Showing posts with label seashore. Show all posts
Showing posts with label seashore. Show all posts

Thursday, February 13, 2020

प्लास्टिक पासून मुक्ती

महाराष्ट्रातील समुद्र किनारे प्लास्टिकच्या बारीक कणांमुळे अधिक प्रदूषित झाल्याचे निरीक्षण पणजी स्थित 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्रफी' या संस्थेतर्फे नोंदविण्यात आले आहे. शिवाय नेदर्लंड्सच्या एका प्रसिद्ध जर्नलमध्ये ही या संदर्भातला लेख प्रसिद्ध झाला आहे. मनुष्यप्राणी निसर्गामध्ये करत असलेल्या लुडबूडीचा व विशेषतः निसर्गाच्या हानीचा हा एक मोठा पुरावाच मानावा लागेल. रसायन शास्त्राने मानवाच्या हाती दिलेला एक घातक पदार्थ म्हणजे प्लास्टिक होय. तसा तो घातक नाहीये, परंतु मानव प्राणी ज्या प्रमाणे त्याचा वापर करत आहे ते पाहता तो घातकच बनत चाललाय! कोकणातल्या मुक्त समुद्रकिनाऱ्यांवर गेल्या काही वर्षांपासून पिकनिकच्या नावाखाली होणारी गर्दी वाढत चालली आहे. त्यामुळे मानवनिर्मित कचऱ्याचीही वाढ होत आहे. त्यात प्लास्टिक कचरा हाच सर्वात मोठ्या प्रमाणात समुद्रकिनाऱ्यांवर टाकला जातो. देशाचे 'सुजाण' नागरिक म्हणून निसर्गाची हानी आपण अशाप्रकारे करतच असतो. त्याची परिणिती किनाऱ्यावरील कचर्‍यात वाढ होण्यामध्ये झालीये. राज्यात लागू झालेल्या प्लास्टिकबंदी नंतरही ते वापरण्यात तीळमात्रही फरक पडलेला नाही. मुख्यतः शासनातही त्यात फारसे घेणेदेणे उरलेले नाही, असेच दिसते. निदान सर्वांनी या देशाचे 'सजग' नागरिक म्हणून तरी आपली जबाबदारी ओळखायला हवी व आपल्या सोबत निसर्गाचाही प्लास्टिक पासून मुक्ती द्यायला हवी.