Tuesday, May 26, 2020

अक्कल

वडज-धामनखेल रस्त्याच्या एका नाक्यावर तिघेजण नेहमी गप्पा मारत बसलेले असतात. बऱ्याचदा तिथल्या वडाच्या पारावर ते मोठमोठ्या गप्पा मारताना दिसतात. ही मंडळी प्रामुख्याने वैज्ञानिक, इतिहास संशोधक, पर्यावरण तज्ञ, निसर्ग अभ्यासक, समाजसेवक, अर्थतज्ञ, स्थापत्य अभियंता सारख्या विविध व्यवसायांशी निगडित असावित असं त्यांच्या दैनंदिन चर्चेतून जाणवतं. एवढ्या विषयांचा गाढा अभ्यास असणारी मंडळी या देशात अगदी क्वचितच सापडतं असावीत! तरीही यांना वृत्तवाहिनीवरच्या एखाद्या चर्चासत्रात कोणी का बोलावत नाही? हा प्रश्न मला नेहमीच पडतो.
कोरोना साथ आल्यापासून लॉकडाऊनच्या काळातही त्यांच्या दैनंदिन चर्चासत्रांमध्ये खंड पडलेला नाही. परवाही ते विविध विषयांवर चर्चा करण्यात मग्न झाले होते. परंतु एकंदरीत अर्थशास्त्र या विषयांवर त्यांची त्या दिवशी जास्त चर्चा होत होती, असे दिसले.
"मोदी ने २० लाख करोडचे पॅकेज दिले म्हणे परवा", पहिला म्हणाला.
"वीस लाख की करोड? ते कळलं नाही पण!" - दुसरा
"वीस लाखाचे करोड की रे!" - तिसरा.
"म्हणजे विसावर किती शून्य?" -  दुसरा.
"आपण काय इथे शून्य मोजायला बसलोय?"  - पहिला.
"पण १३५ करोड लोकांपैकी कोणाच्या वाट्याला किती येतील?" -  दुसरा.
"पंधरा हजार येतील बघ!" - तिसरा.
"एवढं करण्यापेक्षा प्रत्येकाला एक एक करोड दिले असते तर १३५ कोटीमध्येच काम झालं असतं. नाही का?" - पहिला.
"व्हय की, मोदीला काय अक्कल नाही पण!" - तिसरा.
"आज रेशनचे पाच किलो तांदूळ मिळणार आहेत, माहितीये ना?"- दुसरा.
"अरं व्हय की, चल लवकर", असे म्हणत तिघे तिथून निघून गेले.

No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com