रोजच्या जीवनामध्ये सातत्याने संघर्षाचा सामना करणाऱ्या शिवानंद या मुलाची ही गोष्ट. तामिळनाडूतल्या एका छोट्याशा गावामध्ये तो राहत असतो. घरामध्ये आई, बहीण आणि तो असे तिघेजण. एका जमीनदाराच्या भल्यामोठ्या केळीच्या शेतांमध्ये केळीचे घड वाहण्याचे काम त्यांचे कुटुंब करत असते. शिवानंद शाळेत जायचा परंतु सुट्टीच्या दिवशी त्याला आई आणि बहिणीला मदत म्हणून केळांचे घड वाहण्याचे काम करावे लागायचेच. यातून येणारे त्यांचे उत्पन्न अत्यंत तुटपंजे होते. स्वतः शिवानंद शाळेमध्ये हुशार मुलगा होता. तो अतिशय आनंदाने शाळेमध्ये शिकायला जायचा. परंतु त्याला केळी वाहण्याचे काम आवडत नव्हते. ते टाळण्याकरता तो विविध क्लुप्त्या आजमावायचा. या गावातील जवळपास सर्वच लोक त्या केळीच्या शेतावर कामाला होते. एक दिवस जरी कामाला गेले नाही तरी जगण्यासाठी संघर्षाची परिस्थिती होती. बागायतदार देखील इथल्या लोकांना पिळून काम करायला लावायचा. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये शिवानंदाचे शिक्षण आणि काम सातत्याने चालू होते. आपली बहीण वेंबू आणि सख्खा मित्र शेखर हे त्याच्या अत्यंत जवळचे. परंतु एके दिवशी अचानक एक भयावह घटना त्याच्या आयुष्यामध्ये घडते. अगदी नशिबानेच तो स्वतः त्यातून वाचतो. आणि चित्रपट संपतो.
चित्रपटाची गोष्ट गरिबीचे आणि संघर्षाचे विविध कंगोरे दाखवणारी आहे. आजही भारतातील बऱ्याच ग्रामीण भागातील लोकांना रोजच्या जीवनासाठी संघर्ष करावा लागतो. शिक्षण की उदरभरण? यातून एकाची निवड करावी लागते. त्याचेच प्रातिनिधिक उदाहरण म्हणजे शिवानंद होय. शेवटच्या प्रसंगांमध्ये तर त्याला कित्येक वेळा अन्नापासून वंचित व्हायला लागते. आपल्या जवळच्या व्यक्ती गेल्यानंतरही पोटाची भूक त्याला शांत बसू देत नाही. एका हृदय द्रावक घटनेने चित्रपटाचा शेवट होतो. शेवटी दाखवलेल्या श्रेय नामावलीमध्ये सदर घटना चित्रपट सत्यघटनेवर आधारित आहे, असे दाखवले जाते. त्यामुळे शेवट मनामध्ये अधिकच घट्ट रुतून बसतो.
--- तुषार भ. कुटे

No comments:
Post a Comment
to: tushar.kute@gmail.com