Friday, March 4, 2022

द बुक ऑफ राम

#पुस्तक_परीक्षण
📖 दि बुक ऑफ राम
✍️ देवदत्त पटनायक (अनुवाद- चेतन कोळी)
📚 पेंग्विन रँडम हाऊस इंडिया, मंजुल पब्लिशिंग हाउस

देवदत्त पटनायक यांच्याविषयी यापूर्वी बरंच ऐकलेलं होतं. म्हणूनच त्यांच्या पुस्तकाविषयी उत्सुकता तर होतीच. तेव्हा त्यांचे 'द बुक ऑफ राम' हे पुस्तक हाती आले. अर्थातच नावावरून रामकथेवर अर्थात रामायणावर लिहिलेले हे पुस्तक आहे, हे लक्षात येईल. रामायण भारतीय लोकांसाठी काही वेगळा विषय नाही. राम हा भारतीयांच्या श्रद्धेचा विषय आहे. शिवाय अनेकांसाठी तो अस्मितेचा देखील आहे. यापूर्वी अनेकांनी रामकथेवर पुस्तके लिहिलेली आहेत. परंतु प्रत्येक लेखकाचा दृष्टीकोन वेगवेगळा दिसून येतो. देवदत्त पटनायक यांनी देखील रामायण याचे विस्तृत विवेचन या पुस्तकाद्वारे केलेले आहे. रामायणात घडलेल्या विविध घटनांची पार्श्वभूमी सहजपणे पुस्तकात लेखकाने मांडलेली आहे. दूरदर्शनवर पाहिलेल्या रामायणामुळे रामकथा चांगलीच लक्षात राहिली होती. त्यामुळे पुस्तक वाचून नवी काय अनुभवणार, हा देखील प्रश्न होता. परंतु या पुस्तकाद्वारे लेखकाच्या दृष्टिकोनातून रामायणाचे विविध पैलू लक्षात आले. एखादी घटना का घडली, किंबहुना ती घडल्यामुळे काय परिणाम झाले? अशा प्रश्नांची उत्तरे पटनायक यांनी या पुस्तकातून दिलेली आहेत.
विशेष म्हणजे मागच्या हजारो वर्षांमध्ये विविध प्रकारची रामायणे लिहिली गेली. प्रत्येक रामायणाचा गाभा वेगवेगळ्या असला तरी कथेमध्ये काहीसे बदल होतातच, याची देखील माहिती या पुस्तकामध्ये दिलेली आहे. रामायणातील विविध पात्रांचे दृष्टीकोण, विसंगती तसेच विचार करण्याची पद्धती देखील आपल्याला अनुभवता येते. राम हा कथेचा नायक असल्याने त्याच्या विविध पैलूंचा अभ्यास नव्याने करता येतो. पौराणिक कथांचा देखील संशोधनात्मक अभ्यास कसा करायचा, हे या पुस्तकातून निश्चितच समजते. शिवाय रामकथेतून अनेक गोष्टींची शिकवण देखील मिळते. कदाचित याचमुळे आज देखील भारतामध्ये रामकथा सातत्याने वाचल्या व ऐकल्या जातात.
सर्वात विशेष शिकवण अशी की, जेव्हा रामाचा बाण लागून रावण खाली कोसळतो तेव्हा त्याने म्हटलेली वाक्ये देवदत्त पटनायक यांनी खूप सुंदररित्या लिहिलेली आहेत. तो म्हणतो, 'रामा तू खऱ्या अर्थानं अतिशय योग्य असा विरोधक आणि पृथ्वीतलावर ची सर्वात शक्तिमान व्यक्ती आहेस. जिला स्वतःच्याच भावनांपासून अलिप्त राहता येऊ शकते. मी तुला नमस्कार करतो. माझ्याकडे अतिशय थोडा वेळ आहे कारण मी लवकरच मृत्युमुखी पडणार आहे. मात्र माझ्या आयुष्यात मी जे शिकलो त्याच्यापैकी सर्वात महत्त्वाची गोष्ट मी तुला शिकवणार आहे. ज्या गोष्टींपासून नुकसान होईल अशा गोष्टींचा मोह वाटणं किंवा या गोष्टी टाळणं हिताचं आहे. अशाच गोष्टींचं आकर्षण वाटणं, हे अज्ञानी मनाचे लक्षण आहे. हे सदैव ध्यानात ठेव. ज्या गोष्टींबद्दल आपल्याला प्रचंड आकर्षण वाटतं त्याच गोष्टींमुळे तुमचं नुकसान होतं, हे समजण्याची गरज आहे. ज्या गोष्टींपासून आपण दूर पळतो, ज्या गोष्टींबद्दल आपण दिरंगाई करतो अशाच गोष्टी स्वतःचा विकास करण्यासाठी फायदेशीर ठरतात'. ही अतिशय महत्त्वाची शिकवण रावणाने रामाला दिली. विशेष म्हणजे आजही मनुष्य जातीसाठी ती आदर्श अशी शिकवणच आहे.
पुस्तकाच्या सर्वात शेवटच्या परिच्छेदांमध्ये लेखकाने जे लिहिले आहे ती रामायणातील खरी शिकवण म्हणून सांगता येऊ शकते.
आता आपल्याला सीतेची (मनाची) बंधनांतून सुटका करायची आहे. आपल्या बुद्धिरूपी हनुमानात दडलेल्या सर्व क्षमतांचा विकास करायचा आहे. जीवनरूपी सागर तरून जायचा आहे आणि रावणाच्या लंकेवर (अहंकाराच्या साम्राज्यावर) विजय मिळवायचा आहे, त्याची सोन्याची लंका जाळून तिचं रामाशी पुनर्मीलन घडवून आणायचं आहे ... कारण राम आपल्या अंतर्यामीच आहे, तो आपल्यातल्या 'स्व'त्वापर्यंत पोहोचण्याची वाट पाहतोय.
या रामाला आपण केवळ एका काव्यामध्ये किंवा एका स्थानापुरतं मर्यादित ठेवू शकत नाही. तो तर स्थळकाळाच्या मर्यादेपलीकडे आहे. तो सर्वव्यापी आहे. तो म्हणजे दुसरातिसरा कुणी नसून आपलाच आत्मा, परमचैतन्य आहे. तोच आपलं खरं अस्तित्व आहे. तोच आपल्यामध्ये प्राण ओततो आणि आपलं साक्षिभावानं निरीक्षण करतो.
आपण जेव्हा या रामाची प्रचिती घेऊ, तेव्हा राजकीय विजयाची आपल्या मनातली इच्छा लोप पावते. आणि तेव्हा आपलं मन प्रेमानं, समजेनं आणि सर्वांप्रतिच्या भूतदयेनं भरून जातं. त्या वेळी धर्म अधिराज्य गाजवतो, आणि रामराज्याची स्थापना होते ... आपल्या अंतर्यामीसुद्धा आणि सभोवतीसुद्धा!

© तुषार भ. कुटे  



2 comments:

to: tushar.kute@gmail.com