Showing posts with label v v s laxman. Show all posts
Showing posts with label v v s laxman. Show all posts

Saturday, July 16, 2011

एकाच संघाला त्रास देणारे खेळाडू


शिवनारायण चंद्रपालमुळे भारताविरूद्धची शेवटची कसोटी वेस्ट इंडिजने अनिर्णित राखली. त्याच्या शानदार नाबाद शतकाने भारताला वेस्ट इंडिजला लवकर गुंडाळता आले नाही. परिणामी विंडिजचा डाव लांबला. चंद्रपालने यापूर्वीही भारताला अनेकदा अशाच प्रकारे त्रास दिला आहे. विशेषत: भारताविरूद्ध त्याची बॅट तळपली नाही तर नवलच. केवळ चंद्रपालच नव्हे तर जगातील अनेक डावखुरे फलंदाज भारतीय गोलंदाजांची भंबेरी उडविताना मागील दोन शतकांत मी पाहिलेले आहेत. त्यात ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यु हेडन, दक्षिण आफ्रिकेचा गॅरी कर्स्टन, श्रीलंकेचा सनथ जयसुर्या, पाकिस्तानचा सईद अन्वर, झिम्बाब्वेचा अण्डी फ्लॉवर यांचा समावेश होतो. ’कठिण समय येता’ या खेळाडूंनी भारताविरूद्ध नेहमीच आपला सर्व खेळ पणाला लावला होता. त्यांचे व भारतीय गोलंदाजांचे जणू अतुट नातेच तयार झाले होते. कधीकधी आपल्या संघाच्या निम्म्या धावा ह्या हेच खेळाडू करुन टाकत असत. अन्वरने चेन्नईतील एकदिवशीय सामन्यात केलेल्या १९४ धावा व जयसुर्याने कोलंबो कसोटीत केलेल्या ३४० धावा कदाचित भारतीय गोलंदाज विसरू शकणार नाहीत. आपल्या गोलंदाजांना जेरीस आणणारे असे हे फलंदाज होते. अशेस मालिकेचा विचार केल्यास इंग्लंडच्या फलंदाजांना नेहमीच त्रास देणारा ऑस्ट्रेलियन गोलंदाज म्हणजे ग्लेन मॅकग्रा होय. या व्यतिरिक्त गोलंदाज कधीही एखाद्या विशिष्ट संघाला त्रास देताना मात्र दिसले नाहीत.
या यादित भारताच्या दोन फलंदाजांचे नाव मी नक्कीच समाविष्ट करीन. व्ही. व्ही. एस. लक्ष्मण व विरेंद्र सेहवाग. लक्ष्मण-ऑस्ट्रेलिया व सेहवाग-पाकिस्तान यांचे असेच ’अतुट’ नाते आहे. लक्ष्मण व ऑस्ट्रेलिया यांच्या नात्याबद्दल विशेष सांगायलाच नको. आजही हा संघ सचिन-द्रविड पेक्षा लक्ष्मणची जास्त धास्ती घेतो. कदाचित त्यामुळेच त्याच्यासमोर कांगारू गोलंदाज नांगी टाकत असावेत. लक्ष्मणने आजवर केलेल्या सोळा कसोटी शतकांपैकी सहा तर सहा एकदिवशीय शतकांपैकी पाच शतके ही ऑस्ट्रेलिया विरूद्ध केलेली आहेत. केवळ शतकेच नाही तर त्याने अनेक सामने जिंकुन दिलेले आहेत व वाचविलेलेही आहेत. अशाच प्रकारे सेहवागची बॅट नेहमी पाकिस्तानविरूद्ध धावांची बरसात करत असते. त्याचे मुलतानी शतक आजही पाकिस्तानी गोलंदाज विसरणार नाहीत. सचिन-द्रविड सारखे फलंदाज मात्र केवळ एकाच संघाविरूद्ध चालत नाहीत. प्रतिस्पर्धी कोणताही असो, त्यांची बॅट ही सारखीच तळपत राहते.

