Thursday, May 27, 2021

नटसम्राट

वि. वा. शिरवाडकर यांची काही कादंबऱ्या पुस्तकांच्या कपाटाच्या बाहेर काढून ठेवलेल्या होत्या. तेवढ्यात 'तो' एक जण आला. त्याने पुस्तके चाळायला सुरुवात केली. एका पुस्तकाच्या मलपृष्ठावर लेखकाचे छायाचित्र होते. त्याने टक लावून पाहिले. काहीसे आठवल्यासारखे केले व तेवढ्यात त्याचा दिवा पेटला असावा. त्याने मला विचारले,
"या पुस्तकाचे लेखक बघ... ते मराठी कवी नाही का, कुसुमाग्रज... त्यांच्यासारखे दिसतायेत."
मी वळून त्याच्याकडे बघितले. पुस्तकावरचा तो फोटो पाहून स्मितहास्य केले आणि त्याला हसून दुजोरा दिला,
"नाही रे! हे त्या नटसम्राट नाटकाचे नाटककार आहेत ना, त्यांच्या सारखेच दिसतात...!!!"
मग तो सुद्धा परत ते छायाचित्र टक लावून पाहू लागला.

Monday, May 24, 2021

रुमाली रहस्य: गो. नी. दांडेकर

गोपाळ नीलकंठ दांडेकर यांच्या लेखणीतून उतरलेली ही ऐतिहासिक रहस्यकथा होय. या कादंबरीला पेशवेकालीन पार्श्वभूमी आहे. घाशीराम कोतवाल यातून एका वेगळ्या रूपामध्ये आपल्याला अनुभवायला मिळतात. याशिवाय नाना फडणवीस व रामशास्त्री प्रभुणे देखील या कथेतून आपल्याला भेटतात. कादंबरीची सुरुवात होते सर्जेराव घारे नावाच्या मराठा सरदाराच्या खुनापासून आणि थोड्याच वेळामध्ये आणखी एका खुनाची वार्ता घाशीराम कोतवाल यांच्या कानावर येते. लगेचच शोध पथके आपल्या कामाला लागतात. अंदाज बांधले जातात, तर्कवितर्क करून खुन्याच्या मार्गावर मराठी सरदार पाठवले जातात. उत्तरेकडून आलेले व बैराग्याचा वेश घेतलेले दोन जण वेगाने दक्षिणेकडे कूच करत असतात. मराठी सरदार त्यांचा निजामाच्या सीमेपर्यंत पाठलाग करतात. परंतु त्यांना यश येत नाही. तरीही प्रयत्नांची पराकाष्ठा करत वेगळ्या मार्गाने खुन्यापर्यंत पोहोचण्याचा विचार केला जातो. घाशीराम कोतवाल यांची दृष्टी व मराठा सरदारांचे साहस यातून या खुनाची उकल होते. परंतु ज्या गोष्टीसाठी हा खून झालेला असतो ती मात्र खोटी असते. मग खरी गोष्ट नक्की कुठे आहे? त्याची उकल शेवटच्या प्रकरणामध्ये करण्यात आलेली आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली ही कादंबरी अनेक रेखाचित्रांनी सजलेली आहे. त्यामुळे आपल्या डोळ्यासमोर प्रसंग उभे करण्यात ती निश्चितच यशस्वी होते. शिवाय गो. नी. दांडेकर यांचा रहस्यमय साहित्याचा हा प्रयोगही उत्कंठावर्धक शेवटाने संपतो. 



Wednesday, May 19, 2021

वेडा विश्वनाथ

नावात लिहिल्याप्रमाणे विश्वनाथ उर्फ विश्या हा या कादंबरीचा मुख्य नायक आहे. संपूर्ण उपेक्षित, कोणतीही जाण नसलेला तसेच समाजामध्ये कोणतेही स्थान नसलेला हा वेडा विश्वनाथ होय. त्याचं वय विशीच्या पार आहे, पण बुद्धीची समज फक्त ३ वर्षांच्या मुलाइतकीच आहे. दिवसभर बाहेर फिरून काही ना काही उद्योग करत राहणे आणि परत फिरून संध्याकाळी घरी येणे, हाच त्याचा सर्वसामान्य दिनक्रम! त्याच्याच गावात राहणारी आशा ही वयात आलेली मुलगी होय. एक दिवस गावातील काही उनाड टाळकी तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करतात. परंतु वेडा विश्वनाथ तिला त्यातून सहीसलामत सोडवतो. त्याचं हे वेगळं रुप तिला आश्चर्यचकित करणारं असतं. एक-दोन शब्दांच्या पलीकडेही न बोलणारा वेडा विश्या इतकी अचाट कामगिरी कशी करू शकतो, याचे तिला आश्चर्य वाटल्याशिवाय तिला राहवत नाही. मग या गोष्टीमध्ये एन्ट्री होते ती पीएसआय अदवंत यांची. इथून पुढचा घटनाक्रम धारपांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीमध्ये रंगवलेला आहे. अनेक वर्षांपूर्वी घडून गेलेल्या घटना आणि वेडा विश्वनाथ यांचा काय संबंध आहे? याचे रहस्य हळूहळू उलगडत जाते. अदवंत, आशा आणि विश्वनाथ एका दुष्ट चक्रामध्ये फसले जातात. त्यातून ते बाहेर पडतात का आणि वेड्या विश्वनाथाचे पुढे काय होतं? या प्रश्नांची रंजक मांडणी धारपांनी या पुस्तकांमध्ये केलेली आहे.




Sunday, May 16, 2021

द अल्केमिस्ट

प्रेरणादायी पुस्तकांच्या यादी मधलं हे एक नाव... "द अल्केमिस्ट". ही कथा आहे एका मेंढपाळाची, जो खजिन्याच्या शोधार्थ फिरतो आहे. एका खंडातून दुसऱ्या खंडात गेलेला आहे. तिथून वाळवंटाद्वारे तो पिरॅमिडच्या प्रदेशात अर्थात इजिप्तपर्यंत पोहोचतो. या त्याच्या प्रवासामध्ये अनेक अडथळे येतात. त्याला काही संकटांचा सामना करावा लागतो. पण त्यातूनच त्याला अनुभव मिळत जातो. बाहेरचं जग कसा आहे, हे समजत जातं. नव्या गोष्टी तो शिकत चालतो. त्याच्या या प्रवासाने शिकवलेले अनुभव त्याला बरेच काही देऊन जातात. आपल्यामध्ये क्षमता किती आहेत? याची अनेकांना जाणीव नसते. अर्थात खजिना नक्की कुठे आहे? हेच आपण आयुष्यभर शोधत राहतो. परंतु या खजिन्याची दिशा व मार्ग आपल्याला प्रयत्नाने कधी ना कधीतरी सापडतोच, अशी कथा आहे... अल्केमिस्ट या पोर्तुगीज कादंबरीची. एका मेंढपाळाच्या प्रवासाभोवती फिरणारी ही कथा बरंच काही शिकवून जाते. एकाग्रतेने व सलगतेने वाचल्यास तिचा प्रभाव मात्र अनेक काळ आपल्या मनावर टिकून राहतो.



