लाखो वर्षांच्या सेपियन्सच्या प्रवासामध्ये घडलेल्या घडामोडींचे वर्णन युवाल नोवा हरारी यांच्या ‘अनस्टॉपेबल अस’ या ग्रंथशृंखलेमध्ये अनुभवता येते. पहिल्या खंडामध्ये माणसाने जग कसं जिंकलं? या प्रश्नाचे उत्तर मिळाले. याच्याच पुढे जग न्याय का नाही? या प्रश्नाचे उत्तर दुसऱ्या खंडामध्ये मिळते.
मनुष्य हा पृथ्वीवरच्या इतर प्राण्यांमधील एक प्राणी असला तरीही त्याने आपल्या मेंदूच्या बळावर अकल्पित अशी प्रगती करून दाखवली. आणि या प्रगतीचा वेग अजूनही वाढतोच आहे. आपल्या मेंदूच्या बळावर त्याने पृथ्वीवर आणि पृथ्वीवरील अनेक प्राण्यांवर नियंत्रण मिळवले. यातूनच तो जग जिंकायला लागला. हजारो वर्षांच्या प्रगतीच्या कालखंडामध्ये अनेक चढ उतार अनुभवत माणसाने स्वतःचे साम्राज्य निर्माण केले आणि यातूनच न्याय-अन्यायाची संकल्पना उदयास झाली. अनेक समस्यांवर त्याने आपल्या बुद्धीच्या बळावर तोडगा काढला. नवनवीन शोध लावले. त्यातून त्याचा आत्मविश्वास बळवला गेला. चांगल्या वाईट गोष्टींची जाण होत गेली. कोणता प्राणी आपल्यासाठी फायद्याचा आहे आणि कोणता नाही? त्याला कळायला लागले. हळूहळू तो शेती करू लागला. काही वर्षांमध्येच शेतीतील पिके देखील त्याच्या नियंत्रणाखाली आली. “ट्रायल अँड एरर” पद्धतीचा वापर करून तो शिकत गेला आणि स्वतःचं इतर प्राण्यांपेक्षा वेगळा अस्तित्व त्याने तयार केलं. हळूहळू त्याच्यामध्ये संघर्ष निर्माण होत गेले. दुष्काळ, पूर, प्राण्यांची रोग, माणसांचे रोग, असंतुलित आहार, कष्टाची काम, उपद्रवी कीटक, झाडांना होणारे रोग, युद्ध आणि गुलामगिरी यासारखी संकटे त्याने अनुभवली. त्यातूनही तो शिकला. माणसांमध्येही काही बुद्धिमान लोक राजे बनू लागले. इतर लोक हळूहळू त्यांचे गुलाम झाले. एक प्रकारची राज्यव्यवस्था तयार झाली. मालमत्ता नावाची संकल्पना उदयास साली. नोकरशाही तयार झाली. शिक्षणाची सुरुवात झाली. माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी नियम तयार झाले. आणि यातूनच न्यायाची संकल्पना देखील उदयास आली. अर्थात हे नियम सर्वांनाच समान पद्धतीने लागू झाले नाहीत. लाखो लोक अतिशय थोडक्यात लोकांचं अर्थात राजांचं, नेत्यांचं ऐकू लागले. हेच राजे नेते न्याय देणारे ठरले. परंतु न्यायाची संकल्पना समानतेकडे झुकली नाही. कदाचित आजही समाजव्यवस्थेतील ही परिस्थिती बदललेली नाही.
अशा विविध गोष्टींचा ऊहापोह करण्याचे काम रंगीत चित्रांद्वारे “अनस्टॉपेबल अस” च्या या खंडामधून होते. इतिहास हा नेहमी शिकवणारा असतो, बोध देणारा असतो. अर्थात इतिहासाच्या मांडणीतूनच तयार झालेला हा ग्रंथ बऱ्याच वेगवेगळ्या शिकवण्या देतो. आणि कदाचित याही पुढे आपली प्रगती न थांबविणारा सेपियन “अनस्टॉपेबल” म्हणूनच राहील, असे दिसते.
पुस्तकाचे नाव: अनस्टॉपेबल अस - खंड दुसरा
लेखक: युवाल नोआ हरारी
अनुवाद: प्रणव सखदेव
प्रकाशक: मधुश्री पब्लिकेशन
— तुषार भ. कुटे
Thursday, January 1, 2026
“अनस्टॉपेबल अस” - खंड दुसरा
Monday, October 28, 2024
२१ व्या शतकासाठी २१ धडे - युवाल नोआ हरारी
मागच्या प्रत्येक शतकानुरूप माणसाने प्रगतीची द्वारे खुली केलेली आहेत. आपले जीवन सहज आणि सुकर होण्यासाठी विविध गोष्टींचा अवलंब केलेला आहे. तंत्रज्ञानाचा विकास केलेला आहे. त्याचा उपयोग आणि दुरुपयोग देखील केलेला आहे. परंतु आत्ताच्या अर्थात एकविसाव्या शतकामध्ये मनुष्य प्रगतीसाठी कोणत्या गोष्टींचा अवलंब करावा? या प्रश्नाचे उत्तर युवाल नोआ हरारी या पुस्तकातून देतात.
