भूतकाळातील घटनांकडे बघता आणि वर्तमानातील वेगाने बदलणाऱ्या घटनांचा मागवा घेतल्यास भविष्य कसे असेल, याचा थोडा का होईना आपण अंदाज घेऊ शकतो. तंत्रज्ञानातील बदल आणि सामाजिक बदल हे प्रामुख्याने भविष्यामध्ये जाणून घेण्यासारखे असतील. याच पार्श्वभूमीवर आधारित असलेली ही कादंबरी “भविष्य नावाचा इतिहास”.
कादंबरीच्या मलपृष्ठावर काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. जागतिक अर्थव्यवस्था एकाच कॉर्पोरेटच्या हातात जात मक्तेदारीयुक्त ज्ञान विज्ञानाचा स्फोट होईल तेव्हा मानवी भावभावना नातेसंबंध नीती मूल्ये आणि जीवन संघर्ष कसे झपाट्याने बदलतील आणि कोणत्याही स्थितीला सरावू शकणारा माणूस हे भयावह परिवर्तन अंगवळणी पाडून जगण्याचेच मार्ग कसा बदलेल, याचे प्रत्ययकारी दर्शन या कादंबरीत घडते.
कादंबरीचा एकंदरीत सारांश वर दिल्याप्रमाणेच आहे. परंतु त्याचे दर्शन प्रत्ययकारी आहे की नाही याबद्दल थोडासा गोंधळ जाणवतो. जगातील अर्थव्यवस्थेवर आणि एका कारणाने राजकीय व्यवस्थेवर देखील एकाच कंपनीचे राज्य आले तर काय होईल हे कादंबरीतील विविध घटनांमधून आपल्याला समजते. शिवाय सामाजिक मूल्य आज ज्या पद्धतीने बदलत आहेत तशीच बदलत राहिली तर भविष्यात ‘मूल्य’ या शब्दालाच काही मूल्य राहणार नाही. अशा घटना देखील कादंबरीमध्ये मांडलेल्या आहेत. या पुस्तकाचा विषय उत्तम आहे. परंतु अनेक ठिकाणी सुसूत्रता जाणवत नाही. दोन घटनांमधील संबंध अनेक ठिकाणी तुटल्यासारखा वाटतो. बाकी विषय उत्तम. भविष्यातील घटनांवर विचार मंथन करायला लावणारी ही कादंबरी आहे, असं वाटतं.
No comments:
Post a Comment
to: tushar.kute@gmail.com