Tuesday, January 10, 2023

खेड्याकडे चला

एका मराठी वृत्तपत्रामध्ये नुकतीच प्रसिद्ध झालेली ही बातमी. मागच्या काही वर्षांमध्ये वेगाने होणाऱ्या शहरीकरणामुळे सध्या जगामध्ये कोणती परिस्थिती ओढवली आहे, याचा अंदाज या बातमीने येऊ शकतो. जगातील सर्वाधिक लोकसंख्या असणारे शहर म्हणजे जपानची राजधानी टोकियो होय. आज टोकियो शहरामध्ये साडेतीन कोटी लोक राहतात. म्हणून प्रशासनाला इतकी लोकसंख्या नियंत्रण करणे व त्यांच्या सोयीसुविधा पाहणे अवघड होत चाललेले आहे. म्हणूनच अधिकाधिक लोकसंख्येला खेड्याकडे वळवण्यासाठी जपान सरकार विविध योजना आखत आहेत. पण सध्याची परिस्थिती पाहता जनतेचा प्रतिसाद हा अतिशय अल्प असाच आहे.
मागील काही दशकांपासून भारतामध्ये देखील शहरीकरणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अनेक शहरांची सीमारेषा रुंदावत चाललेली आहे. मुंबईसारखी शहरे तर आता काही वर्षात राहण्यासारखी देखील राहणार नाहीत. कसेही असलं तरी शहरांमध्येच राहायचं, असा अनेकांचा अट्टाहास देखील बनत चाललेला आहे. अनेक तरुणांना शहरात राहत नसेल तर लग्नासाठी कोणी मुलगी देखील देत नाही! एकंदर काय भविष्यात शहरीकरण ही समस्या अधिक बिकट होताना दिसणार आहे. कदाचित पुढील काही वर्षांमध्ये आपल्या देशामध्ये देखील सरकारला शहरीकरण थांबवण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना कराव्या लागतील. अर्थात ही समस्या अजून तरी सरकारची डोकेदुखी बनलेली नाही. त्यांच्याकडे येणाऱ्या पैशाचा ओघ वाढतो आहे. पण त्याबरोबरच सोयी सुविधांवर ताण आल्यानंतर कदाचित परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. म्हणून वेळीच सावध होणे व योग्य उपाययोजना करणे, हाच त्यावरील सर्वोत्तम इलाज ठरू शकतो.


 

No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com