Showing posts with label शालिवाहन. Show all posts
Showing posts with label शालिवाहन. Show all posts

Tuesday, January 28, 2020

शालिवाहन शक - गोविंद नारायण दातारशास्त्री

महाराष्ट्रावर अनेक वर्षे राज्य करणाऱ्या परकीय शकांचा महाराष्ट्रीय सातवाहनांनी केलेला पराभव ही इतिहासातील एक मोठी घटना होती व त्यातील युद्धही ऐतिहासिकच होते. परंतु, आजवर या विषयावर वाहिलेली कादंबरी वाचनात आली नाही. हाच विषय घेऊन गोविंद नारायण दातारशास्त्री यांनी 'शालिवाहन शक' ही कादंबरी लिहिली आहे. सातवाहनांनी शकांचा महाराष्ट्रातून समूळ नाश केल्यानंतर महाराष्ट्रीय शके परंपरा चालू झाली. इसवी सन ७८ च्या सुमारास सदर युद्ध झाले होते. या युद्धास मध्यवर्ती ठेवून दातारशास्त्रींनी ही कादंबरी लिहिली आहे. विशेष म्हणजे पूर्ण कथा ही नाशिक व परिसरात घडल्याचे दिसते. ती सुरू होते सातमाळा रांगेतल्या पहिल्या अहिवंत दुर्गा पासून.
कथेची नायक-नायिका हे देवरात-कामंदकी आहेत. त्यांना या दुर्गावर बऱ्याच रहस्यमय गोष्टी आढळून येतात. त्याची उकल उर्वरित कादंबरीत करण्यात आलीये. देवरत व कामंदकीसोबत सेनापती शर्विलक हाही कादंबरीतील महत्त्वाचा नायक आहे. अहिवंत गडापासून सुरु झालेला प्रवास सप्तशृंगगड, बल्लीपुर, दंडपुर (दिंडोरी), पालखेड, रामशेज, नाशिक, अंजनीदुर्ग (अंजनेरी) ते गोवर्धनला येऊन विसावतो. दातारशास्त्रीनी त्यांच्या अनोख्या शैलीत ही कादंबरी रंगवली आहे. त्यामुळे इतिहास, पुरातनकाल व रहस्य यात विशेष रुची असणाऱ्यांनाही कादंबरी निश्चित आवडेल.


ऐतिहासिक संदर्भ:
१. क्षत्रप राजा नहपानाचा नाशिकच्या गोवर्धन येथे मोठा राजवाडा होता व तिथेच सातवाहन व शकांचे युद्ध झाले.
२. त्रिरश्मी अर्थात पांडवलेणी काही शकांनी तर काही सातवाहनांनी बांधली आहेत.
३. या युद्धात सातवाहनांनी शकांचा समूळ नाश केला होता.

बिगर ऐतिहासिक नाटकीय संदर्भ:
१. वासिष्ठीपुत्र पुळुमावीने क्षत्रप राजा नहपानाचा पराभव केला, असे कादंबरीत दाखवण्यात आलेले आहे. परंतु, प्रत्यक्ष इतिहासात गौतमीपुत्र सातकर्णीने नहपानाचा पराभव केल्याचे दिसते. पुळुमावी हा सातकर्णीचा मुलगा होता. महाराणी गौतमी बलश्री व सातकर्णी याचा उल्लेख नाशिकच्या पांडवलेणीत देखील आहेत. त्याचा संदर्भ इथे दिसत नाही.
२. चकोर, शिवश्री व हकुश्री सातकर्णी यांचे झालेले उल्लेख.
३. कामंदकी हिने 'कामंदकिय नीतिसार' लिहिल्याचे कादंबरीत म्हटले आहे. प्रत्यक्षात हा नीतिसार कामंदक की कामंदकिने लिहिले यात अजूनही इतिहासकारांत एकमत नाही. शिवाय सदर पुस्तक इसवीसन आठव्या शतकात लिहिले आहे. ते या कादंबरीत पहिल्या शतकात लिहील्याचे दाखवले आहे.
सदर युद्ध हे महाराष्ट्रातील सर्वात पहिले स्वातंत्र्ययुद्ध होते, यात शंका नाही. या ऐतिहासिक घटना आज महाराष्ट्राच्या अतिशय नगण्य लोकांना ज्ञात आहेत. 'शालिवाहन शक' या अनेक दशकांपूर्वी लिहिलेल्या पुस्तकामुळे निदान त्या महाराष्ट्रीय लोकांना समजतील अशी आशा बाळगायला हरकत नाही.