Friday, October 4, 2013

नारबाची वाडी: Review.

गंभीर विषयाला विनोदी फोडणी दिलेला चित्रपट म्हणजे... ’नारबाची वाडी’! टिपिकल कोकणात चित्रित झालेल्या चित्रपटाने सकस मराठी विनोदाची मेजवानी दिली आहे. गेल्या अनेक दिवसांत मराठी चित्रपटातील विनोद अधिक सकस होत असल्याचे दिसते. याच पठडीतील हा चित्रपट होय. सर्वसामान्यपणे विनोदनिर्मिती करताना कृत्रिमतेची झालर घालावी लागते. परंतु, ’नारबाची वाडी’ हा नैसर्गिक विनोदी चित्रपट आहे. दिलीप प्रभावळकर व मनोज जोशी यांच्या अत्यंत प्रभावी भुमिका, मंगेश धाकडेचे प्रसंगानुरूप येणारे श्रवणीय संगीत, चित्रपटाचा वेग कुठेही न मंदावता त्याची सलगता जपणारे अदित्य सरपोतदारचे दिग्दर्शन व प्रामुख्याने गुरू ठाकूरची पटकथा, संवाद व गीते ही या चित्रपटाची बलस्थाने आहेत! दिलीप प्रभावळकर व मनोज जोशी यांना तोडच नाही. शिवाय निखिल रत्नपारखी, विकास कदम, किशोरी शहाणे, अतुल परचुरे यांनीही त्यांना उत्तम साथ दिलीय. ’देऊळ’ नंतर मंगेश धाकडेचे संगीत पुन्हा उत्तमच झालंय. चित्रपटाचे निम्मे यश हे गुरू ठाकूरमुळे आहे, असे म्हणायला हरकत नाही. त्याची ’नारू म्हणे...’ ही वचने फारच उत्तम, शिवाय ’गझाल खरी काय...’ व ’शबाय शबाय...’ ही दोन्ही गीते सुंदर जमून आलीयेत. 


नाशिकमध्ये या चित्रपटाचे दुसऱ्या आठवड्यात शोज वाढविण्यात आलेत! ४.५ रेटिंग्जचा हा चित्रपट ’Must watch' कॅटेगरीतला आहे!

Sunday, September 29, 2013

सेल्युलॉईड

सेल्युलॉईड... या वर्षीचा सर्वोत्तम मल्याळम चित्रपट...!!! केरळमध्ये तयार झालेल्या पहिल्या चित्रपट निर्मितीची ही कहाणी होय. जे. सी. डॅनियल या उत्साही व धडपड्या तरूणाने ’विगतकुमारन’ या पहिल्या मल्याळी चित्रपटाची निर्मिती सन १९२८ मध्ये केरळात केली होती. त्याची कहाणी (शोकांतिका!) सांगणारा चित्रपट म्हणजे... सेल्युलॉईड!


चित्रपटाच्या फिल्मला इंग्रज लोक सेल्युलॉईड म्हणत. डॅनियलने बनविलेल्या पहिल्या चित्रपटाची प्रिंट उपलब्ध नसल्याने तो अनेक वर्षे ’Pioneer of Malayalam Cinema' म्हणून ओळखला गेला नाही. परंतु, एका सिनेपत्रकाराने त्याची कहाणी उजेडात आणली. ती दिग्दर्शक कमलने अप्रतिमरित्या पडद्यावर सादर केलीय! चित्रपटाच्या सुरूवातीलाच नंदू माधव यांचे दादासाहेब फाळके म्हणून दर्शन होते. त्यांच्या एका मराठी चित्रपटाचे चित्रिकरणही यात दाखविण्यात आले आहे. डॅनियलची धडपडी वृत्ती, त्याला त्याची पत्नी जॅनेटची मिळालेली साथ, अभिनेत्री मिळविण्यासाठी झालेला संघर्ष व दलित असल्याने तीची झालेली शोकांतिका, उतारवयातील डॅनियल, मूळचा तमिळ असल्याने केरळ सरकारने त्याची केलेली हेळसांड या सर्वांची सुंदर मांडणी या चित्रपटात दिसते.

Friday, May 17, 2013

मराठी संगीताविषयी थोडं हेही वाचा.

