Sunday, March 6, 2022

पावनखिंड चित्रपट का पाहावा?

पावनखिंड हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून मागच्या दोन आठवड्यांमध्ये चित्रपटाविषयीच्या तसेच चित्रपट आवडल्याच्या प्रशंसक पोस्ट मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर येत आहेत. एखाद्या मराठी चित्रपटाविषयी मागील काही वर्षांमध्ये मराठी प्रेक्षक भरभरून बोललेले नाहीत. पावनखिंडने मात्र ही कमी भरून काढली. त्याबद्दल मराठी प्रेक्षकांचे धन्यवादच म्हणायला हवेत. अर्थात एकंदरीत चित्रपट लोकांना आवडतो आहे, ही निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळे मी चित्रपटाचे परीक्षण करत बसणार नाही. माझा महत्त्वाचा प्रश्न आहे की, पावनखिंड चित्रपट का पाहावा?
मागच्या काही वर्षांपासून नवी पिढी ही शालेय शिक्षणात मातृभाषेपासून दुरावलेली दिसते. सर्वांनाच हे इंग्रजीच वेड लागलेलं आहे. इंग्रजीत शिकलं की आपण फार मोठे होऊ शकतो, अशी भावना अनेकांच्या मनात रुजू होताना दिसते आहे. त्यामुळेच येणारी नवीन पिढी आता आंतरराष्ट्रीय इंग्रजी शाळांमध्ये शिकताना दिसते आहे. याच आंतरराष्ट्रीय इंग्रजी शाळांमध्ये महाराष्ट्राचा तसेच मराठ्यांचा इतिहास कितपत शिकवला जातो, हा देखील मोठा प्रश्न आहे. त्यांच्या शालेय इतिहासामध्ये मोगलांच्या गौरवशाली(?) इतिहासाबरोबर दोन वाक्यात शिवाजी महाराजांचा इतिहास सांगितला जातो. तोही औरंगजेब सारख्या 'महान' बादशहाला त्रास देणारा एक माणूस दक्षिणेमध्ये होता, असा सारांशरुपी इतिहास तुमच्या मुलांना समजणार आहे. म्हणजेच त्यांच्या लेखी महाराष्ट्राच्या इतिहासाची किंमत शून्य आहे. याच कारणास्तव महाराष्ट्राच्या नवीन मराठी पिढीला आपला इतिहास समजणारच नाही.
भारताच्या एकंदरीत जडणघडणीमध्ये महाराष्ट्राचे सर्वोच्च योगदान राहिलेले आहे. महाराष्ट्राची परंपरा संघर्षाची, बलिदानाची, आत्मसमर्पणाची व अत्युच्च राष्ट्रवादाची आहे, हे आजवर महाराष्ट्राच्या इतिहासाने पाहिले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पराक्रमी तेजस्वी पुरुष या मातीत जन्मला, हे आपले भाग्यच म्हणावे लागेल. परंतु आंतरराष्ट्रीय इंग्रजी पुस्तके या इतिहासाला क्षुल्लक महत्त्व देतात. मग आपला इतिहास आपल्या पुढच्या पिढीला समजणार तरी कसा? इंग्रजीमध्ये तयार होणारे काल्पनिक चित्रपट आणि काल्पनिक हिरो यातच नवी पिढी गुंगवून ठेवायची का? आपले दिवंगत खरे खरे हिरो या पिढीला कधी समजणार? त्यांचा पराक्रम पुढच्या पिढीला दाखवायचा असेल तर शिवकालावर आधारित असे अनेक चित्रपट तयार व्हायला हवेत. तसेच मराठी पालकांनी ते आपल्या पाल्यांना दाखवायला देखील हवेत. तरच आपले पूर्वज किती पराक्रमी होते, याची माहिती नवीन पिढीला होईल.
पाश्चिमात्य देशांमध्ये होऊन गेलेल्या महापुरुषांइतकेच किंबहुना त्याहीपेक्षा तेजस्वी महापुरूष महाराष्ट्राच्या मातीत जन्मले. परंतु महाराष्ट्रीय जनतेला आजही त्यांची माहिती नाही. आपण ऐतिहासिक पुस्तके वाचत नाही. त्यामुळे चित्रपट हे सर्वसामान्यांसमोर आपला जाज्वल्य इतिहास पोचविण्याचे सर्वोत्तम माध्यम आहे. यापुढेही शिवाजी महाराजांवर आधारित अनेक चित्रपट तयार होतील. त्यातून मराठ्यांच्या पराक्रमाची गाथा मांडली जाईल. या चित्रपटांना देखील असाच प्रतिसाद मिळत राहो व आपला इतिहास सर्वदूर पोहोचो, हीच अपेक्षा.
टीप: तुम्हाला कोणताही मराठी चित्रपट आवडला असल्यास त्याचे रेटिंग आयएमडीबी (IMDB) या आंतरराष्ट्रीय वेबसाईटवर नक्की द्या! आपल्या चित्रपटाची प्रशंसा आपण केली तरच जग करेल, हे लक्षात असू द्या. 



1 comment:

  1. Aho, sagla utkrushtha astana Hindu Muslim vadapaav kashala ghusavla director ne. Trailer madhe ek dialog aahe na "Kasam lete hai Shivaji Maharaj ko chhudake layenge". Pawar saheb ani company sattet asle ki asli utpadane vikli jatat.

    ReplyDelete

to: tushar.kute@gmail.com