आणि आपण

मागच्या आठवड्यात जपानमध्ये मोठा पूर आला होता व पुराचे पाणी शहराच्या विविध भागांमध्ये शिरले होते. याच पुरातील पाण्याचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. यात असे लिहिले होते की, जपानमधले पुराचे पाणीही भारतातील नद्यांच्या पाण्यापेक्षा स्वच्छ आहे! एकूणच जपानी जीवनशैली पाहता ही गोष्ट कोणीही नाकारू शकत नाही. आजची एक आदर्शवत संस्कृती जपानने तयार केली आहे. व ती सर्वांनी अनुकरण करण्यासारखीच आहे. 


भारतीय नद्यांचा विचार केल्यास त्या जगातील सर्वात गलिच्छ नद्या आहेत, हे वास्तव आहे. याचं फारसं विश्लेषण करण्यापेक्षा पुन्हा एकदा व्हायरल झालेला खालील फोटो पहा. 


चित्रांवर लिहिलेल्या वाक्यावरून भारतातील नद्या सामान्य नागरिकच का घाण करतो? याचे उत्तर मिळेल. नदीला आपण देवी मानतो व तिचं दैवत्वच तिला गलिच्छ स्वरूप प्राप्त करून देत आहे, असं दिसतं. सार्वजनिक स्वच्छतेच्या बाबतीत आपलं मागासलेपण पावलोपावली जाणवत असतं. शिवाय आपली सदसद्विवेकबुद्धी बाजूला ठेवून केवळ स्वार्थापोटी अनेक गोष्टींचा आपण विचार करतो. उदाहरणार्थ, प्लास्टिकचा वापर... भारत हा सर्वात मोठा प्लास्टिक वापरकर्ता देश आहे. भारतात वापरले गेलेले प्लास्टिक ( मुख्यत्वे सिंगल युज प्लास्टिक ) हे आपल्याला नदीपात्रात सापडेल, मुक्या जनावरांच्या पोटात सापडेल किंवा तुंबलेल्या गटार मध्येही सापडेल.
भारतातील व्हायरल झालेला आणखी एक फोटो पहा. 


हा कुठला आहे, हे नक्की माहीत नाही. परंतु, आपल्या प्रत्येक शहरातल्या गटारातली ही परिस्थिती आहे. आपण या देशाचे जबाबदार नागरिक म्हणून किती कर्तव्य पार पाडतो? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. खालचा फोटो पहा. यावरून अजून एक गोष्ट देण्यात येते की, जैविकरित्या विघटन न होणारे प्लास्टिक देवता मानलेल्या हजारो गायांच्या पोटात आज ठाण मांडून बसलेले आहे. अशी परिस्थिती आणखी किती वर्षे राहणार आहे? 

चार-पाच वर्षांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या आणखी एका फोटोबद्दल आपण बोलूयात. हा फोटो ऑस्ट्रेलियातील आहे. 


भूमिगत गटारे व सांडपाण्याच्या पाइपमधून बाहेर पडणाऱ्या पाण्यातील स्थायू घाण अडवण्यासाठी केलेली ही उपाय योजना! हा एक उत्तम पर्याय आहे. याने काही प्रमाणात नदीतील घाण कमी होऊ शकते. परंतु, आपल्याकडे अशा उपायांसाठी राजकीय इच्छाशक्ती नाही, हे मान्य करावे लागेल. तरीही जनमताचा रेटा असेल तर प्रशासनही सुधारेल. असे मानायला हरकत नाही. शेवटी काय, आपण सुधरा, देशही सुधारेल... इतकेच सांगू शकतो.