हरारी यांचे इतिहासावर टिप्पणी करणारे ‘सेपियन्स’ तर भविष्याचा वेध घेणारे ‘होमो डेअस’ हे पुस्तक यापूर्वी वाचले होते. परंतु २१व्या शतकासाठी २१ धडे हे पुस्तक वर्तमानाचा आणि त्यातून भविष्याकडे जाण्याचा वेध घेणारे आहे.
मानवी जीवनशैली सातत्याने बदलत चाललेली आहे. अर्थात यामध्ये पर्यावरण अथवा वातावरणाचा फारसा प्रभाव नाही. मानवच मानवी शैलीवर प्रामुख्याने प्रभाव टाकताना दिसतो. याच कारणास्तव होणारे सामाजिक बदल आपल्याला स्वीकारावे लागतात. तरच मनुष्य म्हणून आपण या पृथ्वीवर टिकून राहू शकतो. असं म्हणतात की बदल ही एकमेव गोष्ट अशी आहे की जी कधीही बदलत नाही! २१ व्या शतकामध्ये आपण कोणत्या गोष्टी निश्चितपणे ध्यानात ठेवल्या पाहिजेत जेणेकरून पृथ्वीचा पालनकर्ता म्हणून मनुष्यप्राणी निदान हे शतक तरी तग धरून शकेल. याचा सारासार विचार हरारी यांनी या पुस्तकातून केल्याचा दिसतो.
पुस्तकाचे प्रामुख्याने पाच भाग आहेत. यातील पहिल्या भागात तंत्रज्ञानाचे आव्हान, दुसऱ्यामध्ये राजकीय आव्हान तिसऱ्यामध्ये आशा-निराशा, चौथ्या मध्ये सत्य आणि पाचव्यामध्ये लवचिकता या गोष्टींचा प्रामुख्याने विचार केल्याचा दिसतो. तंत्रज्ञानाचे आव्हान हे पहिल्याच भागामध्ये घेतल्याने त्याचे महत्त्व प्रामुख्याने अधोरेखित होते. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळेच मानवी जीवनशैली आणि सामाजिक रचना सातत्याने बदलत आहेत. या शतकात तिचा वेग वाढल्याचे दिसते. हरारी यांनी इतिहासातून बोध घेऊन पुढील वाटचालीतील धोके अतिशय सुयोग्य पद्धतीने नमूद केल्याचे दिसते. अर्थात ललित लेखन नसले तरी ही एक बोधकथा आहे. तंत्रज्ञान माणसाला रसातळाला कसे नेऊ शकते? हे आपल्याला समजते. परंतु याबरोबरच राष्ट्रवाद, धर्मांधता आणि स्थलांतर या गोष्टींवर देखील हरारी प्रकाश टाकतात. राष्ट्रे निर्माण झाल्यानंतर राष्ट्रवादी प्रवृत्ती वाढत गेल्या. धर्माने मानवी जीवनात कट्टरता आणली. आणि स्थलांतरांमुळे स्थानिकांमध्ये असुरक्षितता निर्माण झाली. अर्थात या गोष्टी पुढे बदलत जाणार आहेत. त्या दृष्टीने सावध पावले कशी टाकावीत, याचे उत्तर देखील हरारी देतात.
दहशतवाद, युद्ध यावर त्यांनी परखड मते मांडलेली आहेत. दोन्हीही हिंसक गोष्टी तंत्रज्ञानाच्या तालावर जगात वेगाने पसरताना दिसतात. मानवी प्रगतीतील तो सर्वात मोठा अडथळा आहे. त्याच्या इतिहासातून बोध घेऊन आपल्याला कोणती पावले टाकता येतील, याचे उत्तरही देखील या पुस्तकातून मिळते.
पुस्तकाच्या चौथ्या भागात अर्थात ‘सत्य’मध्ये हरारी यांनी अज्ञान, न्याय, सत्योत्तर काळ आणि विज्ञानकथा या विषयांवर आपल्याशी चर्चा केल्याचे दिसते. मागच्या शेकडो वर्षांपासून यामध्ये सातत्याने बदल झालेला आहे. मागच्या शतकातील ज्ञान, न्याय, विज्ञान हे पूर्ण वेगळं होतं आणि एकविसाव्या शतकामध्ये ते अजून निराळे आहे. हा बदल कसा स्वीकारावा, याची चर्चा हरारी या पुस्तकामध्ये करतात.
अंतिम भागामध्ये अर्थात ‘लवचिकता’ या प्रभागात शिक्षण, आयुष्याचा अर्थ आणि ध्यानधारणा या तीन गोष्टींवर हरारी विश्लेषण करतात. जीवनाचा एक मुख्य भाग म्हणून याकडे पाहता येईल. ज्याची प्रत्येक मनुष्यप्राण्याला नितांत आवश्यकता आहे. तात्विकदृष्ट्या महत्त्वाच्या गोष्टी आपण आपल्या जीवनात कशा पद्धतीने जमवून घ्यायला हव्यात अशा विविध प्रश्नांची उत्तरे हरारी या पुस्तकातून देतात.
