Showing posts with label science fiction. Show all posts
Showing posts with label science fiction. Show all posts

Tuesday, May 20, 2025

डॉ. जयंत नारळीकर: खगोलविज्ञान आणि साहित्याचा तेजस्वी संगम

डॉ. जयंत विष्णू नारळीकर हे नाव खगोलभौतिकशास्त्र आणि विज्ञान साहित्याच्या क्षेत्रात अत्यंत आदराने घेतले जाते. विज्ञानातील किचकट संकल्पना सोप्या आणि रंजक भाषेत सामान्य लोकांपर्यंत पोहोचवणारे ते एक अग्रगण्य शास्त्रज्ञ आणि लेखक आहेत. त्यांचे जीवन आणि कार्य अनेक पिढ्यांना प्रेरणा देत आले आहे.

जन्म आणि शिक्षण:
जयंत नारळीकर यांचा जन्म १९ जुलै १९३८ रोजी कोल्हापूर येथे झाला. त्यांचे वडील विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ञ होते आणि बनारस हिंदू विद्यापीठात गणित विभागाचे प्रमुख होते. आई सुमती नारळीकर या संस्कृत विदुषी होत्या. अशा विद्वत्तापूर्ण वातावरणात वाढल्याने जयंतरावांना लहानपणापासूनच ज्ञानार्जनाची आवड निर्माण झाली. त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून पदवी शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर ते उच्च शिक्षणासाठी केंब्रिज विद्यापीठात गेले. तिथे त्यांनी प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ सर फ्रेड हॉईल यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. आणि नंतर डी.एस्सी. या पदव्या संपादन केल्या.

वैज्ञानिक योगदान:
डॉ. नारळीकर यांचे सर्वात महत्त्वाचे योगदान म्हणजे सर फ्रेड हॉईल यांच्यासमवेत मांडलेला "स्थिर स्थिती सिद्धान्त" (Steady State Theory) होय. हा सिद्धान्त महास्फोट सिद्धान्ताला (Big Bang Theory) एक पर्याय म्हणून ओळखला जातो. या सिद्धान्तानुसार, विश्वाची निर्मिती एका विशिष्ट क्षणी न होता ते नेहमीच अस्तित्वात आहे आणि नवीन दीर्घिका (galaxies) सतत निर्माण होत असतात. जरी आज महास्फोट सिद्धान्त अधिक स्वीकारला गेला असला, तरी हॉईल-नारळीकर सिद्धान्ताने विश्वरचना शास्त्रातील अनेक मूलभूत प्रश्नांवर विचार करण्यास चालना दिली. याव्यतिरिक्त, त्यांनी गुरुत्वाकर्षण, काळ (Time), कृष्णविवर (Black Holes) आणि सापेक्षता सिद्धान्त (Theory of Relativity) यांसारख्या विषयांवरही महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे. त्यांनी 'कन्फॉर्मल ग्रॅव्हिटी थिअरी' (Conformal Gravity Theory) विकसित करण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

विज्ञान प्रसार आणि साहित्य:
डॉ. नारळीकर यांनी केवळ संशोधन क्षेत्रातच नव्हे, तर विज्ञान प्रसाराच्या कार्यातही मोलाची कामगिरी केली आहे. त्यांनी मराठी आणि इंग्रजी भाषेतून अनेक पुस्तके लिहिली आहेत, ज्यामध्ये खगोलशास्त्र, गणित आणि विज्ञानातील इतर संकल्पना अत्यंत सोप्या आणि मनोरंजक पद्धतीने स्पष्ट केल्या आहेत. त्यांच्या विज्ञान कथा (Science Fiction) विशेष लोकप्रिय आहेत. "यक्षांची देणगी", "प्रेषित", "वामन परत न आला", "अंतराळातील भस्मासूर" यांसारख्या त्यांच्या अनेक विज्ञान कथांनी मराठी साहित्यात एक नवा प्रवाह निर्माण केला आणि वाचकांना विज्ञानाच्या अद्भुत दुनियेची सफर घडवली. लहान मुलांसाठीही त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली आहेत. विज्ञानाचा प्रसार केवळ शहरांपुरता मर्यादित न राहता तो तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचावा, यासाठी ते नेहमीच आग्रही राहिले आहेत.