Monday, October 21, 2019

मराठीचे जगातील स्थान

विकिपीडियाच्या ह्या लिंक वरून काढलेली खालील आकडेवारी पहा. 'एथोनॉलॉग' या जगप्रसिद्ध भाषांची माहिती ठेवणाऱ्या कॅटलॉगने सदर तालिका सन 2019 मध्ये प्रसिद्ध केली आहे. सर्वात अभिमानाची गोष्ट म्हणजे आपली मातृभाषा 'मराठी' या तालिकेत जगात दहाव्या क्रमांकावर आहे. ही आकडेवारी प्रथम भाषा बोलणार्‍या लोकांची आहे. यात एकाच भाषेचे विविध प्रकार वगळण्यात आलेले आहेत. भारतीय भाषांचा विचार केल्यास देशात मराठी ही हिंदी व बंगाली नंतर तिसऱ्या तर जगात चौथ्या क्रमांकाची भाषा आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पहिल्या दहामध्ये मराठी ही अशी एकमेव भाषा आहे, जी फक्त एकाच देशात बोलली जाते! अशी मराठी भाषा बोलत असल्याचा आम्हाला अभिमान वाटतो!


Monday, October 14, 2019

मराठीत बोला आणि लिहा सहजपणे...

इंटरनेटवर आज मोठ्या प्रमाणात मराठी भाषेतून लेख कविता ब्लॉग्स व ई-बुक उपलब्ध झालेले दिसतात. हा सारा सृजनशील पसारा वेगाने वाढत चाललाय. मराठी भाषेसाठी इंटरनेट व त्यावर लिहिली जाणारी मराठी आज एक प्रकारे टेक्नो-संजीवनीच काम करीत आहे. ज्यांना आपल्या भाषेत व्यक्त व्हायचंय, त्यांच्यासाठी अनेक मुक्त व्यासपीठ इंटरनेट मी उपलब्ध करून दिलीत.
आज वाचकांची संख्या लेखकांपेक्षा जास्त असली तरी प्रत्येक वाचतात एक सुप्त लेखक घडल्याचा दिसतो. अनेक जणांना लिहायचं असतं. इंटरनेटद्वारे व्यक्त व्हायचं असतं, परंतु लिहायचं कसं? हा पहिला प्रश्न पडतो. फॉन्ट कोणता? सॉफ्टवेअर कोणते? कसे टाईप करायचं? असे अनेक प्रश्न मराठी लेखकांना पडतात. युनिकोड व नॅचरल लँगवेज प्रोसेसिंग द्वारे मराठी भाषा आता सहजपणे संगणकात वापरता येऊ लागलीये. ही सर्व संगणक तंत्रज्ञानाची किमया आहे. संगणकात मराठीसाठी कोणताही फॉन्ट वापरला जात नाही. युनिकोडच्या साह्याने इंग्रजी सारखीच अन्य कोणतीही भाषा आपण संगणकात सहजपणे वापरू शकतो. त्यासाठी विविध प्रकारचे एडिटर्सही उपलब्ध झाली आहेत. यातीलच बहुतांश एडिटर्स हे गुगल ट्रान्सलिटरेशन ची मदत घेतात. याद्वारे कोणीही सहजपणे मराठीत टाईप करू शकतो. अनेकांना तर टाईप करण्याचा व लिहायचाही कंटाळा असतो. त्यासाठी ही विविध सुविधा अँड्रॉइड ऍपच्या साह्याने उपलब्ध झालेल्या आहेत. खाली दिलेल्या लिंक वर असेच एक सुलभ ॲप गूगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. गुगलचे 'स्पीच टू टेक्स्ट' तंत्रज्ञान वापरून हे ऍप मराठीत बोललेली माहिती टेक्स्ट मध्ये अर्थात संगणकात मराठी भाषेत आपोआप टाईप करून दाखविते. विशेष म्हणजे यात आपले बोलणे मराठी टाईप करून अन्य भाषेत भाषांतरित करण्याचीही सुविधा आहे! जेव्हा तुम्ही सदर ॲप इन्स्टॉल करून उघडाल तुम्हाला वरच्या बाजूला पाच आयकॉन्स दिसतील. त्यातील मधल्या आयकॉनवर क्लिक करून तुम्हाला फक्त आपल्या भाषेत स्पष्टपणे बोलायचं आहे. जसजसे तुम्ही बोलत जाल तसे या ॲपच्या एडिटरवर टाईप होत जाते. विशेष म्हणजे सदर ॲपचा वेग खूपच चांगला असून असून त्याची अचूकता 99% मानायला काहीच हरकत नाही. एडिटरमध्ये टाईप झालेले मराठी वाक्य तुम्ही दुसरीकडे कुठेही थेट कॉपी व शेअरही करू शकता. ॲप वापरताना एक गोष्ट लक्षात ठेवायची एक की, तुमचं मोबाईल इंटरनेटला जोडलेला असायला हवा.
असं हे मराठीतले एक सुंदर ऍप आहे. चला तर मग ते वापरूया व इंटरनेटवरची मराठी समृद्ध करूयात. 
 
