Showing posts with label comedy. Show all posts
Showing posts with label comedy. Show all posts

Tuesday, April 11, 2023

अशोक सराफ

काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमामध्ये मला प्रश्न विचारला होता की, तुमचे आवडते कलाकार कोण? मी तात्काळ उत्तर दिले...  अशोक सराफ. केवळ मीच नाही तर महाराष्ट्रातील करोडो लोकांचे ते आवडते कलाकार आहेत!
झी गौरव सोहळ्यामध्ये जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याचा व्हिडिओ संपूर्ण समाजमाध्यमांवर व्हायरल झाला होता. त्यानिमित्ताने अशोक सराफ यांच्याबद्दल थोडं लिहावंसं वाटलं. आजवर अनेक मराठी चित्रपट पाहिले पण अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे आणि निळू फुले यांच्या बरोबरीचा अभिनय करू शकेल असा अन्य कोणताही अभिनेता दिसला नाही. अशोक सराफ यांची गोष्टच पूर्णपणे वेगळी आहे. अतिशय सहज आणि नैसर्गिक अभिनयाचे ते विद्यापीठ आहेत. त्यांनी अभिनय केलेला कोणताही चित्रपट असो कधीच कंटाळवाणा वाटत नाही. किंबहुना त्यांचे चित्रपट कित्येकदा पाहिले तरीही त्यातली मजा कमी होत नाही. महाराष्ट्रातील असंख्य मराठी चित्रपट प्रेमींची कदाचित हीच भावना असावी. विनोद करावा तो अशोक सराफ यांनीच!
आजकालचे काही अभिनेते किळसवाणे विनोद करून हास्य निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. ते पाहून अशोक सराफ यांचा अभिनय किती उच्च दर्जाचा होता, याची कल्पना येते. बऱ्याचदा अगदी खळखळून हसायचं वाटल्यास अशोक सराफ यांचे चित्रपट आम्ही पाहतो. मराठी चित्रपट आणि अशोक सराफ यांचं अतूट नातं आहे. कदाचित यापुढे देखील मराठी चित्रपटसृष्टी अशोक सराफ यांच्यामुळेच ओळखली जाईल, यात शंका नाही. 



Monday, April 10, 2023

फोर्ट

मागच्या आठवड्यामध्ये मला एक ओळखीचा फोन आला.
"अरे, आम्हाला फोर्टला जायचय. कसं जायचं सांग ना!"
हे ऐकून मी काहीसा गोंधळून गेलो. फोर्ट हे तर मुंबईमध्ये आहे. मग तिथे कसं जायचं, हे मी कसा सांगू शकेल? हा प्रश्न मला पडला. मी म्हणालो,
"ते तर मुंबईमध्ये आहे ना! गुगल मॅपला सर्च कर. भेटून जाईल. मला मुंबई मधलं फारसं माहिती नाही."
यावर तो बोलला,
"अरे फोर्ट...फोर्ट... तू नाही का मागच्या आठवड्यामध्ये लोहगड फोर्टला गेला होता. तसा फोर्ट!"
मग मला पण फोर्टचा अर्थ उमगला आणि मनातल्या मनात खूप हसू आले. पुण्याच्या आजूबाजूचे सर्वच 'फोर्ट' अतिशय उंच असल्याने सदर व्यक्ती त्या 'फोर्ट'च्या 'पीक'वर जाऊ शकतील की नाही? याची मला शंका आली आणि शेवटी मी त्यांना चाकण फोर्टचे नाव सुचवले! 😂


 

Tuesday, February 14, 2023

भिरकीट

गावातील सर्वांना परिचित, सर्वांची कामे करणारा तसेच सर्वांना योग्य तो सल्ला देणारा व्यक्ती म्हणजे तात्या होय. याच गावामध्ये जब्बर अण्णा हे सर्वात लोकप्रिय व्यक्तिमत्व! परंतु वयोवृद्ध झाल्यामुळे आता ते अंथरुणाला खेळून आहेत. त्यांचा मोठा मुलगा आणि सून त्यांची काळजी घेत आहेत. तर लहान मुलगा व त्याची बायको मुंबईला राहत आहेत. अचानक एक दिवस जब्बर अण्णा यांचा मृत्यू होतो. सर्वत्र ही बातमी पसरते. गावातील बहुतांश लोक शोकाकुल होतात. त्यांचा बाहेर गावाकडील मुलगा आणि मुलगी देखील अंत्ययात्रेला येतात. प्रत्येकाचा दृष्टिकोन, भावना निरनिराळे असतात. शिवाय अनेकांच्या वागण्यातून स्वार्थीपणा डोकावत राहतो. गावातील निवडणुका जवळ आलेल्या असतात आणि त्याकरता गावातील प्रतिष्ठित राजकारणी बंटीदादा यांना इलेक्शनचा वाजत गाजत फॉर्म भरायचा असतो. परंतु सर्व गावाचेच कुळ एक असल्यामुळे सर्वांना सुतक पडलेले असते. आता करायचे काय, म्हणून जगभर अण्णांच्या तेराव्याचा विधी तीनच दिवसांमध्ये उरकून घेण्याचे ठरले जाते. यात वाद प्रतिवाद होतात. पण बंटी दादाचे म्हणणे ऐकण्यास सर्वांना भाग पडते. यामध्ये तात्याची भूमिका अतिशय महत्त्वपूर्ण ठरते.
जब्बर अण्णांची बायको त्यांच्या मृत्यूपासून सुन्न अवस्थेत गेलेली असते. तीन-चार दिवसांपासून चाललेला गोंधळ ती पाहत असते. आपल्या पतीविषयी कोणाला किती आपुलकी आहे, याची देखील तिला जाणीव होत असते. दोनच दिवसांमध्ये आपली मुले संपत्तीची वाटणी करून तिची परस्पर विक्री करायला निघालेली आहेत, हे देखील ती उघड्या डोळ्यांनी पाहत असते. कदाचित हे तिला कालांतराने सहन होत नाही. ज्या माणसाने गावातील बहुतांश तरुणांना मुंबईमधील गिरणीमध्ये कामाला लावले त्याच्या अंतिम समयी चाललेला गोंधळ तिलाही बघवत नाही. यातून ती एक महत्त्वाचा निर्णय घेते आणि चित्रपट संपतो.
तात्याची महत्त्वपूर्ण आणि मध्यवर्ती भूमिका गिरीश कुलकर्णी यांनी साकारलेली आहे. ती देखील त्यांच्या नेहमीच्या ग्रामीण शैलीमध्ये. चित्रपटातील प्रसंग व त्यातील भावभावनांचे चित्रण तसेच सर्वच कलाकारांचा अभिनय उत्तम जुळून आला आहे. विनोदाबरोबरच गांभीर्याची फोडणी देताना दिग्दर्शकाने कथेचा योग्य मेळ घातल्याचे दिसते. शेवटमात्र आपल्याला चुटपुट लावून जातो.


