Showing posts with label story. Show all posts
Showing posts with label story. Show all posts

Tuesday, May 6, 2025

जॉर्ज डॅन्टझिग

कोलंबिया विद्यापीठातील एका गणिताच्या वर्गात एक विद्यार्थी झोपून गेला आणि त्याच्या वर्गमित्रांच्या बोलण्याने जागा झाला. तास संपल्यावर त्याने पाहिले की प्राध्यापकांनी फळ्यावर दोन प्रश्न लिहिले आहेत. त्याने वाटले की हे गृहपाठ आहेत, म्हणून त्याने नंतर सोडवण्यासाठी ते आपल्या वहीत उतरवून घेतले.
जेव्हा त्याने पहिल्यांदा ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याला ते खूप कठीण वाटले. तरीही, त्याने चिकाटी सोडली नाही. संदर्भ गोळा करण्यासाठी आणि अभ्यास करण्यासाठी ग्रंथालयात तासनतास घालवले. पूर्णवेळ तो त्या प्रश्नाच्या मागे लागला होता.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे पुढच्या दिवशी प्राध्यापकांनी गृहपाठाबद्दल वर्गात विचारले नाही. शेवटी उत्सुकतेपोटी विद्यार्थी उभा राहिला आणि म्हणाला, "सर, तुम्ही मागील तासाच्या असाइनमेंटबद्दल का विचारले नाही?"
प्राध्यापकांनी उत्तर दिले, "ते अनिवार्य नव्हते. मी फक्त गणिताच्या अशा समस्यांची उदाहरणे देत होतो, ज्यांची विज्ञानाने आणि शास्त्रज्ञांनी अजूनपर्यंत उकल केली नाही."
त्यांच्या या बोलण्याने विद्यार्थ्याला धक्का बसला. तो म्हणाला, "पण मी त्यापैकी प्रश्न एक चार पेपर्समध्ये सोडवला आहे!"
त्याने शोधलेल्या उपायाचे श्रेय शेवटी त्याला देण्यात आले आणि कोलंबिया विद्यापीठात त्याची नोंद करण्यात आली. या विषयावर त्याने लिहिलेले चार पेपर्स अजूनही संस्थेत प्रदर्शित केलेले आहेत.
विद्यार्थी तो प्रश्न सोडवू शकला, याचे मुख्य कारण म्हणजे त्याने प्राध्यापकांना "कोणीही उपाय शोधला नाही" असे म्हणताना ऐकले नव्हते. त्याऐवजी, त्याला विश्वास होता की ही सोडवण्यासारखी समस्या आहे आणि त्याने निराशेविना त्यावर काम केले, ज्यामुळे त्याला यश मिळाले.
ही गोष्ट एक शिकवण देते: जे तुम्हाला सांगतात की तुम्ही काहीतरी साध्य करू शकत नाही त्यांचे ऐकू नका, कारण आजकाल अनेक तरुण नकारात्मकता आणि शंकेने घेरलेले आहेत. काही लोक हेतुपुरस्सर अपयश आणि निराशेची बीजे पेरतात.
तुमच्यात तुमची ध्येये साध्य करण्याची, अडचणींवर मात करण्याची आणि तुमच्या आकांक्षा पूर्ण करण्याची शक्ती आहे. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रयत्न करत राहा.

तो विद्यार्थी जॉर्ज डॅन्टझिग होता आणि तो प्रश्न मॅथ स्टॉक एक्सचेंजमधून आला होता.
"डॅन्टझिगने दाखवून दिले की, स्टुडंटच्या टी-टेस्टच्या संदर्भात, ज्याची पॉवर स्टँडर्ड डिव्हिएशनपासून स्वतंत्र असेल अशी हायपोथिसिस टेस्ट तयार करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे एक नल टेस्ट वापरणे, ज्यामध्ये नेहमीच रिजेक्ट करण्याची किंवा रिजेक्ट करण्यात अयशस्वी होण्याची समान शक्यता असते, जी अर्थातच व्यावहारिक नाही!"


 

Tuesday, February 25, 2025

बुद्धाची गोष्ट

बऱ्याच दिवसांपासून मराठीतील जुन्या लेखकांचं काही वाचलं नव्हतं म्हणून वि. स. खांडेकर यांचा “बुद्धाची गोष्ट” हा कथासंग्रह वाचायला घेतला. अर्थातच खांडेकरांच्या सिद्धहस्त लेखणीतून अवतरलेल्या कथा मनात घर करणाऱ्या अशाच आहेत. एकूण नऊ कथांपैकी पुस्तकाचे शीर्षककथा असणारी “बुद्धाची गोष्ट” म्हणजे काहीतरी खासच.
सुरुवातीला वाटतं की गौतम बुद्धांविषयी ही कथा लिहिलेली असावी. परंतु प्रत्यक्षात गौतम बुद्धांच्या जीवनावर भाषण ठोकणाऱ्या एका लहान मुलाची ही गोष्ट आहे. लहान मुलांचं मन अर्थातच निरागस असतं. एका अर्थाने प्रत्येक गोष्टीकडे ते तटस्थपणे बघू शकत असतात. त्यांचा मेंदू शिकण्याच्या अवस्थेमध्ये असतो. आणि विशेष म्हणजे त्यांची सदसदविवेकबुद्धी देखील जागृत असते. बुद्धाचे जीवन आणि आपलं जीवन यामधील फरक त्याला समजायला लागतो. त्यातूनच बुद्धदेखील कळू लागतो. तो का महान होता? त्यांनी असं का केलं? अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे तो स्वतःच शोधू लागतो. आणि यातूनच आपल्याला देखील बुद्ध कळतो. असा सारांशरुपी गोषवारा या कथेबद्दल सांगता येईल. याव्यतिरिक्त आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचे अवलोकन खांडेकरांनी प्रवाह, आकाश, फत्तर, वेग, पाप, अपघात, ओलावा आणि सूर्यास्त अशा विविध कथांमधून केले आहे. वाचनमग्न होत असताना आपण ही कथा समोरच पडद्यावर अनुभवत आहोत की काय, याची अनुभूती देखील येते.