Saturday, May 15, 2021

इमोजी: डिजिटल युगातील सर्वमान्य भाषा

सकाळी मोबाईल हातात घेतला आणि व्हाट्सअपचे मेसेज बघितले की बहुतांश सर्वच मेसेज इमोजीने भरलेले असतात. फेसबुकचही काहीच असंच आहे. ट्विटरही याला अपवाद नाही. शिवाय आज काल लिंक्डइनवर देखील इमोजीचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे. इंग्रजीमध्ये असं म्हटलं जातं, "पिक्चर सेज मोर दॅन वर्डस" अर्थात शब्दांपेक्षा चित्रे अधिक काही सांगून जातात. याच कारणामुळे शब्दांपेक्षा चित्र रूपात असलेल्या इमोजींचा वापर वाढत चाललेला आहे. किंबहुना स्मार्टफोन वापरणारा प्रत्येक जण त्यांचा अगदी सहजपणे वापर करत असतो. शिवाय शब्दांमध्ये लिहिण्यापेक्षा चित्रांमध्ये लिहिणे आज-काल सोपे होऊ लागले आहे. जवळपास सर्वच प्रकारच्या इमोजी आज मोबाईलमध्ये व सोशल मीडियावर उपलब्ध झालेल्या आहेत. म्हणूनच कमीत कमी शब्दांमध्ये व्यक्त होण्यासाठीचे एक उत्तम व प्रभावी माध्यम तयार झालेले आहे. नव्या पिढीची बहुतांश चॅटिंग ही याच स्वरूपामध्ये दिसून येते. ही भाषा चित्रांची असल्यामुळे ती सर्वमान्य आहे. यामध्ये चित्ररूपी भावनांमधून व्यक्त होता येते. ही भाषा अतिशय सोपी आहे. त्यामुळे इंटरनेटचा व सोशल मिडीयाचा वापर करणारा प्रत्येक जण या भाषेमध्ये व्यक्त होत असतो. अशी ही इमोजीची भाषा नक्की सुरू केव्हा झाली, ते बघूयात.
तुम्हाला आश्चर्य वाटेल पण इमोजीचा जन्म मागच्या शतकातला आहे. १९९९ मध्ये शिगेताका कुरिता नावाच्या जपानी विकसकाने इमोजी सर्वप्रथम तयार केले. दूरसंचार क्षेत्रातील आघाडीची जपानी कंपनी "डोकोमो" मध्ये कार्यरत असताना इमोजी त्याने तयार केली होती. दूरसंचार कंपन्यांमधील चढाओढ या काळामध्ये सुरू झाली होती. त्यातूनच इमोजीचा जन्म झालेला आहे. १२ x १२ पिक्सेलच्या १७६ इमोजी कुरिता याने तयार केल्या होत्या. आज त्या सर्व इमोजी 'न्यूयॉर्क म्युझियम ऑफ मॉडर्न आर्ट' मध्ये पाहता येतात. वातावरण, रहदारी, तंत्रज्ञान तसेच चंद्राच्या विविध कला अशा निरनिराळ्या थीमचा वापर करून तत्कालीन ईमोजी बनवल्या गेल्या होत्या. आज त्या अतिशय लोकप्रिय झालेल्या आहेत. सन २०१५ मध्ये 😂 या इमोजीला अर्थात LOL ला 'वर्ड ऑफ दी ईयर' म्हणून ऑक्सफर्ड शब्दकोशाने घोषित केले होते! म्हणजेच केवळ पंधरा वर्षांमध्ये इमोजीच्या भाषेतील शब्दांनी सर्वोच्च पातळी गाठली, असे म्हणता येईल. जागतिक महासत्ता असणाऱ्या अमेरिकेतील सत्ताकेंद्र अर्थात व्हाईट हाऊसने प्रकाशित केलेल्या आर्थिक अहवालामध्ये देखील इमोजींचा वापर पाहण्यात येतो!
सुरवातीच्या काळामध्ये याला 'इमोटिकॉन्स' म्हटले जायचे. त्यासाठी कीबोर्ड मधील अक्षरांचा विशिष्ट समूह उपयोगात आणायला जायचा. जसे हसण्याच्या स्माईलीसाठी :-) हे चिन्ह आणि नाराजीच्या स्माईलीसाठी :-( असे चिन्ह वापरले जात होते. "डोकोमो"मध्ये बनविण्यात आलेल्या या ईमोजी लवकरच लोकप्रिय होऊ लागल्याने स्पर्धक कंपन्यांनी देखील त्यांचा वापर सुरू केला. सन २००० नंतर जपानच्या बाहेर अनेक देशांमध्ये त्यांचा वापर व्हायला लागला. त्या काळामध्ये केवळ विशिष्ट मोबाईलसाठी ईमोजी उपलब्ध होत्या. परंतु सन २००७ मध्ये गुगलच्या पुढाकाराने इमोजीसाठी संगणकामध्ये युनिकोड देण्यात आला. युनिकोड प्रदान करणाऱ्या युनिकोड कन्सॉर्टियम या संस्थेने अनेक इमोजींना संगणकामध्ये वापर करण्यास मान्यता दिली. युनिकोड ही संगणकातील एक अधिकृत व सर्वमान्य कोडींग पद्धती आहे, ज्यामध्ये प्रत्येक अक्षराला एक जागतिक क्रमांक दिला जातो. त्यामुळे जगातील प्रत्येक संगणकांमध्ये ही अक्षरे वापरता येतात. शिवाय मोबाईलमध्येही त्यांचा वापर करता येतो. म्हणूनच इमोजींना देखील युनिकोड क्रमांक दिल्याने त्यांचा वापर सार्वत्रिक झाला. सन २००९ मध्ये ॲपल मधील या यासुओ किडा आणि पीटर एडबर्ग यांनी ६२५ नवीन इमोजींचा युनिकोडमध्ये अंतर्भाव केला. सन २०१० मध्ये या इमोजी सार्वत्रिक करण्यात आल्या. २०११ मध्ये ॲपल कंपनीच्या स्मार्टफोनवरील कीबोर्डमध्ये पहिल्यांदाच इमोजी दिसून आल्या. त्यानंतर दोन वर्षांनी अँड्रॉइड मोबाईलमधील कीबोर्डवर इमोजी दिसू लागल्या होत्या. आज युनिकोड कन्सॉर्टियमने हजारो इमोजी संगणकामध्ये वापरण्यास मान्यता दिलेली आहे. जवळपास जगातील सर्वच प्रकारच्या इमोजी संगणकात वापरता येतात. दरवर्षी शेकडो नव्या इमोजी युनिकोडमध्ये येत आहेत. सन २०१५ मध्ये युनिकोडने इमोजींचे स्किन टोन बदलण्याची देखील मान्यता दिली. ज्याद्वारे मानवी शरीराचे अंग असलेल्या ईमोजी आपल्याला त्वचेच्या विविध रंगांमध्ये वापरता येतात. इमोजी तयार करताना किंवा त्यांना मान्यता देताना युनिकोडला सर्वच गोष्टींची काळजी घ्यावी लागते. जगातील प्रत्येक वंश, धर्म, पंथ, भाषा, देश यांचा अपमान तर होत नाही ना? याची देखील त्यांना काळजी घ्यावी लागते.
मागच्या काही वर्षांमध्ये स्मार्टफोनचा वापर वेगाने वाढत चालल्याने आज स्मार्टफोनद्वारे होणारी माहितीची देवाण-घेवाण ईमोजीच्या भाषेमध्ये बदलताना दिसत आहे. जसे 'आय लव यू' साठी 🤎 हे चिन्ह वापरले जाते आणि लोटस ऑफ लाफ्टर अर्थात LOL साठी 😂 या चिन्हाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. इमोजींची लोकप्रियता पाहून ॲपल कंपनीने ऍनिमोजी अर्थात ऍनिमेटेड इमोजी नावाची नवीन संकल्पना तयार केली. तीदेखील बऱ्यापैकी लोकप्रिय झालेली आहे. आज युनिकोडने मान्यता दिलेल्या ३,५२१ ईमोजी अस्तित्वात आहेत. एखाद्या भाषेमध्ये देखील इतकी अक्षरे कदाचित अस्तित्वात नसावी. अर्थात डिजिटल वापरकर्त्यांची सर्वमान्य भाषा असल्यामुळे एवढ्या मोठ्या शब्दभांडाराचा अंतर्भाव तिच्यात असणे गरजेचेच होते. इमोजीची सध्याची प्रगती पाहता प्रिंट माध्यमांमध्ये देखील त्यांचा अशाच पद्धतीने वापर वाढला तर आश्चर्य वाटायला नको!



