पुणे ग्रँड टूर २०२६ ही आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांसह आजूबाजूच्या अनेक तालुक्यांमधून या स्पर्धेचा मार्ग होता. यावर्षी पहिल्यांदाच पुण्यामध्ये ही शहर ही स्पर्धा आयोजित केली असल्यामुळे पुणेकरांचा उत्साह काही वेगळाच होता. समाजमाध्यमांवरील अनेक पोस्टद्वारे ही स्पर्धा बहुतांश लोकांपर्यंत पोहोचली. शिवाय ज्या मार्गाने सायकलपटू जात होते त्याच्या दोन्ही बाजूंना ही स्पर्धा पाण्यासाठी तसेच सायकलपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी पुणेकरांची बरीच मोठी गर्दी पाहायला मिळाली. अगदी ग्रामीण भागामध्ये देखील नागरिकांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता.
मलासुद्धा काही सेकंद का होईना हा अनुभव घेता आला. आज अखेरच्या दिवशी स्पर्धेला सुरुवात झाल्यानंतर केवळ दहाच मिनिटांमध्ये सायकलपटुंचा जत्था पाषाण रोडवरून पुणे विद्यापीठाच्या दिशेने गेला. यावेळी नेहमीच ओस पडलेल्या भागावर देखील मोठ्या प्रमाणात नागरिक गर्दी करून होते. सायकलपटूंना प्रोत्साहन देत होते. आणि विशेष म्हणजे या एकंदरीत क्रीडासणाचा आनंद देखील घेत होते. एका अर्थाने आपल्या शहरातील नागरिक सुजाण आहेत अशी प्रतिमा परदेशी सायकलपटूंसमोर तयार झाली असावी, यात वाद नाही.
जेव्हा अशा आंतरराष्ट्रीय स्पर्धा शहरांमध्ये होतात त्यावेळेस त्यातून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या असतात. सायकलिंग हा प्रकार आपल्यासाठी नवीन नाही. परंतु त्याला कोणी फारसे गांभीर्याने देखील घेत नाही. या निमित्ताने का होईना सर्वसामान्य नागरिकांना या क्रीडा प्रकारातले वेगळेपण निश्चितच दिसून आले असावे. शिवाय क्रीडापटूंची मेहनत, कणखरता, सातत्य यांचा देखील अनुमान आला असावा, अशी आशा वाटते.
--- तुषार भ. कुटे
Friday, January 23, 2026
पुणे ग्रँड टूर २०२६
आजि मी स्वच्छ शहरे पाहिली!
आज पुणे ग्रँड टूर स्पर्धेचा शेवटचा दिवस. आणि पुण्यातले रस्ते बंद करण्याचा पण.... याचं वेळापत्रक कालच आलं होतं. सकाळी नऊ वाजल्यापासूनच पिंपरी चिंचवड आणि पुण्यातले बरेचसे रस्ते बंद होणार होते. त्यामुळे जोखीम नको म्हणून सकाळी साडेसात वाजताच बाईक घेऊन मार्गस्थ झालो.
मागच्या काही दिवसांपासून या स्पर्धेच्या तयारीची क्षणचित्रे शहरांमधल्या रस्त्यांवरून अनुभवत होतो. आज ती पूर्णतः पाहायला मिळाली. देहू-आळंदी रस्ता पार करून स्पाईन रोडला लागलो. गेली कित्येक वर्षांपासून पहिल्यांदाच हा रस्ता छान नटलेला दिसत होता. रस्त्यावर कुठेही घाण नाही. अगदी रस्त्यांच्या झाडांचा पालापाचोळा देखील पडलेला नव्हता. सकाळी सकाळीच स्वच्छता कर्मचारी तो साफ करत होते. थोड्याच वेळात भोसरी एमआयडीसी मधून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याला लागलो. एमआयडीसीतल्या कंपन्यांमधून येणाऱ्या धुराचा आणि केमिकलचा वास घेत टाटा मोटर्सच्या रस्त्यावर पोहोचलो. आज या रस्त्यावर गाडी चालवण्याची अनुभूती काहीतरी वेगळीच होती. काळे कुळकळीत आणि सपाट गुळगुळीत रस्त्यांवरून सुसाट वेगाने गाडी चालवू लागलो. दुभाजक चक्क पाण्याने धुऊन काढलेले होते! त्यांच्यावर काळ्या पिवळ्या रंगाचे पट्टे देखील मारले होते. मागच्या तीन-चार दिवसांपासून सातत्याने पाणी पिऊन दुभाजकावर लावलेली झाडे सुंदर टवटवीत दिसू लागली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना सफाई कर्मचारी अजूनही कचरा झाडून घेत होते. कुठेही कोणत्या प्रकारचे अतिक्रमण नाही. सकाळी सकाळी पादचारी देखील पदपथाचा अर्थात फुटपाथचा वापर करत होते. रोज रस्त्याच्या कडेला दिसणाऱ्या गाड्या आज तिथे पार्क केलेल्या नव्हत्या. रस्त्याकडेच्या बांधकाम विभागाच्या सर्व फलकांवर पुणे ग्रँड टूरचा शुभंकर आणि बोधचिन्ह लावलेले होते. रस्ता इतका गुळगुळीत की सायकल स्वाराच्या बाटलीतील पाणीदेखील हलणार नाही. इतके दिवस सायकल चालवतोय पण अशा रस्त्यांवर सायकल चालवण्याची संधी कधीच मिळाली नाही, याची मात्र वाईट वाटले.
