Tuesday, May 28, 2019

गौतमीपुत्र सातकर्णी: एक युद्धाळलेला चित्रपट

सुमारे 2 हजार वर्षांपूर्वी महाराष्ट्रावर साडेचारशे वर्षे राज्य करणारे साम्राज्य म्हणजे सातवाहन होय. सातवाहनांचा विसावा राजा गौतमीपुत्र सातकर्णी हा सर्वांत पराक्रमी राजा होता. सातवाहनांच्या साम्राज्याचा मोठा इतिहास जुन्नरला असल्यामुळे त्यांचे मोठे आकर्षण मला नेहमीच राहिले आहे. शिवाय इतिहासातला सातवाहन हाच माझा सर्वात आवडता विषय होता व आजही आहे. गौतमिपुत्रा बद्दल इतिहासात अनेक गोष्टी वाचल्या आहेत. याच गौतमीपुत्र सातकर्णी वर 2017 मध्ये एक तेलगू चित्रपट तयार झाला होता. हा चित्रपट बघण्याची संधी नुकतीच मला मिळाली त्याचेच हे विश्लेषण.
प्रथमत: चित्रपट बघताना माझे पूर्ण लक्ष फक्त ऐतिहासिक घटनांवर राहिले होते. त्यामुळे हा चित्रपट केवळ इतिहास आहे, इतकेच माझ्या डोक्यात राहिले. म्हणूनच केवळ इतिहास म्हणून या चित्रपटाची मीमांसा करायला मी सुरुवात केली. पहिली गोष्ट अशी की 58 वर्षांचा नंदमुरी बालकृष्ण हा बिलकूलच गौतमीपुत्र सातकर्णी म्हणून शोभत नाही! त्याची आई म्हणून दाखवलेली हेमामालिनी ही जवळपास त्याच वयाची दिसते. तरीही ही गोष्ट थोडीशी बाजूला ठेवूयात. गौतमीपुत्राने भारतातील अनेक छोटी छोटी राज्य एकत्रित करून सातवाहनांचे मोठे साम्राज्य बनवले होते. ही गोष्ट खरी आहे आणि चित्रपटात येथे चांगल्या पद्धतीने दाखवली आहे. कल्याणचे युद्ध जिंकून कल्याणचा राजा सातवाहनांचा मांडलिक होतो व गौतमीपुत्राशीच  नंतर तो दगा करतो. याला ऐतिहासिक आधार मात्र दिसलेला नाही. कल्याणचा राजा म्हणून दाखवलेला मिलिंद गुणाजीचे दर्शन सुखावणारे ठरते. याशिवाय सातकर्णीने स्वतःला 'गौतमीपुत्र' म्हणवून घेणे व स्वतःच्या मुलाला 'वासिष्ठीपुत्र पुलुमावी' हे नाव प्रदान करणे, हे संदर्भ अत्यंत योग्य आहेत. गौतमी बलश्रीची भूमिका हेमा मालिनीने चांगल्या पद्धतीने साकारली आहे. परंतु या भूमिकेला फारसा वाव दिसत नाही. सातवाहन इतिहासात नागनिकेनंतर गौतमी बलश्री ही सर्वात ताकदवान स्त्री होती. त्याचे प्रतिबिंब चित्रपटात दिसायला हवे होते. परंतु, ते तसे दिसत नाही. शिवाय महाराणी वशिष्ठीची भूमिकाही फारशी प्रभाव पाडत नाही. एकंदरीत चित्रपटाचा पूर्ण फोकस गौतमीपुत्र सातकर्णी याच नावावर आहे. 

चित्रपटाची सुरुवात होते कल्याणच्या युद्धाने. मध्यंतरात नहपणाविरुद्ध युद्ध होते आणि शेवट होतो तो दिमित्रीयस सोबतच या युद्धाने नहपणासोबतचे युद्ध इतिहासात सर्वात गाजलेले युद्ध होते. त्याची रंजकता फारशी जाणवत नाही. एकंदरीत दक्षिण भारतीय चित्रपट असल्यामुळे फिल्मी स्टाईल ची मारामारी आणि युद्ध या चित्रपटात ठासून भरलेली आहेत. चित्रपटातील एकूण 60 ते 70 टक्के भाग हा फक्त युद्ध आणि युद्धाचे व्यापलेला आहे. अखेरीस दिमित्रीयस यासोबतच युद्धही फिल्म पद्धतीने दाखवलेले आहे. सातकर्णीवर ग्रीक योद्धा अथेना विषप्रयोग करते व दुसऱ्या दिवशी तो दुपारी युद्धात फिल्मी स्टाईलने उठून परत सामील होतो. हे मात्र अतिरंजक वाटते. 'क्षहरात वन्स निर्वंश करत' असे वर्णन नाशिकच्या एका लेण्यांमध्ये गौतमीपुत्राच्या केले आहे. हे मात्र चित्रपटात उठून दिसते. हेही खरे आहे की, गौतमीपुत्राने ग्रीकांना हरवल्यानंतर कित्येक शतके भारतावर परकीय आक्रमण झाले नव्हते. त्याचे श्रेय सातवाहनांच्या राजाला द्यायलाच हवे.
सातवाहन मूळचे महाराष्ट्रातले असले तरी आंध्र वासियांनी ते आमचेच आहेत, असे दाखवले आहे. शिवाय इतिहासकारांनी हे सिद्ध केले आहे की, सातवाहनांची राजधानी पैठण या ठिकाणी होती. तरीही ती आंध्रप्रदेशातल्या अमरावती येथे दाखवण्यात आली आहे. शिवाय नहपानासोबतचे युद्ध महाराष्ट्र मध्ये नाशिक परिसरात झाले होते. ते सौराष्ट्रात दाखवण्यात आले आहे. या चित्रपटातल्या ऐतिहासिक चुका होत. सातवाहन हे बौद्ध धर्माचे उपासक होते व रक्षणकर्ते होते. त्यामुळे युद्धखोर म्हणून दाखवलेल्या गौतमिपुत्राला बौद्ध भिक्खूंच्या विरोध होता. परंतु त्याने बौद्ध भिक्खूंना दिलेले स्पष्टीकरण मात्र चुकीचे वाटते. एकंदरीत चित्रपटांचे दिग्दर्शन करण्यापूर्वी दिग्दर्शकाने इतिहासकारांची मदत घ्यायला हवी होती. नुसती युद्ध टाकून कोणताही चित्रपट यशस्वी होत नाही. इतिहासकार तर हा चित्रपट केराच्या टोपलीत फेकून देतील असाच आहे.

चित्रपट ह्या युट्युब लिंकवर पाहू शकता:  https://www.youtube.com/watch?v=FhlsfkfZO38

No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com