Friday, May 29, 2020

जॉगिंग

कांदळीतल्या एका छोटेखानी रस्त्यावर एका मजल्याचा बंगला आहे. आजकाल तिथे दोघे आजी-आजोबा राहतात. त्यांच्या दोन्ही मुलींची लग्न झाली आहेत. त्यामुळे सध्या निवृत्तीनंतर दोघेही गावीच आपल्या बंगल्यात मजेत आयुष्य घालवत आहेत.
दोन वर्षांपूर्वी पुण्यातून गावी येऊन स्थायिक झाले तरी आजोबांची फिट राहण्यासाठी दररोज सकाळी अर्धा तास चालण्याची सवय काही सुटलेली नव्हती. सुरुवातीला त्यांना कोणी सोबत नसायचे. कालांतराने मात्र त्यांनी दोन मित्र जमवले. ते मग त्यांना सकाळी सोबत असतात.
लॉकडाऊन झाल्यानंतर करोनाच्या या भीतीने दोन्ही मित्रांनी सकाळी बाहेर पडणे बंद केले. परंतु, आजोबांना काही चैन पडेना. त्यांचे रुटीन मात्र चालूच होते. सकाळी सात वाजता घरातून निघून पुढे चालत लिंबामाथ्यापर्यंत येत. मग तिथून हायवेच्या कडेकडेने एमआयडीसी रोडने पुन्हा आत जात. यात त्यांना जवळपास अर्धा तास लागायचा. बरोबर साडेसात वाजता ते पुन्हा घरी परतत असत. त्यावेळेस आजींनी चहा बनवून ठेवलेला असायचा.
आज मात्र आजोबा केवळ वीस मिनिटात अर्थात दहा मिनिटे लवकरच घरी पोहोचले होते.
"अगं चहा झाला नाही का अजून", त्यांनी आल्या आल्या फर्मावले.
त्या आवाजाने आजीबाई बाहेर आल्या व आश्चर्याने आजोबांकडे पाहू लागल्या.
"चहा कसा होईल....? पण तुम्ही इतक्या लवकर कसे आलात?"
"अगं कोकाटेंचा विकास भेटला होता रस्त्यात. तो म्हटला, काका चला तुम्हाला घरी सोडतो. मग आलो त्याच्या बाईकवर बसून. म्हटलं आजचा वेळही वाचेल."
त्यांचं बोलणं ऐकून आजींनी कपाळाला हात लावला.
"अहो एवढा वेळ वाचवायचा तर घराच्या बाहेर तरी कशाला पडता?", असं बोलून त्या परत स्वयंपाक घरात निघून गेल्या. आजोबा मात्र आजीच्या प्रश्नावर गहन विचार करू लागले.


No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com