आपला देश म्हणजे राजकीय नेते आणि अभिनेते यांच्यावर भरभरून प्रेम करणारा देश. परंतु, हे प्रेम सर्वांनाच मिळत नाही. आपल्या कार्यातून, व्यक्तिमत्वातून लोकांच्या मनावर राज्य करणारे अतिशय कमी लोक आपल्या देशात आहेत. त्यातीलच एक अजितदादा पवार.
सकाळी सकाळीच आलेल्या त्यांच्या निधनाच्या बातमीने सर्वच जण सुन्न झाले. अजितदादा इतक्या लवकर जाऊच शकत नाहीत. अशीच सर्वांची भावना होती. परंतु सत्य हे कटू असते. याची जाणीव काल प्रकर्षाने झाली. ज्या व्यक्तीला आपण कधीच भेटलो नाही आणि केवळ बातम्यांमधून पाहत आलेलो आहे, त्यांच्याविषयी इतके वाईट का वाटावे? हा प्रश्न मला पडला.
खरंतर या व्यक्तीने आपल्या कामांमधून, धडाडीतून जी ओळख निर्माण केली तीच ओळख मनामध्ये घर करून राहिली होती. आपल्या राज्याला असाच नेता हवा आहे, ही भावना मनात तयार झाली होती. राज्याला सांभाळणारा नेता असाच असेल, असं वाटू लागलं होतं. पुढची अनेक वर्षे महाराष्ट्र ज्याच्या हातामध्ये बिनधास्तपणे सोपवू शकतो, असा हा नेता होता. परंतु त्याच्या अकाली जाण्याने बसलेला धक्का पचवू शकलो नाही. एखाद्या राजकीय नेत्याबद्दल पहिल्यांदाच इतक्या प्रकर्षाने वाईट वाटले. कालपासून अवघा सोशल मीडिया दादांवरील बातम्यांनी आणि भरभरून लिहिल्या गेलेल्या लेखांनी ओसंडून वाहतो आहे. ही त्यांच्या कामाची आणि लोकांच्या प्रेमाची खरी पावती आहे. अनेक व्यक्तिमत्त्वांच्या जाण्याने तयार झालेली पोकळी भरून काढता येत नाही. अजितदादा देखील त्यातीलच एक. आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये त्यांच्या नावाशिवाय काहीही लिहिले जाणार नाही, हे निर्विवाद सत्य आहे. शिवाय त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन नव्या पिढीतील नेते तयार होतील जे महाराष्ट्रा च्या प्रगतीचा वेग असाच कायम चालू ठेवतील, अशी आशा बाळगूया. हीच अजितदादांना खरी श्रद्धांजली ठरेल.
--- तुषार भ. कुटे.
(कोणत्याच राजकीय नेत्याबद्दल मी आजवर काहीच लिहिलेले नाही. पण आज राहावले नाही.)
Thursday, January 29, 2026
अजितदादा
Subscribe to:
Post Comments (Atom)

This comment has been removed by the author.
ReplyDelete