झोपडपट्टीची वस्ती असलेल्या ठिकाणी पूर्ण रस्त्याला पांढरे कापड लावलेले होते. गरिबी मिटवण्याऐवजी ती झाकण्यास सोपे असते, हेही या निमित्ताने स्पष्ट झाले. थोड्याच वेळात पुन्हा एमआयडीसीमध्ये घुसलो आणि रस्त्यांची श्रीमंती गरिबीमध्ये बदलून गेली. पुणे-नाशिक महामार्गावर तीच वर्दळ चालू होती. इथला कचरा तसाच होता. पालापाचोळा कित्येक दिवसांपासून तसाच रस्त्याच्या कडेला पडलेला होता. आजूबाजूची वाहनेच त्याची हालचाल करवत होती.
नाशिक फाट्यावरून दापोडी आणि पुढे नदी ओलांडून बोपोडीच्या पुलाखालून पुणे विद्यापीठाच्या दिशेला लागलो. नदीच्या काठावर इथे येणारी दुर्गंधी तशीच होती. कदाचित सायकलस्वारांची वारी या रस्त्याने जात नसावी, हे समजले. अनाधिकृत फलकमुक्त झालेल्या पिंपरी-चिंचवड मधून पुणे मनपा हद्दीमध्ये पोचल्यावर नवनियुक्त नगरसेवकांच्या अभिनंदनचे भलेमोठे फलक पुन्हा दृष्टीस पडले. कदाचित हा देखील सायकल स्वारीचा मार्ग नव्हता. मग स्पायसर चौक, ब्रेमेन चौक करत पुणे विद्यापीठ रस्त्याला लागलो. आणि पुणे महानगरपालिका सफाई कर्मचाऱ्यांची लगबग दिसायला लागली. आजूबाजूच्या भिंती छानपणे रंगवलेल्या त्यावर पुन्हा बोधचिन्ह आणि शुभंकर...! रस्त्यावर रोज मुक्तपणे संचार करणारी आणि एकमेकांवर सतत कुरघोडी करत भुंकणारी भटकी कुत्री आज एका कोपऱ्यामध्ये घोळका करून उत्सुकतेने पाहत होती. आज त्यांना कदाचित मारून मुटकून एका जागेवर बसवले असावे! आज कोणता सण आहे की काय? याची उत्सुकता त्यांच्या डोळ्यात देखील दिसत होती. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे रस्ते देखील तसेच काळे कुळकुळीत आणि सपाट गुळगुळीत....
पाषाण रोडवर रस्त्याला मारलेले पांढरे पट्टे अतिशय उठून दिसत होते. आज पहिल्यांदाच लक्षात आले की हा रस्ता तब्बल चार पदरी आहे! इथल्या ही दोन्ही बाजूंना भिंतीवर रंगवलेले शुभंकर आणि बोधचिन्ह पुन्हा मिरवत होते. मागच्या बऱ्याच वर्षांपासून पाहत आलेले फळविक्रेते त्यांच्या अतिक्रमण केलेल्या फुटपाथवर दोन दिवसांपासून नव्हते. ती जागा अतिशय स्वच्छ आणि रंगवलेली दिसली....