Friday, May 14, 2021

नरभक्षक मानव

वीसेक वर्षांपूर्वी हॉलिवूडमध्ये "द टेक्सास चेनसॉ" नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. अमेरिकेतल्या एका जंगलामध्ये एक रानटी जमात राहत असते. ही जमात माणसांच्या मांसांवर जगायची अर्थात हे जंगली लोक नरभक्षक होते, असं ह्या चित्रपटात दाखविण्यात आले होते. तसं पाहिलं तर गेल्या अनेक वर्षांमध्ये नरभक्षक मानव हा पूर्णपणे संपल्यातच जमा आहे. आज नरभक्षण हा मानसिक रोग मानला जातो. परंतु मानवी प्राण्यातील नरभक्षकत्व यापूर्वी अस्तित्वात होते का? याचा शोध शास्त्रज्ञांनी बऱ्याच काळापासून घेतलेला आहे. यातून पुढे आलेल्या पुराव्यांनुसार मनुष्य प्राणी देखील या नरभक्षक होता, हे सिद्ध झालेले आहे. आठ लाख वर्षांपूर्वी स्पेनमधील ग्रँड डॉलीना गुहेमध्ये सापडलेल्या हाडांवरून मानवी नरभक्षकत्वाचे सर्वात जुने पुरावे मिळतात. हाडांवरील खुणा तपासल्या असता शास्त्रज्ञांना मानवी नरभक्षकत्व सिद्ध करता आले आहे. या हाडांद्वारे युरोप मधील मानवाच्या अनेक जाती या नरभक्षक होत्या, असे शास्त्रज्ञांना वाटते. त्यानंतरच्या अनेक मानवी जातींमध्ये देखील नरभक्षकत्व दिसून आलेले आहे. प्रामुख्याने अन्नाची कमतरता आणि एका जमातीचे दुसऱ्या जमातीवरील वर्चस्व या दोन कारणांमुळे माणूस नरभक्षक होत असावा, असे अनुमान काढता येते. नंतरच्या काळामध्ये देखील पश्चिम व मध्य आफ्रिका, पॅसिफिक सागरातील बेटे, ऑस्ट्रेलिया, सुमात्रा, उत्तर व दक्षिण अमेरिका या सारख्या प्रदेशांमध्ये नरभक्षक मानव अस्तित्वात होते. याशिवाय अनेक संस्कृतींमध्ये मानवी मांस हे अन्य प्राण्यांच्या मांसाप्रमाणेच उपयोगात आणले जायचे. तसेच काही विशिष्ट प्रसंगी देखील या मांसाचा उपयोग केला जात असे. न्यूझीलंडमधल्या एका प्रदेशात मानवी मांस मेजवानी म्हणून खाल्ले जात असे. आफ्रिकेतल्या काही भागांमध्ये मानवी शरीरातील अनेक अवयव भाजून खाल्ले जात असत. मध्य अमेरिकेतल्या ऍझटेक संस्कृतीमध्ये देखील मांसभक्षणाची परंपरा दिसून येते. याशिवाय ऑस्ट्रेलियातील मूलनिवासी देखील नरमांसभक्षक होते, असे आढळून आलेले आहे. गेल्या अनेक शतकांमध्ये संस्कृती विकसित झाल्यानंतर नरभक्षक मानव जवळपास संपल्यातच जमा झालेले आहेत. परंतु त्याचा हा गुण आता निसर्गाच्या मुळावर उठल्याचे प्रकर्षाने दिसते!

