Tuesday, May 5, 2026

राजा शिवाजी

एक मे रोजी प्रदर्शित झालेल्या रितेश देशमुख दिग्दर्शित 'राजा शिवाजी' या चित्रपटाबद्दल समाजमाध्यमांवर भरभरून लिहिले जात आहे, बोललं जात आहे. अर्थात चित्रपट अतिशय मेहनतीने आणि उत्तमरीत्या बनवलेला आहे, यात शंका नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अवघ्या मराठी माणसांना व्यवस्थित ज्ञात आहे. तरीदेखील आपल्या राजाचे कर्तृत्व मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी मराठी लोक गर्दी करत आहेत, यातच या चित्रपटाचे यश आहे.



हा चित्रपट शिवकाळावर आधारित असणाऱ्या अन्य चित्रपटांपेक्षा काही विशेष कारणांमुळे वेगळा ठरतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे रितेश देशमुखने हा चित्रपट प्रामुख्याने मराठी भाषेमध्ये तयार केला. आजवरच्या अनुभवावरून असं लक्षात येतं की बॉलीवूडच्या चित्रसृष्टीमध्ये काम करणाऱ्या कोणत्याही मराठी दिग्दर्शक अथवा निर्मात्याने मराठी भाषेत चित्रपट बनवलेला नाही. प्रत्येकाला स्वतःच्या भाषेपेक्षा पैशाचं गणित महत्त्वाचं वाटतं. शिवाय मराठी चित्रपट म्हणजे भली मोठी जोखीम आहे, असे देखील वाटत असावं. परंतु रितेश देशमुखने मराठी प्रेक्षकांवर भरवसा ठेवून आपल्या भाषेमध्ये भव्यदिव्य चित्रपट तयार केला, याबद्दल त्याचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. दक्षिण भारतीय असो वा उत्तर भारतीय भाषेतील चित्रपटसृष्टी असो यात मराठी चित्रपट कुठेही मागे पडत नाही, हेच या निमित्ताने अधोरेखित झाले. शिवाय स्वतःला महान समजणाऱ्या बॉलीवूडच्या चित्रसृष्टीमधून देखील बरेच कलाकार या चित्रपटांमध्ये दिसून आले. अनेकांना तर रितेशने मराठीदेखील बोलायला लावले. ही गोष्ट मला जास्त महत्त्वाची वाटते. सातत्याने मराठी चित्रपटसृष्टीला दुय्यम दर्जा देणाऱ्या कलाकारांना या निमित्ताने का होईना मराठी चित्रपटांचे महत्त्व समजेल.
चित्रपटाची सुरुवात शिवजन्मामागील एका भल्या मोठ्या पार्श्वभूमीने होते. आपल्याला शिवजन्मानंतरचा अर्थात शिवाजी महाराजांच्या कालखंडातील महाराष्ट्र माहित आहे. परंतु त्यापूर्वी या राज्यात नक्की काय घडले होते? लखोजी राजे जाधव तसेच शहाजीराजे यांच्या कारकिर्दीची पार्श्वभूमी देखील या चित्रपटामध्ये दाखविण्यात आलेली आहे. पहिल्या प्रसंगापासून ते अंतिम प्रसंगापर्यंत आदिलशाही सरदार अफझलखान हा प्रमुख खलनायक म्हणून लक्षात राहतो.
महाराष्ट्रावर सातत्याने वर्चस्व गाजविण्याचा प्रयत्न करणाऱ्या आदिलशाही, निजामशाही आणि मुघलांसारख्या परकीय आक्रमकांमधील चढाओढ या चित्रपटामध्ये सुंदररित्या मांडलेली आहे. सर्वात विशेष म्हणजे शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजीराजे यांची महाराष्ट्राला माहीत नसलेली कारकीर्द देखील ठळकपणे पाहता येते. जे आजवर कोणत्याही चित्रपटांमध्ये दाखविले गेले नाही. संभाजीराजे देखील शिवाजी महाराजांसोबत महाराष्ट्रामध्ये असते तर? अशा प्रश्नाचे उत्तर देखील आपण शोधू लागतो. 
सतराव्या शतकातील भला मोठा कालखंड या चित्रपटाने दाखवला आहे. कदाचित याच कारणास्तव काही घटनांना जास्त लांबी देता आलेली नाही. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाला केंद्रस्थानी ठेवून तयार केलेला हा चित्रपट निश्चितच एकदा नाही तर अनेकदा पाहण्यासारखा आणि दाखविण्यासारखा देखील आहे. कलाकारांच्या अभिनयाबद्दल बोलायचे झाले तर काही कलाकारांचे मराठी उच्चार वगळता ते इतरत्र कुठेही कमी पडत नाहीत. 
चित्रपटाची सध्याची एकंदरीत प्रगती पाहता लवकरच तो १०० कोटीचा पल्ला गाठेल, याची शक्यता आहे. अर्थात मराठी भाषेतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरेल, यात देखील शंका नाही.

--- तुषार भ. कुटे