संस्थात्मक कार्य:
भारतात परत आल्यानंतर, त्यांनी टाटा मूलभूत संशोधन संस्थेत (Tata Institute of Fundamental Research - TIFR) प्राध्यापक म्हणून काम केले. त्यानंतर, पुणे येथे १९८८ साली "आंतर-विद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी केंद्र" (Inter-University Centre for Astronomy and Astrophysics - IUCAA) या संस्थेची स्थापना करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. ते या संस्थेचे संस्थापक संचालक होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली 'आयुका'ने आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवला.

पुरस्कार आणि सन्मान:
डॉ. नारळीकर यांना त्यांच्या कार्यासाठी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये भारत सरकारतर्फे पद्मभूषण (१९६५) आणि पद्मविभूषण (२००४), तसेच महाराष्ट्र भूषण (२०१०) या पुरस्कारांचा समावेश आहे. त्यांना भटनागर पुरस्कार, युनेस्कोचा कलिंग पुरस्कार (१९९६) आणि साहित्य अकादमी पुरस्कार (२०१४, त्यांच्या "चार नगरातले माझे विश्व" या आत्मचरित्रासाठी) यांसारखे अनेक प्रतिष्ठित सन्मान लाभले आहेत.

डॉ. जयंत नारळीकर हे एक दूरदर्शी शास्त्रज्ञ, प्रतिभावान लेखक आणि समर्पित विज्ञान प्रसारक आहेत. त्यांचे जीवन हे ज्ञान, जिज्ञासा आणि कठोर परिश्रमाचे प्रतीक आहे. त्यांनी भारतीय विज्ञान आणि साहित्य क्षेत्रात दिलेले योगदान अतुलनीय असून, ते भावी पिढ्यांसाठी सदैव प्रेरणादायी राहील.

--- तुषार भ. कुटे

Tuesday, November 12, 2024

गोग्रामचा चितार

विज्ञान कादंबऱ्यांमध्ये विविध प्रकारचे विषय हाताळले जातात. परग्रहवासी हाही त्यातलाच एक विषय. आजवर बऱ्याच विज्ञान कथांमधून आपल्याला परग्रहवासी भेटलेले आहेत. बहुतांश वेळा अशा कथांमधून परग्रहवासीयांचा आणि पृथ्वीवासीयांचा संघर्ष पाहायला, ऐकायला आणि वाचायला मिळतो. परग्रहावरील लोक आपल्या ग्रहावरील लोकांना त्रास देतात किंवा त्यांच्याकडे आपल्यापेक्षा मोठी अद्भुत शक्ती असते, ज्याच्या जोरावर ते आपल्यावर राज्य करू पाहतात. अशा कल्पनारम्य विज्ञान कादंबऱ्या आजवर वाचलेल्या होत्या.