संदर्भ: १००१ आयडियाज दॅट चेंज्ड वी थिंक 



Wednesday, May 12, 2021

समांतर: अर्धी वेब सिरीज आणि अर्धे पुस्तक

मागच्या एक वर्षापासून वेब सिरीज हा प्रकार काही आता नवीन राहिलेला नाही. लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर वेब सिरीज रिलीज होत आलेल्या आहेत. मराठीमध्ये तशी त्यांची संख्या कमीच होती. पण हळूहळू हा ट्रेंड आता मराठीत देखील दाखल झालेला आहे. अशीच एक मराठी वेब सिरीज म्हणजे "समांतर" होय.
मागच्या वर्षभरामध्ये मराठीत सर्वाधिक चर्चिली गेलेली ही लोकप्रिय वेबसिरीज होय. मागील आठवड्यामध्ये एमएक्स प्लेयरवर पाहण्याचा योग आला. सुहास शिरवळकर यांच्या 'समांतर' या कादंबरीवर ही वेबसिरीज आधारलेली आहे. या कथेतील नायक कुमार महाजन याची भूमिका स्वप्निल जोशी याने साकारलेली आहे. तसेच त्याच्या पत्नीची अर्थात निमाची भूमिका तेजस्विनी पंडित हीने साकारली आहे. कुमार महाजन हा परिस्थितीने पीडित आणि सातत्याने अपयशाला सामोरे जाणारा एक युवक आहे. त्याचा मित्र वाफगावकर त्याला एका ज्योतिष सांगणार्‍या स्वामींकडे घेऊन जातो. त्यांचं भविष्य आजवर कधीही चुकलेले नसतं. परंतु हे स्वामी त्याचं भविष्य सांगायला नकार देतात. शिवाय त्याचा हात त्यांनी यापूर्वी पाहिलेला आहे, असेही ते सांगतात. त्यामुळे भविष्यामध्ये नक्की काय होईल? हे जाणून घेण्याची कुमारची आणखी तीव्र इच्छा तयार होते. त्यातच त्याला समजतं की, ज्या माणसाचा हात अगदी तंतोतंत त्याच्याशी जुळतो असा सुदर्शन चक्रपाणी नावाचा मनुष्य देखील अस्तित्वात आहे. मग शोध सुरू होतो..  या नव्या माणसाचा अर्थात सुदर्शन चक्रपाणीचा. त्याच्या शोधासाठी कुमारला अनेक दिव्ये पार करावी लागतात. परंतु तो जिद्द सोडत नाही. अखेरीस चक्रपाणीपर्यंत पोहोचतोच. या सुदर्शन चक्रपाणीची भूमिका नितीश भारद्वाज यांनी साकारलेली आहे. दोघांच्या हातांवरील रेषा समान असल्यामुळे दोघेही समांतर आयुष्य जगत आहेत, असं दिसून येतं. चक्रपाणी जे आयुष्य यापूर्वी जगलेला आहे, तसंच कुमारच्या बाबतीत होणार असतं. म्हणून त्याचं भविष्य सुदर्शन चक्रपाणीकडून जाणून घेण्याचाच त्याचा प्रयत्न असतो. तेव्हा त्याला सुदर्शनच्या आयुष्यातील डायऱ्या मिळतात आणि इथून पुढे सुरु होतो खरा थरार. सुदर्शनच्या आयुष्यातील घटना कुमार महाजनच्या आयुष्यात घडू लागतात. परंतु डायरीतल्या एका पानापाशी येऊन ही वेब सिरीज थांबते. त्यामुळे आता पुढे काय होणार? या प्रश्नाचे उत्तर मात्र मिळत नाही. माझेही काहीसे असेच झाले. वेब सिरीजमध्ये रंगलेला थरार अचानकपणे थांबतो. तेव्हा पुढे काय होणार? या प्रश्नाचे उत्तर देण्याचा शोधण्याचा आपणही त्याच्या परीने प्रयत्न करू लागतो. या वेब सिरीजचा पुढचा भाग कधी येईल, ते माहीत नाही. त्यामुळे सुहास शिरवळकर यांचे समांतर पुस्तकच वाचायला घेतले.
एकूण १९६ पानांच्या या पुस्तकातील कथेनुसार वेब सिरीज १२२ व्या पानापर्यंत तयार झालेली आहे. तिथूनच पुढे पुस्तक वाचायला सुरुवात केली. हा काही वेगळाच अनुभव होता. अर्धी कथा व्हिडिओ रूपात आणि अर्धी कथा वाचनाच्या रुपाने अनुभवायला मी सुरुवात केली. तसं पाहिलं तर पुस्तकावरूनच जशीच्या तशी वेबसिरिज तयार करण्यात आलेली आहे. पात्रांची नावेही तीच आहेत फक्त कथाविस्तार करण्यासाठी काही घटनांचा अंतर्भाव वेब सिरीजमध्ये करण्यात आल्याचा दिसतो. पुस्तकाची १२२ ते १९६ ही पाने उत्सुकतेने वाचून काढली. कथा तुटत असल्याचे बिलकुल जाणवले नाही. या भागांमध्ये मात्र दोन नव्या पात्राची एन्ट्री झाल्याचे दिसते. पुस्तक वाचताना पदोपदी कुमार महाजन म्हणजे स्वप्नील जोशीच असल्याचे जाणवत होते. प्रत्येक घटना वेबसिरीजमध्ये दाखवलेल्या परिस्थितीप्रमाणे पुढे चालली आहे, याचाही अनुभव येत होता. अखेरीस एका मोठ्या रहस्य भेदाने या कादंबरीचा शेवट झाला. खरोखर शिरवळकरांनी लिहिलेल्या एका अप्रतिम रहस्य कथेचा हा शेवट असल्याचे जाणवले. काही कथा लिहिताना लेखकाच्या सर्जनशीलतेची कसोटी लागते. तशीच ही कादंबरी होय. शिरवळकरांच्या अनेक उत्तम कलाकृतीपैकी समांतर ही सुद्धा एक कलाकृती आहे. भय आणि रहस्य या दोन्ही प्रकारात मोडणारी ही दीर्घ कथा आहे. यापूर्वीही अनेकांनी समांतर वेबसीरिज आणि पुस्तक वाचले असावे. परंतु अर्धी वेबसिरिज आणि अर्धे पुस्तक असा प्रयोग करणारा आणखी कोणी आहे का? असाही प्रश्न मला विचारावासा वाटतो.
दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी केलेले दिग्दर्शन अप्रतिम आहे. परंतु वेब सिरीज म्हटलं की, गलिच्छ शिव्यांचा भडिमार करायचा आणि किसिंग सीनचा अंतर्भाव करायचा, हे कदाचित दिग्दर्शकाने आधीच मनोमन ठरवले असावे. तसा याचा कादंबरीशी काहीच संबंध नाही. शिवाय शिरवळकरांच्या या 'दुनियादारी'नंतरच्या या दुसऱ्या पुस्तकाचा नायकही स्वप्नील जोशी आहे, हे विशेष! स्वप्निल जोशी आणि नितीश भारद्वाज हे दोघे कदाचित दूरदर्शनवर अनेक वर्षांपूर्वी प्रसारित झालेल्या श्रीकृष्ण मालिकेनंतर पहिल्यांदाच एकत्रित आले असावेत. यातही त्यांनी एकमेकांशी जोडलेल्या भूमिका केलेल्या आहेत.
एकंदरीत काय, वेबसिरीज बघा किंवा कादंबरी वाचा, शिरवळकरांच्या कथेतील थरार आपल्याला रोमांचित करून सोडतो, हे मात्र नक्की!