इच्छितस्थळी पोहोचलो तेव्हा या सर्वांचा विचार केला. आपल्याकडच्या प्रशासन प्रणाली सर्वकाही करू शकतात. शहरे स्वच्छ ठेवता येतात. अतिक्रमण मुक्त करता येतात. सर्वकाही शिस्तबद्ध चालवता येऊ शकतं. शहरी जीवनमान वाहतूक सुसह्य करता येऊ शकते. पण प्रशासन ते करत नाही. जेव्हा गरज असेलच तेव्हाच ही यंत्रणा पूर्ण शक्तीनिशी कार्यरत होते. एकदा सर्वकाही संपलं की पुन्हा जैसे थे!
--- तुषार भ. कुटे
Friday, December 29, 2023
एका मॅरेथॉनची गोष्ट!
२७ नोव्हेंबर २०२२… एका वर्षापूर्वी बजाज एलियान्झ पुणे हाफ-मॅरेथॉनचे
आयोजन बालेवाडीच्या शिवछत्रपती क्रीडा संकुलापासून करण्यात आले होते. मी
प्रत्यक्ष पाहिलेली ही पहिलीच मॅरेथॉन होती.
सकाळी सातच्या दरम्यान
आम्ही बालेवाडीच्या चौकात पोहोचलो. गाड्या पुढे नेण्यासाठी बंदी असल्यामुळे
बालेवाडी पीएमटी डेपोच्या समोरच एका ठिकाणी गाडी पार्क केली. मॅरेथॉन
संपायला बराच वेळ होता. म्हणून तिथेच बसून राहिलो. परंतु गाड्यांची गर्दी
वाढत गेल्याने पार्किंगमधून गाडी काढता येईल की नाही अशी शंका आल्याने मी
स्वतःच गाडी बाहेर काढून बायपासच्या पुढच्या चौकातून महाळुंगेच्या दिशेने
निघालो. एका ठिकाणी गाडी पार्क करायला जागा मिळाली. तिथे गाडी लावून
बालेवाडीच्या मुख्य चौकाकडे चालत आलो.
एव्हाना प्रत्यक्ष मॅरेथॉन चालू
झालेली होती. खरंतर पाच किमी, दहा किलोमीटर आणि २१ किलोमीटरच्या मॅरेथॉन
केव्हाच सुरू झाल्या होत्या आणि संपल्या देखील होत्या. आता फक्त तीन
किलोमीटरची अर्थात हौशी लोकांची मॅरेथॉन चालू होती. बायपासपाशी असलेल्या
बालेवाडीच्या त्या चौकामध्ये मॅरेथॉनसाठी पोलिसांनी बॅरिकेट्स लावून विशेष
रस्ता तयार केला होता. त्याच्या पलीकडून शेकडो लोक या मॅरेथॉनमध्ये धावताना
दिसले. कित्येक जण तर केवळ चालतच होते! आयोजकांनी दिलेले शर्ट घालून मस्त
मौजमजा करत फिरत चालले होते. अनेक जण कदाचित वर्षातून एकदाच अशा कुठल्यातरी
इव्हेंटमध्ये भाग घेऊन आपली ‘हेल्थ’विषयी असणारी काळजी दाखवत ‘स्टेटस
मेंटेन’ करत असावेत, असे दिसले. शरीरात कदाचित मधुमेह, रक्तदाब, शर्करा
सारखे आजार असणारे देखील यामध्ये असावेत, असं एकंदरीत त्यांच्या रूपावरून
दिसून आलं. मॅरेथॉन अशी असते होय? असा प्रश्न मला पडला. हौशी लोकांना तीन
किलोमीटरची मॅरेथॉन पूर्ण करायला कदाचित पाहून ते एक तास तरी लागला असावा.
मी मात्र शरीराने त्यांच्या मनाने बऱ्यापैकी किरकोळ होतो. जवळपास एक तास मी
त्या गर्दीचे निरीक्षण करत होतो. मनात विचार आला की, आपणही अशा
मॅरेथॉनमध्ये भाग घेऊ शकतो का? अर्ध-मॅरेथॉन असल्यामुळे सर्वाधिक अंतर २१
किलोमीटरचे होते. मी इतरांच्या तुलनेत मला बऱ्यापैकी फिट समजत होतो!