Sunday, August 8, 2010

लंकाविजय आणि लक्ष्मण

परवाच्या सामन्यात व्ही.व्ही.एस. लक्ष्मणने भारताच्या विजयाची नौका तीरावर पोहोचवून ठेवली लंकादहन साकार करून दाखविले. कसोटीमध्ये कशा प्रकारची खेळी करायची असते, हे लक्ष्मणसोबतच राहुल द्रविडनेही अनेकदा दाखवून दिले आहे. आजही या दोन महान खेळाडूंना युवा पर्याय सापडत नाहियेत.
अझरूद्दीन कर्णधार असताना हैद्राबादच्या लक्ष्मणचे भारतीय संघात प्रदार्पण झाले. दोघेही हैद्राबादी असल्याचा फायदा लक्ष्मणला झाला असावा. पण, संघात प्रवेश झाल्यानंतर त्याने आपल्या खेळीने संघातील स्थान पक्के केले होते. आपल्या नजाकदार खेळीने टिपिकल हैद्राबादी फलंदाजी त्याच्यात दिसून यायची. सुरूवातीच्या काळात तर त्याच्या फलंदाजीवर अझरूद्दीनच्या फलंदाजीची छाप दिसून येत होती. त्यावेळी त्याच्या फलंदाजीत दिसलेले अफलातून टायमिंग मला आजही दिसून येते. कसोटी संघातील स्थान पक्के होत असताना मात्र त्याला एकदिवशीय संघात स्थान टिकवता आले नाही. राहुल द्रविडही खऱ्या कसोटी टाईप खेळाडू असला तरी त्याने एकदिवशीय संघात स्थान पक्के केले होते परंतु, लक्ष्मणला मात्र तसे जमले नाही. सन २००१ मध्ये ऑस्ट्रेलिया संघ भारताच्या दौऱ्यावर असताना कोलकत्याला झालेली ती ऐतिहासिक कसोटी मला अजुनही आठवते आहे. लक्ष्मणने राहुल द्रविडच्या सोबतीने फॉलोऑनवरून भारताचा ऐतिहासिक विजय साकारला होता. त्या कसोटीनंतर खऱ्या अर्थाने लक्ष्मणचा कसोटी क्रिकेटमध्ये दबदबा तयार झाला. नंतरच्या काळात राहुल द्रविडसोबतच्या त्याच्या भागीदाऱ्यांनी भारताला विजय प्राप्त करून दिले होते. द्रविड-लक्ष्मण खेळले भारत हरला, असे कधीच झाले नाही.
लक्ष्मणने आजवर १६ शतके केली आहेत. त्यांपैकी केवळ दोन सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला होता. हे दोन्ही सामने भारताने सिडनी क्रिकेट स्टेडियमवर गमावले आहेत. गेली अनेक वर्षे लक्ष्मण हा राहुल द्रविडच्या सोबतीने मि. डिपेंडेबल बनून राहिला आहे. सचिन-राहुलच्या जमान्यातही त्याने स्वत:च्या फलंदाजीचे वेगळेपण जपले आहे. या दोघांपेक्षाही लक्ष्मण हा टायमिंगच्या बाबतीत उजवाच आहे, हे आवर्जुन नमूद करावेसे वाटते. परवा कसोटीच्या शेवटच्या दिवशी सचिन बाद झाल्यावरही अगदी थंड डोक्याने फलंदाजी करून त्याने भारताचा विजय साकारला. कसोटी क्रिकेटला असणारे वलय आता कमी झाल्याने तो आजच्या तरूणांचा आयकॉन बनू शकत नाही, यामुळे त्याचे महत्व कमी होत नाही. टी-२० च्या जमान्यातील युवकांना कसोटी क्रिकेट खेळताना किती संयम एकाग्रता लागते, हे काय कळणार? त्यामुळे त्यांना द्रविड लक्ष्मण सारखे खेळाडू हे संघावर बोझच वाटत राहणार आहेत. ऑनलाईन वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या कमेंट्समुळे ही बाब मला प्रकर्षाने समजून आली.
सध्या तरी युवा खेळाडूंमध्ये राहुल द्रविड व्ही.व्ही.एस. लक्ष्मणला पर्याय ठरणारे खेळाडू दिसून येत नाहीत. कसोटी क्रिकेट लयाला जाणार असे गृहित धरूनच सध्याच्या क्रिकेटचीप्रगतीचालू आहे. भारताला क्रमवारीत आपले स्थान अग्र ठेवायचे असेल तर लक्ष्मणसारख्या खेळाडूंची खऱ्या अर्थाने गरज आहे...