Sunday, May 9, 2021

गुगल आणि मराठी भाग २/१० (गुगल इनपुट टूल्स)

संगणकामध्ये युनिकोड पद्धतीचा वापर सुरू झाल्यानंतर जगातील सर्व प्रमुख भाषा आपल्याला यामध्ये वापरता यायला लागल्या. शिवाय अनेक भाषांची लिपी एकच असल्यामुळे केवळ लिपीचा अंतर्भाव केल्यानंतर अनेक भाषा आज संगणकामध्ये व्यवस्थित लिहिता येतात. मराठीसाठी वापरण्यात येणारी देवनागरी लिपी देखील आपण संगणकात सहज पद्धतीने लिहू शकतो. एकेकाळी इंग्रजी वगळता अन्य भाषा संगणकात वापरायच्या असल्यास विविध प्रकारच्या फॉन्टचा वापर केला जायचा. मराठी भाषेमध्ये "शिवाजी" तसेच आज वापरण्यात येणाऱ्या "श्रीलीपी" व "कृतीदेव" या फॉन्टचा अनेक जण वापर करतात. परंतु आज युनिकोडच्या सुलभतेमुळे कोणीही माणूस संगणकामध्ये आपल्या भाषेत टाईप करू शकतो. तसेच विविध प्रकारच्या फाइल्समध्ये माहिती साठवूही शकतो. त्याकरिता कोणत्याही फॉन्टची अथवा विशिष्ट प्रकारच्या किबोर्ड लेआऊटची गरज नाही.
गुगलने इंग्रजीसह अन्य भाषांमध्ये सहज टाईप करता यावेत याकरिता ऑनलाइन इनपुट टूल्स असलेला एडिटर बनवलेला आहे. खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही तो पाहू शकता.

https://www.google.com/inputtools/try

 


जिथे इंग्लिश असे लिहिले आहे, त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला छायाचित्र क्रमांक दोन प्रमाणे सर्व भाषांची नावे दिसून येतील. 
 

 
जगभरातील जवळपास १३० भाषांमध्ये या एडिटरद्वारे आपल्याला लिहिता येते. लक्षात ठेवा की, हा कोणत्याही प्रकारचा फॉन्ट नाही. इथे लिहिलेली माहिती तुम्ही जगात कोणत्याही संगणकावर व कोणत्याही सॉफ्टवेअरवर तसेच ऑपरेटिंग सिस्टिमवर जशीच्या तशी वापरू शकता! हे युनिकोड चे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. भाषांच्या नावांमधून मराठीवर क्लिक केल्यास तुम्हाला एडिटरमध्ये थेट मराठी मध्ये टाईप करता येऊ शकेल. कोणत्याही मराठीत शब्दाचे इंग्रजी स्पेलिंग टाईप करायला सुरुवात करा. लगेचच एका पॉपडाऊन विंडोमध्ये छायाचित्र क्रमांक ३ मध्ये दाखविल्याप्रमाणे सूचना तुम्हाला दिसून येतील. 
 

 
जेव्हा तुम्ही स्पेस टाइप कराल, त्यावेळेस तुम्ही मराठीत इंग्रजीत टाईप केलेला शब्द मराठी मध्ये उमटेल. यासाठी कोणत्या मराठी उच्चाराला इंग्रजीत कोणते अक्षर वापरले जाते? याची माहिती असणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ, 'क्ष' टाईप करायचे असल्यास ksh तसेच 'त्र' टाईप करायचे असल्यास tra अशा कि-बोर्डवरील अक्षरांचा वापर करावा. सातत्यपूर्ण सरावाने तुम्ही वेगाने मराठीमध्ये टाईप करू शकाल. इथे टाईप केलेली माहिती कॉपी करून तुम्ही कुठेही जशीच्या तशी वापरू शकता.
एखादा मराठी लेख लिहिण्यासाठी या पद्धतीचा सहज पद्धतीने अवलंब करता येऊ शकतो. 'मराठी' जिथे लिहिले आहे, त्या समोर एक 'म' अक्षर दिसून येईल, त्यावर एकदा क्लिक केल्यास. मराठी भाषा बंद होऊन तुम्ही इंग्रजीमध्ये टाईप करू शकता. छायाचित्र क्रमांक ४ मध्ये दाखविल्याप्रमाणे 'म' अक्षराच्या समोर असलेल्या त्रिकोनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला चार पर्याय दिसून येतील. 
 

 
यातील दुसऱ्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्ही चित्र क्रमांक ५ सारखी विंडो तुम्हाला दिसून येईल. 
 

 
या व्हाईटबोर्डचा वापर करून तुम्ही माऊसच्या सहाय्याने मराठी अक्षर लिहू शकता व 'एंटर' केल्यानंतर ते अक्षर देवनागरी लिपीमध्ये तुम्हाला एडिटरवर उमटलेले दिसेल. शिवाय चित्र क्रमांक पाच मध्ये दाखविल्याप्रमाणे सदर अक्षराशी मिळतेजुळते दुसरे अक्षर देखील तुम्ही निवडू शकता! चित्र क्रमांक चार मध्ये दाखविल्याप्रमाणे तिसरा पर्याय आहे अर्थात देवनागरी (फोनेटिक) निवडल्यानंतर तुम्ही थेट इंग्रजी अक्षरांचा वापर करून मराठीमध्ये टाईप करू शकता. यासाठी चित्र क्रमांक सहा तपासून पहा. या पद्धतीने टाईप करायचे असल्यास थोडा वेगळ्या पद्धतीच्या कीबोर्डचा वापर करावा लागतो. उदाहरणार्थ, 'आ' चा उच्चार लिहिण्यासाठी दोन वेळा a टाईप करावे लागेल. तसेच पहिल्या उकारासाठी u हे अक्षर तर दुसऱ्या ऊकारासाठी U चा वापर होतो. चौथी पर्याय अर्थात देवनागरी (इनस्क्रिप्ट) हा उपलब्ध असला तरी तो फारसा उपयोगाचा नाही.
चला तर मग सुरु करा मराठीमध्ये लिहायला... गुगल इनपुट टूल्सद्वारे!