म्हणूनच याच मॅरेथॉन मध्ये पुढच्या वर्षी २१ किलोमीटर मध्ये भाग घेऊन ती
पूर्ण करून दाखवायची, असा चंग बांधला
आजवर सकाळी उठल्यानंतर मी फक्त
मॉर्निंग वॉक अर्थात केवळ चालण्यासाठीच जात होतो. अनेकदा हे अंतर चार ते
पाच किलोमीटरचे असायचे. चालणं हाही हा एक व्यायाम असला तरी तो केवळ वृद्ध
लोकांसाठीच पूरक असा आहे. खरंतर युवकांनी धावणे आणि सायकलिंग करायला हवी
असे म्हटले जाते.
मॅरेथॉनमध्ये भाग घेण्यासाठी आता तयारी करायची होती.
म्हणून मी दुसऱ्याच दिवसापासून पहिल्यांदाच सकाळी धावायला सुरुवात केली.
सुमारे १०० मीटर अंतर गेल्यावर मला बऱ्यापैकी धाप लागली होती. मी हळूहळू
चालू लागलो. छातीतली धडधड वाढत होती. कालांतराने ती कमी झाली. पुन्हा
पळायला लागलो… परत तीच परिस्थिती! एका किलोमीटर नंतर मला ध्यानात आले की
माझी पळण्याची क्षमता बऱ्यापैकी कमी झालेली आहे! त्यामुळे पहिल्याच दिवशी
मी मॅरेथॉन मधील अर्ध-मॅरेथॉन चे २१ किमीचे अंतर पूर्ण करू शकेल की नाही
याची मला शंका यायला लागली. तरीही दररोज थोडं थोडं धावणं चालू ठेवलं. १००
मीटर वरून थोड्याच दिवसांमध्ये मी सलग एक किलोमीटर धावायला लागलो! कधी कधी
पाय देखील दुखायचे, पण त्याकडे दुर्लक्ष करत माझा हा नित्यनियम चालू होता.
या कारणामुळे दिवसभर मला ताजतवानं देखील वाटायला लागलं. एक दिवस निश्चयाने
जोपर्यंत पूर्ण दम लागत नाही तोपर्यंत पळत राहायचं ठरवलं. जवळपास तीन
किलोमीटरची सलग धाव मी पूर्ण केली! त्या दिवशी एक महत्त्वाचा मैलाचा दगड
पार केलाय की काय, याची अनुभूती मला आली. आनंदाने मी ही गोष्ट घरी देखील
सांगितली होती. माझा हुरूप वाढायला लागला. हळूहळू मी दमनं विसरायला लागलो…
पाय मात्र नियमितपणे दुखायचे. कधीकधी पाय दुखायला लागल्यामुळेच धावायचे
थांबत होतो. काही दिवस तर कंबर आणि कधी पोट देखील दुखायचे. अशावेळी
धावण्याचा वेग कमी करायचो. पण धावणे थांबवले नाही. सोशल मीडियावरील एका
पोस्टमध्ये एका व्हर्चुअल मॅरेथॉन विषयी वाचले. त्यात सहभाग देखील घेतला.
त्यावेळी स्ट्राव्हा नावाच्या अँड्रॉइड एप्लीकेशन बद्दल समजले. आणि दररोजचे
धावणे रेकॉर्ड करण्यासाठी या अँड्रॉइड एप्लीकेशनचा वापर करायला लागलो.
त्याचा बऱ्यापैकी फायदा झाला. रोजची प्रगती कशी होत होती, याचा अंदाज यायला
लागला. दर दिवशी नवे ध्येय समोर ठेवायला लागलो. एव्हाना दररोजचे पाच
किलोमीटर धावणे ठरलेले होते. दररोजचा मार्ग देखील निश्चित होता. एकदा मनाशी
ठरवलं की, आज इतके किलोमीटर पळायचे आहे की आपोआपच जोश वाटायला लागायचा.
त्याच उर्जेने मी दररोज धावत होतो. गुगल फिट एप्लीकेशनमध्ये देखील सर्व
काही व्यवस्थित नोंदवले जात होते. एकेकाळी दिवसभरात केवळ ४० हार्ट पॉइंट्स
मिळवणारा मी दररोज शंभरी गाठायला लागलो! याच कारणास्तव वजन देखील कमी झाले
होते. शरीरातील स्थूलपणा जाऊन शरीर मध्यम पातळीवर स्थिर होऊ पाहत होते.
