Thursday, October 6, 2022

महाराष्ट्रात या आणि हिंदी शिका

ग्रामीण भागातील एका 'एमआयडीसी'मधील कंपनीत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे माझे दिवसभराचे सत्र होते. संध्याकाळी ते संपले त्यानंतर सहभागी कर्मचाऱ्यांपैकी एक जण मला भेटायला आला. तो केरळमधून अडीच वर्षांपूर्वी कामाच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये आला होता. शिवाय मी त्याच्याशी पूर्णपणे इंग्रजीत बोलत असलो तरी त्याचे माझ्याशी बऱ्यापैकी संभाषण हिंदी भाषेतून चालू होते. याचे मला आश्चर्य वाटले. म्हणून उत्सुकता म्हणून मी त्याला विचारले,
"Generally, Tamil and Malayalam people don't study and understand Hindi language. How can you speak Hindi so well?"
तर तो म्हणाला, "मेरे को केरला मे ढाई साल पहले हिंदी नही आती थी. यहा महाराष्ट्र मे आके हिंदी सीखी है!"
यावर मी त्याला विचारले, "So people around you are North Indians?"
माझा प्रश्न ऐकून तो किंचितसा हसला आणि बोलू लागला, "यहा के सभी लोग मराठी ही है लेकिन वो मुझसे हिंदी मे ही बोलते है. इस वजह से मुझे हिंदी आती है."


त्याचे बोलणे माझ्यासाठी धक्कादायक होते. पुणे जिल्ह्यातल्या एका ग्रामीण भागामध्ये राहणारा दक्षिण भारतीय माणूस अडीच वर्षांमध्ये उत्तम हिंदी बोलू शकतो. परंतु मराठीचा त्याला गंध देखील नव्हता. त्याच्याशी आजूबाजूचे सर्व मराठी लोक हिंदीमध्ये संभाषण साधायचे. ज्या भाषेला मल्याळम लोक काडीचीही किंमत देत नाही, ती भाषा मराठी लोकांनी या व्यक्तीला शिकवली होती.
खरंतर आपल्याच भाषेला तुच्छ समजणाऱ्या मराठी लोकांसाठी हा एक धडा आहे. समोरच्याला मराठी समजत नसेल तर थेट हिंदीत संभाषण करून आपलेच लोक आपल्या भाषेला दुय्यम दर्जा देताना दिसतात. पूर्वी मुंबई शहरामध्ये असणारे मराठीच्या अनासक्तीचे लोन आता हळूहळू महाराष्ट्रात इतरत्र देखील पसरताना दिसत आहे. महाराष्ट्राच्या राजेभाषेच्या भविष्यासाठी ही सर्वात मोठी धोक्याची घंटा आहे.
मराठी लोकांनो वेळीच सावध व्हा आपली भाषा आपल्याच राज्यात मरत आहे. त्याला जबाबदार पण आपणच आहोत.

No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com