 
 

Sunday, October 13, 2019

पोलिसांची प्रतिमा

पोलीस व प्रत्येकाच्या जीवनाशी निगडित एक वेगळ्याच प्रकारचा विषय असतो. कधी ना कधी ह्या विषयाची आपल्याबरोबर गाठ पडत असते. परंतु, ही गाठ सकारात्मकतेपेक्षा नकारात्मकते कडे जास्त झुकलेली दिसते. केवळ माझाच नाही तर अनेकांचा अनुभव कदाचित असाच असावा.
साधारण वर्षभरापूर्वीची गोष्ट आहे. पुणे ते नाशिक रस्त्यावर आंबेगाव तालुक्यात कळंब नावाचे एक खेडे आहे. या गावातून पुणे-नाशिक महामार्ग अतिशय अरुंद भागातून जातो. घोड नदीच्या काठावर वसलेल्या या गावात नदीवरचा एक अरुंद पूलही आहे. त्यादिवशी नाशिकला जाताना या पुलावर आमचा अपघात झाला होता. एका सेलेरियो कारने s-cross कारला मागून धडक दिली. त्यामुळे त्या कारने आमच्या कारला धडक दिली व आमची कार पुढच्या एसयूव्ही कारला धडकली! अशा तऱ्हेने एकाच वेळी चार गाड्या एकमेकांना धडकल्या होत्या. आमच्यासह सर्वजण सर्वात शेवटच्या कार ड्रायवरवर भयंकर भडकले होते. त्याला फक्त मारायचे बाकी ठेवले होते. त्यातच आमच्या मागच्या गाडीच्या ड्रायव्हरने पोलिसात तक्रार करण्याची धमकी दिली. प्रत्यक्षात त्याने तसे केले नसते. परंतु जवळच्या पोलिस चौकीला कुठून तरी वास लागलाच! थोड्याच वेळात दोन कॉन्स्टेबल पंचनामा करण्यासाठी दाखल झाले. हे सर्व अपघात प्रकरण पोलिसात लवकरच नोंद होणार, अशी परिस्थिती होती. परंतु याबाबतीत आजूबाजूच्या लोकांनी आमची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. सर्वांचे असेच म्हणणे होते की, पोलिसात गेल्यावर त्यांना चार-पाच हजार रुपये द्यावे लागतील. विशेष म्हणजे अशा मताचे जवळपास सर्वच लोक तिथे होते! सर्वांना हेच वाटत होते की, तुम्ही आपापसात मिटवून घ्या. कशाला पोलिसांची 'झंझट'? त्यावेळी एकंदरीत पोलिसांची जनमानसात काय प्रतिमा असेल, हे ध्यानात आले आणि हा विषय पोलिसात मात्र गेला नाही.
वरील घटनेनंतर साधारणत: चार महिन्यांनी भोसरीच्या स्पाईन रोड सिग्नलपाशी मला असाच अनुभव आला. एक दारू पिऊन चाललेला बेवडा माझ्या गाडीला मागून येऊन घासून गेला. अर्थात त्यामुळे त्याच्यात गाडीचे जास्त नुकसान झाले होते. तरीही बेवडे साहेब गाडीतून उतरून तावातावाने भांडायला आले. त्यावेळेसही सदर प्रकरण पोलिसात जाण्याच्या वाटेवर होते. परंतु पुन्हा सर्वांच्या म्हणण्यानुसार पोलिसात जाणे म्हणजे पैसे आणि वेळ दोन्ही वाया घालवणे होय. पोलीस खायलाच टपलेले असतात, असे अनेकांचे म्हणणे होते आणि हेही प्रकरण इथेच थांबले.