 

Sunday, January 15, 2023

वाळवी

पहिल्या क्षणापासून अखेरच्या क्षणापर्यंत उत्सुकता वाढवणारा आणि ती टिकवून ठेवणारा चित्रपट म्हणजे 'वाळवी' होय. चित्रपट पाहण्यापूर्वी त्याचा ट्रेलर देखील पाहिला नव्हता आणि कथानकाचा देखील काहीच अंदाज नव्हता. त्यामुळे या चित्रपटाबद्दल काहीच माहिती नव्हती, हे बरं झालं.
ब्लॅक कॉमेडी हा प्रकार मराठीमध्ये फारसा हाताळला गेलेला नाही. याच प्रकारातला हा नाविन्यपूर्ण चित्रपट आहे. पुढे काय होईल, ही उत्सुकता ताणणारा आणि गंभीर प्रसंगातून देखील विनोद निर्मिती करणारा 'वाळवी' म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीमधील एक मैलाचा दगड ठरावा असाच आहे. आपल्या स्वार्थासाठी काहीही करणाऱ्या तीन वेगवेगळ्या माणसांची ही गोष्ट. ती फिरते चौथ्या माणसाभोवती!
खुनाचे प्लॅनिंग करणे सोपे आहे, पण ते प्रत्यक्षात उतरवणे किती अवघड असते, हे वाळवीच्या निमित्ताने दिग्दर्शकांनी अतिशय उत्तमरीत्या सादर केले आहे. चित्रपटातील छोटे छोटे प्रसंग देखील लक्षात राहतात. हे असं का घडलं असावं? किंवा असं का झालं असावं? याची उत्तरे हळूहळू मिळत जातात. चित्रपटाचा वेग अतिशय उत्तम आहे. कुठेही तो संथ वाटत नाही. म्हणूनच त्यातील थरार शेवटच्या क्षणापर्यंत कायम राहतो. या सगळ्याचा शेवट कसा होईल? याची उत्सुकता सगळ्यांनाच लागून राहते आणि तो अतिशय अनपेक्षित असाच असतो. जवळपास कुणालाच चित्रपटाचा शेवट काय होईल, याचा अंदाज येत नाही. आणि चित्रपट संपल्यावर त्याचे नाव 'वाळवी' का होते? हे समजते.
कोणत्याही प्रकारचे अश्लील विनोद यामध्ये नाहीत किंवा उगाच वेळ घालवण्यासाठी कोणतेही गाणं देखील नाही. पण सुरुवातीपासून अखेरपर्यंत हा चित्रपट आपल्याला खिळवून ठेवतो. पुढील काही महिन्यांमध्ये कदाचित अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये या पुरस्काराला या चित्रपटाला पुरस्कार अथवा नामांकने देखील मिळतील, याची खात्री वाटते. शिवाय तो झी-टीव्हीच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील प्रदर्शित होईल. पण तिथे पाहण्यात ती मजा येणार नाही, जी चित्रपटगृहामध्ये पाहण्यामध्ये आहे.
परेश मोकाशी यांच्या नावामुळे हा चित्रपट पाहायला गेलो होतो. अपेक्षापूर्ती तर १०० टक्के झाली आणि 'वेड' नंतर पुन्हा एकदा दिग्दर्शक नवरा आणि निर्माती बायको ही जोडी पाहायला मिळाली!


 

Friday, April 16, 2021

अचाट, अफाट, अकल्पनीय आणि अलौकिक : चार्ली चॅप्लिन

चार्ली चॅप्लिन म्हणजे एकेकाळचा हॉलीवूडचा अनभिषिक्त बादशहा होय! शंभर वर्षांपूर्वी त्याने अमेरिकेतल्या मूकपटांवर राज्य केलं. त्याच्याच काळात चित्रपटांचा प्रवास मूकपटाकडून बोलपटांकडे झाला. अचाट, अफाट, अकल्पनीय आणि अलौकिक अशी अनेक विशेषणे चार्ली चॅप्लिनच्या या एकंदरीत जीवन प्रवासाला लावता येतात. त्याची कथा म्हणजे एका अतिसामान्य व अठरा विश्वे दारिद्र्य भोगणार्‍या, टक्केटोणपे खाल्लेल्या परंतु नैसर्गिक कलागुणांच्या, बुद्धिमत्तेच्या व निरीक्षणशक्तीच्या जोरावर चित्रपटसृष्टीचा बादशहा होण्याची कथा होय.
चार्ली चॅप्लिन हे नाव माहीत नसणारा व्यक्ती म्हणजे विरळाच. आज शंभर वर्षांनी देखील कलेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाचे चार्लीवर अतोनात प्रेम आहे. त्याच्या काळात हॉलिवूड सृष्टी बहरली. चित्रपटांकडे लोक आकर्षिले गेले. चित्रपटांचे मायाजाल तयार झाले, हेही त्याच्याच कारकिर्दीतच. लहानपणी दारिद्र्याचे चटके खाणारा हा अवलिया सर्वोत्कृष्ट अभिनेता व दिग्दर्शक होतो, ही कथाच अकल्पनीय आहे. शिवाय सर्व अर्थाने ती सामान्य माणसासाठी प्रेरणादायी देखील आहे. लोकांचे मनोरंजन करणे, हे सोपे काम निश्चितच नाही. ज्या काळात नाटकांचा जमाना होता, त्याने लोकांना चित्रपटाकडे वळवले. शिवाय एका परक्या देशामध्ये अमाप प्रसिद्धी त्याला मिळाली. जीवनात त्याने अनेक चढ-उतार बघितले. त्याच्या जीवनात अनेक स्त्रिया प्रवेशकर्त्या झाल्या. त्यातील काही त्याच्या जीवनसाथी देखील बनल्या होत्या. हॉलिवूडच्या आजच्या संस्कृतीची पाळेमुळे कदाचित त्याच काळात रोवली गेली होती, असे म्हणता येईल. चार्लीने मात्र या सर्व प्रवासात अनेक दशके चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवले. त्याने चित्रपटांमधील निरनिराळे प्रयोग करून प्रेक्षकांचे अफाट मनोरंजन केले. त्यामुळेच तो आज प्रत्येकाला माहित आहे. या क्षेत्रातला ध्रुवतारा म्हणून त्याची ओळख आहे. त्याला जेव्हा ऑस्कर पुरस्कार जाहीर झाला, त्यावेळी सर्व प्रेक्षकवृंदाने उभे राहून सलग बारा मिनिटे टाळ्या वाजवल्या होत्या! हेच त्याच्या कारकिर्दीतले सर्वात मोठे यश होय. अशी मानवंदना अन्य कोणत्याही कलाकाराला आजवर मिळालेली नाही. अमेरिकेतल्या त्याच्या अखेरच्या कालखंडामध्ये कम्युनिस्ट म्हणून शिक्का बसल्याने त्याला मायदेशी परतावे लागले. परंतु त्याच्या कर्तृत्वाने आजही त्याची कर्मभूमी त्याची सातत्याने आठवण काढीत असते. असा अमाप यश मिळवणारा व अलौकिक कार्यसिद्धि साधणारा माणूस यापूर्वी कधी झाला, न पुन्हा होईल!
आज त्याच्या जयंतीनिमित्त या अवलियाला विनम्र अभिवादन!

