Wednesday, June 15, 2022

एक विशेष संवाद

'पायथॉन प्रोग्रॅमिंग' या मराठीतील माझ्या पुस्तकाची 'लिंक्डइन'वर मी पोस्ट केली होती. अनेक मराठी तसेच अमराठी तंत्रज्ञांकडून त्यावर लाईक, कमेंट्स आणि शेअर्सचा पाऊस पडला. त्यामुळे ती अधिकाधिक लोकांकडे पोहोचण्यास मदत झाली. मराठी लोक आपल्या भाषेतून तंत्रज्ञान शिकण्यास व समजावून घेण्यास उत्सुक आहेत, ही बाब समाधानाची होती. परंतु काही अमराठी लोकांनी देखील आमच्या या प्रयत्नाची प्रशंसा केली.
बंगळुरूमधील 'डेटा सायन्स'मध्ये काम करणाऱ्या एका कन्नड अभियंत्याशी झालेला संवाद मला विशेष महत्त्वाचा वाटतो. त्याने आग्रहाने माझ्याकडून माझा मोबाईल नंबर घेतला होता आणि मी दिलेल्या वेळेवरच मला फोन केला. त्याने युरोपमधील फ्रान्स आणि जर्मनी सारख्या देशांचे दौरे केले होते. तिथल्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी व तंत्रज्ञान शिक्षण हे त्यांच्याच भाषेमध्ये दिले जातं. इंग्रजी भाषा ते वेगळी ट्युशन लावून शिकत असतात. याच कारणास्तव तंत्रज्ञानातील अनेक मूलभूत तत्वे त्यांची पक्की झालेली असतात. परंतु भारतात मात्र परिस्थिती अगदीच उलटी आहे. आपण अभियांत्रिकी असो व मेडिकल असो कायदा, वाणिज्य, विज्ञान असो किंवा औषधनिर्माणशास्त्र असो सर्वच गोष्टीत इंग्रजीमधून शिकवत असतो. इंग्रजी ही जगाची भाषा आहे, असं आपल्याला वाटतं. त्यात खोटं काहीच नाही. ती एक संवादाची भाषा आहे. परंतु ज्ञानग्रहण करायची असल्यास स्वभाषा हीच सर्वोत्तम भाषा होय. ज्यामधून आपल्याला सर्व गोष्टी नीट समजतात. परंतु भारतात असं कुठेही होताना दिसत नाही, याबद्दल त्याने खंतही व्यक्त केली. आपल्यासारख्या तंत्रज्ञांनी यासाठी पुढाकार घ्यायला हवा. अधिकाधिक ज्ञान भारतीय भाषांमध्ये यायला हवं. याविषयीही तो आग्रही होता. इंग्रजीमध्ये बहुतांश जणांना समजत नसल्याने ते केवळ रट्टा मारून परीक्षा देतात व पास होतात. आज अभियांत्रिकी शिक्षण घेणारे सत्तर टक्‍क्‍यांपेक्षा अधिक विद्यार्थी केवळ प्रश्नांची उत्तरे पाठ करूनच परीक्षा देत असतात. अशी परिस्थिती भारतातील सर्वच राज्यांमध्ये आहे. याच कारणास्तव भारतामध्ये मनुष्यबळ पुरेसे असले तरी ज्ञानाधारित पिढी तयार होताना दिसत नाही. उलट भारतीय भाषांमधून शिकवले तर ते अधिक उत्तमरीत्या समजू शकतात, असेही त्याला वाटत होते. मी देखील त्याच्या या मताशी शंभर टक्के सहमत आहे. आज भारतातील अभियांत्रिकी व तंत्रज्ञान संस्थांमधील बहुतांश विद्यार्थी ज्ञानग्रहण करतच नाही. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांच्या पदव्यांना केवळ एक प्रिंट केलेला एक आकर्षक कागदी तुकडा म्हणता येईल. आणि मग आम्हाला नोकरी का मिळत नाही? या प्रश्नाचे उत्तर ते दुसऱ्या कुणावर तरी सोपवून मोकळे होतात. यातून सुयोग्य मार्ग काढण्याची गरज आहे. शासनाने देखील थोडे सर्वेक्षण केले तरी त्यांना चांगला मार्ग सापडू शकतो.
(टीप: आमचा हा पूर्व संवाद इंग्रजीतून झाला!)

Ⓒ Ⓐ  तुषार भ. कुटे

No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com