लेखक विनायक होगाडे यांची ‘विठोबा मिसिंग इन पंढरपूर’ ही कादंबरी खऱ्या अर्थाने तिच्या शीर्षकापासूनच वाचकाची उत्सुकता ताणून धरते. केवळ नावातच वेगळेपण नसून, पंढरपुरातून अचानक 'मिस' झालेला विठोबा आपल्याला जे काही वास्तववादी आणि सद्यस्थितीचे जग दाखवतो, ते खरोखरच प्रत्येकाला सखोल विचार करायला भाग पाडते.
अठ्ठावीस युगांपासून पंढरपुरात एकाच विटेवर उभा असणाऱ्या सावळ्या विठ्ठलाला अचानक जाग येते आणि तो थेट आपल्या मंदिरातून बाहेर पडतो. मंदिराबाहेर आल्यावर त्याच्या दृष्टीस एक पूर्णपणे वेगळेच जग पडते. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे, शेकडो वर्षांपासून महाराष्ट्रात जी महान संत परंपरा होऊन गेली, त्याविषयी खुद्द विठ्ठलालाच काहीही माहिती नसते. अशा वेळी या सर्व घडामोडींकडे अत्यंत डोळस आणि प्रगल्भ दृष्टीने पाहणारी रखुमाई विठोबाच्या मदतीला धावून येते. ती स्वतः विठ्ठलाला त्याच्याच भक्तांचे आणि या महान संतांचे दर्शन घडवते. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव यांच्यापासून ते अगदी आधुनिक काळातील अनेक थोर समाजसुधारकांपर्यंतचा एक विलोभनीय प्रवास रखुमाई विठ्ठलाला घडवून आणते.
आपला मराठी समाज जरी महान संत परंपरेने समृद्ध असला, तरी आजचा समाज एका पूर्णपणे चुकीच्या आणि भरकटलेल्या दिशेने प्रवास करत आहे, ही बोचरी जाणीव ही कादंबरी करून देते. तंबाखूचा नैवेद्य मागणारे फेंदरे महाराज आणि आपल्या 'विनोदी' कीर्तनांमधून सातत्याने स्त्रियांना तुच्छ लेखणारे गोविंदा महाराज यांसारखी पात्रे आजच्या काळातील भोंदू बाबांशी आणि स्वयंघोषित विभूतींशी तंतोतंत साम्य दाखवतात. समाज प्रबोधनाची इतकी मोठी देदीप्यमान परंपरा असणारा आपला महाराष्ट्र आज अशा भोंदू लोकांच्या मागे का धावत आहे? हा अस्वस्थ करणारा प्रश्न लेखकाने अत्यंत ताकदीने उपस्थित केला आहे. आजची तरुण पिढी आपल्या संतांच्या खऱ्या विचारांपासून अनभिज्ञ असताना, लेखकाने अत्यंत प्रभावी शैलीत ते विचार वाचकांसमोर मांडण्याचे महत्त्वाचे काम केले आहे.
या कादंबरीतील अनेक विचार आपल्याला अंतर्मुख व्हायला भाग पाडतात. एका ठिकाणी अतिशय सुंदर रूपक वापरले आहे. आपल्याला विठ्ठल धर्माचे जे अमूल्य फळ मिळाले आहे, त्याचे बीज मुळात संत नामदेवांनी रोवले, त्याला संत ज्ञानदेवांनी पाणी घातले, त्याची काळजी संत जनाबाईने वाहिली, त्याला चोखोबांनी खत घातले आणि त्याला एकनाथांनी कुंपणाचे संरक्षण दिले. हे असे फळ आहे की जे एकदा चाखले, की माणसाचा विवेक जागा होतो. तो आंधळ्या श्रद्धेतून आणि फुकाच्या जातीय अहंकारातून कायमचा मुक्त होतो व त्याला खऱ्या ज्ञानाची प्राप्ती होते.
कादंबरीत आणखी एका परिच्छेदात लेखकाने मांडलेला विचार अतिशय मर्मभेदी आहे- संत हे मुळात बंडखोर होते. त्यांनी संस्कृतच्या भिंतीत अडकलेले ज्ञान सर्वसामान्यांसाठी मराठीत आणले. ते कारुण्याचे सागर होते, ज्यांना झोपडीझोपडीत ज्ञानाची गंगा न्यायची होती. मात्र, तत्कालीन समाजाने त्यांचा अतोनात छळ केला. ज्ञानदेवांवार बहिष्कार टाकला, तुकोबांचे अभंग इंद्रायणीत बुडवले, तर एकनाथ महाराजांचे भागवत काशीच्या पंडितांनी गंगेत फेकले. हे संत जिवंत असताना आपण त्यांचा केवळ छळ केला आणि ते मेल्यावर मात्र आपण त्यांच्या पालख्या नाचवत आहोत. इतके सोसूनही ते डगमगले नाहीत; त्यांनी वाळवंटात तरी किमान हा भेदभाव नष्ट केला. मग आता त्यांच्या पुढचे पाऊल आपण टाकायला नको का? नदी जर थबकली तर ती संपते, तिला समुद्राला मिळेपर्यंत पुढेच जावे लागते. तसेच आपणही 'अवघाची संसार सुखाचा' होईपर्यंत ही वैचारिक वाटचाल पुढे नेली पाहिजे.
आपल्या महान संत परंपरेचे असे शेकडो अमूल्य विचार धारण करत ही कादंबरी शेवटाकडे जाते. भूतकाळ आणि वर्तमानकाळातील विविध घटनांची सुयोग्य सांगड घालत ती वाचकाला नव्याने विचार करायला भाग पाडते. या कादंबरीच्या वाचनातून आलेला माझा वैयक्तिक अनुभव सांगायचा तर, मला संत चोखामेळा आणि संत कान्होपात्रा यांच्याबद्दल फारशी सखोल माहिती नव्हती. परंतु या कादंबरीतील प्रसंगांनी मला प्रेरित केले की मी इतर विविध पुस्तकांमधून त्यांची माहिती शोधून काढली. खऱ्या अर्थाने एका चांगल्या साहित्याचे हेच यश असते की ते तुमची वैचारिक चेतना आणि जिज्ञासा जागृत करते. या पुस्तकाने नक्कीच ती चेतना जागृत करण्याचे मोलाचे काम केले आहे, असे मी ठामपणे म्हणेन.
--- तुषार भ. कुटे
#मराठी #पुस्तक #परीक्षण #विठोबा #विठ्ठल #महाराष्ट्र #संत #पंढरपूर

No comments:
Post a Comment
to: tushar.kute@gmail.com