--- तुषार भ. कुटे

 

Wednesday, October 23, 2024

झांबळ

‘घनदाट माणसांचं भाव विश्व उलगडणार्‍या कथा’ अशी टॅगलाईन असणारा “झांबळ” हे पुस्तक वाचायला सुरुवात केली.. पहिली कथा संपली आणि तिने मनात घर केले. मग काय लगेचच बाकीच्याही कथा वाचून काढल्या.

असं बऱ्याचदा होतं की कोणत्याही कथासंग्रहातील एखादी कथा वाचली की पुढच्याही कथा वाचाव्याशा वाटतात. खरंतर ही लेखकाच्या लेखनाची किमया आहे. आपल्या शब्दांनी तो वाचकाला खिळवून ठेवतो, प्रसंगांमध्ये गुंतवून ठेवतो. कथेतील प्रत्येक प्रसंग, घटना आपल्यासमोर उभी राहते. जणू काही ती आपल्यासमोरच किंवा आपल्या भोवतालीच घडत आहे, असं जाणवत राहतं. या पुस्तकाच्या बाबतीतही माझं असंच काहीतरी झालं.

या कथासंग्रहातील कथांना पूर्णतया ग्रामीण पार्श्वभूमी आहे. त्यातील प्रसंग गावच्या मातीत घडलेले आहेत. यात निरनिराळ्या प्रकारची माणसे आपल्याला भेटतात. त्यांच्या मानसिक भावभावनांचे दर्शन होते. गावाकडील मातीत जन्मलेल्या, रुजलेल्या आणि रुळलेल्या कोणालाही या कथा सहज भावतील. किंबहुना त्यातील अनेक प्रसंग त्यांनी अनुभवलेले देखील असतील. याच कारणास्तव त्या आपल्याला अधिक जवळच्या वाटतात. आपल्या भोवतालच्या अनेकविध माणसांचा आपण त्यांच्याशी संबंध जुळवू शकतो. बहुतांश कथा आपल्या काळजालाच हात घालतात. एकंदरीत लेखकाची लेखनशैली ही अतिशय उच्च दर्जाची जाणवते. यापूर्वी मला केवळ आनंद यादव, व्यंकटेश माडगूळकर आणि वि. वा. शिरवाडकर यांच्याच कथांमध्ये अशी शैली अनुभवता आली होती. समीर गायकवाड यांची शैली देखील याच पठडीतील आहे. कोणत्याही प्रसंगांचे किंवा व्यक्तीचे वर्णन करताना अतिशय सुयोग्य आणि चपखल शब्द ते वापरतात. जेणेकरून तो मनुष्य आपल्या डोळ्यासमोरच उभा राहतो. एकदा त्याची प्रतिमा तयार झाली की प्रसंग देखील आपल्या मनात तयार व्हायला लागतात.

यातील प्रत्येक कथेची एक कादंबरी होण्यासारखी आहे. अर्थात यात वेगाने घडणाऱ्या घटना आहेत, प्रसंग आहेत आणि आपल्याला मिळणारा बोध देखील आहे! एकाच पुस्तकामध्ये २२ कादंबऱ्या वाचण्याचा योग आपल्याला अनुभवता येतो! ‘हायवे’ ही कथा भयकथा या प्रकारात मोडू शकते. अन्य सर्व सामाजिक आणि ग्रामीण कथा आहेत. 

कथा संपते तेव्हा मनाला काहीशी हुरहुर देखील ती लावून जाते. यातच लेखकाच्या लेखणीचे आणि लेखनशैलीचे खरे यश आहे.



Sunday, February 5, 2023

दोन कथा ऐका...

दोन कथा ऐका...

1. नोकियाने अँड्रॉइडला नाकारले
2. 'याहू'ने गुगलला नकार दिला

कथा संपली!

शिकलेले धडे:
1. जोखीम घ्या
2. बदल स्वीकारा
3. जर तुम्ही वेळेनुसार बदलण्यास नकार दिला तर तुमचा नाश होईल!

आणखी २ कथा

1. फेसबुकने व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्राम विकत घेतले
2. 'मिंत्रा' ने जबॉन्ग विकत घेतले, फ्लिपकार्टने मिंत्रा आणि नंतर वॉलमार्टने फ्लिपकार्ट विकत घेतले

कथा संपली

शिकलेले धडे:
1. इतके शक्तिशाली व्हा की तुमचे प्रतिस्पर्धी तुमचे सहयोगी बनतील.
2. वरच्या स्थानावर पोहोचा आणि नंतर स्पर्धा काढून टाका.