फक्त याच दोन नाही तर अशा अनेक त्रयस्थ ठिकाणी अशाच प्रकारचा अनुभव येतो. यातून कोणता बोध घ्यावा, तेच समजत नाही. सिंघम आणि दबंग हे केवळ चित्रपटात शिट्ट्या मिळवण्यासाठी असतात, असेच यातून एकंदरीत दिसते. केवळ पोलिसच नाही तर अनेक सरकारी कर्मचाऱ्यांना बद्दल अशाच प्रकारचे अनुभव आपल्या नागरिकांकडे आहेत आणि विशेष म्हणजे त्यांना त्याची सवय झालीये! अनेक ठिकाणी तर ही संस्कृती मानली जाते. त्यामुळे एकंदरीत सरकारी कर्मचारी ही जमात वेगळीच आहे. त्यांच्या वाटेला जायला नको. असा ग्रही आमच्यासारख्यांच्या मनात तयार झालाय. कधी कोणत्या सरकारी कार्यालयात गेले की तेथील लोक केवळ आपल्या कडून पैसे उकळायला बसलेत, असंही बऱ्याचदा वाटून जातं. हा ग्रह पुसून टाकण्यासाठी कधीतरी एखादा प्रामाणिक अधिकारी आमच्यासारख्यांच्या अनुभवात जमा व्हावा असेही वाटते. वाट बघुयात.

Friday, October 11, 2019

एक्झाम वॉरियर्स - नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेले हे पुस्तक आहे, "एक्झाम वॉरियर्स". अगदी अपघातानेच हे पुस्तक हाती आले. परीक्षेला केंद्रभागी ठेवून लिहिलेले कदाचित हे पहिलेच 'सुटसुटीत' पुस्तक असावे. शालेय जीवनात विद्यार्थी अनेकदा परीक्षांना सामोरे जातात. परीक्षा हेच शालेय विद्यार्थ्यांच्या जीवनात भीतीचे सर्वात मोठे कारण असते. हीच भीती उद्भवू नये, म्हणून काय करावे? या प्रश्नाचे उत्तर या पुस्तकातून मिळते. परीक्षा म्हणजे नक्की काय? स्पर्धा, तंत्रज्ञान, विश्रांती, खेळ, झोप, ताणतणाव, आत्मविश्वास, शिस्त, शैली, कॉपी, आत्मचिंतन, प्रवास, तंदुरुस्ती अशा विविध अंगांना लेखकाने खूप उत्तम प्रकारे व सहजपणे हाताळले आहे. 


वरील काही शब्द वाचायला जरी जड वाटत असले तरी त्यांची शालेय विद्यार्थ्यांच्या दृष्टीने मांडणी छानपणे करण्यात आली आहे. हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी एक प्रकारे 'पर्सनल डायरी' सारखे काम करेल असेच आहे. जवळपास प्रत्येक धडा 'क्यूआर कोड'ने पंतप्रधानांच्या ऍपला जोडण्यात आलाय, जेणेकरून विद्यार्थी त्यांचे अनुभव थेट शेअर करू शकतील. पालक, शिक्षक व विद्यार्थी अशा तिघांनाही उद्देशून लिहिलेले हे पुस्तक शालेय विद्यार्थ्यांनी वाचायला हवे. पेंग्विन रँडम हाऊसने प्रकाशित केलेल्या मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद पुण्याच्या अमेय इन्स्पायरिंग बुक्सने केला आहे.