Saturday, May 8, 2021

चमचाभर जिंदगी, थोडी आंबट बरीचशी गोड, लेखक: रवी वाळेकर

पुस्तक_परीक्षण
📖 चमचाभर जिंदगी, थोडी आंबट बरीचशी गोड
✍️ रवी वाळेकर
📚 शिवसमर्थ सेवा प्रकाशन

बऱ्याच दिवसांपासून काहीतरी हलकाफुलकं वाचावं म्हणून पुस्तके शोधत होतो. त्यातच हे पुस्तक हाती लागलं. रवी वाळेकर हे यापूर्वी त्यांनी लिहिलेल्या कंबोडायन आणि इंडोनेशियायन या प्रवास वर्णनांनी मराठी साहित्य विश्वात प्रकाश झोतात आलेले, नव्या दमाचे आणि आगळ्या शैलीचे लेखक होय. त्यांच्या जीवनातील विविध घटनांचा मागोवा त्यांनी या पुस्तकामध्ये घेतलेला आहे. एकंदरीत या सर्व घटनांवरून त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन लक्षात येतो आणि तो निश्चितच सकारात्मक दृष्टीचा आहे. त्यांच्या जीवनातील हे अनुभव केवळ आंबट आणि गोड नसून अन्य चवींचे देखील आहेत, असं ध्यानात येतं. अनेक घटनांमधून ते माणसाला ओळखू पाहतात. त्याच्या मनाचा ठाव घेऊ पाहतात. शिवाय साध्या आणि सरळ भाषेमध्ये त्याचं वर्णनही करतात. अन्य काही लेखकांप्रमाणे त्यांनी मराठीतले अवजड आणि बोजड शब्द न वापरता या पुस्तकाचे लेखन केले आहे. मुंबईतील त्यांचे अनेक अनुभव संवेदनशील मुंबईकरांनाही आले असतील. परंतु त्यांचा दृष्टिकोन कदाचित वेगळा असेल. वाळेकर म्हणतात की, हे जग सुंदर आहे फक्त आपला दृष्टिकोन तसा ठेवायला हवा. त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग मनाला भावून जातात. शिवाय त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची देखील ओळख होते. रतन टाटांविषयी लिहिलेला त्यांचा अनुभव हा खूप सुंदर आहे. बहुतांश भारतीयांना ज्ञात असणारे रतन टाटा लेखकालाही तसेच जाणवतात. एखादा व्यक्ती महान किंवा होतो? या प्रश्नाचे उत्तरही आपल्याला सहज मिळून जाते. शेवटी काय...  या पृथ्वीवर काही काळासाठी राहण्याकरता आलेले आपण सर्व पाहुणे आहोत. जीवनाचा आनंद ज्याने त्याने आपापल्या पद्धतीने घ्यायचा असतो आणि जिंदगीतल्या आंबट आणि गोड प्रसंगांना सोबत घेऊन जायचं असतं, हाच या पुस्तकाचा सारांश!



Wednesday, May 5, 2021

चित्रपट: साईना

चार वर्षांपूर्वी जेव्हा साईना नेहवालच्या जीवनावर चित्रपट बनण्याची घोषणा झाली होती, तेव्हापासूनच या चित्रपटाबद्दल उत्सुकता तर होतीच. अखेरीस मागील वर्षी प्रदर्शित होणारा हा चित्रपट लॉकडाऊनमुळे अमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाला. मागील काही वर्षांमध्ये भारतातल्या मोठ्या क्रीडापटुंवर चित्रपट निघाले आहेत. हाही त्याच शृंखलेतील एक चित्रपट होय. कदाचित बॅडमिंटनवर आधारित असलेला हा पहिलाच चित्रपट असावा. भारतामध्ये बॅडमिंटन या खेळाला फारसे वलय नाहीये. त्यातल्या त्यात महिला बॅडमिंटन क्षेत्रात तर काहीच नव्हतं. परंतु मागच्या काही वर्षांपासून साईना नेहवालने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय बॅडमिंटनला विशेषत: महिला बॅडमिंटनला उच्च स्थानावर नेऊन ठेवलं होतं. तिचीच ही कहाणी होय.
प्रकाश पदुकोण आणि पुलेला गोपीचंद यांच्या व्यतिरिक्त भारतात बॅडमिंटन खेळाडू फारसे नावाजलेले नव्हते. परंतु आज आपण अनेक खेळाडूंची नावे ऐकत असतो. याला काही अर्थाने साईना नेहवाल कारणीभूत होती, असं म्हणावं लागेल. हरियाणाच्या एका निमशहरी भागातून हैदराबादमध्ये आलेली ही मुलगी होय. तिचे आईवडील दोघेही बॅडमिंटन खेळाडू होते. परंतु विशेषतः आईच्या प्रयत्नांनी ती या क्षेत्रात दाखल झाली. हळूहळू घरातला इतरांचीही तिला साथ लाभत गेली. हैदराबाद मधील लाल बहादूर शास्त्री स्टेडियम मधून सुरू झालेला हा प्रवास जगातील नंबर वन बॅडमिंटन खेळाडू होण्यापर्यंत अविरत चालू होता. या प्रवासामध्ये तिला अनेकांची साथ लाभली. अनेकांचे बहुमुल्य मार्गदर्शन मिळाले. बऱ्याचदा तिचा मार्गही चुकला. ती ठेचाळत होती. पण पुन्हा ती ध्येयाच्या दिशेने चालू लागली. अशी साईनाची कहाणी दिग्दर्शक अमोल गुप्ते यांनी या चित्रपटात चितारलेली आहे. अन्य चित्रपटांप्रमाणेच नाटकीयरित्या काही प्रसंग सादर केले गेले आहेतच. त्यामुळे डॉक्युमेंटरी न पाहता चित्रपट पाहण्याचा फील येतो. परंतु, कधीकधी दिग्दर्शकाचे प्रयत्न कमी पडत आहेत, असंही जाणवतं. बऱ्याचदा चित्रपट संथ गतीने चालला आहेत, असेही वाटू लागतं. साईनाची भूमिका केलेल्या परिणीती चोप्रा हिने चांगली मेहनत घेतली असल्याचे दिसतं. कदाचित याहीपेक्षा चांगली भूमिका ती करू शकली असती, असं वाटून जातं. एकंदरीतच महिला क्रीडापटूंना प्रेरणा देणारा हा प्रवास आहे. किमान एकदा तरी बघायलाच हवा.