अशात भूक देखील वाढली होती. एका अर्थाने व्यायामाचे किंबहुना पळण्याचे
व्यसन लागायला लागले होते. अशातच आमच्या सौभाग्यवतींनी मला सायकल भेट दिली.
त्यामुळे सकाळच्या माझ्या या उद्योगामध्ये आणखी एका उद्योगाची भर पडली.
जेव्हा जेव्हा पाण्यामुळे पाय दुखायचे त्याच्या दुसऱ्या दिवशी मी सायकल
घेऊन फिरायला बाहेर पडत असू. आजूबाजूच्या बऱ्याच ठिकाणी तीस ते पन्नास
किलोमीटरचे फेरफटके मी या काळात मारले. यात अतिशय क्वचित असा खंड पडत होता.
एक दिवस मी सलग दहा किलोमीटरची धाव पूर्ण केली! पाय बऱ्यापैकी दुखत होते
पण मैलाचा आणखी एक दगड पूर्ण केल्याचे समाधान मात्र मिळाले. तोपर्यंत चार
ते पाच महिने झाले होते. जसजसे नवनवे मैलाचे दगड पूर्ण होत होते तसतसे
ध्येय जवळ येत असल्याची जाणीव होत होती. स्ट्रावामध्ये निरनिराळी ध्येय
समोर ठेवत होतो. आणि पूर्ण देखील करत होतो. ध्येयपूर्तीचा तो आनंदच निराळा
होता. एव्हाना मला माझ्या शारीरिक क्षमतेचा अंदाज यायला लागला होता.
पुन्हा काही महिन्यांमध्ये मी पंधरा किलोमीटरची धाव देखील पूर्ण केली!
त्यामुळे आत्मविश्वासाने पुढची पायरी गाठली होती. यावेळी मी लवकरच २१
किलोमीटरची धाव पूर्ण करेल याची खात्री वाटायला लागली. सप्टेंबर २०२३
पर्यंत तीन वेळा १५ किलोमीटरची धाव पूर्ण केली. आणि प्रत्येक वेळी आधीच्या
पेक्षा कमी वेळ गाठली होती. दरम्यान सायकलिंगचा प्रवास चालूच होता.
सकाळच्या धावण्याच्या आणि सायकलिंगच्या स्वतःसोबत चाललेल्या स्पर्धेमुळे एक
निराळीच ऊर्जा शरीरामध्ये तयार झाली होती. ऑक्टोबरमध्ये आजवरची सर्वात
लांबची धाव अर्थात १७ किलोमीटरची धाव पूर्ण केली. पाय मात्र दुखत होते.
त्यावर उपाय म्हणून डॉक्टरच्या सल्ल्याने विटामिन बी१२ च्या गोळ्या सुरू
केल्या. शाकाहारी लोकांमध्ये या जीवनसत्वाची कमतरता असल्याने पाय दुखतात,
असे त्यांनी सांगितले. माझ्या या सर्व कार्यक्रमात मी बाहेरून शरीरात
घेतलेले हे एकमेव ‘सप्लीमेंट’ होय. या पूर्ण प्रवासात मी एकाही प्रत्यक्ष
मॅरेथॉन अथवा सायक्लोथॉनमध्ये सहभाग घेतला नाही. ध्येय होते यावर्षीच्याच
पुणे हाफ-मॅरेथॉनमध्ये धावण्याचे. एका वर्षात स्वतःला ह्याच मॅरेथॉनसाठी
तयार करण्याचे होते. पण काही कारणास्तव मला यामध्ये सहभागच घेता आला नाही.
पण खात्री मात्र होती की मी २१ किलोमीटर नक्की पूर्ण करू शकलो असतो.
शंभर
मीटर वरून २१ किलोमीटरपर्यंतचा धावण्याचा हा प्रवास दहा महिन्यांमध्ये
झाला. ऊर्जेंची एक अद्वितीय अनुभूती २०२३ या वर्षांने मला दिली. एक अनोखी
वाट जोपासायची संधी देखील याच वर्षात मिळाली. कदाचित पुढील वर्षी नव
काहीतरी करता येईल, म्हणून हा प्रवास झाला असावा!