2 आणखी कथा

1. कर्नल सँडर्स यांनी वयाच्या 65 व्या वर्षी KFC सुरू केले
2. जॅक मा, ज्यांना KFC मध्ये नोकरी मिळू शकली नाही, त्यांनी अलीबाबाची स्थापना केली

कथा संपली

शिकलेले धडे:
1. वय फक्त एक संख्या आहे
2. जे प्रयत्न करत राहतात तेच यशस्वी होतात

शेवटचे पण अतिशय महत्वाचे,

1. फेरारीचे संस्थापक एन्झो फेरारी यांनी ट्रॅक्टर मालकाचा अपमान केला
2. ट्रॅक्टर मालकाने लॅम्बोर्गिनीची स्थापना केली

कथा संपली

शिकलेले धडे:
1. कधीही कोणालाही कमी लेखू नका
2. यश हा सर्वोत्तम बदला आहे

सर्वांचा आदर करा !!
तुमचा वेळ हुशारीने गुंतवा !!
मेहनत करत रहा !!
शिकत रहा आणि वाढत रहा !!

तुमची वेळ येईल !



(संकलित)
- तुषार कुटे


 


Thursday, January 19, 2023

रंगा-पतंगा

विदर्भातल्या ग्रामीण भागातलं एक पोलीस स्टेशन. या पोलीस स्टेशनमध्ये एक गरीब शेतकरी आपल्या रंगा आणि पतंगा हरविल्याची तक्रार घेऊन आला आहे. परंतु पोलीस अधिकाऱ्याला जेव्हा समजते की रंगा आणि पतंगा हे दोघेही बैल आहेत, तेव्हा तो त्या शेतकऱ्याला हाकलवून लावतो आणि त्याची तक्रार लिहून घेत नाही.
लहानपणापासून मुलांच्या मायेने जपलेली बैलजोडी हरवते तेव्हा शेतकरी सैरभैर होतो. ते काहीही करून सापडले पाहिजेत, याकरिता तो निरनिराळ्या क्लुप्त्या वापरायला सुरुवात करतो. त्यांच्याशिवाय त्याला व त्याच्या पत्नीलाही अन्न गोड लागत नाही. रंगा आणि पतंगा हरवल्याची बातमी जेव्हा मीडियाला समजते, तेव्हा ती न्यूज चॅनेलची हेडलाईन होऊन जाते. तिला वेगवेगळ्या वाटा फुटू लागतात. धार्मिक आणि सामाजिक रंग दिला जातो. यामध्ये अनेक जण आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करतात. पोलीसही यामध्ये भरडले जातात. परंतु कसोशीने प्रयत्न करून ते या केसचा छडा लावतात. त्यातून काय सत्य बाहेर येते, हे चित्रपट पाहिल्यावरच समजेल.
प्रसाद नामजोशी यांनी दिग्दर्शन चांगले केले आहे. शेतकरी जुम्मनच्या मुख्य भूमिकेमध्ये मकरंद अनासपुरे पूर्णपणे फिट बसतो. त्याने भूमिकेला पूर्ण न्याय दिला आहे.



Saturday, December 24, 2022

ज्ञानाची किंमत

झिम्बाब्वेमध्ये एका दरोड्यादरम्यान बँक दरोडेखोर बँकेतील सर्वांना ओरडून म्हणाले: "हलू नका. पैसे देशाचे आहेत. पण जीव तुमचा आहे."

बँकेतील सर्वजण शांतपणे खाली पडले. याला म्हणतात "माइंड चेंजिंग कन्सेप्ट"... परंपरागत विचार पद्धती बदलणे.

जेव्हा एक महिला प्रक्षोभकपणे टेबलावर पडली, तेव्हा दरोडेखोर तिच्यावर ओरडले: "कृपया सभ्यपणे वागा! हा एक दरोडा आहे, बलात्कार नाही!"

याला म्हणतात "व्यावसायिक असणे". फक्त तुम्ही काय करण्यासाठी प्रशिक्षित आहात? यावर लक्ष केंद्रित करा!

जेव्हा बँक दरोडेखोर घरी परतले, तेव्हा धाकटा दरोडेखोर (एमबीए प्रशिक्षित) मोठ्या दरोडेखोराला म्हणाला, "चल आपल्याला किती मिळाले ते मोजू."

यावर मोठा दरोडेखोर म्हणाला: "तू खूप मूर्ख आहेस. इतका पैसा आहे की मोजायला खूप वेळ लागेल. आज रात्री, टीव्हीवरील बातम्या सांगतील की आम्ही बँकेतून किती लुटले!"

याला "अनुभव" म्हणतात. आजकाल कागदी पात्रतेपेक्षा अनुभव महत्त्वाचा!

दरोडेखोर निघून गेल्यानंतर बँक मॅनेजरने बँक सुपरवायझरला त्वरीत पोलिसांना बोलवा असे सांगितले. पण सुपरवायझर त्याला म्हणाले: "थांबा! आपण स्वतःसाठी बँकेतून १ कोटी काढू आणि ते ७ कोटीमध्ये जोडू जे आपण यापूर्वी बँकेतून गहाळ केले होते."

याला "प्रवाहासह पोहणे" असे म्हणतात. प्रतिकूल परिस्थितीला आपल्या फायद्यासाठी रूपांतरित करणे!

सुपरवायझर म्हणाला, "दर महिन्याला दरोडा पडला तर चांगले होईल." याला "किलिंग बोरडम" म्हणतात. तुमच्या नोकरीपेक्षा वैयक्तिक आनंद महत्त्वाचा आहे.