Sunday, April 11, 2021

शिकाऊ अनुज्ञप्ती पुराण

जवळपास दोन वर्षांपासून नियमितपणे फेरफटका मारण्याची आमचे सरकारी कार्यालय म्हणजे एमएच १४ चे परिवहन कार्यालय. त्यावेळी नुकतीच पिंपरीहुन मोशीच्या नव्या इमारतीत स्थलांतरित झाले होते. तेव्हापासून आम्ही त्याची 'प्रगती' अनुभवत आहोत! जवळपास सर्वच सरकारी कार्यालयांची प्रगती ही समान संथगतीने होत असते. त्यात हेही सुटलेले नाही!
मागच्या काही महिन्यांपासून चारचाकीची शिकाऊ अनुज्ञप्ती अर्थात लर्निंग लायसन्स काढण्यासाठी आम्ही सदर कार्यालयात अनेक फेऱ्या मारल्या. गेल्या काही वर्षांपासून परिवहन कार्यालयाने सदर पद्धती ऑनलाईन केल्याने आपले कार्य सुलभ होईल, अशी अपेक्षा होती. परंतु नागरिकांना त्रास देण्यासाठी व पैसे लाटण्यासाठी ही सोय होती, हे आमच्यासारख्या पामरास खूप उशिरा समजले. आम्ही स्वतः संगणक अभियंता असल्याने आमची दृष्टी वेगळी आणि पैसे लाटणाऱ्याची दृष्टी वेगळी पडते, हे आमच्या फारच उशिरा ध्यानात आले. आमचे आधीचे लायसन्स हे एमएच १५ द्वारा वितरित करण्यात आले होते. त्यामुळे नवे लायसन्स एमएच १४ कडून मिळण्यात इतक्या अडचणी येतील, याची जराही कल्पना आमच्या मनात नव्हती. परंतु त्यामुळे ही सर्व कार्यालये एकाच भारतीय संघराज्यात किंवा भारताच्या एकाच राज्यात येतात का? हाही प्रश्न आमच्या मनात घर करून राहिला होता. त्याला आता दोन वर्षे उलटली आहेत. नव्या कार्यालयातले साहेबही बदलले आहेत. त्यामुळे आम्ही आता ताज्या दमाने नवा अर्ज करण्यासाठी सज्ज झालो होतो.

 

पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी शासनाने जी ई-पद्धतीची अर्ज प्रक्रिया चालू केली आहे, तिचा आम्ही पुरेपूर वापर केला. ऑनलाईन भरलेल्या अर्जाच्या, त्याच्या पावतीच्या, आमच्या ओळखपत्राच्या, जन्म पुराव्याच्या आम्ही "प्रिंट्स" काढल्या व पुनश्च त्या स्कॅन करून अपलोड करण्याच्या कामाला लागलो. कुठूनतरी ढापलेल्या वेब टेम्प्लेट वर बनवलेले संकेतस्थळ आम्ही शोधले! त्यावर अजूनही "साईट टायटल हियर" असं लिहिलेलं आहे! हे विशेष! अशा नावीन्यपूर्ण संकेतस्थळावर आपले सर्व दस्तावेज अपलोड करताना आमची ऑनलाइन दमछाक झाली. चार एमबीची फाईल 200 केबीमध्ये बसवताना ऑनलाईन दमछाक होते, हे लक्षात असू द्यात! त्यानंतरचा ऑनलाइन पेमेंट गेटवे हा तब्बल तीन वेळा कोसळला! तोही ऑनलाईनच! सुमारे एक-दीड तासानंतर आमचेही ऑनलाइन पुराण समाप्त झाले. आता लवकरच आपल्या लायसन्स (ऑनलाईन!) मिळणार याची स्वप्ने पडायला लागली.
शहरात सगळ्यात जास्त बेशिस्त पार्किंग कुठे होत असेल तर, ती आरटीओ कार्यालयाच्या बाहेर! 'दिव्याखाली अंधार' ही उक्ती सार्थ ठरवणारी ही खरीखुरी जागा होय. अशा विविध सरकारी कार्यालयाची पायरी चढायची म्हणजे मोठा आत्मविश्वास व धैर्य लागते. खासकरून तेव्हा.. जेव्हा तुम्ही कोणत्याही अधिकाऱ्याचा खिसा गरम करणार नसाल! कार्यालयात प्रवेश करताच एंडोर्समेंट लायसन्स अर्थात लायसन्स वर लायसन्स काढण्यासाठी भली मोठी रांग लागलेली दिसली. अर्थात ती नव्याने लायसन्स काढणाऱ्या व्यक्तींना पेक्षा निश्चितच छोटी होती. समोर एका खुर्चीवर एक अधिकारी महिला अर्जांची छाननी करत होत्या. रांग पुढे सरकू लागली. वेग तसा चांगला होता. आजूबाजूला उभे असणाऱ्या अनेकांच्या हातातील त्यांचे अर्ज मी पाहिले. प्रत्येकाच्या अर्जावर कोणत्या ना कोणत्यातरी मोटार ड्रायव्हिंग स्कूलचा शिक्का होता. मीच आपुला उघडा बोडका अर्ज घेऊन त्या रांगेत उभा होतो, याची जाणीव झाली. चौकशी नंतर समजले की मोटार ड्रायव्हिंग स्कूलकडून दोनशे रुपये तपासणी करणार्‍या अधिकार्‍यांना दिले जातात. मी मात्र त्यात नव्हतो, याची खंत की लाज वाटली हे मला समजले नाही. त्या दोनशे रुपयांना कदाचित ते मानधन म्हणत असावेत. त्याला लाच म्हणणे म्हणजे अधिकाऱ्याचा व पैशाचाही अपमानच होय. खरं तर एखादा सरकारी अधिकारी व कर्मचारी पाहिला की, तो आपल्याकडे 'बकरा' या नजरेने पहात असावा असं आम्हाला बऱ्याचदा जाणवतं. आपल्याकडे पाहताना त्याच्या तोंडातून लाळ गळत आहे व प्रत्येक थेंबाची किंमत सुमारे पाचशे रुपये असावी, असेही आम्हाला सतत जाणवत राहतं. प्रामाणिक अधिकारी ही आमच्या दृष्टीने अंधश्रद्धा आहे. तिचं श्रद्धेत रुपांतर करण्याची हिम्मत आजवर एकाही सरकारी अधिकाऱ्याने केलेली नाही. या वेळीही काही वेगळी परिस्थिती नव्हती. कार्यालयातील ती रांग सरकत सरकत पुढे आली. आमचा नंबर आला. मॅडमने प्रथम पाहिलं, अर्जावर कोणत्याही मोटार ड्रायव्हिंग स्कूलचा शिक्का नव्हता. "च्यायला दोनशे रुपये गेले!", असे भाव मॅडमच्या मनात उमटले असावेत व त्यांनी तात्काळ प्रतिसाद दिला,
"अर्ज नीट अपलोड केला नाहीये परत अपलोड करा!", असे म्हणत आमचे कागद आमच्या अंगावर फेकले व संगणकात उघडला गेलेले अर्ज तात्काळ डिलीट करून टाकला. पुढचा क्रमांक घ्यायला मग त्या सज्ज झाल्या. ऑनलाइन अर्ज डीलीट केल्याने आमच्याकडे कोणताच पुरावा राहिला नव्हता. मग आम्ही निमूटपणे मागे हटलो व खुर्चीत जाऊन बसलो. आमचा मांडी-संगणक अर्थात लॅपटॉप आमचा सोबती म्हणून सतत बरोबर असतो. आम्ही तो बाहेर काढला व पुन्हा अर्ज अपलोड करायच्या मागे लागलो. मॅडमच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही. 'मला खुन्नस देतोस काय?', ही भावना त्यांच्या मनात तयार झाली असावी. आमचा अर्ज पुन्हा अपलोड होईस्तोवर रांग संपून गेली होती. मग अर्ज घेऊन आम्ही पुन्हा मॅडमच्या समोर दाखल झालो. त्यांनी पुन्हा दहा मिनिटे काहीतरी काम केल्याची नाटकं केली आणि परत आमचा फॉर्म घेतला. त्यांच्यासमोरच संपूर्ण फॉर्म अपलोड झाल्याने कदाचित त्या मनातल्या मनात नवं कारण शोधत असाव्यात. तसेच त्या दोनशे रुपयांच्या नुकसानीची खंत त्यांना सतावत असावी. यावेळेस त्यांनी फॉर्म व्यवस्थित तपासून पाहिला आणि विचारलं, "जन्मतारखेचा प्रूफ कुठे आहे?" यावर मी त्यांना तात्काळ माझं अजून दुचाकीचं लायसन्स दाखवलं व लगेच उत्तर मिळालं,
"हे नाही चालत ओ!"
ज्या आरटीओ कार्यालयाने स्वतःला दुचाकीचं लायसन्स दिलं आहे, ते तिथे खोटं ठरवण्यात आलं! ही बाई स्वतःच्या कार्यालयाने जारी केलेल्या ओळखपत्र नामंजूर करत होती! एका २०० रुपयांसाठी हे लोक काय काय करू शकतात, याचा नमुना त्यादिवशी आमच्या समोर दिसत होता. तेव्हा मनाची खात्री पटली की, काहीही झाले तरीही बाई आज आपल्याला लायसन्स मिळवून देणार नाहीये. त्यामुळे तेथून काढता पाय घेणं योग्य होतं. जाताजाता कार्यालयात शोभेसाठी लावलेला लाचलुचपत प्रतिबंधक शाखेच्या फलकही आम्हाला नजरेस पडला. त्याला मनातल्या मनात आम्ही सलाम ठोकला!
जवळपास दहा दिवसांनी एक सुट्टीचा दिवस मिळाला. मग काय... पुनश्च आम्ही सरकारी लोकांची तोंडं बघायला याच कार्यालयात डेरेदाखल झालो! पुन्हा तीच मोठी रंग. आणि याही वेळी तेच आम्ही एकुलते एक यांच्या अर्जावर कोणताही स्टॅम्प नव्हता! यावेळी महिला अधिकार्‍याची जागा एका पुरुष अधिकाऱ्याने घेतली होती. सर्वांनाच प्रतिव्यक्ती दोनशे रुपये मिळायला हवेत, असा समानतेचा कायदा असल्याने कदाचित या खुर्चीवर रोज नवनवे अधिकारी बसत असावेत. यावेळी मात्र आमचा क्रमांक येईपर्यंत कामकाज संपायची वेळ झाली होती. अखेरीस जवळपास एकच्या सुमारास आमच्या क्रमांक आला. साहेबांनी आपल्या संगणकाचा पडदा कोणालाही दिसू नये म्हणून पूर्ण तिरका करुन ठेवलेला होता. त्यांनी आमचा अर्ज क्रमांक टाकला आणि ओरडले,
"डॉक्युमेंट नीट अपलोड केलेले नाहीयेत... हे बघा!"
असं सांगत त्यांनी संगणकाची स्क्रीन आमच्याकडे वळवली व त्यावरील "पेज नॉट फाऊंड" हा मेसेज दाखवला. यावर आम्ही उत्तरलो,
"पण बाकीच्यांचे कसे काय दिसत आहेत?"
"तुम्ही नीट अपलोड नाही केलीत."
"अहो पण दहा दिवसांपूर्वी तर दिसत होती."
"दहा दिवस ती डॉक्युमेंट राहणार आहेत का तिथं?"
साहेबांचा हा प्रतिप्रश्न ऐकून आम्हाला संगणक अभियंता असण्याची लाज वाटली! त्यांच्या म्हणण्याप्रमाणे कदाचित ती कोणीतरी चोरून नेली असावित वा पावसाच्या पाण्याने भिजली असावीत. मग काय, त्यांनी आमच्या अंगावर फेकलेली कागदपत्रे पुनश्च गोळा करून आम्ही तिथून चालते पडलो. या भाऊने दोनशे रुपयांसाठी "पेज नॉट फाउंड"ची युक्ती केली होती. ती काय असावी? हा प्रश्न मात्र आमच्या मनात पडूनच राहिला.
तिसऱ्या खेपेला मात्र गयावया करून आम्ही आमचा अर्ज ऑनलाइन मंजूर करून घेतला व लर्निंग लायसन्स आमच्या हाती पडले!
सरकारी कार्यालयांकडे पाहिलं तर खऱ्या अर्थाने समजतं की, तंत्रज्ञानाच्या फायद्यापेक्षा तोटेच जास्त आहेत! तुम्ही कितीही ठरवले तरी सरकारी कर्मचारी तुम्हाला त्रास देणारच आहेत. शेवटी पैसा कोणी सोडतं का? पण त्यात ही पेक्षा खरे आहेत की, फुकटचा पैसा कधी पचतो का? या प्रश्नाचे उत्तर सर्वांनाच ठाऊक आहे.
शिधापत्रिकेच्या शेवटी लिहिलेलं कविवर्य कुसुमाग्रजांच्या ओळी अशा प्रसंगी मला नेहमी आठवतात. #टारगेट #१००कोटी