परंतु कल्पना करा की पृथ्वीच्या जवळच्याच एका ग्रहावरील जीवसृष्टी आपल्यापेक्षा अधिक प्रगत झालेली आहे. त्यांना हेही माहित आहे की, आपल्या शेजारी जीवसृष्टी असलेला आणखी एक ग्रह नांदतो आहे. परंतु ते आपल्यावर आक्रमण करत नाहीत. आपल्याला जाणून घेतात. आपण आपल्या ग्रहाची काय अवस्था करून ठेवलेली आहे? याचे सखोल ज्ञान त्यांना असते. पृथ्वीवरील मनुष्यप्राणी नक्की पृथ्वीचा कसा सांभाळ की विनाश करतो आहे, याची देखील त्यांना इत्यंभूत माहिती आहे. एकंदरीत काय मनुष्य प्राण्याचा स्वभाव त्यांना पुरता कळलेला आहे. प्रगतीच्या मार्गावर असलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करून ते या विश्वामध्ये कोणताही विनाश करू शकतात, याची कल्पना त्यांना देखील आलेली आहे. म्हणजेच एका अर्थाने पृथ्वीवरच्या मनुष्य प्राण्याची प्रवृत्ती त्यांना खरोखरीच कळलेली आहे. उद्या पृथ्वीवासी आपल्यावर निश्चितच आक्रमण करून आपला ग्रह ताब्यात घेतील, याची त्यांना खात्री आहे. म्हणूनच भविष्यात दिसणाऱ्या धोक्यावर उपाय म्हणून हे परग्रहवासी सूर्यमालेच्या बाहेरील ग्रह शोधायला लागतात. त्यांच्याकडील अद्ययावत तंत्रज्ञानाने इंटरस्टेलर स्पेसमध्ये त्यांचा शोध सुरू होतो. आणि अशातच त्यांचा संपर्क पृथ्वीवरील एका मानवाशी होतो….. ही कथा आहे नारायण धारप लिखित ‘गोग्रामचा चितार’ या कादंबरीची.

नारायण धारप हे नाव प्रामुख्याने भयकथांशी जोडलेले आहे. परंतु त्यांनी बऱ्याच विज्ञानकथा, कादंबऱ्या देखील लिहिलेल्या आहेत, याची माहिती कमी जणांना असेल. धारपांच्या विज्ञान कथा मालिकेतीलच ही कादंबरी ‘गोग्रॅमचा चितार’. पृथ्वीवरील विजय आणि मंगळावरील गोग्रॅम हे या कथेचे नायक. अचानकपणे एके दिवशी हा मंगळग्रहवासी पृथ्वीवासीयाला भेटतो आणि वेगवेगळ्या घटना घडत जातात. ज्या आपल्याला कथेशी शेवटपर्यंत बांधून ठेवतात. एका चित्रपटाप्रमाणे या कादंबरीचे दोन भाग आहेत. पूर्वार्धात गोग्रॅमचे आगमन तर मध्यंतरानंतर उत्तरार्धात गोग्रॅमचे पुनरागमन आपल्याला वाचायला मिळते. खरी गोष्ट मध्यंतरानंतरच वेग घेते. त्यामुळे वाचताना संयम देखील बाळगायला लागतो. मागच्या शतकामध्ये धारपांनी लिहिलेल्या या कादंबरीमध्ये बऱ्याच सुंदर अशा कल्पना विज्ञानरुपी विस्तृतपणे मांडलेल्या दिसून येतात. बुध, शुक्र, मंगळ, शनी, गुरु अशा विविध ग्रहांची वर्णने देखील यामध्ये आहेत. हे ग्रह नक्की कसे आहेत? याची माहिती देखील आपल्याला होते. त्याकाळी त्यांनी लिहून ठेवलं होतं की, आणखी काही वर्षानंतर पृथ्वीवासीय मंगळावर स्वारी करतील. आणि तेच आज आपण अनुभवत आहोत.

खरंतर विज्ञानकथेच्या रूपाने ही एक बोधकथारूप कादंबरी आहे. त्यातून वरती सांगितल्याप्रमाणे मानवी स्वभावाचे दर्शन मंगळग्रहवासी आपल्याला करून देतात. 


