Thursday, January 29, 2026

श्रद्धांजली अजितदादा

मागच्या तीन ते चार दिवसांपासून सतत धावपळ चालू होती. परंतु आजचा दिवस बऱ्याच दिवसांनी आरामातच होतो असंच म्हणावं लागेल. सकाळी ज्ञानोबाला शाळेत सोडून आलो. सगळ आवरलं. आणि कामाला सुरुवात करणार तोवर अजित पवारांच्या अपघाताची बातमी समाजमाध्यमांवर तसेच विविध चॅनेल्सला दिसायला लागली होती. आणि थोड्याच वेळामध्ये अजितदादांचा या अपघातामध्ये मृत्यू झाल्याची वार्ताही आली. सर्व काही अनपेक्षित होतं. आणि धक्कादायक देखील. अजित पवारांसारख्या नेत्याचे इतक्या लवकर जाणे मनाला पटले नाही. काही बातम्यांवर फक्त अपघात झाल्याचे दाखवत होते तर काही ठिकाणी त्यांचे निधन झाल्याचेही वृत्त होते. परंतु प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाच्या अधिकृत माहितीवर आम्ही विश्वास ठेवला. नंतर सर्वत्रच त्यांच्या निधनाची बातमी आली. मन सुन्न झाले. खरंतर अशा प्रकारची बातमी आम्हालाच नाही तर महाराष्ट्रातील कोणालाच अपेक्षित नव्हती. सातत्याने कामात गुंतलेले अजितदादा वयाच्या ६६ व्या वर्षी अनंतात विलीन झाले. त्यानंतरचे दोन तास फक्त टीव्हीवरच्या बातम्या पाहत होतो. कामात देखील लक्ष लागले नाही. असे कसे झाले असावे? यात काही घातपात तर नाही ना? अशाच वेगवेगळ्या प्रश्नांचे मनात काहूर माजले होते. महाराष्ट्रातील जनतेच्या मनावर राज्य करणारा आजच्या काळातील नेता हे जग सोडून गेला होता.
दुपारी पीएचडीच्या रिव्ह्यूसाठी मला कॉलेजला जायचे होते. माझा रिव्ह्यू आज नव्हताच. पण इतर दोघांच्या रिव्ह्यूसाठी जाणे भाग होते. आज सकाळच्या बातमीमुळे मी अस्वस्थ होतो. कुठे बाहेर जाण्यासाठी अनुत्सुकदेखील. तरीसुद्धा जाणे भाग होते. गाडी काढली आणि ती चालवत असतानाच सातत्याने वाटत होते की आजचा रिव्ह्यू रद्द होईल. थोड्याच वेळात समजले की आज सर्वच महाविद्यालयांना सुट्टी दिलेली आहे. पण आमचा रिव्ह्यू मात्र होणार होता. आज पहिल्यांदाच इतक्या अनुत्सुकतेने महाविद्यालयात पोहोचलो. मनात अजूनही ती बातमी घर करून होती. कदाचित या वर्षातील ती सर्वात बातमी वाईट बातमी असावी.

--- तुषार भ. कुटे


 

No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com