 


Tuesday, May 4, 2021

ऑनलाइन तंत्रशिक्षणाकडे

अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालये कोवीड-१९ च्या प्रभावामुळे प्रादुर्भावामुळे लवकर उघडणार नाहीत, हे ध्यानात घेऊन या एआयसीटीई अर्थात अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने त्यांचे सर्व प्रशिक्षण कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने राबवण्यास सुरुवात केली होती. एआयसीटीई च्या अटल अकॅडमी अर्थात एआयसीटीई ट्रेनिंग अँड लर्निंग अकॅडमीने भारतभर अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयांमध्ये विविध प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम राबवले. डिसेंबर २०२० ते मार्च २०२१ या कालावधीतील पंधरा आठवड्यांमध्ये सदर कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने विविध महाविद्यालयांमध्ये आयोजित करण्यात आले होते. यातील बहुतांश प्रशिक्षण कार्यक्रम हे कार्यशाळा पद्धतीने विशेषत: संगणक अभियांत्रिकीशी निगडित होते. भारतातील कोणीही व्यक्ती या कार्यशाळांमध्ये सहभाग घेऊ शकत होता. अगदी औद्योगिक क्षेत्रातील लोकांनाही एआयसीटीईने या कार्यशाळांमध्ये सहभाग घेण्याची परवानगी दिली होती. भारतातल्या विविध राज्यांमधील महाविद्यालयात होणारे व झालेले हे प्रशिक्षण कार्यक्रम गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आणि झूम सारख्या वेब कॉन्फरन्सिंग एप्लीकेशनद्वारे पार पडले. एका कार्यशाळेत अधिकाधिक दोनशे जणांना सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली होती. शिवाय एका अकाऊंटद्वारे तुम्ही दोन ते जास्तीत जास्त चार कार्यशाळांमध्ये सहभागी होऊ शकत होता. त्यासाठी एआयसीटीईच्या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी गरजेची होती. ज्यात प्रामुख्याने ईमेल आयडी व व्हाट्सअँप क्रमांक तपासला जात होता. या पंधरा आठवड्यांमध्ये भारतातील विविध अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयांनी आयोजित केलेल्या बारा कार्यशाळा मी पूर्ण केल्या. प्रत्येक कार्यशाळेसाठी कमीत कमी ८०% उपस्थिती व अंतिम दिवशी ऑनलाइन घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये ६० टक्के गुण येणे गरजेचे होते. या बाराही कार्यशाळा मी ८० टक्के उपस्थिती व ६० टक्के गुणांची पूर्ती करून पूर्ण केल्या. खरतर एकाला केवळ चारच प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण करता येऊ शकत होते. परंतु तीन वेगवेगळ्या ईमेल आयडी व व्हाट्सअप क्रमांकाद्वारे मी त्यात माझा सहभाग नोंदवला. ज्यामुळे मला बारा कार्यशाळा पूर्ण करता आल्या! अत्याधुनिक तंत्रज्ञानाधारित यातील अनेक कार्यशाळा संपन्न झाल्या. डेटा सायन्स, मशीन लर्निंग, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, डीप लर्निंग, वर्चुअल रियालिटी, थ्रीडी प्रिंटिंग सारखे नवनवीन विषय या कार्यशाळांमध्ये हाताळण्यात आले होते. सदर विषयांवर मी यापूर्वीही सखोल अभ्यास केला आहे. परंतु दर कार्यशाळेमध्ये नवनवीन माहिती वेगवेगळ्या प्रकारे अभ्यासायला व शिकायला मिळाली. विशेष म्हणजे भारतातील विविध भागातील अनेक तज्ञांशी बोलायला व त्यांची शिकवण्याची पद्धती अभ्यासायला मिळाली. त्यातून एक वेगळ्या प्रकारचे शिक्षण प्राप्त झाले. अनुभवसंपन्नता आली. लॉकडाऊनचा व ई-लर्निंगचा हा एक प्रकारे फायदाच झाला, असे म्हणता येईल. एकंदरीत या अनुभवाचा पुढील वाटचालीसाठी निश्चितच उपयोग होईल, असे वाटते.
अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या या कार्यक्रमांविषयी काही गोष्ट नमूद कराव्याशा वाटतात. त्यांनी प्रत्येक कार्यशाळेसाठी २०० जणांसाठीच जागा राखीव करून ठेवल्या होत्या. त्यामुळे दोनशेपेक्षा अधिक प्रवेशिका आल्या असल्यास महाविद्यालये त्या सरळ रद्द करीत होते. परंतु वस्तुस्थिती अशी होती की, एकाही कार्यक्रमाला नोंदणी केलेल्या सहभागींपैकी १०० पेक्षा अधिक सहभागी प्रत्यक्ष उपस्थित राहत नव्हते. याचाच अर्थ असा की ज्यांना खरोखर प्रशिक्षण कार्यक्रम करायचे होते, त्यांचे नाव रद्द केले गेले असावे. अनेक महाविद्यालयांमध्ये ४०० ते ५०० जणांनी सहभाग नोंदवला होता. परंतु प्रत्यक्ष ८० ते १०० लोकांनीच या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. यावर तंत्रशिक्षण परिषदेने काहीतरी उपाय शोधायला हवा. शिवाय प्रत्येक प्रशिक्षण कार्यक्रम मोफत असल्यामुळे उपस्थितांचा निष्काळजीपणा अनेक ठिकाणी दिसून आला. अर्थात तंत्रशिक्षण परिषदेने अशा प्रकारचा कार्यक्रम पहिल्यांदाच राबविला असल्याने त्यात कदाचित या त्रुटी राहिल्या असतील. परंतु भविष्यात असे ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम अधिकाधिक लोकांपर्यंत कसे पोहोचवता येतील, याचा विचार निश्चितच करायला हवा.
बाकी काय ज्ञान मिळवण्यासाठी तुम्हाला पैसे द्यायचे नसतील तर ते नक्कीच मिळवा. त्याने त्याचे मूल्य कधीच कमी होत नाही. पुढील काही महिन्यांमध्ये तंत्रशिक्षण परिषदेकडून पुन्हा असे कार्यक्रम लवकरच राबविण्यात येणार आहेत. कदाचित यावेळी या कार्यक्रमांचे नियोजन अधिक उत्तमरित्या असेल. शिवाय अधिकाधिक तंत्रज्ञ व प्राध्यापक त्याचा लाभ घेऊ शकतील अशी आशा वाटते. 