Saturday, May 11, 2013

कॉमेडी एक्सप्रेसची लोकप्रिय पात्रे

मराठीमध्ये सध्या सुरू असलेल्या सिरियल्सपैकी ई टीव्ही मराठी वरील ’कॉमेडी एक्सप्रेस’ ही सर्वात विनोदी मालिका होय . तीच्या लोकप्रियतेमुळे ती आज ५०० व्या भागाकडे कूच करित आहे. प्रशांत लोके व आशिष पाथरे या लेखकांच्या लेखनीतून ’कॉमेडी एक्सप्रेस’ मध्ये अनेक पात्रे जन्माला आली. शिवाय ती खूप लोकप्रिय झाली. या मालिकेत दर्जेदार विनोदांचा भरणा असल्याने तीची लोकप्रियता आजही ओसरलेली नाही. याचे श्रेय लेखक व या पात्रांना द्यायला हवे. या पात्रांचा घेतलेला हा छोटासा वेध.

मिस्टर ’ह’
आशिष पवार साकारत असलेले हे पात्र होय. प्रत्येक शब्दाची सुरूवात ’ह’ ने करणारे हे पात्र खूप लोकप्रिय झाले होते. कदाचित, तोच तोच पणा येत असल्याने सध्या त्याचे प्रयोग बंद असावेत.

चमडी बाबा
भूषण कडू साकारत असलेला हा ढोंगी बाबा होय. ’चंद्रकांत महादेव डिकोस्टा’ असे त्याचे पूर्ण नाव! या चमडी बाबाची कृत्ये आजवर अनेकांनी उघडकिस आणली आहेत.

प्रद्युम्न मराठे
मराठी भाषेचा हा प्रकांड पंडित आशिष पवार साकारतो. या पात्रासाठी लिहिलेला ऍक्ट लेखकाची कसोटी घेणारा ठरतो, हे मात्र नक्की.

कॉमन मॅन
अष्टपैलू आशिष पवार साकारत असलेले हे आणखी एक पात्र. सामान्य माणसाच्या नजरेतून विविध घटनांची मीमांसा करणारे हे पात्रही लेखकाची कसोटी घेणारे ठरते!

अमरजित हिरवे
 


वयाच्या ८० च्या वर्षी तरूण मुलींवर लाईन मारणारा हा म्हतारा आशिष पवार साकारतो!

मी-मो
मी-मो अर्थात मीरा मोडक होय. सदान कदा याला त्याला बोअर करणारी मी-मो कॉमेडी एक्सप्रेसमध्ये बरीच कुप्रसिद्ध आहे!

डॉ. भगेंद्र
कॉमेडी एक्सप्रेसमधील सर्वांचे लाडके अरूण कदम हे पात्र साकारतात. भगेंद्र हा एक बोगस डॉक्टर आहे!

डॉ. महिपाल
 
हा ज्युनियर भगेंद्र होय! ही भूमिका समीर चौघुले साकारतात. हाही एक पेशंट न मिळत असलेला बोगस डॉक्टर होय!

मिश्किल बगळे

एका वृत्तवाहिनीवरील पत्रकाराची भूमिका वठविणारे सागर कारंडे अर्थात मिश्किल बगळे होय. वृत्तवाहिनीवर एखाद्याला बोलावून त्याची इज्जत घ्यायची कला यांना चांगलीच अवगत आहे!

इन्स्पेक्टर कवी
 
 

अर्थात कमलाकर सातपुते होय. डिपार्टमेंट मुळे कविता न करता येण्याची खंत हा कवी सतत दाखवित असतो. त्याचा कविता संग्रहही प्रसिद्ध झालाय... एके दिवशी काय जाहले...!!!

महाप्रश्ने
 

किशोर चौघुले साकारत असलेले हे पात्र होय. आपल्या प्रश्नांच्या भडिमाराने समोरच्याला बेजार करून टाकणारा हा असा महाप्रश्ने आहे!

का. न. केसे
 

विकास समुद्रेच्या लेखणीतून अवतरलेला व तो स्वत: साकारत असलेली ही भुमिका होय. पूर्ण कानांवर केस असलेला हा म्हतारा त्याच्या बोलण्याच्या वेगळ्या शैलीने परिचित आहे.

बंडू आणि मास्तर


कॉमेडी एक्सप्रेसमधील सर्वात लोकप्रिय जोडी. मास्तरांशी वाद घालणारा व त्रास देणारा बंडू या ऍक्टमध्ये दिसतो. सर्वाधिक प्रयोग यांचे झाले असावेत. बंडू आशिष पवार तर मास्तर अभिजित चव्हाण साकारतात.

मोरू आणि मास्तर
 
 


शास्त्रज्ञ मोरू अर्थात भूषण कडू व मास्तर अर्थात अभिजित चव्हाण यांचा हा ऍक्ट आहे. दरवेळी नवा शोध लावण्याचा दावा करणारा मोरू मास्तरांकडून पकडला जातो.