— तुषार भ. कुटे

 


 


Thursday, October 24, 2024

रेवन रॉय - समर

मराठीमध्ये आजवर अनेक विज्ञानकथालेखकांनी वेगवेगळे प्रयोग केले. यातूनच विज्ञानातील विविध संकल्पना मराठी वाचकांना समजायला लागल्या. परंतु पॅरलल युनिव्हर्स अर्थात समांतर विश्व ही संकल्पना पहिल्यांदाच समर लिखित रेवन रॉय या कादंबरीतून मराठीमध्ये दिसून आली.
आपल्या विश्वाच्या समांतर देखील असेच आणखी एक विश्व आहे, ज्यात आपल्यासारखीच माणसे राहतात. बहुतांश वेळा ती आपल्याला स्वप्नातून देखील भेटतात, ही संकल्पना म्हणजे पॅरलल युनिव्हर्स होय. अर्थात याला पूर्ण वैज्ञानिक आधार नाही, परंतु सायन्स फिक्शनचा विचार केला तर यातून पाश्चिमात्य लेखकांनी बरंच लेखन केलेले आहे. तसं पाहिलं तर संकल्पना समजायला अवघडच. म्हणून कथा रूपात  आणण्यासाठी लेखकाचे लेखनकौशल्य देखील पणाला लागते. हे शिवधनुष्य उचलून लेखकाने रेवन रॉय या कादंबरीद्वारे चांगला प्रयत्न केला आहे.
रेवन रॉय नावाच्या निराशावादी मानसशास्त्रज्ञाची ही गोष्ट. त्याच्यासोबत त्याचे आणखी सात सहकारी आहेत. आपल्या विश्वाला संपवण्यासाठी तो सर्वदूर असलेले चैतन्य संपवायला सुरुवात करतो. यातूनच समांतर विश्वातील दुसरा रेवन रॉय देखील समोर येतो. अशी पार्श्वभूमी असणारी ही कथा. अनेकदा ती किचकट वाटते. शिवाय एक घटना आपल्या विश्वात तर दुसरी समांतर विश्वामध्ये घडते, तेव्हा वाचक काहीसा गोंधळून जातो. अर्थात यामध्ये वाचकाची एकाग्रता असणे अधिक महत्त्वाचे वाटते. कथेची मांडणी आणि वेग चांगला आहे. अर्थात तो अधिक उत्तम असू शकला असता. परंतु यानिमित्ताने का होईना समांतर विश्वाची गोष्ट मराठी वाचकांना समजेल, अशी आशा वाटते.


 

Wednesday, January 3, 2024

अंतराळातील स्फोट

जवळपास २५ वर्षांपूर्वी एका वाचनालयामध्ये जयंत नारळीकरांचं “अंतराळातील स्फोट” हे पुस्तक वाचायला मिळाले. अभ्यास सोडून अवांतर म्हणून वाचलेलं माझ्या आयुष्यातील कदाचित हे पहिलंच पुस्तक होतं. नारळीकरांची ही विज्ञान कथा मला भयंकर आवडली. कदाचित याचमुळे मला वाचनाची आवड निर्माण झाली. यानंतर मी नारळीकरांच्याच प्रेषित आणि ‘वामन परत न आला ‘या कादंबऱ्या देखील वाचल्या. त्याही मला तितक्याच आवडल्या होत्या. कालांतराने मी स्वतःच्या पुस्तकांचा संग्रह करायला सुरुवात केली. काही वर्षानंतर मी वाचलेले ‘अंतराळातील स्फोट’ हे पुस्तक बाजारात शोधण्याचा देखील प्रयत्न केला. परंतु ते काही मिळाले नाही. मागील आठवड्यामध्ये पुणे पुस्तक महोत्सवात साहित्य अकादमीच्या स्टॉलवर हे पुस्तक मला अनपेक्षितरित्या दिसून आले. ते विकत घेतल्यानंतर अगदी दोन ते तीन तासांमध्ये वाचून संपवले. दोन दशकांपूर्वीच्या वाचन आठवणी जागृत करणारा हा प्रसंग होता! 