 

Saturday, May 1, 2021

गुगल आणि मराठी भाग १

वीस वर्षांपूर्वी जेव्हा पहिल्यांदा इंटरनेट वापरायला सुरुवात केली त्यावेळेस इंटरनेटवर आपण सहजपणे मराठी वापरू शकतो, याची शक्यता ही मनात आली नव्हती. पण आजचा विचार केल्यास इंटरनेटवर मराठी आता आपण अगदी सहज व सोप्या पद्धतीने वापर करू शकतो. ही सर्व अद्ययावत आधुनिक तंत्रज्ञानाची किमया आहे. छायाचित्र क्रमांक १ वरील सर्वेक्षण पहा. 
 

२०२१ पर्यंत इंटरनेटवर मराठी भाषेचा वापर करणारे भारतात पाच लाखांपेक्षा वापरकर्ते आहेत! भारताचा उत्तर पट्टा हिंदी भाषिकांचा असल्यामुळे अर्थातच त्यांची संख्या अधिक आहे. शिवाय भारत सरकारच्या राज्यव्यवहाराची भाषा असल्यामुळे त्याचा फायदा ही हिंदी भाषेला झाला आहे. त्यामुळे हिंदी भाषा पहिल्या क्रमांकावर असल्याचे विशेष नाही. विशेष म्हणजे आपल्या भाषेचा सर्वाधिक स्वाभिमान बाळगणारे तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषिक मराठी भाषिकांच्या अजूनही मागे आहेत. शिवाय बंगाली व तमिळ या अन्य देशांच्या देखील राष्ट्रभाषा आहेत. त्यावर मात करून मराठी आज भारतातली इंटरनेटवरील दुसऱ्या क्रमांकाची भाषा ठरली, हे विशेष! त्याबद्दल मराठी इंटरनेट वापरकर्त्यांचं अभिनंदन करतो आणि आभारही मानतो.
आज पासून सुरू होणाऱ्या या लेखमालिकेद्वारे मराठीचा इंटरनेटवर आपण किती सहज व सुलभ वापर करू शकतो, याची माहिती घेणार आहोत. दहा लेखांच्या या लेखमालिकेचे नाव आहे, "गूगल मराठी" अर्थात गुगलच्या विविध साधनांद्वारे इंटरनेटवर आपण मराठी कशी समृद्ध करू शकतो, तसेच तिचा कशापद्धतीने सहज वापर करू शकतो? याचा आढावा घेणार आहोत. युनिकोडचा वापर वाढल्यापासून जगातील सर्वच भाषा संगणकावर स्थानापन्न झालेल्या आहेत. याचाच फायदा जगातील सर्व प्रमुख भाषिकांनी घेतला. यात मराठी भाषिक आजही कमी नाहीत. किंबहुना मराठी भाषेची प्रगती इंटरनेटवर अतिशय वेगाने होत आहेत. जे मराठी भाषिक अजूनही मराठीचा वापर इंटरनेटवर करू शकत नाही. त्यांच्यासाठी या लेखमालिकेचा निश्चितच फायदा होईल.
नैसर्गिक भाषा प्रक्रिया अर्थात नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंगचा वापर करून गुगलने अनेक सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आजही मराठी भाषिक अशा अनेक सुविधांपासून अनभिज्ञ आहेत. याच सुविधांचा वापर कसा व केव्हा करायचा, याचा आढावा आपण या लेखमालिकेमध्ये घेणार आहोत. आजच्या लेखामध्ये गुगल सर्च बाबत थोडं जाणून घेऊयात.
गुगल हे जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन आहे. अर्थात याचा वापर करून इंटरनेटवर असलेली कोणतीही माहिती आपण सहज शोधू शकतो. आज जगातील ९२% संगणक वापरकर्ते गुगलचा वापर करूनच माहितीचा शोध घेत असतात. ही माहिती शोधताना केवळ इंग्रजीचाच वापर करावा लागतो, असे नाही. गुगलने जगातील शेकडो भाषा गुगल सर्चमध्ये उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. त्याकरिता आपल्याला आपल्या गुगल अकाऊंट मधील ते प्रेफर्ड लैंग्वेज अर्थात प्राधान्य असलेली भाषा बदलावी लागेल. खालील लिंकवर क्लिक करा.

https://myaccount.google.com/language

तुमच्या गुगल अकाउंटसाठी असलेली भाषा अर्थात त्यास प्रेफर्ड लैंग्वेज तसेच ऑप्शनल लैंग्वेज आणि ऑदर लँग्वेज तुम्ही इथे बदलू शकता. ही भाषा बदलल्यावर तुम्हाला गुगलच्या सर्व सुविधा मराठीमध्ये वापरता येतील. यानंतर गुगलच्या फ्रंट पेज वर अर्थात मुख्य पानावर या सर्च बॉक्सच्या खाली तुम्हाला काही भारतीय भाषांची नावे दिसून येतील. तिथूनही तुम्ही तुमची भाषा बदलू शकता. सर्च बॉक्सच्या समोर चित्र क्रमांक २ मध्ये दाखविल्याप्रमाणे एक कीबोर्ड दिसून येईल. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला देवनागरी फोनेटिक कीबोर्ड स्क्रीनवर पॉप अप होईल. त्याचा वापर करण्याची आवश्यकता नाही. 
 

आता केवळ गुगलच्या सर्च बॉक्समध्ये इंग्रजी अक्षरांचा वापर करून मराठीमध्ये टाईप करा. याठिकाणी मराठीमध्ये अक्षरी उमटू लागतील. या सुविधेचा वापर करून तुम्ही थेट मराठीतून माहिती गुगलद्वारे शोधू शकता. 
 
 
चित्र क्रमांक ३ वर दाखविल्याप्रमाणे तुम्हाला गुगलमध्ये मराठी शब्दांचा वापर करून माहिती शोधता येईल. विशेष म्हणजे ज्या मराठी शब्दांचा वापर तुम्ही केला आहे, त्याचेच इंग्रजी समानार्थी शब्द देखील आपोआप गुगलमध्ये शोधले जातात! तुम्ही इंग्रजीमध्ये जरी एखादी गोष्ट शोधली तरी सर्च परिणामांच्या उजव्या बाजूला ती माहिती तुम्हाला मराठीत भाषांतरित करून आलेली दिसेल. भाषा प्राधान्यक्रम बदलल्यानंतरच ही माहिती तुम्हाला मराठीमध्ये दिसते. यासाठी छायाचित्र क्रमांक ४ पहा. 
 

या पद्धतीचा अवलंब करून कोणतीही माहिती तुम्ही थेट मराठी मधून शोधू शकता.
धन्यवाद.
#गूगल #मराठी #गूगल_सर्च
क्रमशः...