पार्थ आणि त्याचे बाबा
 

विचित्र कल्पक विचारांचा पार्थ अभिजित चव्हाण तर त्याचे बाबा भूषण कडू साकारतो.

ऍडव्होकेट चढ्ढा आणि मनोज
 

अभिजित चव्हाण व भूषण कडू यांचा हा तिसरा सुप्रसिद्ध ऍक्ट होय. निरनिराळ्या खटल्यांत साक्षीदार म्हणून बोलाविलेल्या मनोजला दरवेळेस चढ्ढा हाकलून लावतात!

चिमण आणि चतुर
 

कमलाकर सातपुते व समीर चौघुले यांचा पुणेरी मित्रांची ही पात्रे होय. जुन्या मराठी सिनेमातील पात्रांप्रमाणे चोपुन-चापून मराठी बोलतात!

चिमण आणि चंद्रिका


कमलाकर सातपुते व शैला काणेकर यांचा हा ऍक्ट. दोघेही जुन्या मराठी चित्रपटांतील नवरा-बायको दाखविले जातात.

याशिवाय अनेक नवनवे प्रयोग कॉमेडी एक्सप्रेसमध्ये केले जातात. एक वेळ नक्की पाहा. त्यांचे सर्व व्हिडिओ युट्युबवर उपलब्ध आहेत.

कापूस

कधी कधी काही विनोद किती सहज असतात पण, खूप हसवून जातात. विनोद लिहिणारे किती विनोदी प्रकारे विचार करत असतील याचा विचार करावा लागतो. काही महिन्यांपूर्वी असाच एक विनोद मी ऐकला होता. तो तयार करणारा कदाचित पुण्याचा असावा. 
फोनची रिंग वाजते.
"हॅलो..."
"हॅलो, कापूस आहे?"
"हो आहे..."
"मग ठेवा की खिशात!". फोन कट.

थोड्या वेळाने पुन्हा फोनची रिंग वाजते.
"हॅलो..."
"हॅलो, कापूस आहे?"
"हो आहे..."
"मग ठेवा की खिशात!". फोन कट.

दहा मिनिटांनी पुन्हा फोनची रिंग वाजते.
"हॅलो..."
"हॅलो, कापूस आहे?"
[वैतागून] "नहिये...!!!"
"मग काढा की खिशातून....!!!!". फोन कट.

Saturday, April 6, 2013

मराठीतूम मल्याळम (भाग-२, व्यंजनांची ओळख)

आज आपण मल्याळम भाषेतील व्यंजनांची ओळख करून घेऊयात. भारतातील सर्वच भाषांमध्ये समान व्यंजने वापरली जातात. त्यांत अगदी चार-पाच टक्क्यांचा फरक दिसून येतो. मल्याळम व मराठीतील व्यंजने व त्यांचे उच्चार हे सारखेच आहेत. फक्त मल्याळम मध्ये ’क्ष’ व ’ज्ञ’ नाहीत. त्या जागेवर ’ष’ व ’ळ’ चा उच्चार असणारे वर्ण आहेत. त्यांचा उच्चार मूळ मल्याळम भाषिकालाच विचारावा लागेल! तत्पूर्वी खालील व्यंजनांची माहिती पाहा. 
 
क = ക
ख = ഖ
ग = ഗ
घ  = ഘ
च = ച
छ = ഛ
ज = ജ
झ = ഝ
ट = ട
ठ = ഠ
ड = ഡ
ढ = ഢ
ण = ണ
त = ത
थ = ഥ
द = ദ
ध = ധ
न = ന
प = പ
फ = ഫ
ब = ബ
भ = ഭ
म = മ
य = യ
र = ര
ल = ല
व = വ
श = ശ
ष = ഷ
स = സ
ह = ഹ
ळ = ള
ऴ =

ऱ =

Thursday, April 4, 2013

छे


गुजराती भाषेत ’आहे’ ला समानार्थी शब्द ’छे’ आहे. त्यामुळे त्याचा खूपदा वापर वाक्यरचनेत होत असतो. याशिवाय बंगाली व नेपाळी भाषेतही याच प्रकारचा शब्द वापरण्यात येतो. या ’छे’ वरून काही विनोद हिंदी व मराठी चित्रपटांत तयार झाले होते. त्यांचा हा थोडा गोषवारा.

प्रसंग १:
फू-बाई-फू
झी मराठी फू-बाई-फू मध्ये दुसऱ्या वा तिसऱ्या पर्वामध्ये विकास समुद्रे व आरती सोळंकी यांचा एक ऍक्ट होता. त्यामध्ये विकास समुद्रे हा एक कोकणी माणूस असतो व आरती ही एक गुजराती मुलगी असते. दोघेही आपापल्या भाषेत संवाद साधत असतात. आरतीच्या तोंडी सतत छे.. छे.. सारखे शब्द बाहेर पडत असतात. तेव्हा विकास तीला म्हणतो, ’तुमच्यात काय फक्त ’छे’च असतं काय...? सात-आठ नसतं काय...?’