दुसर्‍या दिवशी, टीव्हीच्या बातम्यांमध्ये सांगण्यात आले की, बँकेतून १० कोटी चोरले गेलेत!

दरोडेखोरांनी पैसे मोजले.. मोजले... मोजले, परंतु त्यांना फक्त दोन कोटींच मिळाले होते. दरोडेखोर खूप संतापले, "आम्ही आमचा जीव धोक्यात घालून फक्त २ कोटी चोरले. बँक मॅनेजरने ८ कोटींवर डल्ला मारला. चोर होण्यापेक्षा शिक्षित असणे चांगले आहे, असे दिसते!"

याला म्हणतात "ज्ञानाची किंमत सोन्याइतकी आहे!"

त्या दिवशी बँक मॅनेजर आणि सुपरवायझर सगळे हसत हसत आनंदात होते!!

(संकलित)


 

Thursday, June 2, 2022

मध्यरात्रीचे पडघम

रत्नाकर मतकरी यांच्या अकरा गूढकथांचा हा संग्रह आहे. या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्येच मतकरी यांनी गूढकथा या साहित्य प्रकाराचे अतिशय सुंदर विवेचन केलेले आहे. ही कथा म्हणजे केवळ रहस्य कथा व भूत कथा नसते. तिची स्वतःची वैशिष्ट्ये काय आहेत, हे देखील मतकरी यांनी स्पष्ट केलेले आहे. त्यांच्या प्रत्येक कथेमध्ये अपेक्षित गूढपणा जाणवत राहतो. 'मध्यरात्रीचे पडघम' शीर्षककथा ही या कथासंग्रहातील सर्वात शेवटची कथा आहे. 'काळ्या मांजराचं स्वप्न' या कथेतून त्यांनी मांजराच्या भावविश्वाचे चित्रण केले आहे. यातून लेखकाच्या कल्पनासृष्टीची व्याप्ती दिसून येते. अशी वेगळ्या धाटणीतली कथा सर्वात विशेष वाटते. शिवाय 'बाळ अंधार पडला' ही या कथासंग्रहातील सर्वात वेगळी कथा म्हणता येईल. अंतिम परिच्छेदामध्ये रहस्यभेद केल्यानंतर तो अनपेक्षित असतो. पुस्तकातील जवळपास सर्वच कथा या प्रकारामध्ये मोडतात. गुढकथांवर प्रेम करणाऱ्यांनी हा कथासंग्रह वाचलाच पाहिजे असा आहे.

Ⓒ Ⓐ  तुषार भ. कुटे 




Saturday, July 17, 2021

एक अपूर्ण आणि अद्भुत पावसाळी ट्रेक

Quora मराठी च्या "आठवणीतला पाऊस" स्पर्धेतील या वर्षीची दुसऱ्या क्रमांकाची कथा.
मूळ लिंक