- तुषार भ. कुटे
Tuesday, March 28, 2023
चाकण भुईकोट सायकल स्वारी
सकाळी सहा वाजता उठलो तेव्हा वातावरणामध्ये धुकं कमी होतं. पण हळूहळू दहा
ते पंधरा मिनिटांमध्ये त्याची तीव्रता वाढायला लागली आणि सगळीकडे अस्पष्ट
दिसायला लागलं. इंद्रायणी नदीभोवती तयार झालेल्या या धुक्याच्या वातावरणात
नदीच्या काठाकाठाने मार्गक्रमण करणं तसं अवघड होतं. म्हणून आज नदी पार करून
कुठेतरी सायकल स्वारी करण्याचे ठरवले.
आमच्या घरापासून सगळ्यात जवळ
असणारा परंतु आजवर भेट न दिलेला किल्ला म्हणजे चाकणचा भुईकोट दुर्ग अर्थात
संग्रामदुर्ग होय. अंतर फक्त ११ किलोमीटर होतं. परंतु प्रवास होता
राष्ट्रीय महामार्गावरचा. सायकल काढली आणि पाचच मिनिटांमध्ये पुणे-नाशिक
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६० ला लागलो. मोशी टोलनाक्यापाशी मोठ्या
प्रमाणात धुकं दिसून येत होतं. या टोलनाक्याच्या पुढेच इंद्रायणी नदी आहे.
महामार्गावरील
नेहमीप्रमाणे गाड्यांची वर्दळ चालू होतीच. रस्त्याच्या पूर्ण डाव्या कडेने
मी सायकल हाकायला सुरुवात केली. महामार्गावरून वेगाने गाड्या घोंगावत जात
होत्या. तरीही धुके असल्यामुळे त्यांचा वेग काहीसा कमी असलेला दिसला. माझा
चढतीचा रस्ता होता त्यामुळे वेग फारसा पकडलेला नव्हताच. फक्त उलट्या दिशेने
समोरून येणाऱ्या वाहनांमुळेच अडचण व्हायची. बाकी रस्त्याच्या कडे कडेने
चालल्यावर तसा काही त्रास होत नव्हता. चाकण नगरपरिषदेच्या हद्दीपाशी
आल्यावर धुकं पूर्णतः संपलं होतं. आणि सर्विस रोड चालू झालेला होता.
सकाळच्या सूर्याची किरणे आता सर्वत्र दिसायला लागली होती. धुक्याचा
मागमूसही नव्हता. चाकण शहराचा मुख्य चौक जवळ येत होता. मला आता रस्ता पार
करून पलीकडच्या बाजूला जायचे होते. आज पहिल्यांदाच चाकणच्या उड्डाणपुलाचा
काय उपयोग आहे, हे समजले! कार चालकांसाठी तसे दोनही उड्डाणपूल हे
निरुपयोगीच आहेत. या पुलाच्या खालून मी पलीकडच्या दिशेने गेलो. मुख्य
बाजारपेठ अजूनही उघडलेली नव्हती. कदाचित ती सुरू झाल्यानंतर इथे बरीच मोठी
गर्दी होत असावी असं दिसून आलं.
चाकण शहरातील जिल्हा परिषद शाळा
क्रमांक एक आणि दोनच्या समोर बांधलेल्या एका कमानीतून आत गेलो. इथे समोरच
चाकणचा उध्वस्त भुईकोट किल्ला नजरेस पडला. महाराष्ट्रातील इतर भुईकोट
किल्ल्यांप्रमाणेच आज या एकेकाळ्याच्या पराक्रमी भुईकोट किल्ल्याची देखील
अवस्था झाली आहे. फारसे अवशेष शिल्लक राहिलेले नाहीत. त्यावर निव्वळ
दृष्टिक्षेप टाकला आणि परतीच्या वाटेने निघालो. येताना रस्ता जवळपास
उतरणीचाच होता. एकदा तर एका पीएमपी बसला देखील ओव्हरटेक करून आलो! ती बस
नंतर माझ्यापुढे गेलीच नाही!
इंद्रायणी नदीच्या जवळ आलो तोवर धुक्याची
तीव्रता बऱ्यापैकी कमी झालेली होती. आज पहिल्यांदाच पूर्ण प्रवास सतत
कानावर आढळणाऱ्या वाहनांच्या आवाजामध्येच गेला.. अंतर होतं 22 किलोमीटर!