गोरगरिबा छळू नका । पिंड फुकाचे गिळू नका।
गुणीजनांवर जळू नका।

© तुषार कुटे

Sunday, September 20, 2020

अशी ही बनवाबनवी आणि धुमधडाका

सचिन पिळगावकरचा "अशी ही बनवाबनवी" आणि महेश कोठारे यांचा "धुमधडाका" हे मराठी चित्रपट सृष्टीतील मैलाचा दगड ठरलेले चित्रपट होय. परंतु, दोन्ही चित्रपट विविध चित्रपटांचे रिमेक आहेत, याची खूप कमी जणांना माहिती असेल. धूमधडाका हा चित्रपटाच्या रिमेकच्या सिरीज मधला सर्वात शेवटचा चित्रपट होता. 1985 मध्ये तयार झालेला धुमधडाका हा मूळ तमिळ चित्रपट काढलिक्का नेरामिलाई या या चित्रपटाचा रिमेक होय. हा तमिळ पट 1964 मध्ये तयार झाला होता. त्याचा पहिला रिमेक तेलगु मध्ये 1965 मध्ये झाला. 1966 मध्ये तो हिंदीत "प्यार किये जा"  या नावाने तयार झाला होता. तर 1979 मध्ये या चित्रपटाचा कन्नडमध्ये रिमेक झाला आणि सर्वात शेवटी तो महेश कोठारे यांनी 1985 मध्ये मराठी मध्ये आणला!
सचिन पिळगावकर यांनीही हिंदीमधले अनेक चित्रपट मराठीमध्ये रिमेक केले आहेत. त्यातीलच "अशी ही बनवाबनवी" हाही एक चित्रपट होय. तो 1988 मध्ये रिलीज झाला होता. 1966 मधील ऋषिकेश मुखर्जी यांच्या "बिवी और मकान" या चित्रपटावर तो आधारित होता. त्याचा पुन्हा रिमेक 1991 मध्ये तेलगू भाषेत तर 2003 मध्ये कन्नड भाषेमध्ये करण्यात आला. 2009 मध्ये हिंदीत "पेयिंग गेस्ट" या नावाने, 2014 मध्ये पंजाबी मध्ये मिस्टर अँड मिसेस 420 तर 2017 मध्ये जिओ पगला या नावाने बंगालीत रिमेक झाला. अशा तऱ्हेने एक सुपर हिट स्टोरी भारताच्या विविध भाषांमध्ये पुन्हा पुन्हा तयार होत आलेली आहे.


 

Monday, June 1, 2020

इमान

"एक म्हैना व्हऊन गेला राव. इमानं अजून बंदच हायेत!", पहिला चिंतातुर होऊन बसला होता.
"तुला काय करायचं रं इमानाचं? तू आपलं एष्टीचं बघ की, ती बी बंदच हाय!" - दुसरा.
"असं काय करतूस राव, तुला म्हाईत नाय का इमानानं परदेशात जायचं लई मोठं सपनं हाय माझं."
"व्ह्यय की, इतकी वर्षं तेच ऐकतोय ना!"
"इमानं कधीच चालू व्हनार नाय का रं?"
"आजूक दोन-तीन म्हैनं तरी न्हाय व्हनार."
"म्हंजी... नंतर व्हतीलच ना?"
"व्हतीलच रं. पन तू लई सपान नको बघू. काईतरी दुसरा इषय काढू."
"दुसरा काय इषय आता?" - पहिला चिंताग्रस्त.
"टीवी वरचं रामायण संपलं ना? मग मला सांग, त्यातून तू काय शिकला?"
या प्रश्नावर पाहिल्याने गहन विचार केला व बोलू लागला.
"परदेशात इमानानं जाणारी सीता ही पहिली भारतीय व्हती!"
"अरे खुळ्या, ते न्हाय. दुसरं काय तरी सांग."
पुन्हा पाहिल्याने काही काळ डोके खाजविले व बोलू लागला.
"सोताच्या ताकदीवर परदेशात जाणारा हनुमान हा पहिला भारतीय व्हता!"
"खुळं तेच डोक्यात घेऊन बसलंय अजून. तू नाय सुधारणार बाबा!"
अशी तणतण करत दुसरा तेथून निघून गेला. पहिला मात्र अजून काही सुचतंय का? याचा विचार करत तिथेच डोकं खाजवत उभा होता.  


Friday, May 29, 2020

जॉगिंग

कांदळीतल्या एका छोटेखानी रस्त्यावर एका मजल्याचा बंगला आहे. आजकाल तिथे दोघे आजी-आजोबा राहतात. त्यांच्या दोन्ही मुलींची लग्न झाली आहेत. त्यामुळे सध्या निवृत्तीनंतर दोघेही गावीच आपल्या बंगल्यात मजेत आयुष्य घालवत आहेत.
दोन वर्षांपूर्वी पुण्यातून गावी येऊन स्थायिक झाले तरी आजोबांची फिट राहण्यासाठी दररोज सकाळी अर्धा तास चालण्याची सवय काही सुटलेली नव्हती. सुरुवातीला त्यांना कोणी सोबत नसायचे. कालांतराने मात्र त्यांनी दोन मित्र जमवले. ते मग त्यांना सकाळी सोबत असतात.
लॉकडाऊन झाल्यानंतर करोनाच्या या भीतीने दोन्ही मित्रांनी सकाळी बाहेर पडणे बंद केले. परंतु, आजोबांना काही चैन पडेना. त्यांचे रुटीन मात्र चालूच होते. सकाळी सात वाजता घरातून निघून पुढे चालत लिंबामाथ्यापर्यंत येत. मग तिथून हायवेच्या कडेकडेने एमआयडीसी रोडने पुन्हा आत जात. यात त्यांना जवळपास अर्धा तास लागायचा. बरोबर साडेसात वाजता ते पुन्हा घरी परतत असत. त्यावेळेस आजींनी चहा बनवून ठेवलेला असायचा.
आज मात्र आजोबा केवळ वीस मिनिटात अर्थात दहा मिनिटे लवकरच घरी पोहोचले होते.
"अगं चहा झाला नाही का अजून", त्यांनी आल्या आल्या फर्मावले.
त्या आवाजाने आजीबाई बाहेर आल्या व आश्चर्याने आजोबांकडे पाहू लागल्या.
"चहा कसा होईल....? पण तुम्ही इतक्या लवकर कसे आलात?"
"अगं कोकाटेंचा विकास भेटला होता रस्त्यात. तो म्हटला, काका चला तुम्हाला घरी सोडतो. मग आलो त्याच्या बाईकवर बसून. म्हटलं आजचा वेळही वाचेल."
त्यांचं बोलणं ऐकून आजींनी कपाळाला हात लावला.
"अहो एवढा वेळ वाचवायचा तर घराच्या बाहेर तरी कशाला पडता?", असं बोलून त्या परत स्वयंपाक घरात निघून गेल्या. आजोबा मात्र आजीच्या प्रश्नावर गहन विचार करू लागले.


