Tuesday, February 14, 2023

भिरकीट

गावातील सर्वांना परिचित, सर्वांची कामे करणारा तसेच सर्वांना योग्य तो सल्ला देणारा व्यक्ती म्हणजे तात्या होय. याच गावामध्ये जब्बर अण्णा हे सर्वात लोकप्रिय व्यक्तिमत्व! परंतु वयोवृद्ध झाल्यामुळे आता ते अंथरुणाला खेळून आहेत. त्यांचा मोठा मुलगा आणि सून त्यांची काळजी घेत आहेत. तर लहान मुलगा व त्याची बायको मुंबईला राहत आहेत. अचानक एक दिवस जब्बर अण्णा यांचा मृत्यू होतो. सर्वत्र ही बातमी पसरते. गावातील बहुतांश लोक शोकाकुल होतात. त्यांचा बाहेर गावाकडील मुलगा आणि मुलगी देखील अंत्ययात्रेला येतात. प्रत्येकाचा दृष्टिकोन, भावना निरनिराळे असतात. शिवाय अनेकांच्या वागण्यातून स्वार्थीपणा डोकावत राहतो. गावातील निवडणुका जवळ आलेल्या असतात आणि त्याकरता गावातील प्रतिष्ठित राजकारणी बंटीदादा यांना इलेक्शनचा वाजत गाजत फॉर्म भरायचा असतो. परंतु सर्व गावाचेच कुळ एक असल्यामुळे सर्वांना सुतक पडलेले असते. आता करायचे काय, म्हणून जगभर अण्णांच्या तेराव्याचा विधी तीनच दिवसांमध्ये उरकून घेण्याचे ठरले जाते. यात वाद प्रतिवाद होतात. पण बंटी दादाचे म्हणणे ऐकण्यास सर्वांना भाग पडते. यामध्ये तात्याची भूमिका अतिशय महत्त्वपूर्ण ठरते.
जब्बर अण्णांची बायको त्यांच्या मृत्यूपासून सुन्न अवस्थेत गेलेली असते. तीन-चार दिवसांपासून चाललेला गोंधळ ती पाहत असते. आपल्या पतीविषयी कोणाला किती आपुलकी आहे, याची देखील तिला जाणीव होत असते. दोनच दिवसांमध्ये आपली मुले संपत्तीची वाटणी करून तिची परस्पर विक्री करायला निघालेली आहेत, हे देखील ती उघड्या डोळ्यांनी पाहत असते. कदाचित हे तिला कालांतराने सहन होत नाही. ज्या माणसाने गावातील बहुतांश तरुणांना मुंबईमधील गिरणीमध्ये कामाला लावले त्याच्या अंतिम समयी चाललेला गोंधळ तिलाही बघवत नाही. यातून ती एक महत्त्वाचा निर्णय घेते आणि चित्रपट संपतो.
तात्याची महत्त्वपूर्ण आणि मध्यवर्ती भूमिका गिरीश कुलकर्णी यांनी साकारलेली आहे. ती देखील त्यांच्या नेहमीच्या ग्रामीण शैलीमध्ये. चित्रपटातील प्रसंग व त्यातील भावभावनांचे चित्रण तसेच सर्वच कलाकारांचा अभिनय उत्तम जुळून आला आहे. विनोदाबरोबरच गांभीर्याची फोडणी देताना दिग्दर्शकाने कथेचा योग्य मेळ घातल्याचे दिसते. शेवटमात्र आपल्याला चुटपुट लावून जातो.


 

No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com