 

Thursday, December 1, 2022

ल्युसी: मेंदूच्या वापराची कहाणी

माणसाच्या मेंदूमध्ये कोट्यावधी न्यूरॉन असतात. याच न्यूरॉनचा वापर करून मानवाने इतर प्राण्यांपेक्षा अनेक पावले पुढची बुद्धिमत्ता प्राप्त केली आहे. प्रत्यक्षात मनुष्यप्राणी आपल्या मेंदूमधील किती टक्के न्यूरान्सचा वापर करतो? या प्रश्नाचे उत्तर जेव्हा शास्त्रज्ञांनी शोधले तेव्हा त्यांना समजले की आपण फार-फार तर दहा टक्के मेंदू आजवर वापरलेला आहे! जर आपण इतक्या कमी प्रमाणात मेंदू वापरलेला असेल आणि अन्य प्राणी जगताला हेवा वाटेल अशी प्रगती केली असेल तर जेव्हा १००% मेंदू वापरू त्यावेळेस काय होईल? याची कल्पना देखील करवत नाही. याच संकल्पनेवर आधारित असणारा हा हॉलीवुडपट म्हणजे "ल्युसी" होय.
ल्युसी ही एक सर्वसामान्य युवती आहे. चीनमधल्या एका शहरामध्ये ती काम करते. आपल्या प्रियकराने दिलेल्या धोक्यामुळे ती मोठ्या संकटात सापडते. त्यातून बाहेर येण्याचा ती जीवाच्या आकांताने प्रयत्न करत असते. परंतु याच घडामोडींमध्ये तिच्या शरीरात झालेल्या रासायनिक प्रक्रियेमुळे तिच्या मेंदूची क्षमता वाढायला सुरुवात होते. पहिल्यांदा २०% मग २८% नंतर ४०% नंतर ६०% कालांतराने ८० टक्के आणि अखेरीस ती आपल्या मेंदूचा शंभर टक्के वापर करते. या प्रत्येक टप्प्यामध्ये तिचा मेंदू कशा पद्धतीने काम करतो, किंबहुना ती तिच्या मेंदूचा कसा वापर करते? हे अतिशय रंजकपणे चित्रपटामध्ये दाखवलेले आहे.
जेव्हा मेंदू १००% कार्यरत होतो त्यावेळेची स्थिती काहीशी अनाकलनीय आहे. पण चित्रपट विज्ञानातील एक अद्भुतरंजकता आपल्याला दाखवून जातो. विशेष म्हणजे प्रत्येक टप्प्यागणिक तो खिळवून ठेवतो आणि खरोखरच असं झालं तर काय? या प्रश्नाचे उत्तर आपल्याला देत राहतो. काही विज्ञान रंजन मनाला सुखवणारे असतात. काही कल्पना प्रत्यक्षात येण्याजोग्या असतात पण कधी येतील याची खात्री नसते? त्यातीलच ही विज्ञान रंजक कल्पना होय.
भविष्यामध्ये कदाचित आपण देखील आपल्या मेंदूचा शंभर टक्के वापर करण्यास यशस्वी होऊ. त्यावेळेस कदाचित विश्वाची रहस्ये आपल्यासमोर खुली देखील होतील. ...बाकी स्कार्लेट जोहान्सनने ल्युसीची भूमिका अप्रतिम पार पाडली आहे!


 