Tuesday, May 26, 2020

अक्कल

वडज-धामनखेल रस्त्याच्या एका नाक्यावर तिघेजण नेहमी गप्पा मारत बसलेले असतात. बऱ्याचदा तिथल्या वडाच्या पारावर ते मोठमोठ्या गप्पा मारताना दिसतात. ही मंडळी प्रामुख्याने वैज्ञानिक, इतिहास संशोधक, पर्यावरण तज्ञ, निसर्ग अभ्यासक, समाजसेवक, अर्थतज्ञ, स्थापत्य अभियंता सारख्या विविध व्यवसायांशी निगडित असावित असं त्यांच्या दैनंदिन चर्चेतून जाणवतं. एवढ्या विषयांचा गाढा अभ्यास असणारी मंडळी या देशात अगदी क्वचितच सापडतं असावीत! तरीही यांना वृत्तवाहिनीवरच्या एखाद्या चर्चासत्रात कोणी का बोलावत नाही? हा प्रश्न मला नेहमीच पडतो.
कोरोना साथ आल्यापासून लॉकडाऊनच्या काळातही त्यांच्या दैनंदिन चर्चासत्रांमध्ये खंड पडलेला नाही. परवाही ते विविध विषयांवर चर्चा करण्यात मग्न झाले होते. परंतु एकंदरीत अर्थशास्त्र या विषयांवर त्यांची त्या दिवशी जास्त चर्चा होत होती, असे दिसले.
"मोदी ने २० लाख करोडचे पॅकेज दिले म्हणे परवा", पहिला म्हणाला.
"वीस लाख की करोड? ते कळलं नाही पण!" - दुसरा
"वीस लाखाचे करोड की रे!" - तिसरा.
"म्हणजे विसावर किती शून्य?" -  दुसरा.
"आपण काय इथे शून्य मोजायला बसलोय?"  - पहिला.
"पण १३५ करोड लोकांपैकी कोणाच्या वाट्याला किती येतील?" -  दुसरा.
"पंधरा हजार येतील बघ!" - तिसरा.
"एवढं करण्यापेक्षा प्रत्येकाला एक एक करोड दिले असते तर १३५ कोटीमध्येच काम झालं असतं. नाही का?" - पहिला.
"व्हय की, मोदीला काय अक्कल नाही पण!" - तिसरा.
"आज रेशनचे पाच किलो तांदूळ मिळणार आहेत, माहितीये ना?"- दुसरा.
"अरं व्हय की, चल लवकर", असे म्हणत तिघे तिथून निघून गेले.

Wednesday, April 1, 2020

चिमणचारा

चि.वि. जोशींच्या बालवाड्मयातील आणखी एक कलाकृती म्हणजे 'चिमणचारा' होय. त्यातील मुख्य पात्र म्हणजे चिमणराव. या चिमणरावांना चि. वि. जोशीनी यांनी अजरामर केलंय. मोरू, मैना, राघू आणि साळु या भावंडांना झालेले संवाद जोशींनी या पुस्तकात शब्दबद्ध केले आहेत. आठ छोटेखानी कथा एका तासात वाचून होतील एवढ्या छोट्या आहेत. त्यामुळे बालवाचकांना वाचायला देण्यात काहीच हरकत नसावी.


Tuesday, March 31, 2020

मोरू आणि मैना

चि.वि. जोशींनी सत्तर एक वर्षांपूर्वी बाल मराठी वाङ्मयात मोलाची भर घातली. विविध बालपात्राद्वारे त्यांना मुलांना छान छान गोष्टी सांगितल्या. त्यातीलच एक बालजोडी म्हणजे मोरू आणि मैना होय. या दोन्ही बहीण-भावांच्या बालकरामती त्यांनी "मोरू आणि मैना" या पुस्तकात रंगवल्या आहेत. अगदी बालसुलभ पद्धतीने मांडलेल्या गोष्टी कधी हसवितात तर कधी उपदेशाचे डोस पाजत असतात. त्यांची वाघाबरोबरची भेट, झालेली नजरानजर, दोघांचीही गुजरात भ्रमंती, तिथल्या गमतीजमती, मोरूची हास्यउपचार पद्धती व त्याने लिहिलेला उपसंहार इत्यादी विविध गोष्टी या पुस्तकात वाचण्यासारख्या आहेत. 

Sunday, March 29, 2020

सोळा आणे

'सोळा आणे' हा चि.वि. जोशींचा १६ कथांचा कथासंग्रह. १६ गोष्टींमुळे त्यांनी ह्या संग्रहात 'सोळा आणे' हे नाव दिलं आहे, हे वेगळे सांगणे नको! सर्वसामान्य जीवनात घडणाऱ्या विविध छोट्या छोट्या घटनांना अशाप्रकारे विनोदी अंगे असू शकतात, हे या कथांमधून जाणवते. यातील काही कथा लेखकाने विद्यार्थीदशेत असताना लिहिल्या आहेत. त्यामुळे युवा वयापासूनच त्यांच्या अंगात विनोदीपणा भरला आहे, हे यातून निश्चितच दिसून येते. काही कथा ३-४ पानात संपतील अशा लघुकथा आहेत. त्यामुळे मित्र श्रेणीतील हा कथासंग्रह निश्चितच चेहऱ्यावर हसू आणणारा आहे.


Wednesday, March 25, 2020

ओसाडवाडीचे देव

ओसाडवाडी नावाचं सातारा जिल्ह्यातल्या वाई तालुक्यात एक गाव असतं. इथले लोक अवली आहेतच. देवही जागृत असतात. मारुती, गणपती, नवलाई सटवाई आणि महादेव हे ओसाडवाडीचे मुख्य दैवत. सर्वच जागृत देव भक्तांच्या हाकेला लगेच ओ देत असतात. याच पार्श्वभूमीवर रंगवलेला चि. वि. जोशी यांचा हा कथासंग्रह होय. पु.लंची बटाट्याची चाळ, द.मां.ची भोकरवाडी, निलेश साबळेची थुक्रटवाडी तशीच ही चि.विं.ची ओसाडवाडी होय! विशेष म्हणजे ओसाडवाडीचा त्यांचा हा पूर्ण कथासंग्रह देवांच्या विविध करामतींनी रंगलेला आहे. भक्तांच्या हाकेला ओ देऊन सर्व देव आपल्या अंगातली ताकद दाखवतात व त्यातूनच बऱ्याच गमतीजमती तयार होत असतात. कधी हनुमान सर्कशीचे खेळ दाखवतो, कधी शिपायी होतो, कधी वाईसाठी बॅटिंग करतो तर कधी पुण्यातल्या आपल्या भाऊबंदांना भेटून येतो. हीच परिस्थिती गजाननाची आणि त्याच्या उंदीर मामाची आहे. १९४६ झाली प्रसिद्ध झालेला हा कथासंग्रह आजही तितकाच हसविणारा आहे.