 
हटकेश्वरनंतर जुन्नर मधील सर्वात उंच शिखर म्हणजे ढाकोबा डोंगर होय. जुन्नर मधल्या सर्व शिखरांवरून आणि किल्ल्यांवरून ढाकोबाचे दर्शन होते. त्यामुळे हाडाचे ट्रेकर असणाऱ्या आम्हाला ढाकोबाने नेहमीच भुरळ घातली होती. साधारणतः तीन वर्षांपूर्वी ढाकोबाचा ट्रेक आम्ही पूर्ण केला.
आंबोली हे जुन्नर मधलं सर्वात शेवटचं गाव. इथून पुढे सह्याद्रीच्या डोंगररांगा आहेत. निसर्गरम्य दाऱ्या घाट आहे. या घाटाच्या डाव्या बाजूने वर चढत गेलं की दूरवर ढाकोबा शिखर लागतं. हा अतिशय दुर्गम प्रदेश असल्याने त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी जंगलांच्या अवघड पायवाटा आहेत. शिवाय गाव सोडल्यानंतर शिखरापर्यंत कुठेही मनुष्यवस्ती दिसून येत नाही. कोकणकड्यावरच ढाकोबाचे शिखर असल्याने त्याचे रौद्रपण अधिकच जाणवते. या ट्रेकचा मनमुराद आनंद आम्ही तीन वर्षांपूर्वी घेतला. इथली निसर्गराजी मनमोहक अशीच होती. त्यामुळे पावसाळ्यात एकदा तरी या ठिकाणी यायचा आमचा मनोदय होता. त्याचप्रमाणे सन २०१९ च्या जुलै महिन्यामध्ये आमची पावसाळी ट्रेकची योजना तयार झाली. जुलैमध्ये पाऊस भरात आला होता. दिवसेंदिवस सूर्याचं दर्शनही दुर्लभ होत होतं. अशा वातावरणात पावसाळी ट्रेक आम्ही अनेकदा अनुभवला आहे. परंतु त्यादिवशीचा पावसाळ्यातील ढाकोबाच्या ट्रेक आम्हाला सदैव लक्षात राहील असाच ठरला.
एखाद्या ट्रेकसाठी जायचे असल्यास सहसा सुट्टीचे दिवस वगळूनच आम्ही जात असतो. त्या दिवशीही कोणतीही सुट्टी नव्हती. त्यामुळे कुठेही फारशी वर्दळ असण्याचा संभव नव्हता. जुन्नरवरून आंबोलीला जाण्यासाठी साधारण अर्धा ते पाऊण तास लागला. आंबोली गाव रिमझिम बरसणाऱ्या पावसामध्ये न्हावून निघालेले होते. तसा थेंबांचा वेग जास्त नव्हता. असा पाऊस या ठिकाणी नेहमीच बसत असतो. शिवाय तिन्ही बाजूंना उंच उंच कडे असल्याने सातत्याने तो धुक्यामध्ये राहतानाही दिसतो. अगदी सकाळीच सातच्या सुमारास आम्ही आंबोलीला पोहोचलो. मी, रजत आणि अक्षय असे आमचे त्रिकुट होते. आजवर केलेल्या सर्व ट्रेकपैकी जवळपास ९० टक्के ट्रेकमध्ये आम्ही तिघेही एकत्रच फिरलेलो आहोत. त्यामुळे तिघांनाही एकमेकांबद्दल व्यवस्थित माहिती होती. आमच्यामध्ये रजत सर्वात उत्साही मनुष्य! वेगवेगळ्या ठिकाणी ट्रेक करण्याचा त्याचा उत्साहच आम्हाला त्याच्या सोबत घेऊन जात असे. यावेळीही काही वेगळी परिस्थिती नव्हती.
आंबोलीतुन दाऱ्याघाटाच्या दिशेने चालायला सुरुवात केली. त्यावेळेस पावसाच्या मंद सरी कोसळत होत्या. वातावरणामध्ये बर्‍यापैकी गारवा तयार झालेला होता. शिवाय कोकण कड्यावरून येणारे वारे शरीराला थंडीची जाणीव करून देत होते. सुरवातीचा रस्ता तसा चढता नव्हता. साधारणतः एक किलोमीटर चालत गेल्यानंतर उजव्या बाजूला जुन्नरमधील सर्वात उंच आंबोली धबधबा दिसून आला. विकेंडला आजकाल या धबधब्याखाली भली मोठी गर्दी दिसते. दोन ते तीन टप्प्यात कोसळणारा हा धबधबा ढाकोबाच्या शिखरावरून मार्गक्रमण करत खाली येत असतो. त्याच्या उजव्या बाजूने कडेकडेने एक पायवाट ढाकोबा शिखराच्या दिशेने जाते. मागील ट्रेकच्या वेळी आम्हाला ती माहीत झाली होती. त्यामुळे त्या झाडीतुन रस्ता शोधण्यास फारसा विलंब लागला नाही. पण आता पावसाळी हंगाम होता, त्यामुळे झाडी ही बर्‍यापैकी वाढलेली होती. डोंगरावरून येणारे पाण्याचे प्रवाह पायवाटेवरूनच खाली येत होते. म्हणूनच थोडं सावधगिरीने आम्ही पावले टाकत होतो. चढण सुरु झाल्यावर थोड्याच अंतरावर एक कोरकाई देवीचे उघडे मंदिर दिसून आले. चार लोखंडी खांब आणि त्यावर पत्रा, आतमध्ये ओबडधोबड दगडांनी सजवलेले ते मंदिर त्या दिवशी पावसाने न्हावून निघत असल्याचे दिसले. मंदिराच्या उजव्या बाजूने डोंगरावर जाणाऱ्या पायवाटेने आम्ही चढाई सुरू केली. पावसाचा वेग हळूहळू वाढत चालला होता. त्यामुळे पायवाटेवरील पाण्याचा प्रवाह वेग धरू लागला. कडेलाच धबधबा कोसळत होता. पाण्याचे इतक्या उंचावरून कोसळणारे आवाज त्याच्या रौद्रपणाची जाणीव करून देत होते. आजूबाजूचा परिसर दिसेनासा होऊ लागला होता. केवळ पंधरा मिनिटांमध्ये आम्ही पूर्णतः भिजून गेलो होतो. पायातील बुटांमध्ये पाणी साचू लागले होते. अधून मधून बूट काढून त्या पाण्याला बाहेर काढत होतो. पण ते नेहमीपेक्षा अधिक जड झाले होते. म्हणूनच आमचा चालण्याचा वेगही मंदावला होता. अनेक ठिकाणचा रस्ता हा दाट झाडीतून जात होता. त्यातून येणारे पाण्याचे प्रवाह आता गुडघ्यापर्यंत लागायला लागले होते. पावसाचा वेग वाढत असल्याचे आम्हाला जाणवले देखील. पण पाऊस नंतर कमी होईल या आशेने आम्ही चढाई करत होतो. जवळपास एक तासानंतर पहिला डोंगर पार केला. पावसाची तीव्रता आहे तेवढीच होती. त्याचे टपोरे थेंब आता अंगाला बोचू लागले होते. इथून पुढे तीन ते चार जंगली वाटा पूर्ण केल्यानंतरच आम्ही ढाकोबा पर्यंत पोहोचणार होतो. धबधब्याखाली कोसळणारी पाण्याची धार पार करावी लागणार होती. आज तिचा वेग मात्र प्रचंड दिसून आला. पण तिघांनीही एकमेकांचे हात धरून तो प्रवाह पार केला. पुढे जंगलातून जाणारी एक अरुंद पायवाट होती. ती माहीत असल्यामुळे आम्ही मार्गक्रमण करू शकलो. एखाद्या नवख्या माणसाला कदाचित ती कधीच सापडू शकली नसती. पायवाटेने जातानादेखील पाण्याचा प्रवाह वेगाने पायांवर आदळत होता. कदाचित पुढे जाऊ नका, असा संदेशही तो यातून देत असावा. परंतु त्याचे आम्ही ऐकले नाही. दहा मिनिटानंतर जंगलातील झाडी काहीशी कमी झाली होती. पण पावसाचा वेग कमी होत नव्हता. पुढे रस्ता बंद झाल्यासारखा वाटला. रजतने आजूबाजूची झाडी बाजूला सारून कुठे वाट सापडते का? हे चाचपणी याचा प्रयत्न केला. अक्षय मात्र आता घाबरायला लागला होता. आजुबाजुला घनदाट जंगल आणि वरून धो धो कोसळणारा पाऊस. शिवाय चुकलेली पायवाट! यात आम्ही फसत चाललो होतो. किंबहुना फसलेलो होतो!