Tuesday, June 21, 2022

अदृश्य माणूस

विज्ञान कथांचं जग मनोरंजक आणि तितकच अद्भुत देखील असतं. त्यात अनेकदा अतिशयोक्ती असली तरी 'हे असं घडू शकतं' असंही वाटत राहतं. मराठी साहित्याला विज्ञान कथांचा प्रदीर्घ इतिहास नसला तरी पाश्चिमात्य साहित्यामध्ये मात्र शेकडो वर्षांपासून विज्ञानकथा लिहिल्या जात आहेत.
विज्ञान कथांचे जनक म्हणले जाणारे एच. जी. वेल्स यांची 'अदृश्य माणूस' ही अतिशय रंजक अशी विज्ञान कादंबरी होय. 'इनव्हीजीबल मॅन' या मूळ कादंबरीचा प्रणव सखदेव यांनी मराठी अनुवाद केलेला आहे. ही कादंबरी सन १८९७ मध्ये म्हणजे सव्वाशे वर्षांपूर्वी वेल्स यांनी लिहिली होती. विज्ञान कथा याच काळामध्ये पहिल्यांदा तयार व्हायला लागल्या. त्यात 'इनव्हीजीबल मॅन' ही कादंबरी मोठ्या प्रमाणात गाजली. आज ती वाचत असताना इतकी जुनी असेल असे जराही वाटत नाही. अदृश्य माणूस ह्याच मध्यवर्ती संकल्पनेवर ती आधारित असली तरी त्या भोवती फिरणारा थरार हा लेखकाने अतिशय उत्कृष्टरित्या रंगविलेला आहे. सुरुवातीला पार्श्वभूमी तयार करत असलेला काळ थोडासा कंटाळवाणा वाटतो. कदाचित भाषांतरित कादंबरी असल्याने इंग्रजी माणसांची नावे जुळवून घेण्यास थोडासा वेळ लागत असावा. परंतु अदृश्य माणसाचे जसे जसे रहस्य समोर यायला लागते तसतसा घटनांचा वेग वाढत जातो आणि कादंबरीचा थरार देखील वाढतो. अनेकदा अदृश्य माणसाची कीव देखील येते. कादंबरी वेगाने पुढे सरकत असताना लेखकाने अनेक छोट्या छोट्या गोष्टींचा विचार केलेला आहे. यावरूनच लेखकाचे सूक्ष्म निरीक्षण देखील लगेच ध्यानात येते. हे सूक्ष्म निरीक्षणच या कादंबरी लेखकाचे यश मानावे लागेल. विशेष म्हणजे सुरुवातीची काही पाने सोडली तर ती कुठेही कंटाळवाणी जाणवत नाही. साहस कथा आणि रहस्यकथा तसेच विज्ञानकथा वाचकांसाठी ही मेजवानीच आहे असे म्हणता येईल!


 