Monday, March 9, 2020

वडे

वेळ: फेब्रुवारी २०२० मधील एक दिवस (शनिवार-रविवार वगळता)
स्थळ हिंजवडी आयटी पार्क मधील एक गजबजलेला चौक

संध्याकाळच्या वेळेस हिंजवडीतुन स्वतःची गाडी चालवत बाहेर पडणं म्हणजे सर्वात मोठे दिव्य! असे दिव्य पार करत एका चौकात आलो. एका छोट्याश्या हॉटेलात दोन तरुण काय खावे? याबद्दल चर्चा करत होते. बहुदा त्यातला पहिला तरुण मराठी व दुसरा तमिळ असावा.
"भाऊ काय खाणार तू?", पहिल्याने दुसऱ्याच विचारले.
"कुछ भी चलेगा." -दुसरा
"वडापाव खाणार?"
"वुई साउथ इंडियन डोन्ट इट ऑईली थिंग्स!", दुसऱ्याने किळसवाणे तोंड करून उत्तर दिले.
"मग ते भोक-भोकाचे वडे काय पाण्यात तळून खाता काय?",
पहिल्याने केलेल्या या प्रतिप्रश्नावर दुसरा निरुत्तर झाला व जबरदस्तीने हास्य तोंडावर आणू लागला.


Tuesday, March 3, 2020

लिफ्ट

स्थळ: पुण्यातील एक अभियांत्रिकी महाविद्यालय
 
पहिल्या मजल्यावरील काम संपून सातव्या मजल्यावर जायचं होतं म्हणून लिफ्टच्या दरवाज्यासमोर मी लिफ्ट खाली येण्याची वाट पाहत होतो. अर्थात लिफ्टचे वर जाण्याचे बटन दाबले होते. तेवढ्यात एकजण आला व त्याने खाली जाण्याचं बटन दाबलं. पहिल्या मजल्यावरून खाली जाण्यासाठी हा लिफ्ट वापरणार म्हणून मीही त्याच्याकडे कुतूहलाने पाहिले व विचारलं,
"तळमजल्यावर जायचं का?"
"नाही सिक्स्थ फ्लोअरला!" तो उत्तरला. 
"मग खालचं बटन का दाबलं?"
"लिफ्टला खाली आणण्यासाठी!"
मनातल्या मनात खुदकन हसवणारे उत्तर होते हे.
लिफ्ट आली आणि आम्ही आत गेलो. मग मी त्याला समजावून सांगितलं, "बाहेरची बटनं लिफ्ट कुठे न्यायची याच्यासाठी नसतात. आपल्याला कुठे जायचे? याच्यासाठी असतात".
"पण आली ना लिफ्ट खाली!"
त्याच्या या बोलण्यावर पुढे काय बोलावं, हे मला सुचेना. मी मात्र पु.ल.देशपांडे व द. मा. मिरासदार यांच्या कोणत्या पात्रात माझ्या लिफ्टमधील हे पात्र योग्यरीत्या बसेल, याचा विचार करत बसलो.


Sunday, November 10, 2019

ट्रेनमध्ये घोरणारी प्रवृत्ती

घोरणे ही सर्वसामान्य माणसाची एक प्रवृत्ती आहे. मीही कधीकाळी घोरत नव्हतो. परंतु, आमच्या हीच्या म्हणण्यानुसार मीही बऱ्याचदा झोपेत घोरत असतो. पण झोप नीट आली नाही की, झोपेत घोरणं होत नाही! 