पायवाट ही मागील वेळेस गेलो होतो, त्याच वेळेसची होती. पण नक्की कुठे संपली, वा सुरू झाली, हे समजले नाही. पाण्याचे प्रवाह सगळ्याच बाजूंनी येत होते. त्यामुळे पुढचा रस्ता सापडत नव्हता. काय करावे ते सुचत नव्हते. बराच वेळ आम्ही तिथेच रस्ता शोधत कसेबसे चाचपडत होतो. पण तो सापडत नव्हता. रजतला देखील त्या दिवशी मी पहिल्यांदाच हताश झालेले बघितले. तो अनुभवी ट्रेकर होता. पण त्या दिवशी आम्ही सर्वच जण फसलो होतो. शेवटी पुन्हा मागे फिरायचे ठरवले. पाणी जाईल त्या दिशेने आम्ही खाली उतरू लागलो. आता पाण्याचा प्रवाह आम्हाला खाली खेचत होता. बराच वेळ झाला पण परतीचे ते जंगल संपत नव्हते. पाणी मात्र वेगाने खालच्या दिशेने वाहत होते. पाऊण ते एक तास झाला असेल. तरीही आम्ही पूर्वी पार केलेल्या धबधब्याच्या प्रवाहापर्यंत पोहोचलो नाही. कदाचित पुन्हा रस्ता चुकला होता! त्यामुळे आता हृदयाची धडधड वाढायला लागली होती. कोणाच्याच मोबाईलला रेंज नव्हती. ते पण पूर्णतः भिजून गेले होते. पाऊस वेगाने कोसळतच होता. आजूबाजूला अंधार पडला नव्हता, हीच आमच्यासाठी जमेची बाजू होती. अक्षय आता रडकुंडीला आला होता. काय करावे काहीच सुचेनासे झाले होते. पायवाटा पावसाच्या प्रवाहाने पूर्णतः विरून गेल्या होत्या. वेगाने कोसळणाऱ्या त्या धारांमध्ये आम्ही तिघेही एकमेकांचे हात पकडून बाहेर पडण्याचे मार्ग शोधत होतो.
जंगलातील एका वरच्या धारेतून झाडे हलण्याचा आवाज आला. तिघांनीही चमकून त्या दिशेने पाहिले. झाडांची वरची पाने हलत होती. आत मध्ये कुणीतरी असावे व ते आपल्या दिशेने येत आहे, असे जाणवत होते. एखादं हिंस्त्र श्वापद तर नसेल ना? या विचारानेच आमची गाळण उडाली.
तिघांनीही एकमेकांचे हात घट्ट धरले होते. समोरच्या झाडाची एक फांदी बाजूला सारली गेली व त्यातून एक व्यक्ती आमच्या दिशेने येताना दिसली. हातात काठी घेऊन पाण्याच्या प्रवाहामध्ये पुढे सरकत सरकत एक वृद्ध महिला आमच्या दिशेने येत होती. डोक्यावर तिने पावसापासून संरक्षण होण्यासाठी रेनकोटसारखा एक प्लास्टिकचा झगा घातला होता. ती काठी टेकवत आमच्या समोर येऊन उभी राहिली.
"काय रे पोरांनो... काय करता हितं?" - तिचा प्रश्न.
तिच्या या काळजीवजा प्रश्नाने आम्हाला थोडेसे हायसे वाटले.
"आजी... ढाकोबाकडे जायचा रस्ता कुठय?", रजतने विचारले.
यावर तिने स्मितहास्य केले व बोलू लागली.
"ढाकुबा तिकडं पलीकडच्या डोंगराकडं राहिला. ह्यो डोंगररस्ता पार दुर्गा देवीच्या मंदिराकडे जातो. ते पण लय लांब हाय... पण एवढ्या पावसात तुम्हाला रस्ता गावल का?"
"आजी, आम्हाला खाली गावात जायचा रस्ता तरी सांगा. आम्ही परत जातो.", अक्षय बोलला.
"चला मग माझ्यासोबत.", असं म्हणत ती आजी पुढे चालू लागली.
पाण्याच्या त्या वेगवान प्रवाहामध्ये देखील अतिशय स्थिर पावले टाकत ती चालत होती. रस्ता तिच्या ओळखीचा होता. आम्हाला तिच्यावर विश्वास ठेवण्यावाचून दुसरा पर्यायच नव्हता. आम्ही तिच्या मागे मागे सावध पावले टाकत चाललो. दोन-तीन वळणे घेत आम्ही धबधब्याच्या प्रवाहाशी पोहोचलो. अतिशय शिताफीने पावले टाकत तिने तो प्रवाह सहजपणे पार केला. आम्हाला मात्र एकमेकांचे हात धरल्याशिवाय पुढे जाता येत नव्हते. ती सपासप पावले टाकत चाललेली होती. आम्हीदेखील तिच्यामागे त्याच वेगाने चालू लागलो होतो.
"एवढ्या पावसाचं कशाला यायचं पोरांनो इकडं?", चालता चालताच तिने प्रश्न केला.
पण आमच्यापैकी कोणीही तिला उत्तर दिले नाही. कदाचित तितके बळही आमच्यामध्ये शिल्लक नसावे. अर्ध्या तासाच्या उतरणीनंतर आम्ही सकाळी भेटलेल्या त्या उघड्या मंदिरापाशी आलो. तेव्हा सुटकेचा निश्वास सोडला.
"थँक्यू आजी!", असं म्हणत अक्षयने तिचे आभार मानले. ती काहीच बोलली नाही. फक्त स्मितहास्य केले व पाठमोरी होऊन पुन्हा वरच्या दिशेने चालु लागली. आम्हाला काय बोलावे, काही सुचत नव्हते. एका मोठ्या संकटातून तिने आमची सुटका केली होती. धो धो कोसळणाऱ्या पावसामध्ये ती तिची चालत जाणारी ती पाठमोरी आकृती काही सेकंदातच दिसेनाशी झाली. आम्ही तिघे जण ज्या वाटेने चाचपडत चाललो होतो, त्याच वाटेने ती झराझरा चालत निघूनही गेली.
आमचे चेहरे आता चिंतामुक्त झाले होते इतक्या वर्षात अपूर्ण राहिलेला हा आमचा पहिलाच ट्रेक! शिवाय पावसाच्या भीषणतेची जाणीव करून देणारा देखील पहिलाच ट्रेक होता. आम्ही भानावर आलो. तेव्हा अनेक प्रश्न आमच्या मनात पडत गेले. ढाकोबाच्या त्या परिसरामध्ये कोणीही मनुष्य राहत नाही. मग इतक्या पावसात ती आजी त्या ठिकाणी आली कशी? शिवाय ती आम्हाला रस्ता दाखवून पुन्हा त्याच मार्गाने निघून गेली. नंतर जेव्हा आम्हाला या घटना आठवायला लागल्या त्यावेळेस त्या आजी बद्दलचे कुतूहल नेहमीच जागृत व्हायला लागले. पुन्हा कधी ढाकोबाला गेलोच तर तिच्या घरी नक्की जाऊ, असे आम्ही ठरवले. तिचे मनापासून आभार मानायचे राहूनच गेले होते.
या घटनेनंतर साधारणतः चार महिन्यांनी आत्रामगडाच्या ट्रेकवर जाण्यापूर्वी पायथ्याशी कोरकाई देवीचे एक छोटेखानी बंदिस्त मंदिर दिसून आले. सहसा आम्ही मंदिरामध्ये जात नाही. पण या मंदिरात जाण्याची इच्छा मनात निर्माण झाली. मंदिराचे दार अतिशय छोटे होते. त्याच्या वरती अवाढव्य अक्षरांमध्ये 'श्री कोरकाई प्रसन्न' असे लिहिलेले होते. आम्ही त्या चिंचोळ्या दारातून आत प्रवेश केला. समोर एक शेंदूर फासलेला दगड ठेवलेला होता आणि भिंतीवर देवीचा चित्रकाराने काढलेला ओबडधोबड चेहरा दिसून आला. तो चेहरा पाहिला आणि काळजाचा एक ठोकाच चुकला! हा तोच चेहरा होता, ज्या आजीबाईने आम्हाला ढाकोबावर संकटातून मुक्तता केली होती!