Tuesday, June 14, 2022

पृथ्वीवर माणूस उपराच - डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी

विज्ञानविश्वामध्ये वाद आणि प्रतिवाद चालूच असतात. जोपर्यंत एखादी गोष्ट पूर्णपणे १००% पुराव्यानिशी सिद्ध होत नाही, तोपर्यंत विज्ञानामध्ये त्या गोष्टीला अनेक अस्पष्ट बाबी घेरलेल्या असतातच. मानवाची पृथ्वीवरील उत्क्रांती हादेखील असाच एक बहुसंशोधनाचा विषय आहे. उत्क्रांतीचा सिद्धांत व त्यातील 'मिसिंग लिंक्स'चा आधार घेऊन इंग्रजीमध्ये तसेच मराठीमध्ये देखील पुस्तके लिहिली गेली आहेत. त्यातीलच डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी यांनी लिहिलेले हे पुस्तक, 'पृथ्वीवर माणूस उपराच'.
याच विषयावर बाळ भागवत यांचं देखील पुस्तक उपलब्ध आहे. ते पुस्तक वाचले तेव्हा अनेकांनी मला नाडकर्णी यांच्या या पुस्तकाविषयी देखील सुचवलं होतं. तसं पाहिलं तर दोन्ही पुस्तकांचा गाभा हा एकच आहे. तसेच त्यामध्ये नमूद केलेल्या काही घटना व गोष्टी देखील सारख्याच जाणवतात. पृथ्वीवर आज अतीप्रगत झालेला मानवप्राणी हा मूळचा पृथ्वीवरील नाहीच, या सिद्धांताला पुष्टी देण्यासाठी केलेला अभ्यास या पुस्तकामध्ये विस्कटून सांगितलेला आहे.
पृथ्वीवर फार वर्षांपूर्वी अस्तित्वात असणाऱ्या अनेक संस्कृतींचा तसेच त्या संस्कृतीमध्ये तयार झालेल्या रचनांचा अभ्यास करून अनेक अतिमानवी गोष्टींचा उहापोह या पुस्तकामध्ये केलेला आढळतो. अशा अनेक प्रश्नांची शास्त्रीय उकल आजही मनुष्यप्राण्याला करता आलेली नाही. यामुळेच उत्क्रांतिवादाचा सिद्धांत अजूनही १००% शास्त्रज्ञांनी स्वीकारलेला नाही! हजारो वर्षांपूर्वी पृथ्वीवर तयार झालेल्या किंबहुना तयार केल्या गेलेल्या रचना या आजदेखील प्रगत मानवाला तयार करणे शक्य नाही. मग त्यांचा उगम झाला तरी कसा? या प्रश्नाचे उत्तर लेखकाने अप्रत्यक्षरीत्या दिलेले आहे. माणसाची उत्क्रांती या पृथ्वीवर झालेली नाहीच. तो दुसऱ्या ग्रहावरून पृथ्वीवर आलेला आहे! मानव प्राण्यांमध्ये आणि अन्य प्राण्यांमध्ये असलेले छोटे छोटे फरक व त्यांचे विवेचन यास निष्कर्षापर्यंत पोहोचत असल्याचे लेखक म्हणतात. अर्थात ही संशोधकांची एक बाजू आहे. ती समजून घेणे देखील तितकेच गरजेचे वाटते. हजारो वर्षांपूर्वी इजिप्तमध्ये तयार केले गेलेले पिरॅमिड्स आणि पॅसिफिक महासागरातील ईस्टर आयलँडवर तयार केलेल्या भल्यामोठ्या मानवी आकृती यांचे गूढ अजूनही आजच्या वैज्ञानिकांना शोधता आलेले नाही. याच कारणास्तव हजारो वर्षांपूर्वीचा मानव कसा होता? या प्रश्नाचे उत्तर आजही तंतोतंत मिळत नाही. यावर आणखी खोलात जाऊन संशोधन होणे निश्चितच गरजेचे वाटते. तरच याविषयी अवैज्ञानिकपणे बोलणारी तोंडे बंद होतील!



 

Saturday, August 8, 2020

कल्पित-अकल्पित - सुधा रिसबूड

सुधा रिसबूड यांच्या लेखणीतून अवतरलेला 'कल्पित-अकल्पित' हा कथा संग्रह होय. विज्ञानातील भविष्यातील प्रगती या विषयाला प्रामुख्याने अनुसरून यातील कथा लेखिकेने लिहिलेल्या आहेत. भविष्यामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान तसेच प्रामुख्याने खगोल विज्ञान कसे असेल? या कल्पनेतून कथा साकारलेल्या दिसून येतात. विज्ञान हा नेहमीच रंजक विषय राहिलेला आहे. त्यामुळे भविष्यातील विज्ञान अधिक रंजकता प्राप्त करून देतो. याच अनुषंगाने लिहिलेल्या कथा विज्ञान-मनोरंजन करून जातात. यातील काही कथांची व्याप्ती हजारो वर्षे भविष्यातील आहे. या कथा मांडताना लेखिकेच्या कल्पना कौशल्याचा कस लागल्याचे दिसते. बऱ्याचदा हे स्वप्नरंजन भासत असले तरी अशक्य नाही, याचीही जाणीव होते. शिवाय काही ठिकाणी शेकडो वर्षांनी विज्ञान याहीपेक्षा कितीतरी प्रगत असू शकते, हेही जाणवते.
एकंदरीत विज्ञान कथा वाचण्यासाठी एक सुंदर खजिना सुधा रिसबूड यांनी मराठी वाचकांसमोर या पुस्तकाद्वारे ठेवल्याचे या पुस्तकातून दिसते.