याही पुस्तकामध्ये असे अनेक विचार आहेत ते सुविचार म्हणून लिहून ठेवता येतील. परंतु पुस्तक वाचण्याच्या प्रवाहामध्ये त्याची परिणामकारकता अधिक जाणवते, हेही तितकेच खरे.
Monday, July 17, 2023
होमो डेअस: मानवजातीच्या भविष्याचा रोमांचक वेध
हरारी यांचे सेपियन्स हे पुस्तक वाचल्यानंतरच मी त्यांचा मोठा चाहता झालो होतो. भूतकाळामध्ये इतिहासात होऊन गेलेल्या अनेक विचारवंतांबद्दल ऐकलं होतं. त्यांची पुस्तके देखील वाचली. पण आजच्या काळातील खराखुरा विचारवंत कसा असतो, याची माहिती किंबहुना प्रचिती सेपियन्स वाचल्यानंतर आली. सेपियन्स हे मानव जातीच्या इतिहासाचे पुस्तक होते. त्याचाच पुढचा खंड हरारी यांनी होमो डेअस या पुस्तकाद्वारे आणला आहे. हे पुस्तक म्हणजे आधुनिक विश्वाची सांगड घालणारं एक तत्त्वज्ञानाचे पुस्तक आहे. मला तर यातील वाक्यनवाक्य हे आधुनिक सुविचारांशी मिळतं जुळतं आहे, असं वाटलं. बरीच वाक्ये मी अजूनही बाजूला काढून ठेवलेली आहेत. त्यांचे विचार पटतात किंबहुना जुळतात म्हणून हे पुस्तक अधिक भावलं.
मानवी प्रगतीचा वेग पाहता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि जेनेटिक इंजीनियरिंग या तंत्रज्ञानाद्वारे मानवाची भविष्यातील वाटचाल चालू राहणार आहे, असं हरारी म्हणतात. या तंत्रज्ञानाद्वारे कदाचित प्रत्यक्ष अस्तित्वात नसणारा देवही घडविण्याची ताकत मानवात आहे. सेपियन्समध्ये त्यांनी मानवानं देव, पैसा, समानता आणि स्वातंत्र्य यासारख्या काल्पनिक पण सर्वमान्य संकल्पनांवर विश्वास ठेवून सारं जग काबीज केलेले आहे, असं म्हटलं होतं. आणि या पुस्तकामध्ये इथून पुढचे जग मनुष्य कशा पद्धतीने काबीज करेल, याची माहिती दिलेली आहे. भूतकाळाची भविष्याशी घातलेली सांगड हा या पुस्तकातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा वाटतो. आज आपण तंत्रज्ञानाने घेरलेले आहोत. हे तंत्रज्ञान आपल्याला कुठवर येईल याची निश्चित माहिती सांगता येणार नाही. पण सद्य परिस्थिती पाहता इथून पुढे तंत्रज्ञानच मानवी आयुष्यावर नियंत्रण करू शकेल, हे मात्र निश्चित.
आज आपण स्वतःला पृथ्वीवरच्या देवांच्या रूपात घडवत असलो तर नेमके कोणते कार्यक्रम हाती घेतले पाहिजेत? हे हरारी सांगतात. आपला ग्रह आजच्या मानवी करामती पाहता लवकरच मरणाच्या दिशेने प्रवास करताना दिसतो. आपणच आपल्या कबरी नकळतपणे खोदत चाललो आहोत. एकविसावे शतक तंत्रज्ञानाचे असलं तरी त्यातील विनाशकारी तोटे आपल्यावर वर्चस्व गाजवू शकतात. मग यातून बाहेर कसं पडायचं? या मायाजालातून बाहेर पडणं खरोखर सोपं आहे का? याकरता कोणत्या विचारधारेची किंवा नवसंकल्पनेची आवश्यकता आहे? अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं या पुस्तकातून हरारी आपल्याला देतात. कादंबरी किंवा कथा नसली तरी वाचकाला खिळवून ठेवण्याची ताकत लेखकाच्या लेखणीमध्ये आहे.
एकविसाव्या शतकाला आकार देत असताना होऊ शकणारा मानवी प्रवास हा अंधारमय आणि प्रकाशमय अशा दोन्ही वाटा दाखवतो. त्यातली कोणती वाट निवडायची हे मानवानेच ठरवायचे आहे. पुढचं शतक पाहताना मानवी प्रगती कुठपर्यंत वाटचाल करेल? याचा अंदाज हरारी यांना आलेलाच आहे. कदाचित त्यांनी आपल्याला सावध करण्यासाठी या पुस्तकाचा मार्ग अवलंबला असावा.
- तुषार भ. कुटे