Tuesday, June 16, 2020

निवडक र. अ. नेलेकर

धारक व मतकरी यांच्यानंतर वाचलेले र. अ. नेलेकर हे तिसरे भयकथा लेखक! त्यांच्या भयकथांचे केवळ तीन संग्रह प्रसिद्ध आहेत. त्यामुळे मराठी वाचकांना ते फारसे परिचित नसावेत. शिवाय त्यांच्या नावे तीन विनोदी कथासंग्रह देखील आहेत! भय आणि विनोद असे परस्परविरोधी प्रकार हाताळलेले नेलेकर कदाचित एकमेव मराठी लेखक असावेत. त्यांच्याच भयकथांचा हा कथासंग्रह होय- निवडक र. अ. नेलेकर (राजेंद्र प्रकाशन)
प्रत्येक लेखकाची एक वेगळी शैली असते. तशीच नेलेकरांची स्वतःची शैली आहे. फारसं वर्णनात्मक चित्रन न करता साध्या सरळ पद्धतीने परंतु वाचकांना खिळवून ठेवणाऱ्या कथा, हे त्यांचे वैशिष्ट्य मानावे लागेल. धारप व मतकरी वाचल्यानंतर नेलेकरांच्या शैलीत रुळायला थोडा वेळ लागतो. पण नंतर ती आपल्या मनाची पकड घ्यायला सुरवात करते व एक अद्भुत विश्वाची सफर घडवून आणते. त्यांच्या या पुस्तकात एकूण सोळा कथा आहेत. त्यातील अखेरची 'कणक राऊळ' ही केवळ साहस कथा आहे. बाकीच्या भयकथांमध्ये कुठली सर्वात चांगली? असे निश्चित सांगता येणार नाही. कारण प्रत्येक कथा ही पूर्णतः वेगळ्या धाटणीची आहे. त्यांच्यात तोचतोचपणा जाणवत नाही. त्यामुळे कुठलीही कथा वाचली तरी आपल्याला निराळ्याच विश्वात घेऊन जाते, हे विशेष.
संग्रहातील काही कथांना विविध स्पर्धांमध्ये पारितोषिके मिळाली आहेत. त्यामुळे अशा दर्जेदार कथांचा संग्रह निश्चितच वाचनीय असाच आहे.