प्रसंग २:
चित्रपट चुप-चुप के
राजपाल यादवचे विनोद या चित्रपटात खूप प्रसिद्ध झाले होते. गुजराती येत नसल्याने काही वाक्यांचा तो वेगळाच अर्थ काढतो व त्यामुळे त्याला विनाकारण मार खावा लागतो. त्यानंतर शक्ति कपूर त्याला सोडवून जेवणासाठी बाहेर बसवतो. राजपालला जेवणात वाढलेली पोळी खूपच जाड असल्याने तो आचाऱ्याला म्हणतो, ’इसको सूखा कैसे खाऊ? इस के साथ अचार मिलेगा?’
आचारी गुजराती असल्याने त्याला वाटते की, अचार म्हणजे आणखी चार पोळ्या हा मागतो आहे. मग तो राजपालला चार पोळ्या आणखी मोजून देतो.. एक, बे, त्रैण, चार...
आधीच वैतागलेला राजपाल अर्थात बांडिया उद्वेगाने म्हणतो, ’ये क्या....!!!! छे...!!!’
आचाऱ्याला वाटते, याला सहा पोळ्या हव्या आहेत. तो आणखी दोन पोळ्या त्याला देतो... पांच... छह...!!!

प्रसंग ३:
चित्रपट नवरा माझा नवसाचा
सचिन-सुप्रियाच्या एसटीने गणपतिपुळे प्रवासाची ही विनोदी कहाणी आहे, हे सर्वांना माहितच असेल. त्यांच्या बसमध्ये एक पारशी म्हातारी बसलेली असते. तीच्या दोन मुलींबद्दल सांगताना ती म्हणते...’मारी डिकरी छे ना ती चिपलूनमां छे.... अन बिजी डिकरी छे ना ती मानगांवमां डाक्टर छे...’
यावर सचिन म्हणतो, ’...आणि तीजी?’
’त्रीजी नथी... दोनच छे...’
कंडक्टर अशोक सराफ हे सर्व ऐकत असतो. त्या म्हातारीचे शेवटचे वाक्य ऐकुन तो उद्गारतो, ’दोनच आहेत आणि.. छे...छे म्हणतीये...!!!’.

Wednesday, April 3, 2013

आयपीएल आणि पाणी

आयपीएलच्या सामन्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या पाण्यावरून सध्या युद्ध सुरू झाले आहे. महाराष्ट्रात होणाऱ्या सामन्यांसाठी दर सामन्याला आठ लाख लिटर पाणी लागणार आहे. असे १६ सामने महाराष्ट्रात होतील. म्हणजेच वानखेडे स्टेडियम, मुंबई व एमसीए स्टेडियम, गहुंजे (पुणे) येथील सामन्यांत आयपीएलच्या काळात ऐन उन्हाळ्यात सुमारे पन्नास लाख लिटर पाणी लागेल. एका अर्थाने महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना या लाखो लिटर पाण्याची नासाडी होणार आहे. सामन्यांसाठी वापरले जाणारे पाणी हे सार्वजनिक असल्याने हा पाण्याचा अपव्ययच आहे. त्यावर तातडीने उपाय करण्याची गरज आहे. बीसीसीआयचे राजीव शुक्ला हे महाराष्ट्रातून खासदार म्हणून गेल्याने त्यांनीच या बाबीची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. केवळ आयपीएल मधून पैशाचा वर्षाव होतो म्हणून दुष्काळी परिस्थितित पाण्याचा अपव्यय करू नये. भविष्यातही पाण्याच्या बाबतीत मैदानांनी स्वयंपूर्ण होणे, ही काळाची गरज ठरणार आहे. इंग्लंडच्या कौंटी क्लबमधील मैदाने तसेच ऑस्ट्रेलियातील गाबा स्टेडियम व विंडेजचं किंग्ज्टन ओव्हल ही मैदाने रेनवॉटर हार्वेस्टिंगचे प्रकल्प राबवितात. असे प्रकल्प आपल्या राज्यातही राबविता येतील. पावसाळ्यात मैदानातील व मैदानाच्या छतावरील पाणी साठवून त्याचा वापर मैदानासाठी करता येऊ शकतो. बडोद्याच्या मैदानात अशा प्रकारची योजना राबवली जाते. पुढील काळात आपल्यालाही त्याची गरज भासणार, हे निश्चित!