कामाच्या निमित्ताने ट्रेनमध्ये बराचसा प्रवास होतो आणि आजवर अनेकदा ट्रेनचा रात्रीचा प्रवास आम्हाला घडलाय. आता रात्र आली की, झोप येते आणि झोप आली की, घोरणंही येतच! ट्रेनच्या ३A च्या डब्यात जवळपास 64 प्रवासी असतात. त्यामुळे रात्रीच्या वेळेस आपण आपल्या बर्थवर झोपलेलो असताना कुठून ना कुठून तरी घोरण्याचा आवाज येत राहतात. चित्रविचित्र घोरण्याने कधीकधी मनोरंजन होतं तर कधीकधी वैतागून किळस वाटायला लागतो. या जगात मनोरंजकरित्या घोरणाऱ्यांची संख्या तशी कमीच आहे! ट्रेनच्या इतक्या वेळेसच्या प्रवासात आजवर फक्त एकदाच ट्रेनमधल्या प्रवाश्याचे घोरणे लक्षात ठेवावे, असे वाटले होते.
नांदेडची आमची नेहमीची पनवेल-नांदेड एक्सप्रेस ही ट्रेन होती आणि नेहमीप्रमाणे ट्रेन आरक्षण करणाऱ्या सॉफ्टवेअरने अप्पर बर्थ आमच्या माथी मारला होता! आमच्या उंचीमुळे तीन बर्थ असलेल्या जागेत आम्हाला कधीच बसता आले नाही. त्यामुळे हा बर्थ नेहमी कंटाळवाणा वाटतो. आमच्या समोरच्या अप्पर बर्थवर एक ९० ते १०० किलो वजनाचा मनुष्यप्राणी येऊन ठेपला. खरेतर तो ठेपला नव्हता तर त्याला ठेपवला होता! म्हणजेच आप्तस्वकीयांनासोबत राहता यावे म्हणून कोणीतरी आपली सीट बदलून घेतली होती. यामुळे सदर इसम समोरच्या अप्पर बर्थवर आला. रात्री दहा वाजेपर्यंत सर्व काही ठीक चालले होते. परंतु त्यानंतर सदर इसमास झोप लागली आणि त्याचा जो मूळ आवाज आहे, त्याच्या दुप्पट आवाजात तो घोरायला लागला. घोरण्याचा इतका भयंकर आवाज पहिल्यांदाच आमच्या कानावर पडत होता. एखाद्याच्या घोरण्याने दुसऱ्याच्या कानाचे पडदे फाटू शकतात का? या प्रयोगासाठी कदाचित हाच आवाज योग्य असावा, असे वाटून गेले. सदर इसम मुद्दामहून तर असा आवाज काढत नाहीये ना? हाही विचार आला. परंतु त्याच्यामध्ये इतकं सातत्य असावा का? या प्रश्नाचे उत्तर आमच्याही मनाने 'नाही' असेच दिले. आजूबाजूच्या कंपार्टमेंट मधून येणारे इतर घोरण्याचे आवाज या आवाजाची बिलकुलच स्पर्धा करू शकत नव्हते. त्यांनी तर केव्हाच तलवार म्यान केल्याचे जाणवत होते. एकटा शिपाई किती वेळ लढणार? केव्हातरी थांबेल, असा विचार मनात आला. पण एकट्याची लढाई काही थांबेचना. त्या इसमाच्या नाकातून मध्येच चित्रविचित्र आवाज यायचे. नाकात काहीतरी अडकलेय आणि ते बाहेर येण्यासाठी तडफडते आहे, असं भासत होतं. पण एवढ्या एक तासात ते बाहेर यायला होतं. तरीही आलं नाही. जवळपास दोन तास तो कर्कश्य आवाज आमच्या श्रवणेंद्रियातून थेट मेंदूत जाऊन घुमत होता. त्यामुळे आमचा मेंदू विश्रांतीला सुरुवात करण्याची वेळ सतत पुढे पुढे ढकलत असल्याचे जाणवले. म्हणून निद्राधीन होण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहण्यावाचून आमच्यापुढे काहीच पर्याय नव्हता. इसमाच्या घोरण्याची तीव्रता एक वेळी एवढी व्हायची की, जणू आत्ताच त्याचा कंठ फुटून नाकातून बाहेर येईल. त्यादिवशी आम्हाला जाणवले की, बॅग मधील गरजेच्या वस्तू ठेवतो त्या पर्समध्ये कापसाचे बोळे ठेवायला हवेत. वेळ कुणावर सांगून येत नाही. कधी कशाचा वापर करावा लागू शकेल, हेही सांगता येणार नाही. अशा या बिकट परिस्थितीत रात्री कधीतरी आम्हास झोप लागली. परंतु ती अल्पकालीनच ठरली. पहाटेपासून परत तोच दंगा चालू झाला आणि सकाळी 7 वाजेपर्यंत तो चालू होता! तदनंतर तो इसम आमच्या झोपेची वाट लावून साडेसात वाजता परभणी स्टेशनला उतरून निघून गेला. जाता जाता हेही म्हणाला की, 'ट्रेन मध्ये काय झोप होत नाही ओ नीट... !'. आम्ही स्मितहास्य करून त्यांना प्रतिसाद दिला. त्यानंतर एका महाभयंकर संकटातून सुटल्याची जाणीव आम्हाला झाली. अर्ध्या-पाऊण तासाच्या प्रवासानंतर झोपेची जोरदार गुंगी यायला लागली होती. पण थोड्याच वेळात ट्रेन हुजूर साहिब नांदेड स्टेशनला पोहोचली.

© तुषार कुटे

Sunday, November 3, 2019

नांदेडचा येवले चहा

नांदेडच्या विद्यापीठात एकेदिवशी कामानिमित्त जाणे झाले होते. त्यावेळी विद्यापीठातल्या एका प्राध्यापकांनी सांगितलेला हा किस्सा.
येवले अमृततुल्य बद्दल आता सबंध महाराष्ट्राला माहिती झालीये. नांदेडमध्येही येवले चहाची शाखा चालू झाली आहे. याठिकाणी अन्य ठिकाणांसारखी रांगेत उभे राहून चहा पिण्यासाठी गर्दी झाल्याचे दिसते अर्थात त्यांची लोकप्रियता वाढतच आहे.


गणपतीच्या काळामध्ये प्राध्यापकांच्या गल्लीतही एका सार्वजनिक गणेशाची स्थापना झाली होती. परंतु, प्रत्येकच गल्लीत गणपती असल्याने संध्याकाळच्या आरतीला फारशी गर्दी होत नसे. एक दिवस गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षाने सकाळी पाटी लावली- "आज संध्याकाळी आरतीनंतर सगळ्यांना येवले यांच्या कडून चहा मिळणार आहे!" म्हणता म्हणता दिवसभरात ही बातमी आजूबाजूच्या सगळ्या गल्ल्यांमध्ये पोहोचली आणि त्यादिवशी गणपतीच्या आरतीला भली मोठी गर्दी झाली! आरती सुरू झाल्यानंतर प्रत्येक जण ती कधी संपेल, याची वाट पाहत होता. एवढी गर्दी पाहून मंडळवाले खुश झाले. अखेर आरती संपली व सर्वजण बिल्डिंगच्या पार्किंग मध्ये येवले चहा पिण्यासाठी जाऊ लागले. पण, पार्किंगमध्ये दृश्य तर वेगळेच होतं. तिथे एक मनुष्य टेबलावर चहाचा थर्मास घेऊन व एका हातात चहाचे कागदी कप घेऊन सगळ्यांची वाट बघत उभा होता. प्राध्यापकांच्या लक्षात आले की सदर मनुष्य त्यांच्या कॅन्टीन मध्येच कामाला आहे. याने पण येवले चहा जॉईन केलं की काय? असाही विचार त्यांच्या मनात आला. पण, नंतर चौकशी केल्यावर समजलं की, कॅन्टीन वाल्याचेही आडनाव येवले आहे! मग काय सर्वजण 'येवले' यांचा चहा पिऊन तृप्त झाले.

© तुषार कुटे

Wednesday, July 3, 2019

साहेबांचे महत्वाचे काम

दोन आठवड्यांपूर्वीची गोष्ट आहे. उपप्राचार्य साहेबांच्या केबिनमध्ये बसलो होतो. साहेब आपल्या कामात अतिशय गुंग झालेले दिसत होते. बाहेर विद्यार्थ्यांचा गोंधळ ऐकू येत होता. साहेबांची सही घेण्यासाठी विद्यार्थी बाहेर ताटकळत उभे होते. त्यांच्यावर खेकसत शिपाई बोलला, 'शांत बसा रे... सरांचं महत्वाचं काम चाललंय!' मग मुलांनी थोडा गोंधळ कमी केला. 

साहेब नक्की काय महत्वाचं काम करतायेत, हे पाहण्यासाठी मी थोडं डोकावून साहेबांच्या संगणकात दृष्टी घातली. पाहिले तर... साहेब आपले मेलबॉक्स उघडून अतिशय तन्मयतेने लेन्स्कार्ट, पैसा बाजार, पॉलिसी बाजार, क्रेडिट कार्ड, नौकरी.कॉमचे मेसेजेस डिलीट करत होते!