 

Sunday, May 31, 2020

बिभीषण की कुंभकर्ण?

रामायणातील एक छोटी गोष्ट...
राक्षसांचा राजा लंकाधिपती रावणाचे दोन भाऊ म्हणजे बिभिषण व कुंभकर्ण. दोघेही सत्कर्मी होते. तरीही दोघांचे विचार मात्र वेगवेगळे होते. बिभीषणाने आधीपासूनच सत्याची अर्थात श्रीरामाची बाजू घेतलेली होती. त्यासाठी तो लंकेचा बळीही द्यायला तयार झाला होता.
याउलट कुंभकर्णाचं होतं. त्याला ही गोष्ट माहीत होती की, चूक रावणाची आहे. त्याच्यामुळेच लंकेवर संकट ओढवलं होतं. तरीही त्याने रावणाचीच बाजू घेतली. कारण त्यावेळी लंकेचं रक्षण करणं आवश्यक होतं. ज्याला तो धर्म मानत होता. नंतर मात्र कुंभकर्ण व रावण दोघांचाही युद्धात मृत्यू झाला.
सांगायचे इतकेच की, या जगात अशी अनेक सज्जन लोकं आहेत ज्यांना समजत नाही की, बिभीषण बनावं की कुंभकर्ण? यात गल्लत झाली की, तुम्ही नायकाचे खलनायक होऊन बसता!


Saturday, February 15, 2020

बारा कथा

कविवर्य कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांचा मी वाचलेला हा पहिलाच कथासंग्रह. डॉ. बा. वा. दातार यांनी त्याचे संपादन केले आहे. नावाप्रमाणेच यात 12 कथा आहेत. सर्वच वेगळ्या विषयाला वाहिलेल्या. पहिल्या दोन-तीन कथा प्रेम व विरह यावर आधारित होत्या. त्यामुळे असं वाटलं की, नंतरच्या ही कथा अशाच असतील. परंतु शिरवाडकरांनी विविध विषयांवर हात घातल्याचे दिसते. यातील तीन कथा या रहस्य प्रकारात मोडणाऱ्या आहेत. लेखकाचे भाषेवर असलेलं प्रभुत्व सर्वच कथांतून प्रतीत होतं. कथा कशी असावी? याचे प्रात्यक्षिक उदाहरणच शिरवाडकरांनी त्यांच्या लेखणीतून दाखवून दिले आहे. कोणतीच कथा ही कंटाळवाणी वाटत नाही. अगदी एकाच बैठकीत संपून टाकावे, असे हे पुस्तक आहे. वाचनाला सलग वेळ मिळत नसल्याने मी कादंबरी ऐवजी कथासंग्रह वाचतो. अर्थात प्रत्येकाची पद्धत निराळी असतेच. परंतु, हे पुस्तक मी एकाच बैठकीत संपवले हे विशेष!

कवीचे भाषेवर जबरदस्त प्रभुत्व असते, हे शिरवाडकरांच्या साहित्यकृतीतून जाणवते. त्यामुळे कथा आणि साहित्यप्रेमींसाठी सदर पुस्तक मेजवानी ठरावे असेच आहे.

Wednesday, September 11, 2019

एक छोटीशी बोधकथा

मकरंद आणि विनय दोघे बालपणीचे मित्र. दहावीपर्यंत दोघेही एकाच वर्गात शिकलेले. शिवाय दोघांचे मार्कही जवळपास समान, अर्थात ६५ ते सत्तरच्या मधलेच. परंतु, दहावीनंतर दोघांनीही वेगवेगळ्या वाट निवडल्या.
आज दहा वर्षांनंतर मक्या अर्थात मकरंद आपल्या वडिलांसह वीटभट्टीवर देखरेखीचं काम करतो तर विनय एमपीएससीची परीक्षा पास होऊन पोलीस सब-इन्स्पेक्टर झालाय. त्या दिवशी सहजच गावात दोघांची भेट झाली. इतक्या वर्षांनी शाळेतला मित्र भेटला म्हटल्यावर दोघांनाही फार फार आनंद झाला. मकरंदला मात्र विनयच्या प्रगतीविषयी असूया वाटत होती. त्या भेटीत तो विनयला म्हणाला होता, 'असतो बाबा देव एकेकावर मेहेरबान... म्हणून तू आज पोलीस झालायेस...'


त्याच्या वडिलांना मात्र त्याचे हे बोलणे खटकले. ते म्हणाले, 'बाळा... खरं सांगू का, देव काही त्याच्यावर मेहेरबान नाहीये. जेव्हा तू गणपती अन नवरात्रात रात्री पॅन्ट फाटेस्तोवर नाचत होतास ना, तेव्हा तो अभ्यास करून आपल्या भविष्याची पेरणी करत होता... इतकंच... '