 

Monday, July 6, 2020

विज्ञान भ्रमंती - निरंजन घाटे

ज्येष्ठ विज्ञान लेखक निरंजन घाटे यांच्या विज्ञान बखरीमधलं हे बहुमूल्य पुस्तक होय. विज्ञान हा विषय किती अद्भुत व सखोल आहे, याची जाणीव करून देणारं हे पुस्तक आहे. मंगळावरील पाण्यापासून माणसांच्या मासेमारी पर्यंत, भुताच्या जन्मापासून माकड आणि माणसांपर्यंत आणि आपल्या आदि पूर्वजांपासून गॅलापेगॉसच्या राक्षसी कासर्वांपर्यंत विस्तृत विज्ञान-ज्ञान देणारे पुस्तक म्हणजे "विज्ञान भ्रमंती" होय. विज्ञानात जितके खोलात जाऊ तितके ते अधिक गहन होत जातं. व ही खोलीच ज्ञानाची कवाडं उघडी करतात. याची प्रचिती हे पुस्तक वाचल्यावर निश्चितच येते.
काही प्रश्नांचा आपण विज्ञानाच्या दृष्टीने अजूनही विचार केलेला नाही. डावे-उजवे का व कसे? लिओनार्दो दा विंची, मिडास राजाची कथा अशा विविध विषयांना लेखकाने या पुस्तकाच्या निमित्ताने संशोधनात्मक रूप दिले आहे.
मानववंशशास्त्र हा माझा आवडता विषय. डार्विनशिवाय हा विषय पूर्णच होऊ शकत नाही. यावरच आधारित "सजीवांची जीवघेणी स्पर्धा" हे सर्वात वाचनीय प्रकरण या पुस्तकात लेखकाने विस्तृत पद्धतीने मांडले आहे. त्यामुळे विज्ञानाच्या अमर्याद विश्वाची छोटीशी भ्रमंती ते निश्चितच करून आणते. याशिवाय विज्ञानाचे सोबती असणारे गणित व इतिहास या विषयांचे महत्त्वही जागोजागी ठळकपणे दिसून येते.

 

Wednesday, June 17, 2020

अंतराळातील मृत्यु - डॉ. संजय ढोले

पुणे विद्यापीठात कार्यरत असणारे डॉ. संजय ढोले यांचे मेहता पब्लिशिंग हाऊसने ५-६ विज्ञान कथासंग्रह प्रकाशित केले आहेत. त्यातीलच 'अंतराळातील मृत्यू' हा एक होय. त्यांच्या डिंभक व अश्मजीव या दोन पुस्तकानंतर वाचलेला हा तिसरा कथासंग्रह होय. त्यांच्या प्रत्येक पुस्तकात लेखक म्हणून त्यांची संशोधक वृत्ती सातत्याने जाणवते. प्रत्येक कथेत मुलविज्ञान अर्थात जीव, भौतिक व रासायन यांचा प्रामुख्याने प्रभाव असतो. विशेष म्हणजे त्या विज्ञान संकल्पनांनी ओतप्रोत भरलेल्या असतात. विज्ञान कशा प्रकारे काम करू शकते? या प्रश्नाचे उत्तर ते आपल्या कथांमधून देत राहतात. हे सर्व कल्पनाविलास असले तरी अशक्यतेचा पल्ला कदाचित गाठू शकणार नाही असेच आहेत.
प्रयोग, संशोधन व शास्त्रज्ञ/प्राध्यापक हे त्यांच्या प्रत्येक कथेत येणारे शब्द. अर्थात त्याची प्रत्येक कथा ही एका प्रयोगात सारखीच असते. तिच्यात विज्ञानाच्या मूल गाभ्याचा प्रकर्षाने समावेश असतो. जयंत नारळीकर, निरंजन घाटे व बाळ फोंडके यांच्या पेक्षा वेगळ्या कथा डॉ. ढोले लिहितात. हे मला प्रामुख्याने सांगावेसे वाटते. त्यांच्या सर्वच कथासंग्रहांमध्ये त्यांची शैली व विज्ञान हे समान धागे आहेत. त्यामुळे मुल विज्ञानाची आवड असणाऱ्यांनी त्यांचे कथासंग्रह निश्चितच वाचावेत.