वाचन प्रेरणेचे एक पाऊल

आजच्या डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगात वाचनसंस्कृती रुजवावी, या हेतूने भारत सरकारने 2015 पासून भारताचे लोकप्रिय माजी राष्ट्रपती डॉक्टर ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीला अर्थात 15 ऑक्टोबरला वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. आजही सर्व मराठी शाळांमध्ये हा दिवस साजरा केला जातो. वाचनाची संस्कृती रुजावी आणि वाचनसंस्कृती वाढवावी, ही केवळ सरकारच नव्हे तर आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. असेच उद्दिष्ट लक्षात घेऊन मी आणि माझी पत्नी मागच्या चार वर्षांपासून विविध मराठी शाळांमध्ये वाचन प्रेरणा दिवस साजरा करतो. सदर उपक्रमांतर्गत विविध गरजू मराठी शाळांना आम्ही चरित्रपर, प्रेरणादायी, गोष्टींची, कवितांची, कोड्यांची, सुलभ विज्ञानाची तसेच अभ्यासक्रमातील पुस्तके भेट स्वरूपात देत असतो. साधारणतः 80 ते 90 पुस्तके या संचात असतात. विद्यार्थ्यांना शालेय वयातच छोट्या-छोट्या पुस्तकांमधून अवांतर वाचनाची गोडी लागावी व त्यातूनच त्यांची ज्ञानसमृद्धी व्हावी, हा आमचा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. सण 2015 पासून नाशिकच्या एका मराठी शाळेतून आम्ही ही सुरुवात केली होती. यावर्षी सदर उपक्रमाची व्याप्ती वाढवून आम्ही तीन शाळांपर्यंत पोहोचणार आहोत.
हे सर्व इथे लिहिण्याचा उद्देश असा की आपणही आपल्या परीने आपल्या जवळच्या शाळेत सदर उपक्रम राबवू शकता. मराठी वाचन संस्कृती वाढविण्याच्या दृष्टीने आपले योगदान निश्चितच बहुमूल्य राहणार आहे.


Monday, September 30, 2019

गुरुत्वाकर्षण

विश्वात सर्वत्र संचार असणारे व सर्वात प्रभावी बल म्हणजे गुरुत्वीय बल होय. आज आपण सहजपणे 'गुरुत्वाकर्षण' म्हणतो! परंतु, या वैश्विक बलाची शास्त्रीय उकल करण्यासाठी गॅलिलिओ, न्यूटन आणि आईन्स्टाईन या मानवी इतिहासातल्या प्रतिभावान वैज्ञानिकांनी आयुष्यातील अनेक वर्षे घालविली. कोणत्याही आधुनिक तंत्रज्ञानाधारित साधनांचा वापर न करता त्यांनी ही उकल कशी केली, याची कहाणी दाखविणारा हा माहितीपट. शोध कसे लावायचे असतात? याची प्रेरणा या माहितीपटातून नक्कीच घेता येईल...!

https://www.youtube.com/watch?v=2_p2ELD7npw 



Wednesday, September 11, 2019

एक छोटीशी बोधकथा

मकरंद आणि विनय दोघे बालपणीचे मित्र. दहावीपर्यंत दोघेही एकाच वर्गात शिकलेले. शिवाय दोघांचे मार्कही जवळपास समान, अर्थात ६५ ते सत्तरच्या मधलेच. परंतु, दहावीनंतर दोघांनीही वेगवेगळ्या वाट निवडल्या.
आज दहा वर्षांनंतर मक्या अर्थात मकरंद आपल्या वडिलांसह वीटभट्टीवर देखरेखीचं काम करतो तर विनय एमपीएससीची परीक्षा पास होऊन पोलीस सब-इन्स्पेक्टर झालाय. त्या दिवशी सहजच गावात दोघांची भेट झाली. इतक्या वर्षांनी शाळेतला मित्र भेटला म्हटल्यावर दोघांनाही फार फार आनंद झाला. मकरंदला मात्र विनयच्या प्रगतीविषयी असूया वाटत होती. त्या भेटीत तो विनयला म्हणाला होता, 'असतो बाबा देव एकेकावर मेहेरबान... म्हणून तू आज पोलीस झालायेस...'


त्याच्या वडिलांना मात्र त्याचे हे बोलणे खटकले. ते म्हणाले, 'बाळा... खरं सांगू का, देव काही त्याच्यावर मेहेरबान नाहीये. जेव्हा तू गणपती अन नवरात्रात रात्री पॅन्ट फाटेस्तोवर नाचत होतास ना, तेव्हा तो अभ्यास करून आपल्या भविष्याची पेरणी करत होता... इतकंच... '